26 Mar 2021

मटा लॉकडाउन वर्षपूर्ती लेख

अज्ञाताच्या वळणावर...

----------------------------



आपल्या देशात लॉकडाउन सुरू झाला, त्याला आज (२५ मार्च) बरोबर एक वर्ष पूर्ण झालं. ‘कोव्हिड-१९’ किंवा करोना नावाच्या विषाणूनं आपल्या जगण्यात प्रवेश करून सगळा खेळच बिघडवून टाकला. या एका वर्षात आपल्या आयुष्यात ‘न भूतो...’ असे बदल घडून आले. ‘...न भविष्यति’ असं मुद्दाम म्हटलं नाही, कारण भविष्याच्या पोटात काय वाढून ठेवलं आहे, हे आपल्याला माहिती नाही. त्या अर्थानं एका अज्ञाताच्या वळणावर आपण सारे उभे आहोत. संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाला मुळापासून हादरे देणाऱ्या ज्या काही गोष्टी हजारो वर्षांपासून घडत आल्या आहेत, त्यातली ही एक असू शकेल का, हेही आपल्याला माहिती नाही. तसं असेल तर मात्र आपण आपल्या मानवजमातीच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे साक्षीदार आपोआपच होत आहोत. आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या उलथापालथीकडे या व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहिलं, तर सगळं जगणं कवेत घेणं कदाचित सुलभ होऊ शकेल. आपल्या जगण्याचा फेरविचार करता येईल. आपल्या गरजांकडे, वाढीकडे, अपेक्षांकडे आणि आकांक्षांकडे नव्याने पाहता येईल.

गेल्या वर्षी करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा, अर्थात टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाच्या योग्यायोग्यतेची चर्चा होत राहील. मात्र, त्या वेळी हे संकट सर्वांसाठीच नवीन असल्याने जे जे उपाय केले गेले, ते ‘हे करून तर पाहू’ अशा दृष्टीनेच केले गेले. व्यापक जनहितासाठी काही गैरसोयी सहन करण्याची तयारी सर्वांनीच ठेवली. मात्र, अशा प्रकारची परिस्थिती जगाने यापूर्वी कधीही अनुभवली नसल्याने, अशा निर्णयांतून येणारी अपरिहार्य होरपळ बऱ्याच मोठ्या जनसमुदायाच्या वाट्याला आली. या सगळ्यांतून ज्यांच्या जगण्यावर काहीच प्रतिकूल परिणाम झाला नाही, असे फारच थोडे. ते भाग्यवान! मात्र, बहुसंख्यांना या ना त्या प्रकारे या भीषण संकटाची झळ बसली. ‘आयुष्यात सगळं काही सुरळीतच चालणार आहे,’ या आपल्या मनात नकळत तयार झालेल्या गृहीतकालाच धक्का बसला. त्याची जागा ‘आज, आत्ता, उद्या काहीही होऊ शकतं’ या भावनेने घेतली. अशी भावना सातत्याने मनात राहणं म्हणजे दीर्घकाळाच्या नैराश्याला आश्रय! गेल्या वर्षभरात जगभरात अनेकांना अशा नैराश्याचा सामना करावा लागला. रोजीरोटीचं साधन हरपल्यामुळं खूप जणांना सैरभैर व्हायला झालं. करोनामुळं आपल्या जवळच्या आप्तांचा थेट मृत्यूच बघावा लागलेल्यांच्या दु:खाची तर गणनाच नाही. सर्वांत जास्त हाल तर हातावर पोट असलेल्या लाखो श्रमिकांचे झाले.

लॉकडाउननंतर भारतातलं फाळणीनंतरचं कदाचित सर्वांत मोठं असं स्थलांतर घडून आलं. मनात इच्छा नसताना करावं लागणारं स्थलांतर वेदनादायक असतं. भारतातल्या मोठ्या महानगरांमधून असे अनेक अभागी जीव आपापल्या गावांकडं निघाले. रस्ते बंद होते, वाहने नव्हती. अशा वेळी अगदी दुचाकी गाड्यांवरून, सायकलवरून आणि ज्यांच्याकडे ही वाहनेही नव्हती ते तर चालत चालत हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या गावांकडे निघाले. या स्थलांतराची वृत्तवाहिन्यांवरून पाहिलेली दृश्ये काळजाला पीळ पाडणारी होती. ज्या शहरांवर आपण अवलंबून होतो, त्यांनी अचानक आपल्याला दूर लोटल्याने एक प्रकारे अनाथ झाल्याची भावना या श्रमिकांच्या चेहऱ्यावर दाटली होती. सगळेच जण संकटात होते. एरवी मदतीला धावून येणाऱ्या हातांनाही इथे मागे सरावे लागले होते. तरीही अनेक स्वयंसेवी संस्थांनी, माणसांनी आपल्यातली माणुसकी शाबूत असल्याचे दाखवून, या श्रमिकांना होता होईल ती मदत केली. मात्र, ती फारच अपुरी होती. स्थलांतरितांच्या वेदनांना अंत नव्हता. 



शहरांमध्ये जे राहिले आणि ज्यांना रोजीरोटी उपलब्ध होती, त्यांचेही हाल सुरूच होते. लहान हॉटेल चालविणारे, छोट्या खाणावळी किंवा मेस चालविणारे, केशकर्तनालय चालविणारे, पर्यटन व्यावसायिक, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे अशा अनेकांचे धंदे या लॉकडाउनमुळं बंद पडले. अनेकांना रोजच्या जेवणासाठी दुसऱ्यांकडे मदतीचा हात पसरावा लागला. अनेकांनी नवे उद्योग-व्यवसाय सुरू केले. केस कापणाऱ्या कारागिरांनी रस्त्यावर बसून कलिंगड विकले. कुणी घरोघरी अन्नपदार्थ पोचविण्याचे काम सुरू केले. ज्याला जसे जमेल तसे त्याने हात-पाय हलवले आणि जीव तगविला. प्रत्येक प्राणिमात्रांत ‘सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट’ असतंच. मनुष्यप्राणी सर्वांत हुशार; त्यामुळे त्याच्यात तर ते असतंच. त्यामुळं आपण सगळेच तगून राहिलो. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी मागच्या वर्षी ‘हे वर्ष फक्त तगून राहण्याचे आहे,’ असे रास्तपणे म्हटले होते, ते त्यामुळेच! अर्थात आपल्या जगण्याच्या गुणवत्तेवर त्याचा मोठा परिणाम झाला. अनेकांच्या धारणा बदलल्या, अनेकांच्या मूल्यव्यवस्थेला तडे गेले, अनेकांना आपले प्राधान्यक्रम तपासून पाहावेसे वाटले, तर अनेक नातेसंबंधांत वितुष्ट आले किंवा दुरावा तरी आला. दुसरीकडे, संकटांमुळे माणूस जोडलाही गेला. सामान्य माणसातले असामान्यत्व कित्येकदा दिसून आले. जिथे आपले दूर गेले, तिथे ओळखपाळख नसलेलेही मदतीला धावून आले. प्लाझ्मादान करण्यापासून ते करोना झालेल्या कुटुंबीयांना अन्नधान्य पोचविण्यापर्यंत अनेक हात मदतीसाठी पुढे आले. जगण्यावरची श्रद्धा दृढ व्हावी, असे क्षण अनेकांच्या वाट्याला आले. विशेषत: डॉक्टर, नर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांना हे क्षण अधिक लाभले. त्यांच्या अविश्रांत कष्टांमुळे कित्येक जीव जगले, वाचले! 

मध्यमवर्गीय घरांमध्ये अनेकांना पूर्वीचे दिवस पुन्हा जगता आले. सर्व कुटुंब संध्याकाळच्या जेवणासाठी एकत्र आले आहे, हे दृश्यही अनेक घरांत दिसून आले. ‘वर्क फ्रॉम होम’ हा नव्या जगण्याचा मंत्र झाला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात (मूळ अभ्यासक्रमात नसलेला) ‘ऑनलाइन शिक्षण’ नावाचा नवाच धडा आला. विद्यार्थ्यांसोबतच पालकांची आणि शिक्षकांचीही कसोटी या काळाने बघितली. ती ‘परीक्षा’ अजूनही सुरू आहे आणि कदाचित आता नव्या जगण्याचा तो अविभाज्य भागच असू शकेल. माणसाला माणसाची सोबत किती महत्त्वाची आहे, हे या काळात बहुतेकांना नव्याने उमगलं. लॉकडाउनमुळे आपली अतिवेगवान जीवनशैली एकदम थांबल्याने अनेकांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा झाला. कामासाठी दूर अंतरापर्यंत प्रवास करून जाण्याचे कष्ट टळले. त्यामुळे अनेकांची तब्येत सुधारली. अनेकांनी घरकामांत मदत करायला सुरुवात केली. आपल्या  धावपळीच्या, ताणाच्या जगण्यात आपण काय गमावत होतो, हेही अनेकांना कळून चुकलं.

आज लॉकडाउनला एक वर्ष पूर्ण होत असताना, दुर्दैवाने आपण पुन्हा गेल्या वर्षी जिथं होतो तिथंच उभे आहोत. साथीने पुन्हा नव्याने तोंड वर काढले आहे. लसी आल्या असल्या तरी सर्वांना लस मिळेपर्यंत बराच काळ जाईल. त्यामुळे ही साथ आणि ही सगळी बंधनं किती काळ पुढं चालणार आहेत, हे कुणीच सांगू शकत नाही. आपण गेल्या वर्षी या साथीला जेवढं गांभीर्यानं घेतलं, तेवढं आता घेत नाही आहोत, हे स्पष्टच दिसतं आहे. याचे परिणाम काय होणार आहेत, हे सांगता येत नाही. अज्ञाताच्या या वळणावर, सगळं काही अनिश्चित, धूसर दिसत असताना एक गोष्ट मात्र शाश्वत आहे - माणसाचं जगण्यावरचं चिवट प्रेम! आपल्याला जगायचं आहे आणि चांगल्या दर्जाचं आयुष्य जगायचं आहे, ही माणसाची मूलभूत प्रेरणाच त्याला या संकटातून तारून नेईल, हे नक्की!

---


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २५ मार्च २०२१)

---

गेल्या वर्षी लिहिलेला लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

----

No comments:

Post a Comment