शून्य गढ़ शहर...
--------------------
आठ एप्रिल. पं. कुमार गंधर्व यांचा वाढदिवस. त्या दिवशी सकाळी चालताना मग कुमारजींचं काही तरी ऐकणं अपरिहार्यच होतं. मी माझं आवडतं भजन लावलं - शून्य गढ शहर बस्ती... हे भजन मी पहिल्यांदा केव्हा ऐकलं हे आता आठवत नाही. मात्र, पहिल्यांदा ऐकलं तेव्हापासून या भजनानं माझ्या मनावर एक निराळंच गारूड केलं आहे. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमासाठी ट्रेननं मी इंदूरला निघालो होतो. संध्याकाळी पाच-साडेपाचचा सुमार असेल. पाऊस नव्हता, पण हवा पावसाळी होती. देवास स्टेशन आलं. तिथं उतरता येणं तर शक्य नव्हतं, पण नजर भिरभिरत राहिली. कुमारांचं घर याच परिसरात असेल. इथल्याच हवेत त्यांनी श्वास घेतला असेल... बाहेर गव्हाची हिरवीगार शेतं दिसत होती. मध्येच सूर्यदर्शन होत होतं आणि त्या संध्याकाळच्या उन्हात ती हिरवीगार शेती चमकत होती. मला एकदम ‘शून्य गढ़ शहर...’ आठवलं. मी यू-ट्यूबवर ते भजन लावलं आणि इअरफोन लावून ऐकू लागलो. ट्रेनच्या खिडकीतून मागं पळणारी शेती, झाडं दिसत होती. एका लयबद्ध वेगानं ट्रेन चालली होती. त्यात केवळ तानपुरा आणि तबल्याच्या साथीनं कुमारजींनी म्हटलेलं ‘शून्य गढ़ शहर...’ ऐकणं हा खरोखर एक वेगळ्याच प्रकारचा आध्यात्मिक अनुभव होता. ते भजन ऐकताना मला गुंगीच आली. पुढं किती तरी दिवस कुमारांचे ते स्वर आणि त्या हलत्या रेल्वेतला मी मलाच आठवत राहिलो होतो...
हे भजन पुढीलप्रमाणे -
शून्य गढ़ शहर शहर घर बस्ती,
कौन सोता कौन जागे है
लाल हमारे हम लालन के,
तन सोता ब्रह्म जागे है...
जल बिच कमल, कमल बिच कलिया,
भंवर बास ना लेता है
इस नगरी के दस दरवाजे,
जोगी फेरी नीत देता है...
तन की कुंडी मन का सोटा
ग्यान की रगड लगाता है
पांच पचीस बसे घट भीतर,
उनकू घोट पिलाता है...
अगन कुंडसे तपसी तापे,
तपसी तपसा करता है
पांचो चेला फिरे अकेला,
अलख अलख कर जपता है...
एक अप्सरा सामें ऊभी जी
दूजी सुरमा हो सारे है ||
तिसरी रंभा सेज बिछाये,
परण्या नहीं कुंवारा है...
परण्या पहिले पुतर जाया,
मात पिता मन भाया है
शरण मछिंदर गोरख बोले,
एक अखंडी ध्याया है...
आपल्यापैकी बहुतेकांना ही रचना माहितीच असेल. गोरक्षनाथांनी लिहिलेली ही रचना विलक्षण आध्यात्मिक पातळीवरचा अनुभव देते. शरीराला एका नगराची उपमा देऊन गोरक्षनाथांनी हे भजन रचले आहे. याचा अर्थही किती सुंदर आहे. शरीरापलीकडच्या ब्रह्मस्वरूपाची, त्या चेतनेची आठवण करून देणारं हे भजन आपल्या आध्यात्मिक परंपरेची लखलखीत मोहोर आपल्या मनावर उमटवून जातं.
इंटरनेटवर या भजनाविषयी अधिक माहिती घेता, कुणा महेश बडगुजर नावाच्या व्यक्तीने २०१५ मध्ये लिहिलेला एक लेख सापडला. त्यात त्यांनी या भजनाचा अर्थ अगदी सुरेख पद्धतीने उलगडून सांगितला आहे. तो अतिशय वाचनीय आहे. त्यामुळे त्यांच्याच शब्दात द्यायचा मोह आवरत नाही. तो येणेप्रमाणे -
(महेश बडगुजर लिहितात -
ही रचना आहे गोरक्षनाथांची. शरीराला एका नगरीची उपमा देत गोरक्षनाथांनी ही रचना केली असली तरी त्यात मांडण्यात आले आहे ते विश्वाचे ब्रह्मस्वरूपच. या शरीराचे रक्षण सहस्रदलकमल एखाद्या गडकोटासारखे करते. त्यात आत्मा वास करून असतो. अशी शरीरधारी काही माणसे जागी आहेत म्हणजेच त्यांना ब्रह्मज्ञान झाले आहे तर काही निद्रिस्त आहेत म्हणजेच अज्ञानात बुडून गेली आहेत, असे गोरक्षनाथ सांगतात. ‘लाल’ म्हणजेच परमेश्वर किंवा ब्रह्म. तो आणि आपण एकच असे अद्वैत येथे गोरक्षनाथ मांडतात. या शरीराचे दहा दरवाजे म्हणजेच प्रत्येकी दोन डोळे, नाकपुड्या, कान, गुह्येंद्रिये आणि एक मुख व एक ब्रह्मरंध्र. प्रलोभने आणि वासनांची हीच प्रवेशद्वारे. योगी या दरवाजांवर शरीराचीच (दरवाजाची) कडी आणि मनाचा सोटा हाती घेऊन पहारा देत असतो, असे गोरक्षनाथ सांगतात. पंचमहाभूते, त्यांनी बनलेली पंचवीस तत्त्वे यांचे हे शरीर. त्यांना साधनेचे घोट पाजण्याची तपस्या तपस्व्याला करावी लागते. पंचमहाभूते ही तर खऱ्या, सच्च्या तपस्व्याची शिष्येच. पण सच्चा योगी त्यांच्यापासूनच अलिप्त राहतो यावर गोरक्षनाथांचा भर आहे. अविद्या, विद्या, आत्मा या तिन्ही अप्सरा. माणसाला मोहवणाऱ्या. या तिन्ही प्रियतम परमेश्वरापाशीच आहेत. म्हणजेच ब्रह्म ब्रह्मचारी नाही तर आपल्या प्रियेसोबतच आहे असे गोरक्षनाथ सांगून जातात. या विश्वाची निर्मिती करून प्रकृती आणि पुरुष या मातापित्यांना आनंद देणाऱ्या या निर्गुण, निराकार ब्रह्माचेच आपण चिंतन करतो, असे सांगत गोरक्षनाथ समस्त मानववर्गाला तेच करण्याचा उपदेशही देत असतात.)
हे वाचल्यानंतर, हा अर्थ उमगल्यानंतर हे भजन ऐकणं हा आनंद विशेष आहे.
असंच आणखी आवडणारं भजन म्हणजे - उड जाएगा हंस अकेला...
त्याविषयी पुन्हा केव्हा तरी...
----
हे भजन ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
----
दोन गाणी - दोन आठवणी हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
------
No comments:
Post a Comment