14 Oct 2024

दोन पुस्तकांविषयी...

रूह आणि खुलभर दुधाची कहाणी
-----------------------------------------


अलीकडं सोशल मीडिया, स्मार्टफोन या गोष्टींमुळं पुस्तकवाचन कमी झालं आहे. ही काही फार अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट नाहीय खरं; पण ही वस्तुस्थिती आहे हे मान्य करायला पाहिजे. असं असलं तरी पुस्तकं खरेदी केली जातातच. उशाशी ठेवलेला आवडत्या पुस्तकांचा ढीग कधीही कमी होत नाही. त्यातलं एखादं पुस्तक कधीही उचलून वाचावं, अशा हेतूनंच तो ढीग तिथं ठेवलेला असतो. कधी वाचली जातात, कधी नाही! मात्र, नुकतीच दोन अतिशय चांगली मराठी पुस्तकं वाचून संपविली. एरवी एखादं दोनशे पानांचं पुस्तक संपवायला मला कधी महिनाही लागू शकतो. ही दोन पुस्तकं मात्र अगदी रोज सलग वाचून आठवडाभरात संपविली. एक दोनशे पानांचं होतं, तर एक चारशे. या दोन्ही पुस्तकांविषयी आपल्यासारख्या रसिक वाचकांना सांगितलंच पाहिजे, म्हणून हा लेखप्रपंच....

(विशेष नोंद - हे या पुस्तकांंच परीक्षण नाही. फार तर आस्वादन आहे, असं म्हणू या.)

---

 १.  रूह
----------

पहिलं पुस्तकं वाचलं ते मानव कौलचं ‘रूह’. हा रोहन प्रकाशननं केलेला मराठी अनुवाद आहे. माझी मैत्रीण नीता कुलकर्णी हिनं हा अनुवाद केला आहे. हे पुस्तक म्हणजे एका अस्वस्थ कलाकारानं स्वत:ची मुळं शोधण्याचा केलेला मनस्वी प्रवास आहे.
मानव कौल मला आधी माहिती झाला तो एक अभिनेता म्हणून. ‘तुम्हारी सुलू’ या सिनेमात विद्या बालनचा ‘लो प्रोफाइल’ नायक म्हणून तो लक्षात राहिला. अगदी ‘सातच्या आत घरात’मधला मानवही आठवला. मानव अभिनेता म्हणून प्रसिद्ध असला, तरी अलीकडं लेखक म्हणूनही त्यानं त्याची ओळख प्रस्थापित केली आहे. हिंदीतील साहित्यविश्वात त्याची पुस्तकं लोकप्रिय आहेत. आपल्याकडेही त्याच्या लेखनाचे अनेक चाहते आहेत. मी स्वत: त्याचं हे पहिलंच पुस्तक वाचलं. तेही अनुवादित स्वरूपात. मात्र, आता या लेखकाची इतर पुस्तकं (मूळ भाषेतून) वाचायला हवीत, असं वाटू लागलं आहे.
‘रूह’, म्हणजेच आत्मा, ही मानवच्या स्वत:च्या मुळांचा शोध आहेच; पण त्यासोबतच तो त्याचा स्वत:चाही आत्मशोध आहे. ही कौल मंडळी म्हणजे काश्मिरी पंडित. गेल्या चार दशकांत काश्मीरमध्ये काय सुरू आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. सन १९९० मध्ये काश्मीरमधून सर्व पंडितांना भयानकरीत्या हाकलून देण्यात आले. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यांच्या मालमत्ता हडप करण्यात आल्या, त्यांच्या बायका-मुलींवर बलात्कार करण्यात आले, अनेकांचे खून पाडण्यात आले. चार दशकं झाली तरी अजूनही काश्मिरी पंडितांना न्याय मिळालेला नाही. मानवचं घर बारामुल्लाजवळ ख्वाजाबाग या गावी आहे. तिथल्या त्या घराच्या त्याच्या आठवणी त्याच्या लहानपणच्या आहेत आणि धूसर आहेत. त्याला आठवतो तो फक्त त्या घराचा निळा दरवाजा आणि आजूबाजूची वस्ती. हा घराच्या ओढीनं तो काश्मीरमध्ये जातो आणि तिथं त्याला काय अनुभव येतो, त्याची ही कहाणी आहे.
या कहाणीत लेखकाची नायिका आहे ‘रूहानी’ (किंवा ‘रूह’) या नावाची. ही अमेरिकेतील तरुणी, पण तिचा काश्मीरवर मोठा अभ्यास आहे. ती लेखकाची मैत्रीण/प्रेयसी आहे आणि त्याला त्याच्या घराचा शोध घेण्यास प्रवृत्त करते आहे. ही कादंबरी दोन स्तरांवर आपल्याशी संवाद साधते. एक आहे तो मानवचा काश्मीरमधल्या त्याच्या मुळांचा शोध घेणारा प्रवास आणि दुसरा आहे तो काश्मीरमधील नागरिक, तिथले स्थानिक लोक यांच्याशी त्याचा होत असलेला संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं काश्मीरचं वेगळं रूप. यापैकी त्याचा पहिला प्रवास हा बऱ्यापैकी गूढ, आत्मरत आणि स्वसंवादी असा आहे. यातली ‘रूह’ हेदेखील एक प्रतीकच म्हणून तो वापरतो आहे की काय, असंही मला काही वेळा वाटून गेलं. म्हणजे ‘रूह’ ही त्याची प्रेयसी नसून, त्याचंच एक अंतर्मन किंवा आत्मा आहे आणि त्या अद्वैताशी त्याचा संवाद होतो आहे, असंही वाटलं. विशेषत: ‘रूहानी’ आणि ‘रूह’ असे दोन वेगळे उल्लेख येतात, तेव्हा असं वाटतं. एक ‘रूहानी’ लेखकाला खरोखर भेटली असावी आणि ‘रूह’ म्हणून जो उल्लेख येतो, तो कदाचित त्याचा अंतर्मनाशी असलेला संवाद असावा. माहिती नाही. लेखकाच्या मनात तसं असेल किंवा नसेलही. तसंही एका कथनाचे अनेक अर्थ, अनेक आविष्कार होणं हे एका चांगल्या कलाकृतीचंच लक्षण मानतात. त्या अर्थानेही ‘रूह’ ही शब्दश: आपल्या आत्म्याला भिडते. 
दुसरीकडं लेखक आणि त्याच्या वडिलांचं एक विलक्षण नातं यात आपल्याला पदोपदी जाणवत राहतं. काश्मीर सोडताना वडिलांना झालेल्या वेदना ते शेवटपर्यंत विसरू शकत नाहीत. मुळापासून उखडलेलं झाड दुसरीकडं रुजू शकत नाही, तशी त्यांची अवस्था होते. लेखकाच्या संवेदनशील मनाला वडिलांची ही तगमग दिसत राहते. तो वडिलांसाठी पुन्हा काश्मीरमधलं आपलं संचित शोधायला जातो. या प्रवासात लेखकाचं मन सतत त्याचं बालपण, तेव्हाचे मित्र, तेव्हाची कॉलनी आणि तो सगळा परिसर यांचा शोध घेत राहतं. श्रीनगरमध्ये, वेगवेगळ्या शहरांत प्रवास करताना भेटणारे तिथले जुने मित्र, काही आप्त किंवा काही स्थानिक माणसं यांचं मनोगत त्याला ऐकायला मिळतं. त्यातून काश्मीरची भळभळती व्यथा-वेदना दिसत राहते. एक मात्र आहे. या सर्व परिस्थितीला लेखक कुठेही कोणालाही जबाबदार धरत नाही. कोणावरही हेत्वारोप करत नाही. आहे ते स्वीकारण्याची एक समंजस जाणीव दिसते.
अशा जवळपास काव्यात्म अनुभव असलेल्या लेखनाचा अनुवाद करणं ही कठीण गोष्ट. त्यात लेखक कधी भूतकाळ, कधी वर्तमानकाळ तर कधी भविष्यकाळ असा तिन्ही काळांत लीलया संचार करतो. मात्र, नीता अतिशय संवेदनशीलतेनं आणि सफाईनं या जाणिवेचा भावानुवाद करते. त्या लेखनातील सगळी व्याकुळता, सगळी वेदना, सगळा ‘दर्द’ तिनं अगदी व्यवस्थित मराठी रूपांतरात आणला आहे. ‘रोहन’ची निर्मिती नेहमीच देखणी असते. ‘आंतरभारती’ या विभागात ते भारतातील इतर भाषांतील पुस्तकं मराठीत आणत असतात. या मालिकेतील हे महत्त्वाचं पुस्तक आहे. ते वाचणं म्हणजे एक समृद्ध करणारा, पण त्याच वेळी मनात एक अनाम टोचणी लावणारा, तरी हवाहवासा वाटणारा अनुभव आहे.

---

२. खुलभर दुधाची कहाणी
--------------------------------

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. 
सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं.
एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर  सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे.
सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच  निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते.
त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे.


------