20 Apr 2025

कूर्ग ट्रिप १२-१५ एप्रिल २५ (भाग ३)

कावेरीच्या उगमापासून कॉफीच्या बियांपर्यंत...
-------------------------------------------------------


कूर्ग, १४ एप्रिल २५

आज ब्रेकफास्ट झाल्यावर बरोबर नऊ वाजता अराफात हॉटेलपाशी आला. आम्ही लगेच निघालो ते तलकावेरीला. हे कावेरी नदीचं उगमस्थान. मडिकेरीपासून साधारण ४५ किलोमीटर अंतर. आठ किलोमीटर आधी त्रिवेणी संगम लागतो. आम्ही मंगळुरू रस्त्याकडे निघालो. आम्हाला परवा येताना तलकावेरीकडं जाणाऱ्या रस्त्याची मोठी कमान दिसली होती. मडिकेरीपासून साधारण सात-आठ किलोमीटर अंतरावर हा फाटा आहे. आम्ही तिकडं वळलो. आतला रस्ता आतापर्यंतच्या रस्त्यांच्या तुलनेनं थोडा लहान व काही काही ठिकाणी जरा खराब होता. अराफात सारखा म्हणत होता, की इकडं यायचं तर अगदी सकाळी सहा वाजता निघायला पाहिजे. त्या रस्त्यावर मस्त वातावरण असतं. क्वचित धुकं वगैरेही असतं. अर्थात आम्ही नऊ वाजता निघालो असल्यानं थोड्याच वेळात ऊन चांगलंच तापलं आणि काचा बंद करून कारमधला एसी सुरू करावा लागला. तलकावेरीकडं जाणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी निसर्गानं अक्षरश: सौंदर्याची उधळण केली होती. डोंगरदऱ्या, उतारावर घनदाट झाडी, छोटी छोटी गावं, मंगलोरी कौलं घातलेली टुमदार घरं असं ते सगळं दृश्य म्हणजे कुठल्याही चित्रकारासाठी पर्वणीच. (मध्येच बोलताना मंगलोरी कौलांचा विषय निघाला, तर अराफात म्हणाला, की आम्हीही इकडं त्याला कौलं असंच म्हणतो.) 
साधारण तास-सव्वा तासानं आम्ही त्रिवेणी संगमापाशी पोचलो. इथं बागमंडला मंदिर आहे. त्रिवेणी संगमावर आता मोठा पूल झाला आहे. इथं कावेरी, कनिके व संज्योती (गुप्त) या नद्यांचा संगम आहे. कावेरीच्या उगमापासून हे स्थान अगदी जवळ असल्याने इथं नदीचं पात्र अगदी लहान होतं. दुसरी नदीही लहान होती. त्यामुळं तो त्रिवेणी संगमाचा परिसर तसा अगदी छोटा होता. तिथं टुमदार घाट बांधलेला होता. आम्ही तिथं जाऊन पाण्यात पाय भिजवले. काही काही भाविक पाण्यात उतरून स्नान करत होते. बाजूला दोन छोटी मंदिरं होती. ऊन रणरणायला लागलं असलं, तरी एकूण तो परिसर रमणीय होता. आम्ही तिथून मग बागमंडला मंदिरात गेलो. इथं बाहेर चपला काढण्यासाठी स्टँड होते आणि सगळीकडं एका जोडाला तीन रुपये असा स्टँडर्ड दर होता. शिवाय प्रत्येक ठिकाणी यूपीआयचा स्कॅनरही असायचा. इथंही बाहेरच ड्रेसकोडचा बोर्ड होता. आत मोबाइलवरून फोटो काढण्यास मनाईचे फलक लावले होते. आम्ही गेलो तेव्हा तिथं गर्दी कमी होती, तरीही एक गार्ड आत फिरून कुणी फोटो, सेल्फी वगैरे काढत नाहीय ना, हे अगदी डोळ्यांत तेल घालून पाहत होता. शिवाय तो ड्रेसकोडबाबतही बराच कडक असावा. कारण आम्ही नंतर बाहेर पडलो, तेव्हा स्कर्ट घातलेली एक ललना बाहेरूनच दर्शन घेताना दिसली. आम्ही अगदी थांबून पाहिलं, पण ती काही आत गेली नाही. गार्ड समोरच उभा होता. हे मंदिर छान होतं. इथल्या पद्धतीप्रमाणे सुरुवातीलाच जे दार होतं, त्यावर मोठं गोपुरासारखं बांधकाम होतं. त्या तुलनेत आतल्या मंदिराचा कळस उंचीनं अगदीच लहान होता. मंदिराच्या संकुलाला चारी बाजूंनी मजबूत दगडी भिंतींचं कुंपण होतं. आतमध्ये आपल्यासारख्याच देवळी होत्या. तिथं काही भाविक सावलीला बसून होते. आतमध्ये मुख्य मंदिरासोबत सुब्रह्मण्यम, गणपती यांची छोटी छोटी मंदिरं होती. तिथं खूप शांत, छान वाटलं. दर्शन घेऊन थोडा वेळ ‘देवाचिये द्वारी बसलो क्षणभरी’! अर्थात पुढं निघायचं होतं. 

बाहेर आलो. ऊन जाणवत होतं, म्हणून एके ठिकाणी शहाळ्याचं पाणी प्यायलो. अराफातला बोलावलं. आता पुढचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास आणखी चढणीचा होता. छोटेखानी घाटच. मात्र, आडवा पसरलेला. अखेर अर्ध्या तासानं ती तलकावेरी क्षेत्राची कमान दिली. इथं बाहेर बऱ्याच चारचाकी गाड्या पार्क केलेल्या दिसल्या. अनेक स्थानिक मंडळी दुचाकीवरूनही सहकुटुंब सहलीला आल्याप्रमाणे तिथं आलेली दिसली. इथंही अगदी बाहेरच चपला स्टँड होता. तिथून आत त्या फरशीच्या पायऱ्यांवरून भर उन्हात चालत जायचं होतं. अर्थात सगळेच लोक तसे अनवाणीच निघाले होते. त्या कमानीखालीच जरा सावली होती. आम्ही पाच मिनिटं तिथं थांबून, फोटो सेशन करून पुढं निघालो. काही पायऱ्या चढून गेल्यावर कावेरीचा उगम असलेलं ते कुंड लागलं. तिथं पुजारी आणि सुरक्षारक्षक बसले होते. पाण्यात नाणी टाकू नयेत, हात-पाय धुऊ नयेत, फोटो काढू नयेत वगैरे बऱ्याच सूचनांचा फलक तिथं होता. आम्ही त्याचं पालन करीत फक्त कुंडाचं व तिथल्या देवीच्या मूर्तीचं दर्शन घेऊन बाहेर आलो. काही भाविक मात्र तिथंही मोबाइल काढून शूटिंग करत होते. मग त्यांना त्या सिक्युरिटी गार्डचा ओरडा खावा लागला. शेजारी आणखी एक कुंड होतं. तिथं मात्र भरपूर नाणी पडलेली दिसली. इथं बहुतेक ती नाणी टाकून इच्छा व्यक्त करायची जागा असावी. आम्हीही त्या कुंडात नाणी टाकली. इथून आणखी वर डोंगरावर जाण्याचाही एक रस्ता होता. मात्र, तेव्हा ऊन झालं असल्यानं आणि आम्हाला लवकर परत निघायचं असल्यानं आम्ही वर गेलो नाही. अर्धात जिथं कुंड होतं, तिथूनही समोरचं निसर्गदृश्य अत्यंत सुंदर दिसत होतं. दूरवर पसरलेल्या हिरव्यागार डोंगररांगांनी तो सर्व परिसर व्यापला होता. त्यामुळं एवढ्या उन्हातही डोळ्यांना गार वाटत होतं. थोडा वेळ तिथं फोटोसेशन करून आम्ही खाली उतरलो. अराफातभाई आमची वाट पाहत थांबलेच होते. लगेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पुन्हा मडिकेरीत येईपर्यंत आम्हाला एक वाजला. मग आधी ‘अंबिका उपाहार’ या अराफातच्या लाडक्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. इथं बदल म्हणून मी नॉर्थ इंडियन थाळी मागवली. भरपूर जेवण झालं. नंतर लस्सी मागवली.
जेवणं झाल्यावर आम्हाला आता पहिल्या दिवशी राहिलेल्या कॉफी प्लँटेशनकडं जायचं होतं. अराफातला सकाळीच तसं सांगितल्यामुळं तो खूश झाला होता. आम्ही लगेच तिकडं गेलो. पहिल्या दिवशी आम्हाला भेटलेला उंचापुरा, भरघोस मिशा असलेला माणूसच तिथं होता. ‘तुम्ही परत आलात हे बघून आनंद झाला,’ असं त्यानं आवर्जून सांगितलं. आम्ही प्रत्येकी दोनशे रुपयांचं तिकीट काढलं. इथं मात्र स्कॅनरची सोय नव्हती. त्यामुळे रोख पैसे द्यावे लागले. त्यांनी एक तरुण मुलगा गाइड म्हणून दिला. त्यानं अर्ध्या तासाची पायी भटकंती करून ते सर्व प्लँटेशन आम्हाला नीट दाखवलं. सुरुवातीला हातात काठ्या दिल्या. त्यामुळं ट्रेक करत असल्याचा फील येतो म्हणे. त्या मुलानं आम्हाला कॉफीची निरनिराळी झाडं दाखवली. कॉफीच्या बिया, पानं, त्या बिया काढण्यापासून ते कॉफी तयार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत सर्व काही तिथं दाखवण्यात आलं. स्थानिक वेगळी झाडं बघायला मिळाली. 'सिल्व्हर ओक'ची झाडं तिथं विपुल प्रमाणात दिसली. वेगळ्या आकाराच्या संत्र्यांचं एक झाडही होतं. सागाची उंच झाडं होती. एकूण दोनशे रुपये तिकीट काढलं, त्याचं सार्थक झालं. ही पाहणी संपवून आम्ही वर येऊन बसलो, तर त्यांनी तिथली स्पेशल ब्लॅक कॉफी आणून दिली. ती अतिशय सुंदर होती. शिवाय अर्धा तास पायपीट केल्यानंतर ती मिळाल्यामुळं गरम असली, तरी छान वाटली. त्यानंतर मग तिथला कॉफीचा कारखाना बघायला गेलो. तिथल्या माणसानं अगदी बारकाईनं पुन्हा एकदा सगळी प्रक्रिया सांगितली. कॉफीचे विविध प्रकार दाखवले. तिथली स्पेशल ‘कावेरी कॉफी’ही दाखवली. यात मार्केटिंगचा भाग अर्थातच होता. मात्र, अमुक एक घ्याच, अशी सक्ती अजिबात नव्हती. त्यामुळं आम्ही वरच्या दुकानात जाऊन आम्हाला हवी ती खरेदी केली. 

आता इथून आम्हाला जायचं होतं ते फोर्ट म्युझियमला. मडिकेरी गावाच्या अगदी मध्यभागी हा जुना किल्ला आहे. आम्ही अगदी थोड्याच वेळात तिथं पोचलो. एका जुन्या चर्चच्या जागी हे शासकीय संग्रहालय आहे. मात्र, त्या दिवशी आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी असल्यानं हे संग्रहालय बंद होतं. मग आम्ही त्या किल्ल्याच्या परिसरात नुसता एक फेरफटका मारला. मुख्य इमारतीत आता न्यायालय व इतर काही सरकारी कार्यालये आहेत. समोरच्या बाजूला दोन हत्तींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. तिथं शेजारी या किल्ल्याची माहिती लिहिली होती. कूर्गच्या राजाने १६८१ मध्ये हा किल्ला उभारला. किल्ल्यात एक गणपती मंदिरही होतं. आम्ही तिथं जाऊन दर्शन घेतलं. पलीकडून गावात निघणारा आणखी एक रस्ता व मोठं दगडी प्रवेशद्वार होतं. ते पाहून मला आपल्या पन्हाळ्यावरील ‘तीन दरवाजा’ची आठवण आली. नील त्या वरच्या तटाच्या भिंतीवरही जाऊन आला. तिथं आणखी काही मराठी पर्यटक होते. थोडा वेळ रेंगाळून निघालो,
आता आम्हाला शेवटच्या पर्यटनस्थळी - राजाज टोम्ब - इथं जायचं होतं. इथल्या राजांची समाधी असलेली ही एक बाग आहे. तिकडं जाताना अराफातनं जुन्या मडिकेरी गावातून मुद्दाम कार नेली. त्यामुळं आम्हाला ते शांत, निवांत पहुडलेलं गाव बघता आलं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणाची (शिरूर, वैजापूर, येवला, फलटण, श्रीगोंदा इ,) आठवण येईल, असं ते ‘सुशेगाद’ गाव होतं. दोन दोन मजली घरं, समोर छोटं अंगण, तिथं लावलेल्या दुचाकी गाड्या, घरांसमोर ठेवलेली छोटी फुलझाडं, काही ठिकाणी रांगोळ्या, तर काही घरांसमोर बकऱ्या बांधलेल्या अशा संमिश्र वस्तीच्या त्या भागातून जाताना त्या गावाचं ‘खरं’ दर्शन घडलं. आता अराफात त्याच्या घरी वगैरे नेतो की काय, असं आम्हाला क्षणभर वाटलं. पण तो पक्का प्रोफेशनल होता. त्यानं तसं काही न करता आम्हाला थेट त्या राजांच्या समाधीपाशी सोडलं. तिथंही तिकीट होतं. ते काढून आम्ही आत शिरलो, तेव्हाच आभाळ भरून आलं होतं. त्या दोन समाध्या आमच्या जेमतेम पाहून झाल्या आणि पावसाचे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली. आम्ही पळतच येऊन कारमध्ये बसलो. इथून पुढं ‘ॲबी फॉल’कडे जायची आमची इच्छा नव्हती. जोरदार पाऊस आला तर सगळा रस्ता चिखलाचा आहे आणि तुम्हालाही भिजावं लागेल, असं अराफात म्हणाला. एकूणच तिथून सहा किलोमीटरवर असलेल्या आणि आता अगदी क्षीण धार पडत असलेल्या त्या धबधब्याकडं जायला तोही फारसा उत्सुक नव्हता, हे आमच्या लक्षात आलं. मग आम्हीही म्हटलं, की नको आता जायला तिकडं. चला हॉटेलवर. पडत्या फळाची आज्ञा घेऊन अराफातनं आम्हाला थेट हॉटेलवर आणून सोडलं. तेव्हा जेमतेम साडेचार, पाचच वाजले होते. मात्र, आता पावसानं चांगलाच जोर पकडला होता. उद्या आमचं चेक-आउट होतं, त्यामुळं आम्ही अराफातला सकाळी नऊ वाजता यायला सांगितलं अन् त्याचा निरोप घेतला.
आज आम्ही लवकरच हॉटेलवर आल्यामुळं आणि बाहेर पाऊस पडत असल्यानं रेस्टॉरंटमधूनच वर चहा मागवला. इथं कॅरमची पण सोय होती. मग नीलनं खाली रिसेप्शनला फोन करून कॅरम मागवला. थोड्याच वेळात हॉटेलचा माणूस कॅरम घेऊन आला. अगदी पावडरसह. मी खूप दिवसांनी कॅरम बोर्डवर हात साफ करून घेतला. काही काही फेव्हरिट शॉट जसेच्या तसे जमताहेत का, ते पाहिलं. चक्क जमले. आपल्या मेंदूची क्षमता अचाट असते हे खरं. किती तरी वर्षांनी खेळूनही मधल्या गोलात असलेली सोंगटी डावीकडच्या बॉक्समध्ये एका फटक्यात पाडता आली. तो विशिष्ट कट अगदी जसाच्या तसा जमला, याचा आनंद झाला. थोडा वेळ कॅरम खेळलो, पण आम्ही बाल्कनीत बसलो होतो आणि तिथ आता जोरात पाऊस यायला लागला. मग आत येऊन उरलेला डाव खेळलो. मग नीलला कंटाळा आल्यावर कॅरम परत देऊन टाकला. खरं तर आज आम्हाला मडिकेरीतल्या आणखी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन डिनर करायचं होतं. मात्र, पाऊस एवढा वाढला, की आम्ही तो बेत रद्द केला. शेवटी हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो. आज सुट्टीचा शेवटचा दिवस असल्यानं बरेच लोक चेक-आउट करून गेले होते. त्यामुळं डिनरला तिथं फक्त आम्ही तिघंच होतो. अर्थात त्यांनी व्यवस्थित सर्व्ह केलं. जेवून आम्ही वर आलो. आता सगळं आवरून ठेवायचं होतं. उद्या ब्रेकफास्ट करून परतीचा प्रवास सुरू करायचा होता...


कूर्ग/मंगळुरू/बंगळुरू/पुणे, १५ एप्रिल २५

मंगळवारी सकाळी लवकर उठून आवरून ठेवलं. ब्रेकफास्ट केला. बॅगा आवरून ठेवल्या. बरोबर नऊ वाजता अराफात आला. आम्ही इथल्या रेस्टॉरंटमध्ये जे काही दोन-तीन दिवस जेवलो होतो, त्याचं बिल त्यांनी एकदम दिलं. मग ते पेमेंट केल्यावर चेक-आउट पूर्ण झालं. आता आम्ही परतीच्या वाटेला लागलो. आमचं बंगळुरूला जाणारं विमान मंगळुरूवरून दुपारी ३.२५ वाजता निघणार होतं. मध्ये १३७ किलोमीटरचा प्रवास होता. आम्हाला निदान दोन वाजता तरी मंगळुरूत पोचायला हवं होतं. त्यामुळं आम्ही नऊ वाजता निघालो. मात्र, रस्त्यानं फारशी वाहतूक नसल्यानं आम्ही १२.३० वाजताच मंगळुरू शहरात पोचलो. मग दुपारचं जेवण शहरातच कुठल्याही तरी रेस्टॉरंटमध्ये करून घ्यावं, असं ठरवलं. त्यानुसार अराफातनं आम्हाला एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये नेलं. खरं तर ते रेस्टॉरंट अगदीच साधं होतं. मात्र, आता आमच्याकडं वेळ नव्हता. अर्थात तिथं जेवण व्यवस्थित मिळालं. मग जेवून आम्ही लगेच विमानतळाकडं निघालो. बरोबर दीड वाजता आम्ही विमानतळावर पोचलो. अराफातला निरोप दिला. त्याच्या दोन मुलींसाठी खाऊसाठी पैसे दिले. त्यामुळं तो खूश झाला. आम्ही ‘डिजियात्रा’त नोंदणी केलेली असल्यानं आमचं चेक-इन फटाफट झालं. हा विमानतळ अगदीच छोटा होता. गर्दीही कमी होती. इथून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइट जास्त संख्येने होत्या. आमचं विमान वेळेत आलं. वेळेत निघालं. इथून टेक-ऑफ करतानाही विमान दरीच्या बाजूकडे जाईल आणि तिथून विरुद्ध दिशेने उडेल असा माझा अंदाज होता. तसंच झालं. त्या अपघातानंतर केलेला का कायमस्वरूपी इलाज असणार. आमचं फ्लाइट अर्ध्याच तासाचं होतं. मात्र, बंगळुरू विमानतळावर ‘गो अराउंड’ करावं लागल्यानं जरा वेळ लागला. तरी पाच वाजता आम्ही लँड झालो होतो. इथून आम्ही आतल्या आत जे ‘अन्तर्राज्यीय स्थानांतर’ असतं, तिकडं जाऊ शकलो. तिथंही ‘डिजियात्रा’मुळं प्रवेश सुकर झाला. (पुण्यात प्रवास सुरू करताना माझं ‘डिजियात्रा’ चाललं नव्हतं. त्यामुळं मला रेग्युलर रांगेतून आत यावं लागलं होतं. सुदैवानं मंगळुरू व बंगळुरूत ती अडचण आली नाही आणि माझाही प्रवेश सहज झाला.) इथल्या गेटवर जाऊन बसलो. महागामोलाची कॉफी घेतली. पाण्याची बाटलीही अशीच महागाची विकत घेतली. (आमची स्टीलची पाण्याची बाटली अराफातच्या गाडीतच विसरली. त्याचा फोनही आला होता. पण काय करणार? राहू दे म्हटलं आता तुम्हाला...) गेटची एकदा बदलाबदली होणं हे जवळपास रिच्युअल असतं. ते झालं. मग त्या गेटवरून बोर्डिंग सुरू झालं आणि आम्ही एकदाचे पुणेगामी विमानात बसलो. खरं तर हा तासाभराचा प्रवास; पण पुण्याला चक्क लँडिंग सिग्नल मिळेना. पुण्यावरही आमचं ‘गो अराउंड’ सुरू झालं. मी तसा बऱ्याचदा पुणे विमानतळावर उतरलोय, मात्र इथं ‘गो अराउंड’ करायची वेळ यापूर्वी कधी आली नव्हती. आता पुण्यातल्या रस्त्यांवरच्या ट्रॅफिक जॅमची लागण आकाशालाही झालेली दिसते. असो. फार उशीर झाला नाही. आम्ही साडेआठला उतरलो. मग त्या बॅटरी ऑपरेटेड गाड्यांतून एअरो मॉलला गेलो. तिथून ‘रॅपिडो’ची कॅब बुक केली. मात्र, त्यांचा अधिकृत थांबा तिथं नसल्यानं आम्हाला त्या कॅबवाल्यानं सिम्बायोसिस रस्त्यानं जरा मागं बोलावलं. मग तिथवर चालत गेलो. कॅबनं साडेदहा वाजता घरी सुखरूप पोचलो. 
कूर्गची ट्रिप अगदी जशी व्हायला हवी होती तशी झाली. थोडं आमचं नियोजन, बरीचशी ‘विहंग टूर्स’च्या परांजपे दाम्पत्याची आस्था आणि स्थानिक नागरिक व हवामानाची साथ यामुळं ही ट्रिप यशस्वी झाली. 
या ट्रिपला आम्हाला सर्व मिळून माणशी ३० हजार रुपये खर्च आला. 
(‘विहंग टूर्स’चे शैलेंद्र परांजपे यांचा फोन नंबर - ९५५२५५७५७२)


(समाप्त)

---------

बंगळूर-म्हैसूर डायरी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

--------

19 Apr 2025

कूर्ग ट्रिप १२-१५ एप्रिल २५ (भाग २)

कावेरीअम्मा अन् हत्ती...
-----------------------------

कूर्ग, १३ एप्रिल २५.

सकाळी साडेसहाच्या सुमारास जाग आली अन् बाल्कनीत गेलो तर समोर डोंगरावर सूर्यदेव उगवलेले. घरबसल्या असं सूर्योदयाचं अप्रतिम दृश्य बघण्याचा योग खूप दिवसांनी आला. थोड्या वेळानं दोन पक्षी तिथून उडत गेले आणि अगदी शाळेत आपण सूर्योदयाचं चित्र काढतो तसं ते ‘पिक्चर परफेक्ट’ झालं. रूममध्ये चहा-कॉफीची सोय होती. त्या बाल्कनीतल्या खुर्चीवर बसून, अत्यंत थंडगार हवेत, हातात गरमागरम चहाचा कप घेऊन तो सूर्योदय बघणं हे केवळ परमसुख होतं. आजचा दिवस झकास जाणार याची खात्री पटली. हॉटेलमध्ये आम्हाला ब्रेकफास्ट होता. तो घेऊन आम्ही बरोबर नऊ वाजता तयार राहिलो. आज नौशाद नावाचा ड्रायव्हर येणार आहे, हे परांजपेंनी काल रात्री मेसेज करून कळवलं होतं. फोन केला तर नौशादमियाँ खाली येऊन थांबले होते. आम्ही कारमध्ये बसलो आणि आमच्या पहिल्या पर्यटनस्थळाकडं निघालो - दुबारे एलिफंट कॅम्प. 
हे ठिकाण मैसुरू रोडवर आणि कूर्गपासून साधारण ४०-४५ किलोमीटर अंतरावर होतं. सकाळच्या त्या हवेत, कोवळ्या उन्हात प्रवास करताना अतिशय आल्हाददायक वाटत होतं. नौशादमियाँ अगदी मितभाषी होते. अराफातच्या बरोबर उलट. त्यामुळं मीच बडबड करत होतो. रस्ता अतिशय सुंदर होता. (हेआता गृहीतच धरावं.) मला स्वत:ला काही क्षण तिथं ड्रायव्हिंग करायचा मोह झाला. साधारण ३५ किलोमीटर अंतर कापल्यावर आम्ही उजवीकडं वळलो. मुख्य रस्ता सोडून आपण आत वळलो, की आत कच्चा, खराब रस्ता असणार हा आपल्याकडचा अनुभव. इथं मात्र आतला रस्ताही तेवढाच चांगला होता. साधारण आठ किलोमीटरवर आम्ही पुन्हा डावीकडं वळलो. तिथं लगेच तो दुबारे कॅम्प आला. तिथं पार्किंगसाठी भरपूर जागा होती. सकाळची वेळ असली तरी भरपूर गर्दी होती. तो चांगलाच प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉट असणार, हे दिसत होतं. दोन्ही बाजूंना दुकानं होती. एका ठिकाणी स्वच्छतागृहाची चांगली व्यवस्था होती. तिथं पाच रुपये घेत होते, पण त्यामुळं ती स्वच्छतागृहं खरोखर स्वच्छ होती. एकूणच पर्यटनस्थळावर पर्यटकांची चांगली काळजी घेण्याची वृत्ती इथं दिसली. आम्ही तातडीनं नदीच्या बाजूला धाव घेतली. कावेरीचं पात्र दृष्टीस पडलं. नदीपात्राच्या कडेला बांधलेल्या भिंतीमधूनच खाली पायऱ्या उतरत होत्या. तिथून थेट नदीच्या पाण्यातच आपण प्रवेश करतो. बऱ्याच ठिकाणी खाली वाळूची पोती वगैरे टाकली आहेत. पण काही ठिकाणी पाणी गुडघ्यापेक्षाही खोल होतं. शिवाय निसरडे दगड आणि काही ठिकाणी पाण्याला असलेला थोडासा वेग यामुळं ही नदी ओलांडणं हा चांगलाच थ्रिलिंग अनुभव ठरला. आम्ही सोबत एक ज्यूटची पिशवी घेऊन गेलो होतो. त्यात तिघांच्याही चपला टाकल्या व अनवाणी त्या पाण्यात उतरलो. एकमेकांचे हात धरत, सावरत ती नदी ओलांडणं हा फार भन्नाट अनुभव होता. साधारण दोनशे मीटर अंतर पार करून, बऱ्याच लोकांसोबत आम्हीही एकदाचे पलीकडच्या तीरावर पोचलो.हा कॅम्प साधारण साडेअकरापर्यंत सुरू असतो. आम्ही पोचलो तेव्हा दहा वाजले होते. तीन हत्तींचा एक कळप नदीच्या त्या बाजूला अंघोळीला आल्याचं आम्हाला नदी ओलांडताना दिसलं होतं. पलीकडच्या तीरावर पोचल्यावर दरडोई १४० रुपयांचं तिकीट काढून आम्ही आत गेलो. सुरुवातीला या हत्ती प्रशिक्षण केंद्राची माहिती होती. आजूबाजूच्या शेतांत त्रास देणारे हत्ती पकडून वन विभाग त्यांना इथं आणून ठेवतो. यातल्या काही हत्तींना पुन्हा जंगलात सोडलं जातं, तर काही हत्तींना प्रशिक्षण दिलं जातं. यातले काही हत्ती मैसुरूच्या प्रसिद्ध दसरा महोत्सवातही सहभागी होतात. तिथं वेगवेगळ्या ठिकाणी हत्ती साखळदंडांनी बांधून ठेवले होते. त्यातले काही हत्ती पर्यटकांना सरावले होते, असं दिसलं. सोंड उंचावून दाखव, मान वळवून दाखव, झाडावरचा पाला तोडून दाखव असले प्रयोग काही हत्तींनी सुरू केले. काही हत्तींचे माहूत पैसे घेऊन, पर्यटकांच्या डोक्यावर सोंड ठेवून आशीर्वाद देण्याचे प्रात्यक्षिक त्यांच्या हत्तींकडून करवून घेत होते. आम्हाला त्या हत्तींची नदीवरची अंघोळ बघण्याची इच्छा होती. मात्र, पुढची अंघोळ आता साडेअकरा वाजता होणार असं कळलं. आम्ही तो सगळा भाग फिरून बघितला. तिथं आता चांगलाच उकाडा जाणवू लागला होता. आम्ही थोडा वेळ तिथल्या बाकांवर बसलो. आता नदीवर इकडं येणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसत होती. आम्हाला परत निघायचं होतं. मग पुन्हा एकदा हत्तींसोबत फोटोसेशन केलं आणि परतीची वाट धरली. 

परत निघताना त्या नदीत आता चांगलीच गर्दी झाली होती. तिथं गर्दी नियंत्रित करायला कोणी नव्हतं. लोक कसेही येत होते. येणारी झुंड मोठी असल्यानं जाणाऱ्यांना वाटच मिळत नव्हती. शेवटी कसेबसे पलीकडं पोचलो. अगदी त्या काठावर दोन सुरक्षारक्षक गर्दी नियंत्रित करताना दिसले. मात्र, त्या काळात अनेक जण, विशेषत: मुली त्या पाण्यात घसरून पडल्या. कडेवर लहान मूल घेऊन ही नदी ओलांडणारेही कही महाभाग होते. त्यातल्या एकाला तर घसरल्यावर मीच हात देऊन सावरलं. एकूण येताना जेवढा उत्साह होता, तेवढा परतताना काही राहिला नाही. शेवटी एकदाची नदी ओलांडली. कावेरीअम्माला पुन्हा एकदा नमस्कार केला आणि तिथून बाहेर पडलो. नौशादमियाँना फोन केल्यावर ते तातडीनं हजर झाले आणि आम्ही पुढच्या ठिकाणाकडं निघालो. 
आता आम्ही गोल्डन टेम्पल हे ठिकाण बघायला निघालो होतो. थोड्याच वेळात आम्ही त्या मॉनेस्ट्रीपाशी पोचलो. समोर एका मोठ्या मैदानात पार्किंगची व्यवस्था होती. आमच्या ड्रायव्हरनं मॉनेस्ट्रीच्या दारात सोडलं आणि तो निघून गेला. या संकुलाचं नाव ‘नामड्रोलिंग मॉनेस्ट्री’. पेनॉर रिनपोचे यांनी १९६३ मध्ये ही मॉनेस्ट्री सुरू केली. तिबेटी बुद्धांचं हे सर्वांत मोठं शिक्षण संकुल आहे, असं मानलं जातं. इथं बांधलेलं मंदिर सोन्याच्या पत्र्यानं मढवलेलं आहे, म्हणून त्याला ‘गोल्डन टेम्पल’ असंही म्हटलं जातं. तिबेटी बुद्ध धर्माच्या नाइंगमा या वंशाचे हे शैक्षणिक संकुल असून, इथं सुमारे सात हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. हा विहार आणि तिथला एकूणच परिसर भव्य आणि शांत वाटला. मुख्य विहारात बुद्धाची अतिशय शांत, ४० फूट उंच मूर्ती आहे. शेजारी आणखी दोन गुरूंच्या तेवढ्याच भव्य मूर्ती आहेत. त्या परिसरात पर्यटकांची भरपूर गर्दी होती. आम्ही बाहेर पडलो, तेव्हा तिथं बरंच उकडत होतं. समोर दुकानं होती. एका दुकानात आम्ही मलेशियाचं एक सॉफ्ट ड्रिंक घेतलं. ते प्यायल्यावर जरा बरं वाटलं. शेजारी आणखी एक स्मृतिवस्तूंचं दुकान होतं. तिथंही चक्कर मारली. थोड्या वेळानं आम्ही तेथून निघालो. आता साधारण एक वाजत आला होता. नौशादमियाँना परत बोलावून घेतलं. आता जेवायचं होतं. मग त्यांनाच एखादं हॉटेल दाखवायला सांगितलं. त्यांनी रस्त्यात ‘नक्षत्रम्’ नावाचं एक व्हेज हॉटेल सुचवलं. आम्ही तिथं थांबून जेवलो. मी रीतसर साउथ इंडियन मिल्स मागवलं. त्यात भरपूर भात आणि तीन-चार प्रकारच्या भाज्या, वरण, रस्सम असं सगळंच आलं. सर्व ‘भातार्पणमस्तु’ करून खाल्लं. त्यामुळं पोट व्यवस्थित भरलं.
इथून आमचा पुढचा स्पॉट होता निसर्गधाम. ही एक बागच आहे. या बागेच्या दारात भरपूर दुकानं होती. एक प्रकारचं शॉपिंग कॉम्प्लेक्सच. तिथं अत्यंत स्वस्तात म्हणजे शंभर रुपयांना एक टी-शर्ट वगैरे अशी दुकानं होती. तिथं प्रचंड गर्दी उसळली होती, हे सांगायला नकोच. आम्ही आधी बागेत जायचं ठरवलं. दरडोई ४० रुपये तिकीट काढून आम्ही आत गेलो. आत नदीवरचा एक झुलता पूल होता, तो छान होता. मात्र, त्या पुलाच्या मधोमध गेलं, की लोक मोबाइल काढून सेल्फी काढत बसायचे. आम्हीही तेच केलं. नंतर दोन्ही बाजूंचे सुरक्षारक्षक ओरडायला लागले, की मग लोक पुढं सरकायचे. निसर्गधाम या उद्यानात प्रामुख्याने बांबूचं बन होतं. एका बाजूला कॉटेजेस होती. पण तिथं कुणी राहताना दिसलं नाही आणि ती अगदीच पर्यटकांच्या येण्या-जाण्याच्या मार्गात होती. आम्ही आतपर्यंत चक्कर मारली. त्या भागातील वेगवेगळ्या जाती-जमातींच्या नृत्य प्रकाराचे पुतळे उभारले होते. पुढं एक बर्ड पार्क लागलं. इथं पुन्हा वेगळं तिकीट होतं. ते काढून आत गेलो. आत मकाउसारख्या पक्ष्यांसोबत फोटो काढून घेण्याची सोय होती. त्याला अर्थात पुन्हा पैसे होते. नीलला त्या पक्ष्यासोबत फोटो काढायचा होता. मग आम्ही पैसे भरले. मग तिथल्या त्या पक्षीपालक ताईंनी नीलला त्या पिंजऱ्यात नेलं आणि तो भला मोठा पक्षी त्याच्या खांद्यावर व मग हातावर ठेवून फोटो काढायला सांगितले. नीलचे फोटो काढून झाल्यावर त्या ताईंनी आता तो पक्षी मला खांद्यावर घेऊन फोटो काढायची ऑफर दिली. (एकावर एक फ्री...) माझी फारशी इच्छा नव्हती, पण शेवटी तो पक्षी खांद्यावर बसवून एकदाचे फोटो काढून घेतले. बाहेर इतरही पक्षी होते. सगळ्यांत भारी म्हणजे शहामृगांची जोडी होती. हे उंच व भव्य पक्षी सहसा बघायला मिळत नाहीत. बाकी पार्क फार मोठं नव्हतं. पण जे पक्षी बघितले ते बघून मजा आली.

पुढं गेल्यावर एका ठिकाणी झिपलाइन (दोरावरून घसरत पलीकडं जायचं) सुरू होतं. नीलला ते करायचं होतं. मग शंभर रुपये देऊन ते करून घेतलं. व्हिडिओ वगैरे काढला. येताना एक झाडावरचं मचाणवजा घर दिसलं. मग शिडीवरून तिथं चढून थोडा वेळ बसलो. एकूण या ‘निसर्गधामा’त चांगला टाइमपास झाला. येताना आम्हाला बोटिंगही करायचं होतं, पण बराच उशीर झाला होता. त्यामुळं पार्कमधून बाहेर पडलो. समोरच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सकडं पाय वळलेच. तिथं बराच टाइमपास झाला. थंड ज्यूस प्यायलो. टी-शर्टची खरेदी झाली. अखेर तिथून नौशादमियाँना फोन करून बोलावून घेतलं व एकदाचे तिथून बाहेर पडलो.
आता आम्ही पुन्हा कूर्गच्या दिशेने निघालो. रस्त्यात जोरात पाऊस सुरू झाला. मात्र, सुदैवानं तो थोड्या वेळात तो थांबला. आम्हाला आता कूर्गमधलं जनरल थिमय्या म्युझियम बघायला जायचं होतं. थोड्याच वेळात आम्ही तिथं पोचलो. मडिकेरी गावात मुख्य रस्त्यावरच हे संग्रहालय आहे. ‘सनीसाइड’ असं त्या बंगल्याचं जे नाव होतं, तेच या संकुलाला देण्यात आलं आहे. अतिशय सुंदर, मोक्याच्या जागेवर हा बंगला उभा आहे. बंगल्याच्या समोर दरीसारखा खोल भाग असून, पुढच्या डोंगरावर वसलेलं गाव इथून स्पष्ट दिसतं. तिकीट काढून आत गेल्यावर उजव्या बाजूला विमान, पाणबुडी, रणगाड्याच्या प्रतिकृती ठेवलेल्या दिसल्या. ‘अमर जवान ज्योती’चंही काम सुरू असलेलं दिसलं. संग्रहालयाच्या सुरुवातीलाच बंगल्याबाहेर एक मोठी, लष्करी बुटाची प्रतिकृती आहे. तिथं इंग्रजीतील एक कविताही लिहिली आहे. जनरल थिमय्या हे कूर्गचे भूमिपुत्र. लष्करप्रमुखपदापर्यंत त्यांची वाटचाल गौरवशाली होती. सायप्रसमध्ये त्यांना अकाली मरण आले. त्यांचा सर्व जीवनप्रवास या संग्रहालयात मांडला आहे. कूर्गमध्ये प्रवेश करताना आम्हाला एक लष्करी अधिकाऱ्याचा पुतळा दिसला होता. तो थिमय्या यांचाच असावा, असं मला वाटलं होतं. मात्र, तो फील्ड मार्शल करिअप्पा यांचा होता. तेही कूर्गचेच भूमिपुत्र. त्यानंतर पुढच्या चौकात आणखी एक असाच लष्करी अधिकाऱ्याचा पुतळा आहे. ते ब्रिगेडिअर मानप्पा की अशाच नावाचे भूमिपुत्र अधिकारी होत. थिमय्या यांचा घोड्यावर स्वार असलेला पुतळा आहे. तो या संग्रहालयाच्या थोडं पुढं, आमच्या हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर होता.

या संग्रहालयाची भेट आटोपून आम्ही मागच्या बाजूला असलेल्या कॅफेत आलो. तिथं आम्हाला छान गरमागरम कॉफी मिळाली. ती घेतल्यावर एकदम तरतरी आली. आम्ही मागच्या बाजूने बाहेर पडताना पुन्हा एकदा त्या रणगाड्यासमोर, विमानासमोर फोटो काढले. आम्ही बाहेर पडलो, तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. नौशादमियाँनी आम्हाला हॉटेलवर सोडलं आणि ते गेले. आजचं आमचं स्थलदर्शन तसं लवकर आटोपलं होतं. मात्र, हॉटेलवर आल्यावर नाही म्हटलं तरी दिवसभराचा थकवा जाणवलाच. मग सरळ आराम केला. खालच्या रेस्टॉरंटमधून चहा-कॉफी रूमवरच मागवली. ती लगेच आली. चहा घेऊन बरं वाटलं. संध्याकाळी फारशी भूक नव्हती. मग इथं झोमॅटो किंवा ‘स्विगी’वरूनही तुम्ही खायला मागवू शकता, हा काल अराफातने सांगितलेला उपाय लक्षात आला. नीलला पिझ्झा मागवायचा होता. मग आम्ही तिथल्या ‘डॉमिनोज’मधून पिझ्झा मागवला. त्या छोट्याशा गावात अशी सेवा देणारे किती लोक असणार? आम्ही ऑर्डर नोंदवल्यावर तिथल्या माणसाचा नीलला थेट फोन आला. त्यानं हे आहे, ते नाही असं सांगून ऑर्डर पुन्हा कन्फर्म केली. आम्ही पुन्हा ‘जे आहे त्यातून’ निवडून ऑर्डर दिली. अर्ध्या तासात तो मुलगा पिझ्झा घेऊन हॉटेलच्या खाली आला. मग नीलनं रिसेप्शनपाशी जाऊन ते पार्सल आणलं. पिझ्झा खाल्ला, तरी मला थोडी भूक होती. मग पुन्हा खालच्या रेस्टॉरंटमधून कर्ड राइस मागवला व जरा उशिरा म्हणजे नऊ वाजता खाल्ला. आयपीएलची मॅच होतीच. आज जरा उशिरा झोपलो तरी चालणार होतं. उद्या साइटसीइंगचा शेवटचा दिवस, अराफात व परांजपे दोघांचेही फोन आले. दिवस कसा गेला, वगैरे चौकशी परांजपेंनी आपुलकीने केली. उद्याचा पहिला कार्यक्रम तलकावेरीचा अर्थात, कावेरीच्या उगमाकडं जाऊन तिथं दर्शन घेण्याचा होता. शिवाय काल राहून गेलेली आणखी एक गोष्ट खुणावत होती...


(क्रमश:)


--------------

पुढील व शेवटचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----------

18 Apr 2025

कूर्ग ट्रिप १२-१५ एप्रिल २५ (भाग १)

कूर्ग, कावेरी, कॉफी अन् बरंच काही....
-----------------------------------------------



नीलची फायनल इयरची परीक्षा झाली आणि आम्हाला कुठे तरी ट्रिपला जायचे वेध लागले. दोन पर्याय होते. एक उत्तरेत शिमला, कुलू, मनालीचा आणि दुसरा दक्षिणेचा - कूर्गचा. हातात असलेले दिवस, एकाच ठिकाणी बरंच काही पाहण्यासारखं असण्याचे पर्याय आणि सुरक्षितता या मुद्द्यावर दक्षिणेचा विजय झाला आणि आम्ही कूर्गला जाण्याचं मुक्रर केलं. जाताना व येताना वेळ वाचवण्यासाठी विमानानंच जायचं हे निश्चित होतं. दोन महिने आधीच बुकिंग केलं. आमच्या सोसायटीच्या ग्रुपवर असलेले शैलेंद्र परांजपे व श्रावणी परांजपे यांची ‘विहंग टूर्स’ ही पर्यटनविषयक सेवा देणारी कंपनी आहे. आम्हाला कस्टमाइज्ड टूर हवी होती, तशी त्यांनी करून दिली. विमानांचं बुकिंग दोन महिने आधीच केल्यामुळं ते तिकीट तुलनेनं स्वस्त पडलं. आम्ही पुणे ते बंगळुरू आणि बंगळुरू ते मंगळुरू असं फ्लाइट बुकिंग केलं. मंगळुरूहून कूर्ग १३७ किलोमीटर आहे. कारनं साडेतीन तासांत तिथं पोचता येतं. त्यामुळं हाच मार्ग निश्चित केला. परांजपेंनी आम्हाला मंगळुरू विमानतळ ते मंगळुरू विमानतळ अशी कार, हॉटेल आणि पर्यटन ठिकाणांची भेट अशी बाकी सगळी व्यवस्था करून दिली. त्यामुळं आम्ही निश्चिंत मनाने ११ एप्रिलच्या रात्री पुणे विमानतळावर निघालो. (बुकिंग करताना रात्री बारानंतरच्या फ्लाइटच्या वेळा आणि दिनांक नीट तपासून घ्यावेत. मध्यरात्री १२.४५ चं विमान म्हणजे तारीख असते १२ एप्रिल आणि आपल्याला निघायचं असतं ११ एप्रिलला रात्री.) 

पुणे/बेंगळुरू/मंगळुरू/कूर्ग, १२ एप्रिल २५

आमचं ‘इंडिगो’चं विमान होतं. पुणे विमानतळाचं नूतनीकरण आणि नवं टर्मिनल झाल्यापासून आम्ही पहिल्यांदाच तिथं जात होतो. बाहेर महाराजांचा पुतळा, तिरंगा झेंडा आणि तिथं केलेली म्युरल्स व रंगवलेली चित्रं यामुळं एकूण प्रथमदर्शनी हे नवं टर्मिनल उत्तम भासतं. विमानतळाच्या आत गेल्यावर मात्र खूप जास्त गर्दीमुळं हाच विमानतळ छोटासा भासू लागतो. पुणे विमानतळावर खरोखर एसटी स्टँडसारखी गर्दी असते. त्यात आम्हाला आधी चार नंबरचं गेट सांगितलं. ते बदलून ‘१ ए’ दिसायला लागलं. पण १ आणि १ ए ही दोन्ही गेट आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी राखीव आहेत. त्यामुळं तिथं बरीच गर्दी जमा झाली तरी दार कुणी उघडेना. मग कळलं, की आता ६ नंबरचं गेट आहे. मग पुन्हा आमची वरात खालच्या मजल्यावर असलेल्या त्या गेटवर गेली. तिथं हैदराबाद आणि बंगळुरू अशा दोन्ही फ्लाइटच्या प्रवाशांना बोलावलं होतं. त्यामुळं त्या गेटसमोर तोबा गर्दी झाली. अखेर वेगवेगळ्या रांगा करून लोकांना बसमध्ये सोडायला सुरुवात झाली. त्या बसमधून मग अखेर आम्ही विमानापाशी गेलो व त्या शिड्या चढून एकदाचे आसनस्थ झालो. विमान सुटलं मात्र वेळेवर. मध्यरात्रीच्या पुण्याचा अफाट विस्तार अन् झगमगाट डोळे दिपवणारा होता, यात शंका नाही. थोडं पुढं गेल्यावर विमानानं डावीकडं हलकेच वळण घेतलं आणि अंतराळातला अथांग अंधार कापत ते दक्षिणेस रोरावत निघालं. मधेच एक उजळलेला मोठा महामार्ग दिसला. त्यावरचे दिवे मधेच लुप्त झाले होते. त्यावरून तो कात्रजचा बोगदा असावा, असा अंदाज बांधला. पुढं विमान जसजसं उंचावर जाऊ लागलं, तसतसे खालचे दिवे अंधुक होत गेले आणि डोळ्यांतली झोप दाट! बंगळुरूपर्यंतचं ८०० किलोमीटरचं अंतर विमान अवघ्या तासाभरात कापतं. आम्ही मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी बरोबर केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. पुढचं कनेक्टिंग फ्लाइट ९० मिनिटांच्या आत असेल तर आतल्या आत एका वेगळ्या मार्गाने तुम्हाला त्या विभागाकडं जाता येतं. आम्ही बघितलं तर ते दार बंद होतं. शिवाय आमच्या पुढच्या विमानाला जवळपास तीन तास वेळ होता. मग आम्ही बाहेर पडलो. त्यामुळं पुन्हा सगळी सिक्युरिटी वगैरे करून आत जावं लागलं. अर्थात हाताशी वेळच वेळ होता. मात्र, झोपेचं खोबरं झालं होतं. आमचं गेट शोधलं आणि तिथं बघितलं तर प्रचंड गर्दी. कशीबशी तिघांना बसायला जागा मिळाली. आम्ही बसल्या बसल्याच झोप काढली. साधारण पाच वाजता आमच्या विमानाची घोषणा झाली आणि आम्ही एकदाचे पुढच्या विमानात जाऊन बसलो. हे विमानही वेळेत उडालं. बंगळुरू ते मंगळुरू अंतर ३५० किलोमीटरचं, त्यामुळं फ्लाइट अगदी अर्ध्या तासाची. मंगळुरू विमानतळावर उतरायचं म्हटल्यावर मनात त्या विमानतळावर २०१० मध्ये झालेल्या ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ विमानाच्या भीषण अपघाताची आठवण आलीच. आता तिथं काय बदल केले आहेत हे बघायची मला उत्सुकता होती. सगळा पश्चिम घाट (त्यात कूर्गही आलंच) ओलांडून आमचं विमान मंगळुरूकडं झेपावत होतं. मंगळुरूत लँडिंग सुरू झालं तसा इथला डोंगर-दऱ्यांचा, चढ-उताराचा प्रदेश डोळ्यांत भरला. मंगळुरू समुद्राकाठी असलं तरी समुद्र काही दिसला नाही. विमानतळापासून तो बराच पुढं आहे, असं नंतर कळलं. ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’चं विमान रनवेच्या ज्या दरीच्या बाजूनं कोसळलं, त्या बाजूनंच आता सगळी लँडिंग होत असावीत, असा माझा अंदाज होता आणि तो बरोबर निघाला. अगदी रनवेच्या जवळ येताना आम्ही त्या दरीवरूनच पुढं गेलो आणि क्षणभर अंगावर शहारा आला. अर्थात पुढच्या काही सेकंदांतच आमच्या विमानानं सुखरूप लँडिंग केलं आणि मी तरी हुश्श केलं. (तो विमान अपघात कसा झाला, का झाला, इथला विमानतळ लँडिंगसाठी कसा क्रिटिकल आहे, वगैरे माहितीसाठी यु-ट्यूबवर एक २३ मिनिटांची उत्तम डॉक्युमेंटरी आहे, ती जिज्ञासूंनी नक्की पाहावी.)

आम्ही अगदी साडेसहा वाजताच विमानतळावर उतरलो. हा विमानतळ अर्थात खूप छोटा आहे. आम्ही बाहेर येण्यापूर्वी जरा आन्हिकं उरकली. आमचा ड्रायव्हर अराफात आलाच होता. लगेच त्याच्या ‘टोयोटा इटिऑस’मध्ये बसून आम्ही कूर्गकडे निघालोही. आम्हाला रस्त्यात नाश्ता करायचा होता. शिवाय आमच्या हॉटेलचं चेक-इन दुपारी १ वाजता होतं. त्यामुळं आम्हाला घाई अजिबात नव्हती. मंगळुरू शहर बऱ्यापैकी मोठं आहे आणि आडवं पसरलं आहे. आता काही काही उंच इमारतीही दिसू लागल्या आहेत. बाकी नारळाची झाडं, चढ-उताराचे रस्ते असं टिपिकल कोकणी वातावरण लगेचच अनुभवण्यास मिळालं. मंगळुरू म्हणजे ‘दक्षिण कन्नड’ जिल्ह्याचं मुख्यालय. इथून आम्हाला घाट चढून कूर्गला जायचं होतं. कूर्गचं अधिकृत नाव आता ‘कोडुगू’ आहे. मडिकेरी हे गाव म्हणजे या जिल्ह्याचं मुख्यालय. मडिकेरी म्हणजेच कूर्ग. (ही सगळी महत्त्वाची माहिती तिथं जाऊन आलेल्या कुणीही मला आजतागायत सांगितली नव्हती.) मंगळुरूत उतरल्या उतरल्या दमट हवा आणि थोडा उकाडा जाणवत होता. आता आम्ही हळूहळू पूर्वेकडे आणि उंचावर निघालो होतो. कूर्ग समुद्रसपाटीपासून साधारण एक किलोमीटर उंचीवर आहे. ही उंची गाठण्यासाठी आम्हाला १३७ किलोमीटर प्रवास करावा लागणार होता. मंगळुरू ते बंगळुरू महामार्गानं आम्ही निघालो. (खरं तर मंगळुरू ते हासन... हासनला हा रस्ता मुंबई-बंगळुरू हायवेलाच मिळतो व पुढं बंगळुरूकडं जातो.) या रस्त्याचं काम गेली दहा वर्षं सुरू आहे, असं अराफात सांगत होता. पुढं एके ठिकाणी त्यानं गाडी थांबविली आणि पाण्याची बाटली विकत घेतली. तिथं चहा होता म्हटल्यावर मी चहा घेतला. विशेष म्हणजे अराफातनंच आमचे पैसे दिले. मला त्याच्या या कृतीचं आश्चर्य वाटलं व बरंही वाटलं. अराफात हा एक बडबड्या, पण पक्का प्रोफेशनल ड्रायव्हर होता. खरं म्हणजे तो मालकच होता. ही गाडी त्याची स्वत:ची होती. पुढं हायवेला एका गावात त्यानं गाडी उभी केली आणि नाश्ता करून घ्या, असं सांगितलं. आम्ही रस्त्यात त्याला मंगळुरी बन्सविषयी विचारलं होतं. त्यानं हे केटी नावाचं हॉटेल त्यासाठीच प्रसिद्ध आहे असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात त्या हॉटेलमध्ये सगळे जण गरमागरम इडली-वडा सांबार खात होते हे बघितल्यावर आम्हीही तेच मागवलं. बन्स खायचे राहूनच गेले. पुढं म्हणजे मंगळुरूपासून साधारण ४५ किलोमीटर अंतरावर मानी नावाचं छोटंसं गाव लागलं. इथं आम्ही हा हायवे सोडला आणि उजवीकडं वळलो. इथून पुढं रस्ता दुहेरी होता, पण उत्तम होता. व्यवस्थित दुभाजक आखलेले व बाजूला पिवळे पट्टे ओढलेले. हा रस्ता सिमेंटचा वाटत नव्हता, पण पांढुरका दिसत होता. बहुतेक अस्फाल्ट की काय म्हणतात तसं, प्लास्टिक मिक्स वगैरे त्यापासून केलेला असावा. जे काही असेल ते, पण रस्ता सुंदर होता. आजूबाजूला सतत डोंगर-दऱ्या होत्या आणि परिसर अतिशय हिरवागार होता. सुरुवातीला सगळीकडं रबराची उंचच उंच झाडं दिसत होती. रस्त्यात बंटवाल, पुत्तूर व सुल्या ही दोन-तीन मोठी गावं लागली.
आम्ही साधारण अकरा-सव्वाअकराच्या सुमारासच कूर्गमध्ये शिरलो. अराफात आम्हाला आधी एका कॉफी प्लँटेशनमध्ये घेऊन गेला. म्हणजे तिथं गेल्यावरच आम्हाला ते कळलं. इथं अर्धा-पाऊण तासाची एक टूर असते, ती तुम्ही करून घ्या, असं तो म्हणाला. तिथं विचारलं तर २०० रुपये प्रत्येकी असं तिकीट होतं. तिकिटाचं काही नाही, पण आम्ही सलग प्रवास करून आल्यामुळं दमलो होतो. त्यात दुपारच्या वेळी त्या प्लँटेशनमध्ये अर्धा-पाऊण हिंडायची आमच्यात एनर्जीच नव्हती. म्हणून आम्ही त्याला तसं सांगितलं व तिथून निघालो. त्यावर तो जरा खट्टू झाला. कारण आमच्या हॉटेलपासून पुढं तो आम्हाला घेऊन आला होता, हे नंतर कळलं. अर्थात आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम राहिलो आणि आधी हॉटेलवरच घेऊन चल, असं स्पष्ट सांगितलं. आम्ही ‘हॉटेल अल्टिट्यूड’ इथं पोचलो तेव्हा बारा वाजले होते. तिथं रिसेप्शनला सांगितल्यावर त्यांनी आम्हाला थोडा वेळ थांबायला सांगितलं. मग आम्ही हॉटेलच्या लॉबीतच थांबलो. थोड्याच वेळात त्यांनी आमची रूम ताब्यात दिली. रूम व एकूण व्यवस्था चांगली होती. रस्त्याच्या बाजूनं उघडणारी एक मोठी बाल्कनी होती. तिथून समोरचा रस्ता आणि पुढचे डोंगर दिसत होते. आम्ही थोड्या वेळानं आवरून त्या हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये जेवलो. जेवण चांगलं होतं.

आम्ही ड्रायव्हरला पाच वाजता यायला सांगितलं होतं. आधी तो उद्या सकाळीच भेटू असं म्हणाला होता. मात्र, आमच्या कार्यक्रमपत्रिकेत आज दोन ठिकाणं लिहिलेली होती. ती आम्हाला आजच पाहायची होती. त्यामुळं आम्ही त्याला पाच वाजता यायला सांगितलं. त्यानुसार तो आलाही. आम्ही मग तिथून आधी ओंकारेश्वर मंदिरात गेलो. मडिकेरी गावाच्या मध्यभागी हे मंदिर आहे. दाक्षिणात्य पद्धतीनुसार, मंदिरासमोर एक मोठं पाण्याचं कुंड होतं. पलीकडं हनुमानाचं मंदिर होतं. त्या दिवशी हनुमान जयंती होती, त्यामुळं त्या मंदिरात जरा गर्दी होती. आम्हीही तिथं जाऊन मारुतीरायाचं दर्शन घेतलं. मग नंतर मुख्य मंदिरात गेलो. बाहेरच ‘ड्रेसकोड’चा बोर्ड होता. सर्व लोक त्या कोडचं पालन करत होते. दर्शन घेऊन बाहेर आलो. आता आम्हाला ‘राजाज सीट’ नावाच्या ठिकाणी जायचं होतं. हे एक उद्यान होतं. तिथं पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. सुंदर हवा होती. छान वारं सुटलं होतं. त्या बागेत बरीच गर्दी होती. सुट्टीचा दिवस होता. त्या मुख्य पॉइंटवर अनेक बाक ठेवले होते. पण बसायला जागा नव्हती. शेवटी आम्हाला एके ठिकाणी जागा मिळाली. हा सनसेट पॉइंट होता. मात्र, आकाश ढगाळलेलं असल्यानं सूर्यास्त थेट बघायला मिळणार नव्हता. पण तिथं बसूनच छान वाटत होतं. समोर खोल दरी आणि त्यापलीकडं मोठमोठे, लांबवर पसरलेले डोंगर असं दृश्य छान दिसत होतं. नंतर त्या बागेत चालत फिरलो. तिथं डायनासोर, हत्ती, अजगर वगैरै बरेच प्राणी पुतळ्यांच्या रूपात उभे करून ठेवले होते. मधोमध एक कारंजंही होतं. पण ते बंद होतं. बाहेर आलो. तिथं खाऊगल्ली होतीच. एके ठिकाणी द्रोणात भेळ मिळत होती, ती घेऊन खाल्ली. वेगळीच चव लागली. नंतर आमच्या ड्रायव्हरला म्हटलं, कुठं तरी चहा-कॉफीला जाऊ या. मग त्यानं त्या गावात ‘अंबिका उपाहारगृह’ नावाच्या हॉटेलात गाडी नेली. तिथं आम्ही चहा-कॉफी तर घेतलीच, पण शेजारीच एका कुटुंबानं मंगलोरी बन्स घेतलेले बघितल्यावर मला सकाळी हुकलेल्या त्या बन्सची आठवण आली. मग आम्हीही ते बन्स मागवले व खाल्ले. मी पूर्वी गोव्यात पणजीतल्या ‘कॅफे भोसले’मध्ये हे बन्स खाल्ले होते. त्यानंतर थेट आज इथं. नील व धनश्री पहिल्यांदाच खात होते. दोघांनाही ते आवडले. इथंच खाली मसाल्यांची व कूर्गच्या प्रसिद्ध ‘होम मेड चॉकलेट्स’ची दुकानं होती. मग तिथं खरेदी झालीच. साधारण सात वाजताच अराफातनं आम्हाला हॉटेलवर सोडलं. नंतर आम्ही सरळ ‘आयपीएल’ची मॅच पाहत बसलो. संध्याकाळी पुण्याहून परांजपेंचा फोन आला. त्यांनी दिवसभरात आम्ही काय काय केलं, आमचं सर्व व्यवस्थित सुरू आहे ना, याची चौकशी केली. रात्री फारशी भूक नव्हतीच. खाली रेस्टॉरंटमध्ये जाऊन मस्त दाल-खिचडी खाल्ली व वर येऊन लवकर झोपलो. त्यापूर्वी परांजपेंचा मेसेज आला, की उद्या अराफात नसेल. त्याऐवजी दुसरा ड्रायव्हर येईल. आम्हाला कळेचना, की असं का? दिवसभर तर हा आमच्याबरोबर होता. काही बोलला नाही. परांजपे म्हणाले, की त्याला कुठं तरी जायचंय. त्यामुळं उद्या दुसरा ड्रायव्हर येईल. परवापासून परत अराफात असेल. मला साधारण दहा वाजताच झोप आली. आदल्या दिवशी अजिबात झोप झाली नव्हती. त्यामुळं झोपेची गरज होतीच...
जे झोपलो ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता जाग आली. बाल्कनीत गेलो अन् समोरचं दृश्य पाहून थक्क झालो...


(क्रमश:)

-----------------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------------

23 Mar 2025

‘अडोलसन्स’विषयी...

गोठवून टाकणारा अनुभव
-------------------------------


‘नेटफ्लिस’वर आलेल्या ‘अडोलसन्स’ या मालिकेची सध्या खूप चर्चा आहे. चारच भागांची ही ब्रिटिश मालिका पाहताना आपलं काळीज हादरून जातं. यातल्या प्रसंगाला तोंड देणाऱ्या आपल्यासारख्याच साध्यासुध्या माणसांची घुसमट पाहून आपणही सुन्न होऊन जातो. संवेदनशील मन शिल्लक असेल तर पाठीतून भयंकर थंड असं काही तरी कापत जात असल्याचा गोठवून टाकणारा अनुभवही येऊ शकतो. स्टीफन ग्रॅहम व जॅक थॉर्न कृत आणि फिलिप बरान्तिनी दिग्दर्शित ही मालिका, वयात आलेल्या वा येऊ घातलेल्या प्रत्येक मुलाच्या पालकांनी आवर्जून पाहावी अशीच आहे.
काय आहे या मालिकेत? एका तेरा वर्षांच्या मुलाला त्याच्याच वयाच्या एका मैत्रिणीचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेपासून ही मालिका सुरू होते. यात प्रत्यक्ष दृश्यात्मक हिंसा नाही किंवा खुनाचं बटबटीत, अंगावर येणारं चित्रण नाही. मात्र, त्या घडून गेलेल्या घटनेचं गांभीर्य, त्यातलं अनपेक्षित क्रौर्य, त्यातून निर्माण होणारी बेचैनी, उद्विग्नता एक क्षणही आपली पाठ सोडत नाही; जसं यातला कॅमेरा एक क्षणही पात्रांवरून आपली नजर ढळू देत नाही तसंच! हो. सिंगल शॉट या तंत्राने ही संपूर्ण मालिका चित्रित करण्यात आली आहे, हे तिचं आणखी एक वैशिष्ट्य. थोडक्यात, दृश्य कुठेही ‘कट’ होत नाही. एकदा मालिकेचा भाग सुरू झाला, की तो थेट संपेपर्यंत कॅमेरा एकसलग दृश्य चित्रित करत राहतो. हल्ली ड्रोन किंवा तत्सम अत्याधुनिक पद्धतींनी अशी दृश्यं चित्रित करणं तंत्रदृष्ट्या सोपं झालं असेलही; इथं मात्र दिग्दर्शकानं हा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचं दिसतं. त्यामुळं जवळपास एक तास लांबीचे हे चारही भाग बघताना आपण जणू त्या पात्रांसोबत वावरतो. त्यांच्याच ‘आय-लेव्हल’ने सगळ्या गोष्टी बघतो. एका अर्थानं यातल्या प्रत्येक पात्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला या सर्व घटिताकडं ‘पाहता’ येतं. प्रेक्षकाचा स्वत:चा असा एक दृष्टिकोन तयार होण्याच्या आधीच, दिग्दर्शक त्याला हवा असलेला एक आयता ‘दृष्टि-कोन’ आपल्याला इथं या तंत्राद्वारे प्रदान करतो आणि त्यामुळं आपण त्या कथानकात अक्षरश: खेचले जातो. 
जेमी मिलर (ओवेन कूपर) या तेरा वर्षांच्या मुलासह त्याच्या आई-वडिलांंचं व मोठ्या बहिणीचं भावविश्व या एका घटनेनं क्षणात उद्ध्वस्त होतं. ‘आपला मुलगा असं काही करूच शकत नाही,’ इथपासून ‘आपण कुठं कमी पडलो, म्हणून आपला मुलगा असं वागला?’ इथपर्यंतचा पालकांच्या भावजीवनाचा प्रवास यात अतिशय संयतपणे चितारण्यात आला आहे. हा प्रवास अर्थात करुण आहे. मात्र, त्यात भावनांचे बेढब कढ नाहीत किंवा आक्रस्ताळा संताप वा मनस्ताप नाही. अत्यंत नाजूक अशा या भावना मालिकाकर्ते तितक्याच नाजूकपणे आपल्यासमोर उलगडत नेतात. 
या घटनेत गुंतलेले पोलिस दल, तपास अधिकारी, वकील, मानसतज्ज्ञ, शेजारीपाजारी, शाळेतील शिक्षक, इतर विद्यार्थी या सर्वांचं ‘जसं आहे तसं’ दर्शन या मालिकेत घडत जातं. या घटनेचा प्रत्येकावरचा परिणाम कमी-अधिक प्रमाणात जाणवत राहतो. समाज म्हणून आपण कुठं उभे आहोत, याचंही आत्मपरीक्षण करायला लावणारं दर्शन यात अनेकदा सूक्ष्मपणे दिसत राहतं.

या मालिकेतला तिसरा भाग विशेषत्वाने खास झाला आहे. यात एक ब्रायनी अरिस्टन (एरिन डोहर्टी) ही मानसशास्त्रज्ञ जेमीशी चर्चा करते एवढंच या भागाचं स्वरूप आहे. लहान मुलगा अडोलसन्ट होताना, म्हणजेच पौगंडावस्थेत येताना स्वाभाविकच त्याच्यात खूप शारीरिक, मानसिक बदल होत असतात. हे बदल प्रत्येक मुलापरत्वे बदलत असतात. या बदलांना मुलं कशी सामोरी जातात, हा बदल स्वीकारता न आल्यास त्यांच्यातील आदिम भावना कसं विकृत वळण घेऊ शकतात, हे सारं या चर्चेतून आपल्यासमोर येतं. ओवेन कूपर या मुलानं जेमीची भूमिका फारच समजून केली आहे. सिंगल शॉटमध्ये चित्रित होणाऱ्या या मालिकेत जेमीच्या साऱ्या भावभावना, त्या वयानुरूप येणाऱ्या त्याच्या प्रतिक्रिया, त्याचं चिडणं-रडणं-ओरडणं हे सगळं ओवेननं अतिशय प्रत्ययकारी उभं केलं आहे. 
या मालिकेचा खरा नायक आहे तो एडी मिलर, अर्थात जेमीच्या वडिलांची भूमिका करणारा, या मालिकेचा कर्ता स्टीफन ग्रॅहम. स्टीफन ही पित्याची भूमिका अक्षरश: जगला आहे. आपल्या अवघ्या तेरा वर्षांच्या मुलाला खुनाच्या आरोपाखाली पोलिस अटक करून नेत आहेत या धक्क्यापासून ते शेवटी त्याच्यासाठी जे जे शक्य होईल, ते ते सगळं करणारा पिता त्यानं फार समर्थपणे साकारला आहे. हा पिता सर्वसामान्य माणूस आहे. टॉयलेट दुरुस्ती आदी प्लंबिंगची कामं करणारा एका साधा कामगार आहे. मात्र, त्याचं आपल्या पत्नीवर व दोन्ही मुलांवर मनापासून प्रेम आहे. अगदी लहानपणापासून त्यानं दोघांना, विशेषत: धाकट्या मुलाला - जेमीला - अतिशय लाडाकोडात वाढवलं आहे. दर एपिसोडच्या सुरुवातीला या कुटुंबाचे आधीचे फोटो येतात. त्यात जेमी लहान असतो. हे फोटो आणि लगेच आताच्या काळात सुरू होणारा माालिकेचा भाग आणि तोही सिंगल शॉटमधून अंगावर येणारा, यामुळं योग्य तो परिणाम साधला गेला आहे.
ब्रिटनमध्ये गेल्या काही काळात तरुण मुलांकडून चाकूहल्ल्यांचे वाढते प्रमाण पाहून अस्वस्थ झालेल्या स्टीफन ग्रॅहमनं या मालिकेचा घाट घातला. मालिकेत मुलं आणि इन्स्टाग्राम, फेसबुक यांवरील पोस्ट, त्यावरचं चॅटिंग यांचे उल्लेख येतात. हे पाहता या घटना किंवा हे वातावरण केवळ ब्रिटनपुरतं मर्यादित नाही, तर ते आपल्याही आजूबाजूला आहे, हे सहज लक्षात येतं. मोबाइल वापरू दिला नाही किंवा तत्सम कारणांवरून आपल्याकडेही लहान मुलांच्या आत्महत्या किंवा थेट आईचा खून अशा घटना घडलेल्या आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळंच ही मालिका आपल्यालाही अस्वस्थ करते. विशेषत: ज्यांना या वयातील मुलगे वा मुली आहेत, त्यांची तर झोप उडल्याशिवाय राहणार नाही. ‘तुमची मुलं काय करतात?’ हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यासाठी आरडाओरडा किंवा धाकधपटशा हे उपाय नाहीत, तर मुलांचे मित्र होऊन त्यांच्याशी संवाद साधणं हाच यावरचा उपाय आहे, हे आपल्याकडील मानसशास्त्रज्ञही सांगत असतात. 
अनेकदा आपण आपल्या कारकिर्दीत, कामात, वैयक्तिक गोष्टींत एवढे बुडून जातो, की आपली मुलं काय करताहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना काय हवंय, ते नक्की कसा विचार करतात याकडं आपलं नकळत दुर्लक्ष होतं आणि मग त्याची मोठी शिक्षा नंतर भोगायला लागू शकते. ‘अडोलसन्स’सारखी मालिका पाहून आपण मुलांशी संवाद वाढवला आणि या मालिकेत जे घडलं ते रोखू शकलो, तर ते आपलं केवळ वैयक्तिकच नव्हे, तर समाज म्हणून मोठं यश असेल.

(ओटीटी - नेटफ्लिक्स)

--------------

(यातल्या दोन वेगळ्या शब्दांचे अर्थ - 

Nonce -

'nonce' can also refer to a slang term for alleged or convicted sex offenders, especially those involving children, chiefly used in Britain. 

Incel - 

a member of an online community of young men who consider themselves unable to attract women sexually, typically associated with views that are hostile towards women and men who are sexually active.)


-----

20 Mar 2025

दोन गाणी - दोन आठवणी

१. कोई ये कैसे बताएँ...
---------------------------


‘अर्थ’ या महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपटातील ‘कोई ये कैसें बताएँ के वो तनहा क्यूँ है?’ हे जगजितनं गायलेलं (व त्याचंच संगीत असलेलं) कैफी आझमींचं गाणं म्हणजे एका चिरंतन वेदनेचं, खोल खोल घाव घालणारं, काळजात रुतत जाणारं विलक्षण गाणं आहे. मी हे गाणं कित्येक वर्षांपासून ऐकत आलो असलो, तरी हे गाणं खऱ्या अर्थानं समजायला वयाची निदान चाळिशी उलटावी लागते. त्यामुळं मलाही हे गाणं आत्ता आत्ताच कळू लागलं आहे, असं म्हणता येईल. जेवढं ते ‘कळत’ जातं, तेवढं ते अधिकाधिक रुतत जातं.
हे गाणं आपल्या आयुष्यात अपरिहार्यपणे येणाऱ्या, नाजूक नात्यातल्या कित्येक हळव्या प्रश्नांना पुकारत जातं. जगजितचा आवाज मखमली तर आहेच; पण या गाण्यात त्याच्या आवाजातला तो ‘दर्द’ इतका पुरेपूर उतरला आहे, की त्या धारदार सुरांच्या सुरीनं तो आपला कलेजा कापत चाललाय, असा भास होतो.
‘वो जो अपना था वही किसी और का क्यूं है...’ या प्रश्नातली वेदना, तो घाव आयुष्यात ज्यांनी एकदा तरी सोसलाय त्यांनाच कळावी. ‘यही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यूं है?’ असा आर्त सवाल इथं केला जातो, पण याला काही उत्तर नाही, हेही त्याच स्वरांत अधोरेखित होतं, हे जगजितच्या गायकीचं वैशिष्ट्य. ‘तुम मसर्रत का कहो या इसे ग़म का रिश्ता, कहते है प्यार का रिश्ता है जनम का रिश्ता, है जनम का जो ये रिश्ता तो बदलता क्यूँ है?’ असं शेवटी कवी विचारतो, तेव्हा असल्या जखमा उघड्या पडून, डोळ्यांतील अश्रूंद्वारे घळघळा वाहू लागतात.कैफींच्या शब्दांचं हे मोठेपण, जगजित आपल्या आवाजातून आणि विलक्षण परिमाणकारक संगीतातून आणखी मोठं करत नेतो.विशेषत: जगजित जेव्हा शेवटचे ‘क्यूँ है?’ हे दोन शब्द उच्चारताना ऐकावं. ती हताशा, असहायता, दु:ख, पीडा हे सगळं सगळं त्या अत्यंत कमाल उच्चारांत मिळून येतं.
महेश भट नावाचा मास्टर क्राफ्ट्समन जेव्हा उत्तम, ‘अर्थ’पूर्ण सिनेमे तयार करायचा, त्या काळात त्यानं हे गाणं आपल्या सिनेमात वापरलं. त्याच्या दिग्दर्शकीय नजरेचं कौशल्यही यात दिसतं. राजकिरण हा एक दुर्दैवी अभिनेता. या गाण्यात मात्र या उमद्या नटानं पडद्यावर या गाण्याचं सोनं केलं आहे. गाण्यातली आणि राजकिरणच्या हातातली गिटारही या वेदनेला आणखी गहिरं करते. यातही राजकिरण काही ठिकाणी जे कसंनुसं हसतो ना, ते हसणं खरोखर काळीज चिरत जातं. शबाना आझमी हातात मद्याचा प्याला येण्याच्या आधी आणि नंतरही या वेदनेचं मूर्तिमंत रूप होऊन समोर वावरते. या घावाला कारणीभूत ठरलेला कुलभूषण खरबंदा आणि त्याच्या खांद्याचा आसरा घेणारी स्मिता पाटील यांच्या अस्तित्वाची टोचणी या वेदनेला जणू आणखी जखमी करते!
गायक, संगीतकार, अभिनेते आणि दिग्दर्शक एकत्र येऊन काय चमत्कार करू शकतात, याचं चालतंबोलतं उदाहरण म्हणजे हे गाणं. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असे घाव - मग ते प्रेमभंगाचे असोत वा विश्वासघाताचे - सोसले असतील तर मग एखाद्या ‘शाम-ए-ग़म’ला हे गाणं ऐकत ऐकत स्वत:च स्वत:च्या वेदनांवर फुंकर घालण्याचं काम तेवढं आपल्या हातात उरतं. वयाची एक विशिष्ट प्रगल्भता आल्यावरच अशा गाण्यांचे अर्थ खोलवर उतरतात, हे मात्र खरं.
कितीही वर्णन केलं तरी या गाण्याविषयी नक्की काय वाटतं, हे शब्दांत उतरवता आलंय, असं मला वाटत नाही. त्यामुळं हे गाणं ऐकावं, पुन:पुन्हा ऐकावं आणि काळीजकातर, दुखऱ्या मनाची समजूत काढत राहावं... आणखी काय लिहिणे!


(९-१-२०२५)

हे गाणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

----

२. मेहंदी है रचनेवाली...
----------------------------


अलका याज्ञिकचा आवाज अतिमधुर आहे. प्रचंड गोडवा आहे तिच्या आवाजात... आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ९० चं दशक अलकानं गाजवलं. आमच्या तारुण्याचं गाणं म्हणजे अलका-साधना सरगम-कुमार सानू-उदित नारायण आणि सोनू निगम या पंचमस्वरांनी सजवलं. अलकाचं सर्वश्रेष्ठ सोलो गाणं म्हणून अनेक जण ‘जख्म’मधल्या ‘गली में आज चांद निकला....’चा उल्लेख करतील. ते गाणं आहेच तसं! मात्र, आज मला इथं वेगळ्याच गाण्याचा उल्लेख करायचाय. हे गाणं आहे ‘झुबेदा’मधलं ‘मेहंदी है रचनेवाली...’ संगीतकार अर्थातच ‘९०’चा निर्विवाद सम्राट - मोझार्ट ऑफ मद्रास - ए. आर. रेहमान!
रेहमानचं संगीत आणि अलकाचा मधाळ, पण इथं प्रसंगानुरूप लागलेला किंचित दुखरा आवाज यांचं जबरदस्त मिश्रण मला वारंवार या गाण्याच्या प्रेमात पाडतं. हे गाणं नुसतं ऐकलंत तरी ठीक आहे. मात्र, ते बघितलंत तर त्या गाण्याची व अलकाच्या आवाजाची खरी कमाल कळू शकेल. इथं अर्थातच हे मुख्य श्रेय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं. जोडीला करिश्मा कपूरचंही! करिश्मा ही फार अंडररेटेड अभिनेत्री आहे, असं माझं मत आहे. मला ती प्रचंड आवडते. तिचा झुबेदा आणि ‘दिल तो पागल है’ हे दोन सिनेमे - ती ‘द राज कपूर’ची नात आहे - हे सांगायला पुरेसे आहेत. या चित्रपटात सिच्युएशन अशी आहे, की झुबेदाचं लग्न तिच्या मनाविरुद्ध लावलं जातंय. मुस्लिम कुटुंब आहे. पारंपरिक आहे. त्या पद्धतीनं मेहंदीचा कार्यक्रम सुरू आहे. झुबेदा, म्हणजेच करिश्मा आतून प्रचंड धुमसते आहे. आई फरिदा जलाल व सुरेखा सिकरी शेजारी आहेत. त्या तिला नटवत आहेत, सजवत आहेत. या पार्श्वभूमीवर हे गाणं सुरू होतं. सुरुवातीला ते फरिदा जलालच्या तोंडी आहे व नंतर बॅकग्राउंडला जातं. करिश्मा प्रचंड चिडलेली आहे. ती अचानक उठते आणि आतल्या खोलीत जाऊन पिस्तूल शोधू लागते. ती पिस्तूल डोक्याला लावणार तोच फरिदा तिथं येते आणि ते पिस्तूल दूर फेकून देते. अक्षरश: हतबल झालेली करिश्मा प्रचंड रडत-स्फुंदत स्वत:ला आईच्या अंगावर झोकून देते. तोवर तिकडे वडील - अमरीश पुरी - कारमधून उतरतात. त्यांच्या उपस्थितीत, करड्या नजरेत पुढचा सगळा कार्यक्रम पार पडतो.
करिश्मा निर्जीव पुतळा होऊन, निर्विकार होऊन सगळा सोहळा नाइलाजास्तव पार पाडते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अलकाचं गाणं आपल्याला ऐकू येत राहतं. त्या आवाजात काय नाही? म्हटलं तर लग्नसमारंभात गायलं जाणारं पारंपरिक गाणं. मात्र, अलकाच्या आवाजात त्या प्रसंगाचे सर्व भाव पुरेपूर उतरतात. स्त्रीचं जगणं, तिची हतबलता, तिचं सोसणं, सर्व काही विसरून जणू काही घडलंच नाही अशा रीतीनं सर्व प्रसंग निभावून नेणं... पुरुषांना अनेकदा कळतही नाही आत काय काय वादळं येऊन गेलीयत ते! इथं तिचा होणारा नवरा शांतपणे तिच्या शेजारी बसला आहे आणि आपण प्रेक्षक म्हणून नुकतंच ते वादळ अनुभवलं आहे... अलकाचा आवाज हे सगळं त्या गाण्यात उतरवतो आणि आपल्यापर्यंत पोचवतो. 


हे गाणं स्त्रीच्या वेदनेचं आहे, तसंच ते तिच्या आंतरिक सामर्थ्याचंही आहे. अलकाचा आवाज ‘९०’च्या उडत्या चालींतल्या, तेव्हाच्या खासगी वाहतूक करणाऱ्या जीपांमध्ये वाजणाऱ्या कॅसेटींमधला असला, तरी अशा काही गाण्यांत तो तांब्या-पितळेत उठून दिसणाऱ्या एखाद्या हिऱ्यासारखा लखलखीत झळाळतो.
अलका याज्ञिक, खूप आनंद दिलात! 

(२० मार्च २०२३)

ये गाणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा....

27 Feb 2025

क्रिककथा दिवाळी अंक २४

सिनेमातलं क्रिकेट
----------------------


भारतीय लोकांना क्रिकेट, सिनेमा आणि क्राइम या तीन ‘सीं’विषयी अतोनात आकर्षण आहे. या तिन्ही विषयांत बोलायला कुणालाही कसल्याही पात्रतेची गरज नसते. या देशातील प्रत्येक नागरिक अगदी मुक्तपणे या तिन्ही विषयांत आपलं मत व्यक्त करत असतो. त्यातल्या त्यात क्राइम या विषयात सर्वसामान्यांना गप्पांव्यतिरिक्त फार काही करता येण्यासारखं नसल्यानं इतर दोन विषयांना फूटेज अधिक मिळतं, हेही खरं. क्रिकेट आणि सिनेमा ही दोन्ही आपल्याकडची ग्लॅमरस क्षेत्रं. दोन्ही अमाप लोकप्रिय. दोन्ही क्षेत्रांतील माणसांना मोठं वलय. त्यात यश मिळवणाऱ्यांचं अफाट कौतुक होतं. त्यांच्याविषयी एक सुप्त आकर्षण आणि आपुलकीही वाटते. मोठे ‘स्टार’ त्यातूनच जन्माला येतात. क्रिकेट आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रांतील मंडळी एकमेकांच्या क्षेत्रांत जात-येत असतात. सिनेमातल्या मंडळींना क्रिकेटमध्ये थेट खेळायला जाणं कठीण, तसंच क्रिकेटपटूंना थेट कॅमेऱ्यासमोर उभं राहून अभिनय करणं कठीण. मात्र, त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा त्या त्या वेळी घेण्यासाठी हे सर्व प्रकार सर्रास केले जातात. क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांचे विवाह किंवा अफेअर यांचीही आपल्याकडे चवीचवीनं चर्चा चालत असते. गॅरी सोबर्स-अंजू महेंद्रू, टायगर पतौडी-शर्मिला टागोर, व्हिव रिचर्ड्स-नीना गुप्ता, रवी शास्त्री-अमृतासिंग, मोहसीन खान-रीना रॉय, वासीम अक्रम-सुश्मिता सेन, विराट कोहली-अनुष्का शर्मा, हरभजनसिंग-गीता बसरा ही त्यातली काही गाजलेली उदाहरणं. क्रिकेटपटूंनी सिनेमात काम करणं हेही आपल्याकडं नवीन नाही. सुनील गावसकर (प्रेमाची सावली), संदीप पाटील (कभी अजनबी थे), अजय जडेजा (खेल) ही उदाहरणं प्रसिद्ध आहेत. गावसकरने मराठीत दोन गाणीही म्हटली आहेत. ऐंशीच्या दशकात सुनीलनं गायलेलं ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा…’ हे गाणं ‘आकाशवणी’वर सतत लागायचं. अलीकडं खूप वर्षांनी मी ते यू-ट्यूबवर ऐकलं, तेव्हा एकदम लहान झाल्यासारखं वाटलं.
क्रिकेट आणि सिनेमाचं हे असं नातं असल्यानं क्रिकेट रूपेरी पडद्यावर या ना त्या रूपात अवतरणार, यात काही आश्चर्य नाही. क्रिकेटवर आधारित अनेक चित्रपट आले. यात प्रामुख्याने दोन प्रकार दिसतात. एक पूर्ण काल्पनिक कथानकावर आधारित, तर दुसरे क्रिकेटपटूंचे बायोपिक. पहिल्या प्रकारात ‘इक्बाल’, ‘फेरारी की सवारी’ किंवा ‘लव्ह मॅरेज’सारखे सिनेमे येतात, तर दुसऱ्यात ‘८३’, ‘अजहर’, ‘एम. एस. धोनी’, ‘शाबाश मिथू’ असे सिनेमे येतात. याशिवाय ‘सचिन- ए बिलियन ड्रीम्स’सारखा डॉक्यु-सिनेमा या दुर्मीळ प्रकारातला ‘सिनेमा’ही आला आहे. क्रिकेटवर माहितीपट तर विपुल आहेत. आता विविध ओटीटी प्लॅटफॉर्ममुळं अनेक माहितीपट पाहायला मिळतात. त्यात क्रिकेटवर भरपूर माहितीपट उपलब्ध आहेत. मात्र, मला आठवते ते नव्वदच्या दशकात ‘दूरदर्शन’वरून प्रसारित झालेली ‘बॉडीलाइन’ ही प्रसिद्ध मालिका. इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील त्या कुप्रसिद्ध मालिकेवर आधारित ही टीव्हीमालिका खरोखर खिळवून ठेवणारी झाली होती. डॉन ब्रॅडमन, डग्लस जार्डिन, हेराल्ड लारवूड ही नावं तोवर नुसती ऐकली होती किंवा वाचली होती. या मालिकेच्या रूपानं (त्यांच्या पात्रांच्या रूपानं का होईना) तेव्हाचं नाट्य पडद्यावर प्रत्यक्ष अनुभवता आलं होतं. अलीकडं आलेली ‘इनसाइड एज’ ही आयपीएलसारख्या स्पर्धांवर आधारित मालिकाही गाजली होती. अर्थात इथे आपल्याला प्रामुख्याने ‘क्रिकेटचा समावेश असलेले चित्रपट’ याच वर्गवारीचा अधिक विचार करायचा आहे.
त्या दृष्टीने विचार केल्यास वरील दोन्ही प्रकारांतला सर्वोत्कृष्ट किंवा आतापर्यंतचा सर्वांत यशस्वी हिंदी चित्रपट आहे तो ‘लगान’. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ २००१ मध्ये प्रदर्शित झाला. क्रिकेट सामन्याची मध्यवर्ती कल्पना घेऊन आशुतोषने तीन तासांचं हे भव्य नाट्य रूपेरी पडद्यावर अतिशय तळमळीनं सादर केलं होतं. आमीर खानच्या करिअरला वेगळं वळण देणारा असा हा सिनेमा होता. ब्रिटिशांच्या सत्ताकाळात एकोणिसाव्या शतकात चंपानेर या मध्य भारतातील एका काल्पनिक संस्थानात घडणारी ही गोष्ट होती. दुष्काळामुळं शेतकऱ्यांना सारा (लगान) देता येत नाही. तेव्हा तो वसूल करण्यासाठी त्या प्रांतातील आढ्यतेखोर अधिकारी कर्नल रसेल गावकऱ्यांसमोर क्रिकेट सामना खेळण्याचा प्रस्ताव ठेवतो. ‘लगान’ रद्द करून घ्यायचा असेल तर अर्थात या सामन्यात इंग्रजांच्या टीमला हरवावं लागेल, ही मुख्य अट असते. गावकऱ्यांच्या वतीनं भुवन (आमीर) हे आव्हान स्वीकारतो आणि कधीही न खेळलेल्या त्या चेंडू-फळी नावाच्या ‘विचित्र’ खेळाचा अभ्यास सुरू करतो. या कामी त्याच्या मदतीला येते कर्नल रसेलची बहीण. हिचं मनोमन भुवनवर प्रेम बसतं. भुवन त्या दुष्काळी प्रांतातील नानाविध प्रकारच्या लोकांना एकत्र करून अक्षरश: एकहाती संघबांधणी करतो. त्यानंतर प्रत्यक्ष सामना रंगतो, त्यात येणाऱ्या अडचणी, भोळ्याभाबड्या गावकऱ्यांचं या खेळाविषयीचं आधी अज्ञान, मग कुतूहल आणि मग जिंकणारी ईर्षा, भुवनची प्रेमकहाणी, कॅप्टन रसेलचे राजकारणी डावपेच… या सगळ्याला देशभक्तीचा जोरदार तडका आणि ए. आर. रेहमानची जबरदस्त गाणी असा सगळा योग जुळून आल्यानं ‘लगान’ सुपरडुपर हिट झाला.


आशुतोष गोवारीकरच्या डोक्यात अनेक वर्षं हे कथाबीज घोळत होतं. त्याला हवा तसा सिनेमा तयार करायला बराच खर्च येणार होता. तो खर्च करायला तयार असणारा निर्माता त्याला मिळत नव्हता. मात्र, आमीर खानला या कथेत ‘स्पार्क’ आढळला. आमीरचा हा अंदाज किती योग्य होता, हे भविष्यात सिद्ध झालंच. आशुतोषनं अतिशय तब्येतीनं, वेळ घेत हा सिनेमा तयार केला. या सिनेमासाठी गुजरातमध्ये भुजजवळ एक गावच वसवण्यात आलं होतं. ‘मेकिंग ऑफ लगान’ नावाच्या माहितीपटात हा सर्व प्रवास तपशीलवार दाखवण्यात आला आहे. अनेक बाबतींत ‘लगान’ हा ‘शोले’सारखा होता. दोन्ही चित्रपटांना लाभलेल्या प्रचंड यशात काही साम्यस्थळं होती. अतिशय बंदिस्त पटकथा, प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहील अशा पद्धतीनं केलेलं काम, मुख्य भूमिकेत लोकप्रिय अभिनेता आणि उतम संगीत. याशिवाय ‘लगान’च्या पारड्यात अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे क्रिकेट. या सिनेमाच्या केंद्रस्थानी क्रिकेट होतं. भारत अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळत असला तरी आपल्या देशात अगदी तळागाळापर्यंत क्रिकेटचं वेड आणि प्रत्यक्ष तो खेळण्याची मुलांमधली आस ही साधारण १९८३ मध्ये आपण इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रुजली असं म्हटल्यास वावगं ठरू नये. यानंतर पुढचीच वर्ल्ड कप स्पर्धा १९८७ मध्ये भारतातच भरली. यामुळं क्रिकेटची लोकप्रियता आणखी वाढली. याच वर्षी सुनील गावसकर निवृत्त झाला, पण दोनच वर्षांनी भारताला सचिन तेंडुलकर नावाचा सुपरस्टार मिळाला. यानंतर भारतानं १९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर भारतात खासगी वाहिन्या दिसू लागल्या. ‘स्टार टीव्ही’चं उच्च दर्जाचं प्रक्षेपण भारतातही दिसू लागलं. जाहिराती वाढल्या. भारतीय क्रिकेट मंडळ पैशांनी श्रीमंत होऊ लागलं. मग १९९६ चा वर्ल्ड कप पुन्हा भारतात (पाकिस्तान व श्रीलंकेसोबत संयुक्त यजमान) भरला. क्रिकेटच्या छोट्याशा जगावर भारताचं साम्राज्य मैदानावर नसलं, तरी आर्थिकदृष्ट्या जाणवू लागलं होतं. याच काळात शतकानं कूस बदलली. सिनेमाही बदलला. भारतात मल्टिप्लेस संस्कृतीचं आगमन झालं. ‘दिल चाहता है’ हा या नव्या तरुणाईच्या मानसिकतेचा वेध घेणारा फ्रेश चित्रपट याच काळात आला. सुभाष घईंपासून ते फरहान अख्तरकडे असा हा प्रवास सुरू झाला होता. चित्रपटांत वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले होते. याच काळात ‘लगान’ आला. मल्टिप्लेक्सचं आगमन झालं असलं, तरी देशभर अद्याप सिंगल स्क्रीन थिएटरचंच प्राबल्य होतं. त्यामुळं तब्बल सव्वातीन तासांचा हा सिनेमा बघणं तेव्हा प्रेक्षकांना जड गेलं नाही. सिनेमाही अर्थात खिळवून ठेवणाराच झाला होता. भारतीय क्रिकेटही बदलत होतं. सचिन, गांगुली, सेहवाग, लक्ष्मण, द्रविड, कुंबळे, झहीर यांच्या संघात आता विजिगिषू वृत्ती दिसत होती. भुवनच्या संघानं तेव्हाच्या राज्यकर्त्या इंग्लंडच्या संघाला हरवणं हे फारच प्रतीकात्मक आणि अपील होणारं होतं. आशुतोषनं सिनेमातील संघात घेतलेले एकेक खेळाडूही भारतातील सर्व धर्म, प्रांत यांचं नेमकं प्रतिनिधित्व करत होते. अगदी ‘अछूत कचरा’ हे पात्र आणून आशुतोषनं त्याला यातून कोणता संदेश द्यायचा आहे हे बरोबर अधोरेखित केलं होतं. ‘लगान’ भारतीयांना मनापासून आवडेल अशी डिश होती. ती तुफान लोकप्रिय होणार होती, याची बीजं तिच्या कथासूत्रात आणि क्रिकेटसारख्या मध्यवर्ती संकल्पनेचा नेमका वापर करण्यात दडली होती. आजही क्रिकेट या विषयावरचा फिक्शन गटातला सर्वोत्तम चित्रपट म्हणून ‘लगान’चं स्थान अढळ आहे.

‘लगान’नंतर फिक्शन प्रकारात मोठी लोकप्रियता मिळविणारा चित्रपट म्हणून नागेश कुकनूरच्या ‘इक्बाल’चा उल्लेख करावा लागेल. सुभाष घईंची निर्मिती आणि नागेश कुकनूरचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला. यातील ‘इक्बाल’ची भूमिका साकारणाऱ्या श्रेयस तळपदेला या चित्रपटामुळं देशव्यापी (खरं तर विश्वव्यापी) प्रसिद्धी मिळाली. यातील नसीरुद्दीन शाह यांची भूमिकाही उल्लेखनीय होती. इक्बालच्या बहिणीच्या भूमिकेत श्वेता प्रसादनं, आईच्या भूमिकेत प्रतीक्षा लोणकरनं, तर वडिलांच्या भूमिकेत यतीन कार्येकरनं चांगली छाप पाडली. ‘इक्बाल’मधलं ‘आशाएँ खिली दिल में…’ हे केकेनं गायलेलं गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. अगदी आजही ते तितकंच लोकप्रिय आहे. ‘इक्बाल’ ही एका मूकबधिर मुलाच्या स्वप्नांची प्रेरणादायी कहाणी होती. या मुलाला क्रिकेटचं वेड असतं. त्याला भारतासाठी क्रिकेट खेळायचं असतं. मात्र, मूकबधिर मुलाला कोण संघात घेणार? त्याचे वडील त्यामुळं त्याला विरोध करत असतात. मात्र, त्याची धाकटी बहीण त्याला कायम प्रोत्साहन देत असते. अखेर ती मोहित (नसीरुद्दीन) नावाच्या एका मद्यपी क्रिकेटरला भेटते आणि इक्बालला प्रशिक्षण देण्याची विनंती करते. हा मोहित एके काळचा चांगला क्रिकेटर असतो. तो मग इक्बालला कसं घडवतो, याची ही कथा. नागेशनं ही गोष्ट अतिशय साध्या, पण प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या पद्धतीनं मांडली होती. इक्बालचा संघर्ष हा जणू भारतात क्रिकेट खेळू इच्छिणाऱ्या, पण विविध कारणांनी तिथपर्यंत पोचू न शकणाऱ्या अनेक मुलांचा प्रातिनिधिक संघर्ष होता. म्हणूनच तो सगळ्यांना एवढा भावला! नागेश कुकनूरची ही एक सर्वोत्तम कलाकृती म्हणता येईल.
नॉन-फिक्शन प्रकारांत क्रिकेटपटूंवरचे बायोपिक बरेच आले. त्यातला नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट चांगला चालला. मला स्वत:ला त्यात काहीसं अपुरेपण जाणवलं. अर्थात क्रीडापटूंवर बायोपिक बनवणं सोपं नाही. विशेषतः तो खेळाडू अद्याप खेळत असेल तर खूपच. पण तरीही नीरज पांडे दिग्दर्शक असल्यामुळं अपेक्षा उंचावल्या होत्या. हे सर्व लक्षात घेता, हा सिनेमा वन टाइम वॉच वाटला. धोनीसारख्या खेळाडूचं आयुष्य नक्कीच प्रेरणादायी आहे. पण सिनेमा ते सगळं आयुष्य दाखवत नाही आणि इथंच तो अपुरा वाटतो. एक मात्र आहे. सुशांतसिंह राजपूतनं धोनीचं काम फार मस्त केलं होतं. तो संपूर्ण सिनेमाभर धोनीच वाटतो, हे त्याचं यश. रांचीसारख्या छोट्या गावातून येऊन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्यातही सर्वाधिक यशस्वी कर्णधार हा धोनीचा प्रवास खूपच प्रेरणादायक आहे. नीरजसारखा दिग्दर्शक असल्यानं हा प्रवास रोचक पद्धतीनं पाहायला मिळेल, अशा अपेक्षेनं आपण सिनेमा पाहायला सुरुवात करतो. सिनेमा खूपच मोठा आहे. तीन तास दहा मिनिटांचा... त्यामानाने त्यात नाट्यमयता कमी आहे. पूर्वार्धात धोनीचं पूर्वायुष्य आलं आहे. (जी खरंच आपल्याला माहिती नसलेली, म्हणजेच अनटोल्ड स्टोरी आहे..) ही सगळी गोष्ट एकरेषीय पद्धतीनं साकारते. पण त्यात आपल्याला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी असल्यानं त्यातील रंजकता टिकून राहते. धोनी शाळेत असतानाचं त्याचं फुटबॉलप्रेम, क्रिकेटकडे अपघातानं वळणं इथपासून ते खरगपूर स्टेशनवर टीसी म्हणून त्यानं केलेली नोकरी हा सगळा भाग पूर्वार्धात चांगला जमला आहे. विशेषतः धोनी हा 'यारों का यार' आहे आणि त्याचे सर्व मित्र आणि त्यांनी धोनीच्या उत्कर्षासाठी केलेला आटापिटा हा सर्वच भाग खूपच सुंदररीत्या समोर येतो. उत्तरार्ध धोनीच्या सगळी क्रिकेट करिअरची चढती भाजणी मांडणारा आहे. हा भाग बऱ्यापैकी निराश करतो. धोनीसारख्या छोट्या गावातून आलेला तरुण भारतीय संघात तेव्हा असलेल्या दिग्गजांशी कसा वागतो, कसा बोलतो, संघ उभारणी कशी करतो, त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या राजकारणाचा मुकाबला कसा करतो, तो स्वतः इतरांविरुद्ध कसं राजकारण करतो, त्याच्या बाजूनं कोण असतं, विरोधात कोण असतं, हे सगळं यात आपल्याला पाहायला मिळेल, असं वाटतं. पण तसं ते काहीच होत नाही. कारण आपल्याकडं बायोपिक काढण्यासाठी वास्तवाचा कठोर सामना करण्याचं धैर्य ना त्या कथानायकाकडं असतं, ना दिग्दर्शकाकडं! बीसीसीआयचा यातला उल्लेख तर एवढा गुडीगुडी आहे, की हसू येतं. गांगुली, द्रविड, सेहवाग, कुंबळे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ज्याचं पोस्टर लहानपणी धोनीनं हट्टानं विकत घेतलेलं असतं, तो सचिन तेंडुलकर... या सर्वांसोबत खेळण्याची, एवढंच नव्हे, तर त्यांचा समावेश असलेल्या टीमचं नेतृत्व करण्याची संधी धोनीला मिळाली. तेव्हा त्याला काय वाटलं, तो या सगळ्यांशी कसा वागला-बोलला हे पाहण्यात प्रेक्षकांना रस होता. केवढं नाट्य आहे या घटनेत! पण या सगळ्या घटना सिनेमा आला तेव्हा नुकत्याच घडून गेल्यामुळं आणि खुद्द धोनीही तेव्हा वन-डेत का होईना, पण खेळत होता, त्यामुळे त्या सर्वांवर काहीही भाष्य करायला दिग्दर्शकाची छाती झाली नसावी. असो. सिनेमाचा क्लायमॅक्स अर्थातच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २०११ मध्ये झालेला वर्ल्ड कपचा अंतिम सामना आणि त्यात धोनीनं षटकार मारून भारताला मिळवून दिलेला अविस्मरणीय विजय हाच आहे. किंबहुना याच दृश्यापासून चित्रपटाची सुरुवात होते आणि शेवटही इथंच येऊन होतो... हा क्षण पुन्हा जगण्यासाठी हा सिनेमा आपण पाहू शकतो.
‘धोनी’प्रमाणे ‘अजहर’ हा महमंद अजहरुद्दीनवरचा बायोपिक सिनेमा आला होता. इम्रान हाश्मीने यात अजहरचं काम केलं होतं. हा सिनेमा म्हणजे अजहरवर झालेले मॅच फिक्सिंगचे आरोप कसे चूक होते आणि त्याच्यावर कसा अन्याय झाला, हे सांगण्याचा आटापिटा होता. मात्र, तो अजिबात कन्व्हिन्सिंग नव्हता. त्यामुळेच हा सिनेमा अपयशी ठरला.

त्या तुलनेत अगदी अलीकडं आलेला ‘८३’ हा भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप विजयावरचा चित्रपट उत्तम झाला होता. कपिल देवच्या जिगरबाज नेतृत्वाखाली जिंकलेल्या या यशोगाथेची कहाणी सांगणारा हा कबीर खान दिग्दर्शित चित्रपट. तो बघताना अनेकदा आपले डोळे पाणावतात. हृदय उचंबळून येतं. देशप्रेमाच्या भावनेनं मन ओथंबून जातं. सिनेमा संपला, तरी किती तरी वेळ हा प्रभाव टिकून राहतो. मी तर हा सिनेमा बघून आल्यावर पुन:पुन्हा त्या अंतिम सामन्याची क्षणचित्रं यू-ट्यूबवर बघितली. परत परत तो अपार जल्लोष, ती उत्कट विजयी भावना मनात साठवून घेतली. एवढा त्या सिनेमाचा प्रभाव होता!
कबीर खाननं ‘८३’ सिनेमा अगदी ‘दिल से’ तयार केला आहे, हे त्या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतं. खरं सांगायचं तर या सिनेमाचा ट्रेलर मी प्रथम पाहिला तेव्हा मला तो काही तितकासा भावला नव्हता. अगदी रणवीरसिंहही कपिल म्हणून पटला नव्हता. इतर खेळाडू तर सोडूनच द्या! मात्र, त्यामुळंच मी अगदी किमान अपेक्षा ठेवून हा सिनेमा पाहायला गेलो होतो. त्या तुलनेत तो खूपच उजवा निघाला आणि अंत:करणापर्यंत पोचला.
हा सिनेमा अर्थातच केवळ वर्ल्ड कपमधल्या त्या विजयापुरता नाही. तो अर्थातच केवळ क्रिकेटपुरताही नाही. भारताला जागतिक स्तरावर एक ताकद म्हणून ओळख मिळवून देणारी, देशवासीयांचा स्वाभिमान जागविणारी, पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारी अशी ती एक ऐतिहासिक घटना होती. म्हणूनच कबीर खान चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्या काळात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचे सूचक उल्लेख करून आपल्याला त्या काळात नेतो. फूलनदेवी आणि नवाबपूरची दंगल हे त्यातले ठळक उल्लेख.
भारतीय क्रिकेट मंडळ आणि तेव्हाच्या क्रिकेटपटूंची एकूणच सांपत्तिक स्थिती, क्रिकेटच्या जगात, त्यातही वन डे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं असलेलं स्थान, स्वातंत्र्य मिळून ३५ वर्षं झाली तरी इंग्लंडबाबत मनात असलेली ‘साहेबाचा देश’ ही मानसिकता, इंग्लिश क्रिकेट बोर्ड आणि एकूणच तेथील पत्रकार, सर्वसामान्य यांच्या मनात भारताबद्दल असलेली तुच्छतावादी मानसिकता, वेस्ट इंडिजच्या संघाचा तेव्हा असलेला प्रचंड दबदबा, आपले क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटुंबीय, आपल्या संघाचे उत्साही आणि धडाकेबाज मॅनेजर मानसिंह असे सगळे बारकावे आणि व्यक्तिरेखा कबीर खाननं अगदी बारकाईनं टिपल्या होत्या. त्यामुळंही हा सिनेमा अधिक भिडला असावा.
रणवीरसिंह कपिल म्हणून शोभत नाही, हे ट्रेलर बघून झालेलं माझं मत सिनेमा बघितल्यानंतर पूर्ण पुसलं गेलं. त्यानं फारच मेहनतीनं ही भूमिका साकारली, यात वाद नाही. श्रीकांत झालेल्या जिवा या अभिनेत्यानं मजा आणली. पंकज त्रिपाठीनं मानसिंहच्या भूमिकेत हा सिनेमा अक्षरश: तोलून धरला, यात दुमत नसावं.
सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यावर दोन-तीन वर्षांनी‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जेम्स एरिस्काईन यांनी तो दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट म्हणण्यापेक्षा माहितीपट होता, असं म्हणणं योग्य ठरेल. अर्थात सचिनची लोकप्रियता एवढी, की हा माहितीपटही लोकांनी थिएटरला जाऊन पाहिला. सचिनशी बहुतेकांचं नातं भावनिक असल्यानं हा माहितीपट पाहताना, सचिनचं संपूर्ण करिअर पुन्हा अनुभवताना कित्येकदा भावनोत्कट व्हायला झालं. अनेकदा डोळ्यांत अश्रू आले. सचिनचे कौटुंबिक जीवनातील अनेक महत्त्वाचे क्षण या माहितीपटाच्या निमित्ताने सगळ्यांना पाहता आले. महत्त्वाच्या सामन्यांच्या वेळी सचिन काय तयारी करत होता, त्याची मन:स्थिती कशी असायची, कर्णधारपद सोडताना नक्की काय काय घडलं, ‘टेनिस एल्बो’सारख्या त्रासाला तो कसा सामोरा गेला, हे सगळं या चित्रपटातून थोडं फार समजलं. अर्थात, सचिनविषयीची उत्सुकता पूर्ण शमवण्यात हा माहिती-चित्रपट पूर्ण यशस्वी झाला असं म्हणता येत नाही. सचिनवर चित्रपट तयार करणं हे सोपं काम नाहीच. मात्र, भविष्यात त्याच्यावर पूर्ण लांबीचा चित्रपट (माहितीपट नव्हे) तयार होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. अर्थात, त्यासाठी दिग्दर्शक त्या तोलामोलाचा हवा हेही तितकंच खरं.
या पार्श्वभूमीवर अगदी अलीकडं आलेल्या ‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करायला हवा. प्रवीण तांबे या क्रिकेटपटूचं नाव हा सिनेमा येण्याआधी खरोखर फार थोड्या लोकांनी ऐकलं होतं. त्यामुळं सिनेमाचं शीर्षक अगदी यथार्थ होतं. हा सिनेमात प्रवीण तांबेचं काम श्रेयस तळपदेनं केलं आहे. ‘इक्बाल’नंतर त्याचा हा दुसरा महत्त्वाचा क्रिकेटपट. अर्थात, या सिनेमात त्याला प्रत्यक्षातील व्यक्तीची भूमिका साकारायची होती. जयप्रद देसाई या दिग्दर्शकाचा हा चित्रपट प्रवीण तांबे या मुंबईतील अवलिया क्रिकेटपटूची कहाणी मांडतो. या प्रवीण तांबेनं वयाच्या ४१ व्या वर्षी एका आयपीएल संघात स्थान मिळवलं, तेव्हा सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी चकित झाले. ‘हा कोण प्रवीण तांबे?’ असाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्याच प्रवीणचा संघर्षपूर्ण, पण प्रेरणादायी लढा हा सिनेमा आपल्याला सांगतो. श्रेयसनं पुन्हा एकदा यात आपल्या अभिनयाची कमाल दाखवली आहे. क्रिकेटविषयी असलेली प्रचंड आत्मीयता एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काय उलथापालथी घडवू शकते, त्याला कुठून कुठे नेऊ शकते, याचं फार प्रत्ययकारी दर्शन दिग्दर्शकानं या सिनेमात घडवलं होतं. चित्रपटाची कथा लिहिणारे किरण यज्ञोपवित यांनाही या यशाचं श्रेय द्यायला हवं.
लोकप्रिय खेळाडूंचे चरित्रपट येत असतातच. आपल्याकडे आत्ताआत्तापर्यंत क्रिकेट म्हटलं, की फक्त पुरुषांचं क्रिकेट डोळ्यांपुढं येतं. मात्र, अलीकडं महिला क्रिकेटलाही चांगले दिवस येत आहेत आणि ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. शुभांगी कुलकर्णी, डायना एडलजी अशा जुन्या काळातील दिग्गज खेळाडूंसारखा संघर्ष आताच्या पिढीला तुलनेनं कमी करावा लागतोय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) आता पुरुष व महिला खेळाडूंचे सामन्याचे मानधनही एकसारखे केले आहे. आताच्या हरमन प्रीत कौर किंवा स्मृती मानधना यांचीही लोकप्रियता पुरुष खेळाडूंसारखीच आहे. अर्थात भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत मोठी खेळाडू म्हणून डोळ्यांसमोर नाव येतं ते मिताली राजचं. मितालीच्या नावे असलेले अनेक विश्वविक्रम आणि खेळातील तिची आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे. अशा या मितालीच्या आयुष्यावरही ‘शाबाश मितू’ हा चित्रपट आला आहे, ही फार कौतुकाची बाब आहे. श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात मितालीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने केली आहे. सुमारे दोन तास ३६ मिनिटांच्या या चित्रपटात मितालीची पूर्ण कारकीर्द उभी करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. दुर्दैवाने ‘बॉक्स ऑफिस’वर या चित्रपटाला फारसे यश लाभले नाही.

ही झाली प्रत्यक्ष क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित काही चित्रपटांची माहिती; मात्र, काल्पनिक कथानक असलेल्या अनेक हिंदी चित्रपटांत या ना त्या प्रकारे क्रिकेट डोकावलं आहे. अगदी जुनं उदाहरण घ्यायचं म्हणजे  देव आनंद व माला सिन्हा यांचा ‘लव्ह मॅरेज’ हा १९५९ मध्ये आलेला सिनेमा. सुबोध मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात नायक देव आनंद हा झाशी शहरातील स्टार क्रिकेटपटू असतो. विशेष म्हणजे सिनेमातलं नाव सुनीलकुमार असतं. नायिका माला सिन्हाला आधी हा नायक आखडू वाटतो, मात्र नंतर त्याचं क्रिकेट पाहून ती त्याच्या प्रेमात पडते वगैरे. देव आनंदचं हे क्रिकेटप्रेम तीस वर्षांनंतरही कायम राहिलं. त्यानं १९९० मध्ये निर्माण केलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘अव्वल नंबर’ या चित्रपटाचं कथानक क्रिकेटकेंद्रितच होतं. कोवळा आमीर खान यात नायकाच्या भूमिकेत होता. गंमत म्हणजे यातही नायकाचं नाव ‘सनी’ असतं. (सुनील गावसकर १९८७ मध्ये निवृत्त झाला होता, आणि सचिनचा उदय व्हायचा होता, अशा काळात हा चित्रपट निर्माण होत होता, हे लक्षात घेतलं पाहिजे.) तर या सनीला क्रिकेट संघात घेतलं जातं, त्याच वेळी रॉनी या दुसऱ्या स्टार क्रिकेटपटूला बाहेर ठेवलं जातं. रॉनी सनीचा बदला घ्यायचं ठरवतो. तेव्हाच एक अतिरेकी क्रिकेटच्या मैदानात बॉम्ब ठेवण्याचा कट रचतो. डीआयजी विक्रमसिंह (साक्षात देवसाब) अर्थातच हा कट उधळून लावतात. भारत वि. ऑस्ट्रेलिया या महत्त्वाच्या सामन्यात मग सनी विजयी खेळी करून भारताला विजय मिळवून देतो, हे ओघानं आलंच. हा देव आनंद यांचा चित्रपट असल्यानं तो ‘अफाट’च होता. तो तिकीटबारीवर जोरदार पडला, हे सांगायची गरज नाही.
अगदी अलीकडच्या काळात म्हणजे २०११ मध्ये अक्षयकुमारचा ‘पतियाळा हाऊस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतीय वंशाचा, इंग्लंडचा फिरकी गोलंदाज माँटी पानेसर याच्या जीवनप्रवासावर ढोबळपणे हा चित्रपट आधारित होता. इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्याचं मुलाचं स्वप्न आणि वंशवादाच्या भीतीमुळं वडिलांचा होणारा विरोध हा संघर्ष अखेर मुलाच्या कर्तबगारीमुळं संपुष्टात येतो, अशी ही कथा. या चित्रपटाला माफक यश मिळालं. भारतात २०११ चा वर्ल्ड कप भरला होता, त्याच कालावधीत हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘क्रिकेट फीव्हर’मुळे सिनेमाला नक्कीच फायदा झाला.
याशिवाय राणी मुखर्जीचा ‘दिल बोले हडिप्पा’ हा २००९ मध्ये आलेला आणखी एक महत्त्वाचा क्रिकेटविषयक चित्रपट. ‘शी इज द मॅन’ हा चित्रपटावरून (जो मुळात शेक्सपीअरच्या ‘ट्वेल्थ नाइट’वर आधारित होता) प्रेरित होऊन तयार झालेला अनुरागसिंह दिग्दर्शित हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. शाहीद कपूरने यात नायकाची भूमिका केली होती. क्रिकेट खेळण्यासाठी पुरुष खेळाडू असल्याचं नाटक करणाऱ्या ‘वीरा’ची भूमिका राणीनं ताकदीनं पेलली होती. चित्रपटाचा विषयच असा होता, की त्यात नाट्य भरपूर होतं. शिवाय भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ‘खुन्नस’ची पार्श्वभूमी होती. हा सगळा तडका, मसाला असल्यामुळं सिनेमा थोडा फार चालला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं तेव्हा ६५ कोटींचा गल्ला गोळा केला होता. राणीच्या अभिनयाचं कौतुक झालं. तिला पुरस्कारही मिळाले.
याशिवाय ‘जन्नत’ या २००८ मध्ये आलेल्या इम्रान हाश्मीच्या सिनेमानं क्रिकेटमधील काळे पर्व असलेल्या ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणावर भाष्य केलं होतं. साधारण त्याआधी दहा वर्षांपूर्वी, म्हणजे १९९९ च्या आसपास संपूर्ण क्रिकेट विश्व मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळं वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. ‘जन्नत’मधून क्रिकेट आणि सट्टेबाजी, क्रिकेट आणि अंडरवर्ल्ड या संबंधांवर दिग्दर्शक कुणाल देशमुखनं भाष्य केलं होतं. या चित्रपटाला चांगलं यश मिळालं. पुढं ‘जन्नत’चे आणखी काही भाग आले आणि तेही यशस्वी झाले. 
‘फेरारी की सवारी’ हा २०१२ मध्ये आलेला राजेश मापुस्कर दिग्दर्शित चित्रपट अतिशय सुंदर होता. या देशातील सर्वसामान्य नागरिकांचं क्रिकेटशी कसं भावनिक नातं आहे, हे या सिनेमात फार लोभसपणे दाखवलं होतं. यात शर्मन जोशी, बोमन इराणी आणि ऋत्विक साहोर या बालकलाकारानं छान काम केलं होतं. चित्रपटात शेवटी साक्षात सचिन तेंडुलकरचं दर्शन होणं हा चाहत्यांना सुखद धक्का होता.
याव्यतिरिक्त २००७ मध्ये आलेला ‘चैन कुली की मैन कुली’, मुथय्या मुरलीधरनचा जीवनपट मांडणारा ‘८००’ किंवा अगदी अलीकडं आलेला ‘मि. अँड मिसेस माही’ असे अनेक चित्रपट क्रिकेटवर आधारित होते. याशिवाय मला ज्ञात नसलेले किंवा स्मरणातून निसटलेले आणखी काही सिनेमे असतीलच. आणखी एक म्हणजे यात प्रामुख्याने मुख्य धारेतील हिंदी सिनेमाचाच विचार केला आहे. प्रादेशिक भारतीय भाषांत तयार झालेल्या, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार झालेल्या (तसे असतील तर) अन्य चित्रपटांची दखल यात घेतलेली नाही. तशी ती घेणं विस्तारभयास्तव शक्यही नाही.
सुरुवातीला म्हटलं तसं क्रिकेट आणि सिनेमा ही आपल्या देशातील आत्यंतिक आवडीची दोन क्षेत्रं. ती एकत्र आणण्याचा मोह भल्याभल्या चित्रकर्मींना झाला. काही यशस्वी झाले, तर काही फसले. कितीही मोठा खेळाडू असला, तरी तो प्रत्येक सामन्यात शतक करू शकत नाही, तसंच हे आहे. मात्र, यातल्या जमलेल्या कलाकृतींनी आपल्या मनमुराद आनंद दिला आहे, यात शंका नाही.


(पूर्वप्रसिद्धी : क्रिककथा दिवाळी अंक, २०२४)

-------

14 Feb 2025

मुंबई ट्रिप ८-२-२०२५

मोठं होत जाण्याचं सुरेल गाणं...
-------------------------------------


मित्र डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही...’ या कार्यक्रमाचा दोन हजारावा प्रयोग मुंबईतील नीता मुकेश अंबानी सेंटरमधील ‘ग्रँड थिएटर’मध्ये होणार आहे, हे कळलं त्याच वेळी या कार्यक्रमाला आपण जायचंच हे मी मनोमन निश्चित केलं होतं. ‘आयुष्यावर बोलू काही...’ (एबीके) कार्यक्रम २००३ मध्ये सुरू झाला. गेली २२ वर्षं तो सतत सुरू आहे. अर्थात सलील व संदीप या दोघांशीही माझी मैत्री या कार्यक्रमापेक्षा जुनी. संदीप व मी तर एकाच कॉलेजचे - पुण्यातील गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकचे. मी पहिल्या वर्षाला होतो, तेव्हा संदीप तिसऱ्या वर्षाला (इलेक्ट्रिकल) होता. त्या वर्षीच्या गॅदरिंगमध्ये त्यानं ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यांत’ हे गाणं स्वत: पेटी वाजवून म्हटलं होतं. म्हणजे हे गाणं मी आता ३० हून अधिक वर्षं ऐकतो आहे. (आम्ही तेव्हा काही एकमेकांना भेटलो नाही व मित्रही झालो नाही. नंतर मी ‘सकाळ’मध्ये असताना आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी त्याला हा किस्सा सांगितला होता. तेव्हापासून संदीप मला ‘कॉलेज मित्र’च म्हणतो.) सलीलची ओळखही मी १९९७ मध्ये ‘सकाळ’मध्ये रुजू झाल्यानंतरचीच. सलील व संदीपच्या कार्यक्रमांवर मी आमच्या ‘कलारंजन’ पुरवणीत तेव्हा काही छोटेखानी लेखही लिहिले होते. या दोघांचा ‘आयुष्यावर बोलू काही...’ हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा मी तो लगेचच पाहिला. बहुतेक टिळक स्मारक मंदिरात असेल. या कार्यक्रमाचा ताजेपणा व तारुण्य दोन्ही चटकन जाणवलं. पुढं अनेकदा हा कार्यक्रम ऐकला. कॅसेट आणल्या. सीडी आणल्या. नंतर कार घेतल्यावर याच सीडी सतत वाजत असायच्या. पुढचेही सगळे अल्बम विकत घेतले आणि सतत ऐकत राहिलो....
...म्हणूनच परवा, ८ फेब्रुवारीला ‘एनएमएसीसी’च्या भव्य प्रयोगाच्या सुरुवातीलाच शुभंकर व रुमानी यांनी निवेदन केलं, तेव्हा मला अगदी भरून आलं. कार्यक्रम सुरू झाला आणि सलील व संदीपनं ‘जरा चुकीचे... जरा बरोबर...’ म्हणायला सुरुवात केल्याबरोबर नकळत डोळे वाहू लागले. असं का व्हावं, याचं मला आश्चर्य वाटलं. पण नंतर जाणवलं, की ही तर आपल्याच मोठं होण्याची गोष्ट आहे. सलील, संदीप व मी जवळपास समवयस्क. मी थोडा लहानच त्यांच्यापेक्षा. पण आमची मुलं साधारण एकसारख्या वयाची. ‘अग्गोबाई, ढग्गोबाई’वर महाराष्ट्रातल्या अगणित आयांनी आपापल्या मुलांची जेवणं केली तसं आम्हीही नीलला भरवलं आहे. शुभंकर किंवा रुमानी जसे मोठे झाले तसाच नीलही आता मोठा झाला आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’चा पाचशेवा प्रयोग गणेश कला-क्रीडा मंच इथं झाला होता. तेव्हा नील बराच लहान होता. तो कार्यक्रम ‘झी मराठी’वर नंतर सादर झाला होता. त्यात काही सेकंद लहानग्या नीलवर कॅमेरा गेलेला आहे. आम्हाला अक्षरश: सर्व महाराष्ट्रातून नातेवाइकांनी फोन करून नीलला पाहिल्याचं कळवलं. आम्हीही तो कार्यक्रम कधीही परत टीव्हीवर लागला, की नील दिसेल म्हणून परत परत पाहत असू. अशा वेगळ्याच रीतीनं तोही या कार्यक्रमाशी जोडला गेला आहे. शुभंकरचं गाणं त्याला आवडतं. एकदा पुण्यातल्या त्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (२०१७) कुप्रसिद्ध कसोटी सामन्यात सलील त्याच्या लेकीला - अनन्याला घेऊन आला होता आणि मी नीलला घेऊन गेलो होतो. दुर्दैवानं त्या वेळी एकाच सत्रात आपला डाव गडगडला आणि आम्ही लगेच तिथून निघालो. आमची मुलं अशी सोबत मोठी होत असल्यानं आणि त्यांच्यासोबत आम्हीही पालक म्हणून मोठे होत असल्यानं, ‘एबीके’ हा नुसता कार्यक्रम न राहता, आमच्यासाठी ती एक भावना झाली आहे. कार्यक्रम सुरू होताना डोळ्यांत पाणी का तरळलं, याच्यामागं ही सगळी अबोध कारणं होती. असो.
नीता मुकेश अंबानी सेंटर (एनएमएसीसी) सुरू झाल्यावर आम्ही लगेचच तिथं जाऊन ग्रँड थिएटरला ‘इंडियन म्युझिक फेस्टव्हल’ हा अजय-अतुल यांचा भव्य कार्यक्रम पाहिला होता. त्यानंतर मात्र तिथं काही जाणं झालं नव्हतं. त्यामुळं आता एक मराठी, कवितेचा कार्यक्रम - तोही आपल्या मित्रांचा - होतोय म्हटल्यावर आम्ही लगेचच जायचं निश्चित केलं. बऱ्याचदा अशा ट्रिपच्या वेळी आमच्यासोबत असणारा माझा आतेभाऊ साईनाथ, वहिनी वृषाली व त्यांचा मुलगा अर्णव हेही आमच्यासोबत येणार होते. मग आम्ही एक ‘इनोव्हा’ बुक केली आणि रीतसर एक दिवसाची ट्रिपच ठरवली. मला ते टूर ऑपरेटर तयार करतात, तसा प्रवासाचा कार्यक्रम आखायला आवडतं. आम्हाला नुकताच सुरू झालेला अटल सेतू पाहायचा होता, नवा कोस्टल रोडही पाहायचा होता. मुंबईचा भूगोल मला तोंडपाठ असल्यानं कुठून कुठं, कसं जाणं सोयीचं पडेल हे मला माहिती होतं. अटल सेतूवरून भायखळ्याच्या जिजामाता बागेत असलेल्या भाऊ दाजी लाड म्युझियमला जाणं सोयीचं पडेल, हे लक्षात आलं होतं. हे म्युझियम आम्ही मागे गेलो होतो, तेव्हा बंद होतं. आता नूतनीकरणानंतर ते सुरू झाल्याचं मी बातम्यांत पाहिलं होतं. साईनाथ व मला दोघांनाही संग्रहालयं बघण्यात रुची आहे. त्यामुळं भाऊ दाजी लाड म्युझियमला जाणं नक्की केलं. नंतर कोस्टल रोडनं वांद्र्याला जाऊन, बीकेसीत नीता मुंकेश अंबानी सेंटरला जाणं अगदीच सोयीचं होतं. त्यानुसार सगळं नियोजन केलं. कार्यक्रम रात्री अकराच्या पुढं संपेल आणि तिथं जेवायला थांबलो तर उशीर होईल, हे लक्षात घेऊन निघतानाच पॅक डिनर सोबत घेतलं.
शनिवारी सकाळी बरोबर आठ वाजता कार बोलावली होती. साईनाथची फॅमिली आमच्याकडं येऊन निघेपर्यंत आम्हाला साडेआठ झाले. बरोबर दहा-सव्वादहा वाजता आम्ही खालापूरच्या फूड मॉलवर होतो. तिथं ब्रेकफास्ट करून लगेच निघालो. जेएनपीटीची (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) एक्झिट घेऊन आम्ही अटल सेतूच्या रस्त्याला लागलो. मी पहिल्यांदाच या रस्त्यानं जात होतो. हा रस्ता न्हावाशेवा बंदराकडं जात असल्यानं रस्त्यानं स्वाभाविकच कंटेनरची मोठी गर्दी होती. अटलसेतू बराच पुढं होता. त्या सेतूपासून एक्स्प्रेस-वेपर्यंत स्वतंत्र उड्डाणपूल केल्याशिवाय ही कनेक्टिव्हिटी सुलभ व वेगवान होणार नाहीय, हे लगेच लक्षात आलं. साधारण २५ ते २७ किलोमीटर अंतर प्रवास केल्यानंतर आम्ही अटल सेतूच्या रस्त्याला वळलो. डावीकडं एक वळण घेऊन आम्ही उड्डाणपुलावर आलो. इथूनच अटल सेतू खरं तर सुरू होत होता. हा उड्डाणपूल खालच्या रस्त्याला आडवा छेदून काहीसा उत्तरेला जातो व एका डोंगराच्या बाजूनं शार्प वळण घेऊन पुन्हा पश्चिमेकडं वळतो. तिथंच टोल नाका आहे. तो पार केल्यावर खरा अटल सेतू सुरू झाला. ‘मुंबई २५ किलोमीटर’ अशी पाटी दिसली. अटल सेतूवर सर्वत्र कॅमेरे आहेत आणि वेगमर्यादा पाळूनच गाडी चालवावी लागते. त्यामुळं आमचा ड्रायव्हर त्या मर्यादेत, पण एका लयीत कार चालवत होता. त्या दिवशी (आणि बहुतेक कायमच) त्या सगळ्या परिसरात धुरकं असल्यानं आम्हाला आजूबाजूचा परिसर नीट दिसतच नव्हता. त्यात काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणासाठी दोन्ही बाजूंनी उंच उंच अडथळे उभारले आहेत. उजवीकडं ट्रॉम्बेची अणुभट्टी असल्यानं ती बाजू झाकलेली समजू शकतो. मात्र, डावीकडंही तेवढेच उंंच पत्रे लावून पलीकडचं काही दिसण्याची सोयच ठेवलेली नाही. अर्थात हे अडथळे सर्वत्र नाहीत. थोडं पुढं गेल्यावर डावीकडं अगदी धुरकट असं समुद्राचं पाणी दिसू लागलं. नंतर घारापुरीचा डोंगरही अस्पष्ट दिसू लागला. दोन वर्षांपूर्वी आम्ही घारापुरीला आलो होतो, तेव्हा या पुलाचं काम चालू असलेलं बोटीतून बघितलं होतं. आज त्या पुलावरून घारापुरीचा डोंगर पाहत होतो. एकूणच अटल सेतूवरचा हा प्रवास अतिशय सुखद आणि अभिमानास्पद म्हणावा असा होता. अगदी अर्ध्या तासात एकदम आम्हाला वडाळा, शिवडीचा परिसर दिसू लागला आणि एक से अक अजस्र स्कायस्क्रेपरही दिसू लागल्या. इथं सगळीकडं पाट्या लावल्या असल्या आणि मी ‘गुगल मॅप’ लावला असला, तरी वडाळ्याकडं वळायचं सोडून आम्ही पुढंच गेलो. आता परतीचा मार्ग नव्हता. मग बरंच पुढं जाऊन, ईस्टर्न फ्री वेवरून उतरून, यू टर्न घेऊन आम्ही पुन्हा मागं आलो. अर्थात, ठरलेल्या वेळेच्या आत, म्हणजे बरोबर १२ वाजून १० मिनिटांनी आम्ही भायखळ्याच्या जिजामाता उद्यानाच्या पार्किंगमध्ये होतो. 

शनिवार असल्यानं उद्यानात गर्दी होती. आम्हाला संग्रहालयात जायचं असल्यानं तिथली तिकिटं काढली. (प्रत्येकी २० रुपये फक्त) इथं दर शनिवारी साडेबारा वाजता मराठीतून म्युझियम टूर असते, हे मला माहिती होतं. त्याप्रमाणे तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी ‘त्या मॅडम तिथं एका ग्रुपला माहिती सांगत आहेत,’ असं सांगून त्यांच्याकडं पिटाळलं. त्या मॅडम पाच-सहा जणांच्या एका ग्रुपला इंग्रजीतून (बहुदा त्यात एक परदेशी व्यक्ती असल्यानं) माहिती सांगत होत्या. खरं तर संग्रहालयात सर्व दालनांत माहिती लिहिलीच होती. मग आम्ही त्या मॅडमचा नाद सोडला आणि आपले आपले संग्रहालय फिरायला लागलो. या संग्रहालयाचं मूळ नाव ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ असं होतं आणि ते १८७२ मध्ये सुरू झालं आहे, ही माहिती मला नवीन होती. दीड वर्षांपूर्वी आम्ही लंडनला गेलो असताना, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसमोर अर्धा तास बसूनही केवळ कंटाळा आल्यानं ते म्युझियम बघितलं नव्हतं. (याच संग्रहालयात वाघनखं आहेत हे मला तेव्हा माहिती नव्हतं. नंतर ती साताऱ्यातील संग्रहालयात आली तेव्हा मी व साईनाथनं खास ती बघायला सातारा ट्रिप केली होती.) तर त्याच मूळ नावाचं संग्रहालय आता तरी बघता आलं, याचा एक कोमट आनंद माझ्या मनाला झाला. संग्रहालयाच्या मधोमध त्या युवराज अल्बर्टचा पूर्णाकृती संगमरवरी पुतळा उभारलेला आहेच. संग्रहालय छोटेखानी असलं, तरी आकर्षक आहे. मला तिथं वरच्या मजल्यावर असलेलं, मिनिएचर पुतळ्यांनी सजलेलं दालन विशेष आवडलं. 
संग्रहालयाच्या मागं एक छोटंसं कॅफे आहे. तिथं बसून छान ताक प्यायलो. आता भूक लागली होती. ‘गुगल’वरच जवळपास रेस्टॉरंट शोधलं. अगदी जवळ एक इसेन्स नावाचं रेस्टॉरंट असल्याचं कळलं. मग तिथं गेलो. ते एक हेरिटेज नावाचं जुनं, बैठं असं छान हॉटेल होतं. त्यांचंच हे रेस्टॉरंट होतं. एसी होतं हे महत्त्वाचं. मग तिथं छान, भरपेट जेवलो. तिथले काका मराठीच होते आणि त्यांनी आमची अगदी उत्तम सरबराई केली. बिलही तुलनेनं माफकच होतं. (पुण्याबाहेर गेलं, की हे फार प्रकर्षानं जाणवतं. सगळं स्वस्तच वाटायला लागतं.) 
तिथून आम्हाला कोस्टल रोडला जायचं होतं. पण नीलला राजाबाई टॉवर बघायचा होता. मग टूर कंपन्यांच्या भाषेत आम्ही तिथं एक ‘फोटो स्टॉप’ घेतला. नील व अर्णव खाली उतरले आणि त्या टॉवरचे व परिसराचे भराभर फोटो काढून आले. थोड्याच वेळात आम्ही मरीन ड्राइव्हच्या रस्त्यावर आलो. दोन वर्षांपूर्वी आलो होतो, तेव्हा या कोस्टल रोडच्या कामासाठी सगळं खोदून ठेवलेलं पाहून वैतागलो होतो. आता त्याच कोस्टल रोडमधून आम्ही निघालो होतो. छत्रपती संभाजीमहाराज किनारी मार्ग मरीन ड्राइव्हपासून बोगद्यात शिरतो, तो थेट पश्चिम किनाऱ्यावर बाहेर पडतो. तिथून खऱ्या अर्थानं कोस्टल रोड सुरू होतो. आम्ही अगदी क्षणार्धात हाजी अलीपाशी आलो. इथून सगळीकडं जाण्यासाठी वेगवेगळे फाटे काढण्यात आले आहेत. रस्त्यावर पाट्या आहेत, पण तरीही गोंधळ होऊ शकतो. आम्ही चुकलो. आमच्याप्रमाणे आणखी दोन ट्रॅव्हल कारही चुकल्या. मग रिव्हर्स घेऊन योग्य रस्त्याला लागलो. पण पुढं गेल्यावर पुन्हा चुकलो. मात्र, मला कोस्टल रोडवरूनच जायचं असल्यानं मी आमच्या ड्रायव्हरला यू टर्न घ्यायला लावला आणि आम्ही वरळीतून पुन्हा रॅम्पवर आलो. आता मात्र आम्ही योग्य रस्त्याला लागलो. हा कोस्टल रोड जिथं जुन्या सागरी सेतूला मिळतो, तिथं निळ्या आकाराच्या दोन लोखंडी कमानी उंच अशा दिसतात. त्या लांबूनही दिसत होत्या. त्यामुळं आम्हाला आपोआप दिशादर्शन झालं. कोस्टल रोडवरून जुन्या सागरी सेतूवर आपण अगदी ‘सीमलेस’ म्हणतात तसं जातो. वरळीकडून जुन्या सेतूवर जायला डाव्या बाजूनं आता एका नव्या रॅम्पचं काम सुरू आहे. काही दिवसांत ते पूर्ण होईल. वांद्रे बाजूच्या टोल नाक्यानंतर आम्ही लगेचच बीकेसीत शिरलो. आमच्या अपेक्षित वेळेच्या अर्धा तास आधीच, म्हणजे दुपारी चार वाजता आम्ही ‘एनएमएसीसी’त पोचलो. पार्किंगला गाडी लावून, मग वर जिओ प्लाझात आलो. तिथं टाइमपास केला. पुण्याहून आलेली काही मंडळी भेटली. साईनाथ व वृषाली पहिल्यांदाच इथं येत होते. मग तो सगळा एरिया त्यांना फिरून दाखवला. तिथं चहापान झालं. थोडं निवांत बसलो. मग फ्रेश झालो. बरोबर सात वाजता प्रेक्षकांना ‘ग्रँड थिएटर’मध्ये आत सोडायला सुरुवात झाली. 
आमच्या दोन्ही मुलांची तिकिटं अगदी पुढं, म्हणजे दुसऱ्या रांगेत होती. आमची साधारण बाराव्या लायनीत होती. मागच्या वेळी आम्ही मधल्या बाल्कनीत बसलो होतो. त्या तुलनेत अगदी खाली बसल्यावर हे थिएटर आणखी भव्य वाटत होतं. बरोबर साडेसातला कार्यक्रम सुरू झाला. पुढचे तीन तास म्हणजे निव्वळ नॉस्टॅल्जिया, धमाल गाणी, आठवणी असं सगळंच होतं. सलील हा मैफलींचा राजा आहे. त्याला मैफल ताब्यात कशी घ्यायची हे व्यवस्थित कळतं. त्यामुळं त्याच्या मैफली रंगत नाहीत, असं सहसा होत नाही. संदीपची हजरजबाबी आणि नेमकी साथ असतेच. ग्रँड थिएटरचं एकूण लायटिंग, नेपथ्य अपेक्षेप्रमाणे भव्य व नेत्रदीपक होतं. सलील व संदीपचे सर्व सहवादक कलाकार आदित्य आठल्ये, डॉ. राजेंद्र दूरकर, रितेश ओहोळ आणि अनय गाडगीळ या सर्वांनी उत्तम साथसंगत केली. आर्या आंबेकर आणि शुभंकर यांनीही काही गाणी म्हटली. ‘एकटी एकटी घाबरलीस ना आई...’ या गाण्याच्या वेळी सलीलनं ‘कोल्ड प्ले’प्रमाणे सर्व प्रेक्षकांना मोबाइलची बॅटरी लावायला सांगितली. क्षणार्धात त्या सभागृहात दीड-दोन हजार हात मोबाइलचा लाइट लावून हलू लागले. ते दृश्य अभूतपूर्व होतं. मराठी कवितेच्या कार्यक्रमाला मिळणारा हा जबरदस्त प्रतिसाद केवळ भारावून टाकणारा होता, यात शंका नाही. या गाण्यानंतर शुभंकरसाठी सलग दोन मिनिटं आम्ही टाळ्या वाजवत होतो, एवढं तो सुंदर गायला. सलीलला अगदी भरून आलं, हे जाणवत होतं. अनेक गाण्यांना ‘वन्स मोअर’ मिळाले, अनेक गाणी सर्वांनी मिळून म्हटली. एकूण ही प्रेक्षकांनीही रंगवलेली मैफल होती. ‘एबीके’च्या बहुतेक प्रयोगांना असाच अनुभव येतो. दोन हजारावा ‘ग्रँड’ प्रयोगही त्याला अपवाद नव्हता. केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, पुणे, नाशिक अशा सर्व ठिकाणांहून रसिक इथं आले होते आणि सलील-संदीपनं कुणालाही निराश केलं नाही.

कार्यक्रम संपल्यावर बाहेर कॅफेटेरियाच्या परिसरात त्या दोघांना भेटायला एकच झुंबड उडाली होती. त्या गर्दीत आम्हीही घुसलो आणि फोटो काढून घेतले. एरवी त्यांना भेटतच असतो, पण या विशेष मैफलीचे फोटो आम्हाला हवेच होते. कार्यक्रम संपल्यावर थोडा वेळ अशी एक शून्यावस्था येते. आम्ही पार्किंगमध्ये जाऊन कारमध्ये बसेपर्यंत आम्ही एकमेकांशी काहीही बोललो नाही. एका अविस्मरणीय मैफलीला मिळालेली ती ‘दिल से’ दाद होती. साडेअकराला पुण्याकडं निघालो. कारमध्येच सगळ्यांनी खाऊन घेतलं. सगळ्यांना झोप येत होती. मधे फूड मॉलला थांबून ड्रायव्हरदादाचं चहा-पाणी झालं. बरोबर अडीच वाजता घरी येऊन पोचलो. घरात गादीला पाठ टेकताच गाढ झोप आली. स्वप्नात मात्र ‘एबीके’ची मैफल सुरूच राहिली...

---

याआधीच्या मुंबई ट्रिपवरचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

वाघनखं पाहण्यासाठी केलेल्या सातारा ट्रिपवरचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----