30 Jul 2024

कोथरूडवरील लेख

कोथरूड... पुण्याचं नाक!
--------------------------------

(नोंद - साधारण दहा वर्षांपूर्वी पुणे ‘मटा’त एक ‘कोथरूड प्लस’ नावाची पुरवणी सुरू झाली होती. त्या पुरवणीसाठी लिहिलेला हा लेख... २०१५ मध्ये लिहिलेला हा लेख अजून मी ब्लॉगवर कसा काय टाकला नाही, याचं आश्चर्य वाटलं. आता हा लेख शेअर करतोय....)

----


मध्य पुणे किंवा पेठांचा भाग हे पुण्याचं हृदय मानलं तर कोथरूड हे पुण्याचं नाक आहे, असं निश्चित म्हणता येईल. किंबहुना पुण्याची पंचेद्रियं म्हणजे कोथरूड असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरू नये. नाक हे जास्त ठळक, कारण पुण्याचा सगळा तोरा हे नाक आपल्या अंगावर मिरवतं. 'ऑल आर इक्वल, बट सम आर मोअर इक्वल' असं जॉर्ज ऑरवेलनं म्हटलंय, त्याच धर्तीवर 'आम्ही कोथरूडकर, जरा अधिक पुणेकर' असं कोथरूडकर अगदी अभिमानानं म्हणत असतात. हे म्हणत असताना त्यांच्या लालबुंद नाकाच्या शेंड्यावरचा तो अभिमान अगदी लखलखीतपणे दिसत असतो. 'आशियातलं सर्वांत वेगानं वाढलेलं उपनगर' अशी एके काळी विक्रमी नोंद करणारं हे उपनगर आता जवळपास मुख्य शहराचाच भाग झालंय. नळस्टॉपपासून साधारण कोथरूडची हवा सुरू होते. पौड फाट्यापासून डाव्या अंगानं कर्वेनगर, वारज्यापर्यंत जाणारा कर्वे रोड आणि उजव्या हाताला चांदणी चौकापर्यंत जाणारा पौड रोड या बेचक्यात कोथरूड नावाचं हे खास शहर वसलं आहे. हे दोन्ही रस्ते अत्यंत गजबजलेले. याउलट काही अत्यंत शांत, मस्त झाडीत लपलेल्या शांत, उच्चभ्रू सोसायट्या... असं हे सुंदर कोथरूड पाहताक्षणीच प्रेमात पडण्यासारखं. डहाणूकर कॉलनी, आयडियल कॉलनी, हॅपी कॉलनी किंवा पौड रोडच्या कडेच्या अनेक सोसायट्या अत्यंत आखीवरेखीव आणि नियोजनबद्ध आहेत. खेळाची मैदानं, छोटी उद्यानं, ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे असं सारं काही इथं आहे. काही काही भागांत तर चक्क परदेशात असल्याचाही भास होतो म्हणे. तसंही कोथरूडमध्ये साधारण घरटी एक माणूस अमेरिका किंवा युरोप किंवा ऑस्ट्रेलियात आहेच म्हणा. एके काळी कोथरूडच्या पोस्टातून सर्वाधिक 'एअर मेल' जात असत. आताही ते प्रमाण कायम असलं, तरी स्काइप वगैरे आल्यापासून थेटच संवाद सुरू झाला आहे.

मध्य पुण्यातच एके काळी राहत असलेले पुणेकर कोथरूडमध्ये एक तर बंगले बांधून किंवा मोठी घरं हवीत म्हणून शिफ्ट झाले. त्यामुळं पुणेकर नावाचं जे रसायन आहे, ते मूळच्या झऱ्यासह इथंही खळाळून वाहतंच आहे. एकविसाव्या शतकात आयटी क्रांतीनंतर पुणं चहूअंगानं विस्तारलं तसं कोथरूडही वाढत गेलं. पार वारज्याच्या पुढं बायपासपर्यंत जाऊन भिडलं. ऐंशीच्या दशकात बांधलेल्या तीन तीन मजली सोसायट्या आता ३०-३५ वर्षांनी 'रिडेव्हलपमेंट'ला आल्यासुद्धा. कोथरूड पुन्हा कात टाकू पाहतंय. कोथरूडमध्ये सिटीप्राइड मल्टिप्लेक्स सुरू झालं त्यालाही आता नऊ वर्षं झाली. हे मल्टिप्लेक्स आणि त्याच्याशेजारीच असलेला 'बिग बझार'सारखा मॉल यामुळं हा भाग एकदम हॅपनिंग स्ट्रीट होऊन गेला. कर्वे शिक्षण संस्था, एसएनडीटी किंवा एमआयटी यासारख्या मोठ्या शिक्षण संस्थांनी कोथरूड हे आपलं माहेरघर केल्यानं इथं तरुणाईची कायमच गजबज असते. बालगंधर्व आणि टिळक स्मारक लांब पडत असल्यानं कोथरूडकरांच्या आग्रहास्तव महापालिकेनं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासारखं सुसज्ज नाट्यगृह इथं बांधलं. तेव्हापासून नाट्यप्रेमी कोथरूडकरांची तीही गरज पूर्ण झाली. आता तिथंच आणखी एक मिनी थिएटर होऊ घातलंय. (हे अजूनही पूर्ण झालेलं नाही, ते सोडा...) कोथरूड स्टँड ते वनदेवी मंदिरापर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी मोठमोठ्या ब्रँडेड दुकानांनी गजबजलेला असतो. आता हौशी कोथरूडकर मंडईत किंवा लक्ष्मी रोडला सहज जातातही; पण बऱ्याचशा गरजा कोथरूडमध्येच पूर्ण होतात, यात शंका नाही. उपनगर साहित्य संमेलन भरणारं हे कदाचित देशातलं एकमेव उपनगर असावं. इथं कायमच वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम सुरू असतात. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाव्यतिरिक्त डहाणूकर कॉलनीतला कमिन्स हॉल, हॅपी कॉलनीचा हॉल, धन्वंतरी सभागृह, शैलेश सभागृह, महालक्ष्मी लॉन्स, मोरे विद्यालयातील सभागृह, पुण्याई सभागृह, मनोहर मंगल कार्यालय (इथं आता ‘व्हरांडा’ हॉटेल झालं आहे...) इथं काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनं सतत सुरूच असतात आणि कोथरूडकर हौसेनं इथं भेटी देत असतात.
खाऊ गल्लीतही कोथरूड अर्थातच मागं नाही. खवय्या कोथरूडकरांना हवं ते खिलवण्यासाठी इथं कॉन्टिनेंटलपासून ते स्ट्रीट फूडपर्यंत सगळं काही उपलब्ध आहे. एमआयटी कॉलेजचा परिसर, करिष्मा सोसायटीजवळची चौपाटी किंवा डहाणूकर कॉलनीजवळचा परिसर इथं मोठ्या संख्येनं फूड जॉइंट्स आहेत आणि ती कायम खवय्यांनी हाउसफुल्ल असतात. शनिवारी तर अनेक ठिकाणी वेटिंग असतं. कोथरूडमध्ये मंगल कार्यालयंही मोठ्या संख्येनं आहेत. डी. पी. रस्त्यावरची लॉन्सही अनेकदा या लग्नसमारंभांसाठी फुल्ल असतात. मध्यमवर्गीयांपासून ते नवश्रीमंतांपर्यंतचा पैसे खुळखुळत असलेला वर्ग इथं मोठ्या संख्येनं राहत असल्यानं अनेक सेवासुविधा इथं घरपोच पोचवल्या जातात आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारही तयार होतो. सुसंस्कृत आणि नागरी हक्कांबाबत अत्यंत जागरूक वर्ग इथला रहिवासी असल्यानं इथल्या नगरसेवकांनाही कायम अलर्ट राहावं लागतं. सेवा बजावून घेणारे इथले नागरिक प्रॉपर्टी टॅक्स भरायलाही रांगा लावतात हेही आवर्जून सांगायला हवं.
याचा अर्थ कोथरूडमध्ये सगळंच काही आलबेल आहे, असं नाही. इथं अजूनही काही सुविधांची वानवा आहे. विशेषतः एवढ्या मोठ्या उपनगरासाठी खरं तर स्वतंत्र एसटी बसस्थानकाची गरज आहे. कोथरूडवरून मुंबईला किंवा कोल्हापूरकडं जाणाऱ्या लोकांसाठी बायपासलगत कुठे तरी मोठं बसस्टँड होण्याची गरज आहे. कोथरूडमध्ये पंचतारांकित हॉटेल नाही. खरं तर ही व्यावसायिक गरज आहे. पण अद्याप तरी कुणी असं पंचतारांकित हॉटेल कोथरूडमध्ये उभारलेलं नाही, हे वास्तव आहे. पु. ल. देशपांडे उद्यानासारखं मोठं उद्यान कोथरूडमध्ये नाही. अर्थात आता ते होणंही शक्य नाही, कारण एवढी जागाच इथं उपलब्ध नाही. पण किमान जितेंद्र अभिषेकी उद्यानासारखं चांगलं उद्यान आता तरी चालू व्हावं, ही इथल्या नागरिकांची अपेक्षा आहे. (हेही उद्यान अद्याप सुरू झालेलं नाही...) आणि हो, आश्चर्य वाटेल, पण कोथरूडसारख्या सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या उपनगरात पुस्तकांचं एकही मोठं दालन नाही. मराठी व इंग्रजी पुस्तकं मिळतील असं पुस्तकांचं तीन-चार मजली दालन कोथरूडमध्ये व्हायला हवं. तसं ते झालं तर ते जोरात चालेल, हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही.  (आता पुस्तकपेठ, भावार्थ आणि इतरही काही पुस्तकांची दुकानं सुरू झाली आहेत...) अर्थात या सुविधा मिळाल्या, तर कोथरूडचा मूळचा वाढीव भाव आणखीनच वधारेल आणि पुण्याचं हे नाक आणखी टेचात सगळीकडे मिरवेल, यात शंका नाही.


(ता. क. सन २०१६ मध्ये भूमिपूजन झालेली वनाझ ते रामवाडी मेट्रो २०२२ मध्ये सुरू झाली आणि आता कोथरूडकरांच्या चांगली अंगवळणी पडलीय...)

----

17 Jul 2024

एक सदर - एक प्रयोग, दोन लेख

एक सदर - एक प्रयोग, दोन लेख
---------------------------------------

विशेष नोंद - 

‘मटा’मध्ये दोन वर्षांपूर्वी संपादकीय पानावर ‘जाता जाता’ हे सदर ‘चकोर’ या टोपणनावाने प्रसिद्ध होत असे. वेगवेगळे संपादकीय सहकारी ते लिहीत असत. मीही अनेकदा ते लिहिले आहे. खाली दिलेला पहिला भाग मी आमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्यानंतर काही मैत्रिणींनी गमतीत अशी तक्रार केली, की ही तर एकच (म्हणजे पुरुषांची) बाजू आहे. आम्ही लिहू का आमची बाजू? त्यावर मीही गमतीनं म्हटलं, की तुम्ही कशाला? मीच लिहितो. मग मी त्या ग्रुपपुरता एक मजकूर लिहिला आणि तिकडं शेअर केला. त्यात सदराचं नाव ‘येता येता’ असं ठेवलं आणि लिहिणारीचं नाव ‘चकोरी’ झालं. त्यालाही चांगला प्रतिसाद म्हणाला. स्त्रीच्या भूमिकेतून आपण तसा विचार करू शकतो का, याची ही एक चाचणी होती. हा परकाया प्रवेश अवघड असला, तरी अशक्य नव्हता. आता दोन वर्षांनंतर मला वाटलं, की ही गंमत अधिक जास्त वाचकांपर्यंत पोचावी, म्हणून दोन्ही लेख इथं ब्लॉगवर प्रकाशित करतोय. आधी मूळ सदरातील लेख, नंतर त्याला ग्रुपपुरतं दिलेलं उत्तर... एंजॉय...

-------------


जाता जाता
--------------

एक आदिम साहसी खेळ
-----------------------------------

साहसी खेळांच्या यादीत लग्नाचाही समावेश करावा, अशी मागणी कधी एकदा होतेय याचीच आम्ही वाट बघत होतो. एक दीर्घानुभवी पती असल्यानं आम्ही स्वत: ही मागणी करणं शक्यच नव्हतं, हे चाणाक्ष (अन् अनुभवी) वाचकांच्या लक्षात आलंच असेल. अखेर व्हॉट्सअप मेसेजेस स्क्रोल करता करता ‘तो’ मेसेज दिसला अन् गुदगुल्या झाल्या. ‘लग्नालाही साहसी खेळ’ म्हणून मान्यता द्या, अशी अतिसाहसी मागणी त्या कथित विनोदी संदेशात होती. आम्हाला मात्र ही मागणी विनोदी आहे, असं म्हणवत नाही. लग्न हा साहसी खेळच आहे, यात शंका नसावी. या खेळाची वैशिष्ट्यं अगणित आहेत. जगातील बहुसंख्य लोक आयुष्यात किमान एकदा तरी हा खेळ खेळतात. या खेळात जोडीदार बदलण्याची संधी (सहसा) नसते. निवडण्याची जरूर असते; मात्र एकदा निवडला, की त्या जोडीदारासोबतच पुढं आयुष्यभर हा खेळ खेळावा लागतो. बहुतेकांना खूप लहानपणापासून या खेळासाठी तयार केलं जातं. घरी पालकांचा ओरडा आणि शाळेत शिक्षकांचा दणका यांतून आपण या खेळासाठी टणक होत जातो. आपल्या अंगी अधिक सोशिकता यावी, यासाठी परीक्षादी उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या खेळात भाग घेण्यापूर्वी काही गोष्टींची पूर्तता करणं अगदी गरजेचं असतं. दर महिना काही विशिष्ट रकमेच्या दमड्या कमावणं आणि किमान चार खोल्यांचा फ्लॅट असणं, या त्या बेसिक अटी होत. या अटी पूर्ण होईपर्यंतच खेळाडूंचं निम्मं अवसान गळालेलं असतं. मात्र, अशा खेळाडूचे पालक जोशात असतात. ते कोंबड्यांची झुंज लावावी, त्याप्रमाणे आपल्या अपत्याला या साहसी खेळात भाग घ्यायला उतरवतातच. एक मन नको म्हणत असतं; मात्र काही ‘बेसिक इन्स्टिंक्ट’ना बळी पडून खेळाडू अखेर या खेळाच्या मैदानात उतरतोच. खेळाडू एकदा तयार झाला, की लाखो रुपये खर्च करून मोठा सोहळा आयोजित केला जातो. देवा-ब्राह्मणांच्या आणि (किरकोळ आहेराच्या बदल्यात) फुकटचं जेवण झोडायला आलेल्या गावभरच्या पाहुण्यांच्या साक्षीनं खेळाडू आपल्या जोडीदाराबरोबर गळ्यात हार घालून घेतो. खेळाच्या सुरुवातीलाच त्याच्या वाट्याला ‘हार’ नावाचा हा प्रकार येतो, तो पुढं आयुष्यभर कायम राहणार असतो. बहुतेक (पुरुष) खेळाडू त्या वेळी बावळट असल्यानं, त्यांना याची काहीही कल्पना नसते. लाखो रुपये खर्च करूनही ते वेड्यासारखे हसत फोटो काढून घेत असतात. (पुढं आयुष्यभर या प्रसंगाचे हृदयद्रावक फोटो बघून त्यांना रडायचंच असतं.) अनेक पुरुष खेळाडूंचा हा बावळटपणा पुढं अनेक वर्षं टिकतो. काही गडी मात्र स्मार्ट असतात. ते पहिल्यापासून आपण बावळट किंवा येडछाप असल्याचं सोंग घेतात आणि ते आयुष्यभर निभावतात. हे सोंग एकदा जमलं, तर या साहसी खेळात त्यांना पुढं बऱ्यापैकी गंमत येऊ लागते. तसे या खेळाचे नियम अगदी सोपे असतात. आपल्या पत्नी नामक जोडीदारासमोर कायम नतमस्तक होऊन राहणं आणि तिनं काहीही विचारलं, की वरपासून खालपर्यंत मुंडी हलवणं ही एक शारीरिक क्रिया करणं, एवढं केलं की खेळ जमतोच. आयुष्यभर माणसाला ‘होय होय’ करायला लावणारा एवढा सकारात्मक खेळ दुसरा नसेल. अशा या खेळाप्रति आणि खेळाडूंप्रति समाजानं कायम सहानुभूती बाळगली पाहिजे.

- चकोर

(मटा, २३-८-२०२२)

---

येता येता...

---------------

साहसे ‘श्री.’ प्रतिवसति...
---
-------------------------------

साहसी खेळांच्या यादीत लग्नाचाही समावेश करावा, अशी मागणी कधी एकदा होतेय याचीच मी वाट बघत होते. एक दीर्घानुभवी बायको असल्यानं आपणच ही मागणी करावी, असं कालपास्नं सारखं वाटत होतं. पण मेल्या भिशी ग्रुपच्या वस्साप गप्पांतून सवड ती कशी होईना! अखेर आमच्या शाळेच्या ग्रुपवर ‘तो’ मेसेज पडलाच. खुदुखुदू हसू लागले. ‘लग्नालाही साहसी खेळ म्हणून मान्यता द्या,’ अशी मागणी त्या कथित विनोदी संदेशात करण्यात आली होती. मला मात्र ही मागणी विनोदी आहे, असं काही म्हणवत नाही. लग्न हा साहसी खेळच आहे, यात शंका नसावी. माझंच बघा. चांगली डिग्री होईपर्यंत सुखात होते. आई-बाबांच्या लाडाकोडात वाढत होते. ते घरी आणि कॉलेजमधले गोंडाघोळू मित्र बाहेर काही कमी पडू देत नव्हते. कॉलेजात तर ‘चकोरी कॉलेजक्वीन’ असं कुणी कुणी नालायक लिहूनही ठेवायचं भिंतीवर... तेव्हा ‘किशन कन्हैया’तलं ‘चंदा पे चकोरी क्यूं हो हो हो होती है कुरबान’ हे गाणं फेमस होतं. त्या दंताळ्या गण्यानं मला फिशपॉंड टाकला होता त्यावरून! नंतर चप्पल दाखवलीन् त्याला... असे सुखाचे दिवस चालले होते. पण आई-बाबांना हे सुख बघवेना. माझा मंगळ कडक असावा बहुतेक. पोरीनं लव्ह मॅरेज करावं, म्हणून आईनं सगळे देव पाण्यात घातले होते. पण त्यात मदनदेव नसावा. शिवाय तिला दासबोधाचं वेड! मग कसलं होतंय आमचं लव्हमॅरेज? झालं. ते ‘चहा-पोहे’ नावाचं महाबंडल प्रकरण आयुष्यात आलं. काय एकेक नग आले होते देवा... दर वेळी आमच्याकडच्या रोहिणीमावशीनं केलेले पोहे मी त्या पोरट्यासमोर नेऊन आदळायची आणि ते येडं ‘छान चव आहे तुमच्या हाताला’ म्हणत कोमट हसायचं. मी इकडं इतकी फुटायचे! सावरून घेता घेता आईची पुरेवाट व्हायची. अखेर आईचा त्रागा बघवेना आणि बाबांच्या सिग्रेटी वाढत चालल्या तसा मी एक ‘चि. श्याम’ पसंत करून टाकला. धुमधडाक्यात लग्न लागलं. हे पहिलं साहस! हनीमूनला प्रथेप्रमाणे गोव्याला गेलो. आमचा चि. श्याम खरोखर ‘चि. श्याम’ होता, हे मला पहिल्याच रात्री कळलं. तेव्हापासून आमच्या संसाराच्या ड्रायव्हिंग व्हीलवर मीच बसल्ये आहे. हे दुसरं साहस! आज १२ वर्षं झाली. श्यामरावांना हनीमूनमधली गंमत लवकरच कळली आणि आमच्या संसारवेलीवर ‘बकुळ’ फुलली. मला मुलगीच हवी होती. आमच्या ‘ललिता पवारां’ना आम्हाला अजून पोरगं व्हायला हवं होतं म्हणे. आता याला दु:साहस म्हणायचं नाही तर काय! मी बरी खमकी होते आणि ‘ललिताबाईं’ना लवकरच बाप्पानं तिकडं बोलावून घेतलं आणि आम्ही सुटलो. तेव्हापासून किराणा यादीपासून लाइट बिलापर्यंत आणि इस्त्रीच्या कपड्यांपासून ते बकुळच्या डब्यापर्यंत मीच सगळा गाडा ओढत्ये आहे. श्यामराव भिडस्त असले तरी कधी मूडमध्ये आले, की घरातल्या घरात मला ऑर्डरी सोडतात. एका कामाला हात म्हणून लावत नाहीत. त्यांच्या गादीला मी राजगादी म्हणते. श्यामरावांना त्यातही एक कोमट आनंद होतो. बाकी त्यांना एकूण ‘हे’ कमीच. एवढी दमले, तरी बाबा कधी अर्धा कप चहा विचारणार नाही. मलाही अपेक्षा नाहीच म्हणा! एकूण आमचा संसार हॉट नसला, तरी ‘कोमट’ तरी आहे. बाकी मैत्रिणींच्या संसाराचे काय धिंडवडे निघालेत ते आमच्या ‘टवाळ टवळ्या’ ग्रुपवर कळतंच. मी आपलं ध्यान पदरी पडलं पवित्र झालं म्हणत्ये आणि बकुळच्या (आगामी) संसाराची चित्रं रंगवत बसते. बकुळनं तरी प्रेमविवाह करावा अशी माझी इच्छा आहे. मी सगळ्या इच्छा मारत मारत जगले, तसं तिचं होऊ नये. थोडक्यात, बाईमाणसाची आयुष्यभर सत्त्वपरीक्षा पाहणारा हा साहसी खेळ नाही, असं कोण म्हणेल? या साहसातच आमचे ‘श्री’ वस्ती करून राहताहेत ना! ‘साहसे श्री प्रतिवसति’ ही संस्कृत म्हण तिथूनच आली असली पाहिजे. ते काही का असेना, मला वाटतं, की या खेळाप्रति आणि माझ्यासारख्या सोशिक खेळाडूंप्रति समाजाने कायम सहानुभूती बाळगली पाहिजे.

- चकोरी

---