3 Feb 2026

पुण्यभूषण दिवाळी अंक २५ - लेख

चटकदार चवीची लज्जतदार भेळ
---------------------------------------

भेळ आवडत नाही असा माणूस भेटणं कठीण. लहान-थोर, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत अशा सर्व भेदांपलीकडे जाऊन भेळ बहुतेक सर्वांना आवडतेच. करायला म्हटलं तर सोपी. तिची एकच एक अशी काही स्टँडर्ड रेसिपी नाही. त्यामुळं कुणालाही करायला सोपी वाटणारी. ती तयार करायला लागणारे सगळे घटकही मिळणं अवघड नाही. संध्याकाळचं चटक-मटक खाणं म्हणजे भेळ हे आजही अनेकांसाठी अभेद्य असं समीकरण आहे. भेळेत दोन मुख्य प्रकार. एक म्हणजे सुकी व दुसरा म्हणजे ओली. ओल्या भेळेला जरा तरी जामानिमा असतो. त्या मानाने सुकी भेळ अगदी कधीही, कुठेही तयार होऊ शकेल अशी. चुरमुरे, फरसाण, शेंगदाणे, बारीक शेव, कांदा, तळलेली वा कच्ची मिरची, असल्यास टोमॅटो व कोथिंबीर आणि वरून थोडंसं तिखट-मीठ घातलं की झाली सुकी भेळ तयार. ही शक्यतो वर्तमानपत्राच्या मोठ्या कागदावर ढीग करून खायची. शिवाय शक्यतो एकट्याने न खाता, समूहाने खायची. पूर्वी तर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांनंतर कार्यकर्ते मंडळींचा हाच आहार असायचा. त्याला भत्ता असं म्हटलं जात असे. भेळभत्ता असा मूळ शब्द. नंतर त्याचं लघुरूप ‘भत्ता’ हेच प्रचलित झालं. राजकीय सभा, गणेशोत्सव, बैठका अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी उपस्थित सर्वांना एकत्र खायला देण्यासारखा (व अर्थात परवडणारा) हाच पदार्थ असल्यानं तो अतिशय लोकप्रिय आहे. अगदी लहान-मोठ्या सहली, गेटटुगेदर, ऑफिसमधल्या अचानक ठरणाऱ्या पार्ट्या आणि दुपारच्या वेळेला मुलांना खायला काय द्यावे या विवंचनेत असणाऱ्या आया या सर्व ठिकाणी उपयुक्त ठरते ती ही सुकी भेळ किंवा भत्ता. महाराष्ट्रातल्या विविध शहरांत-गावांत या भत्त्याची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. डाव्या आघाडीच्या किंवा कामगार संघटनांच्या बैठकांत अशा भत्त्यात ‘लेनिन मिक्श्चर’ हा प्रकार लोकप्रिय होता. याचं मूळ आंध्र प्रदेशात आहे. विजयवाडा येथून हे ‘लेनिन मिक्श्चर’ प्रसिद्ध झालं. भत्त्यासारखाच प्रकार, पण आंध्रात यात तळलेले दाणे, मसाले असं बंरच काय काय मिक्स करतात. सत्तरच्या दशकात मुंबईत गिरणी कामगार, त्यांच्या बैठका, कामगार संघटना, डाव्यांच्या संघटना यांतून हा प्रकार अधिक बघायला मिळे. निवडक मराठी साहित्यिकांच्या लेखनात याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात नाशिक, सांगली-मिरज, पंढरपूर आदी ठिकाणचे अनुक्रमे चिवडा, भडंग व मुरमुरे राज्यभर प्रसिद्ध असल्याने तेथील भेळेत स्वाभाविकच या पदार्थांचा मुबलक वापर व्हायला लागला. किंबहुना त्या त्या शहराची ती खासियत ठरली.
ओली भेळ हा जास्त करून बागेत जाऊन खाण्याचा प्रकार. रेसिपी सुक्या भेळेसारखीच, फक्त यात चिंचेचे, पुदिन्याचे, मिरचीचे असे मिश्र पाणी घालून ती भेळ ओली केली जाते. हे घटक कसे मिळून येतात आणि ते पाणी काय चवीचं तयार होतं, यावर त्या त्या भेळेची चव ठरते. मुंबईतील चौपाटीवरची भेळ सर्व राज्यात सर्वाधिक प्रसिद्ध आहे. पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे, अशा ठिकाणी खाताना स्वच्छतेचे इंद्रिय आवरावे लागते. किंबहुना भे‌ळवाल्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीत भेळेची चव रंगते. मुंबईत या भेळेसोबत पुरी दिली जाते. त्या पुरीनेच ती भेळ खाणे अपेक्षित असते.
मुंबईत जशी चौपाटी तशी पुण्यात सारसबाग, शनिवारवाडा आणि कमिशनर ऑफिस येथील ‘चौपाट्या’ पूर्वीपासून प्रसिद्ध होत्या. महाराष्ट्रात इतरत्र जी भेळ मिळते त्यात प्रामुख्याने फरसाण हा बेस असतो. पुणेरी भेळेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे चुरमुरे हा बेस असतो. त्यामुळ‌े पुण्याबाहेरच्या भेळी काहीशा तिखट आणि झणझणीत असतात. मात्र, पुण्यातील भेळ चवीला चटकदार असली, तरी न बाधणारी, सौम्य अशी असते. मुरमुऱ्यांसोबत पापडी, भावनगरी शेव, एक नंबर (बारीक) शेव, गाठी, खारेदाणे, तिखट बुंदी, काळे मीठ, मिरचीचा ठेचा, चिंच-खजुराची चटणी, वर कांदा-टोमॅटो हे सगळं मिश्रण मोठ्या पातेल्यात एकजीव करायचं, त्यावर पुन्हा बारीक शेव, कोथिंबीर, कांदा, ग्राहकाने मागितल्यास पुन्हा थोडी चिंचेची चटणी, सीझन असेल तर कैरीच्या फोडी अशी साधारण भेळ तयार करण्याची इथली पद्धत.
मी ३०-३५ वर्षांपूर्वी पुण्यात आलो, तेव्हा सर्वांत प्रथम सारसबागेसमोरच भेळ खाल्ली होती. त्यानंतर पुण्यातच वास्तव्य झालं. त्यानंतर अनेकदा, अनेक ठिकाणची भेळ खाल्ली. ‘सकाळ’मध्ये काम करताना शनिवारवाड्यासमोरची चौपाटी हा आमचा रात्रीच्या जेवणाऐवजीचा हक्काचा पर्याय असायचा. तेव्हा शनिवारवाड्यासमोर मोकळं मैदान होतं. आता समोर दगडी भिंत घातली आहे, ती नव्हती. तिथं रस्त्याच्या कडेलाच ओळीनं भेळेच्या, आइस्क्रीमच्या, खाऊच्या गाड्या लागलेल्या असत. जवळपास राहणारी पुणेकर मंडळी तिथं रात्री फिरायला येत. आम्हाला काम संपवून बाहेर पडायला अनेकदा उशीर होई. तोवर हॉटेलं बंद होत आलेली असत आणि खरं सांगायचं तर रोज हॉटेलमध्ये जाऊन खाणं परवडायचंही नाही. मग शनिवारवाड्यासमोरची ही चौपाटी मदतीला यायची. मी व माझे सहकारी चालत तिथं जात असू आणि तेव्हा पाच की दहा रुपयांना मिळणाऱ्या भेळेत रात्रीचं जेवण भागवत असू. तिथल्या भेळेच्या गाड्यांची नावं आता फार लक्षात नाहीत. पण एक ‘नवरत्न’ नावाची भेळ बऱ्यापैकी प्रसिद्ध होती. अर्थात तेव्हा भूक भागवणं हाच मुख्य हेतू असल्यानं भेळ किती चवीष्ट आहे की नाही वगैरे फारसं बघितलं जायचं नाही. मात्र, या सर्व भेळेच्या गाड्यांवर तेव्हाही भरभरून गर्दी व्हायची. एक पथ्य मात्र आम्ही आवर्जून पाळायचो. ते म्हणजे गणपतीच्या काळात बाहेर, रस्त्यावर ही भेळ खायची नाही! (किंवा खरं तर काहीच खायचं नाही.) त्या काळात त्या भेळेची चव पार बिघडलेली असायची. (मला वाटतं, फक्त गणपतीच्या काळात पुण्यात येऊन ही असली भेळ खाऊन मगच बाहेरचे लोक पुण्यात चांगली भेळ मिळत नाही, असं म्हणत असावेत.)
शनिवारवाड्याप्रमाणेच स्वारगेट बस स्टँडवर अगदी मध्यरात्रीही एक भेळेचा गाडा सुरू असायचा. स्थानकाच्या अगदी आत, स्वारगेट डेपोच्या बाजूला तो गाडा उभा असायचा. आम्ही कित्येकदा ऑफिस संपवून रात्री दीड-दोन वाजता तिथं जाऊन भेळ खाल्ली आहे. त्या भेळेच्या गाड्याचं नाव मात्र आता विसरलो. त्या भेळेची चव व त्यासोबत सहकाऱ्यांसोबत विविध विषयांवर झोडलेल्या मनसोक्त गप्पा मात्र आजही लक्षात आहेत. पूर्वी शिवाजीनगर रेल्वेस्थानकाजवळची झटका भेळ प्रसिद्ध होती. ही मी कधी चाखली नाही, मात्र ती खूप प्रसिद्ध होती, असं ऐकलं आहे. हे मालक म्हणे भेळ तयार करताना मानेला झटका द्यायचे म्हणून ते नाव! (हे असं नाव ठेवणं पुण्याच्या तेव्हाच्या प्रकृतीला अगदी साजेसंच...) सिटीपोस्टाजवळची अण्णांची भेळ अशीच प्रसिद्ध होती. इथं उकडलेला बटाटा घालून भेळ मिळायची. नेहमीच्या ग्राहकांशी वर गप्पांची मैफलही इथं रंगायची. अपोलो टॉकीजजवळच्या ‘इंटरव्हल’ या भेळेविषयीही फक्त ऐकलं आहे. कधी जाण्याचा योग आला नाही. तिथं प्रत्येक टेबलावर चिंचेच्या पाण्याचा तांब्या व तिखट चटणीची वाटी ठेवलेली असते म्हणे. शौकिनांनी आपल्याला हवी तशी चव तयार करून घ्यावी. लाल भडंग भेळ ही त्यांची खासियत. जंगली महाराज रस्त्यावरून झेड ब्रिजकडं वळताना आता तिथं दोन्ही बाजूंना मोठी खाऊ गल्ली विकसित झाली आहे. पूर्वी तिथं अगदी मोजक्या भेळेच्या गाड्या असायच्या. तिथली सांगली भडंग भेळ खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय आर डेक्कन मॉलच्या खाली यशवंत कच्छी दाबेलीच्या शेजारी सोनाक्षी या नावाचा भेळेचा गाडा लागतो. त्यांचीही भेळ, पाणीपुरी, शेवपुरी असं सगळं चांगलं असतं.
याशिवाय तेव्हाचे आमच्या आवडीचे आणखी एक ठिकाण होते ते म्हणजे फरासखान्यासमोरचे ‘रामचंद्र भगवंत घाटगे चिवडेवाले’ यांच्याकडची कोरडी भेळ. खरं तर तो चिवडाच. मात्र, त्यात सुक्या भेळेतील सर्व घटक असायचे. अनिल अवचट यांनी या चिवडेवाल्यांवर लेख लिहिल्यामुळे ते खूपच प्रसिद्ध झाले. पायजमा, पांढरा शर्ट, गांधी टोपी अशा वेषातील ते घाटगेकाका मला आजही आठवतात. कुणी जादा लिंबू किंवा मिरची मागितली, की ते जरा वैतागायचे. ‘आम्ही करून दिलेलं मिश्रण सर्वोत्तम असून, तुम्ही ती चव बिघडवू नका,’ असंच त्यांचं सांगणं असायचं. त्यांचे नेहमीचे ग्राहक त्यामुळे कधीही जादा लिंबू, कांदा वा मिरची मागायचे नाहीत. अतिशय अप्रतिम असा हा चिवडा असायचा. इथंच अगदी जवळ जोगेश्वरीच्या बोळातील प्रवीण भेळही अतिशय जुनी व प्रसिद्ध आहे.
पूर्वी चौपाटीव्यतिरिक्त पुण्यात निव्वळ भेळेची म्हणून काही दुकानं अतिशय प्रसिद्ध होती. गुप्ता भेळ, मंडईजवळची लता भेळ, पासोड्या विठोबाजवळची नानाची भेळ, सोन्या मारुती चौकातील मारुती भेळ, लोखंडी तालमीसमोरचा (बहुतेक गजानन) भेळवाला, पुष्करिणी भेळ हे मध्य वस्तीतले असेच प्रसिद्ध भेळवाले. यांच्या पुणेरीपणाचे किस्सेही बहुतेकांना माहिती आहेत. लोखंडे तालमीचा गणपती बसतो, तिथं अगदी समोर एका अगदी चिंचोळ्या जागेत हे भेळवाले उभे राहायचे. तिरक्या भिंतीमुळे त्रिकोणी आकार तयार झाला होता तिथं. संध्याकाळी पाच वाजता तिथलं शटर वर करून ते भेळेचं दुकान सुरू करायचे. त्यांच्या भेळेची ख्याती बऱ्यापैकी होती. त्यामुळं लोक उभे राहून,  वाट बघून ती भेळ खात असत. त्या दुकानाचं नाव बहुतेक गजानन भेळ असावं. आता मला नीटसं लक्षात नाही; मात्र लक्षात आहे तो अतिशय भरभर चालणारा त्यांचा हात. अगदी थोड्या वेळात त्या भल्यामोठ्या स्टीलच्या भांड्यात ते भेळ तयार करत असत. ग्राहकांच्या गर्दीमुळे तो एकटा माणूस अनेकदा वैतागून जाई आणि लोकांवर ओरडे. मात्र, लोक तरीही तो ओरडा ऐकून घेऊनही ती भेळ खायला तिथं थांबत.

अशीच दुसरी प्रसिद्ध पुणेरी भेळ म्हणजे सदाशिव पेठेतली पुष्करिणी भेळ. कुमठेकर रोडवरील बिझीलँड बिल्डिंगमधील ही भेळ अतिशय लोकप्रिय आहे. प्रभाकर वासुदेव मेंगणे यांनी १९२५ मध्ये या भेळेची सुरुवात केली. म्हणजेच सध्या या भेळेच्या दुकानाची जन्मशताब्दी सुरू आहे. सुरुवातीला बाजीराव रोडवर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’जवळ हे दुकान होतं. तिथं पूर्वी एक पुष्करिणी (हौद) असल्यामुळं दुकानाचं नावही त्यांनी ‘पुष्करिणी’ असंच ठेवलं. नंतर १९३५ मध्ये ते आताच्या जागेत गेलं व अजूनही ते तिथंच आहे. मुरमुरे, शेव, चिवडा वा फरसाण आणि चटणी हे कुठल्याही भेळ‌ेचं मूलभूत साहित्य. ‘पुष्करिणी’मध्ये हे सर्व घटक तर असतातच; शिवाय इथं लाल तिखट आणि चिंच व गुळाची चटणीही वापरली जाते. त्यामुळंच इतर भेळेपेक्षा ही भेळ अधिक चटकदार लागते. इथं एका वेळी खूप जास्त भेळ करून ठेवायची पद्धत नाही. सर्व घटकांचा कुरकुरीतपणा, ताजेपणा कायम राहावा, हाच त्यामागचा हेतू असतो. (त्यामुळं इथं वेटिंग असतं कायम!) ‘पुष्करिणी’त फरसाण, चिवडा व इतर सर्व पदार्थ स्थानिक बाजारपेठेतून व विश्वासाच्या पुरवठादारांकडूनच घेतले जातात. शेव व शेंगदाणे ताजे मिळावेत यासाठी रोज सकाळी दुकानातच शेव तळली जाते व शेंगदाणे भाजले जातात.
प्रभाकर मेंगणे यांचे नातू नित्यानंद सध्या दुकान सांभाळतात. ते आणि आणखी एक व्यवस्थापक एवढे दोघेच जण दुकानात असतात. आजूबाजूला लक्ष्मी रोड, शनिवार, मंडई, तुळशीबाग इथं खरेदी करून झाली, की बहुतेक पुणेकर इथली भेळ खायला येतातच. साधारण संध्याकाळी साडेचार वाजता दुकान उघडतं. भेळ संपेपर्यंत म्हणजे साधारण आठ-साडेआठपर्यंत ते सुरू राहतं. वेटिंग असलं, तरी सर्वांना ताजी व दर्जेदार भेळ देण्याकडं मालकांचा कटाक्ष असतो. इथल्या पाट्या हाही अनेकदा चर्चेचा विषय असतो. एकूण, अस्सल पुणेरी परंपरेतील अशी ही भेळ आहे. 

बिबवेवाडीत सुरू झालेली कल्याण भेळ म्हणजे लहान गोष्टींपासून सुरुवात करून यशाचे शिखर कसे गाठता येते याचे उत्तम उदाहरण आहे. रमेशभाऊ कोंढरे यांनी १९७४ मध्ये सुरू केलेल्या ‘कल्याण भे‌ळ’ या अन्न उद्योगाचा प्रसार आता अनेक शाखा आणि परदेशांत भेळ निर्यात करण्यापर्यंत झाला आहे. गरिबीमुळे रमेशभाऊ व त्यांचे वडील मार्केट यार्डात हमाल म्हणून काम करत असत. गरिबीमुळं चौथ्या इयत्तेतच रमेशभाऊंचं शिक्षण थांबलं. गुळाच्या ढेपा पोत्यात भरण्यापासून ते भाजी विकण्यापर्यंत सर्व व्यवसाय त्यांचं कुटुंब करत होतं. त्याच सुमारास, म्हणजे १९७४ मध्ये रमेशभाऊंच्या आईने बिबवेवाडीतील कल्याण सोसायटीच्या बाहेर शाळेतील मुलांना भेळ करून द्यायला सुरुवात केली. भेळेतील चटणी करण्याची त्यांची स्वत:ची एक खास पद्धत होती. यामुळं त्यांची भेळ मुलांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाली. हळूहळू रमेशभाऊंनी ग्राहकांच्या प्रतिसादावरून अंदाज घेत नवनव्या डिशेस सुरू केल्या आणि या व्यवसायाचा विस्तार केला. अगदी सुरुवातीला भेळेची छोटी गाडी होती. तिथपासून आताच्या भव्य दुकानापर्यंत या भेळेच्या उद्योगाचा विस्तार कोंढरे कुटुंबीयांनी केला आहे. पुण्यात आता आठ शाखा आणि तब्बल ३८ देशांना निर्यात एवढा या व्यवसायाचा व्याप आता वाढला आहे. 

कल्याण भेळेप्रमाणेच पुण्यातील भेळेचा आणखी एक प्रसिद्ध ब्रँड म्हणजे गणेश भेळ. दिनेश गुडमेवार व त्यांचे बंधू हे या ब्रँडचे संचालक आहेत. ते मूळचे नांदेडचे. लहानपणी ते पुण्यात त्यांच्या मामाकडे येत असत. नंतर ते शाळा सोडून मामाकडेच आले व त्यांना लहान-मोठ्या कामांत मदत करू लागले. त्यांनी १९७८ मध्ये पुण्यात भेळेची एक लहान गाडी सुरू केली. त्यानंतर सुमारे २० वर्षे त्यांनी या गाडीवरूनच भेळविक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर १९९८ मध्ये कर्वेनगरमध्ये त्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा गणेश भेळ या नावाने दुकान सुरू केले. त्यानंतर दोनच वर्षांत एकाची तीन दुकाने झाली. आता पुण्यात त्यांची एकूण १३ दुकाने आहेत. त्यांनी भेळेच्या व्यवसायाला कॉर्पोरेट रूप दिले. अनेक फ्रँचायझी, यंत्रांवर निर्मिती, निर्यात अशा सर्व आघाड्यांवर गणेश भेळ हा ब्रँड आता नावलौकिक टिकवून आहे. भेळेप्रमाणेच इथं चाटचे सर्व पदार्थ मिळतात आणि त्या प्रत्येक पदार्थाचं ब्रँडिंग करण्यात ‘गणेश भेळ’चे मालक यशस्वी झाले आहेत. इथल्या पदार्थांचा दर्जा आवर्जून जपला जातो. इथले कामगार अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये असतात त्याप्रमाणे केस बांधून वगैरे डिश सर्व्ह करत असतात. बहुतेक घटक पदार्थ आता कारखान्यांत यंत्रांद्वारे तयार केले जातात. पाणीपुरीसारखा पदार्थ आरोग्यदायीच असावा, यासाठी तिथं मिनरल वॉटर वापरलं जातं. हे सर्व असताना इथले पदार्थ थोडेसे महाग वाटू शकतील. मात्र, चांगल्या दर्जासाठी दाम मोजणारे ग्राहक आपल्याकडे आता विपुल आहेत. त्यांना या भेळ‌ेच्या ब्रँडचे पदार्थ निश्चितच आवडतात.
गणेश भेळेप्रमाणेच आणखी एक लोकप्रिय नाव म्हणजे कैलास भेळ. यांचं मूळ ठिकाण खरं तर पुण्यात नाही. पुण्याहून साताऱ्याला जाताना खेड शिवापूर हे गाव लागतं. इथं खूप वर्षांपासून कैलास भेळ विकली जाते. आता या महामार्गावर तुम्हाला अनेक ‘कैलास भेळ’ दिसतील. अगदी एखाद्या लहान मॉलसारखी वाटतील, एवढी भव्य भेळेची दुकानं आता तिथं तयार झाली आहेत. किसन मिठारे, कैलास मिठारे, सुभाष मिठारे व अशोक मिठारे यांनी १९७५ मध्ये शिवापूरमध्ये भेळेचं लहानसं दुकान सुरू केलं. इथल्या स्वादिष्ट, चटकदार भेळेमुळं लवकरच कैलास भेळ हे नाव पुणे-सातारा महामार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांत लोकप्रिय झालं. सध्याच्या ‘कैलास भेळ’ या ब्रँडचे मालक शिवराज मिठारे यांनी हा व्यवसाय नव्या उंचीवर नेला. पुण्याबाहेरही हा ब्रँड लोकप्रिय झाला पाहिजे, या विचाराने त्यांनी व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. आज या भेळेचे आकर्षक वेष्टन परदेशांतही निर्यात केले जाते. पुणे-सातारा महामार्गावर वरवे येथे ‘कैलास भेळ’चे मोठे विक्री केंद्र व उपाहारगृह दिसेल. आता तिथं केवळ भेळच नव्हे, तर एखाद्या उपाहारगृहात मिळतात, ते सर्व पदार्थ दिले जातात. त्यातही पिठलं-भाकरी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. एका छोट्या दुकानापासून सुरू होऊन एका मोठ्या कंपनीपर्यंतचा हा ‘कैलास’चा पदार्थ प्रेरणादायीच आहे. मराठी माणूस व्यवसायात दिसत नाही किंवा मागे पडतो, या समजुतींना छेद देणारेच हे सर्व भेळ उद्योजक आहेत, असे म्हणता येईल.
शिवाजीनगर भागातील गुप्ता भेळ हीदेखील पुण्यातील एक प्रसिद्ध भेळ. आता सुमारे ८३ वर्षांपासून ही भेळ पुणेकरांच्या सेवेत आहे. आता गुप्तांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. सुरुवातीला अगदी छोट्या फेरीवाल्या गाड्यापासून सुरुवात झालेल्या या भेळ व्यवसायाने आता चांगलेच मूळ धरले आहे. गुप्ता भेळ येथे साधारणपणे तीन प्रकारच्या भेळ मिळतात. पहिल्या प्रकारात साधी, सुकी भेळ मिळते. यात फरसाण, मुरमुरे एवढंच असतं. दुसरी म्हणजे ओली भेळ. यात चिंचेचं पाणी, कांदा, लाल तिखट टाकून ओली भेळ तयार केली जाते. तिसरी म्हणजे मटकी भेळ. यात मटकीमुळं भेळेचा स्वाद वाढतो. गुप्ता बंधू भेळेसाठी लागणारे फरसाण स्वत: कारखान्यात तयार करतात. शेवेचे वेगवेगळे प्रकारही तयार केले जातात. छत्रपती शिवाजीमहाराज रस्त्यावर असलेलं हे दुकान सकाळी आठ वाजता सुरू होते. ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असतं. मग पुन्हा चारनंतर सुरू होतं आणि संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहतं. उत्तम दर्जामुळं अगदी लांबून लांबून ही भेळ खाण्यासाठी लोक येतात, असा गुप्ता बंधूंचा अनुभव आहे.
मुंढवा (केशवनगर) येथील जय गणेश भेळ हा ब्रँडही अतिशय लोकप्रिय आहे. संजय माने यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ भेळेचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. गेल्या १८ वर्षांपासून त्यांनी हा व्यवसाय यशस्वीपणे उभारला आहे. सुरुवातीला केवळ भेळ व पाणीपुरी होती. कालानंतराने त्यांनी मटकी भेळ, रगडापुरी, दहीपुरी असे पदार्थही विक्रीसाठी ठेवले. मोठ्या ब्रँडची मोठी दुकाने आसपास होती. स्पर्धाही खूप होती. मात्र, चिकाटी, मेहनत, स्पर्धेत टिकण्यासाठी केलेला अभ्यास या सर्व गुणांमुळे माने यांचा हा ब्रँड चांगला यशस्वी झाला आहे.
पुण्यातील बहुतेक बागांजवळ भेळेची दुकाने आहेतच. छत्रपती संभाजी उद्यान हे जंगली महाराज रस्त्यावरचं आणि पुण्यातलं एक महत्त्वाचं उद्यान. या उद्यानात असलेल्या ‘पूनम भेळ’ या प्रसिद्ध दुकानाचे सध्या अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे. खरं तर अलीकडच्या काळात संभाजी उद्यानाची रया गेल्यासारखी स्थिती आहे. जंगली महाराज रस्त्यावर आणि एकूणच पुण्यात फूड जॉइंट्स वाढल्यामुळे संभाजी उद्यानातील अनेक फूड स्टॉल एक तर कमी झाले आहेत किंवा तिथे येणाऱ्यांची संख्या तरी घटली आहे. मात्र, पूनम भेळ अद्यापही पूर्वीच्याच थाटात ग्राहकांना सेवा देत आहे. फावडे कुटुंबाच्या मालकीच्या या दुकानाची जबाबदारी आता तिसऱ्या पिढीकडे आली आहे. पुण्याचे तत्कालीन मनपा आयुक्त स. गो. बर्वे यांनी नाशिकहून बोलावून घेतल्याने फावडे कुटुंब पुण्यात आले, असे परशुराम फावडे सांगतात. फावडे यांचे आजोबा बाबूराव फावडे नाशिकमध्ये चिवडा विक्रीचा व्यवसाय करत असत. हा चिवडा अतिशय आवडल्याने बर्वे यांनी फावडे कुटुंबास पुण्यात व्यवसाय करण्यास बोलावले. तेव्हा छत्रपती संभाजी उद्यान नव्याने विकसित करण्यात आले होते. येथे फावडे कुटुंबास दुकानाचा परवाना देण्यात आला आणि एक जुलै १९५१ पासून तेथे बाबूराव फावडे यांनी चिवडाविक्री सुरू केली. त्या काळात एक आणा, दोन आणे अशी त्या चिवड्याची किंमत असायची. पुढे व्यवसायाचा व्याप वाढल्यावर परशुराम यांचे वडील मधुकर यांनी ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स’मधली नोकरी सोडून, या व्यवसायात उडी घेतली. त्यांनी चिवडाविक्रीसोबतच भेळ व पाणीपुरी यांचीही विक्री सुरू केली. आता परशुराम व त्यांचे बंधू वासुदेव हा व्यवसाय सांभाळतात. संभाजी उद्यानाची वेळ मर्यादित केल्याने, तसेच तेथील आकर्षणे घटल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याची खंत परशुराम फावडे बोलून दाखवतात. त्यांचा स्वभाव गप्पीष्ट, बोलका. बोलता बोलता सढळ हाताने दोन पाणीपुरी प्लेटमध्ये अधिक घालतील. पाणीपुरीतही उगाचच खारी बुंदी, शेव वगैरे जादा गोष्टी टाकण्यावर त्यांचा विश्वास नाही. फक्त पाणीपुरीचं ते खास तयार केलेलं पाणी घालूनच पुरी खायला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष. तशीच पाणीपुरी आवडते म्हटल्यावर खुलून दोन पुऱ्या प्लेटमध्ये अधिक टाकतात. वर थोडी भेळ ऑफिसमध्ये खायला बांधून देऊ का, असंही म्हणतात. याचे कुठलेही जादा पैसे वगैरे नाहीत. वर्षानुवर्षे बांधून ठेवलेले ग्राहक का बांधून राहतात, याचं गुपित फावडे यांच्याकडं बघितलं की सहज उलगडतं.
पुण्यातल्या सर्व भेळ दुकानांचं आद्यपीठ म्हणता येईल अशी जागा म्हणजे सारसबाग चौपाटी. या परिसरातील समाधान भेळ, संतोष भेळ ही भेळेची दुकानं लोकप्रिय आहेत. समाधान भेळ पर्वती पायथ्याच्या रस्त्याला, दांडेकर पुलाकडे जाताना लागणारं प्रसिद्ध दुकान. हे दुकान ५५ वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. मामा भेळवाले यांची ही भेळ मटकी भेळेसाठी प्रसिद्ध आहे. मुरमुरे, पापडी, शेव, बुंदी, खारे शेंगदाणे, भरपूर कांदा आणि अर्थातच भरपूर मटकी घालून ही भेळ केली जाते. ही मटकी हळद, मीठ घालून चांगली उकडलेली असते. यात वरून घातला जाणारा मसालाही ‘समाधान स्पेशल कांदा-लसूण मसाला’ असतो. सोबत उकडलेली मिरची असतेच. ठेचाही आवडीनुसार मिळतो. लिंबू पिळून, हाताने ही भेळ खाताना उत्तम चवीचा आनंद मिळतो, असं अनेक ग्राहक सांगतात. भांबरकर कुटुंबीयांच्या मालकीचे हे दुकान १९७० पासून सुरू आहे. इथल्या भेळेतलं फरसाण मालक स्वत:च तयार करतात. त्याच्या दर्जाकडे विशेष लक्ष देतात. पुण्यात सनसिटीजवळ यांची दुसरी शाखाही आहे.
सारसबाग चौपाटी परिसरातली आणखी एक प्रसिद्ध भेळ म्हणजे संतोष भेळ. किसनराव पवार यांच्या मालकीचे हे दुकान १९७८ पासून सारसबाग परिसरात आहे. आता संतोष हॉल (सिंहगड रोड), महर्षीनगर इथेही संतोष भेळेच्या शाखा सुरू झाल्या आहेत. कल्पना भेळ ही टिळक रोडवरची आणखी एक प्रसिद्ध व जुनी भेळ. ही भेळ १९४८ पासून पुणेकरांच्या सेवेत आहे. या भेळेची एक शाखा सहकारनगर परिसरातही आहे. टिळक रोडवर या भेळेच्या गाडीवर सत्तरच्या दशकात ‘दाढीवाल्या काकां’ची भेळ खाल्ली नाही, असे पुणेकर सापडणे कठीण. (याच गाडीशेजारी असलेल्या ‘उत्तम चाट भांडार’ या गाडीवर मिळणाऱ्या पाणीपुरीची चव चाखली नसेल असे पुणेकरही क्वचितच असतील. विशेषत: या गाडीवर ज्या आजी (त्यांचं नाव बहुतेक बेबीताई) असायच्या, त्यांच्याच हातची पाणीपुरी विशेष चवीची लागायची, असं अनेक पुणेकर छातीवर हात ठेवून सांगतील. हातची म्हणण्यापेक्षा चमच्याची, कारण या आजी पुरी कधीही हाताने पाण्यात बुचकळून द्यायच्या नाहीत. त्याऐवजी चमच्याने ते पाणी पुरीत भरून द्यायच्या. असो. हे जरा विषयांतर झालं.)
पुणे शहरात गल्लीबोळांत अक्षरश: शेकड्यानी भेळेच्या गाड्या किंवा दुकानं आहेत. स्थानिक लोकांत ते चांगलेच लोकप्रियही आहेत. गेल्या काही वर्षांत, विशेषत: सन २००० नंतर पुणे शहर अवाढव्य पसरलं आहे. निगडीपासून ते कात्रजपर्यंत आणि यवतपासून ते वाघोलीपर्यंत शहर प्रचंड वेगानं विस्तारलं आहे. निगडी प्राधिकरणातला एक चौक तर ‘भेळ चौक’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. या सर्व ठिकाणच्या भेळेच्या दुकानांची दखल घ्यायची किंवा तिथली भेळ चाखायची तर आयुष्य पुरणार नाही. याशिवाय पुणे जिल्ह्याचा विचार केला तर भेळेच्या दुकानांची संख्या काही हजारांत निश्चितपणे जाईल. नगरहून येताना लोणीकंदजवळील सोमेश्वर मटकी भेळ, सरदवाडीची प्रसिद्ध भेळ, नाशिककडे जाताना चाकण-खेड दरम्यान भामा नदीवरचा पूल ओलांडल्यावर लागणारी तिथल्या स्थानिक भेळेची प्रसिद्ध दुकानं अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील. पुण्यापासून मुंबई, सातारा, सोलापूर, नगर व नाशिक या सर्व महामार्गांवर आता भेळ व चाट पदार्थ देणारी मोठमोठी दुकाने उभारली गेली आहेत. ती सर्व वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण व त्यामुळं लोकप्रियही आहेत. या सर्वांचा आढावा या एकाच लेखात घेणं खरोखर अवघड आहे आणि एका व्यक्तीची ती मर्यादाही आहे. (त्यामुळं या लेखात काही प्रसिद्ध किंवा आपल्या आवडीच्या भेळेचे उल्लेख राहून गेले असतील, हे अगदी शक्य आहे.)
थोडक्यात, भेळ ही अशी आपल्या नेहमीच्या अळणी जगण्याला खमंग, चटकदार, लज्जतदार बनवणारी एक नामी चीज आहे. आपलं आयुष्य या भेळेतल्या चविष्ट घटकांसारखंच रुचकर आणि उत्तम व्हायला हवं, एवढी शिकवण तर भेळ आपल्याला देतेच!

इति भेळपुराण संपूर्णम्...

---

(पूर्वप्रसिद्धी : पुण्यभूषण दिवाळी अंक २-०२५)

---


No comments:

Post a Comment