29 Jan 2026

मनशक्ती बालकुमार दिवाळी २५ - लेख

चौसष्ट घरांची ‘राणी’
------------------------


माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विविध गुणांची आवश्यकता असते. त्या माणसाचे वैयक्तिक कष्ट, इप्सित ध्येय साध्य करण्याची तीव्र इच्छा, त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी, ध्येयाकडे जाण्याचे योग्य नियोजन, कार्यसाधनेतील एकाग्रता या सर्व गोष्टींचे एकत्रित फळ म्हणून आपल्याला यश मिळते. आपल्याला यशस्वी होण्यासाठी जगातील अनेक यशस्वी लोकांच्या कथा प्रेरणा देत असतात. या लोकांचा यशाकडे झालेला प्रवास, त्या मार्गात आलेल्या अडथळ्यांवर त्यांनी कशी मात केली याचे अनुभव, यश मिळविण्यासाठी घेतलेली मेहनत या सर्व बाबी आपल्यालाही तसेच यश मिळविण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. क्रीडा क्षेत्रात आपल्याला अशा अनेक यशोगाथा ऐकायला मिळतात. अगदी भारतापुरते बोलायचे झाले तर ‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांच्यापासून ते महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत अनेक खेळाडूंची उदाहरणे देता येतील. क्रिकेटमध्येच सुनील गावसकर किंवा अगदी अलीकडच्या काळातील एम. एस. धोनी, विराट कोहली वा रोहित शर्मा, या सर्वांनी प्रचंड चिकाटीने, मेहनतीने त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळविल्याचे दिसते. बॅडमिंटनमध्ये प्रकाश पदुकोण यांच्यापासून साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधूपर्यंत पुष्कळ अशीच उदाहरणे सांगता येतील. मैदानी स्पर्धांमध्येही मिल्खासिंग, पी. टी. उषा यांच्यापासून ते नीरज चोप्रापर्यंत अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाद्वारे देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे. या सर्व खेळाडूंच्या यशात एक गोष्ट समान दिसेल - ती म्हणजे त्यांची अविचल, अढळ कार्यसाधना!


या लेखात बुद्धिबळात सर्वोच्च यश मिळविणारी मराठमोळी मुलगी दिव्या देशमुख हिच्या कार्यसाधनेविषयी जाणून घेऊ या. बुद्धिबळ हा खेळ आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. या खेळाच्या नावाप्रमाणेच यात बुद्धीचा कस लागतो. या खेळाचा उगम प्राचीन भारतातच झाला असं म्हणतात. त्यामुळे आपला भारत देश हेच या अद्भुत खेळाचे जन्मस्थान आहे, असं मानायला हरकत नाही. पूर्वी त्याला ‘चतुरंग’ असं नाव होतं. साधारण सहाव्या शतकापर्यंत मागे या खेळाचा इतिहास सांगता येऊ शकतो. तत्कालीन हिंदुस्थानातील सैनिकांनी हा खेळ देशाबाहेर नेला. त्यानंतर पर्शिया (आताचा इराण) देशात तो ‘शतरंज’ या नावाने खेळला जाऊ लागला आणि तिथूनच त्याचा जगभर प्रसार झाला असं मानण्यात येतं.
आधुनिक काळातही बुद्धिबळ या खेळात भारत आता एक महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. एके काळी सोविएत महासंघाचा या खेळात दबदबा होता. याशिवया युरोपीय देशांतील अनेक खेळाडूही नावलौकिक राखून होते. भारतात अलीकडच्या काळात विश्वनाथन आनंद या खेळाडूपासून आधुनिक भारतीय बुद्धिबळाच्या वर्चस्वाचे पर्व सुरू झाले, असे मानले जाते. विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर. त्याने १९८८ मध्ये हा मान मिळवला. आधुनिक बुद्धिबळात ‘ग्रँडमास्टर’ हा सर्वांत मोठा किताब मानला जातो. त्यासाठी काही विशिष्ट ‘एलो’ गुणांचा टप्पा पार करावा लागतो. सहसा २६०० ते २८०० गुणांपर्यंत जाणारे मोजके खेळाडूच ‘ग्रँडमास्टर’ होऊ शकतात. आतापर्यंत फारच थोड्या खेळाडूंना हा टप्पा गाठता आला आहे. त्यापैकी विश्वनाथन आनंद उर्फ ‘विशी’ हा एक. विशीच्या या उत्तुंग यशामुळे भारतातील बुद्धिबळ खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली. आनंद याच्यानंतर आतापर्यंत भारताचे केवळ ८८ खेळाडू ग्रँडमास्टर किताब मिळवू शकले आहेत, यावरून ‘ग्रँडमास्टर’ होणे किती कठीण असेल, याचा अंदाज येईल.
अगदी अलीकडे म्हणजे या वर्षी जुलै महिन्यात भारताची ८८ वी ग्रँडमास्टर होण्याचा मान नागपूरच्या दिव्या देशमुखने मिळवला. दिव्याची भव्य कामगिरी ही, की तिने महिलांची बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकून थेट ‘ग्रँडमास्टर’ किताबाला गवसणी घातली. गेल्या २८ जुलैला तिने महिलांच्या या विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हम्पीचा टायब्रेकरमध्ये पराभव केला आणि विश्वविजेतेपदावर स्वत:चे नाव कोरले. (त्यानंतर ऑगस्टमध्ये भारताचा रोहित कृष्णा ८९वा ‘ग्रँडमास्टर’ झाला आहे.) दिव्याच्या आधी कोनेरू हम्पी, आर. वैशाली व हरिका द्रोणावली या केवळ तीन भारतीय महिलांनाच ग्रँडमास्टर किताब मिळविता आला आहे, यावरूनही दिव्याच्या कामगिरीचे मोठेपण लक्षात येईल.
दिव्या अवघी १९ वर्षांची आहे. तिचा जन्म नऊ डिसेंबर २००५ रोजी नागपुरात एका मराठी कुटुंबात झाला. तिचे वडील जितेंद्र व आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. नागपुरातील भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिरात तिचं शालेय शिक्षण झालं. दिव्या अगदी लहान वयापासून, म्हणजे पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळते आहे. तिची आई डॉ. नम्रता यांनी सांगितल्याप्रमाणे, तिला आधी बुद्धिबळात रस नव्हता. तिची मोठी बहीण बॅडमिंटन खेळायला जायची, म्हणून दिव्याही बॅडमिंटन खेळायला जायचा हट्ट करायची. मात्र, लहानग्या दिव्याला बॅडमिंटनची रॅकेट पेलवत नसे. त्यामुळं तिला शेजारीच असलेल्या बुद्धिबळ अॅकॅडमीत घालण्यात आलं. मात्र, तिला तिथं बुद्धिबळाची गोडी लागली आणि लवकरच ती या खेळात अगदी पारंगत झाली. बुद्धिबळ हा अतिशय एकाग्र होऊन, लक्ष केंद्रित करून खेळायचा खेळ आहे. अगदी लहान असल्यानं दिव्याला तसं एकाग्र होऊन खेळणं स्वाभाविकच जमायचं नाही. मात्र, तिच्या पालकांनी तिला खूप प्रोत्साहन दिलं. न कंटाळता, न थकता, ते तिच्याकडून सराव करून घ्यायचे. त्यामुळं दिव्या खूप लवकर बुद्धिबळ खेळात तयार झाली. तिला अवघ्या आठव्या वर्षी, म्हणजे २०१३ मध्ये ‘फिडे’कडून (बुद्धिबळ खेळाची आंतरराष्ट्रीय संघटना) मास्टर पदवी मिळाली. मग २०१८ मध्ये ती महिला आंतरराष्ट्रीय मास्टर झाली. त्यानंतर ती भारताकडून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. सन २०२० मध्ये फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय संघात ती होती. नंतर २०२२ मध्ये तिने राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. यानंतर दिव्यानं मागं वळून बघितलं नाही. तिच्या या खेळातली घोडदौड जोरात सुरू झाली. तिने २०२३ मध्ये आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्यानंतर भारतातील महिलांच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेतही तिने बाजी मारली. या स्पर्धेत तर तिला सर्वांत कमी मानांकन होते. तरीही तिने हरिका द्रोणावली, वंतिका अगरवाल, कोनेरू हम्पी, सविता श्री बी., इरिना क्रुश अशा नामवंत खेळाडूंचा पराभव केला होता. जून २०२४ मध्ये ती वीस वर्षांखालील गटातील वर्ल्ड चॅम्पियन झाली. सौम्या स्वामीनाथन, हरिका द्रोणावली व कोनेरू हम्पी यांच्यानंतर अशी कामगिरी करणारी ती चौथी भारतीय महिला ठरली. अंतिम फेरीत तिनं बल्गेरियाच्या तृतीय मानांकित बेलोस्वावा क्रस्टेव्हा हिला पाच तासांहून अधिक चाललेल्या मॅरेथॉन लढतीत पराभूत केलं होतं. यानंतर ४५ व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून देताना तिनं चमकदार विजय मिळवला होता. याच स्पर्धेत तिनं वैयक्तिक सुवर्णपदकाचीही कमाई केली होती.
यंदा जॉर्जिया देशात बाटुमी या शहरात झालेल्या जागतिक विजेतेपद स्पर्धेत दिव्याला १५ वे मानांकन देण्यात आले होते. तिने चौथ्या फेरीत द्वितीय मानांकित झू जिनेर हिचा पराभव केला. उपउपांत्य फेरीत तिने भारताच्याच हरिका द्रोणावलीला हरवलं. उपांत्य लढतीत तिने चीनच्या तान झोंगयी हिच्यावर मात केली आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अंतिम फेरीत वर उल्लेख आला आहे त्याप्रमाणे भारताच्याच कोनेरू हम्पीला हरवून ती विश्वविजेती ठरली. एवढ्या लहान वयात कुशाग्र बुद्धीच्या दिव्याने बुद्धिबळ या खेळात मोठी चमक दाखवली आहे.
दिव्याच्या या यशामध्ये तिच्या जिद्दीचा, कार्यसाधनेचा अर्थातच मोठा वाटा आहे. एखादा माणूस यशस्वी झाला, असं आपण केव्हा म्हणतो? एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान, पुरस्कार वा किताब मिळणं ही या यशाची एक पोचपावती असते. त्या स्थानापर्यंत जाण्यासाठी अनेक अडथळे असतात. कष्ट असतात. कुठलंही यश सहजासहजी मिळतच नाही. दिव्यानेही बुद्धिबळासारख्या सर्वोच्च बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेल्या खेळात अशाच कष्टाने, साधनेने यश मिळविले आहे. त्यामागे तिच्या पालकांची मेहनत तर आहेच; पण स्वत: दिव्यानेही विलक्षण जिद्दीने आणि कठोर मेहनतीने हे यश प्राप्त केले आहे, यात शंका नाही. दिव्याने बुद्धिबळात लक्ष केंद्रित करायचे ठरवल्यावर तिच्या नियमित अभ्यासाकडेही दुर्लक्ष केले नाही. मुळातच ती एक हुशार विद्यार्थिनी असल्याने दहावी व बारावी या बोर्ड परीक्षाही ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. अनेकदा तर स्पर्धेच्या काळात, दोन सामन्यांच्या दरम्यान तिने शाळेचा अभ्यास केला आहे. वास्तविक त्या सामन्याचेही एक निराळे दडपण तिच्यावर असणारच. मात्र, तिने बुद्धिबळ व शाळेचा अभ्यास या दोन्हींकडे नीट लक्ष दिले व दोन्हींवर अन्याय होऊ दिला नाही. सध्या मात्र ती विविध स्पर्धांमध्ये एवढी व्यग्र आहे, की पुढचे शिक्षण दूरस्थ पद्धतीने घेण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

कुठल्याही खेळात खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक सक्षमतेची कसोटी लागते. बुद्धिब‌ळासारख्या खेळात तर खेळाडूंच्या मानसिक सक्षमतेची जणू परीक्षाच पाहिली जाते. मानसिक कणखरणा नसेल तर कुणीही खेळाडू बुद्धिबळात टिकूच शकणार नाही. त्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळायचे असेल, तर अत्यंत उच्च दर्जाची मानसिक तयारी करावी लागते. याशिवाय नियमित सरावही महत्त्वाचा असतो. समोरचा प्रतिस्पर्धी कोण आहे, कसा आहे, त्याचं आधीचं रेकॉर्ड कसं आहे हे सर्व बघावं लागतं. अतिशय आधुनिक अशा संगणकांवर बुद्धिबळाचे अनेक डाव तयार केले जातात. आतापर्यंत विविध स्पर्धांत खेळले गेलेले डावही संगणकावर अभ्यासता येतात. किंबहुना, संगणकही बुद्धिबळ ‘खेळतो’, हे आता सर्वज्ञात आहे. संगणकाबरोबर बुद्धिबळ खेळून त्याला हरवून दाखवणं ही फारच उच्च कोटीची कामगिरी मानली जाते. याचे कारण जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या उत्तमोत्तम डावांचा, चालींचा, डावपेचांचा अभ्यास करून संगणकाच्या खेळाचा ‘प्रोग्राम’ तयार केला जातो. संगणकाच्या सर्व चाली अशा गणिती पद्धतीने व अचूक तयार केलेल्या असल्याने, त्या ओळखून, त्याला कोड्यात पाडता येईल अशा प्रतिचाली रचणे, तसा विचार करू शकणे हे अत्यंत अव्वल बुद्धिमत्ता असलेले खेळाडूच करू शकतात. दिव्या ही अशा प्रकारची खेळाडू आहे. बऱ्याच खेळाडूंना जन्मत:च काही विशिष्ट कौशल्यांची (उदा. वेगात आकडेमोड करता येणे) देणगी असते. बुद्धिबळ खेळू शकणाऱ्या खेळाडूंचा मेंदूही अशा काही विशिष्ट, दैवदत्त कौशल्यांनी युक्त असतो. त्याचा त्यांना खेळताना फायदा होत असला, तरी अनेकदा समोरचे खेळाडूही तसेच व तितकेच तयारीचे असल्याने, वैयक्तिक कठोर मेहनत व प्रचंड पूर्वतयारी यांना पर्यायच नसतो. दिव्याचे भव्य यश म्हणजे अशाच अत्यंत कठीण व्रताचे फळ आहे, असेच म्हणावे लागेल.
दिव्याची ही कहाणी वाचल्यावर असं वाटतं, की आपण कुणीही आपल्या आयुष्यात दिव्यासारखं भव्य यश मिळवू शकतो. मात्र, त्यासाठी कुठल्या तरी एका क्षेत्राची अतिशय मनापासून आवड असायला हवी आणि त्या क्षेत्रातील सर्वोत्तम स्थान मिळविण्यासाठी अफाट मेहनत करायची तयारीही हवी. कार्यमग्नतेचा ध्यास आणि कार्यसाधनेची आस घेऊन आयुष्यात पुढं जाण्याची जिद्द हवी. अशा जिद्दीने कष्ट केल्यास यश आपल्या पायाशी नक्की लोळण घेईल, यात अजिबात शंका नाही.

---

(पूर्वप्रसिद्धी : मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक, २०२५)

---

27 Jan 2026

समदा दिवाळी अंक २५ - लेख

स्वप्नांचं ‘टेकऑफ’...
-------------------------

आपल्या आयुष्यात स्वप्न हा प्रकारच नसता तर आयुष्य भलतंच नीरस झालं असतं. आपण स्वप्न पाहू शकतो, म्हणून आजचा दिवस काढू शकतो. एखादं स्वप्न पाहणं, कुठलं तरी उद्दिष्ट ठेवणं, जिद्दीनं ते पूर्ण करणं हा सगळा प्रवास म्हणजेच खरं तर आपलं आयुष्य असतं, असंही म्हणायला हरकत नाही.
आता इथं स्वप्न याचे दोन अर्थ संभवतात. एक आपल्याला झोपेत पडतं ते आणि दुसरं म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो, ती पूर्ण व्हावी म्हणून धडपडतो ते... पण या दोन्हींचा एकमेकींशी अन्योन्य संबंध आहे. कसा? आपण झोपेत पडणारं स्वप्न पाहायला कधीपासून सुरुवात करतो बरं? आपण अगदी तान्हं बाळ असतानाही आपल्याला तसं स्वप्न पडत असणार. आता ते काही आपल्याला आठवणार नाही; पण अनेक लहान बाळं झोपेतल्या झोपेत खुदकन हसताना दिसतात, तेव्हा ती काय बघत असतील? कसला विचार करत असतील? काय दिसत असेल त्यांना? माहिती नाही. पण खूप लहानपणापासून आपण स्वप्नं पाहतो, हे नक्की. स्वप्न म्हणजे अबोध मनाच्या राज्यातला प्रदेश. आपल्या अबोध मनात जे काही विचार चालू असतात किंवा जे काही आपल्याला वाटत असतं, तेच स्वप्नांच्या रूपात दिसतं म्हणे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे किंवा एखादं पद हवं आहे किंवा बढती हवी आहे किंवा बंगला-गाडी-घोडा असं जे जे काही भौतिक हवं आहे ते ते आपल्याला स्वप्नात कधी ना कधी तरी दिसतं. त्यामुळंच आपल्या भाषेत स्वप्न याचा एक अर्थ मनातील इच्छा, आकांक्षा किंवा नुसतीच आशा असा आहे.
त्यामुळं अशा स्वप्नांविषयी बोलायचं तर ते काही अशा एखाद्या लेखात मावायचं नाही. अशी किती तरी स्वप्नं पाहिली! स्वप्नं पाहण्यावर अजून तरी कुणाची बंदी नाही. त्यामुळं हवी तेवढी स्वप्नं पाहावीत. ती पूर्ण होतील किंवा न होतील; किंबहुना बरीचशी तर नाहीच होणार. मग काय करायचं? काही नाही; स्वप्नं पाहत राहायचं. एक ना एक एखादं तरी स्वप्न पूर्ण होतंच, असा माझा अनुभव आहे.
यातल्या काही महत्त्वाच्या स्वप्नांचे, स्वप्नपूर्तीचे अनुभव सांगायलाच हवेत. यातलं पहिलं सर्वांत महत्त्वाचं माझं स्वप्नहोतं ते ड्रायव्हर व्हायचं! हो, ड्रायव्हर... तोही एसटीचा ड्रायव्हर! (बहुतेक मुलग्यांचं हे स्वप्न असतंच!) त्या वेळी सार्वजनिक प्रवासी वाहनांतूनच बहुसंख्य मध्यमवर्गीय लोक प्रवास करायचे. त्यामुळं एसटीचा प्रवास नित्याचाच. अनेक लहान मुलांना ड्रायव्हरच्या मागची सीट हवी असे. त्यात मीही आलो. ड्रायव्हरच्या मागची आडवी सहा जणांची सीट ड्रायव्हरकडं पाठ करून असे. तिथं बसणाऱ्यांना स्वाभाविकच पुढचं काही दिसायचं नाही. त्यामुळं अनेक मुलं या सीटवर उलट तोंड करून, ड्रायव्हरच्या मागची जाळी धरून समोरच्या काचेतून पुढला रस्ता पाहत असत. मीही तसंच करत असे. अधूनमधून ड्रायव्हरचंही निरीक्षण करणं सुरू असे. एवढी मोठी गाडी चालवणारा, घाटात ते स्टिअरिंग गरगर फिरवणारा, मनात येईल तेव्हा तो हॉर्न वाजवणारा ड्रायव्हर म्हणजे त्या सहा चाकांवरच्या फिरत्या देखाव्याचा अनभिषिक्त राजाच असे. पूर्वी दिवाळी किंवा सुट्टीच्या काळात एसट्यांना प्रचंड गर्दी असे. आरक्षण करून प्रवास करणं वगैरे गोष्टी गावाकडच्या लोकांच्या अंगवळणी पडल्या नव्हत्या. एसटी आली की घुसायचं आणि मिळेल त्या मार्गाने (अगदी ‘संकटकालीन खिडकी’तूनही) सीट पटकवायची हेच एकमेव ध्येय असायचं. अशा वेळी संपूर्ण गाडीत ज्या दोनच सीट्सना कुणी हात लावायचं नाही त्या म्हणजे ड्रायव्हर व कंडक्टरच्या सीट्स. त्यातही एखादा कनवाळू कंडक्टर असेल तर तो सगळ्या गाडीची तिकिटं फाडून होईपर्यंत आपल्या जागेवर एखाद्या वृद्ध व्यक्तीला बसायला देतही असे. पण ड्रायव्हरच्या सीटवर कोण बसणार? त्यामुळं सगळी गाडी खचाखच भरली, अगदी पुढच्या बॉनेटवर व शेजारच्या लाकडी पेटीवरही प्रवासी बसले, की ऐटीत येऊन स्टिअरिंगसमोरच्या सीटवर बसणारा, गळ्यातला गमछा सारखा करून घाम पुसणारा, कुणाचा तरी डबा शेजारी ठेवून घेणारा, ओळखीच्या एखाद्या पोराला उजव्या हाताला दारात अगदी कोंबून बसवणारा आणि निघण्यापूर्वी त्या खिडकीतून बाहेर पचकन पानाचा तोबरा थुंकणारा तो अफाट चक्रधर केवळ हेव्याचा विषय असे. त्या संपूर्ण गाडीवर सत्ता गाजवणारा तो सत्ताधीश वाटे. ड्रायव्हिंग सीटचा आणि सत्तेचा असा जवळचा संबंध आहे. ‘ड्रायव्हिंग सीटवर असणे’ वगैरे वाक्प्रचार त्यातूनच रूढ झाले असावेत.
एकदा तुम्हाला ड्रायव्हरची ही महती कळली, की मग ड्रायव्हर होणं हे मुख्य स्वप्न राहतं. कुठलं वाहन ते दुय्यम ठरतं. त्यामुळंच मग भविष्यात ट्रक, टॅक्सी, रेल्वे, आगबोट किंवा विमान (अगदी स्पेस शटलही) यापैकी कुठलंही वाहन चालवणाऱ्या ‘ड्रायव्हर’विषयी असूया, हेवा, त्याच वेळी आत्मीयता, जिव्हाळा अशा सगळ्याच भावना दाटून यायला लागल्या. पु. ल. देशपांडेंनी त्यांना ‘रेल्वे इंजिनचा ड्रायव्हर’ व्हायचं होतं, यावर एक लेख लिहिला आहे. माझ्या आयुष्यात रेल्वे तेवढी आली नाही. मात्र, विमानाच्या ‘ड्रायव्हर’विषयी, अर्थात वैमानिकाविषयी पुढं पुष्कळ आकर्षण निर्माण झालं. हे ‘सीरियस अफेअर’ होतं. अगदी आजही, मला मी वैमानिक व्हायला हवं होतं, असंच वाटतं. बाकी कुठल्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रानं मला फार वेगानं आपल्याकडं खेचून घेतलं. आयुष्यात पहिला खराखुरा विमानप्रवास घडायला वयाची ३१ वर्षं उलटून जावी लागली. पुढं तो अगदी सातत्यानं नाही, तरी बऱ्यापैकी घडला. अगदी परदेश प्रवासही झाले. मात्र, पहिल्या विमान प्रवासाच्या वेळी टिकलेलं वैमानिक या जमातीविषयीचं आकर्षण किंवा प्रेम आजही कायम आहे. इथं एक गोष्ट सांगायला पाहिजे. मला उंचीची कधी भीती वाटली नाही. त्यामुळंच पहिल्यांदा विमान प्रवास करताना खरोखर कुठलीही भीती वाटली नाही; उलट ती उंचावरून दिसणारी दृश्यं छान एंजॉय केली. याउलट मला समुद्राची भीती वाटते. किंवा एकूणच पाण्याची! (पोहता येत नसल्यामुळं असेल...) पण पंचमहाभूतांपैकी एकाची तरी अशी भीती वाटतेच. तर, मुद्दा असा, की उंचीची भीती वाटत नसल्याने विमान चालवता यावं किंवा उंच आकाशात भराऱ्या माराव्यात, या स्वप्नाला बळच मिळत गेलं.
आजकालच्या मुलांमध्ये अनेक गोष्टी अत्यंत स्पष्ट असतात. आपल्याला पुढं काय व्हायचंय वगैरे हा त्यांचा फोकस अगदी लहान वयातच विकसित झालेला असतो. मी ज्या काळातून, शिक्षण व्यवस्थेतून आणि ग्रामीण भागातून आलो, तिथं दुर्दैवानं अशी स्वप्नं पाहण्याची मुभाच नव्हती. ‘हे आपल्यासाठी नाही,’ हे मनात अगदी आपोआप ठसून जात असे. त्यामुळं लहानपणापासून हे स्वप्न पाहण्याचा, त्याचा पाठपुरावा करण्याचा किंवा ते पूर्ण व्हावं म्हणून धडपड करण्याचा प्रश्नच आला नाही. अर्थात या सबबी नाहीत. तशी संधी मिळाली असती तरी केलं असतं का, हा प्रश्न आहेच. मात्र, आज अगदी तीव्रतेनं वाटतं, की आता सध्या मी ज्या पत्रकारितेच्या पेशात आहे (आणि तो मला आवडतो) त्यात नसतो, तर नक्कीच वैमानिक व्हायला आवडलं असतं. आता हे स्वप्न पूर्ण होणं अशक्यच. मग ते स्वप्न हीच आवड किंवा छंद म्हणून जोपासणं हा दुसरा पर्याय. मी आता तेच करतो. मी यूट्यूबवर किंवा इतर कुठल्याही समाजमाध्यमावर विमानांचे, वैमानिकांचे, विमानतळांचे व्हिडिओ पाहतो. सुदैवानं वैमानिकांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक रोचक घटना कुणी ना कुणी तरी चित्रित करून ठेवली आहे. वैमानिकांचे अनेक ग्रुप आहेत. अनेक पेजेस आहेत. तिथं या संदर्भातील माहिती सातत्याने लिहिली जाते. जगातल्या विविध विमानतळांवर टेकऑफ आणि लँडिंगचे अक्षरश: हजारो व्हिडिओ आज आंतरजालात उपलब्ध आहेत. कितीही वेळा हे व्हिडिओ पाहिले तरी मन भरत नाही. जगभरात आज विमानतळांची संख्या मोठी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढते आहे. आता केवळ अमेरिका, युरोप या खंडांतच नव्हे, तर विकसनशील देशांतही विमानतळांची उभारणी होत आहे. जगभरातील महानगरांत तर एकाहून अधिक विमानतळ आहेत. ही बलाढ्य विमानतळं म्हणजे एक स्वतंत्र विश्वच आहे. विमानाचे उड्डाण आणि लँडिंग ही मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे, बिनचूक पार पाडावी लागते. त्यासाठी मोठी यंत्रणा काम करत असते. विमानतळावरचं लॉजिस्टिक्स आणि त्याचं व्यवस्थापन हाही एक अवाढव्य प्रकार असतो. एअर ट्रॅफिक कंट्रोल, ग्राउंड स्टाफ आणि प्रत्यक्ष विमानातील वैमानिक या तिघांच्या समन्वयातून एक उड्डाण यशस्वी होते. अशी अक्षरश: हजारो उड्डाणं दररोज होत असतात. यात अगदी सेकंदासेकंदाच्या हिशेबाने कामं चाललेली असतात. एक बारीकशी चूक अनेक प्रवाशांच्या जिवाशी खेळ ठरू शकते. (नुकत्याच अहमदाबादमध्ये झालेल्या ‘एअर इंडिया’च्या विमानाच्या दुर्दैवी अपघाताची आठवण या संदर्भात आल्याशिवाय राहत नाही.) एखादी गोष्ट जेवढी अधिक गुंतागुंतीची, तेवढी ती पार पाडण्यासाठी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या माणसांची गरज लागते. अशा अनेक लोकांचा समूह एकत्र येऊन आपल्या बुद्धिसामर्थ्यावर व इतर विकसित कौशल्याच्या आधारावर विमानोड्डाणासारखं काम यशस्वी करून दाखवतो, तेव्हा मला त्या गोष्टीचं तीव्र आकर्षण वाटत राहतं.

विमानाचं उड्डाण ही मला आजही एक अद्भुत गोष्ट वाटते. आपणही पक्ष्यासारखं आकाशात तरंगत राहावं, हे माणसाचं कधीपासून स्वप्न होतं कोण जाणे. अमेरिकेच्या राइट बंधूंनी अखेर ते पूर्ण केलं, तो अगदी ताजा इतिहास. जेमतेम सव्वाशे-दीडशे वर्षांचा. मानवजातीच्या अस्तित्वाच्या कालखंडाशी तुलना केली तर ही प्रगती जेमतेम काही सेकंदांपूर्वी झालीय, असंच म्हणावं लागेल. प्रत्येक वेळी विमान आकाशाच्या अथांग पोकळीकडं झेप घेतं, तेव्हा माणसाच्या विजिगीषु वृत्तीला, त्याच्या प्रज्ञेला, त्याच्या जिद्दीला व अनंत ध्येयासक्तीला सलाम करावासा वाटतो. अगदी लहानपणी कधी आकाशातून उडणारं विमान पाहिलं, किंवा विमानाचा नुसता आवाज आला, तरी मी ते बघायला धावायचो. अगदी आजही, अनेकदा विमान प्रवास झाले असले तरीही, विमानाचा आवाज ऐकला की नजर आकाशाकडं जातेच. सुदैवानं पुण्यात मी जिथं राहतो, तिथून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) धावपट्टी अगदी जवळ आहे. एनडीएचं एक छोटं, दोन सीटर विमान जवळपास रोज सॉर्टीसाठी उड्डाण करतं. तेव्हा ते अगदी कमी उंचीवरून आमच्या घरावरून उडत जातं. ते मी न चुकता पाहतो. ते एवढ्या खालून जातं, की अनेकदा त्याच्या पंखांवर रोमन लिपीतून लिहिलेली NDA ही आद्याक्षरंही वाचता येतात. याच एनडीएच्या प्रांगणात वर्षातून दोन वेळा दीक्षान्त समारंभ होतात, तेव्हा सूर्यकिरण नामक पथकातील खास विमानांची प्रात्यक्षिकं होतात. ती बघताना डोळ्यांचं पारणं फिटतं. वैमानिकाच्या कॉकपिटमध्ये एकदा तरी बसून बघण्याचं माझं स्वप्न आहे. ते मात्र अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळंच तर मी कित्येकदा वैमानिकांच्या कॉकपिटमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यांतून चित्रित झालेले कित्येक टेकऑफ आणि लँडिंग पाहत असतो. अनेकदा पुष्कळ प्रवासीही विमानाच्या खिडकीतून दिसणारी कित्येक सुंदर दृश्यं टिपतात. तशी दृश्यं तुम्हाला एरवी स्वप्नातही बघायला मिळणं कठीण. उत्तर ध्रुवाच्या प्रदेशावरून विमान जात असतानाचं दृश्य, हिमालयाच्या शुभ्र पर्वतरांगांवरून जाताना दिसणारं दृश्य, एका विमानातून शेजारून चाललेल्या दुसऱ्या विमानाचं दृश्य, विमानाच्या खिडकीतून दिसणारे अथांग महासागर, ढगांचे कधी गोजिरवाणे, तर कधी भयावह दिसणारे अवाढव्य आकार, सूर्योदय, सूर्यास्त, वाळवंट, मोठमोठ्या नद्या... अक्षरश: डोळ्यांचे पारणे फिडणारी अशी कित्येक दृश्यं अशा व्हिडिओंतून आपल्याला बघायला मिळतात. मला ते व्हिडिओ बघण्याचा अजिबात कंटाळा येत नाही. एकदा आपण तसे व्हिडिओ बघायला लागलो, की संबंधित समाजमाध्यमाद्वारे त्याच प्रकारचे आणखी व्हिडिओ आपल्यासमोर आणले जातात. त्यातून आणखी वेगळे व्हिडिओ, वेगळी दृश्यं, कित्येक चित्तथरारक दृश्यचौकटी बघायला मिळतात.
वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नसलं तरी विमान प्रवासाचं स्वप्न मात्र पूर्ण झालं. मी माझ्या आयुष्यात पहिला विमान प्रवास केला तो वयाच्या ३१ व्या वर्षी. मुंबई ते बेंगळुरू असा तो प्रवास होता. विमानानं टेकऑफसाठी रनवेवर धावायला सुरुवात केली तेव्हा पोटात थोडा खड्डा पडल्यासारखं झालं. पण ते काही क्षणच. शरीराला एवढ्या प्रचंड वेगाची सवयच नव्हती. मात्र, पुढं मला काहीच त्रास झाला नाही व तो प्रवास अगदी एंजॉय केला. आभाळातून धरती कशी दिसते, ढगांचे पुंजके कसे विहरतात, लँडिंगच्या वेळी अगदी लहान लहान दिसणाऱ्या इमारती, घरं, शेतं हळूहळू मूळ रूपात कशी दिसू लागतात हे सगळं मी लहान मुलाच्या डोळ्यांनी अनुभवलं. लवकरच परदेश प्रवास करायचाही योग आला. आमच्या ऑफिसतर्फे थायलंड एका बिझनेस टूरवर जायला मिळालं. तो प्रवासही मोठा होता. समुद्रावरून होता. तो एक वेगळाच अनुभव होता. शिवाय एकट्याने केलेलाही तो पहिलाच परदेश प्रवास होता. आपण कधी विमानात बसू, परदेशात जाऊ असं मला लहानपणी कधीही वाटलं नव्हतं. मात्र, सुदैवानं आपल्या देशात अनेकांची ही (आता छोटी छोटी म्हणता येतील, अशी) स्वप्नं जशी पूर्ण झाली, तशी ती माझीही झाली. त्यानंतर एकदा सिंगापूरची सहल झाली. त्या वेळी ‘बोइंग ए ३८०’ या महाकाय, डबलडेकर जंबोजेटमध्ये बसण्याचंही स्वप्न पूर्ण झालं. मात्र माझं खरं स्वप्न होतं ते लंडनला जाण्याचं. पुलंचं ‘अपूर्वाई’ वाचल्यापासून मला लंडन शहराला भेट देण्याची ओढ लागली होती. अमेरिका किंवा इतर कुठल्याही देशापेक्षा मला लंडनला जावंसं वाटत होतं. का ते माहिती नाही. मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्याची कुठलीही शक्यता दिसत नव्हती. अखेर काही वर्षांपूर्वी तशी संधी मिळाली व मी कुटुंबासह फक्त लंडन व पॅरिस या दोनच शहरांना भेट देणारी छोटेखानी (पण तरीही बरीच खर्चीक) सहल बुक केली. मात्र, हाय रे दुर्दैवा! त्या वेळी कोव्हिडची साथ सुरू झाल्याने ती ट्रिपच बारगळली. लंडनचं स्वप्न अधुरंच राहिलं. मात्र, माझी इच्छाशक्ती तीव्र होती. त्यामुळं अखेर २०२३ च्या ऑगस्टमध्ये लंडनवारी करता आली. प्रवासी कंपनीकडून टूर न घेता, आम्ही आमची आमची ही सहल केली. लंडनमध्ये माझा मेव्हणा राहत असल्यानं तिथं राहण्याचा प्रश्न नव्हता. उलट या आठ दिवसांत मनाजोगतं शहर भटकता आलं. खूप वर्षांपासूनचं एक स्वप्न पूर्ण झालं.
जगातील किमान दहा मोठी शहरं बघायची असंही एक स्वप्न आहे. त्यातली निदान दोन ते तीन बघून झाली आहेत. इतरही होतील, अशी आशा आहे. याशिवाय इतर लहान-मोठ्या स्वप्नांचीही ‘बकेट लिस्ट’ बरीच मोठी आहे. सगळीच स्वप्नं पूर्ण होत नाहीत हे माहिती आहे. मात्र, पूर्ण होणार नाहीत म्हणून ती स्वप्नात बघण्याचं सुख का गमवायचं, नाही का?

---

(पूर्वप्रसिद्धी : समदा दिवाळी अंक, २०२५. संपादक - मनस्विनी प्रभुणे-नायक)

---