10 Dec 2020

बिंगोस्कोप - भाग १० ते १२

बिंगोस्कोप

--------------

स्वाती यादवाडकर या मैत्रिणीनं दोनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘बिंगोकिड्स’ या लहान मुलांच्या पाक्षिकात मी ‘बिंगोस्कोप’ या सदरात जगभरातील काही उत्तम चित्रपटांची ओळख मुलांना करून दिली. ही रूढार्थाने परीक्षणं नाहीत. साधारण दहा ते १४ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी, त्यांना समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत सिनेमांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण २१ सिनेमांवर मी या सदरात लिहिलं आहे. हे लिखाण इथं एकत्रित राहील म्हणून तीन-तीन परिचय एकत्र करून एक ब्लॉग अशा रीतीनं प्रसिद्ध करीत आहे. हा चौथा भाग...

----

१०. स्वदेस

-------------

यह जो बंधन है कभी टूट नहीं सकता...

----------------------------------------------

बालदोस्तांनो, १५ ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन! याच दिवशी १९४७ मध्ये आपला देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला. यंदा आपला देश स्वतंत्र झाला, त्याला ७१ वर्षे होतील. आपल्या देशावर, आपल्या स्वातंत्र्यलढ्यावर किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या आयुष्यावर अनेक सिनेमे आले. ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असतील किंवा यंदाच्या १५ ऑगस्टला वेगवेगळ्या चॅनेलवर पाहायलाही मिळतील. पण आपण मात्र या वेळी देशप्रेमावरच्याच, पण थोड्या वेगळ्या सिनेमाची ओळख करून घेणार आहोत. हा सिनेमा आहे आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’!

स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच भारतातील उच्चशिक्षित तरुण अमेरिका किंवा युरोपात जाऊन स्थायिक होण्याचं प्रमाण वाढलं. या देशाच्या प्रगतीत योगदान देण्याऐवजी या प्रशिक्षित मनुष्यबळाचा फायदा परदेशांनाच जास्त होत होता. ‘स्वदेस’ चित्रपटाचा नायक मोहन भार्गव (शाहरुख खान) हा मात्र अपवाद ठरतो. मोहन अमेरिकेत ‘नासा’मध्ये काम करीत असतो. तो त्याच्या आजीला अमेरिकेला घेऊन जाण्यासाठी भारतात येतो. मात्र, आजीच्या गावाची परिस्थिती पाहून तो भारतातच राहण्याचा निर्णय घेतो आणि गावाच्या प्रगतीसाठी सर्वांना एक करतो, असं हे कथानक आहे. हा चित्रपट २००४ मध्ये आला. एकविसाव्या शतकातही भारतातील खेड्यांची स्थिती फारशी चांगली नाही आणि तिथे पिण्याचे पाणी, वीज, चांगले रस्ते, शाळा अशा अनेक मूलभूत स्वरूपाच्या सेवासुविधाही उपलब्ध नाहीत, याची विदारक जाणीव हा सिनेमा आपल्याला करून देतो. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरनं यात उत्तर प्रदेशातील चरणपूर नामक काल्पनिक खेड्याची व तेथे राहणाऱ्या साध्या-सुध्या लोकांची गोष्ट अतिशय प्रभावीपणे सांगितली आहे.
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रख्यात कन्नड साहित्यिक शिवराम कारंथ यांनी लिहिलेल्या ‘चिगुरिदा कनासू’ या कन्नड चित्रपटावरून ‘स्वदेस’ बेतलेला आहे. अरविंद पिल्ललामरी आणि रावी कुचिमानची या एनआरआय दांपत्याच्या सत्य जीवनावर कारंथ यांनी हा चित्रपट लिहिला होता. हे दांपत्यही परदेशातील चांगली नोकरी सोडून भारतात परतले आहे आणि त्यांनी दुर्गम भागांतील शाळांमध्ये वीज पोचविण्यासाठी पायाभूत स्वरूपाचे काम केले आहे. हा चित्रपट तयार करण्यापूर्वी दिग्दर्शक गोवारीकर यांनी अरविंद व रावी या दांपत्यासोबत काही काळ घालविला. यासोबतच नर्मदा खोऱ्यातील बिळगाव या गावालाही गोवारीकर यांनी भेट दिली. या गावाने श्रमदानातून स्वयंपूर्ण ऊर्जानिर्मितीचा आदर्श घालून दिला आहे.
या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खानने मोहन भार्गव या तरुण, देशप्रेमी शास्त्रज्ञाची भूमिका अत्यंत तन्मयतेनं केली आहे. नायिकेची भूमिका गीता जोशी यांनी, तर मोहनच्या आजीची भूमिका किशोरी बल्लाळ यांनी केली आहे. या चित्रपटाला संगीत ए. आर. रेहमान यांनी दिले आहे, तर यातील गीते प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत. यातलं ‘ये जो देस है मेरा, स्वदेस है मेरा, ये जो बंधन है जो कभी टूट नही सकता’ हे शीर्षकगीत स्वत: रेहमाननं गायलं असून, ते अतिशय गाजलं. याशिवाय ‘ये तारा वो तारा हर तारा’ आणि ‘यूँ ही चला चल राही’ ही गाणीही लोकप्रिय ठरली.
या चित्रपटाचं बरंचसं चित्रिकरण वाई (जि. सातारा) तालुक्यातील मेणवली या गावी झालं. पुण्यातल्या एका पुस्तकाच्या दुकानातही या चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यात आला आहे. तेव्हा यंदाच्या १५ ऑगस्टला ‘स्वदेस’ नक्की पाहा. आपला देश अधिक चांगला समजून घेण्यासाठी त्याची नक्कीच मदत होईल.

---

स्वदेस, हिंदी/भारत/रंगीत/२००४

दिग्दर्शक : आशुतोष गोवारीकर, संगीत : ए. आर. रेहमान

प्रमुख भूमिका : शाहरुख खान, गीता जोशी, किशोरी बल्लाळ

---

११. गांधी

------------

'महात्मा' माणूस...

-----------------------

मित्र हो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी, म्हणजेच दीडशेव्या जयंती वर्षाला दोन ऑक्टोबर २०१८ रोजी सुरुवात होत आहे, हे तुम्ही जाणताच. महात्मा गांधींचं आयुष्य आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व एवढं प्रेरक होतं, की विसाव्या शतकाच्या पूर्वार्धावर त्यांचा अमीट असा ठसा उमटला आहे. गांधीजी गेले, तेव्हा विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणाले होते, 'असा एका महात्मा या भूतलावर होऊन गेला, यावर पुढच्या पिढ्यांचा कदाचित विश्वास बसणार नाही.' अशा या थोर व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट दाखवणारे अनेक चित्रपट येऊन गेले. त्यातला सर रिचर्ड अटनबरो दिग्दर्शित 'गांधी' हा चित्रपट सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. सर रिचर्ड ॲटनबरो हे ब्रिटिश अभिनेते व दिग्दर्शक. त्यांनी महात्मा गांधींवरील चित्रपटाचा भव्य प्रकल्प हाती घेतला आणि अनेक वर्षं त्यावर काम करून तो १९८२ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी 'दूरदर्शन'वर पाहिला असेल. नसेल पाहिला तर तो अवश्य पाहा. 

या चित्रपटातून आपल्याला महात्मा गांधींचे जीवन तर उमगतेच; त्या जोडीला तत्कालीन भारत, तेव्हाचा समाज, इतर राजकीय नेते, स्वातंत्र्यलढा या सगळ्यांविषयी बरीच माहिती समजते. महात्मा गांधी सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत काम करीत होते. तेथेही इंग्रजी राजवट होती. एकदा रेल्वेतून प्रथम वर्गातून प्रवास करीत असताना गांधींना तेथील गोऱ्या लोकांनी खाली उतरवले होते. हा वर्णद्वेष गांधीजींच्या मनावर खोल घाव करून गेला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाच्या विरोधात लढा उभारला. 'गांधी' चित्रपटाची सुरुवात या प्रसंगापासून होते. (अगदी सुरुवातीला त्यांच्या हत्येचा प्रसंग येतो. मात्र, कथानकाची सुरुवात आफ्रिकेतील प्रसंगाने होते.) नंतर आफ्रिकेतून त्यांचे भारतात झालेले आगमन, टिळकांनंतर गांधीजींकडं आलेली काँग्रेसची धुरा, जालियनवालाबाग हत्याकांड, असहकार आंदोलन, चले जाव चळवळ, स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यानंतर गांधीजींची झालेली भीषण हत्या... हे सर्व कथानक या सिनेमात तपशीलवार येतं. प्रख्यात ब्रिटिश अभिनेते बेन किंग्जले यांनी यात महात्मा गांधींची भूमिका साकारली आहे. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यात महात्मा गांधींच्या पत्नीची, म्हणजेच कस्तुरबा गांधींची भूमिका करण्याची संधी मिळाली. रोशन सेठ यांनी पंडित नेहरूंची भूमिका केली होती. सईद जाफरी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची, तर अलेक पदमसी यांनी महंमद अली जीना यांची भूमिका साकारली आहे. डॉ. श्रीराम लागू यात महात्मा गांधींचे गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या छोट्याशा भूमिकेत दिसतात.
या सिनेमात अनेक भव्य समूहदृश्ये आहेत. जालियनवालाबाग हत्याकांडाचे दृश्य अंगावर काटा आणते. महात्मा गांधींच्या भूमिकेत बेन किंग्जले यांनी खरोखर कमाल केली आहे. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास त्यांची ही भूमिका पाहताना जाणवत राहतो. मूळ कोल्हापूरच्या भानू अथय्या यांनी या चित्रपटाची वेषभूषा केली होती. त्यांना या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्याच मराठी व्यक्ती ठरल्या. हा चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारांमध्ये एकूण ११ गटांत नामांकन मिळालं होतं. त्यापैकी आठ पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट पटकथा आदींचा समावेश होता.
या चित्रपटाच्या निर्मितीची कथाही रंजक आहे. सुमारे १८ वर्षे हा प्रकल्प ॲटनबरो यांच्या डोक्यात होता. मात्र, या ना त्या कारणाने तो रखडला. अखेर १९८० मध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आणि ते १९८१ मध्ये संपले. या चित्रपटात गांधीजींच्या अंत्ययात्रेचे दृश्य चित्रित करण्यासाठी तीन लाख ‘एक्स्ट्रा’ कलाकार बोलावण्यात आले होते. एखाद्या चित्रपटात समूह दृश्यासाठी एवढे लोक वापरण्याचा हा विक्रम आहे. हा चित्रपट भारतात हिंदी भाषेत डब करून प्रदर्शित करण्यात आला होता.
तेव्हा असा हा महत्त्वाचा चित्रपट तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल तर नक्की पाहा.

---

गांधी, ब्रिटन/भारत, १९८२, इंग्रजी, रंगीत, १९१ मिनिटे

दिग्दर्शक : सर रिचर्ड ॲटनबरो, निर्माते : सर रिचर्ड ॲटनबरो

पटकथा : जॉन ब्रिली, संगीत : पं. रविशंकर, जॉर्ज फेंटन

प्रमुख भूमिका : बेन किंग्जले, रोहिणी हट्टंगडी, रोशन सेठ, पीटर हर्लो, एडवर्ड फॉक्स, सईद जाफरी

---


१२. इक्बाल

-------------

आशाएँ खिली दिल में...

---------------------------

मुलांनो, तुम्हाला क्रिकेट आवडतं ना? आपल्या भारतात हा एक अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. सचिन तेंडुलकर तर अनेकांचा आवडता क्रीडापटू आहे. आपल्याकडं पूर्वीपासून क्रिकेट लोकप्रिय खेळ होताच; पण सचिनच्या आगमनानंतर तो अगदी खेड्यापाड्यांपर्यंत, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यापर्यंत पोचला. अगदी स्वयंपाकघरापर्यंत पोचला! आपल्या देशातील हजारो छोट्या गावांमधून वाढणाऱ्या अनेक लहान मुलांना 'सचिन' होण्याची स्वप्नं पडू लागली. अनेक पालक आपल्या मुलांना क्रिकेट शिकण्यासाठी कोचिंगला नेऊ लागले. अर्थात, सचिन तेंडुलकर होणं एवढं सोपं नाहीच; पण नुसता क्रिकेटपटू होणंही वाटतं तेवढं सोपं नाही. त्यासाठी कठोर मेहनत, बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि जोडीला चांगलं नशीब लागतं. एवढं सगळं तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला कधी तरी देशासाठी खेळण्याची संधी मिळेल. मग तिथं आपली चमक दाखवून मोठा क्रिकेटपटू होणं ही नंतरची गोष्ट! आज आपण ज्या सिनेमाची माहिती घेणार आहोत तो 'इक्बाल' हा सिनेमाही अशाच एका क्रिकेटवेड्या मुलाची कथा सांगतो. आणि विशेष म्हणजे 'इक्बाल' हा मुलगा मूकबधीर आहे. त्याला ऐकू येत नाही आणि म्हणून बोलताही येत नाही. पण तरी हा मुलगा जिद्दीने यावर मात करून भारतीय संघात स्थान कसं मिळवतो याची ही प्रेरणादायी गोष्ट आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकनूर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. श्रेयस तळपदे यानं यात शीर्षक भूमिका केली आहे. इक्बालला लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड असतं. मात्र, त्यानं क्रिकेटचा नाद सोडून आपल्याला शेतीत मदत करावी, असं त्याच्या वडिलांना वाटत असतं. इक्बालची बहीण खदिजा (श्वेता प्रसाद) ही मात्र त्याला मदत करत असते. ती त्याला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार असलेल्या आणि आता कोच असलेल्या गुरुजींकडं (गिरीश कार्नाड) घेऊन जाते. ते इक्बालची वेगवान गोलंदाजीतील गुणवत्ता बघून त्याला अकॅडमीत घेतातही. मात्र, कमल नावाच्या दुसऱ्या एका मुलाच्या वडिलांच्या भीतीवरून ते त्याला अकॅडमीतून हाकलून देतात. त्यानंतर इक्बालला भेटतात मोहित (नसीरुद्दीन शाह) हे एक वल्ली खेळाडू. मोहित एक महान क्रिकेटपटू असतात. मात्र, आत्ता त्यांना दारूच्या व्ससनानं घेरून टाकलेलं असतं. त्यांच्या विक्षिप्त स्वभावाला तोंड देत, इक्बाल त्यांच्याकडून वेगवान गोलंदाजीचे धडे गिरवतो. अखेर त्याला आंध्र प्रदेश संघाकडून रणजी स्पर्धेत खेळायला मिळतं. तिथं तो चांगली कामगिरी करतो. आता राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांसमोर त्याला चांगली कामगिरी करायची असते. तेव्हा गुरुजी त्याला वाईट खेळून, कमलला संधी मिळण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करतात. इक्बालच्या वडिलांची शेती गहाण पडलेली असते. त्यामुळे त्याला पैशांची गरज असते. म्हणून तो नाइलाजास्तव गुरुजींचा प्रस्ताव स्वीकारतो. मात्र, त्याच वेळी त्याला अचानक एक स्पोर्ट एजंट त्याला चांगल्या पैशांची ऑफर देऊ करतो. त्यानंतर इक्बाल गुरुजींचं न ऐकता, आपली गुणवत्ता दाखवतो आणि आपल्या संघाला सामना जिंकून देतो. तिथं आलेले निवड समिती सदस्य कपिल देव (पाहुणे कलाकार) त्याच्या कामगिरीमुळे खूश होतात. चित्रपटाच्या अखेरीस इक्बाल भारताच्या राष्ट्रीय संघाची निळी जर्सी घालून आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्यासाठी सज्ज होतानाचं दृश्य येतं.
एकदा एखाद्या गोष्टीचं वेड घेतलं, तर कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यावर मात करू शकतो, हे या सिनेमात फार प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. भारतातल्या मुलांचं क्रिकेटचं वेड लक्षात घेता, या सिनेमातला संघर्ष अनेकांना आपला स्वतःचा वाटू शकतो. दिग्दर्शक नागेश कुकनूरने ग्रामीण भागातल्या आणि सुविधांचा अभाव असलेल्या, गरीब मुलांच्या स्वप्नांची कथा यातून सुंदर पद्धतीनं दाखविली आहे. श्रेयस तळपदेनं यातली 'इक्बाल'ची भूमिका अत्यंत कष्टानं साकारली आहे. त्यासाठी त्यानं मूकबधीर मुलांचा अभ्यास तर केलाच; शिवाय वेगवान गोलंदाजी कशी करतात हेही तो शिकला. गिरीश कार्नाड, नसीरुद्दीन शाह, प्रतीक्षा लोणकर, यतीन कार्येकर, श्वेता प्रसाद आदींनी आपापल्या भूमिका उत्तम रीतीनं केल्या आहेत. सन २००५ मध्ये आलेल्या या चित्रपटाला 'इतर सामाजिक विषयांवरील' सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. यातलं 'आशाएँ खिली दिल में' हे केकेनं गायलेलं गाणं खूप गाजलं होतं.
पुढील वर्षी क्रिकेटचा वनडे वर्ल्ड कप आहे. आताही क्रिकेटचा सीझन सुरू झालाच आहे. तुम्ही हा सिनेमा अद्याप पाहिला नसेल तर दिवाळीच्या सुट्टीत जरूर पाहा.

----

इक्बाल (भारत/हिंदी/२००५/रंगीत/१३२ मिनिटे)

निर्माते : सुभाष घई, दिग्दर्शक : नागेश कुकनूर

कथा-पटकथा : नागेश कुकनूर, सिनेमॅटोग्राफी : सुदीप चॅटर्जी, संकलन - संजीब दत्ता,

संगीत : हिमेश रेशमिया, सुखविंदरसिंग, सलीम-सुलेमान

प्रमुख भूमिका : श्रेयस तळपदे, नसीरुद्दीन शाह, गिरीश कार्नाड, श्वेता प्रसाद, प्रतीक्षा लोणकर

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

No comments:

Post a Comment