28 Nov 2020

बिंगोस्कोप - भाग १ ते ३

बिंगोस्कोप
-------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे.

----

बालमित्र हो, आपल्याला सिनेमा पाहायला आवडतं. तंत्रज्ञानावर आधारित या कलेनं विसाव्या शतकात क्रांती घडवून आणली. आपल्या 'बिंगोस्कोप' या सदरातून आपण जगभरातील काही निवडक, नामवंत सिनेमांची ओळख करून घेणार आहोत. हे सिनेमे तुम्ही पाहिले असतील तर उत्तमच; पण पाहिले नसतील तर आवर्जून पाहावेत यासाठीच हा खटाटोप...

------

१. बायसिकल थिव्ह्ज

-------------------------

'चोरी'ची अजरामर गोष्ट....

---------------------------------

इटलीचे प्रख्यात दिग्दर्शक व्हित्तोरिओ डी'सिका यांचा 'बायसिकल थिव्ह्ज' (अमेरिकेत हा चित्रपट 'द बायसिकल थिफ' म्हणून ओळखला जातो.. पण मूळ इटालियन शीर्षकात 'चोर' हा शब्द अनेकवचनी आहे...) हा सिनेमा जगातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक गणला जातो. हा चित्रपट १९४८ मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून आजतागायत तो जगभरातील चित्रकर्मींना प्रेरणा देत आला आहे. इटलीमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या सिनेमाची कथा घडते. कथानक अगदी साधे आहे. मात्र, माणसातल्या आदिम जीवनप्रेरणेचे आणि मूल्यांचे उत्तुंग दर्शन हा सिनेमा घडवीत असल्याने त्याची अभिजात कलाकृतींमध्ये नोंद होते. 

इटलीची राजधानी असलेल्या रोम शहराच्या जवळच्या वस्तीत या सिनेमाची गोष्ट आकारास येते. काळ आहे दुसऱ्या महायुद्धानंतरचा. दुसऱ्या महायुद्धाचे भीषण परिणाम संपूर्ण युरोपावर झाले. अशा या अस्थिर, अस्वस्थ काळात हा सिनेमा आकारास येतो. या चित्रपटाचा नायक अंतानिओ (लँबार्तो मॅग्गिओरानी) हा एक गरीब, बेरोजगार गृहस्थ आहे. पत्नी मारिया (लिआनेला कॅरेल), सात वर्षांचा मुलगा ब्रुनो (एंझो स्टैओला) आणि आणखी एक छोटं बाळ असं त्याचं कुटुंब आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो काम शोधतो आहे. अखेर अंतानिओला तेथील सरकारी रोजगार केंद्रातून एक काम मिळते. हे काम असते भिंतींवर पोस्टर चिकटविण्याचे. फक्त एकच अडचण असते. ज्या व्यक्तीकडे सायकल असेल, त्यालाच हे काम मिळणार असते. अंतानिओ आपल्या पत्नीच्या कानावर ही गोष्ट घालतो. अंतानिओची सायकल गहाण ठेवलेली असते. मग त्याची पत्नी घरातल्या चादरींचा ढीग घेऊन जाते आणि त्या विकून पतीची सायकल सोडवून आणते. अंतानिओ पत्नी व मुलासह ही सायकल घेऊन आनंदात घरी येतो. दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाला घेऊन तो कामावर निघतो. मात्र, एका शिडीवर चढून पोस्टर चिकटवत असताना एक चोर त्याची सायकल घेऊन पळून जातो. अंतानिओ जीव खाऊन त्याचा पाठलाग करतो, पण चोर सापडत नाही. त्यानंतर सुरू होते एक शोधयात्रा... अंतानिओ आणि ब्रुनो दोघेही सायकलच्या शोधात सगळं शहर पालथं घालतात. वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तिथं त्यांना भेटणारी माणसं, इटलीमधलं तेव्हाचं सामाजिक वातावरण, गरिबी, आर्थिक विषमता यांचं एक विषण्ण करणारं दर्शन आपल्याला होतं. चित्रपटाचा शेवटही खूप चटका लावणारा आहे. तो शेवट तुम्ही प्रत्यक्ष सिनेमातच पाहावा, असं मी सुचवीन.
हा सिनेमा निघाला त्याला आता जवळपास ७० वर्षं होतील. मात्र, आजही तो पाहावासा वाटतो किंवा भावतो याचं कारण कुटुंबसंस्था, नातेसंबंध, प्रेम आणि त्यासंबंधीचे माणसाचे विचार आजही तसेच आहेत. यातला नायक गरीब आहे, पण तो आपल्या कुटुंबासाठी कष्ट करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. त्या मार्गात त्याला येणारे अडथळे आणि अपेक्षाभंग आपल्याला पाहवत नाहीत. याचं कारण आपल्याही आयुष्यात आपण अनेकदा अशा परिस्थितीला तोंड देत असतो. एखाद्या साध्या गोष्टीत असा वैश्विक विचार असेल, तर ती गोष्ट जगातल्या प्रत्येक माणसाला भावते. हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डी'सिका यांच्या या सिनेमात कमालीचा साधेपणा आणि सच्चेपणा आहे. हा सिनेमा आपल्याला भिडतो, त्यामागं त्याची ही हाताळणी आहे.
या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे डी'सिका यांनी प्रमुख कलाकारांच्या भूमिकेत तेव्हाचे कुठलेही नावाजलेले अभिनेते, अभिनेत्री घेतले नाहीत. प्रमुख भूमिका करणारे लँबार्तो मॅग्गिओरानी या सिनेमात काम करण्यापूर्वी एका कारखान्यात साधे कामगार होते. (गंमत म्हणजे या सिनेमात काम केल्यामुळं त्यांच्या मालकानं त्यांना पुन्हा कामावर घेतलं नाही. मग त्यांना अभिनय क्षेत्रच निवडावं लागलं.) मारियाचं काम करणारी लिआनेला कॅरेल हीदेखील एक सामान्य स्त्री होती. तिनं यापूर्वी कधीही कॅमेराला तोंड दिलं नव्हतं. तीच गोष्ट लहानग्या ब्रुनोचं काम करणाऱ्या एंझो या मुलाची. त्यानं तर या भूमिकेत कमाल केली आहे. त्याच्या डोळ्यांतले भाव (आणि विशेषतः शेवटचं दृश्य) काळजात घर करून जातात.
हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर इटलीत त्यावर टीका झाली. इटलीतील जीवनाचे नकारात्मक चित्र त्यात रंगविले आहे, असे तेथील लोकांना वाटले. मात्र, जगभरात या सिनेमाचे खूप चांगले स्वागत झाले आणि आज तो सिनेमाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो, यातच त्याचं यश आहे.

---

२. श्यामची आई

---------------------

मातृप्रेमाची महन्मंगल गाथा...

-----------------------------------

पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई' या पुस्तकावरून आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी १९५३ मध्ये याच शीर्षकाचा मराठी चित्रपट निर्माण केला. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णकमळ देण्यास १९५४ मध्ये सुरुवात झाली, तेव्हा हा पुरस्कार पहिल्यांदा जिंकणारा चित्रपट म्हणजे 'श्यामची आई'.

सानेगुरुजी यांनी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात असताना कैद्यांना आपली गोष्ट सांगितली. नंतर त्यांनी पाच दिवसांत ही संपूर्ण गोष्ट लिहून पूर्ण केली. त्यातून 'श्यामची आई' हे पुस्तक तयार झाले. या पुस्तकात ४२ प्रकरणे असून, पहिली रात्र, दुसरी रात्र अशा शीर्षकांनी यातील गोष्टी येतात. ही स्वतः सानेगुरुजींचीच गोष्ट असून, पुस्तकातील श्याम म्हणजे स्वतः सानेगुरुजीच होत. सानेगुरुजींनी त्यांच्या आईची कथा यात अत्यंत हळव्या, प्रेमळ मनाने सांगितली आहे. आई आणि मुलाचे नाते त्यांनी फार वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
आचार्य अत्रे यांच्यावर सानेगुरुजींचा प्रभाव होता. सानेगुरुजींच्या निधनानंतर त्यांचे हे अजरामर लेखन सिनेमाच्या पडद्यावर आणण्याचा निर्धार अत्रे यांनी केला. ते झपाट्याने कामाला लागले. दोन वर्षांत त्यांनी हा सिनेमा पूर्ण केला आणि मार्च १९५३ मध्ये हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा सिनेमाही लोकांना अतिशय आवडला. अभिनेत्री वनमाला यांनी श्यामच्या आईचे - यशोदाचे काम केले होते. माधव वझे या मुलाने श्यामचे, तर शंकर कुलकर्णी यांनी श्यामच्या वडिलांचे, म्हणजे सदूभाऊंचे काम केले होते. बाबूराव पेंढारकर, सुमती गुप्ते, दामुअण्णा जोशी, बापूराव माने या तेव्हाच्या लोकप्रिय कलाकारांनीही यात भूमिका केल्या होत्या. प्रख्यात गीतकार प्रा. वसंत बापट यांनी या सिनेमातील बारक्याची भूमिका केली होती, तर दुर्वांची आजी ही गाजलेली भूमिका सौ. सरस्वती बोडस यांनी केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनीही या सिनेमात पुराणिकबुवांची एक छोटीशी भूमिका केली आहे.
या चित्रपटाला त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. यातील 'भरजरी गं पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण' हे आशा भोसले यांनी गायिलेले गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. याशिवाय ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी तेव्हा, त्यांच्या कुमारवयात गायिलेले यातील 'छडी लागे छमछम' हे गाणेही अत्यंत गाजले.
यातील एका दृश्यात श्याम अंघोळ झाल्यानंतर पायाला घाण लागेल, म्हणून जमिनीवर पाय ठेवायला तयार नसतो, असं दृश्य आहे. तेव्हा श्यामची आई त्याला म्हणते, 'श्याम, पायाला घाण लागू नये, म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो...' हे आणि यासारखे चित्रपटातील अनेक संवाद आजही लोकांना मुखोद्गत आहेत.
'श्यामची आई' हे पुस्तक कधीही वाचले नाही, असे एकही मराठी घर नसेल. त्याचप्रमाणे 'श्यामची आई' हा चित्रपटानेही अनेक पिढ्यांवर गारूड केले आहे. या चित्रपटात छोट्या श्यामची भूमिका करणारे माधव वझे आज प्रसिद्ध नाट्यकर्मी, नाट्यसमीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. 'महाराष्ट्रीय कलोपासक' या संस्थेने त्यांना अभिनयाचे शिक्षण दिले होते. सिनेमाच्या नामावलीत तसा उल्लेख करण्यात आला आहे. या सिनेमाची सुरुवात होते तेव्हा सानेगुरुजींचा पुतळा दिसतो आणि मागे गाय-वासरांचे हंबरणे ऐकू येते. या सूचक दृश्यापासून सिनेमा जो पकड घेतो, तो शेवटर्यंत... अत्यंत भावनात्मक असा हा सिनेमा पाहताना अनेक माणसे अक्षरशः घळघळा रडतात, असा अनुभव आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाने पाहिलाच पाहिजे, असा हा महत्त्वाचा चित्रपट आहे.

----

३. बूट-पॉलिश

-----------------

मुठ्ठी में है तकदीर हमारी...

-----------------------------------

भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा देशात गरीब जनतेचं प्रमाण खूप होतं. अनेक लोकांना काम नसे. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असे. काही लोकांना नाइलाज म्हणून भीक मागून पोट भरावं लागे. अशाही स्थितीत स्वाभिमान बाळगून कष्टानं आपली रोजीरोटी कमावण्याचं त्यांचं स्वप्न असे. 'बूट-पॉलिश' या १९५४ मध्ये आलेल्या हिंदी चित्रपटात अत्यंत विपरीत परिस्थितीत सापडलेल्या दोन लहान मुलांची हृदयद्रावक, पण तितकीच प्रेरणादायक कथा सांगण्यात आली आहे.

प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राज कपूर यांनी आपल्या आरके स्टुडिओद्वारे या सिनेमाची निर्मिती केली, तर प्रकाश अरोरा यांनी दिग्दर्शन केलं आहे.
बेलू आणि भोला या दोन अनाथ मुलांची ही करुण कहाणी आहे. बेलूचं काम बेबी नाझ हिनं, तर भोलाचं काम रतनकुमार या बालकलाकारानं केलं आहे. या चित्रपटात या दोन मुलांची एक दुष्ट काकू आणि शेजारचे एक अपंग, पण प्रेमळ असे जॉनचाचा अशी आणखी दोन महत्त्वाची पात्रे आहेत. जॉनचाचांचे काम हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते डेव्हिड यांनी केलं आहे.
आई मरण पावल्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता बेलू आणि भोलाला त्याच्या काकूकडं आणून सोडतो. मात्र, ही काकू दुष्ट असते. ती या मुलांना छळते आणि भीक मागायला लावते. जॉनचाचांचं पहिल्यापासून या मुलांशी मेतकूट जमलेलं असतं. ते या मुलांना स्वाभिमानाचे धडे देतात आणि भीक न मागण्याबद्दल सांगतात. भोला मोठा असल्यानं त्याला ते पटतं. बेलूही त्याला साथ देते. दोघंही पैसे वाचवून बूट-पॉलिशचं सामान विकत घेतात आणि भोला रेल्वे स्टेशनांवर लोकांचे बूट पॉलिश करून देऊ लागतो. काकूला हे समजताच ती दोघांना मारहाण करते आणि घराबाहेर हाकलून देते. दरम्यान, जॉनचाचांनाही दारू विकत असल्याबद्दल पोलिस अटक करतात. जॉनचाचांचा आसरा गेल्यामुळं मुलं रस्त्यावर येतात. दरम्यान पावसाळा सुरू होतो आणि भोलाला बूट पॉलिशचं काम मिळेनासं होतं. दोघांनाही प्रचंड भूक लागते, तेव्हा एक जण भोलाला भिकारी समजून एक नाणं फेकतो. बेलू ते नाणं घेते, तेव्हा भोला तिला मारतो आणि भीक न मागण्याबद्दल खडसावतो. रेल्वे स्टेशनवर काही तरी काम करून भोला पैसे मिळवतो आणि बेलूसाठी खायला आणतो, तेव्हाच पोलिस येतात आणि पळापळीत बेलू आणि भोलाची ताटातूट होते. बेलू एका रेल्वेगाडीत चढते. तिथं एक दाम्पत्याच्या नजरेस ती पडते. त्यांना मूल-बाळ नसल्यानं ते बेलूला दत्तक घेतात. इकडं भोलाला अटक होते. सुटल्यानंतर भोला बेलूला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती सापडत नाही. तिकडं बेलूलाही रोज भोलाची आठवण येत असते. त्यानंतर काय होतं, हे बहीण-भाऊ एकमेकांना भेटतात का, जॉनचाचांचं काय होतं, हे प्रत्यक्ष सिनेमातच पाहायला हवं.
या चित्रपटात दोन्ही बालकलाकारांची कामं महत्त्वाची आहेत. मुलीच्या भूमिकेसाठी राज कपूर यांनी मुंबईतील १२ शाळांना भेटी दिल्या होत्या. त्यानंतर बेबी नाझला हे काम मिळालं. रतनकुमार यानंही भोलाचं काम खूपच सुंदर केलं आहे. या चित्रपटाला तेव्हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर डेव्हिड यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. चित्रपटाला शंकर-जयकिशन यांचं संगीत असून, यातील आठही गाणी श्रवणीय आहेत. पण तरी यातलं आशा भोसले व महंमद रफी यांनी गायिलेलं 'नन्हे-मुन्हे बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है, मुठ्ठी में है तकदीर हमारी' हे गाणं आजही लोकप्रिय आहे.
गरिबी असली, तरी स्वाभिमानानं जगायला शिकवणारा हा प्रेरणादायक सिनेमा प्रत्येक मुलानं पाहायलाच हवा.

---

(क्रमश:)

-----
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

4 comments:

  1. खूप सुंदर लेखन, मोजक्या शब्दात, अप्रतिम
    चित्रपटाच्या links सोबत असतील तर उत्तम होईल

    ReplyDelete
  2. छान लिखाण. धन्यवाद श्रीपाद जी.

    ReplyDelete