9 Aug 2024

तीन गाणी, तीन आठवणी...

१. सो गया ये जहाँ...
-----------------------

आत्ता खूप दिवसांनी ‘तेजाब’मधलं ‘सो गया ये जहाँ...’ गाणं ऐकलं आणि मन भूतकाळात गेलं. हा सिनेमा आला १९८८ मध्ये. तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. पौगंडावस्थेतलं वय आणि आयुष्यात पहिल्यांदा झालेलं स्थलांतर. मी माझं गाव सोडून शहरात राहायला आलो होतो. तिथल्याच थिएटरच्या अंधारात हा सिनेमा बघितला होता. तेव्हा अर्थात माधुरीच्या ‘एक दो तीन...’चं गारूड होतं. ‘सो गया ये जहाँ...’ गाण्यातला दर्द समजायला चाळिशी यावी लागली. नंतरही मी खूप वेळा हा सिनेमा पाहिलाय असं नाही. मात्र, त्यातले काही काही प्रसंग अगदी लख्ख लक्षात आहेत. महेश देशमुखचा ‘मुन्ना’ कसा झाला, याचा हा विदारक प्रवास आहे. त्या प्रवासाला ऐंशीच्या दशकातील सामाजिक, राजकीय स्थितीची पार्श्वभूमी आहे. भले सिनेमात ती नकळत आली असेल... अर्थात आता इथं तो विषय नाही.
...तर हे गाणं... लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं सगीत, शब्बीर अहमद या फारशा माहिती नसलेल्या गीतकाराचं गीत आणि नितीन मुकेश, अलका याज्ञिक व शब्बीरकुमार यांचे प्रमुख स्वर. सोबतीला कोरस. या कोरसच्या हमिंगनं गाण्याची सुरुवात होते. मुंबईतला रिकामा रस्ता, नुकताच पडून गेलेला पाऊस, त्या पावसाचं रस्त्यावर साठलेलं पाणी आणि सोडियम व्हेपरच्या प्रकाशात चमकणारे ओलसर रस्ते... मुन्नाचे मित्र मुन्ना आणि मोहिनीला घेऊन परत निघाले आहेत. गाणं चित्रित झालंय चंकी पांडे, माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरवर. मित्रांमध्ये विजय पाटकर वगैरे दिसतात. ते सगळे त्या स्टेशन वॅगनसारख्या गाडीच्या छतावर आडवे पडलेले आहेत. समोरची काच फुटलेली ती गाडी चंकी चालवतो आहे आणि गातो आहे - सो गया ये जहाँ, सो गया आसमाँ, सो गयी है सारी मंज़िले, हो सारी मंज़िले, सो गया है रस्ता...
नितीन मुकेशचा प्रमुख स्वर या गाण्यात एक विलक्षण आर्त भाव घेऊन येतो. हा स्वर एकाच वेळी वेदनेचा आहे, वेदनेवर फुंकर घालणाराही आहे, आपल्या बेफिकिरीवर खूश होणारा आहे आणि त्याच वेळी आपल्या अनिकेत अवस्थेची अपरिहार्यता सांगणाराही आहे. नितीन मुकेश यांनी गायलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांत निश्चितच या गाण्याचा समावेश व्हावा. सिनेमातील मुख्य पात्रांच्या जगण्यात प्रचंड उलथापालथ झाली आहे. सगळं जग, नियती विरोधात आहे. केवळ मित्रांचा भरोसा आहे. त्यांच्याच साथीत ही वाटचाल सुरू आहे. नायक-नायिका एका विलक्षण वळणावर ताटातूट होऊन अगदी वेगळ्या रूपात पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत. त्यांना एकमेकांच्या संगतीत घालवलेले प्रेमाचे दिवस आठवताहेत. दोघेही त्या गाडीत मागच्या बाजूला अवघडून बसले आहेत. नायिका जखमी झाली आहे, तर नायक सिगारेटी फुंकून आपला उद्वेग शमवतो आहे. दोघांच्याही भावना गाण्यातून पार्श्वभूमीवर व्यक्त होतात. ‘क्यूं प्यार का मौसम बीत गया, क्यू हम से जमाना जीत गया’...’ ही नायिकेची व्यथा आहे, तर ‘हर घडी मेरा दिल ग़म के घेरे में है, जि़ंदगी दूर तब अंधेरे में है...’ असं नायकाला वाटतंय. मध्येच नायिकेला डुलकी लागते आणि ती बसल्या जागी पडू लागते तर नायक चटकन तिच्या शेजारी सरकून तिला आधार देतो. तीही झोपेत अगदी निश्चिंतपणे त्याच्या खांद्यावर मान टाकून झोपते. नंतर हे मित्र कॅम्प फायरवर नाचतात. तिथं नायिकेच्या चेहऱ्यावर जरा वेळ हसू उमलतं, पण तेवढंच...
पुन्हा या गाडीचा अंधाऱ्या रस्त्यांतून प्रवास सुरू होतो. आपल्याही आयुष्यात आपण असे क्षण अनुभवलेले असतात. सगळीकडे अंधार दिसत असतो. कित्येकदा अशाच मोकळ्या रस्त्यांवरून आपणही हिंडलेले असतो. मग पडद्यावरची पात्रं आणि आपण अगदी एकजीव होऊन जातो...
चंकी पांडे या कलाकाराविषयी फार काही चांगलं बोललेलं ऐकू येत नाही. पण या देखण्या अभिनेत्यानं या एका गाण्यात कमाल केली आहे. त्यासाठी त्याला बाकीचे सगळे माकडचाळे माफ आहेत. या गाण्याचा दर्द पुरेसा समजून घेऊन, चंकीनं हे गाणं पडद्यावर अक्षरश: ‘ड्राइव्ह’ केलं आहे. माधुरी तर या गाण्यात कमाल सुंदर दिसली आहे. अनिल कपूरच्या ‘अँग्री यंग’ मुन्नाच्या तर सगळेच प्रेमात होते. ‘तेजाब’ सुपरडुपर हिट होता. अनेकांनी केवळ माधुरीसाठी या सिनेमाची अक्षरश: पारायणं केली. मात्र, हे गाणं, त्यातलं ते पावसाळी ओलं वातावरण आणि मानवी भावभावनांच्या अनोख्या परी दाखवणारं गीत व संगीत मंत्रमुग्ध करतं. विशेषत: वयाची एक मॅच्युरिटी गाठल्यावर या गाण्याला दर्द अधिकाधिक काळीज चिरत जातो. बाबा आझमीच्या कॅमेऱ्याची आणि त्या कॅमेऱ्यामागच्या एन. चंद्राच्या दिग्दर्शकीय दृष्टीचीही ती कमाल आहे. तेजाब ११ नोव्हेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झाला. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याला ३६ वर्षं, म्हणजे तब्बल तीन तपं होतील. मात्र, आज चाळिशीत-पन्नाशीत असलेल्या सगळ्यांसाठी हे गाणं आजही तितकंच ताजं, टवटवीत आणि हृदयातली एक दुखरी कळ जागवणारं राहील यात शंका नाही.

(१५ जुलै २०२४)

----

हे गाणं बघण्यासाठी येथे क्लिक करा...

------


२. सूरमयी शाम इस तरह आये...
----------------------------------------

आज सुरेश वाडकरांचा वाढदिवस. मला त्यांचा आवाज आवडतो. काही काही गाण्यांत तर त्यांच्याऐवजी इतर आवाजाची कल्पनाच आपण करू शकत नाही, एवढी ती गाणी वाडकरांनी अजरामर करून ठेवली आहेत.  मराठीत ‘दयाघना’ तसंच हिंदीत ‘सूरमयी शाम इस तरह आये...’ ही त्यांची दोन्ही गाणी मला अतिशय आवडतात. दोन्ही गाणी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली आहेत. संगीतकारच मुळात अत्यंत आवडते असल्याने असेल, पण वाडकरांची दोन गाणी विशेष आवडतात. जयदेव यांचं ‘सीने में जलन...’ किंवा इलायराजा यांचं ‘ऐ ज़िंदगी गले लगा ले...’ किंवा रवी दातेंचं ‘आताच अमृताची बरसुन रात गेली...’ यांवरही वाडकरांचा निर्विवाद स्टॅम्प आहेच. पण आज सांगायचं आहे ते ‘सूरमयी शाम...’विषयी...
‘लेकिन’ या चित्रपटातलं हे गाणं. विनोद खन्ना आणि डिम्पलवर चित्रित झालेलं. हे गाणं मी ‘लेकिन’ चित्रपट रीलीज झाल्यापासून, म्हणजे साधारण १९९१ पासून (म्हणजे माझ्या वयाच्या १६ व्या वर्षापासून) ऐकत आलो आहे. मी हे गाणं कितीही वेळा ऐकू शकतो. सुरुवातीला वॉकमनवर ‘लेकिन’च्या कॅसेटची पारायणंच्या पारायणं झाली असल्यामुळं हे गाणं अगदी त्यातल्या प्रत्येक पॉझसकट, वाद्यमेळांसकट कानात इतकं बसलंय की ते प्रत्यक्ष ऐकलं नाही तरी सतत ऐकू येत राहतं. गुलज़ार यांचे खास शब्द, खास मंगेशकर टच असलेलं बाळासाहेबांचं संगीत आणि वाडकरांचा मखमली स्वर यांची अशी काही जादू आपल्यावर होते की बस्स! हिंदीत ज्याला ‘सुकून मिलना’ म्हणतात, तशी काहीशी तृप्तीची भावना हे गाणं ऐकल्यावर मनात येते.
मला कायम वाटतं, गावाकडची ग्रीष्मातली संध्याकाळ असावी.... उकाडा संपून, संध्याकाळची थंड हवेची झुळूक यायला सुरुवात झालेली असावी, आपण घरासमोरच्या सारवलेल्या स्वच्छ अंगणात आरामखुर्ची टाकून, जीव ओवाळून टाकावा असं काही तरी भन्नाट पुस्तक वाचत बसलेलं असावं आणि त्या आपल्या अशा कुणा खास व्यक्तीच्या येण्याची वाट बघताना हे गाणं कानावर यावं... वाट पाहण्यात एक ओढ आहे, वेगळा अनिवार आनंद आहे आणि त्याच वेळी एक हुरहुरही आहे. ‘कोई आहट नहीं बदन की कही फिर भी लगता है तू यहीं है कहीं...’ ही ओळ काय किंवा ‘दिन का जो भी पहर गुजरता है, कोई एहसान सा उतरता है’ ही खास गुलज़ार टच असलेली ओळ काय... प्रत्येक शब्द न् शब्द ऐकताना आपल्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहतात. हे असं वाट पाहणं सुसह्य होतं ते अशा सुरेल गाण्यानं... हे ‘एहसान’ काही आपण आयुष्यभर विसरू शकत नाही...

व्वा वाडकर... जियो... 

(७ ऑगस्ट २०२४)

----

हे गाणे बघण्यासाठी येथे क्लिक करा...

------

३. गंजल्या ओठास माझ्या...
---------------------------------

काही काही गाणी आपल्याला अत्यंत आवडतात, काही आपल्या भावविश्वाचा भाग होऊन जातात, तर काही आपल्या आयुष्यावरच विलक्षण परिणाम करून जातात. 'गंजल्या ओठास माझ्या, धार वज्राची मिळू दे' हे असंच माझ्या आयुष्यावर कायमचा परिणाम करून गेलेलं गाणं... जितक्या वेळा मी हे गाणं ऐकतो, तितक्यांदा माझे डोळे ओले झाले आहेत. वरकरणी दगडी कवचात जगणाऱ्या आपल्या मनातला पाषाण फोडून, आतला निर्झर वाहता करण्याची ताकद या गाण्यात आहे.
सुरेश भट, बाळासाहेब, रवींद्र साठे ऊर्फ बुवा, जब्बार आणि स्मिता हे सगळे अत्यंत दुष्ट लोक आहेत, असं माझं मत आहे. 'उंबरठा' या चित्रपटातल्या या गाण्याचं चित्रिकरण म्हटलं, तर अगदी साधं... स्मिता एका टांग्यातून तिच्या अनाथाश्रामाकडं निघाली आहे. हा सगळा देशावरचा उजाड, भकास भाग आहे. त्यातल्या धुळीच्या रस्त्यानं तो टांगा निघाला आहे. रस्ता निर्जन आहे... मधेच एक रेल्वे जाते. त्या रेल्वेलायनीच्या शेजारच्या धुळकट रस्त्यानं हा टांगा निघाला आहे. तिथं चरत असलेलं एक डुक्करही आपल्याला दिसतं. पुढंही साधारणत: अशाच भागातून हा टांगा मार्गक्रमणा करीत राहतो. कॅमेरा लाँग शॉटमध्ये एकदा हा सारा आसमंत दाखवतो, तर एकदा क्लोजमध्ये स्मिताचा करारी, निर्धारी चेहरा दाखवतो. ज्या गाण्याच्या चित्रिकरणात गाणं केवळ पार्श्वभूमीवर वाजतं, त्या ठिकाणी त्या शब्दांवर अभिनय करणं ही किती जिकिरीची गोष्ट आहे! पण स्मिताला सारं सहजसाध्य आहे. तिचा उत्कट चेहरा पाहत राहावा... त्या चित्रपटातल्या सुलभा महाजनचा सगळा संघर्ष आणि तिची जिद्द त्यात उतरली आहे...
यातला भूप्रदेश माझ्या जन्मगावाच्या भौगोलिक परिस्थितीशी मिळताजुळता आहे. म्हणून मला तो आपलासा वाटतो. आपणही इथूनच आलो आहोत आणि असाच संघर्ष करीत आलो आहोत, हे सारखं जाणवत राहतं....
भटांनी लिहिलं आहे -

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे!
आंधळ्या आत्म्यास माझ्या सूर्य सत्याचा जळू दे!

पांगळा बंधिस्त माझा जन्म आकाशून जावो;
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे!

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो;
सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळू दे!

लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतु
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे!

आणु दे गा वंचकांना क्रूस छद्माचा दयाळा;
रक्त येशूचे परी डोळ्यांत माझ्या साकळू दे!

बाळासाहेबांनी यातली पहिली चार कडवी गाण्यात घेतली आहेत. शेवटचं कडवं गाण्यात नाही. पण भटांचे हे शब्द, हृदयनाथांची चाल आणि बुवांचा आवाज हे त्रिकुट असं काही जमून आलं आहे की बस्स...
यातल्या शेवटच्या म्हणजे 'लाभू दे लाचार छाया... ' या कडव्याला माझ्या डोळ्यांत हमखास पाणी येतं. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय, पण काहीएक नीतिमत्ता मानणाऱ्या लोकांच्या आयुष्याचं हे राष्ट्रगीतच म्हणायला हवं. माझ्या आयुष्यात अगदी तरुणपणी माझ्या वाट्याला नैराश्य, संघर्ष आला होता. तो तसा कुणालाच चुकत नाही. मात्र, त्याही काळात माझं मन शांत राहिलं ते हे गाणं आणि त्यातल्या या ओळी ऐकून...
आजही हे गाणं ऐकताना माझाच तो कटू भूतकाळ सर्रकन डोळ्यांसमोरून जातो आणि त्या आठवणींनी मन आणि डोळे दोन्ही चिंब होतात...
थोर गाणी अशीच घडतात, तयार होतात... कारण ती आपल्या मनात कायमची वस्तीला येतात...

(६ जुलै २०१८)

---

हे गाणे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

No comments:

Post a Comment