26 Jun 2025

‘घायल’विषयी...

‘घायल’ची पस्तिशी…
--------------------------

परवा सहज ‘इन्स्टाग्राम’वर स्क्रोल करत होतो तर ‘घायल’वर सनी देओलची पोस्ट बघायला मिळाली. त्यात त्याने लिहिलं होतं, की आज (२२ जून) ‘घायल’ रिलीज होऊन ३५ वर्षे झाली. ‘घायल’ रिलीज झाला २२ जून १९९० रोजी! बापरे! बघता बघता ३५ वर्षं झाली. अगदी काल-परवा नवा रिलीज झालेला हा सिनेमा बघितल्याचं मला आठवत होतं. अर्थात मी तेव्हा खूप लहान, म्हणजे साडेचौदा-पंधरा वर्षांचा होतो. आज मात्र ‘घायल’ हा एक ‘कल्ट मूव्ही’ (नवा मार्ग तयार करणारा) आहे, असं आपण सहज म्हणू शकतो. कारण ‘घायल’ने त्या वेळेला सिनेमासृष्टीमध्ये एक तुफान आणलं आणि सनी देओलला एक ॲक्शन हिरो म्हणून प्रस्थापित केलं, यात वाद नाही
‘घायल’ प्रदर्शित झाला, त्या वेळची भारताची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थिती आजपेक्षा खूपच वेगळी होती. तेव्हा ‘मंडल’विरोधात आंदोलन सुरू होतं. केंद्रातलं राजीव गांधींचं सरकार जाऊन विश्वनाथ प्रताप सिंहांचं सरकार सत्तेत आलं होतं. तरुणांमध्ये एक अस्वस्थता होती. आणखी एक म्हणजे,  हा १९९१ च्या आधीचा, म्हणजे जागतिकीकरणाच्या आधीचा काळ होता. बरोबर त्याच्या आधी एक वर्ष हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. एका अर्थाने जागतिकीकरणापूर्वीच्या भारताचं दर्शन या सिनेमामध्ये होतं. घायल दिग्दर्शित केला आहे राजकुमार संतोषीने. संतोषी हा एक अफलातून दिग्दर्शक आहे. मी असं वाचलं होतं, की संतोषीने ‘घायल’ची कथा जेव्हा लिहिली त्या वेळेला कमल हसनला हिरो म्हणून घेऊन हा चित्रपट करायचा ठरवलं होतं. आता आपण कल्पनाच करू शकत नाही, की ‘घायल’चा हिरो कमल हसन असता तर काय झालं असतं! अर्थात तसं झालं नाही तो भाग वेगळा. मग संतोषी धर्मेंद्रकडे गेला आणि धर्मेंद्रने हा चित्रपट निर्माण करायचं ठरवलं. त्यानंतरचा पुढचा सगळा इतिहास आहे.
‘घायल’ हे उत्कृष्ट स्टोरीटेलिंगचं उदाहरण आहे. म्हणायला गेलं तर साधा एक ॲक्शनपट. पण त्या काळाच्या पार्श्वभूमीवर आपण या सिनेमाकडे बघितलं तर ‘घायल’चं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. ‘घायल’ इतक्या वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शकाने एका चौकटीत बसवला आहे, की आता तो बारकाईने बघताना आपण अक्षरशः थक्क होतो. अजय मेहरा नावाच्या मुंबईतल्या तरुणाची ही गोष्ट आहे. गोष्ट अगदी साधी. अजय (सनी) हा एक होतकरू बॉक्सिंगपटू आहे. त्याचं वर्षा (मीनाक्षी शेषाद्री) नावाच्या मुलीवर प्रेम आहे आणि त्याला एक मोठा भाऊ (राज बब्बर) आहे आणि एक अतिशय प्रेमळ अशी वहिनी (मौसमी चटर्जी) आहे. असं छान सुखी कुटुंब आहे. त्यात एकदा बॉक्सिंगच्या ट्रेनिंगला अजयला बेंगलोरला जावं लागतं आणि इकडे त्याचा भाऊ त्याला फोन करतो आणि सांगतो, की मला तुझ्या मदतीची गरज आहे आणि मी खूप अस्वस्थ आहे. अजय फोन ठेवतो आणि लगेच मुंबईला येतो. तिथे आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं, की बलवंत राय (अमरीश पुरी) नावाच्या एका बड्या धेंडाकडे आपला भाऊ काम करत होता. मग अन्नू कपूर त्याला ती सगळी स्टोरी सांगतो. सिनेमा आपण बहुतेक सगळ्यांनी बघितला आहे. त्यामुळे पुन्हा इथे पुनरुक्ती करत नाही. पण त्यानंतर सर्व सिस्टीमला ज्या पद्धतीने हा अजय धडका देतो, तो या सिनेमाचा गाभा आहे. मग ते भ्रष्टाचारी पोलिस असतील; घरातला आहे असं दाखवून उलटलेला तो बॅरिस्टर गुप्ता (शफी इनामदार) असेल, बलवंत रायला मदत करणारे राजकारणी असतील! हे सर्व लढे दिग्दर्शकाने बारकाईने दाखवले आहेत. इंटरव्हलनंतर ज्या पद्धतीने अजयचा उद्रेक होतो, तशी ॲक्शन तोवरच्या हिंदी सिनेमात फार क्वचित आपल्याला बघायला मिळाली होती. एक अर्थाने इथे ‘जंजीर’शी तुलना करण्याचा मोह होतो. अमिताभला ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून प्रस्थापित करणारा ‘जंजीर’ आणि सनीला ॲक्शन हिरो म्हणून प्रस्थापित करणारा ‘घायल’ या दोन्ही सिनेमांत बरीच साम्यस्थळं आहेत. आता काळामधला फरक लक्षात घेतला तर त्या वेळेला अमिताभ पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत होता आणि ‘घायल’मधला नायक पोलिसांसह सर्व व्यवस्थेला आव्हान देतो. या दोन चित्रपटांमध्ये साधारण १८ वर्षांचा काळ मध्ये गेला होता. भारतामधल्या एकूण सामाजिक व्यवस्थेमधला झालेला ढासळता बदल या सिनेमात अगदी स्पष्ट दिसून येतो.
‘घायल’ हा जागतिकीकरणाच्या आधीचा सिनेमा असल्यामुळे त्यात लँडलाईन फोन, अगदी ती तपकिरी रंगाची रेल्वे वगैरे असं सगळं दिसतं. मुंबईही कमी गर्दीची दिसते. एक वेगळं जग यात दिसतं. अन्नू कपूर सनीला बॉक्सिंग रिंगमध्ये लढवतो आणि तिथं पैसे कमावतो, तेही गमतीशीर आहे. एक मात्र नक्की आहे. ‘घायल’ बघताना आपल्याला एक क्षणही कंटाळा येत नाही. त्या सिनेमाच्या संकलनाचंही (व्ही. एन. मयेकर) हे यश आहे. ‘घायल’ला संगीत बप्पी लहिरींचं आहे. लता मंगेशकर आणि पंकज उधास यांचं एक द्वंद्वंगीत (माहिया) अगदी सुरुवातीला येतं. इतर गाणीही चांगली आहेत. एक आयटम साँगही आहे. बाकी तेव्हा ‘महाभारत’ किती लोकप्रिय होतं, ते यात प्रवीणकुमारला (‘महाभारता’तला भीम) एका दृश्यात आणलंय, त्यावरून सहज लक्षात येतं.
या सिनेमाने सनी देओलला एक ॲक्शन हिरो म्हणून अगदी वरच्या लीगमध्ये प्रस्थापित केलं. सनीची ॲक्शन हे इतर ॲक्शन हिरोंपेक्षा वेगळी आहे. कोर्टातला सीन बघा. बॅरिस्टर गुप्ता सनीवर  अतिशय घाणेरडा आरोप करतो, त्या वेळेला त्याचा जो काही उद्रेक आहे तो बघण्यासारखा आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात खदखदत असलेल्या एका संतापाला, चिडीला सनीने यात वाट करून दिली आहे. या चित्रपटात आणि नंतर जणू याचा सीक्वेला असल्यासारखा असलेला ‘घातक’सारखा सिनेमा असेल किंवा ‘दामिनी’मधला त्याचा वकिलाचा रोल असेल; एका अर्थाने एक अँटिएस्टॅब्लिशमेंट हिरो म्हणून सनीने आपलं निर्विवाद वर्चस्व सिनेमासृष्टीत स्थापन केलं. अर्थात मूळ श्रेय ‘घायल’चंच. सनीने या भूमिकेवर खूप काम केलं होतं म्हणा, किंवा संतोषीनं त्याच्याकडून ती भूमिका काढून घेतली म्हणा. अजय मेहरा म्हणजे सनीच! स्वत: सनीचीही ही अतिशय आवडती भूमिका आहे, यात आश्चर्य नाही.
अमरीश पुरीने यातला बलवंत राय हा व्हिलन इतका जबरदस्त साकारलाय, की क्या बात है! बलवंत राय आजही लक्षात आहे. राज बब्बरनेही भावाची भूमिका चांगली केलीय. बॅरिस्टर गुप्ताच्या पाताळयंत्री पात्राच्या भूमिकेत शफी इनामदार सहजतेने वावरले आहेत.  कुलभूषण खरबंदा पोलिस कमिशनरच्या भूमिकेत आहे. या सिनेमात अजय पोलिस कमिशनरलाच ओलीस धरतो;  तेही त्याच्याच घरात जाऊन, हे जरा अतीच दाखवलं आहे, सूडाची परिसीमा म्हणून आणि सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून त्या वेळेला प्रेक्षकांनी कदाचित ते स्वीकारलं असेल. बाकी यातले अगदी छोटे छोटे रोलही लक्षात आहेत. अजयचे ट्रेनर विजू खोटेचा थोडासा कॉमेडी रोल आहे. बलवंत रायचा सहायक मोहिले (ब्रह्मचारी) हाही लक्षात राहतो. शरद सक्सेना आहे. अन्नू कपूरही लक्षात राहतो. यात अतिशय वेगळा रोल आहे तो ओम पुरीचा. एसीपी डिसूझा म्हणून ओम पुरी सिनेमाच्या उत्तरार्धात येतात. ही भूमिका अतिशय चांगला लिहिलेली आहे. ते सनीला पकडण्यासाठी प्रयत्न करत असतात, त्या वेळेला सनीचा आणि त्यांचा एक अगदी समोरासमोरचा एक संवाद आहे, तो अतिशय ऐकण्यासारखा आहे. (सलीम-जावेद जोडीची आठवण येते.) किंबहुना यातल्या अनेक संवादांना थिएटरमध्ये अतिशय टाळ्या पडायच्या. तो सिंगल स्क्रीन थिएटरचा जमाना होता. त्यात ‘घायल’ म्हणजे काय विचारू नका! अजय जेव्हा तुरुंगात जातो तिथं मग त्याला तीन मित्र भेटतात. त्यात सुदेश बेरी, शब्बीर खान आणि मितवा नावाचा एक नट आहे. (सिनेमातही त्याचं नाव मितवा असंच आहे.) तेच तिघं मिळून मग अजयला मदत करतात आणि मग तो सगळा सूड पूर्ण करतो.
आज ३५ वर्षांनी ‘घायल’ बघताना असं वाटलं, की आपण किती पुढे आलो! काळ केवढा बदलला! तेव्हा अजयचं कुटुंब एकत्र होतं. तो भाऊ-वहिनीबरोबर राहत होता आणि भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो हे सगळं करतो. आज असं होईल का? न्यूक्लिअर फॅमिली असलेल्या आजच्या काळात हे जरा कठीण वाटतं. सिनेमात सुरुवातीचं जे गाणं आहे ‘सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा,’  हे त्या तात्कालिक कुटुंबव्यवस्थेचं दर्शन घडवतं. ते खूप आनंद देणारं गाणं आहे. एकीकडं सगळं छान चाललेलं असतं आणि मग ते सगळं एका बड्या माणसामुळे कसं बिनसतं याची एक गडद पार्श्वभूमी हे गाणं तयार करतं.
‘घायल’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घायल ‘रि-रन‘लाही खूप चालला. नंतर १९९१, ९२, ९३ या सर्व काळात तो पुन:पुन्हा पडद्यावर येत राहिला. मी डेक्कन टॉकीजला ‘घायल’ अनेकदा बघितला. मॅटिनी शो असायचा आणि त्या शोला आम्ही काही मित्र नेहमी जायचो.
…मध्ये खूप वर्षे गेली आणि परवा अचानक सनी देओलच्या त्या पोस्टमुळे ‘घायल’ची आठवण आली आणि मग मी ‘ॲमेझॉन प्राइम’वर तो परत बघितला. पुन्हा तो बघतानाही मला अजिबात कंटाळा आला नाही. मी सर्वच्या सर्व सिनेमा परत एकदा एंजॉय केला. त्यासाठी राजकुमार संतोषी आणि ‘घायल’च्या सगळ्या टीमला दाद द्यावी लागेल. तेव्हा व्यावसायिकदृष्ट्या सुपरहिट आणि त्याच वेळेला पुढे जाऊन एक ‘कल्ट मूव्ही’ झालेला ‘घायल’  कधीही बघा, कंटाळा येणार नाही. माझा स्वतःचा हा अतिशय आवडता सिनेमा आहे. अशा सिनेमाला ३५  वर्षं झाली, यावर खरोखर विश्वास बसत नाही. आता मी पन्नाशीला आलोय आणि सनी देओल ६७ वर्षांचा झालाय. आजही तो ‘जाट’ नावाचा सिनेमा करतो आणि मी तोही एंजॉय करतो. अर्थात ‘घायल’ तो ‘घायल’च. तो बघण्यासारखी मजा कशातच नाही.


------------

No comments:

Post a Comment