30 May 2025

जयंत नारळीकर आठवणी

 ‘प्रोफेसर’ जयंत विष्णू नारळीकर...
-------------------------------------------

प्रा. जयंत नारळीकर गेले! २० मे २०२५ रोजी पहाटे झोपेतच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. तसे ते गेले काही महिने आजारीच होते. पण ते ‘आहेत’ ही भावनाही पुरेशी असायची. असं अगदी थोड्या लोकांबाबत मला वाटून गेलंय. पु. ल. असतील, भीमसेन जोशी असतील किंवा लतादीदी असतील... या सर्वांच्या बाबतीत त्यांच्या शेवटच्या काळात असंच वाटायचं, की ते ‘आहेत’ हीच भावना केवढी पुरेशी आहे! आपण ज्या आसमंतात वावरतो आहोत, ज्या हवेत श्वास घेत आहोत त्याच हवेत तेही श्वास घेत आहेत, आपण ज्या शहरात राहतोय तिथंच तेही राहताहेत किंवा आपल्यापासून जवळपासच राहताहेत ही भावना फार सुंदर असायची. प्रा. जयंत नारळीकर गेले तेव्हाही असंच वाटून गेलं.
खरं तर जयंत नारळीकर सरांशी थेट संबंधित अशा माझ्या अगदी दोन-तीनच आठवणी आहेत. सर्वांत महत्त्वाची आठवण म्हणजे माझी पहिली मोठी बातमी वृत्तपत्रात छापून आली ती नारळीकरांच्या व्याख्यानाची होती. मी तेव्हा नगरला ‘लोकसत्ता’त प्रूफरीडर म्हणून काम करत होतो. ‘कॉलेज पोर्च’ नावाचं एक सदर माझ्याकडं देण्यात आलं होतं. त्यात कॉलेजांमधल्या घटना-घडामोडी संकलित करणे किंवा काही प्रसंगी कॉलेजांमध्ये जाऊन रिपोर्टिंग करणे असं स्वरूप होतं. आमचे गुरुजी सतीश कुलकर्णी यांनी मला हे काम दिलं होतं. एका अर्थाने माझ्या पुढच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची पायाभरणीच सुरू होती म्हणा ना! तर बहुतेक १९९६ असेल, नगर कॉलेजात नारळीकरांचं व्याख्यान होतं आणि ते कव्हर करायला मला पाठवण्यात आलं. मला अर्थातच आनंद झाला. मी कॉलेजमध्ये गेलो. तो एक मोठा वर्ग होता व समोर बेंचवर मुलं बसली होती. मीही त्यांच्यातच बसून ते व्याख्यान ऐकलं व तडक ऑफिसला निघून आलो. कार्यक्रमानंतर इतर पत्रकार त्यांना भेटले असतील, अनौपचारिक गप्पा झाल्याही असतील. पण तेव्हा मला काही ते सुचलं नाही. मात्र, मी लिहिलेली बातमी ‘लोकसत्ता’त चांगली चार कॉलमी छापून आली. ‘परग्रहांवरही जीवसृष्टीचे अस्तित्व शक्य’ असं काही तरी शीर्षक होतं, एवढंच आता आठवतंय. छापून आलेली प्रत्येक ओळ मी फायलीत कापून. जपून ठेवायचो. तशी ही बातमीही किती तरी दिवस जपून ठेवली होती. कदाचित अजूनही असेल...
मधे बरीच वर्षं गेली. मी पुण्यात ‘मटा’त रुजू झालो होतो. साधारण २०१२-१३ मध्ये मी त्यांचं ‘चार नगरांतले माझे विश्व’ हे आत्मचरित्रपर पुस्तक श्रीधर लोणी यांच्याकडून घेऊन वाचलं आणि ते वाचून मी चांगलाच प्रभावित झालो. त्याच काळात त्यांची पंचाहत्तरी येत असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि यानिमित्त आपण त्यांची मुलाखत घ्यावी, असं मी आमच्या संपादकीय बैठकीत सुचवलं. त्यानुसार तेव्हाचे चीफ रिपोर्टर आशिष पेंडसे व मी अशा दोघांनी जाऊन ही मुलाखत घ्यावी, असं ठरलं. पेंडसे दीर्घकाळ विद्यापीठ व शिक्षण बीट बघत असल्यानं त्यांचा नारळीकर सरांशी चांगलाच परिचय होता. मग आम्ही रीतसर सरांची वेळ घेऊन त्यांच्या घरी गेलो व ती मुलाखत घेतली. ही माझी खऱ्या अर्थाने त्यांच्याशी झालेली पहिली, मोठी भेट. सरांनी आम्हाला भरपूर वेळ दिला. तेव्हा स्मार्टफोन व त्यातल्या कॅमेऱ्याचं प्रस्थ फारसं नव्हतं. त्यामुळं आम्ही काही त्यांच्यासोबत आमचा फोटो काढला नाही. मंगलाताई तेव्हा घरी नव्हत्या. (जयंत नारळीकर व मंगलाताई यांचं सहजीवन पाहून मला नेहमीच पु. ल. व सुनीताबाईंची आठवण होते. नंतर नारळीकरांबाबत अनेकांनी सोशल मीडियावर जे लिखाण केलं, त्यात हाच उल्लेख केलेला पाहून माझं ते वाटणं अगदीच चुकीचं नव्हतं, याची खातरी पटली.) तेव्हाची आणखी एक गंमत अजून लक्षात आहे. नारळीकरांच्या दारात पुठ्ठ्याचं एक साधं घड्याळ केलं होतं. अगदी पूर्वी लहान मुलं विज्ञान प्रदर्शनात वगैरे करायची तसं. त्या घड्याळात शून्य लिटर, अर्धा लिटर, एक लिटर, दीड लिटर व दोन लिटर असं लिहिलं होतं आणि त्याप्रमाणे तो काटा त्यावर ठेवला जाई. (आम्ही गेलो तेव्हा काटा एकवर होता.) ते घड्याळ पाहून मला तेव्हा खूप मजा वाटली होती, हे खरं.
नंतर आम्ही वारज्यात राहत असलेल्या ईशाननगरीजवळ अचानक त्यांचं व्याख्यान असल्याचं मला समजलं. हे साधारण २०१६ असावं. त्या व्याख्यानाला अर्थातच अलोट गर्दी झाली होती. पण आमचीच सोसायटी असल्यानं पदाधिकाऱ्यांना सांगून मी नारळीकर सरांना भेटलो. आधीच्या भेटीची आठवण करून दिली. तेव्हा मी लोणी सरांकडून ‘चार नगरांतले माझे विश्व’ची प्रत बहुतेक परत मागून घेतली. (याचं कारण, नारळीकर सर एरवी नुसती स्वाक्षरी देत नसत. एक तर त्यांच्या पुस्तकावर देत असत किंवा मुलांनी मागितली, तर ते त्यांना पोस्टकार्डवर एक विज्ञानविषयक प्रश्न विचारायला सांगत व त्याला उत्तर म्हणून कार्ड पाठवत व त्यावर स्वाक्षरी करत असत.)  माझ्याकडं ती प्रत असल्यानं मला त्यांनी पहिल्या पानावर स्वाक्षरी दिली, हे सांगणे न लगे. या भेटीच्या वेळी नील लहान होता. या वेळी मात्र मी नारळीकरांसोबत त्याचा फोटो आवर्जून काढून घेतला.
लोणी सरांचा व सरांचा दीर्घकाळ परिचय होता. लोणी सर ‘सकाळ’मध्ये वृत्तसंपादक असताना नारळीकर सरांचे काही लेख आम्ही प्रसिद्ध केले होते, तेव्हा ‘सरांना त्यांच्या नावामागे ‘डॉ.’ लावलेलं फारसं आवडत नाही; त्याऐवजी ‘प्रा.’ लिहीत जा,’ असं लोणी सर डेस्कवरील सर्वांना आवर्जून सांगायचे.
केंब्रिजमध्ये शिकलेल्या नारळीकरांना ‘प्रोफेसर’ या शब्दाची महती चांगलीच ठाऊक होती. आपण त्याला मराठीत समानार्थी असलेला ‘प्राध्यापक’ हा शब्द फारच कॅज्युअली वापरतो. केंब्रिजमध्ये असलेल्या अनेक नोबेल विजेत्या प्रोफेसरांएवढंच मोठेपण नारळीकर सरांकडं होतं, हे निर्विवाद. या मोठेपणाचं ओझं त्यांना कधीही झालं नाही. ‘विद्या विनयेन शोभते’ हे सुभाषित त्यांना अगदी शोभून दिसे. एवढ्या उत्तुंग उंचीच्या माणसांच्या सहवासात काही क्षण जरी घालवले तरी त्या सहवासाचा कस्तुरीसारखा सुगंध आपलं आयुष्य दरवळून टाकतो. विज्ञाननिष्ठा आणि तर्कशुद्ध विचारांची जोपासना करत राहणं हीच प्रा. नारळीकरांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

---

No comments:

Post a Comment