30 Jun 2024

टी-२० वर्ल्ड कप विशेष लेख

वो ‘फॅमिलीवाला फीलिंग’...
---------------------------------

भारतीय संघाच्या विजयानंतरच्या जल्लोषात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे प्रत्येक सदस्याचे एकमेकांशी असलेले घट्ट बंध. याला कारण अर्थातच कुटुंबप्रमुख राहुल द्रविड... अशी काय जादू केली द्रविड मास्तरांनी?


शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सगळा देश जल्लोषात बुडून गेला होता. भारताने तब्बल ११ वर्षांनी आयसीसी क्रिकेट ट्रॉफी जिंकली होती. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर हार्दिक पंड्याच्या शेवटच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेने एक धाव काढली आणि भारताचा सात धावांनी विजय निश्चित झाला. कुठलीही मोठी स्पर्धा जिंकली, की खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरत नाही. प्रत्येक जण आपापल्या शैलीत तो साजरा करतो. मात्र, शनिवारी रात्रीचा भारतीय संघाचा जल्लोष काही वेगळाच भासला. तो अधिक भावनिक, अधिक सच्चा, अधिक संतुलित व म्हणून अधिक प्रगल्भ वाटला.
भारताला विजय मिळाल्याबरोबर कर्णधार रोहित शर्माने स्वत:ला मैदानात झोकून दिलं. हार्दिकही खाली बसला. पॅव्हेलियनमधील सपोर्ट स्टाफ आणि इतर राखीव खेळाडू मैदानात धावत निघाले. प्रत्येक जण अतीव आनंदानं न्हाऊन निघाला होता. सगळे जण एकमेकांना मिठ्या मारत होते, रडत होते, नाचत होते. एरवी कधीही भावनांचं प्रदर्शन न करणारा राहुल द्रविडही भावोत्कट झाला. महंमद सिराजला तर अश्रू आवरत नव्हते. विराटने त्याच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला. त्यात तो त्याच्या लहान मुलीशी गप्पा मारताना दिसला. रोहितने भावपूर्ण पद्धतीने मैदानातील मातीची चव घेतली. अतीव कष्टाने मिळालेल्या विजयाची चव कशी असते, हेच जणू तो पाहत होता!
संघाला करंडक प्रदान करताना रोहित ऐटबाज पद्धतीने पावले टाकत आला आणि मोठ्या जल्लोषात त्याने तो करंडक स्वीकारला. नंतर संघाने केलेला आनंदोत्सव अभूतपूर्व होता. रोहित आणि विराट या दोघांवर सर्वांचं लक्ष होतं. भारताचा तिरंगा अंगावर लपेटून या दोघांनी सर्व मैदानाला फेरी मारली. प्रशिक्षक राहुल द्रविडला ते विसरले नाहीत. सर्व खेळाडूंनी मिळून राहुलला हवेत उचललं आणि आपली कृतज्ञता व्यक्त केली. संघातले सगळे खेळाडू एकमेकांना घट्ट आलिंगन देत होते आणि अश्रू ढाळत होते. रोहित त्याच्या मुलीला खांद्यावर घेऊन सगळीकडं मिरवत होता. हार्दिक पंड्यानं अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि गेल्या तीन-चार महिन्यांत त्याच्याविरुद्ध जे ट्रोलिंग झालं, त्याविषयी सूचक बोलून मन मोकळं केलं. प्रत्येक जण एकमेकांचं कौतुक करत होता. या सगळ्यांतून या सर्व खेळाडूंमधले घट्ट बंध सहज दिसून येत होते.
हे चित्र एका दिवसात तयार झालेलं नाही. यामागे ‘राहुल द्रविड फॅक्टर’ आहे. राहुल द्रविड कसा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पटकन स्वत:कडे श्रेय न घेणारा, संयमी, शांत, अतिशय निगर्वी, कुटुंबवत्सल, साधा आणि अभ्यासू अशी त्याची प्रतिमा आपल्या मनात आहे. राहुल जसा आहे तसंच कालचं आपल्या संघाचं वर्तन होतं. दहा-बारा वर्षांपूर्वीचे रोहित आणि विराट आठवून बघा. त्यातही विराट. ‘दिल्ली का गुंडा’ अशीच त्याची प्रतिमा होती. तिथपासून ते कालच्या कुटुंबवत्सल, जबाबदार, प्रेमळ पित्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास कौतुकास्पद आहे. त्याची पत्नी अनुष्का अनेकदा विनाकारण ट्रोल होते. मात्र, आपल्याला बदलवण्यात तिचा मोठा वाटा आहे, हे विराटनं अनेकदा जाहीरपणे कबूल केलं आहे. विराट आता मुंबईत राहतो, हेही लक्षणीय आहे. रोहितचा स्वभावही वेगळ्या धर्तीवर आक्रमक आहे. मात्र, काल त्याने संयमितपणे प्रदर्शित केलेल्या भावना त्याच्यातील प्रगल्भ माणूस दाखवून गेल्या. वास्तविक, गेल्या काही वर्षांत भारतीय संघाला आयसीसी स्पर्धांमध्ये उपांत्य किंवा अंतिम फेरीत सातत्याने अपयश येत गेलेलं आहे. त्यामुळं कालच्या अंतिम फेरीत विजय हवाच होता. रोहित, विराट आणि राहुल या तिघांसाठीही तो मिळायला हवा होता. तसा तो मिळाल्यानंतर तिघांचंही वर्तन मात्र अतिशय वाखाखण्याजोगं, स्तुत्य होतं. सगळं काही मिळवून झाल्यानंतर जी तृप्तीची, समाधानाची भावना येते, तिचं प्रतिबिंब या तिघांच्या देहबोलीत दिसलं. त्यातूनच रोहित आणि विराटनं आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांतून निवृत्तीची घोषणा केली. राहुलचाही प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ कालच संपुष्टात आला. यशाचं उत्तुंग शिखर गाठल्यानंतर तिघांनीही अतिशय समाधानानं आपली जबाबदारी सोडली.
रोहित काय, विराट काय... यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आगमन ते कालचा त्यांच्या करिअरमधला महत्त्वाचा टप्पा हा प्रवास आपल्यापैकी अनेकांनी आपल्या डोळ्यांदेखत पाहिला आहे. आज वयानं ४० पेक्षा अधिक असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना हे सर्व खेळाडू अगदी आताआतापर्यंत ‘नवी पोरं’ वाटत होती. आरडाओरडा करणे, अॅटिट्यूड दाखवणे, शिव्या देणे, आक्रमक हावभाव करणे, चिडणे अशी तरुणाईची सर्व व्यवच्छेदक लक्षणं घेऊन ते वावरत होते. काल मात्र त्यांचं रूपांतर जबाबदारीनं वागणाऱ्या, संयम दाखवणाऱ्या, गप्प राहून टीका झेलणाऱ्या, आपल्या कुटुंबावर खूप खूप प्रेम करणाऱ्या, सहकाऱ्यांवर जीव लावणाऱ्या ‘बाप्या’ माणसांत झालेलं बघितलं. हे पाहून ‘सगळं नीट मार्गी लागलं बाबा’ टाइप जे एक तृप्त समाधान वाटतं ना, ती भावना अनेक रसिकांसाठी प्रबळ ठरली. आपण या पोरांचं रूपांतर ‘कम्प्लीट मॅन’मध्ये झालेलं बघितलं. हे सगळं ‘राहुल द्रविड फॅक्टर’मुळं घडलं, यात शंका नाही.
भारतात आपल्याला असं आवडतं. कुटुंबात सगळे मार्गी लागले पाहिजेत, असा आपला आग्रह असतो. त्यासाठी कुटुंबप्रमुख आपल्या जीवाचं रान करत असतो. त्याच्या या प्रयत्नांचं मोल कुटुंबातल्या सदस्यांना कळलं, तर ते कुटुंब सुखी व समाधानी होतं. कालच्या भारतीय संघात अशाच एका कुटुंबाचं दर्शन घडलं. राहुल अर्थातच कुटुंबप्रमुख होता. त्याच्या तिथं असण्याने या कुटुंबातले हार्दिकसारखे एरवी ‘टगे’ असणारे मेंबरही बदलले. आपल्या अश्रूंचं, भावनांचं प्रदर्शन करणं ही फार वाईट गोष्ट नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. करंडक मिळाल्यानंतर मैदानातील खेळाडूंपासून ते सपोर्ट स्टाफपर्यंत प्रत्येक सदस्याला ‘हा आपला विजय आहे,’ असं वाटणं हीच मोठी गोष्ट होती.
जेव्हा कुठल्याही व्यक्तिमत्त्वात आक्रमकता आणि संयम यांचा असा देखणा मिलाफ होतो, तेव्हा सर्वोच्च स्थान गाठणं फार अवघड उरत नाही. या संघानं हे ‘फॅमिलीवालं फीलिंग’ आपल्याला दिलं आहे. त्यामुळंच होणारा आनंद जरा काकणभर जास्त आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; १ जुलै २०२४)

----

2 comments:

  1. या उत्तम लेखातून मॅच ची शेवटची ओव्हर व नंतरचा झालेला जल्लोष परत एकदा डोळ्यासमोर उभा राहिला व मन परत एकदा उल्हसित झाल ...खरोखरच फॅमिली वालच फिलिंग होत ते ...!👌👌👍🌷

    ReplyDelete