2 Aug 2015

मोबाइल क्रांतीची दोन दशकं....

भारताच्या आधुनिक इतिहासात मोबाइल क्रांतीमुळं मोठाच आर्थिक, सामाजिक बदल घडवून आणला आहे, हे वाक्य काहीसं गुळगुळीत वाटत असलं, तरी वास्तव मांडणारं आहे. मला तर वाटतं, इसवी सन पूर्व आणि इसवी सन अशी जुन्या काळाची आपण विभागणी केली आहे, तशीच आता मोबाइलपूर्व आणि मोबाइलोत्तर अशी आधुनिक काळाची वाटणी करायला हवी. १९९५ मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेली पिढी आता वीस वर्षांची झालीय. त्यांना मतदानाचाही अधिकार मिळाला आहे. प्रौढांसाठीचे सिनेमे पाहण्याचा अधिकार मिळालाय. एका अर्थानं ही भारताची खरी आधुनिक पिढी आहे. तंत्रज्ञानामुळं प्रत्येक पुढील पिढीला फायदा होतो, ही गोष्ट खरी असली, तरी मोबाइलमुळं समाजातल्या वर्गविग्रहांचं जे सपाटीकरण झालं आहे, ते अभूतपूर्व आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाला तंत्रज्ञानानं दिलेली ही फार मोठी देणगी आहे. त्या अर्थानं मोबाइल हा आपल्या देशासाठी ग्रेट इक्वलायझर ठरला आहे.
भारतात मोबाइलचं आगमन होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली ती १९९१ या वर्षामुळं. भारतानं याच वर्षात आर्थिक उदारीकरणाच्या राजमार्गावर पाऊल ठेवलं. काही विपरीत आर्थिक व राजकीय परिस्थितीमुळं तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांना हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, तो भारताच्या दीर्घकालीन फायद्यासाठी पथ्याचाच ठरला. भारताची प्रचंड मोठी बाजारपेठ जगासाठी खुली झाली. राजीव गांधींच्या काळात एसटीडी, आयएसडीच्या माध्यमातून टेलिफोन क्रांती झालीच होती आणि आता मोबाइलच्या आगमनासाठी देश सज्ज झाला होता. तेव्हा बिर्ला एटी अँड टी, बीपीएल, हच आणि एअरटेल अशा काही मोजक्या कंपन्यांनी देशात मोबाइल सेवा सुरू केली. (पहिली व्यावसायिक मोबाइल सेवा सुरू झाली ती कोलकत्यावरून - तारीख होती १५ ऑगस्ट १९९५.) तेव्हा वृत्तपत्रांत या मोबाइल कंपन्यांच्या मोठमोठ्या पानभर ब्लॅक अँड व्हाइट जाहिराती येत असत. मोटोरोला कंपनीचे वॉकीटॉकीसारखे मोठ्या आकाराचे हँडसेट तेव्हा मिळत. आणि तेव्हाचे २४ रुपये प्रतिमिनिट आउटगोइंग आणि १६ रुपये इनकमिंग हे दर अनेकांना आठवत असतील. या महागड्या दरांमुळं मोबाइल लगेचच सर्वव्यापी झाला नाही. तेव्हा अनेकांकडं लँडलाइन फोन होते आणि ते बऱ्यापैकी उपयुक्त होते. शिवाय तुलनेनं स्वस्त होते. शिवाय मोबाइलला पर्याय म्हणून तेव्हा पेजर वापरले जायचे. हे उपकरण तर अगदी झपाट्यानं कालबाह्य झालं. छोट्या चौकोनी डबीसारखं हे उपकरण केवळ संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरलं जायचं. त्यासाठी लँडलाइनवरून हा मेसेज द्यावा लागायचा. किचकट तंत्रामुळं ते लगेच वापरातून बाहेर गेलं. तरीही मोबाइल ही मूठभर श्रीमंतांची मिराशी होती पहिली काही वर्षं... 
एकविसावं शतक उजाडायच्या काळात म्हणजे १९९९-२००० मध्ये देशात अचानक डॉट कॉम कंपन्यांचं आणि बीपीओंचं पेव फुटलं. जगभराला तेव्हा वायटूकेच्या समस्येनं ग्रासलं होतं. जगभरातल्या संगणकांमध्ये तेव्हा वर्षाच्या जागी दोनच आकडे (म्हणजे १९९९ च्या ऐवजी ९९) वापरले जात. तेव्हा २००० हे वर्ष संपून २००१ हे वर्ष सुरू सुरू होईल, तेव्हा संगणक गडबडणार आणि अनेक व्यवहार गोत्यात येणार, अशी भीती होती. या समस्येवर मात करण्यासाठी अमेरिकी कंपन्यांनी जगभरातलं कुशल मनुष्यबळ हायर केलं. त्यात भारतीय आघाडीवर होते. काही का असेना, आपल्या देशात अनेकांना अचानक रोजगार उपलब्ध झाला आणि तुलनेनं बरे पैसेही मिळू लागले. मोबाइलच्या प्रसाराला ही स्थिती अनुकूल होती. दरम्यानच्या काळात अनेक कंपन्या या व्यवसायात उतरू लागल्यानं स्पर्धेचा परिणाम म्हणून कॉलचे दर झपाट्यानं कमी होत गेले. विशेषतः इनकमिंग कॉल लवकरच मोफत झाले. (यानंतर मिस कॉलचं फॅड आलं.) 

या काळापर्यंत भारतीय बाजारपेठेत नोकिया या हँडसेट बनवणाऱ्या कंपनीचं निर्विवाद वर्चस्व होतं. मोबाइल घ्यायचा तर तो नोकियाचाच, हे अगदी पक्कं असायचं. नोकियाची ती विशिष्ट कॉलर ट्यून जिथं जाऊ तिथं ऐकू यायची. कित्येक नाटकांत, सिनेमांत मोबाइल वाजलाय हे दाखवण्यासाठी कॉमनली हीच ट्यून वापरली जाऊ लागली. तरीही या काळात म्हणजे २००१ पर्यंत भारतातील मोबाइलधारकांची संख्या ५५ लाखांपर्यंतच मर्यादित होती. 
एकविसाव्या शतकात प्रवेश करताना भारतानं बऱ्याच क्षेत्रांत कात टाकली. महानगरांमध्ये पायाभूत सुविधा उभ्या राहू लागल्या, सुवर्ण चतुष्कोनसारख्या प्रकल्पांनी देशभरातले महामार्ग मोठे होऊ लागले, एक्स्प्रेस-वे उभारले जाऊ लागले, महानगरांपासून ते टु-टिअर शहरांपर्यंत सर्वत्र मॉल उभे राहिले, सिनेमांमध्ये मल्टिप्लेक्स संस्कृती आली, तरुण एम-एट्या विकून बाइक घेऊ लागले, दिल चाहता हैसारख्या सिनेमांतून वेगळ्या स्वरूपाची तरुणाईची अभिव्यक्ती समोर आली, कौन बनेगा करोडपतीसारख्या मेगास्टार अमिताभ बच्चनला छोट्या पडद्यावर आणणाऱ्या कार्यक्रमानं तर (मेसेज करण्यासाठी) हातात मोबाइल असणं ही एक मस्ट गोष्ट करून टाकली. अशक्य वाटणारा विमानप्रवास आवाक्यात आला, तर परदेशप्रवास हे मध्यमवर्गीयांसाठी केवळ स्वप्न न राहता, एक सुखद वास्तव बनलं. एका अर्थानं इंडिया शायनिंग होतंच हे! (फक्त त्याचा राजकीय अर्थ आणि राजकीय गणित पार चुकलं...) या सर्व प्रवासात मोबाइल हाती धरून भारतीय जनता एका पातळीवर येण्यासाठी धडपडत होती.
भारताची अवाढव्य बाजारपेठ आणि नित्य वाढत जाणारा येथील मध्यमवर्ग यामुळं जगभरातील हँडसेट कंपन्यांना भारताचं आकर्षण न वाटतं तरच नवल! नोकियापाठोपाठ सॅमसंग, मायक्रोमॅक्स, कार्बन, मोटो, एलजी अशा किती तरी कंपन्या या बाजारपेठेत उतरल्या. हँडसेटचा आकारही वॉकीटॉकीपासून ते तळहातावर मावणाऱ्या छोट्या डबीएवढ्या आकारापर्यंत बदलत गेला. आता प्रत्येक घरात एक मोबाइल नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीकडं एक मोबाइल असण्याचे दिवस आले होते. एसएमएसचं मार्केट प्रचंड होतं. त्यामुळंच टीव्ही शोवर मागवल्या जाणाऱ्या एसएमएसच्या स्पर्धांना सुरुवात झाली. झीवरच्या सारेगमपचं उदाहरण यासाठी पुरेसं ठरावं. जवळपास प्रत्येक रिॲलिटी शोचा विजेता हा या एसएमएसच्या माध्यमातून ठरवला जाऊ लागला. या एसएमएससाठी जास्त पैसे मोजावे लागायचे. शिवाय एरवी तुम्हाला विशिष्ट एसएमएस फ्री असले, तरी सणांच्या दिवशी प्रत्येक मेसेजला पैसे आकारण्याची टूम मोबाइल कंपन्यांनी काढली. मोबाइल कंपन्यांचा सगळा व्यवहार चालतो तो हवेतल्या तरंगपट्ट्यावर, अर्थात स्पेक्ट्रमवर. (या स्पेक्ट्रमच्या लिलावातूनच पुढं ए. राजा प्रकरण घडलं. पण इथं तो विषय नाही.) या स्पेक्ट्रमच्या ताब्यासाठी मोठमोठ्या मोबाइल कंपन्यांची युद्धं सुरू झाली. महानगरांची वेगळी सर्कल आहेत. त्यांच्यासाठी तर अधिकचे पैसे मोजण्याची वेळ आली. पाहता पाहता कॉलच्या रेटचंही युद्ध सुरू झालं आणि ग्राहकराजाची चांदी झाली. जगभरातल्या दरांच्या तुलनेत भारतीयांना फारच स्वस्तात सेवा मिळू लागली. इथल्या मार्केटचा अवाढव्य आकार हे त्याचं उघड गुपित होतं.
मार्केट वाढत चाललं, तसं ग्राहकांना नवीन काही देण्याची गरज कंपन्यांना भासू लागली. त्यातूनच मग जन्मला स्मार्टफोन. भारतात सॅमसंग या कोरियन कंपनीनं सर्वांत प्रथम स्मार्टफोन आणला आणि पाहता पाहता बाजारपेठ या फोनच्या प्रेमात पडली. 
काय नव्हतं या फोनमध्ये? चांगला कॅमेरा होता, संगीत होतं, भरपूर स्पेस होती, सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट होतं, त्यामुळं फेसबुक होतं अन् व्हॉट्सॲपही... बघता बघता खिशातल्या स्मार्टफोननं अनेकांना आपल्या खिशात टाकलं. त्या प्रसिद्ध कंपनीच्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणं खरोखर सगळी दुनिया आता मुठीत आली होती. भारतात साधारणतः २००५-०६ मध्ये स्मार्टफोन मिळू लागले. पण २००८ नंतर ते सार्वत्रिक झाले. नोकिया कंपनी या स्पर्धेत फार मागं पडली आणि पुढं तर ही एके काळची बलाढ्य फिनिश कंपनी बघता बघता 'फिनिश' झाली. सॅमसंगनं आपला दबदबा भारतीय बाजारपेठेत कायम ठेवला. स्मार्टफोन हातात आल्यानं आपल्याला वेडावल्यासारखं झालं, यात शंका नाही. सतत अपडेट पाहणं, बोटांना सतत काही तरी टाइप करायचा चाळा लागणं, दर अर्ध्या मिनिटानं फोन उघडून काही अपडेट किंवा काही मेसेज आलाय का हे पाहणं, कानात इयरफोन घालून किंवा खाली मान घालून टाइप करत करत जवळपास वेड्यासारखं सगळीकडं हिंडणं या सवयी आता अनेकांना वाईट पद्धतीनं जडल्या आहेत. आता सध्या सेल्फीचं फॅड आहे. एके काळी गरजेच्या मानल्या गेलेल्या या स्मार्टफोनच्या अतिसवयीचं रूपांतर व्यसनात होऊ लागलं आहे. आता लवकरच फोर-जी तंत्रज्ञान सर्वत्र बोकाळेल. तेव्हा काय होईल याची कल्पना करणं सहज शक्य आहे. 
मोबाइल नावाच्या या साधनानं संवाद वाढवला, पण जवळच्या नात्यांतला संवाद मात्र संपुष्टात आणला. आता काही जणांनी यावर उपाय म्हणून स्मार्टफोनविना आयुष्य काढायचं, असं ठरवायला सुरुवातही केलीय. कुठलंही तंत्रज्ञान मानवाच्या भल्यासाठीच असतं. आपण त्याचा उपयोग कसा करून घेतो यावर त्याचं यशापयश अवलंबून असतं. आपण तंत्रज्ञानावर स्वार व्हायचं की तंत्रज्ञानाला आपल्यावर स्वार होऊ द्यायचं हा निर्णय शहाण्या माणसांना अवघड जाऊ नये. मोबाइल क्रांतीची द्विदशकपूर्ती साजरी करत असताना या वास्तवाचं भान कायम राहो, एवढंच!
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २ ऑगस्ट २०१५)

----

No comments:

Post a Comment