1 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग ४ ते ६

बिंगोस्कोप
-------------


स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा दुसरा भाग...

----

४. द किड

-------------

खूप काही बोलणारी मूक कहाणी

----------------------------------------

मुलांनो, चार्ली चॅप्लिनचे सिनेमे पाहायला तुम्हाला खूप आवडतात ना! तसं असेल तर तुम्ही त्यांचा 'द किड' हा सिनेमा नक्कीच पाहिला असेल. नसेल तर आवर्जून पाहाच. विनोद आणि करुणा यांचा अनोखा संगम असलेले चित्रपट तयार करण्यासाठी चार्ली चॅप्लिन प्रसिद्ध होते. त्यांनी तयार केलेला 'द किड' हा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट. तो प्रदर्शित झाला फेब्रुवारी १९२१ मध्ये. त्या काळात सिनेमा अद्याप 'बोलू' लागला नव्हता. त्यामुळे सगळे चित्रपट हे मूकपटच असत. 

आपण ज्या 'द किड' सिनेमाविषयी बोलतोय, त्यात एका अनाथ मुलाची कथा दाखविण्यात आली आहे. आपल्या चित्रपटाचा नायक म्हणजे एक गरीब, फाटका, भणंग माणूस आहे. नायकाचं हे काम स्वतः चॅप्लिन यांनीच केलं आहे, हे सांगायला नकोच. तर या नायकाला अगदी नुकतेच जन्मलेले हे छोटे बाळ दिसते. त्याची आई त्याला सोडून गेलेली असते. अशा छोट्या बाळाचं काय करायचं असा प्रश्न चार्लीला पडतो. सुरुवातीला तो दुसऱ्या एका बाईच्या ताब्यात हे मूल देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते जमत नाही. पोलिस संशयानं पाहू लागल्यावर तो अखेर या बाळाला घेऊन घरी जातो. लहान मुलाला कसं सांभाळतात हे त्याला मुळीच माहिती नसतं. त्यामुळं त्याची चांगलीच तारांबळ उडते. पण तो मोठ्या प्रेमानं या मुलाला सांभाळतो.
चित्रपटात यानंतरचा कथाभाग तो छोटा मुलगा पाच वर्षांचा झाल्यावर सुरू होतो. चार्लीनं या मुलाचं नाव जॉन असं ठेवलेलं असतं. अत्यंत गरिबीमुळं दोघंही कशीबशी रोजची रोजीरोटी मिळवत असतात. जॉन दगड मारून घरांच्या काचा फोडत असतो आणि नंतर चार्ली साळसूदपणे तिथं जाऊन ती काच दुरुस्त करीत असतो. दरम्यानच्या काळात जॉनची आई एक श्रीमंत गायिका झालेली असते. ती आणि जॉन एकदा एकमेकांसमोरून जातातही; पण अर्थातच एकमेकांना ओळखत नाहीत. काही काळानंतर जॉन आजारी पडतो, तेव्हा चार्लीला डॉक्टरला बोलवावं लागतं. तो डॉक्टर हा मुलगा चार्लीचा नाही, हे ओळखून पोलिसांना कळवतो. त्यानंतर अनाथाश्रमाचे दोन लोक जॉनला घेऊन जायला येतात. पण चार्ली मोठ्या हिकमतीने पाठलाग करून जॉनला परत मिळवतो. त्यानंतर मात्र अशा काही घटना घडतात, की चार्ली आणि जॉनची ताटातूट अटळ ठरते. शेवटी काय होतं, हे पडद्यावरच पाहणं इष्ट...
चार्लीचा हा पहिलाच सिनेमा असला, तरी पुढं त्याची ओळख बनलेल्या 'आसू आणि हसू' यांच्या मिश्रणाचा हा पहिलाच सिनेमा ठरला. कमालीच्या विपरीत परिस्थितीतही चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवून आल्या स्थितीला तोंड देणारा त्याचा सर्वसामान्य, भेदरट, बावळट; पण प्रामाणिक सामान्य माणूस प्रेक्षकांना अत्यंत भावला. या चित्रपटाने १९२१ मध्ये अमेरिकेत दुसऱ्या क्रमांकाची कमाई केली. चार्ली आणि जॉनचं काम करणारा जॅकी कूगन हा छोटा मुलगा यांना जागतिक प्रसिद्धी मिळाली. हा सिनेमा तयार करण्यापूर्वी चार्लीच्या स्वतःच्या आयुष्यात काही दुःखद घटना घडल्या होत्या. त्याचा प्रभाव या सिनेमावर आहे. याशिवाय चार्लीच्या बालपणीच्या काही वाईट आठवणीही या सिनेमात नकळत गुंफल्या गेल्या आहेत. चार्ली चॅप्लिन यांनी यातल्या ट्रॅम्पचं म्हणजेच भणंग, भटक्या माणसाचं व्यक्तिचित्र खूप अप्रतिम रंगवलं आहे. या सिनेमात शेवटी एक स्वप्नदृश्य आहे. त्यात माणसांना पंख असतात. हे सुंदर दृश्य चॅप्लिन यांनी ज्या पद्धतीनं चित्रित केलंय, ते मुळातूनच पाहण्यासारखं आहे. हा चित्रपट करताना त्यांनी स्वतःचं समाधान होईपर्यंत अनेकदा पुनःपुन्हा चित्रिकरण केलं. त्याचा चांगला परिणाम चित्रपट पाहताना जाणवतो.
या चित्रपटाला अनेक मान-सन्मान मिळाले. जागतिक चित्रपटांच्या इतिहासात हा एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. तो पाहायला हवाच. 

---

५. मदर इंडिया

------------------

कणखर आणि धीरोदात्त...

-------------------------------

बालमित्रांनो, मार्च महिन्याच्या आठ तारखेला दर वर्षी जागतिक महिला दिन साजरा केला जातो, हे तुम्हाला माहिती असेलच. स्त्रीशक्तीला वंदन करण्याचा, तिचा आदर करण्याचा, तिच्याविषयी जाणून घेण्याचा हा खास दिवस. या दिवसानिमित्त स्त्रीशक्तीची गाथा म्हणून आपल्याकडे गाजलेल्या, क्लासिक अशा 'मदर इंडिया' या हिंदी चित्रपटाची ओळख करून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल, असं वाटतं.

'मदर इंडिया' हा चित्रपट मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केला आहे. तो २५ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला. यात नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्रकुमार, कन्हैयालाल आणि राजकुमार या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. मेहबूब खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक बडे दिग्दर्शक मानले जातात. त्यांनी १९४० मध्ये 'औरत' नावाचा हिंदी चित्रपट तयार केला होता. 'मदर इंडिया' हा याच चित्रपटाचा रिमेक होता. 'मदर इंडिया' हा चित्रपट म्हणजे भारतीय स्त्रीच्या कणखरपणाचे, धीरोदात्तपणाचे आणि संघर्षाचे एक उदाहरण आहे. राधा (नर्गिस) या शेतकरी महिलेची ही कहाणी आहे. भारतात त्या काळात जवळपास ८० टक्के लोकांची उपजीविका शेतीवर चालत होती. मात्र, दुष्काळ आणि सावकारी या दोन संकटांना तोंड देताना शेतकरी हतबल होत असे. या परिस्थितीत आजही फारसा फरक पडलेला नाही. राधाच्या कुटुंबावर असंच एका सावकाराचं कर्ज असतं. त्यात अपघातात अपंग झालेला तिचा पती एक दिवस घर सोडून परागंदा होतो. मात्र, राधा हिंमत न हरता, स्वतःच्या मुलांना लहानाचे मोठे करते, शेती सांभाळते, दुष्काळाला तोंड देते आणि सावकाराच्या दुष्टपणाशीही दोन हात करते. मुलं मोठी होतात. राधा पारंपरिक भारतीय नीतिमूल्यांचा आदर करणारी स्त्री असते. पुढे असे काही प्रसंग घडतात, की तिला तिच्या स्वतःच्या मुलाबरोबरही संघर्ष करावा लागतो. मात्र, नीतिमूल्यांसाठी ती स्वतःच्या मुलालाही गोळी घालायला मागे पाहत नाही.
त्या काळात 'मदर इंडिया'ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठविलेला गेलेला पहिला चित्रपट होय. त्याला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीत नामांकनही मिळालं. मात्र, पुरस्कार अवघ्या एका मताने हुकला. असं असलं, तरी आजतागायत या सिनेमाची लोकप्रियता कमी झालेली नाही. नर्गिस या अभिनेत्रीच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम भूमिका मानता येईल. तिच्यावर तर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला. याच चित्रपटाच्या सेटवर आग लागली असताना, सुनील दत्त यांनी नर्गिसचे प्राण वाचविले. त्यानंतर नर्गिस सुनील दत्त यांच्या प्रेमात पडली व नंतर त्या दोघांचा विवाह झाला.
हा चित्रपट १७२ मिनिटांचा आहे, म्हणजे जवळपास तीन तासांचा. यात राधाचा संपूर्ण जीवनप्रवास चित्रित करण्यात आला आहे. त्या काळात सर्वच चित्रपटांमध्ये संगीत महत्त्वाचे असे. 'मदर इंडिया'ला प्रख्यात संगीतकार नौशाद यांनी संगीत दिलं आहे. चित्रपटात एकूण १२ गाणी असून, सगळीच प्रचंड लोकप्रिय झाली. 'गाडीवाले', 'दुनिया में हम आए है तो जीना ही पडेगा', 'नगरी नगरी द्वारे द्वारे', 'दुखभरे दिन बीते रे भय्या' आदी गाणी अगदी आजही लोकप्रिय आहेत. लता मंगेशकर, महंमद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम आदी दिग्गज गायकांनी ही गाणी गायिली आहेत.
प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने लोकप्रियतेेचे अनेक उच्चांक मोडले. तेव्हाचा हा एक खर्चीक सिनेमा मानला जात होता. मात्र, आजही तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान टिकवून आहे. भारतीय सिनेमा समजून घ्यायचा असेल, तर 'मदर इंडिया' पाहण्याशिवाय पर्याय नाही. हा सिनेमा पाहताना भारतीय समाजमनाचे, इथल्या स्त्रीचे, तिच्या संघर्षाचे स्तिमित करणारे दर्शन दिग्दर्शक आपल्याला घडवतो आणि आपण केवळ थक्क होऊन जातो. हा अनुभव घेण्यासाठी आणि स्त्रीच्या शक्तीला सलाम करण्यासाठी 'मदर इंडिया' नक्की पाहा.

---

६. चिल्ड्रन ऑफ हेवन
---------------------------

निरागस बालपणाची हळवी गोष्ट
--------------------------------------

बालमित्रांनो, लवकरच तुमच्या परीक्षा संपतील आणि तुम्हाला सुट्ट्या लागतील. सुट्टीमध्ये तुम्ही 'बिंगोकिड्स'च्या पहिल्या अंकापासून आत्तापर्यंत 'बिंगोस्कोप'मध्ये माहिती दिलेले सर्व सिनेमे एकेक करून नक्की पाहा. त्यातही 'चिल्ड्रन ऑफ हेवन' हा सिनेमा जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल, तर आधी पाहा. 
प्रख्यात इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी १९९७ मध्ये तयार केलेला हा चित्रपट लहान मुलांच्या भावविश्वाचं खूप प्रभावीपणे दर्शन घडवतो. हा सिनेमा पाहताना आपल्याला कळतं, की जगात अनेक देश असले, भाषा वेगळ्या असल्या, वर्ण किंवा वंश भिन्न असले, जाति-धर्म निराळे असले, तरी माणूस म्हणून सगळ्यांची भावना एकसारखीच असते. त्यातही लहान मुलांचं जग तर सगळीकडं समानच असतं. आपलं कुटुंब, आपले आई-बाबा, आपली भावंडं यांच्याविषयीचं प्रेम सगळ्या जगात 'सेम टु सेम' असतं. 
हा सिनेमा जगभर गाजला. गेल्या वीस वर्षांपासून तो जगभरातील अनेक महोत्सवांत दाखविला गेला आहे. या चित्रपटाला १९९८ च्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट परभाषा चित्रपट विभागात नामांकन मिळालं होतं. 
या सिनेमाची कथा अगदी साधी आहे. किंबहुना अगदी साधी कथा, रोजच्या जगण्यातलं वास्तव साधेपणानं मांडणं हे इराणी चित्रपटांचं वैशिष्ट्यच आहे. अली आणि झायरा या बहीण-भावांची ही गोष्ट आहे. इराणची राजधानी असलेल्या तेहरान या भल्यामोठ्या शहराच्या दक्षिण भागात अलीचं कुटुंब राहत असतं. परिस्थिती गरिबीची असते. वडील मोलमजुरी करीत असतात. आई आजारी असते. घराचं भाडं पाच महिन्यांपासून थकलेलं असतं. किराणाची उधारी राहिलेली असते. अशा परिस्थितीत अली आपल्या बहिणीचे फाटके गुलाबी बूट दुरुस्त करून घरी जाताना आपल्याला दिसतो. तो एका ठिकाणी बटाटे घेत असताना एक माणूस ते बूट उचलून रद्दीच्या पिशवीत टाकतो. बहिणीचे बूट गेल्यानं अलीला अतिशय वाईट वाटतं. तो त्याच्या आई-वडिलांना हे सांगू शकत नसतो. वडील आधीच वैतागलेले असतात. आई आजारी असते. त्यामुळं तो बहिणीला बूट गेल्याचं सांगतो. नवे बूट आणण्याची ऐपत नसते आणि शाळेत तर बूट घातल्याशिवाय जाणं शक्यच नसतं. अखेर झायरा एक तोडगा काढते. तिची सकाळची शाळा झाल्यावर ती तिचे बूट अलीला देईल आणि अली तेच बूट घालून त्याच्या शाळेत जाईल, अशी योजना ठरते. अली शाळेत हुशार असतो, पण या धावपळीत त्याला उशीर होऊ लागतो. एकदा तर मुख्याध्यापक त्याला वडिलांना घेऊन यायला सांगतात, पण शिक्षकांनी रदबदली केल्यामुळं अली वाचतो. तिकडं झायराला तिचे बूट रोया नावाच्या एका मुलीच्या पायात दिसतात. तिला आश्चर्य वाटतं. ती शाळा संपल्यावर हळूच तिच्या मागे मागे तिच्या घरापर्यंत जाते. तिचे वडील कचरा उचलणारे व अंध असतात हे तिच्या लक्षात येतं.
नंतर अलीला शाळेत एक स्पर्धा जाहीर झाल्याचं समजतं. त्या धावण्याच्या शर्यतीत तिसरं बक्षीस बुटांच्या जोडीचं असतं. या स्पर्धेत भाग घेऊन तिसरा नंबर मिळवायचा असं अली ठरवतो. पुढं काय होतं, ते तुम्ही या सिनेमातच पाहा.
हा सिनेमा पाहताना दिग्दर्शक माजिदी यांच्या दृष्टिकोनाचं आपल्याला कौतुक वाटतं. त्यांनी हा सिनेमा त्या दोन लहान मुलांच्या नजरेतूनच आपल्याला दाखवला आहे. आपल्याला आपलं बालपण आठवतं. अनेकदा डोळ्यांत पाणी येतं आणि हेच या चित्रपटाचं यश आहे. 
आमीर फारोख हाशेमियाँ याने अलीची, तर बहार सिद्दिकीनं झायराची भूमिका खूप छान केली आहे. प्रसिद्ध इराणी अभिनेते रेजा नाझी यांनी त्यांच्या वडिलांचे काम केले आहे.
या चित्रपटातील या दोन मुलांची अनेक दृश्यं हेलावून टाकणारी आहेत. माजिदी यांनी तेहरान शहरातच या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण केलं आहे. चित्रीकरण वास्तववादी व्हावं, यासाठी अनेकदा ते ऐन गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यांत चित्रीकरण करीत असत. 
या चित्रपटाने इराणी चित्रपटांना जागतिक नावलौकिक मिळवून दिला. या चित्रपटाच्या रूपानं प्रथमच इराणी चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकन मिळालं. तिथं त्याला पुरस्कार मिळू शकला नसला, तरी जगभराच्या अनेक महोत्सवांतून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.
असा हा चित्रपट तुम्ही येत्या सुट्टीत आपल्या मित्र-मैत्रिणींसह नक्की पाहा आणि आम्हालाही कळवा.

---


---

No comments:

Post a Comment