29 Jan 2026

मनशक्ती बालकुमार दिवाळी २५ - लेख

चौसष्ट घरांची ‘राणी’
------------------------


माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विविध गुणांची आवश्यकता असते. त्या माणसाचे वैयक्तिक कष्ट, इप्सित ध्येय साध्य करण्याची तीव्र इच्छा, त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी, ध्येयाकडे जाण्याचे योग्य नियोजन, कार्यसाधनेतील एकाग्रता या सर्व गोष्टींचे एकत्रित फळ म्हणून आपल्याला यश मिळते. आपल्याला यशस्वी होण्यासाठी जगातील अनेक यशस्वी लोकांच्या कथा प्रेरणा देत असतात. या लोकांचा यशाकडे झालेला प्रवास, त्या मार्गात आलेल्या अडथळ्यांवर त्यांनी कशी मात केली याचे अनुभव, यश मिळविण्यासाठी घेतलेली मेहनत या सर्व बाबी आपल्यालाही तसेच यश मिळविण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. क्रीडा क्षेत्रात आपल्याला अशा अनेक यशोगाथा ऐकायला मिळतात. अगदी भारतापुरते बोलायचे झाले तर ‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांच्यापासून ते महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत अनेक खेळाडूंची उदाहरणे देता येतील. क्रिकेटमध्येच सुनील गावसकर किंवा अगदी अलीकडच्या काळातील एम. एस. धोनी, विराट कोहली वा रोहित शर्मा, या सर्वांनी प्रचंड चिकाटीने, मेहनतीने त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळविल्याचे दिसते. बॅडमिंटनमध्ये प्रकाश पदुकोण यांच्यापासून साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधूपर्यंत पुष्कळ अशीच उदाहरणे सांगता येतील. मैदानी स्पर्धांमध्येही मिल्खासिंग, पी. टी. उषा यांच्यापासून ते नीरज चोप्रापर्यंत अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाद्वारे देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे. या सर्व खेळाडूंच्या यशात एक गोष्ट समान दिसेल - ती म्हणजे त्यांची अविचल, अढळ कार्यसाधना!


या लेखात बुद्धिबळात सर्वोच्च यश मिळविणारी मराठमोळी मुलगी दिव्या देशमुख हिच्या कार्यसाधनेविषयी जाणून घेऊ या. बुद्धिबळ हा खेळ आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. या खेळाच्या नावाप्रमाणेच यात बुद्धीचा कस लागतो. या खेळाचा उगम प्राचीन भारतातच झाला असं म्हणतात. त्यामुळे आपला भारत देश हेच या अद्भुत खेळाचे जन्मस्थान आहे, असं मानायला हरकत नाही. पूर्वी त्याला ‘चतुरंग’ असं नाव होतं. साधारण सहाव्या शतकापर्यंत मागे या खेळाचा इतिहास सांगता येऊ शकतो. तत्कालीन हिंदुस्थानातील सैनिकांनी हा खेळ देशाबाहेर नेला. त्यानंतर पर्शिया (आताचा इराण) देशात तो ‘शतरंज’ या नावाने खेळला जाऊ लागला आणि तिथूनच त्याचा जगभर प्रसार झाला असं मानण्यात येतं.
आधुनिक काळातही बुद्धिबळ या खेळात भारत आता एक महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. एके काळी सोविएत महासंघाचा या खेळात दबदबा होता. याशिवया युरोपीय देशांतील अनेक खेळाडूही नावलौकिक राखून होते. भारतात अलीकडच्या काळात विश्वनाथन आनंद या खेळाडूपासून आधुनिक भारतीय बुद्धिबळाच्या वर्चस्वाचे पर्व सुरू झाले, असे मानले जाते. विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर. त्याने १९८८ मध्ये हा मान मिळवला. आधुनिक बुद्धिबळात ‘ग्रँडमास्टर’ हा सर्वांत मोठा किताब मानला जातो. त्यासाठी काही विशिष्ट ‘एलो’ गुणांचा टप्पा पार करावा लागतो. सहसा २६०० ते २८०० गुणांपर्यंत जाणारे मोजके खेळाडूच ‘ग्रँडमास्टर’ होऊ शकतात. आतापर्यंत फारच थोड्या खेळाडूंना हा टप्पा गाठता आला आहे. त्यापैकी विश्वनाथन आनंद उर्फ ‘विशी’ हा एक. विशीच्या या उत्तुंग यशामुळे भारतातील बुद्धिबळ खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली. आनंद याच्यानंतर आतापर्यंत भारताचे केवळ ८८ खेळाडू ग्रँडमास्टर किताब मिळवू शकले आहेत, यावरून ‘ग्रँडमास्टर’ होणे किती कठीण असेल, याचा अंदाज येईल.
अगदी अलीकडे म्हणजे या वर्षी जुलै महिन्यात भारताची ८८ वी ग्रँडमास्टर होण्याचा मान नागपूरच्या दिव्या देशमुखने मिळवला. दिव्याची भव्य कामगिरी ही, की तिने महिलांची बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकून थेट ‘ग्रँडमास्टर’ किताबाला गवसणी घातली. गेल्या २८ जुलैला तिने महिलांच्या या विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हम्पीचा टायब्रेकरमध्ये पराभव केला आणि विश्वविजेतेपदावर स्वत:चे नाव कोरले. (त्यानंतर ऑगस्टमध्ये भारताचा रोहित कृष्णा ८९वा ‘ग्रँडमास्टर’ झाला आहे.) दिव्याच्या आधी कोनेरू हम्पी, आर. वैशाली व हरिका द्रोणावली या केवळ तीन भारतीय महिलांनाच ग्रँडमास्टर किताब मिळविता आला आहे, यावरूनही दिव्याच्या कामगिरीचे मोठेपण लक्षात येईल.
दिव्या अवघी १९ वर्षांची आहे. तिचा जन्म नऊ डिसेंबर २००५ रोजी नागपुरात एका मराठी कुटुंबात झाला. तिचे वडील जितेंद्र व आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. नागपुरातील भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिरात तिचं शालेय शिक्षण झालं. दिव्या अगदी लहान वयापासून, म्हणजे पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळते आहे. तिची आई डॉ. नम्रता यांनी सांगितल्याप्रमाणे, तिला आधी बुद्धिबळात रस नव्हता. तिची मोठी बहीण बॅडमिंटन खेळायला जायची, म्हणून दिव्याही बॅडमिंटन खेळायला जायचा हट्ट करायची. मात्र, लहानग्या दिव्याला बॅडमिंटनची रॅकेट पेलवत नसे. त्यामुळं तिला शेजारीच असलेल्या बुद्धिबळ अॅकॅडमीत घालण्यात आलं. मात्र, तिला तिथं बुद्धिबळाची गोडी लागली आणि लवकरच ती या खेळात अगदी पारंगत झाली. बुद्धिबळ हा अतिशय एकाग्र होऊन, लक्ष केंद्रित करून खेळायचा खेळ आहे. अगदी लहान असल्यानं दिव्याला तसं एकाग्र होऊन खेळणं स्वाभाविकच जमायचं नाही. मात्र, तिच्या पालकांनी तिला खूप प्रोत्साहन दिलं. न कंटाळता, न थकता, ते तिच्याकडून सराव करून घ्यायचे. त्यामुळं दिव्या खूप लवकर बुद्धिबळ खेळात तयार झाली. तिला अवघ्या आठव्या वर्षी, म्हणजे २०१३ मध्ये ‘फिडे’कडून (बुद्धिबळ खेळाची आंतरराष्ट्रीय संघटना) मास्टर पदवी मिळाली. मग २०१८ मध्ये ती महिला आंतरराष्ट्रीय मास्टर झाली. त्यानंतर ती भारताकडून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. सन २०२० मध्ये फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय संघात ती होती. नंतर २०२२ मध्ये तिने राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. यानंतर दिव्यानं मागं वळून बघितलं नाही. तिच्या या खेळातली घोडदौड जोरात सुरू झाली. तिने २०२३ मध्ये आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्यानंतर भारतातील महिलांच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेतही तिने बाजी मारली. या स्पर्धेत तर तिला सर्वांत कमी मानांकन होते. तरीही तिने हरिका द्रोणावली, वंतिका अगरवाल, कोनेरू हम्पी, सविता श्री बी., इरिना क्रुश अशा नामवंत खेळाडूंचा पराभव केला होता. जून २०२४ मध्ये ती वीस वर्षांखालील गटातील वर्ल्ड चॅम्पियन झाली. सौम्या स्वामीनाथन, हरिका द्रोणावली व कोनेरू हम्पी यांच्यानंतर अशी कामगिरी करणारी ती चौथी भारतीय महिला ठरली. अंतिम फेरीत तिनं बल्गेरियाच्या तृतीय मानांकित बेलोस्वावा क्रस्टेव्हा हिला पाच तासांहून अधिक चाललेल्या मॅरेथॉन लढतीत पराभूत केलं होतं. यानंतर ४५ व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून देताना तिनं चमकदार विजय मिळवला होता. याच स्पर्धेत तिनं वैयक्तिक सुवर्णपदकाचीही कमाई केली होती.
यंदा जॉर्जिया देशात बाटुमी या शहरात झालेल्या जागतिक विजेतेपद स्पर्धेत दिव्याला १५ वे मानांकन देण्यात आले होते. तिने चौथ्या फेरीत द्वितीय मानांकित झू जिनेर हिचा पराभव केला. उपउपांत्य फेरीत तिने भारताच्याच हरिका द्रोणावलीला हरवलं. उपांत्य लढतीत तिने चीनच्या तान झोंगयी हिच्यावर मात केली आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अंतिम फेरीत वर उल्लेख आला आहे त्याप्रमाणे भारताच्याच कोनेरू हम्पीला हरवून ती विश्वविजेती ठरली. एवढ्या लहान वयात कुशाग्र बुद्धीच्या दिव्याने बुद्धिबळ या खेळात मोठी चमक दाखवली आहे.
दिव्याच्या या यशामध्ये तिच्या जिद्दीचा, कार्यसाधनेचा अर्थातच मोठा वाटा आहे. एखादा माणूस यशस्वी झाला, असं आपण केव्हा म्हणतो? एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान, पुरस्कार वा किताब मिळणं ही या यशाची एक पोचपावती असते. त्या स्थानापर्यंत जाण्यासाठी अनेक अडथळे असतात. कष्ट असतात. कुठलंही यश सहजासहजी मिळतच नाही. दिव्यानेही बुद्धिबळासारख्या सर्वोच्च बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेल्या खेळात अशाच कष्टाने, साधनेने यश मिळविले आहे. त्यामागे तिच्या पालकांची मेहनत तर आहेच; पण स्वत: दिव्यानेही विलक्षण जिद्दीने आणि कठोर मेहनतीने हे यश प्राप्त केले आहे, यात शंका नाही. दिव्याने बुद्धिबळात लक्ष केंद्रित करायचे ठरवल्यावर तिच्या नियमित अभ्यासाकडेही दुर्लक्ष केले नाही. मुळातच ती एक हुशार विद्यार्थिनी असल्याने दहावी व बारावी या बोर्ड परीक्षाही ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. अनेकदा तर स्पर्धेच्या काळात, दोन सामन्यांच्या दरम्यान तिने शाळेचा अभ्यास केला आहे. वास्तविक त्या सामन्याचेही एक निराळे दडपण तिच्यावर असणारच. मात्र, तिने बुद्धिबळ व शाळेचा अभ्यास या दोन्हींकडे नीट लक्ष दिले व दोन्हींवर अन्याय होऊ दिला नाही. सध्या मात्र ती विविध स्पर्धांमध्ये एवढी व्यग्र आहे, की पुढचे शिक्षण दूरस्थ पद्धतीने घेण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

कुठल्याही खेळात खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक सक्षमतेची कसोटी लागते. बुद्धिब‌ळासारख्या खेळात तर खेळाडूंच्या मानसिक सक्षमतेची जणू परीक्षाच पाहिली जाते. मानसिक कणखरणा नसेल तर कुणीही खेळाडू बुद्धिबळात टिकूच शकणार नाही. त्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळायचे असेल, तर अत्यंत उच्च दर्जाची मानसिक तयारी करावी लागते. याशिवाय नियमित सरावही महत्त्वाचा असतो. समोरचा प्रतिस्पर्धी कोण आहे, कसा आहे, त्याचं आधीचं रेकॉर्ड कसं आहे हे सर्व बघावं लागतं. अतिशय आधुनिक अशा संगणकांवर बुद्धिबळाचे अनेक डाव तयार केले जातात. आतापर्यंत विविध स्पर्धांत खेळले गेलेले डावही संगणकावर अभ्यासता येतात. किंबहुना, संगणकही बुद्धिबळ ‘खेळतो’, हे आता सर्वज्ञात आहे. संगणकाबरोबर बुद्धिबळ खेळून त्याला हरवून दाखवणं ही फारच उच्च कोटीची कामगिरी मानली जाते. याचे कारण जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या उत्तमोत्तम डावांचा, चालींचा, डावपेचांचा अभ्यास करून संगणकाच्या खेळाचा ‘प्रोग्राम’ तयार केला जातो. संगणकाच्या सर्व चाली अशा गणिती पद्धतीने व अचूक तयार केलेल्या असल्याने, त्या ओळखून, त्याला कोड्यात पाडता येईल अशा प्रतिचाली रचणे, तसा विचार करू शकणे हे अत्यंत अव्वल बुद्धिमत्ता असलेले खेळाडूच करू शकतात. दिव्या ही अशा प्रकारची खेळाडू आहे. बऱ्याच खेळाडूंना जन्मत:च काही विशिष्ट कौशल्यांची (उदा. वेगात आकडेमोड करता येणे) देणगी असते. बुद्धिबळ खेळू शकणाऱ्या खेळाडूंचा मेंदूही अशा काही विशिष्ट, दैवदत्त कौशल्यांनी युक्त असतो. त्याचा त्यांना खेळताना फायदा होत असला, तरी अनेकदा समोरचे खेळाडूही तसेच व तितकेच तयारीचे असल्याने, वैयक्तिक कठोर मेहनत व प्रचंड पूर्वतयारी यांना पर्यायच नसतो. दिव्याचे भव्य यश म्हणजे अशाच अत्यंत कठीण व्रताचे फळ आहे, असेच म्हणावे लागेल.
दिव्याची ही कहाणी वाचल्यावर असं वाटतं, की आपण कुणीही आपल्या आयुष्यात दिव्यासारखं भव्य यश मिळवू शकतो. मात्र, त्यासाठी कुठल्या तरी एका क्षेत्राची अतिशय मनापासून आवड असायला हवी आणि त्या क्षेत्रातील सर्वोत्तम स्थान मिळविण्यासाठी अफाट मेहनत करायची तयारीही हवी. कार्यमग्नतेचा ध्यास आणि कार्यसाधनेची आस घेऊन आयुष्यात पुढं जाण्याची जिद्द हवी. अशा जिद्दीने कष्ट केल्यास यश आपल्या पायाशी नक्की लोळण घेईल, यात अजिबात शंका नाही.

---

(पूर्वप्रसिद्धी : मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक, २०२५)

---

No comments:

Post a Comment