20 Apr 2025

कूर्ग ट्रिप १२-१५ एप्रिल २५ (भाग ३)

कावेरीच्या उगमापासून कॉफीच्या बियांपर्यंत...
-------------------------------------------------------


कूर्ग, १४ एप्रिल २५

आज ब्रेकफास्ट झाल्यावर बरोबर नऊ वाजता अराफात हॉटेलपाशी आला. आम्ही लगेच निघालो ते तलकावेरीला. हे कावेरी नदीचं उगमस्थान. मडिकेरीपासून साधारण ४५ किलोमीटर अंतर. आठ किलोमीटर आधी त्रिवेणी संगम लागतो. आम्ही मंगळुरू रस्त्याकडे निघालो. आम्हाला परवा येताना तलकावेरीकडं जाणाऱ्या रस्त्याची मोठी कमान दिसली होती. मडिकेरीपासून साधारण सात-आठ किलोमीटर अंतरावर हा फाटा आहे. आम्ही तिकडं वळलो. आतला रस्ता आतापर्यंतच्या रस्त्यांच्या तुलनेनं थोडा लहान व काही काही ठिकाणी जरा खराब होता. अराफात सारखा म्हणत होता, की इकडं यायचं तर अगदी सकाळी सहा वाजता निघायला पाहिजे. त्या रस्त्यावर मस्त वातावरण असतं. क्वचित धुकं वगैरेही असतं. अर्थात आम्ही नऊ वाजता निघालो असल्यानं थोड्याच वेळात ऊन चांगलंच तापलं आणि काचा बंद करून कारमधला एसी सुरू करावा लागला. तलकावेरीकडं जाणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी निसर्गानं अक्षरश: सौंदर्याची उधळण केली होती. डोंगरदऱ्या, उतारावर घनदाट झाडी, छोटी छोटी गावं, मंगलोरी कौलं घातलेली टुमदार घरं असं ते सगळं दृश्य म्हणजे कुठल्याही चित्रकारासाठी पर्वणीच. (मध्येच बोलताना मंगलोरी कौलांचा विषय निघाला, तर अराफात म्हणाला, की आम्हीही इकडं त्याला कौलं असंच म्हणतो.) 
साधारण तास-सव्वा तासानं आम्ही त्रिवेणी संगमापाशी पोचलो. इथं बागमंडला मंदिर आहे. त्रिवेणी संगमावर आता मोठा पूल झाला आहे. इथं कावेरी, कनिके व संज्योती (गुप्त) या नद्यांचा संगम आहे. कावेरीच्या उगमापासून हे स्थान अगदी जवळ असल्याने इथं नदीचं पात्र अगदी लहान होतं. दुसरी नदीही लहान होती. त्यामुळं तो त्रिवेणी संगमाचा परिसर तसा अगदी छोटा होता. तिथं टुमदार घाट बांधलेला होता. आम्ही तिथं जाऊन पाण्यात पाय भिजवले. काही काही भाविक पाण्यात उतरून स्नान करत होते. बाजूला दोन छोटी मंदिरं होती. ऊन रणरणायला लागलं असलं, तरी एकूण तो परिसर रमणीय होता. आम्ही तिथून मग बागमंडला मंदिरात गेलो. इथं बाहेर चपला काढण्यासाठी स्टँड होते आणि सगळीकडं एका जोडाला तीन रुपये असा स्टँडर्ड दर होता. शिवाय प्रत्येक ठिकाणी यूपीआयचा स्कॅनरही असायचा. इथंही बाहेरच ड्रेसकोडचा बोर्ड होता. आत मोबाइलवरून फोटो काढण्यास मनाईचे फलक लावले होते. आम्ही गेलो तेव्हा तिथं गर्दी कमी होती, तरीही एक गार्ड आत फिरून कुणी फोटो, सेल्फी वगैरे काढत नाहीय ना, हे अगदी डोळ्यांत तेल घालून पाहत होता. शिवाय तो ड्रेसकोडबाबतही बराच कडक असावा. कारण आम्ही नंतर बाहेर पडलो, तेव्हा स्कर्ट घातलेली एक ललना बाहेरूनच दर्शन घेताना दिसली. आम्ही अगदी थांबून पाहिलं, पण ती काही आत गेली नाही. गार्ड समोरच उभा होता. हे मंदिर छान होतं. इथल्या पद्धतीप्रमाणे सुरुवातीलाच जे दार होतं, त्यावर मोठं गोपुरासारखं बांधकाम होतं. त्या तुलनेत आतल्या मंदिराचा कळस उंचीनं अगदीच लहान होता. मंदिराच्या संकुलाला चारी बाजूंनी मजबूत दगडी भिंतींचं कुंपण होतं. आतमध्ये आपल्यासारख्याच देवळी होत्या. तिथं काही भाविक सावलीला बसून होते. आतमध्ये मुख्य मंदिरासोबत सुब्रह्मण्यम, गणपती यांची छोटी छोटी मंदिरं होती. तिथं खूप शांत, छान वाटलं. दर्शन घेऊन थोडा वेळ ‘देवाचिये द्वारी बसलो क्षणभरी’! अर्थात पुढं निघायचं होतं. 

बाहेर आलो. ऊन जाणवत होतं, म्हणून एके ठिकाणी शहाळ्याचं पाणी प्यायलो. अराफातला बोलावलं. आता पुढचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास आणखी चढणीचा होता. छोटेखानी घाटच. मात्र, आडवा पसरलेला. अखेर अर्ध्या तासानं ती तलकावेरी क्षेत्राची कमान दिली. इथं बाहेर बऱ्याच चारचाकी गाड्या पार्क केलेल्या दिसल्या. अनेक स्थानिक मंडळी दुचाकीवरूनही सहकुटुंब सहलीला आल्याप्रमाणे तिथं आलेली दिसली. इथंही अगदी बाहेरच चपला स्टँड होता. तिथून आत त्या फरशीच्या पायऱ्यांवरून भर उन्हात चालत जायचं होतं. अर्थात सगळेच लोक तसे अनवाणीच निघाले होते. त्या कमानीखालीच जरा सावली होती. आम्ही पाच मिनिटं तिथं थांबून, फोटो सेशन करून पुढं निघालो. काही पायऱ्या चढून गेल्यावर कावेरीचा उगम असलेलं ते कुंड लागलं. तिथं पुजारी आणि सुरक्षारक्षक बसले होते. पाण्यात नाणी टाकू नयेत, हात-पाय धुऊ नयेत, फोटो काढू नयेत वगैरे बऱ्याच सूचनांचा फलक तिथं होता. आम्ही त्याचं पालन करीत फक्त कुंडाचं व तिथल्या देवीच्या मूर्तीचं दर्शन घेऊन बाहेर आलो. काही भाविक मात्र तिथंही मोबाइल काढून शूटिंग करत होते. मग त्यांना त्या सिक्युरिटी गार्डचा ओरडा खावा लागला. शेजारी आणखी एक कुंड होतं. तिथं मात्र भरपूर नाणी पडलेली दिसली. इथं बहुतेक ती नाणी टाकून इच्छा व्यक्त करायची जागा असावी. आम्हीही त्या कुंडात नाणी टाकली. इथून आणखी वर डोंगरावर जाण्याचाही एक रस्ता होता. मात्र, तेव्हा ऊन झालं असल्यानं आणि आम्हाला लवकर परत निघायचं असल्यानं आम्ही वर गेलो नाही. अर्धात जिथं कुंड होतं, तिथूनही समोरचं निसर्गदृश्य अत्यंत सुंदर दिसत होतं. दूरवर पसरलेल्या हिरव्यागार डोंगररांगांनी तो सर्व परिसर व्यापला होता. त्यामुळं एवढ्या उन्हातही डोळ्यांना गार वाटत होतं. थोडा वेळ तिथं फोटोसेशन करून आम्ही खाली उतरलो. अराफातभाई आमची वाट पाहत थांबलेच होते. लगेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पुन्हा मडिकेरीत येईपर्यंत आम्हाला एक वाजला. मग आधी ‘अंबिका उपाहार’ या अराफातच्या लाडक्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. इथं बदल म्हणून मी नॉर्थ इंडियन थाळी मागवली. भरपूर जेवण झालं. नंतर लस्सी मागवली.
जेवणं झाल्यावर आम्हाला आता पहिल्या दिवशी राहिलेल्या कॉफी प्लँटेशनकडं जायचं होतं. अराफातला सकाळीच तसं सांगितल्यामुळं तो खूश झाला होता. आम्ही लगेच तिकडं गेलो. पहिल्या दिवशी आम्हाला भेटलेला उंचापुरा, भरघोस मिशा असलेला माणूसच तिथं होता. ‘तुम्ही परत आलात हे बघून आनंद झाला,’ असं त्यानं आवर्जून सांगितलं. आम्ही प्रत्येकी दोनशे रुपयांचं तिकीट काढलं. इथं मात्र स्कॅनरची सोय नव्हती. त्यामुळे रोख पैसे द्यावे लागले. त्यांनी एक तरुण मुलगा गाइड म्हणून दिला. त्यानं अर्ध्या तासाची पायी भटकंती करून ते सर्व प्लँटेशन आम्हाला नीट दाखवलं. सुरुवातीला हातात काठ्या दिल्या. त्यामुळं ट्रेक करत असल्याचा फील येतो म्हणे. त्या मुलानं आम्हाला कॉफीची निरनिराळी झाडं दाखवली. कॉफीच्या बिया, पानं, त्या बिया काढण्यापासून ते कॉफी तयार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत सर्व काही तिथं दाखवण्यात आलं. स्थानिक वेगळी झाडं बघायला मिळाली. 'सिल्व्हर ओक'ची झाडं तिथं विपुल प्रमाणात दिसली. वेगळ्या आकाराच्या संत्र्यांचं एक झाडही होतं. सागाची उंच झाडं होती. एकूण दोनशे रुपये तिकीट काढलं, त्याचं सार्थक झालं. ही पाहणी संपवून आम्ही वर येऊन बसलो, तर त्यांनी तिथली स्पेशल ब्लॅक कॉफी आणून दिली. ती अतिशय सुंदर होती. शिवाय अर्धा तास पायपीट केल्यानंतर ती मिळाल्यामुळं गरम असली, तरी छान वाटली. त्यानंतर मग तिथला कॉफीचा कारखाना बघायला गेलो. तिथल्या माणसानं अगदी बारकाईनं पुन्हा एकदा सगळी प्रक्रिया सांगितली. कॉफीचे विविध प्रकार दाखवले. तिथली स्पेशल ‘कावेरी कॉफी’ही दाखवली. यात मार्केटिंगचा भाग अर्थातच होता. मात्र, अमुक एक घ्याच, अशी सक्ती अजिबात नव्हती. त्यामुळं आम्ही वरच्या दुकानात जाऊन आम्हाला हवी ती खरेदी केली. 

आता इथून आम्हाला जायचं होतं ते फोर्ट म्युझियमला. मडिकेरी गावाच्या अगदी मध्यभागी हा जुना किल्ला आहे. आम्ही अगदी थोड्याच वेळात तिथं पोचलो. एका जुन्या चर्चच्या जागी हे शासकीय संग्रहालय आहे. मात्र, त्या दिवशी आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी असल्यानं हे संग्रहालय बंद होतं. मग आम्ही त्या किल्ल्याच्या परिसरात नुसता एक फेरफटका मारला. मुख्य इमारतीत आता न्यायालय व इतर काही सरकारी कार्यालये आहेत. समोरच्या बाजूला दोन हत्तींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. तिथं शेजारी या किल्ल्याची माहिती लिहिली होती. कूर्गच्या राजाने १६८१ मध्ये हा किल्ला उभारला. किल्ल्यात एक गणपती मंदिरही होतं. आम्ही तिथं जाऊन दर्शन घेतलं. पलीकडून गावात निघणारा आणखी एक रस्ता व मोठं दगडी प्रवेशद्वार होतं. ते पाहून मला आपल्या पन्हाळ्यावरील ‘तीन दरवाजा’ची आठवण आली. नील त्या वरच्या तटाच्या भिंतीवरही जाऊन आला. तिथं आणखी काही मराठी पर्यटक होते. थोडा वेळ रेंगाळून निघालो,
आता आम्हाला शेवटच्या पर्यटनस्थळी - राजाज टोम्ब - इथं जायचं होतं. इथल्या राजांची समाधी असलेली ही एक बाग आहे. तिकडं जाताना अराफातनं जुन्या मडिकेरी गावातून मुद्दाम कार नेली. त्यामुळं आम्हाला ते शांत, निवांत पहुडलेलं गाव बघता आलं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणाची (शिरूर, वैजापूर, येवला, फलटण, श्रीगोंदा इ,) आठवण येईल, असं ते ‘सुशेगाद’ गाव होतं. दोन दोन मजली घरं, समोर छोटं अंगण, तिथं लावलेल्या दुचाकी गाड्या, घरांसमोर ठेवलेली छोटी फुलझाडं, काही ठिकाणी रांगोळ्या, तर काही घरांसमोर बकऱ्या बांधलेल्या अशा संमिश्र वस्तीच्या त्या भागातून जाताना त्या गावाचं ‘खरं’ दर्शन घडलं. आता अराफात त्याच्या घरी वगैरे नेतो की काय, असं आम्हाला क्षणभर वाटलं. पण तो पक्का प्रोफेशनल होता. त्यानं तसं काही न करता आम्हाला थेट त्या राजांच्या समाधीपाशी सोडलं. तिथंही तिकीट होतं. ते काढून आम्ही आत शिरलो, तेव्हाच आभाळ भरून आलं होतं. त्या दोन समाध्या आमच्या जेमतेम पाहून झाल्या आणि पावसाचे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली. आम्ही पळतच येऊन कारमध्ये बसलो. इथून पुढं ‘ॲबी फॉल’कडे जायची आमची इच्छा नव्हती. जोरदार पाऊस आला तर सगळा रस्ता चिखलाचा आहे आणि तुम्हालाही भिजावं लागेल, असं अराफात म्हणाला. एकूणच तिथून सहा किलोमीटरवर असलेल्या आणि आता अगदी क्षीण धार पडत असलेल्या त्या धबधब्याकडं जायला तोही फारसा उत्सुक नव्हता, हे आमच्या लक्षात आलं. मग आम्हीही म्हटलं, की नको आता जायला तिकडं. चला हॉटेलवर. पडत्या फळाची आज्ञा घेऊन अराफातनं आम्हाला थेट हॉटेलवर आणून सोडलं. तेव्हा जेमतेम साडेचार, पाचच वाजले होते. मात्र, आता पावसानं चांगलाच जोर पकडला होता. उद्या आमचं चेक-आउट होतं, त्यामुळं आम्ही अराफातला सकाळी नऊ वाजता यायला सांगितलं अन् त्याचा निरोप घेतला.
आज आम्ही लवकरच हॉटेलवर आल्यामुळं आणि बाहेर पाऊस पडत असल्यानं रेस्टॉरंटमधूनच वर चहा मागवला. इथं कॅरमची पण सोय होती. मग नीलनं खाली रिसेप्शनला फोन करून कॅरम मागवला. थोड्याच वेळात हॉटेलचा माणूस कॅरम घेऊन आला. अगदी पावडरसह. मी खूप दिवसांनी कॅरम बोर्डवर हात साफ करून घेतला. काही काही फेव्हरिट शॉट जसेच्या तसे जमताहेत का, ते पाहिलं. चक्क जमले. आपल्या मेंदूची क्षमता अचाट असते हे खरं. किती तरी वर्षांनी खेळूनही मधल्या गोलात असलेली सोंगटी डावीकडच्या बॉक्समध्ये एका फटक्यात पाडता आली. तो विशिष्ट कट अगदी जसाच्या तसा जमला, याचा आनंद झाला. थोडा वेळ कॅरम खेळलो, पण आम्ही बाल्कनीत बसलो होतो आणि तिथ आता जोरात पाऊस यायला लागला. मग आत येऊन उरलेला डाव खेळलो. मग नीलला कंटाळा आल्यावर कॅरम परत देऊन टाकला. खरं तर आज आम्हाला मडिकेरीतल्या आणखी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन डिनर करायचं होतं. मात्र, पाऊस एवढा वाढला, की आम्ही तो बेत रद्द केला. शेवटी हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो. आज सुट्टीचा शेवटचा दिवस असल्यानं बरेच लोक चेक-आउट करून गेले होते. त्यामुळं डिनरला तिथं फक्त आम्ही तिघंच होतो. अर्थात त्यांनी व्यवस्थित सर्व्ह केलं. जेवून आम्ही वर आलो. आता सगळं आवरून ठेवायचं होतं. उद्या ब्रेकफास्ट करून परतीचा प्रवास सुरू करायचा होता...


कूर्ग/मंगळुरू/बंगळुरू/पुणे, १५ एप्रिल २५

मंगळवारी सकाळी लवकर उठून आवरून ठेवलं. ब्रेकफास्ट केला. बॅगा आवरून ठेवल्या. बरोबर नऊ वाजता अराफात आला. आम्ही इथल्या रेस्टॉरंटमध्ये जे काही दोन-तीन दिवस जेवलो होतो, त्याचं बिल त्यांनी एकदम दिलं. मग ते पेमेंट केल्यावर चेक-आउट पूर्ण झालं. आता आम्ही परतीच्या वाटेला लागलो. आमचं बंगळुरूला जाणारं विमान मंगळुरूवरून दुपारी ३.२५ वाजता निघणार होतं. मध्ये १३७ किलोमीटरचा प्रवास होता. आम्हाला निदान दोन वाजता तरी मंगळुरूत पोचायला हवं होतं. त्यामुळं आम्ही नऊ वाजता निघालो. मात्र, रस्त्यानं फारशी वाहतूक नसल्यानं आम्ही १२.३० वाजताच मंगळुरू शहरात पोचलो. मग दुपारचं जेवण शहरातच कुठल्याही तरी रेस्टॉरंटमध्ये करून घ्यावं, असं ठरवलं. त्यानुसार अराफातनं आम्हाला एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये नेलं. खरं तर ते रेस्टॉरंट अगदीच साधं होतं. मात्र, आता आमच्याकडं वेळ नव्हता. अर्थात तिथं जेवण व्यवस्थित मिळालं. मग जेवून आम्ही लगेच विमानतळाकडं निघालो. बरोबर दीड वाजता आम्ही विमानतळावर पोचलो. अराफातला निरोप दिला. त्याच्या दोन मुलींसाठी खाऊसाठी पैसे दिले. त्यामुळं तो खूश झाला. आम्ही ‘डिजियात्रा’त नोंदणी केलेली असल्यानं आमचं चेक-इन फटाफट झालं. हा विमानतळ अगदीच छोटा होता. गर्दीही कमी होती. इथून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइट जास्त संख्येने होत्या. आमचं विमान वेळेत आलं. वेळेत निघालं. इथून टेक-ऑफ करतानाही विमान दरीच्या बाजूकडे जाईल आणि तिथून विरुद्ध दिशेने उडेल असा माझा अंदाज होता. तसंच झालं. त्या अपघातानंतर केलेला का कायमस्वरूपी इलाज असणार. आमचं फ्लाइट अर्ध्याच तासाचं होतं. मात्र, बंगळुरू विमानतळावर ‘गो अराउंड’ करावं लागल्यानं जरा वेळ लागला. तरी पाच वाजता आम्ही लँड झालो होतो. इथून आम्ही आतल्या आत जे ‘अन्तर्राज्यीय स्थानांतर’ असतं, तिकडं जाऊ शकलो. तिथंही ‘डिजियात्रा’मुळं प्रवेश सुकर झाला. (पुण्यात प्रवास सुरू करताना माझं ‘डिजियात्रा’ चाललं नव्हतं. त्यामुळं मला रेग्युलर रांगेतून आत यावं लागलं होतं. सुदैवानं मंगळुरू व बंगळुरूत ती अडचण आली नाही आणि माझाही प्रवेश सहज झाला.) इथल्या गेटवर जाऊन बसलो. महागामोलाची कॉफी घेतली. पाण्याची बाटलीही अशीच महागाची विकत घेतली. (आमची स्टीलची पाण्याची बाटली अराफातच्या गाडीतच विसरली. त्याचा फोनही आला होता. पण काय करणार? राहू दे म्हटलं आता तुम्हाला...) गेटची एकदा बदलाबदली होणं हे जवळपास रिच्युअल असतं. ते झालं. मग त्या गेटवरून बोर्डिंग सुरू झालं आणि आम्ही एकदाचे पुणेगामी विमानात बसलो. खरं तर हा तासाभराचा प्रवास; पण पुण्याला चक्क लँडिंग सिग्नल मिळेना. पुण्यावरही आमचं ‘गो अराउंड’ सुरू झालं. मी तसा बऱ्याचदा पुणे विमानतळावर उतरलोय, मात्र इथं ‘गो अराउंड’ करायची वेळ यापूर्वी कधी आली नव्हती. आता पुण्यातल्या रस्त्यांवरच्या ट्रॅफिक जॅमची लागण आकाशालाही झालेली दिसते. असो. फार उशीर झाला नाही. आम्ही साडेआठला उतरलो. मग त्या बॅटरी ऑपरेटेड गाड्यांतून एअरो मॉलला गेलो. तिथून ‘रॅपिडो’ची कॅब बुक केली. मात्र, त्यांचा अधिकृत थांबा तिथं नसल्यानं आम्हाला त्या कॅबवाल्यानं सिम्बायोसिस रस्त्यानं जरा मागं बोलावलं. मग तिथवर चालत गेलो. कॅबनं साडेदहा वाजता घरी सुखरूप पोचलो. 
कूर्गची ट्रिप अगदी जशी व्हायला हवी होती तशी झाली. थोडं आमचं नियोजन, बरीचशी ‘विहंग टूर्स’च्या परांजपे दाम्पत्याची आस्था आणि स्थानिक नागरिक व हवामानाची साथ यामुळं ही ट्रिप यशस्वी झाली. 
या ट्रिपला आम्हाला सर्व मिळून माणशी ३० हजार रुपये खर्च आला. 
(‘विहंग टूर्स’चे शैलेंद्र परांजपे यांचा फोन नंबर - ९५५२५५७५७२)


(समाप्त)

---------

बंगळूर-म्हैसूर डायरी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

--------

19 Apr 2025

कूर्ग ट्रिप १२-१५ एप्रिल २५ (भाग २)

कावेरीअम्मा अन् हत्ती...
-----------------------------

कूर्ग, १३ एप्रिल २५.

सकाळी साडेसहाच्या सुमारास जाग आली अन् बाल्कनीत गेलो तर समोर डोंगरावर सूर्यदेव उगवलेले. घरबसल्या असं सूर्योदयाचं अप्रतिम दृश्य बघण्याचा योग खूप दिवसांनी आला. थोड्या वेळानं दोन पक्षी तिथून उडत गेले आणि अगदी शाळेत आपण सूर्योदयाचं चित्र काढतो तसं ते ‘पिक्चर परफेक्ट’ झालं. रूममध्ये चहा-कॉफीची सोय होती. त्या बाल्कनीतल्या खुर्चीवर बसून, अत्यंत थंडगार हवेत, हातात गरमागरम चहाचा कप घेऊन तो सूर्योदय बघणं हे केवळ परमसुख होतं. आजचा दिवस झकास जाणार याची खात्री पटली. हॉटेलमध्ये आम्हाला ब्रेकफास्ट होता. तो घेऊन आम्ही बरोबर नऊ वाजता तयार राहिलो. आज नौशाद नावाचा ड्रायव्हर येणार आहे, हे परांजपेंनी काल रात्री मेसेज करून कळवलं होतं. फोन केला तर नौशादमियाँ खाली येऊन थांबले होते. आम्ही कारमध्ये बसलो आणि आमच्या पहिल्या पर्यटनस्थळाकडं निघालो - दुबारे एलिफंट कॅम्प. 
हे ठिकाण मैसुरू रोडवर आणि कूर्गपासून साधारण ४०-४५ किलोमीटर अंतरावर होतं. सकाळच्या त्या हवेत, कोवळ्या उन्हात प्रवास करताना अतिशय आल्हाददायक वाटत होतं. नौशादमियाँ अगदी मितभाषी होते. अराफातच्या बरोबर उलट. त्यामुळं मीच बडबड करत होतो. रस्ता अतिशय सुंदर होता. (हेआता गृहीतच धरावं.) मला स्वत:ला काही क्षण तिथं ड्रायव्हिंग करायचा मोह झाला. साधारण ३५ किलोमीटर अंतर कापल्यावर आम्ही उजवीकडं वळलो. मुख्य रस्ता सोडून आपण आत वळलो, की आत कच्चा, खराब रस्ता असणार हा आपल्याकडचा अनुभव. इथं मात्र आतला रस्ताही तेवढाच चांगला होता. साधारण आठ किलोमीटरवर आम्ही पुन्हा डावीकडं वळलो. तिथं लगेच तो दुबारे कॅम्प आला. तिथं पार्किंगसाठी भरपूर जागा होती. सकाळची वेळ असली तरी भरपूर गर्दी होती. तो चांगलाच प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉट असणार, हे दिसत होतं. दोन्ही बाजूंना दुकानं होती. एका ठिकाणी स्वच्छतागृहाची चांगली व्यवस्था होती. तिथं पाच रुपये घेत होते, पण त्यामुळं ती स्वच्छतागृहं खरोखर स्वच्छ होती. एकूणच पर्यटनस्थळावर पर्यटकांची चांगली काळजी घेण्याची वृत्ती इथं दिसली. आम्ही तातडीनं नदीच्या बाजूला धाव घेतली. कावेरीचं पात्र दृष्टीस पडलं. नदीपात्राच्या कडेला बांधलेल्या भिंतीमधूनच खाली पायऱ्या उतरत होत्या. तिथून थेट नदीच्या पाण्यातच आपण प्रवेश करतो. बऱ्याच ठिकाणी खाली वाळूची पोती वगैरे टाकली आहेत. पण काही ठिकाणी पाणी गुडघ्यापेक्षाही खोल होतं. शिवाय निसरडे दगड आणि काही ठिकाणी पाण्याला असलेला थोडासा वेग यामुळं ही नदी ओलांडणं हा चांगलाच थ्रिलिंग अनुभव ठरला. आम्ही सोबत एक ज्यूटची पिशवी घेऊन गेलो होतो. त्यात तिघांच्याही चपला टाकल्या व अनवाणी त्या पाण्यात उतरलो. एकमेकांचे हात धरत, सावरत ती नदी ओलांडणं हा फार भन्नाट अनुभव होता. साधारण दोनशे मीटर अंतर पार करून, बऱ्याच लोकांसोबत आम्हीही एकदाचे पलीकडच्या तीरावर पोचलो.हा कॅम्प साधारण साडेअकरापर्यंत सुरू असतो. आम्ही पोचलो तेव्हा दहा वाजले होते. तीन हत्तींचा एक कळप नदीच्या त्या बाजूला अंघोळीला आल्याचं आम्हाला नदी ओलांडताना दिसलं होतं. पलीकडच्या तीरावर पोचल्यावर दरडोई १४० रुपयांचं तिकीट काढून आम्ही आत गेलो. सुरुवातीला या हत्ती प्रशिक्षण केंद्राची माहिती होती. आजूबाजूच्या शेतांत त्रास देणारे हत्ती पकडून वन विभाग त्यांना इथं आणून ठेवतो. यातल्या काही हत्तींना पुन्हा जंगलात सोडलं जातं, तर काही हत्तींना प्रशिक्षण दिलं जातं. यातले काही हत्ती मैसुरूच्या प्रसिद्ध दसरा महोत्सवातही सहभागी होतात. तिथं वेगवेगळ्या ठिकाणी हत्ती साखळदंडांनी बांधून ठेवले होते. त्यातले काही हत्ती पर्यटकांना सरावले होते, असं दिसलं. सोंड उंचावून दाखव, मान वळवून दाखव, झाडावरचा पाला तोडून दाखव असले प्रयोग काही हत्तींनी सुरू केले. काही हत्तींचे माहूत पैसे घेऊन, पर्यटकांच्या डोक्यावर सोंड ठेवून आशीर्वाद देण्याचे प्रात्यक्षिक त्यांच्या हत्तींकडून करवून घेत होते. आम्हाला त्या हत्तींची नदीवरची अंघोळ बघण्याची इच्छा होती. मात्र, पुढची अंघोळ आता साडेअकरा वाजता होणार असं कळलं. आम्ही तो सगळा भाग फिरून बघितला. तिथं आता चांगलाच उकाडा जाणवू लागला होता. आम्ही थोडा वेळ तिथल्या बाकांवर बसलो. आता नदीवर इकडं येणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसत होती. आम्हाला परत निघायचं होतं. मग पुन्हा एकदा हत्तींसोबत फोटोसेशन केलं आणि परतीची वाट धरली. 

परत निघताना त्या नदीत आता चांगलीच गर्दी झाली होती. तिथं गर्दी नियंत्रित करायला कोणी नव्हतं. लोक कसेही येत होते. येणारी झुंड मोठी असल्यानं जाणाऱ्यांना वाटच मिळत नव्हती. शेवटी कसेबसे पलीकडं पोचलो. अगदी त्या काठावर दोन सुरक्षारक्षक गर्दी नियंत्रित करताना दिसले. मात्र, त्या काळात अनेक जण, विशेषत: मुली त्या पाण्यात घसरून पडल्या. कडेवर लहान मूल घेऊन ही नदी ओलांडणारेही कही महाभाग होते. त्यातल्या एकाला तर घसरल्यावर मीच हात देऊन सावरलं. एकूण येताना जेवढा उत्साह होता, तेवढा परतताना काही राहिला नाही. शेवटी एकदाची नदी ओलांडली. कावेरीअम्माला पुन्हा एकदा नमस्कार केला आणि तिथून बाहेर पडलो. नौशादमियाँना फोन केल्यावर ते तातडीनं हजर झाले आणि आम्ही पुढच्या ठिकाणाकडं निघालो. 
आता आम्ही गोल्डन टेम्पल हे ठिकाण बघायला निघालो होतो. थोड्याच वेळात आम्ही त्या मॉनेस्ट्रीपाशी पोचलो. समोर एका मोठ्या मैदानात पार्किंगची व्यवस्था होती. आमच्या ड्रायव्हरनं मॉनेस्ट्रीच्या दारात सोडलं आणि तो निघून गेला. या संकुलाचं नाव ‘नामड्रोलिंग मॉनेस्ट्री’. पेनॉर रिनपोचे यांनी १९६३ मध्ये ही मॉनेस्ट्री सुरू केली. तिबेटी बुद्धांचं हे सर्वांत मोठं शिक्षण संकुल आहे, असं मानलं जातं. इथं बांधलेलं मंदिर सोन्याच्या पत्र्यानं मढवलेलं आहे, म्हणून त्याला ‘गोल्डन टेम्पल’ असंही म्हटलं जातं. तिबेटी बुद्ध धर्माच्या नाइंगमा या वंशाचे हे शैक्षणिक संकुल असून, इथं सुमारे सात हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. हा विहार आणि तिथला एकूणच परिसर भव्य आणि शांत वाटला. मुख्य विहारात बुद्धाची अतिशय शांत, ४० फूट उंच मूर्ती आहे. शेजारी आणखी दोन गुरूंच्या तेवढ्याच भव्य मूर्ती आहेत. त्या परिसरात पर्यटकांची भरपूर गर्दी होती. आम्ही बाहेर पडलो, तेव्हा तिथं बरंच उकडत होतं. समोर दुकानं होती. एका दुकानात आम्ही मलेशियाचं एक सॉफ्ट ड्रिंक घेतलं. ते प्यायल्यावर जरा बरं वाटलं. शेजारी आणखी एक स्मृतिवस्तूंचं दुकान होतं. तिथंही चक्कर मारली. थोड्या वेळानं आम्ही तेथून निघालो. आता साधारण एक वाजत आला होता. नौशादमियाँना परत बोलावून घेतलं. आता जेवायचं होतं. मग त्यांनाच एखादं हॉटेल दाखवायला सांगितलं. त्यांनी रस्त्यात ‘नक्षत्रम्’ नावाचं एक व्हेज हॉटेल सुचवलं. आम्ही तिथं थांबून जेवलो. मी रीतसर साउथ इंडियन मिल्स मागवलं. त्यात भरपूर भात आणि तीन-चार प्रकारच्या भाज्या, वरण, रस्सम असं सगळंच आलं. सर्व ‘भातार्पणमस्तु’ करून खाल्लं. त्यामुळं पोट व्यवस्थित भरलं.
इथून आमचा पुढचा स्पॉट होता निसर्गधाम. ही एक बागच आहे. या बागेच्या दारात भरपूर दुकानं होती. एक प्रकारचं शॉपिंग कॉम्प्लेक्सच. तिथं अत्यंत स्वस्तात म्हणजे शंभर रुपयांना एक टी-शर्ट वगैरे अशी दुकानं होती. तिथं प्रचंड गर्दी उसळली होती, हे सांगायला नकोच. आम्ही आधी बागेत जायचं ठरवलं. दरडोई ४० रुपये तिकीट काढून आम्ही आत गेलो. आत नदीवरचा एक झुलता पूल होता, तो छान होता. मात्र, त्या पुलाच्या मधोमध गेलं, की लोक मोबाइल काढून सेल्फी काढत बसायचे. आम्हीही तेच केलं. नंतर दोन्ही बाजूंचे सुरक्षारक्षक ओरडायला लागले, की मग लोक पुढं सरकायचे. निसर्गधाम या उद्यानात प्रामुख्याने बांबूचं बन होतं. एका बाजूला कॉटेजेस होती. पण तिथं कुणी राहताना दिसलं नाही आणि ती अगदीच पर्यटकांच्या येण्या-जाण्याच्या मार्गात होती. आम्ही आतपर्यंत चक्कर मारली. त्या भागातील वेगवेगळ्या जाती-जमातींच्या नृत्य प्रकाराचे पुतळे उभारले होते. पुढं एक बर्ड पार्क लागलं. इथं पुन्हा वेगळं तिकीट होतं. ते काढून आत गेलो. आत मकाउसारख्या पक्ष्यांसोबत फोटो काढून घेण्याची सोय होती. त्याला अर्थात पुन्हा पैसे होते. नीलला त्या पक्ष्यासोबत फोटो काढायचा होता. मग आम्ही पैसे भरले. मग तिथल्या त्या पक्षीपालक ताईंनी नीलला त्या पिंजऱ्यात नेलं आणि तो भला मोठा पक्षी त्याच्या खांद्यावर व मग हातावर ठेवून फोटो काढायला सांगितले. नीलचे फोटो काढून झाल्यावर त्या ताईंनी आता तो पक्षी मला खांद्यावर घेऊन फोटो काढायची ऑफर दिली. (एकावर एक फ्री...) माझी फारशी इच्छा नव्हती, पण शेवटी तो पक्षी खांद्यावर बसवून एकदाचे फोटो काढून घेतले. बाहेर इतरही पक्षी होते. सगळ्यांत भारी म्हणजे शहामृगांची जोडी होती. हे उंच व भव्य पक्षी सहसा बघायला मिळत नाहीत. बाकी पार्क फार मोठं नव्हतं. पण जे पक्षी बघितले ते बघून मजा आली.

पुढं गेल्यावर एका ठिकाणी झिपलाइन (दोरावरून घसरत पलीकडं जायचं) सुरू होतं. नीलला ते करायचं होतं. मग शंभर रुपये देऊन ते करून घेतलं. व्हिडिओ वगैरे काढला. येताना एक झाडावरचं मचाणवजा घर दिसलं. मग शिडीवरून तिथं चढून थोडा वेळ बसलो. एकूण या ‘निसर्गधामा’त चांगला टाइमपास झाला. येताना आम्हाला बोटिंगही करायचं होतं, पण बराच उशीर झाला होता. त्यामुळं पार्कमधून बाहेर पडलो. समोरच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सकडं पाय वळलेच. तिथं बराच टाइमपास झाला. थंड ज्यूस प्यायलो. टी-शर्टची खरेदी झाली. अखेर तिथून नौशादमियाँना फोन करून बोलावून घेतलं व एकदाचे तिथून बाहेर पडलो.
आता आम्ही पुन्हा कूर्गच्या दिशेने निघालो. रस्त्यात जोरात पाऊस सुरू झाला. मात्र, सुदैवानं तो थोड्या वेळात तो थांबला. आम्हाला आता कूर्गमधलं जनरल थिमय्या म्युझियम बघायला जायचं होतं. थोड्याच वेळात आम्ही तिथं पोचलो. मडिकेरी गावात मुख्य रस्त्यावरच हे संग्रहालय आहे. ‘सनीसाइड’ असं त्या बंगल्याचं जे नाव होतं, तेच या संकुलाला देण्यात आलं आहे. अतिशय सुंदर, मोक्याच्या जागेवर हा बंगला उभा आहे. बंगल्याच्या समोर दरीसारखा खोल भाग असून, पुढच्या डोंगरावर वसलेलं गाव इथून स्पष्ट दिसतं. तिकीट काढून आत गेल्यावर उजव्या बाजूला विमान, पाणबुडी, रणगाड्याच्या प्रतिकृती ठेवलेल्या दिसल्या. ‘अमर जवान ज्योती’चंही काम सुरू असलेलं दिसलं. संग्रहालयाच्या सुरुवातीलाच बंगल्याबाहेर एक मोठी, लष्करी बुटाची प्रतिकृती आहे. तिथं इंग्रजीतील एक कविताही लिहिली आहे. जनरल थिमय्या हे कूर्गचे भूमिपुत्र. लष्करप्रमुखपदापर्यंत त्यांची वाटचाल गौरवशाली होती. सायप्रसमध्ये त्यांना अकाली मरण आले. त्यांचा सर्व जीवनप्रवास या संग्रहालयात मांडला आहे. कूर्गमध्ये प्रवेश करताना आम्हाला एक लष्करी अधिकाऱ्याचा पुतळा दिसला होता. तो थिमय्या यांचाच असावा, असं मला वाटलं होतं. मात्र, तो फील्ड मार्शल करिअप्पा यांचा होता. तेही कूर्गचेच भूमिपुत्र. त्यानंतर पुढच्या चौकात आणखी एक असाच लष्करी अधिकाऱ्याचा पुतळा आहे. ते ब्रिगेडिअर मानप्पा की अशाच नावाचे भूमिपुत्र अधिकारी होत. थिमय्या यांचा घोड्यावर स्वार असलेला पुतळा आहे. तो या संग्रहालयाच्या थोडं पुढं, आमच्या हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर होता.

या संग्रहालयाची भेट आटोपून आम्ही मागच्या बाजूला असलेल्या कॅफेत आलो. तिथं आम्हाला छान गरमागरम कॉफी मिळाली. ती घेतल्यावर एकदम तरतरी आली. आम्ही मागच्या बाजूने बाहेर पडताना पुन्हा एकदा त्या रणगाड्यासमोर, विमानासमोर फोटो काढले. आम्ही बाहेर पडलो, तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. नौशादमियाँनी आम्हाला हॉटेलवर सोडलं आणि ते गेले. आजचं आमचं स्थलदर्शन तसं लवकर आटोपलं होतं. मात्र, हॉटेलवर आल्यावर नाही म्हटलं तरी दिवसभराचा थकवा जाणवलाच. मग सरळ आराम केला. खालच्या रेस्टॉरंटमधून चहा-कॉफी रूमवरच मागवली. ती लगेच आली. चहा घेऊन बरं वाटलं. संध्याकाळी फारशी भूक नव्हती. मग इथं झोमॅटो किंवा ‘स्विगी’वरूनही तुम्ही खायला मागवू शकता, हा काल अराफातने सांगितलेला उपाय लक्षात आला. नीलला पिझ्झा मागवायचा होता. मग आम्ही तिथल्या ‘डॉमिनोज’मधून पिझ्झा मागवला. त्या छोट्याशा गावात अशी सेवा देणारे किती लोक असणार? आम्ही ऑर्डर नोंदवल्यावर तिथल्या माणसाचा नीलला थेट फोन आला. त्यानं हे आहे, ते नाही असं सांगून ऑर्डर पुन्हा कन्फर्म केली. आम्ही पुन्हा ‘जे आहे त्यातून’ निवडून ऑर्डर दिली. अर्ध्या तासात तो मुलगा पिझ्झा घेऊन हॉटेलच्या खाली आला. मग नीलनं रिसेप्शनपाशी जाऊन ते पार्सल आणलं. पिझ्झा खाल्ला, तरी मला थोडी भूक होती. मग पुन्हा खालच्या रेस्टॉरंटमधून कर्ड राइस मागवला व जरा उशिरा म्हणजे नऊ वाजता खाल्ला. आयपीएलची मॅच होतीच. आज जरा उशिरा झोपलो तरी चालणार होतं. उद्या साइटसीइंगचा शेवटचा दिवस, अराफात व परांजपे दोघांचेही फोन आले. दिवस कसा गेला, वगैरे चौकशी परांजपेंनी आपुलकीने केली. उद्याचा पहिला कार्यक्रम तलकावेरीचा अर्थात, कावेरीच्या उगमाकडं जाऊन तिथं दर्शन घेण्याचा होता. शिवाय काल राहून गेलेली आणखी एक गोष्ट खुणावत होती...


(क्रमश:)


--------------

पुढील व शेवटचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----------

18 Apr 2025

कूर्ग ट्रिप १२-१५ एप्रिल २५ (भाग १)

कूर्ग, कावेरी, कॉफी अन् बरंच काही....
-----------------------------------------------



नीलची फायनल इयरची परीक्षा झाली आणि आम्हाला कुठे तरी ट्रिपला जायचे वेध लागले. दोन पर्याय होते. एक उत्तरेत शिमला, कुलू, मनालीचा आणि दुसरा दक्षिणेचा - कूर्गचा. हातात असलेले दिवस, एकाच ठिकाणी बरंच काही पाहण्यासारखं असण्याचे पर्याय आणि सुरक्षितता या मुद्द्यावर दक्षिणेचा विजय झाला आणि आम्ही कूर्गला जाण्याचं मुक्रर केलं. जाताना व येताना वेळ वाचवण्यासाठी विमानानंच जायचं हे निश्चित होतं. दोन महिने आधीच बुकिंग केलं. आमच्या सोसायटीच्या ग्रुपवर असलेले शैलेंद्र परांजपे व श्रावणी परांजपे यांची ‘विहंग टूर्स’ ही पर्यटनविषयक सेवा देणारी कंपनी आहे. आम्हाला कस्टमाइज्ड टूर हवी होती, तशी त्यांनी करून दिली. विमानांचं बुकिंग दोन महिने आधीच केल्यामुळं ते तिकीट तुलनेनं स्वस्त पडलं. आम्ही पुणे ते बंगळुरू आणि बंगळुरू ते मंगळुरू असं फ्लाइट बुकिंग केलं. मंगळुरूहून कूर्ग १३७ किलोमीटर आहे. कारनं साडेतीन तासांत तिथं पोचता येतं. त्यामुळं हाच मार्ग निश्चित केला. परांजपेंनी आम्हाला मंगळुरू विमानतळ ते मंगळुरू विमानतळ अशी कार, हॉटेल आणि पर्यटन ठिकाणांची भेट अशी बाकी सगळी व्यवस्था करून दिली. त्यामुळं आम्ही निश्चिंत मनाने ११ एप्रिलच्या रात्री पुणे विमानतळावर निघालो. (बुकिंग करताना रात्री बारानंतरच्या फ्लाइटच्या वेळा आणि दिनांक नीट तपासून घ्यावेत. मध्यरात्री १२.४५ चं विमान म्हणजे तारीख असते १२ एप्रिल आणि आपल्याला निघायचं असतं ११ एप्रिलला रात्री.) 

पुणे/बेंगळुरू/मंगळुरू/कूर्ग, १२ एप्रिल २५

आमचं ‘इंडिगो’चं विमान होतं. पुणे विमानतळाचं नूतनीकरण आणि नवं टर्मिनल झाल्यापासून आम्ही पहिल्यांदाच तिथं जात होतो. बाहेर महाराजांचा पुतळा, तिरंगा झेंडा आणि तिथं केलेली म्युरल्स व रंगवलेली चित्रं यामुळं एकूण प्रथमदर्शनी हे नवं टर्मिनल उत्तम भासतं. विमानतळाच्या आत गेल्यावर मात्र खूप जास्त गर्दीमुळं हाच विमानतळ छोटासा भासू लागतो. पुणे विमानतळावर खरोखर एसटी स्टँडसारखी गर्दी असते. त्यात आम्हाला आधी चार नंबरचं गेट सांगितलं. ते बदलून ‘१ ए’ दिसायला लागलं. पण १ आणि १ ए ही दोन्ही गेट आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी राखीव आहेत. त्यामुळं तिथं बरीच गर्दी जमा झाली तरी दार कुणी उघडेना. मग कळलं, की आता ६ नंबरचं गेट आहे. मग पुन्हा आमची वरात खालच्या मजल्यावर असलेल्या त्या गेटवर गेली. तिथं हैदराबाद आणि बंगळुरू अशा दोन्ही फ्लाइटच्या प्रवाशांना बोलावलं होतं. त्यामुळं त्या गेटसमोर तोबा गर्दी झाली. अखेर वेगवेगळ्या रांगा करून लोकांना बसमध्ये सोडायला सुरुवात झाली. त्या बसमधून मग अखेर आम्ही विमानापाशी गेलो व त्या शिड्या चढून एकदाचे आसनस्थ झालो. विमान सुटलं मात्र वेळेवर. मध्यरात्रीच्या पुण्याचा अफाट विस्तार अन् झगमगाट डोळे दिपवणारा होता, यात शंका नाही. थोडं पुढं गेल्यावर विमानानं डावीकडं हलकेच वळण घेतलं आणि अंतराळातला अथांग अंधार कापत ते दक्षिणेस रोरावत निघालं. मधेच एक उजळलेला मोठा महामार्ग दिसला. त्यावरचे दिवे मधेच लुप्त झाले होते. त्यावरून तो कात्रजचा बोगदा असावा, असा अंदाज बांधला. पुढं विमान जसजसं उंचावर जाऊ लागलं, तसतसे खालचे दिवे अंधुक होत गेले आणि डोळ्यांतली झोप दाट! बंगळुरूपर्यंतचं ८०० किलोमीटरचं अंतर विमान अवघ्या तासाभरात कापतं. आम्ही मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी बरोबर केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. पुढचं कनेक्टिंग फ्लाइट ९० मिनिटांच्या आत असेल तर आतल्या आत एका वेगळ्या मार्गाने तुम्हाला त्या विभागाकडं जाता येतं. आम्ही बघितलं तर ते दार बंद होतं. शिवाय आमच्या पुढच्या विमानाला जवळपास तीन तास वेळ होता. मग आम्ही बाहेर पडलो. त्यामुळं पुन्हा सगळी सिक्युरिटी वगैरे करून आत जावं लागलं. अर्थात हाताशी वेळच वेळ होता. मात्र, झोपेचं खोबरं झालं होतं. आमचं गेट शोधलं आणि तिथं बघितलं तर प्रचंड गर्दी. कशीबशी तिघांना बसायला जागा मिळाली. आम्ही बसल्या बसल्याच झोप काढली. साधारण पाच वाजता आमच्या विमानाची घोषणा झाली आणि आम्ही एकदाचे पुढच्या विमानात जाऊन बसलो. हे विमानही वेळेत उडालं. बंगळुरू ते मंगळुरू अंतर ३५० किलोमीटरचं, त्यामुळं फ्लाइट अगदी अर्ध्या तासाची. मंगळुरू विमानतळावर उतरायचं म्हटल्यावर मनात त्या विमानतळावर २०१० मध्ये झालेल्या ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ विमानाच्या भीषण अपघाताची आठवण आलीच. आता तिथं काय बदल केले आहेत हे बघायची मला उत्सुकता होती. सगळा पश्चिम घाट (त्यात कूर्गही आलंच) ओलांडून आमचं विमान मंगळुरूकडं झेपावत होतं. मंगळुरूत लँडिंग सुरू झालं तसा इथला डोंगर-दऱ्यांचा, चढ-उताराचा प्रदेश डोळ्यांत भरला. मंगळुरू समुद्राकाठी असलं तरी समुद्र काही दिसला नाही. विमानतळापासून तो बराच पुढं आहे, असं नंतर कळलं. ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’चं विमान रनवेच्या ज्या दरीच्या बाजूनं कोसळलं, त्या बाजूनंच आता सगळी लँडिंग होत असावीत, असा माझा अंदाज होता आणि तो बरोबर निघाला. अगदी रनवेच्या जवळ येताना आम्ही त्या दरीवरूनच पुढं गेलो आणि क्षणभर अंगावर शहारा आला. अर्थात पुढच्या काही सेकंदांतच आमच्या विमानानं सुखरूप लँडिंग केलं आणि मी तरी हुश्श केलं. (तो विमान अपघात कसा झाला, का झाला, इथला विमानतळ लँडिंगसाठी कसा क्रिटिकल आहे, वगैरे माहितीसाठी यु-ट्यूबवर एक २३ मिनिटांची उत्तम डॉक्युमेंटरी आहे, ती जिज्ञासूंनी नक्की पाहावी.)

आम्ही अगदी साडेसहा वाजताच विमानतळावर उतरलो. हा विमानतळ अर्थात खूप छोटा आहे. आम्ही बाहेर येण्यापूर्वी जरा आन्हिकं उरकली. आमचा ड्रायव्हर अराफात आलाच होता. लगेच त्याच्या ‘टोयोटा इटिऑस’मध्ये बसून आम्ही कूर्गकडे निघालोही. आम्हाला रस्त्यात नाश्ता करायचा होता. शिवाय आमच्या हॉटेलचं चेक-इन दुपारी १ वाजता होतं. त्यामुळं आम्हाला घाई अजिबात नव्हती. मंगळुरू शहर बऱ्यापैकी मोठं आहे आणि आडवं पसरलं आहे. आता काही काही उंच इमारतीही दिसू लागल्या आहेत. बाकी नारळाची झाडं, चढ-उताराचे रस्ते असं टिपिकल कोकणी वातावरण लगेचच अनुभवण्यास मिळालं. मंगळुरू म्हणजे ‘दक्षिण कन्नड’ जिल्ह्याचं मुख्यालय. इथून आम्हाला घाट चढून कूर्गला जायचं होतं. कूर्गचं अधिकृत नाव आता ‘कोडुगू’ आहे. मडिकेरी हे गाव म्हणजे या जिल्ह्याचं मुख्यालय. मडिकेरी म्हणजेच कूर्ग. (ही सगळी महत्त्वाची माहिती तिथं जाऊन आलेल्या कुणीही मला आजतागायत सांगितली नव्हती.) मंगळुरूत उतरल्या उतरल्या दमट हवा आणि थोडा उकाडा जाणवत होता. आता आम्ही हळूहळू पूर्वेकडे आणि उंचावर निघालो होतो. कूर्ग समुद्रसपाटीपासून साधारण एक किलोमीटर उंचीवर आहे. ही उंची गाठण्यासाठी आम्हाला १३७ किलोमीटर प्रवास करावा लागणार होता. मंगळुरू ते बंगळुरू महामार्गानं आम्ही निघालो. (खरं तर मंगळुरू ते हासन... हासनला हा रस्ता मुंबई-बंगळुरू हायवेलाच मिळतो व पुढं बंगळुरूकडं जातो.) या रस्त्याचं काम गेली दहा वर्षं सुरू आहे, असं अराफात सांगत होता. पुढं एके ठिकाणी त्यानं गाडी थांबविली आणि पाण्याची बाटली विकत घेतली. तिथं चहा होता म्हटल्यावर मी चहा घेतला. विशेष म्हणजे अराफातनंच आमचे पैसे दिले. मला त्याच्या या कृतीचं आश्चर्य वाटलं व बरंही वाटलं. अराफात हा एक बडबड्या, पण पक्का प्रोफेशनल ड्रायव्हर होता. खरं म्हणजे तो मालकच होता. ही गाडी त्याची स्वत:ची होती. पुढं हायवेला एका गावात त्यानं गाडी उभी केली आणि नाश्ता करून घ्या, असं सांगितलं. आम्ही रस्त्यात त्याला मंगळुरी बन्सविषयी विचारलं होतं. त्यानं हे केटी नावाचं हॉटेल त्यासाठीच प्रसिद्ध आहे असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात त्या हॉटेलमध्ये सगळे जण गरमागरम इडली-वडा सांबार खात होते हे बघितल्यावर आम्हीही तेच मागवलं. बन्स खायचे राहूनच गेले. पुढं म्हणजे मंगळुरूपासून साधारण ४५ किलोमीटर अंतरावर मानी नावाचं छोटंसं गाव लागलं. इथं आम्ही हा हायवे सोडला आणि उजवीकडं वळलो. इथून पुढं रस्ता दुहेरी होता, पण उत्तम होता. व्यवस्थित दुभाजक आखलेले व बाजूला पिवळे पट्टे ओढलेले. हा रस्ता सिमेंटचा वाटत नव्हता, पण पांढुरका दिसत होता. बहुतेक अस्फाल्ट की काय म्हणतात तसं, प्लास्टिक मिक्स वगैरे त्यापासून केलेला असावा. जे काही असेल ते, पण रस्ता सुंदर होता. आजूबाजूला सतत डोंगर-दऱ्या होत्या आणि परिसर अतिशय हिरवागार होता. सुरुवातीला सगळीकडं रबराची उंचच उंच झाडं दिसत होती. रस्त्यात बंटवाल, पुत्तूर व सुल्या ही दोन-तीन मोठी गावं लागली.
आम्ही साधारण अकरा-सव्वाअकराच्या सुमारासच कूर्गमध्ये शिरलो. अराफात आम्हाला आधी एका कॉफी प्लँटेशनमध्ये घेऊन गेला. म्हणजे तिथं गेल्यावरच आम्हाला ते कळलं. इथं अर्धा-पाऊण तासाची एक टूर असते, ती तुम्ही करून घ्या, असं तो म्हणाला. तिथं विचारलं तर २०० रुपये प्रत्येकी असं तिकीट होतं. तिकिटाचं काही नाही, पण आम्ही सलग प्रवास करून आल्यामुळं दमलो होतो. त्यात दुपारच्या वेळी त्या प्लँटेशनमध्ये अर्धा-पाऊण हिंडायची आमच्यात एनर्जीच नव्हती. म्हणून आम्ही त्याला तसं सांगितलं व तिथून निघालो. त्यावर तो जरा खट्टू झाला. कारण आमच्या हॉटेलपासून पुढं तो आम्हाला घेऊन आला होता, हे नंतर कळलं. अर्थात आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम राहिलो आणि आधी हॉटेलवरच घेऊन चल, असं स्पष्ट सांगितलं. आम्ही ‘हॉटेल अल्टिट्यूड’ इथं पोचलो तेव्हा बारा वाजले होते. तिथं रिसेप्शनला सांगितल्यावर त्यांनी आम्हाला थोडा वेळ थांबायला सांगितलं. मग आम्ही हॉटेलच्या लॉबीतच थांबलो. थोड्याच वेळात त्यांनी आमची रूम ताब्यात दिली. रूम व एकूण व्यवस्था चांगली होती. रस्त्याच्या बाजूनं उघडणारी एक मोठी बाल्कनी होती. तिथून समोरचा रस्ता आणि पुढचे डोंगर दिसत होते. आम्ही थोड्या वेळानं आवरून त्या हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये जेवलो. जेवण चांगलं होतं.

आम्ही ड्रायव्हरला पाच वाजता यायला सांगितलं होतं. आधी तो उद्या सकाळीच भेटू असं म्हणाला होता. मात्र, आमच्या कार्यक्रमपत्रिकेत आज दोन ठिकाणं लिहिलेली होती. ती आम्हाला आजच पाहायची होती. त्यामुळं आम्ही त्याला पाच वाजता यायला सांगितलं. त्यानुसार तो आलाही. आम्ही मग तिथून आधी ओंकारेश्वर मंदिरात गेलो. मडिकेरी गावाच्या मध्यभागी हे मंदिर आहे. दाक्षिणात्य पद्धतीनुसार, मंदिरासमोर एक मोठं पाण्याचं कुंड होतं. पलीकडं हनुमानाचं मंदिर होतं. त्या दिवशी हनुमान जयंती होती, त्यामुळं त्या मंदिरात जरा गर्दी होती. आम्हीही तिथं जाऊन मारुतीरायाचं दर्शन घेतलं. मग नंतर मुख्य मंदिरात गेलो. बाहेरच ‘ड्रेसकोड’चा बोर्ड होता. सर्व लोक त्या कोडचं पालन करत होते. दर्शन घेऊन बाहेर आलो. आता आम्हाला ‘राजाज सीट’ नावाच्या ठिकाणी जायचं होतं. हे एक उद्यान होतं. तिथं पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. सुंदर हवा होती. छान वारं सुटलं होतं. त्या बागेत बरीच गर्दी होती. सुट्टीचा दिवस होता. त्या मुख्य पॉइंटवर अनेक बाक ठेवले होते. पण बसायला जागा नव्हती. शेवटी आम्हाला एके ठिकाणी जागा मिळाली. हा सनसेट पॉइंट होता. मात्र, आकाश ढगाळलेलं असल्यानं सूर्यास्त थेट बघायला मिळणार नव्हता. पण तिथं बसूनच छान वाटत होतं. समोर खोल दरी आणि त्यापलीकडं मोठमोठे, लांबवर पसरलेले डोंगर असं दृश्य छान दिसत होतं. नंतर त्या बागेत चालत फिरलो. तिथं डायनासोर, हत्ती, अजगर वगैरै बरेच प्राणी पुतळ्यांच्या रूपात उभे करून ठेवले होते. मधोमध एक कारंजंही होतं. पण ते बंद होतं. बाहेर आलो. तिथं खाऊगल्ली होतीच. एके ठिकाणी द्रोणात भेळ मिळत होती, ती घेऊन खाल्ली. वेगळीच चव लागली. नंतर आमच्या ड्रायव्हरला म्हटलं, कुठं तरी चहा-कॉफीला जाऊ या. मग त्यानं त्या गावात ‘अंबिका उपाहारगृह’ नावाच्या हॉटेलात गाडी नेली. तिथं आम्ही चहा-कॉफी तर घेतलीच, पण शेजारीच एका कुटुंबानं मंगलोरी बन्स घेतलेले बघितल्यावर मला सकाळी हुकलेल्या त्या बन्सची आठवण आली. मग आम्हीही ते बन्स मागवले व खाल्ले. मी पूर्वी गोव्यात पणजीतल्या ‘कॅफे भोसले’मध्ये हे बन्स खाल्ले होते. त्यानंतर थेट आज इथं. नील व धनश्री पहिल्यांदाच खात होते. दोघांनाही ते आवडले. इथंच खाली मसाल्यांची व कूर्गच्या प्रसिद्ध ‘होम मेड चॉकलेट्स’ची दुकानं होती. मग तिथं खरेदी झालीच. साधारण सात वाजताच अराफातनं आम्हाला हॉटेलवर सोडलं. नंतर आम्ही सरळ ‘आयपीएल’ची मॅच पाहत बसलो. संध्याकाळी पुण्याहून परांजपेंचा फोन आला. त्यांनी दिवसभरात आम्ही काय काय केलं, आमचं सर्व व्यवस्थित सुरू आहे ना, याची चौकशी केली. रात्री फारशी भूक नव्हतीच. खाली रेस्टॉरंटमध्ये जाऊन मस्त दाल-खिचडी खाल्ली व वर येऊन लवकर झोपलो. त्यापूर्वी परांजपेंचा मेसेज आला, की उद्या अराफात नसेल. त्याऐवजी दुसरा ड्रायव्हर येईल. आम्हाला कळेचना, की असं का? दिवसभर तर हा आमच्याबरोबर होता. काही बोलला नाही. परांजपे म्हणाले, की त्याला कुठं तरी जायचंय. त्यामुळं उद्या दुसरा ड्रायव्हर येईल. परवापासून परत अराफात असेल. मला साधारण दहा वाजताच झोप आली. आदल्या दिवशी अजिबात झोप झाली नव्हती. त्यामुळं झोपेची गरज होतीच...
जे झोपलो ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता जाग आली. बाल्कनीत गेलो अन् समोरचं दृश्य पाहून थक्क झालो...


(क्रमश:)

-----------------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------------