30 Aug 2024

माळशेज ट्रिप २९-८-२०२४

निसर्गाच्या कुशीत...
-------------------------


वयाच्या, करिअरच्या एका टप्प्यावर कामाचा एक दिवसही मोकळा काढणं अशक्य व्हावं, अशी स्थिती अनेकदा येत असते. यात आपली चूक नसते. आपण कामाला आणि कामानं आपल्याला जुंपून घेतलेलं असतं. अशा वेळी हक्कानं आवाज दिला, की गोळा होतील आणि भटकायला बाहेर पडतील, असे मित्र लाभणं ही काय श्रीमंती असते, हे ती ज्यांना लाभली आहे त्यांना बरोबर समजेल. मंदार, अभिजित आणि योगेश हे माझे तीन मित्र असे आहेत. त्यातल्या त्यात मंदार व अभिजित यांच्याबरोबर अधिक भटकणं, फिरणं, भेटणं होतं, ही गोष्ट खरी आहे. मात्र, सीए असलेला आणि ‘बजाज फिनसर्व्ह’मध्ये मोठ्या पदावर असलेला आमचा चौथा मित्र योगेश जोशी जेव्हा वेळ काढून भेटतो, तेव्हा आम्हाला खरोखर फार मजा येते. आमचा चौघांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. दिवसेंदिवस त्यावर काही बोलणंही होत नाही. मात्र, मैत्री अशा पातळीवर आहे, की या सगळ्यांची गरजही पडत नाही. मागे एकदा चौघं गप्पा मारत बसलो असताना, माळशेज घाटात एखाद्या पावसाळ्यात फिरायला जाऊ या, असा विषय झाला. नेहमीप्रमाणे तो एक-दोन वर्षं बाजूला पडला. यंदा मी नेहमीप्रमाणे परत आठवण केली, तर चक्क चौघांचं एकमत होऊन २२ ऑगस्टला जाऊ या, असं ठरलंही. मात्र, नेमका दोन दिवस आधी योगेश आजारी पडला. मग तेव्हा ते जाणं स्थगित झालं आणि त्याच वेळी पुढच्या गुरुवारी, म्हणजे २९ ऑगस्टला नक्की जाऊ असं ठरलं. 
अखेर सगळं जुळून आलं, रजा वगैरे सगळ्यांना मिळाल्या आणि आम्ही सकाळी निघालो. योगेशकडं ‘टाटा हेक्सा’ ही दणकट गाडी आहे. तेव्हा तीच गाडी घ्यायची हे ठरलं होतं. गंमत म्हणजे आमच्या चौघांपैकी कुणीही यापूर्वी माळशेजला एकदाही गेलं नव्हतं. आम्हाला याचं फार आश्चर्य वाटलं आणि हे कसं काय राहून गेलं, असं आम्ही बोलूनही दाखवलं. कदाचित, हे ठिकाण आधी पाहिलं नसल्यानं आम्हाला ‘ट्रिगर’ मिळाला असावा, हेही खरं. तर, आम्ही ठरल्याप्रमाणे आठ वाजता निघायचं असं म्हणून साडेआठला निघालो. दहा वाजता आम्ही चाकण पार केलं, तेव्हा आमचे ग्रह आज उच्चीचे आहेत आणि ही ट्रिप मस्त पार पडणार, असं फीलिंग आलं. योगेशनं सकाळी काही खाल्लं नव्हतं म्हणून मग भामा नदी पार केल्यावर दोन्ही बाजूंना जी हॉटेलांची रांग आहे, त्यापैकी एका ठिकाणी थांबलो. मिसळ, पोहे, चहा असं सगळं यथासांग झाल्यावर योगेशनं गाडी भरधाव सोडली. पाऊस नव्हता, पण ढगाळ हवा होती. वातावरण उत्तम होतं. पुणे-नाशिक हायवे आता चांगला झाला आहे. बहुतेक गावांना बायपास आहे. त्यामुळं फारच लवकर आळेफाट्याला पोचलो. तिथंही आता बायपास झाला आहे. मग त्या बायपासनं वळून आम्ही नगर-कल्याण महामार्गाला लागलो. इथून पुढं आता दुपदरी रस्ता होता. हा रस्ता कसे असेल अशी आम्हाला धास्ती वाटत होती. मात्र, सुदैवानं रस्ता बरा होता. या रस्त्याला लागल्याबरोबर हवा आणि परिसर दोन्ही एकदम बदलल्याचं जाणवलं. सगळा आसमंत हिरवागार होता. समोर डोंगररांगा दिसू लागल्या होत्या. सह्याद्री दोन्ही हात फैलावून साद घालत होता. रस्त्यावर किती तरी ठिकाणी आता इथंच थांबावं, असं वाटून गेलं. मात्र, आम्हाला गाठायचा होता माळशेज घाट! 
थोड्याच वेळात ओतूर आलं. मी खूप पूर्वी या गावात आलो होतो. माझा आतेभाऊ तेव्हा इथं शिकायला होता. आता हे गाव पुष्कळ बदललेलं दिसलं. वाढलं होतं. ओतूर म्हटलं, की आमच्या ‘बाबा’ची (अनिल अवचट) आठवण होणं स्वाभाविकच. हे त्याचं गाव. शिवाय ‘साप्ताहिक सकाळ’चे दिवंगत संपादक सदा डुम्बरे यांचंही हे गाव. या दोघांचंही स्मरण त्या गावातून जात असताना होणं अगदी स्वाभाविक होतं. पुढं गेल्यावर एके ठिकाणी छोट्या खिंडीसारखा भाग ओलांडून आलो आणि समोरचं दृश्य बघून अक्षरश: स्तिमित झालो. उजव्या बाजूला पिंपळगाव जोगे धरणाचा विस्तीर्ण जलाशय पसरलेला दिसला आणि त्यामागे हिरवीगार, उंच डोंगररांग.... खरं तर तिन्ही बाजूंनी डोंगर आणि मधे बशीसारखं पसरलेलं ते धरणातलं पाणी... अहाहा! स्वित्झर्लंडपेक्षा काय कमी सुंदर होतं हे दृश्य, असं किती वेळा मनात येऊन गेलं. त्या भागात हळूहळू रिसॉर्टसारखी बांधकामंही होताना दिसली आणि मन संभ्रमात पडलं. पर्यटनामुळं विकास होणार, हे खरं; पण त्यामुळं इथला निसर्ग आत्ता आहे तसा राहील का, असंही वाटून गेलं. अर्थात फार वेिचार करायला वेळ नव्हता. एखाद्या ‘बायोस्कोप’मध्ये एकापाठोपाठ एक दृश्यांची माळ दिसत राहते, तशी ‘एक से एक’ अप्रतिम दृश्यं निसर्ग आमच्यासमोर पेश करत होता. सह्याद्रीचं हे वैशिष्ट्य आहे. कितीही वेळा तुम्ही एखादा भाग, डोंगर, किल्ला किंवा पायवाट अनुभवा; तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही. आम्हा चौघांपैकी अभ्या हा जास्त भटका जीव. मी कॉलेज काळात किंवा नंतरही अगदी बॅचलर असेपर्यंत बऱ्यापैकी भटकलेलो. नंतर मात्र, ‘लेजर ट्रिप’ जास्त झाल्या. आमची आजची ट्रिपही तशीच होती. वेळेचं बंधन नव्हतं, अमुक ठिकाण गाठायचंय, अशी घाई नव्हती, की तमुक टिकमार्क गोष्ट केलीच पाहिजे, अशी सक्ती नव्हती. उलट मजेत, गप्पा मारत, आमची आवडती ‘नाइन्टीज’ची गाणी ऐकत मस्त प्रवास सुरू होता. थोड्याच वेळात पुण्याची हद्द संपली (आणि चांगला काँक्रिटचा रस्ताही संपला) आणि ठाणे जिल्ह्याची हद्द सुरू झाली. संपूर्ण माळशेज घाट ठाण्याच्या हद्दीत येतो. मी इकडं पूर्वी कधीही आलो नसल्यानं सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीनच होत्या. मेंदू आपोआप एकेक नोंदी करत चालला होता. पुढं घाट सुरू होताना उजव्या बाजूला एमटीडीसीचं रिसॉर्ट लागलं. मात्र, मी डाव्या बाजूला बसल्यानं माझ्या ते पटकन लक्षात आलं नाही. एक वळण घेऊन आम्ही पुढं गेलो, तर मोठा धबधबा दिसला. झालं. लगेच आम्ही गाडी थांबवली. तिथं बरीच दुकानं होती. मात्र, आज आठवड्याचा मधलाच दिवस असल्यानं पर्यटक फार नव्हते. (आम्हाला तेच अपेक्षित होतं.) थबधब्यापाशी गेलो. तिथं वर जाण्यासाठी पक्क्या पायऱ्या व रेलिंग केलं होतं. धबधब्याखालून जाताना भिजलोच. मला आणि मंदारला भिजायचं नव्हतं; पण योगेश आणि अभ्यानं मनसोक्त भिजून घेतलं. आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढायचं काम केलं. इथं फारच झकास वातावरण होतं. समोर घाट आणि त्याखाली पसरलेली दरी दिसत होती. इथं बराच वेळ रेंगाळल्यावर मग खाली उतरलो. तिथल्या एका दुकानदाराला विचारलं, तर त्यानं पुढं आणखी दहा किलोमीटर घाट आहे, असं सांगितलं. एमटीडीसीचं रिसॉर्ट मागेच गेल्याचंही तो म्हणाला. (आम्हाला शक्यतो तिथं जेवायला जायचं होतं.) मग आम्ही घाटातून पुढं निघालो. एका वळणानंतर अचानक तो ‘आयकॉनिक’ बोगदा दिसला. तो ओलांडल्यावर मग व्ही आकाराचं ते लांबलचक वळण दिसलं. ‘माळशेज घाट’ म्हटलं, की जे फोटो दिसतात, ते याच पट्ट्यातले. बोगदा ओलांडल्यावर समोरच्या डोंगरावरून अक्षरश: पंधरा ते सोळा धबधबे कोसळताना दिसले. फार पाऊस नसल्यानं धबधबे खूप मोठे नव्हते, पण वाहत होते, हेही नसे थोडके. मग आम्ही त्या ‘व्ही’च्या टोकाला टर्न मारून पुढं त्याच धबधधब्यांखाली आलो. इथंच तो ‘कार वॉश पॉइंट’  दिसला. अतिशय शार्प अशा कातळांतून रस्ता काढला होता आणि एका ठिकाणी तो धबधबा थेट रस्त्यावर पडत होता. आम्ही गेलो, तर काही पोरं-पोरी त्या पाण्याखाली, ऐन रस्त्यात बसकण मारून बसले होते आणि अर्थात ‘रील्स’ काढत होते. आम्ही मोठमोठ्यानं हॉर्न वाजवून त्यांच्या बाजूनं गाडी पुढं निघाली. पुढच्या वळणावर एक मोठा पॉइंट दिसला. मात्र, आम्ही तिथं थांबलो नाही. आम्हाला तो घाटरस्ता पूर्ण बघायचा होता. एका वळणानंतर समोर एक अतिप्रचंड कातळाची भिंत अगदी अंगावर आली. खरं तर ती तिथून खूप लांब होती. मात्र, तो अवाढव्य आकार छाती दडपवून टाकत होता. तिथल्या वळणानंतर उतार सुरू झाला. मग पुढं आणखी एक पॉइंट दिसला. (त्याचं नाव लाजवंती सनसेट पॉइंट हे नंतर कळलं.) तिथं आधीच एक तरुण-तरुणी येऊन फोटो काढत बसले होते. मग आम्हीही आमचं फोटोसेशन केलं. इथून दोन्ही बाजूंनी सह्याद्रीच्या विशाल रांगा दूरवर दिसत होत्या. एक अंगठ्यासारखा सुळकाही दिसला. (हाच तो प्रसिद्ध ‘नानाचा अंगठा’ असावा का? माहिती नाही...) इथं आजूबाजूला बरेच गड, सुळके, किल्ले असणार. मात्र, आम्हाला त्याची फारशी माहिती नव्हती. त्यामुळं काही कळलं नाही. अर्थात तो निसर्ग डोळ्यांनी पिऊन घेताना मात्र आम्हाला अजिबात कंटाळा येत नव्हता. ऑक्सिजन रिफिलिंगचं काम जोरात सुरू होतं.

आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. विशेषत: योगेशला खूपच भूक लागली होती. मग आम्ही परतीचा रस्ता धरला. येताना अभ्याच्या लक्षात आलं, की त्याचं जर्किन त्या धबधब्यापाशीच राहिलं आहे. मग ते घ्यायला घाईनं पोचायला हवं, म्हणून येताना त्या मोठ्या पॉइंटपाशी थांबलोच नाही. सुदैवानं धबधब्यापाशी अभिजितचं जर्किन आणि टोपी जशीच्या तशी मिळाली. मग एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये गेलो. तिथं त्यांचं फ्लेमिंगो रेस्टॉरंट आहे. मग तिथं मस्तपैकी जेवलो. जेवण चांगलं होतं. जेवल्यावर मग एमटीडीसीच्या रिसॉर्टवर फेरफटका मारला. डोंगराच्या बाजूनं मोठं माळरान आहे. ते डोंगराच्या बाजूनं कुंपण बांधून बंदिस्त केलंय. तिथं आम्ही जरा फिरलो. फोटो काढले. अभ्यानं रील्स केले. तिथला भन्नाट वारा अगदी झिंग आणणारा होता. निसर्गाचं भव्य रूप चहूबाजूंनी दिसत होतं. उत्तुंग, बेलाग डोंगरकडे आणि त्यावर झेपावणारा सावळ्या मेघांचा महासागर हे रूप पाहून आपल्या खुजेपणाची जाणीव होत होती. पावलं रेंगाळली. मनही तिथंच घुटमळलं... पण आता निघायला हवं होतं. वातावरण असं होतं, की किती वाजले कळत नव्हतं. मगापर्यंत बडबड करणारे आम्ही सगळेच तिथं एकदम शांत, शांत होऊन गेलो होतो. काही बोलू नये, आवाज करू नये... एकमेकांच्या सोबतीनं फक्त तिथं उभं राहावं आणि ती असीम शांतता काळजात भरून घ्यावी!
असा काही वेळ गेल्यावर एका श्वानानं भौतिक अस्तित्वाची जाणीव करून दिली. अगदी जड अंत:करणानं तिथून निघालो. आता जवळपास साडेतीन वाजून गेले होते. आता परतीचे वेध लागले होते. येताना थोडं पुढं आल्यावर जुन्नरकडं जाणारा वेगळा रस्ता दिसला. मग आळेफाट्यावरून न जाता या वेगळ्या रस्त्यानं जाऊ; म्हणजे तोही जरा नवा भाग बघण्यात येईल, असं मी सुचवलं. मग योगेशनं तिकडं गाडी वळवली. जुन्नर हा पर्यटन तालुका जाहीर झाल्यानं इकडं भरपूर निधी आला आहे. अर्थात निधी आला तरी कामं होतातच असं नाही. इथं मात्र अतिशय सुंदर रस्ता तयार केलेला दिसला. साधा दुपदरीच, पण अजिबात खड्डे नसलेला, नवा रस्ता! त्यावर प्रॉपर दुभाजक, दोन्ही बाजूंनी पांढरे पट्टे आखलेले... स्पीड ब्रेकर, फलक सगळं व्यवस्थित असं... या रस्त्यानं पुढं गेल्यावर एक छोटासा घाट लागला. तो तर फारच सुंदर होता. तिथून वर गेल्यावर एक खिंड लागली. तिला ‘गणेश खिंड’ असं नाव आहे, असं तिथल्या फलकावरून कळलं. पुढं जुन्नर अगदी दहा किलोमीटरच होतं. उजवीकडं शिवनेरी किल्ला दिसू लागला. मधली छोटी छोटी गावं चार वाजताच्या कोवळ्या उन्हानं लखलखून दिसत होती. समोर पांढऱ्या अभ्रांचे पुंजके असलेलं निळं-स्वच्छ आकाश आणि खाली हिरवाईचं कोंदण ल्यायलेली धरणी... आपण इंग्लंडच्या कंट्रीसाइडचं खूप कौतुक करतो; पण आम्ही आत्ता बघत असलेला हा भाग त्यापेक्षा कुठंही कमी नव्हता. जुन्नर गावात प्रवेश करताना उजवीकडं ‘नाणेघाट ४३ किमी’ अशी पाटी दिसली. (पुढच्या ट्रिपची खूणगाठ बांधून झाली...) समोर एक भव्य प्रवेशद्वार लागलं. त्याला शहाजीराजांचं नाव होतं. मागे शिवनेरी दुर्ग दिमाखात उभा होता. जुन्नर हे एक टुमदार गाव आहे. गावाच्या मधल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. तिथून डावीकडं वळून बसस्टँडवरून आम्ही गावाबाहेर पडलो. आता नारायणगावकडं निघालो. रस्त्यात ओझर, लेण्याद्री, खोडद खुणावत होते. मात्र, आता उशीर झाला होता. मग आम्ही नारायणगावला येऊन बायपासला चहाला थांबलो.
इथं साधारण पाच वाजले होते. आता पुण्याची वाट खुणावत होती. हा नाशिक-पुणे हायवे असल्यानं इथून पुढं चाकणपर्यंत भन्नाट प्रवास झाला. पुण्यात यायला मात्र साडेसात वाजले. मग पुण्यातच जेवून सहलीची सांगता करायला हवी होती. तशी ती यथासांग, साग्रसंगीत झाली. एका दिवसाची ही नीटनेटकी ट्रिप आता आम्हाला पुढं पुष्कळ दिवस प्राणवायू पुरवत राहील, यात शंका नाही. पुढची सहल कुठं काढू या, अशी चर्चा लगेच सुरू झालीय, हेच मोठं फलित! इति!!


--------

(काही महत्त्वाच्या नोंदी -
- पुणे ते माळशेज घाट अंतर - १३० किलोमीटर
- स्वत:चं वाहन घेऊन जाणे उत्तम
- शक्यतो आठवड्याच्या अधल्या-मधल्या दिवशी जावे. वीकएंडना प्रचंड गर्दी असते. विशेषत: मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या तरुणाईमुळे गेल्या काही वर्षांत माळशेज बदनाम झाले आहे. तरी ‘फॅमिलीवाल्या’ मंडळींनी वीकएंड टाळावाच.
- एमटीडीसीच्या रिसॉर्टवर जेवणाची चांगली सोय
- थोडा वेळ काढून गेल्यास किंवा मुक्काम केल्यास याच ट्रिपमध्ये शिवनेरी, ओझर, लेण्याद्री किंवा खोडद ही ठिकाणेही पाहता येतील.
- पुण्यातून लवकर निघून, सकाळी नऊच्या आत चाकणच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. चाकणच्या पुढे भामा नदी ओलांडली, की दोन्ही बाजूंना नाश्त्यासाठी बरीच हॉटेल आहेत.)

------

9 Aug 2024

तीन गाणी, तीन आठवणी...

१. सो गया ये जहाँ...
-----------------------

आत्ता खूप दिवसांनी ‘तेजाब’मधलं ‘सो गया ये जहाँ...’ गाणं ऐकलं आणि मन भूतकाळात गेलं. हा सिनेमा आला १९८८ मध्ये. तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. पौगंडावस्थेतलं वय आणि आयुष्यात पहिल्यांदा झालेलं स्थलांतर. मी माझं गाव सोडून शहरात राहायला आलो होतो. तिथल्याच थिएटरच्या अंधारात हा सिनेमा बघितला होता. तेव्हा अर्थात माधुरीच्या ‘एक दो तीन...’चं गारूड होतं. ‘सो गया ये जहाँ...’ गाण्यातला दर्द समजायला चाळिशी यावी लागली. नंतरही मी खूप वेळा हा सिनेमा पाहिलाय असं नाही. मात्र, त्यातले काही काही प्रसंग अगदी लख्ख लक्षात आहेत. महेश देशमुखचा ‘मुन्ना’ कसा झाला, याचा हा विदारक प्रवास आहे. त्या प्रवासाला ऐंशीच्या दशकातील सामाजिक, राजकीय स्थितीची पार्श्वभूमी आहे. भले सिनेमात ती नकळत आली असेल... अर्थात आता इथं तो विषय नाही.
...तर हे गाणं... लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं सगीत, शब्बीर अहमद या फारशा माहिती नसलेल्या गीतकाराचं गीत आणि नितीन मुकेश, अलका याज्ञिक व शब्बीरकुमार यांचे प्रमुख स्वर. सोबतीला कोरस. या कोरसच्या हमिंगनं गाण्याची सुरुवात होते. मुंबईतला रिकामा रस्ता, नुकताच पडून गेलेला पाऊस, त्या पावसाचं रस्त्यावर साठलेलं पाणी आणि सोडियम व्हेपरच्या प्रकाशात चमकणारे ओलसर रस्ते... मुन्नाचे मित्र मुन्ना आणि मोहिनीला घेऊन परत निघाले आहेत. गाणं चित्रित झालंय चंकी पांडे, माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरवर. मित्रांमध्ये विजय पाटकर वगैरे दिसतात. ते सगळे त्या स्टेशन वॅगनसारख्या गाडीच्या छतावर आडवे पडलेले आहेत. समोरची काच फुटलेली ती गाडी चंकी चालवतो आहे आणि गातो आहे - सो गया ये जहाँ, सो गया आसमाँ, सो गयी है सारी मंज़िले, हो सारी मंज़िले, सो गया है रस्ता...
नितीन मुकेशचा प्रमुख स्वर या गाण्यात एक विलक्षण आर्त भाव घेऊन येतो. हा स्वर एकाच वेळी वेदनेचा आहे, वेदनेवर फुंकर घालणाराही आहे, आपल्या बेफिकिरीवर खूश होणारा आहे आणि त्याच वेळी आपल्या अनिकेत अवस्थेची अपरिहार्यता सांगणाराही आहे. नितीन मुकेश यांनी गायलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांत निश्चितच या गाण्याचा समावेश व्हावा. सिनेमातील मुख्य पात्रांच्या जगण्यात प्रचंड उलथापालथ झाली आहे. सगळं जग, नियती विरोधात आहे. केवळ मित्रांचा भरोसा आहे. त्यांच्याच साथीत ही वाटचाल सुरू आहे. नायक-नायिका एका विलक्षण वळणावर ताटातूट होऊन अगदी वेगळ्या रूपात पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत. त्यांना एकमेकांच्या संगतीत घालवलेले प्रेमाचे दिवस आठवताहेत. दोघेही त्या गाडीत मागच्या बाजूला अवघडून बसले आहेत. नायिका जखमी झाली आहे, तर नायक सिगारेटी फुंकून आपला उद्वेग शमवतो आहे. दोघांच्याही भावना गाण्यातून पार्श्वभूमीवर व्यक्त होतात. ‘क्यूं प्यार का मौसम बीत गया, क्यू हम से जमाना जीत गया’...’ ही नायिकेची व्यथा आहे, तर ‘हर घडी मेरा दिल ग़म के घेरे में है, जि़ंदगी दूर तब अंधेरे में है...’ असं नायकाला वाटतंय. मध्येच नायिकेला डुलकी लागते आणि ती बसल्या जागी पडू लागते तर नायक चटकन तिच्या शेजारी सरकून तिला आधार देतो. तीही झोपेत अगदी निश्चिंतपणे त्याच्या खांद्यावर मान टाकून झोपते. नंतर हे मित्र कॅम्प फायरवर नाचतात. तिथं नायिकेच्या चेहऱ्यावर जरा वेळ हसू उमलतं, पण तेवढंच...
पुन्हा या गाडीचा अंधाऱ्या रस्त्यांतून प्रवास सुरू होतो. आपल्याही आयुष्यात आपण असे क्षण अनुभवलेले असतात. सगळीकडे अंधार दिसत असतो. कित्येकदा अशाच मोकळ्या रस्त्यांवरून आपणही हिंडलेले असतो. मग पडद्यावरची पात्रं आणि आपण अगदी एकजीव होऊन जातो...
चंकी पांडे या कलाकाराविषयी फार काही चांगलं बोललेलं ऐकू येत नाही. पण या देखण्या अभिनेत्यानं या एका गाण्यात कमाल केली आहे. त्यासाठी त्याला बाकीचे सगळे माकडचाळे माफ आहेत. या गाण्याचा दर्द पुरेसा समजून घेऊन, चंकीनं हे गाणं पडद्यावर अक्षरश: ‘ड्राइव्ह’ केलं आहे. माधुरी तर या गाण्यात कमाल सुंदर दिसली आहे. अनिल कपूरच्या ‘अँग्री यंग’ मुन्नाच्या तर सगळेच प्रेमात होते. ‘तेजाब’ सुपरडुपर हिट होता. अनेकांनी केवळ माधुरीसाठी या सिनेमाची अक्षरश: पारायणं केली. मात्र, हे गाणं, त्यातलं ते पावसाळी ओलं वातावरण आणि मानवी भावभावनांच्या अनोख्या परी दाखवणारं गीत व संगीत मंत्रमुग्ध करतं. विशेषत: वयाची एक मॅच्युरिटी गाठल्यावर या गाण्याला दर्द अधिकाधिक काळीज चिरत जातो. बाबा आझमीच्या कॅमेऱ्याची आणि त्या कॅमेऱ्यामागच्या एन. चंद्राच्या दिग्दर्शकीय दृष्टीचीही ती कमाल आहे. तेजाब ११ नोव्हेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झाला. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याला ३६ वर्षं, म्हणजे तब्बल तीन तपं होतील. मात्र, आज चाळिशीत-पन्नाशीत असलेल्या सगळ्यांसाठी हे गाणं आजही तितकंच ताजं, टवटवीत आणि हृदयातली एक दुखरी कळ जागवणारं राहील यात शंका नाही.

(१५ जुलै २०२४)

----

हे गाणं बघण्यासाठी येथे क्लिक करा...

------


२. सूरमयी शाम इस तरह आये...
----------------------------------------

आज सुरेश वाडकरांचा वाढदिवस. मला त्यांचा आवाज आवडतो. काही काही गाण्यांत तर त्यांच्याऐवजी इतर आवाजाची कल्पनाच आपण करू शकत नाही, एवढी ती गाणी वाडकरांनी अजरामर करून ठेवली आहेत.  मराठीत ‘दयाघना’ तसंच हिंदीत ‘सूरमयी शाम इस तरह आये...’ ही त्यांची दोन्ही गाणी मला अतिशय आवडतात. दोन्ही गाणी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली आहेत. संगीतकारच मुळात अत्यंत आवडते असल्याने असेल, पण वाडकरांची दोन गाणी विशेष आवडतात. जयदेव यांचं ‘सीने में जलन...’ किंवा इलायराजा यांचं ‘ऐ ज़िंदगी गले लगा ले...’ किंवा रवी दातेंचं ‘आताच अमृताची बरसुन रात गेली...’ यांवरही वाडकरांचा निर्विवाद स्टॅम्प आहेच. पण आज सांगायचं आहे ते ‘सूरमयी शाम...’विषयी...
‘लेकिन’ या चित्रपटातलं हे गाणं. विनोद खन्ना आणि डिम्पलवर चित्रित झालेलं. हे गाणं मी ‘लेकिन’ चित्रपट रीलीज झाल्यापासून, म्हणजे साधारण १९९१ पासून (म्हणजे माझ्या वयाच्या १६ व्या वर्षापासून) ऐकत आलो आहे. मी हे गाणं कितीही वेळा ऐकू शकतो. सुरुवातीला वॉकमनवर ‘लेकिन’च्या कॅसेटची पारायणंच्या पारायणं झाली असल्यामुळं हे गाणं अगदी त्यातल्या प्रत्येक पॉझसकट, वाद्यमेळांसकट कानात इतकं बसलंय की ते प्रत्यक्ष ऐकलं नाही तरी सतत ऐकू येत राहतं. गुलज़ार यांचे खास शब्द, खास मंगेशकर टच असलेलं बाळासाहेबांचं संगीत आणि वाडकरांचा मखमली स्वर यांची अशी काही जादू आपल्यावर होते की बस्स! हिंदीत ज्याला ‘सुकून मिलना’ म्हणतात, तशी काहीशी तृप्तीची भावना हे गाणं ऐकल्यावर मनात येते.
मला कायम वाटतं, गावाकडची ग्रीष्मातली संध्याकाळ असावी.... उकाडा संपून, संध्याकाळची थंड हवेची झुळूक यायला सुरुवात झालेली असावी, आपण घरासमोरच्या सारवलेल्या स्वच्छ अंगणात आरामखुर्ची टाकून, जीव ओवाळून टाकावा असं काही तरी भन्नाट पुस्तक वाचत बसलेलं असावं आणि त्या आपल्या अशा कुणा खास व्यक्तीच्या येण्याची वाट बघताना हे गाणं कानावर यावं... वाट पाहण्यात एक ओढ आहे, वेगळा अनिवार आनंद आहे आणि त्याच वेळी एक हुरहुरही आहे. ‘कोई आहट नहीं बदन की कही फिर भी लगता है तू यहीं है कहीं...’ ही ओळ काय किंवा ‘दिन का जो भी पहर गुजरता है, कोई एहसान सा उतरता है’ ही खास गुलज़ार टच असलेली ओळ काय... प्रत्येक शब्द न् शब्द ऐकताना आपल्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहतात. हे असं वाट पाहणं सुसह्य होतं ते अशा सुरेल गाण्यानं... हे ‘एहसान’ काही आपण आयुष्यभर विसरू शकत नाही...

व्वा वाडकर... जियो... 

(७ ऑगस्ट २०२४)

----

हे गाणे बघण्यासाठी येथे क्लिक करा...

------

३. गंजल्या ओठास माझ्या...
---------------------------------

काही काही गाणी आपल्याला अत्यंत आवडतात, काही आपल्या भावविश्वाचा भाग होऊन जातात, तर काही आपल्या आयुष्यावरच विलक्षण परिणाम करून जातात. 'गंजल्या ओठास माझ्या, धार वज्राची मिळू दे' हे असंच माझ्या आयुष्यावर कायमचा परिणाम करून गेलेलं गाणं... जितक्या वेळा मी हे गाणं ऐकतो, तितक्यांदा माझे डोळे ओले झाले आहेत. वरकरणी दगडी कवचात जगणाऱ्या आपल्या मनातला पाषाण फोडून, आतला निर्झर वाहता करण्याची ताकद या गाण्यात आहे.
सुरेश भट, बाळासाहेब, रवींद्र साठे ऊर्फ बुवा, जब्बार आणि स्मिता हे सगळे अत्यंत दुष्ट लोक आहेत, असं माझं मत आहे. 'उंबरठा' या चित्रपटातल्या या गाण्याचं चित्रिकरण म्हटलं, तर अगदी साधं... स्मिता एका टांग्यातून तिच्या अनाथाश्रामाकडं निघाली आहे. हा सगळा देशावरचा उजाड, भकास भाग आहे. त्यातल्या धुळीच्या रस्त्यानं तो टांगा निघाला आहे. रस्ता निर्जन आहे... मधेच एक रेल्वे जाते. त्या रेल्वेलायनीच्या शेजारच्या धुळकट रस्त्यानं हा टांगा निघाला आहे. तिथं चरत असलेलं एक डुक्करही आपल्याला दिसतं. पुढंही साधारणत: अशाच भागातून हा टांगा मार्गक्रमणा करीत राहतो. कॅमेरा लाँग शॉटमध्ये एकदा हा सारा आसमंत दाखवतो, तर एकदा क्लोजमध्ये स्मिताचा करारी, निर्धारी चेहरा दाखवतो. ज्या गाण्याच्या चित्रिकरणात गाणं केवळ पार्श्वभूमीवर वाजतं, त्या ठिकाणी त्या शब्दांवर अभिनय करणं ही किती जिकिरीची गोष्ट आहे! पण स्मिताला सारं सहजसाध्य आहे. तिचा उत्कट चेहरा पाहत राहावा... त्या चित्रपटातल्या सुलभा महाजनचा सगळा संघर्ष आणि तिची जिद्द त्यात उतरली आहे...
यातला भूप्रदेश माझ्या जन्मगावाच्या भौगोलिक परिस्थितीशी मिळताजुळता आहे. म्हणून मला तो आपलासा वाटतो. आपणही इथूनच आलो आहोत आणि असाच संघर्ष करीत आलो आहोत, हे सारखं जाणवत राहतं....
भटांनी लिहिलं आहे -

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे!
आंधळ्या आत्म्यास माझ्या सूर्य सत्याचा जळू दे!

पांगळा बंधिस्त माझा जन्म आकाशून जावो;
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे!

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो;
सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळू दे!

लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतु
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे!

आणु दे गा वंचकांना क्रूस छद्माचा दयाळा;
रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकळू दे!

बाळासाहेबांनी यातली पहिली चार कडवी गाण्यात घेतली आहेत. शेवटचं कडवं गाण्यात नाही. पण भटांचे हे शब्द, हृदयनाथांची चाल आणि बुवांचा आवाज हे त्रिकुट असं काही जमून आलं आहे की बस्स...
यातल्या शेवटच्या म्हणजे 'लाभू दे लाचार छाया... ' या कडव्याला माझ्या डोळ्यांत हमखास पाणी येतं. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय, पण काहीएक नीतिमत्ता मानणाऱ्या लोकांच्या आयुष्याचं हे राष्ट्रगीतच म्हणायला हवं. माझ्या आयुष्यात अगदी तरुणपणी माझ्या वाट्याला नैराश्य, संघर्ष आला होता. तो तसा कुणालाच चुकत नाही. मात्र, त्याही काळात माझं मन शांत राहिलं ते हे गाणं आणि त्यातल्या या ओळी ऐकून...
आजही हे गाणं ऐकताना माझाच तो कटू भूतकाळ सर्रकन डोळ्यांसमोरून जातो आणि त्या आठवणींनी मन आणि डोळे दोन्ही चिंब होतात...
थोर गाणी अशीच घडतात, तयार होतात... कारण ती आपल्या मनात कायमची वस्तीला येतात...

(६ जुलै २०१८)

---

हे गाणे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

-----