कूर्ग, कावेरी, कॉफी अन् बरंच काही....
-----------------------------------------------
नीलची फायनल इयरची परीक्षा झाली आणि आम्हाला कुठे तरी ट्रिपला जायचे वेध लागले. दोन पर्याय होते. एक उत्तरेत शिमला, कुलू, मनालीचा आणि दुसरा दक्षिणेचा - कूर्गचा. हातात असलेले दिवस, एकाच ठिकाणी बरंच काही पाहण्यासारखं असण्याचे पर्याय आणि सुरक्षितता या मुद्द्यावर दक्षिणेचा विजय झाला आणि आम्ही कूर्गला जाण्याचं मुक्रर केलं. जाताना व येताना वेळ वाचवण्यासाठी विमानानंच जायचं हे निश्चित होतं. दोन महिने आधीच बुकिंग केलं. आमच्या सोसायटीच्या ग्रुपवर असलेले शैलेंद्र परांजपे व श्रावणी परांजपे यांची ‘विहंग टूर्स’ ही पर्यटनविषयक सेवा देणारी कंपनी आहे. आम्हाला कस्टमाइज्ड टूर हवी होती, तशी त्यांनी करून दिली. विमानांचं बुकिंग दोन महिने आधीच केल्यामुळं ते तिकीट तुलनेनं स्वस्त पडलं. आम्ही पुणे ते बंगळुरू आणि बंगळुरू ते मंगळुरू असं फ्लाइट बुकिंग केलं. मंगळुरूहून कूर्ग १३७ किलोमीटर आहे. कारनं साडेतीन तासांत तिथं पोचता येतं. त्यामुळं हाच मार्ग निश्चित केला. परांजपेंनी आम्हाला मंगळुरू विमानतळ ते मंगळुरू विमानतळ अशी कार, हॉटेल आणि पर्यटन ठिकाणांची भेट अशी बाकी सगळी व्यवस्था करून दिली. त्यामुळं आम्ही निश्चिंत मनाने ११ एप्रिलच्या रात्री पुणे विमानतळावर निघालो. (बुकिंग करताना रात्री बारानंतरच्या फ्लाइटच्या वेळा आणि दिनांक नीट तपासून घ्यावेत. मध्यरात्री १२.४५ चं विमान म्हणजे तारीख असते १२ एप्रिल आणि आपल्याला निघायचं असतं ११ एप्रिलला रात्री.)
पुणे/बेंगळुरू/मंगळुरू/कूर्ग, १२ एप्रिल २५
आमचं ‘इंडिगो’चं विमान होतं. पुणे विमानतळाचं नूतनीकरण आणि नवं टर्मिनल झाल्यापासून आम्ही पहिल्यांदाच तिथं जात होतो. बाहेर महाराजांचा पुतळा, तिरंगा झेंडा आणि तिथं केलेली म्युरल्स व रंगवलेली चित्रं यामुळं एकूण प्रथमदर्शनी हे नवं टर्मिनल उत्तम भासतं. विमानतळाच्या आत गेल्यावर मात्र खूप जास्त गर्दीमुळं हाच विमानतळ छोटासा भासू लागतो. पुणे विमानतळावर खरोखर एसटी स्टँडसारखी गर्दी असते. त्यात आम्हाला आधी चार नंबरचं गेट सांगितलं. ते बदलून ‘१ ए’ दिसायला लागलं. पण १ आणि १ ए ही दोन्ही गेट आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी राखीव आहेत. त्यामुळं तिथं बरीच गर्दी जमा झाली तरी दार कुणी उघडेना. मग कळलं, की आता ६ नंबरचं गेट आहे. मग पुन्हा आमची वरात खालच्या मजल्यावर असलेल्या त्या गेटवर गेली. तिथं हैदराबाद आणि बंगळुरू अशा दोन्ही फ्लाइटच्या प्रवाशांना बोलावलं होतं. त्यामुळं त्या गेटसमोर तोबा गर्दी झाली. अखेर वेगवेगळ्या रांगा करून लोकांना बसमध्ये सोडायला सुरुवात झाली. त्या बसमधून मग अखेर आम्ही विमानापाशी गेलो व त्या शिड्या चढून एकदाचे आसनस्थ झालो. विमान सुटलं मात्र वेळेवर. मध्यरात्रीच्या पुण्याचा अफाट विस्तार अन् झगमगाट डोळे दिपवणारा होता, यात शंका नाही. थोडं पुढं गेल्यावर विमानानं डावीकडं हलकेच वळण घेतलं आणि अंतराळातला अथांग अंधार कापत ते दक्षिणेस रोरावत निघालं. मधेच एक उजळलेला मोठा महामार्ग दिसला. त्यावरचे दिवे मधेच लुप्त झाले होते. त्यावरून तो कात्रजचा बोगदा असावा, असा अंदाज बांधला. पुढं विमान जसजसं उंचावर जाऊ लागलं, तसतसे खालचे दिवे अंधुक होत गेले आणि डोळ्यांतली झोप दाट! बंगळुरूपर्यंतचं ८०० किलोमीटरचं अंतर विमान अवघ्या तासाभरात कापतं. आम्ही मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी बरोबर केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. पुढचं कनेक्टिंग फ्लाइट ९० मिनिटांच्या आत असेल तर आतल्या आत एका वेगळ्या मार्गाने तुम्हाला त्या विभागाकडं जाता येतं. आम्ही बघितलं तर ते दार बंद होतं. शिवाय आमच्या पुढच्या विमानाला जवळपास तीन तास वेळ होता. मग आम्ही बाहेर पडलो. त्यामुळं पुन्हा सगळी सिक्युरिटी वगैरे करून आत जावं लागलं. अर्थात हाताशी वेळच वेळ होता. मात्र, झोपेचं खोबरं झालं होतं. आमचं गेट शोधलं आणि तिथं बघितलं तर प्रचंड गर्दी. कशीबशी तिघांना बसायला जागा मिळाली. आम्ही बसल्या बसल्याच झोप काढली. साधारण पाच वाजता आमच्या विमानाची घोषणा झाली आणि आम्ही एकदाचे पुढच्या विमानात जाऊन बसलो. हे विमानही वेळेत उडालं. बंगळुरू ते मंगळुरू अंतर ३५० किलोमीटरचं, त्यामुळं फ्लाइट अगदी अर्ध्या तासाची. मंगळुरू विमानतळावर उतरायचं म्हटल्यावर मनात त्या विमानतळावर २०१० मध्ये झालेल्या ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ विमानाच्या भीषण अपघाताची आठवण आलीच. आता तिथं काय बदल केले आहेत हे बघायची मला उत्सुकता होती. सगळा पश्चिम घाट (त्यात कूर्गही आलंच) ओलांडून आमचं विमान मंगळुरूकडं झेपावत होतं. मंगळुरूत लँडिंग सुरू झालं तसा इथला डोंगर-दऱ्यांचा, चढ-उताराचा प्रदेश डोळ्यांत भरला. मंगळुरू समुद्राकाठी असलं तरी समुद्र काही दिसला नाही. विमानतळापासून तो बराच पुढं आहे, असं नंतर कळलं. ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’चं विमान रनवेच्या ज्या दरीच्या बाजूनं कोसळलं, त्या बाजूनंच आता सगळी लँडिंग होत असावीत, असा माझा अंदाज होता आणि तो बरोबर निघाला. अगदी रनवेच्या जवळ येताना आम्ही त्या दरीवरूनच पुढं गेलो आणि क्षणभर अंगावर शहारा आला. अर्थात पुढच्या काही सेकंदांतच आमच्या विमानानं सुखरूप लँडिंग केलं आणि मी तरी हुश्श केलं. (तो विमान अपघात कसा झाला, का झाला, इथला विमानतळ लँडिंगसाठी कसा क्रिटिकल आहे, वगैरे माहितीसाठी यु-ट्यूबवर एक २३ मिनिटांची उत्तम डॉक्युमेंटरी आहे, ती जिज्ञासूंनी नक्की पाहावी.)
आम्ही अगदी साडेसहा वाजताच विमानतळावर उतरलो. हा विमानतळ अर्थात खूप छोटा आहे. आम्ही बाहेर येण्यापूर्वी जरा आन्हिकं उरकली. आमचा ड्रायव्हर अराफात आलाच होता. लगेच त्याच्या ‘टोयोटा इटिऑस’मध्ये बसून आम्ही कूर्गकडे निघालोही. आम्हाला रस्त्यात नाश्ता करायचा होता. शिवाय आमच्या हॉटेलचं चेक-इन दुपारी १ वाजता होतं. त्यामुळं आम्हाला घाई अजिबात नव्हती. मंगळुरू शहर बऱ्यापैकी मोठं आहे आणि आडवं पसरलं आहे. आता काही काही उंच इमारतीही दिसू लागल्या आहेत. बाकी नारळाची झाडं, चढ-उताराचे रस्ते असं टिपिकल कोकणी वातावरण लगेचच अनुभवण्यास मिळालं. मंगळुरू म्हणजे ‘दक्षिण कन्नड’ जिल्ह्याचं मुख्यालय. इथून आम्हाला घाट चढून कूर्गला जायचं होतं. कूर्गचं अधिकृत नाव आता ‘कोडुगू’ आहे. मडिकेरी हे गाव म्हणजे या जिल्ह्याचं मुख्यालय. मडिकेरी म्हणजेच कूर्ग. (ही सगळी महत्त्वाची माहिती तिथं जाऊन आलेल्या कुणीही मला आजतागायत सांगितली नव्हती.) मंगळुरूत उतरल्या उतरल्या दमट हवा आणि थोडा उकाडा जाणवत होता. आता आम्ही हळूहळू पूर्वेकडे आणि उंचावर निघालो होतो. कूर्ग समुद्रसपाटीपासून साधारण एक किलोमीटर उंचीवर आहे. ही उंची गाठण्यासाठी आम्हाला १३७ किलोमीटर प्रवास करावा लागणार होता. मंगळुरू ते बंगळुरू महामार्गानं आम्ही निघालो. (खरं तर मंगळुरू ते हासन... हासनला हा रस्ता मुंबई-बंगळुरू हायवेलाच मिळतो व पुढं बंगळुरूकडं जातो.) या रस्त्याचं काम गेली दहा वर्षं सुरू आहे, असं अराफात सांगत होता. पुढं एके ठिकाणी त्यानं गाडी थांबविली आणि पाण्याची बाटली विकत घेतली. तिथं चहा होता म्हटल्यावर मी चहा घेतला. विशेष म्हणजे अराफातनंच आमचे पैसे दिले. मला त्याच्या या कृतीचं आश्चर्य वाटलं व बरंही वाटलं. अराफात हा एक बडबड्या, पण पक्का प्रोफेशनल ड्रायव्हर होता. खरं म्हणजे तो मालकच होता. ही गाडी त्याची स्वत:ची होती. पुढं हायवेला एका गावात त्यानं गाडी उभी केली आणि नाश्ता करून घ्या, असं सांगितलं. आम्ही रस्त्यात त्याला मंगळुरी बन्सविषयी विचारलं होतं. त्यानं हे केटी नावाचं हॉटेल त्यासाठीच प्रसिद्ध आहे असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात त्या हॉटेलमध्ये सगळे जण गरमागरम इडली-वडा सांबार खात होते हे बघितल्यावर आम्हीही तेच मागवलं. बन्स खायचे राहूनच गेले. पुढं म्हणजे मंगळुरूपासून साधारण ४५ किलोमीटर अंतरावर मानी नावाचं छोटंसं गाव लागलं. इथं आम्ही हा हायवे सोडला आणि उजवीकडं वळलो. इथून पुढं रस्ता दुहेरी होता, पण उत्तम होता. व्यवस्थित दुभाजक आखलेले व बाजूला पिवळे पट्टे ओढलेले. हा रस्ता सिमेंटचा वाटत नव्हता, पण पांढुरका दिसत होता. बहुतेक अस्फाल्ट की काय म्हणतात तसं, प्लास्टिक मिक्स वगैरे त्यापासून केलेला असावा. जे काही असेल ते, पण रस्ता सुंदर होता. आजूबाजूला सतत डोंगर-दऱ्या होत्या आणि परिसर अतिशय हिरवागार होता. सुरुवातीला सगळीकडं रबराची उंचच उंच झाडं दिसत होती. रस्त्यात बंटवाल, पुत्तूर व सुल्या ही दोन-तीन मोठी गावं लागली.
आम्ही साधारण अकरा-सव्वाअकराच्या सुमारासच कूर्गमध्ये शिरलो. अराफात आम्हाला आधी एका कॉफी प्लँटेशनमध्ये घेऊन गेला. म्हणजे तिथं गेल्यावरच आम्हाला ते कळलं. इथं अर्धा-पाऊण तासाची एक टूर असते, ती तुम्ही करून घ्या, असं तो म्हणाला. तिथं विचारलं तर २०० रुपये प्रत्येकी असं तिकीट होतं. तिकिटाचं काही नाही, पण आम्ही सलग प्रवास करून आल्यामुळं दमलो होतो. त्यात दुपारच्या वेळी त्या प्लँटेशनमध्ये अर्धा-पाऊण हिंडायची आमच्यात एनर्जीच नव्हती. म्हणून आम्ही त्याला तसं सांगितलं व तिथून निघालो. त्यावर तो जरा खट्टू झाला. कारण आमच्या हॉटेलपासून पुढं तो आम्हाला घेऊन आला होता, हे नंतर कळलं. अर्थात आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम राहिलो आणि आधी हॉटेलवरच घेऊन चल, असं स्पष्ट सांगितलं. आम्ही ‘हॉटेल अल्टिट्यूड’ इथं पोचलो तेव्हा बारा वाजले होते. तिथं रिसेप्शनला सांगितल्यावर त्यांनी आम्हाला थोडा वेळ थांबायला सांगितलं. मग आम्ही हॉटेलच्या लॉबीतच थांबलो. थोड्याच वेळात त्यांनी आमची रूम ताब्यात दिली. रूम व एकूण व्यवस्था चांगली होती. रस्त्याच्या बाजूनं उघडणारी एक मोठी बाल्कनी होती. तिथून समोरचा रस्ता आणि पुढचे डोंगर दिसत होते. आम्ही थोड्या वेळानं आवरून त्या हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये जेवलो. जेवण चांगलं होतं.
आम्ही ड्रायव्हरला पाच वाजता यायला सांगितलं होतं. आधी तो उद्या सकाळीच भेटू असं म्हणाला होता. मात्र, आमच्या कार्यक्रमपत्रिकेत आज दोन ठिकाणं लिहिलेली होती. ती आम्हाला आजच पाहायची होती. त्यामुळं आम्ही त्याला पाच वाजता यायला सांगितलं. त्यानुसार तो आलाही. आम्ही मग तिथून आधी ओंकारेश्वर मंदिरात गेलो. मडिकेरी गावाच्या मध्यभागी हे मंदिर आहे. दाक्षिणात्य पद्धतीनुसार, मंदिरासमोर एक मोठं पाण्याचं कुंड होतं. पलीकडं हनुमानाचं मंदिर होतं. त्या दिवशी हनुमान जयंती होती, त्यामुळं त्या मंदिरात जरा गर्दी होती. आम्हीही तिथं जाऊन मारुतीरायाचं दर्शन घेतलं. मग नंतर मुख्य मंदिरात गेलो. बाहेरच ‘ड्रेसकोड’चा बोर्ड होता. सर्व लोक त्या कोडचं पालन करत होते. दर्शन घेऊन बाहेर आलो. आता आम्हाला ‘राजाज सीट’ नावाच्या ठिकाणी जायचं होतं. हे एक उद्यान होतं. तिथं पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. सुंदर हवा होती. छान वारं सुटलं होतं. त्या बागेत बरीच गर्दी होती. सुट्टीचा दिवस होता. त्या मुख्य पॉइंटवर अनेक बाक ठेवले होते. पण बसायला जागा नव्हती. शेवटी आम्हाला एके ठिकाणी जागा मिळाली. हा सनसेट पॉइंट होता. मात्र, आकाश ढगाळलेलं असल्यानं सूर्यास्त थेट बघायला मिळणार नव्हता. पण तिथं बसूनच छान वाटत होतं. समोर खोल दरी आणि त्यापलीकडं मोठमोठे, लांबवर पसरलेले डोंगर असं दृश्य छान दिसत होतं. नंतर त्या बागेत चालत फिरलो. तिथं डायनासोर, हत्ती, अजगर वगैरै बरेच प्राणी पुतळ्यांच्या रूपात उभे करून ठेवले होते. मधोमध एक कारंजंही होतं. पण ते बंद होतं. बाहेर आलो. तिथं खाऊगल्ली होतीच. एके ठिकाणी द्रोणात भेळ मिळत होती, ती घेऊन खाल्ली. वेगळीच चव लागली. नंतर आमच्या ड्रायव्हरला म्हटलं, कुठं तरी चहा-कॉफीला जाऊ या. मग त्यानं त्या गावात ‘अंबिका उपाहारगृह’ नावाच्या हॉटेलात गाडी नेली. तिथं आम्ही चहा-कॉफी तर घेतलीच, पण शेजारीच एका कुटुंबानं मंगलोरी बन्स घेतलेले बघितल्यावर मला सकाळी हुकलेल्या त्या बन्सची आठवण आली. मग आम्हीही ते बन्स मागवले व खाल्ले. मी पूर्वी गोव्यात पणजीतल्या ‘कॅफे भोसले’मध्ये हे बन्स खाल्ले होते. त्यानंतर थेट आज इथं. नील व धनश्री पहिल्यांदाच खात होते. दोघांनाही ते आवडले. इथंच खाली मसाल्यांची व कूर्गच्या प्रसिद्ध ‘होम मेड चॉकलेट्स’ची दुकानं होती. मग तिथं खरेदी झालीच. साधारण सात वाजताच अराफातनं आम्हाला हॉटेलवर सोडलं. नंतर आम्ही सरळ ‘आयपीएल’ची मॅच पाहत बसलो. संध्याकाळी पुण्याहून परांजपेंचा फोन आला. त्यांनी दिवसभरात आम्ही काय काय केलं, आमचं सर्व व्यवस्थित सुरू आहे ना, याची चौकशी केली. रात्री फारशी भूक नव्हतीच. खाली रेस्टॉरंटमध्ये जाऊन मस्त दाल-खिचडी खाल्ली व वर येऊन लवकर झोपलो. त्यापूर्वी परांजपेंचा मेसेज आला, की उद्या अराफात नसेल. त्याऐवजी दुसरा ड्रायव्हर येईल. आम्हाला कळेचना, की असं का? दिवसभर तर हा आमच्याबरोबर होता. काही बोलला नाही. परांजपे म्हणाले, की त्याला कुठं तरी जायचंय. त्यामुळं उद्या दुसरा ड्रायव्हर येईल. परवापासून परत अराफात असेल. मला साधारण दहा वाजताच झोप आली. आदल्या दिवशी अजिबात झोप झाली नव्हती. त्यामुळं झोपेची गरज होतीच...
जे झोपलो ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता जाग आली. बाल्कनीत गेलो अन् समोरचं दृश्य पाहून थक्क झालो...
(क्रमश:)
-----------------
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
------------
हा लेख वाचून कुर्गला जाण्याचं ठरवावसं वाटतंय. पण मे महिना टाळणं योग्य होईल ना?
ReplyDeleteनक्की जा. हाच सीझन असतो. फक्त सीझनमुळे जी गर्दी असते, त्यामुळे थोडं महाग पडू शकेल.
Deleteमस्त वर्णन ...सावकाश वाचल पाहिजे आणि तिथे नक्की जायलाच पाहिजे
ReplyDelete