17 Jul 2024

एक सदर - एक प्रयोग, दोन लेख

एक सदर - एक प्रयोग, दोन लेख
---------------------------------------

विशेष नोंद - 

‘मटा’मध्ये दोन वर्षांपूर्वी संपादकीय पानावर ‘जाता जाता’ हे सदर ‘चकोर’ या टोपणनावाने प्रसिद्ध होत असे. वेगवेगळे संपादकीय सहकारी ते लिहीत असत. मीही अनेकदा ते लिहिले आहे. खाली दिलेला पहिला भाग मी आमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्यानंतर काही मैत्रिणींनी गमतीत अशी तक्रार केली, की ही तर एकच (म्हणजे पुरुषांची) बाजू आहे. आम्ही लिहू का आमची बाजू? त्यावर मीही गमतीनं म्हटलं, की तुम्ही कशाला? मीच लिहितो. मग मी त्या ग्रुपपुरता एक मजकूर लिहिला आणि तिकडं शेअर केला. त्यात सदराचं नाव ‘येता येता’ असं ठेवलं आणि लिहिणारीचं नाव ‘चकोरी’ झालं. त्यालाही चांगला प्रतिसाद म्हणाला. स्त्रीच्या भूमिकेतून आपण तसा विचार करू शकतो का, याची ही एक चाचणी होती. हा परकाया प्रवेश अवघड असला, तरी अशक्य नव्हता. आता दोन वर्षांनंतर मला वाटलं, की ही गंमत अधिक जास्त वाचकांपर्यंत पोचावी, म्हणून दोन्ही लेख इथं ब्लॉगवर प्रकाशित करतोय. आधी मूळ सदरातील लेख, नंतर त्याला ग्रुपपुरतं दिलेलं उत्तर... एंजॉय...

-------------


जाता जाता
--------------

एक आदिम साहसी खेळ
-----------------------------------

साहसी खेळांच्या यादीत लग्नाचाही समावेश करावा, अशी मागणी कधी एकदा होतेय याचीच आम्ही वाट बघत होतो. एक दीर्घानुभवी पती असल्यानं आम्ही स्वत: ही मागणी करणं शक्यच नव्हतं, हे चाणाक्ष (अन् अनुभवी) वाचकांच्या लक्षात आलंच असेल. अखेर व्हॉट्सअप मेसेजेस स्क्रोल करता करता ‘तो’ मेसेज दिसला अन् गुदगुल्या झाल्या. ‘लग्नालाही साहसी खेळ’ म्हणून मान्यता द्या, अशी अतिसाहसी मागणी त्या कथित विनोदी संदेशात होती. आम्हाला मात्र ही मागणी विनोदी आहे, असं म्हणवत नाही. लग्न हा साहसी खेळच आहे, यात शंका नसावी. या खेळाची वैशिष्ट्यं अगणित आहेत. जगातील बहुसंख्य लोक आयुष्यात किमान एकदा तरी हा खेळ खेळतात. या खेळात जोडीदार बदलण्याची संधी (सहसा) नसते. निवडण्याची जरूर असते; मात्र एकदा निवडला, की त्या जोडीदारासोबतच पुढं आयुष्यभर हा खेळ खेळावा लागतो. बहुतेकांना खूप लहानपणापासून या खेळासाठी तयार केलं जातं. घरी पालकांचा ओरडा आणि शाळेत शिक्षकांचा दणका यांतून आपण या खेळासाठी टणक होत जातो. आपल्या अंगी अधिक सोशिकता यावी, यासाठी परीक्षादी उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या खेळात भाग घेण्यापूर्वी काही गोष्टींची पूर्तता करणं अगदी गरजेचं असतं. दर महिना काही विशिष्ट रकमेच्या दमड्या कमावणं आणि किमान चार खोल्यांचा फ्लॅट असणं, या त्या बेसिक अटी होत. या अटी पूर्ण होईपर्यंतच खेळाडूंचं निम्मं अवसान गळालेलं असतं. मात्र, अशा खेळाडूचे पालक जोशात असतात. ते कोंबड्यांची झुंज लावावी, त्याप्रमाणे आपल्या अपत्याला या साहसी खेळात भाग घ्यायला उतरवतातच. एक मन नको म्हणत असतं; मात्र काही ‘बेसिक इन्स्टिंक्ट’ना बळी पडून खेळाडू अखेर या खेळाच्या मैदानात उतरतोच. खेळाडू एकदा तयार झाला, की लाखो रुपये खर्च करून मोठा सोहळा आयोजित केला जातो. देवा-ब्राह्मणांच्या आणि (किरकोळ आहेराच्या बदल्यात) फुकटचं जेवण झोडायला आलेल्या गावभरच्या पाहुण्यांच्या साक्षीनं खेळाडू आपल्या जोडीदाराबरोबर गळ्यात हार घालून घेतो. खेळाच्या सुरुवातीलाच त्याच्या वाट्याला ‘हार’ नावाचा हा प्रकार येतो, तो पुढं आयुष्यभर कायम राहणार असतो. बहुतेक (पुरुष) खेळाडू त्या वेळी बावळट असल्यानं, त्यांना याची काहीही कल्पना नसते. लाखो रुपये खर्च करूनही ते वेड्यासारखे हसत फोटो काढून घेत असतात. (पुढं आयुष्यभर या प्रसंगाचे हृदयद्रावक फोटो बघून त्यांना रडायचंच असतं.) अनेक पुरुष खेळाडूंचा हा बावळटपणा पुढं अनेक वर्षं टिकतो. काही गडी मात्र स्मार्ट असतात. ते पहिल्यापासून आपण बावळट किंवा येडछाप असल्याचं सोंग घेतात आणि ते आयुष्यभर निभावतात. हे सोंग एकदा जमलं, तर या साहसी खेळात त्यांना पुढं बऱ्यापैकी गंमत येऊ लागते. तसे या खेळाचे नियम अगदी सोपे असतात. आपल्या पत्नी नामक जोडीदारासमोर कायम नतमस्तक होऊन राहणं आणि तिनं काहीही विचारलं, की वरपासून खालपर्यंत मुंडी हलवणं ही एक शारीरिक क्रिया करणं, एवढं केलं की खेळ जमतोच. आयुष्यभर माणसाला ‘होय होय’ करायला लावणारा एवढा सकारात्मक खेळ दुसरा नसेल. अशा या खेळाप्रति आणि खेळाडूंप्रति समाजानं कायम सहानुभूती बाळगली पाहिजे.

- चकोर

(मटा, २३-८-२०२२)

---

येता येता...

---------------

साहसे ‘श्री.’ प्रतिवसति...
---
-------------------------------

साहसी खेळांच्या यादीत लग्नाचाही समावेश करावा, अशी मागणी कधी एकदा होतेय याचीच मी वाट बघत होते. एक दीर्घानुभवी बायको असल्यानं आपणच ही मागणी करावी, असं कालपास्नं सारखं वाटत होतं. पण मेल्या भिशी ग्रुपच्या वस्साप गप्पांतून सवड ती कशी होईना! अखेर आमच्या शाळेच्या ग्रुपवर ‘तो’ मेसेज पडलाच. खुदुखुदू हसू लागले. ‘लग्नालाही साहसी खेळ म्हणून मान्यता द्या,’ अशी मागणी त्या कथित विनोदी संदेशात करण्यात आली होती. मला मात्र ही मागणी विनोदी आहे, असं काही म्हणवत नाही. लग्न हा साहसी खेळच आहे, यात शंका नसावी. माझंच बघा. चांगली डिग्री होईपर्यंत सुखात होते. आई-बाबांच्या लाडाकोडात वाढत होते. ते घरी आणि कॉलेजमधले गोंडाघोळू मित्र बाहेर काही कमी पडू देत नव्हते. कॉलेजात तर ‘चकोरी कॉलेजक्वीन’ असं कुणी कुणी नालायक लिहूनही ठेवायचं भिंतीवर... तेव्हा ‘किशन कन्हैया’तलं ‘चंदा पे चकोरी क्यूं हो हो हो होती है कुरबान’ हे गाणं फेमस होतं. त्या दंताळ्या गण्यानं मला फिशपॉंड टाकला होता त्यावरून! नंतर चप्पल दाखवलीन् त्याला... असे सुखाचे दिवस चालले होते. पण आई-बाबांना हे सुख बघवेना. माझा मंगळ कडक असावा बहुतेक. पोरीनं लव्ह मॅरेज करावं, म्हणून आईनं सगळे देव पाण्यात घातले होते. पण त्यात मदनदेव नसावा. शिवाय तिला दासबोधाचं वेड! मग कसलं होतंय आमचं लव्हमॅरेज? झालं. ते ‘चहा-पोहे’ नावाचं महाबंडल प्रकरण आयुष्यात आलं. काय एकेक नग आले होते देवा... दर वेळी आमच्याकडच्या रोहिणीमावशीनं केलेले पोहे मी त्या पोरट्यासमोर नेऊन आदळायची आणि ते येडं ‘छान चव आहे तुमच्या हाताला’ म्हणत कोमट हसायचं. मी इकडं इतकी फुटायचे! सावरून घेता घेता आईची पुरेवाट व्हायची. अखेर आईचा त्रागा बघवेना आणि बाबांच्या सिग्रेटी वाढत चालल्या तसा मी एक ‘चि. श्याम’ पसंत करून टाकला. धुमधडाक्यात लग्न लागलं. हे पहिलं साहस! हनीमूनला प्रथेप्रमाणे गोव्याला गेलो. आमचा चि. श्याम खरोखर ‘चि. श्याम’ होता, हे मला पहिल्याच रात्री कळलं. तेव्हापासून आमच्या संसाराच्या ड्रायव्हिंग व्हीलवर मीच बसल्ये आहे. हे दुसरं साहस! आज १२ वर्षं झाली. श्यामरावांना हनीमूनमधली गंमत लवकरच कळली आणि आमच्या संसारवेलीवर ‘बकुळ’ फुलली. मला मुलगीच हवी होती. आमच्या ‘ललिता पवारां’ना आम्हाला अजून पोरगं व्हायला हवं होतं म्हणे. आता याला दु:साहस म्हणायचं नाही तर काय! मी बरी खमकी होते आणि ‘ललिताबाईं’ना लवकरच बाप्पानं तिकडं बोलावून घेतलं आणि आम्ही सुटलो. तेव्हापासून किराणा यादीपासून लाइट बिलापर्यंत आणि इस्त्रीच्या कपड्यांपासून ते बकुळच्या डब्यापर्यंत मीच सगळा गाडा ओढत्ये आहे. श्यामराव भिडस्त असले तरी कधी मूडमध्ये आले, की घरातल्या घरात मला ऑर्डरी सोडतात. एका कामाला हात म्हणून लावत नाहीत. त्यांच्या गादीला मी राजगादी म्हणते. श्यामरावांना त्यातही एक कोमट आनंद होतो. बाकी त्यांना एकूण ‘हे’ कमीच. एवढी दमले, तरी बाबा कधी अर्धा कप चहा विचारणार नाही. मलाही अपेक्षा नाहीच म्हणा! एकूण आमचा संसार हॉट नसला, तरी ‘कोमट’ तरी आहे. बाकी मैत्रिणींच्या संसाराचे काय धिंडवडे निघालेत ते आमच्या ‘टवाळ टवळ्या’ ग्रुपवर कळतंच. मी आपलं ध्यान पदरी पडलं पवित्र झालं म्हणत्ये आणि बकुळच्या (आगामी) संसाराची चित्रं रंगवत बसते. बकुळनं तरी प्रेमविवाह करावा अशी माझी इच्छा आहे. मी सगळ्या इच्छा मारत मारत जगले, तसं तिचं होऊ नये. थोडक्यात, बाईमाणसाची आयुष्यभर सत्त्वपरीक्षा पाहणारा हा साहसी खेळ नाही, असं कोण म्हणेल? या साहसातच आमचे ‘श्री’ वस्ती करून राहताहेत ना! ‘साहसे श्री प्रतिवसति’ ही संस्कृत म्हण तिथूनच आली असली पाहिजे. ते काही का असेना, मला वाटतं, की या खेळाप्रति आणि माझ्यासारख्या सोशिक खेळाडूंप्रति समाजाने कायम सहानुभूती बाळगली पाहिजे.

- चकोरी

---

No comments:

Post a Comment