2 Sept 2019

अनिल अवचट पंचाहत्तरी - मटा लेख

मस्त कलंदर
-----------


अनिल अवचट ऊर्फ बाबा या माणसाचं वर्णन करण्यासाठी कलंदर किंवा अवलिया हेच शब्द वापरावे लागतात. लेखक, पत्रकार, संपादक, (प्रॅक्टिस न करणारा) डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता, अभ्यासक, चित्रकार, शिल्पकार, गायक, ओरिगामी तज्ज्ञ, बासरीवादक, नवनव्या गोष्टी शिकण्याची मनस्वी आवड असणारा विद्यार्थी, दोन मुलींचा उत्तम पालक... एका माणसात किती गोष्टी असाव्यात! अवचटांचं आयुष्य अशा विविधरंगी गोष्टींनी फुललेलं आहे. सर्व ऋतूंत बहरणारं हे वेगळंच ‘झाड’ आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या जडणघडणीचे ते डोळस साक्षीदार आहेत. त्यांनी आयुष्यात जे जे पाहिलं, अनुभवलं, ते ते लहान मुलाच्या कुतूहलानं पाहिलं व अनुभवलं. लोकांना सांगताना मात्र एखाद्या जाणत्या माणसानं लहान मुलांना सांगावं, तशा समजुतीनं, नीट सांगितलं. जगण्याचे विविध अनुभव घेतले; अगदी मनस्वीपणे घेतले. स्वत:चं मध्यमवर्गीय विश्व कधी लपवलं नाही, पण त्याचा अनाठायी बडेजावही केला नाही. उलट शक्य होईल तेव्हा मध्यमवर्गीय असण्याची बंधनं तोडण्याचाच प्रयत्न केला. कधी जमला, कधी नाही जमला! मात्र, अवचट कशात अडकून पडले नाहीत. पुढं चालत राहिले. एका वयात सामाजिक क्रांती करण्याचं वेड त्यांच्या अंगात होतं. मात्र, ते प्रकृतीला झेपत नाही असं लक्षात आल्यावर शांतपणे बाजूला झाले. हा काही तरी आयुष्यात मोठा पराभव झाला आहे, असा भाव कधी ठेवला नाही. नंतर बराच काळ शोधपत्रकारितेत रमले. जे काम करायचं, ते व्यवस्थितच अशी वृत्ती असल्यानं आणि मूळ स्वभाव सर्व गोष्टींविषयी जात्याच कुतूहल बाळगणारा असल्यानं ही शोधपत्रकारिताही त्यांनी गाजविली. महाराष्ट्राला तोवर फारसा माहिती नसलेला ‘रिपोर्ताज’ प्रकार त्यांनी हाताळला. नंतर लोक त्यालाच ‘अवचट शैली’ म्हणू लागले. ‘मी मुद्दाम असं काही लिहिलं नाही, जे भिडलं, आतून लिहावंसं वाटलं ते लिहीत गेलो,’ असं त्यांनी नंतर अनेक मुलाखतींतून सांगितलं. मात्र, काही विशिष्ट गुण किंवा प्रतिभा असल्याशिवाय कुणालाही असं लिखाण करता येत नाही. अवचटांच्या ‘मनोहर’ किंवा ‘साधने’तल्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य असं, की त्यांनी मुंबई किंवा पुण्याच्या बाहेर पसरलेला विस्तृत, पण बेदखल असा महाराष्ट्र आपल्या लेखणीतून सगळ्या समाजासमोर आणला. ‘संभ्रम’ किंवा ‘कोंडमारा’मधले त्यांचे लेख वाचले, की याची प्रचिती येते. अवचटांना समाजातल्या शेवटच्या घटकाविषयी ममत्व आहे. कथित कनिष्ठ जातींतले, कथित अस्पृश्य आणि नाडलेले, गांजलेले असे अनेक व्यक्तिसमूह त्यांच्या लेखनाचा विषय झाले. ‘माणसं’ हे त्यांचं पुस्तक आलं, तेव्हा ते वाचून महाराष्ट्र हादरून गेला. आपल्याभोवती छोट्याशा सुखाचा कोष विणून आत्मरत असलेल्या मध्यमवर्गाला त्यांनी आपल्या लेखणीतून दाहक सामाजिक वास्तवाचे चटके दिले. तत्कालीन मध्यमवर्गीयांत संस्कारांमधली संवेदनशीलता टिकून असल्यानं त्यांनीही हे लिखाण वाचलं आणि स्वीकारलं. महाराष्ट्रात गेली शंभर-दीडशे वर्षं कथित पुरोगामी आणि कथित सनातनी असे दोन वर्ग कायमचे पडलेले आहेत. कुणी कुठल्या वर्गात असायचं, याचे संकेतही ठरलेले आहेत. अवचट यांच्या लेखणीची जादू अशी, की तिने हे संकेत मोडून काढले. अवचट दोन्ही वर्गांना आपलेसे वाटले. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लेखक म्हणून असलेला त्यांचा प्रामाणिकपणा आणि साधेपणा! 
आपल्याकडं अनेकदा प्रामाणिकपणा हा जणू कमावलेला गुण असल्यासारखा मिरवला जातो. काहींचा साधेपणा हा भाबडेपणाकडं, तर क्वचित बावळटपणाकडं झुकतो. याचं कारण आपल्या समाजाची पूर्वापार चालत आलेली दांभिक वृत्ती. अवचट मात्र याला अपवाद ठरले. याचं कारण त्यांच्यातला लेखक आणि त्यांच्यातला माणूस हे वेगळे कधीच नव्हते. ते जसं जगले, तसं लिहीत गेले. त्यांच्या अनेक लेखांची नावे ‘घडले तसे’, ‘दिसले तसे’ अशी आहेत. त्यामुळं अवचटांमधला प्रामाणिकपणा वाचकांना पटला, भावला. त्यांच्यातला साधेपणा अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवला आणि सगळ्यांना सांगितला. त्यामुळंच कथा-कादंबरी, कविता किंवा विनोदी साहित्य अशा कुठल्याही पठडीत त्यांचं साहित्य रूढार्थानं बसत नसतानाही ते लेखक म्हणून अमाप लोकप्रिय झाले. त्यांची सुरुवातीच्या काळातली सगळीच पुस्तकं ‘नॉन-फिक्शन’ प्रकारातली होती आणि तत्कालीन इतर लेखकांच्या मानानं निराळी होती. तरीही तेव्हाच्या वाचकांनी ती उचलून धरली. अवचटांच्या व्यक्तिमत्त्वातल्या पारदर्शकतेचाचा हा परिणाम होता. त्यांनी घेतलेले काही अनुभव केवळ सर्वसाधारण वाचकांच्याच नव्हे, तर सर्वसाधारण लेखकांच्याही परिघाच्या बाहेरचे होते. अवचट ओतूरसारख्या छोट्या गावातून आले. त्यांचा जन्म १९४४ चा. स्वातंत्र्यानंतरचा बदलता देश आणि बदलता महाराष्ट्र बघत त्यांची पिढी मोठी झाली. सत्तरच्या दशकातला स्वप्नाळूपणा आणि बंडखोरी अशा दोन्ही गोष्टी या पिढीनं अनुभवल्या. अवचट यांचे वडील डॉक्टर व घराणं गावातलं प्रतिष्ठित. त्यामुळं तत्कालीन परंपरेप्रमाणं त्यांनाही डॉक्टर होणं भागच होतं. त्याप्रमाणे ते बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये गेलेही. मात्र, त्यांचा कल पहिल्यापासूनच डॉक्टरकी न करण्याकडंच राहिला. एकच एक गोष्ट आयुष्यभर करत बसणं त्यांच्यातल्या कलंदर माणसाला आवडणं शक्यच नव्हतं. मात्र, या कॉलेजात अवचटांना ‘सुनंदा’ भेटली. सुनंदा ऊर्फ अनिता अवचट यांच्या आयुष्यात येण्यानं अवचटांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. ‘तुला हवं ते कर, मी घर सांभाळते’ असं बिनधास्त सांगणारी जीवनसाथी मिळणं हे अवचटांचं भाग्य होतं. सुनंदाताईंच्या पाठबळावर अवचटांनी पुढं आयुष्यात पुष्कळ ‘उद्योग’ केले. बहुसंख्य मराठी माणसासाठी चौकटीतलं जगणं हेच प्राक्तन असताना अवचटांना निराळं आयुष्य जगायची संधी मिळाली. त्यांच्या अंगातल्या कलंदरपणामुळं त्यांनी ती पुरेपूर उपभोगली. त्यांचे अनुभव ऐकून, वाचून चौकटबद्ध मराठी वाचकांना एका वेगळ्याच ‘फँटसी’ची अनुभूती मिळाली. आपण सहसा करू शकत नाही त्या गोष्टी सहजी करणाऱ्या लेखकांचं, व्यक्तिश्रेष्ठांचं वाचकांना आकर्षण असतंच. गौरी देशपांडेंचं लेखन वाचताना त्या आकर्षणाची प्रचिती येते. अवचटांच्या लेखनातूनही वेगळ्या पद्धतीची ‘फँटसी’ मराठी वाचकांचं समाधान करून गेली. अवचट लेखक म्हणून लोकप्रिय होण्यात या घटकाचा वाटा दुर्लक्षिता येण्यासारखा नाही. 
काळ बदलला तसे अवचटही बदलत गेले. त्यांनी कधी स्वत:ला ‘स्टीरिओटाइप’ केलं नाही. ‘गर्द’च्या व्यसनाचा अभ्यास करताना त्यांना या महाभयंकर समस्येचं अक्राळविक्राळ स्वरूप समजलं. या व्यसनाधीन लोकांसाठी काही तरी केलं पाहिजे, असं त्यांनी व अनिता अवचट यांनी ठरवलं. त्यातून पु. ल. देशपांडे दाम्पत्याच्या मदतीतून ‘मुक्तांगण’ची सुरुवात झाली. काळाच्या पुढचा विचार त्यामागं होता. आज मोबाइलपासून सुटका होण्यासाठी या केंद्रात उपचारांची सोय झाली आहे, याला द्रष्टेपणच म्हणायचं नाही तर काय! नव्वदमध्ये अवचटांनी लिहिलेलं ‘स्वत:विषयी’ हे एक आगळं-वेगळं पुस्तक आलं आणि अवचटांच्या चाहत्यांत मोठी भर पडली. हा अवलिया बाबा एक मुलगा म्हणून, विद्यार्थी म्हणून, मित्र म्हणून, प्रियकर म्हणून, नवरा म्हणून, पालक म्हणून कसा होता; त्याची जडणघडण कशी झाली हे मराठी वाचकांना या पुस्तकातून कळलं. पु. ल. आणि सुनीताबाईंना ‘महाराष्ट्राचं फर्स्ट कपल’ म्हटलं जातं. त्यांचा तो मान अबाधित ठेवून अनिल व सुनंदा या दाम्पत्याला ‘महाराष्ट्राचं दुसरं लाडकं दाम्पत्य’ म्हणता येईल, एवढी लोकप्रियता या पुस्तकाला आणि पर्यायानं अवचट दाम्पत्याला लाभली. मात्र, पुढच्या काही वर्षांतच, १९९७ मध्ये सुनंदा यांचं कर्करोगानं आकस्मिक निधन झालं. हा धक्का मोठा होता. अवचट पूर्वीचे राहिले नाहीत. मात्र, मुक्ता व यशोदा या अवचटांच्या दोन गुणी मुलींनी ‘बाबा’ला हळुहळू पुन्हा पूर्वपदावर आणलं. यानंतरच्या काळातले लेखक अवचट वेगळे होते. त्यांना आता ‘मस्त मस्त उतार’ सापडला होता. आता हा बाबा मुलाबाळांत अधिक रमू लागला. ओरिगामी, बासरी, काष्ठशिल्पं यात जीव रमवू लागला. लेखांचेही विषय बदलले. लेखनातला आक्रमकपणा लुप्त झाला. माया, जिव्हाळा, वात्सल्य या भावना वरचढ झाल्या. लहान मुलासारखी निरागसता आणि कुतूहल हे मात्र सदैव कायम राहिलं. 
सध्या बुवाबाजीचं थोतांड पुन्हा वाढलंय. अवचटांनी आयुष्यभर त्याचा विरोध केला. मात्र, ज्याच्या लेखनाबाबत ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ म्हणावं, असा हा आवडता लेखक आहे.  
लौकिकार्थानं बाबाला अनेक पुरस्कार मिळाले. मान-सन्मान मिळाले. मात्र, त्यानं पुस्तकातून जोडलेले वाचक आणि प्रत्यक्ष जीवनात जोडलेली अक्षरश: शेकडो लहान-थोर माणसं हाच त्याचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. बाबानं मागच्या सोमवारी (२६ ऑगस्ट) वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. मात्र, त्याच्या नजरेतलं मूलपण आजही कायम आहे आणि हे निरागस मूलपण हाच आजच्या ‘बाबा’चा सर्वांत सुंदर दागिना आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी, १ सप्टेंबर २०१९)

---

10 comments:

  1. छान झाला आहे लेख. तुलाही लिहायला मजा आली असणार. बाबाचे व्यक्तिमत्व, स्वभाव आणि अख्खा जीवनपट लख्खपणे उभा केला आहेस.

    ReplyDelete
    Replies
    1. होय. मजा आली खरंच. मन:पूर्वक धन्यवाद सागर...

      Delete
  2. Khhup chhan. Anek kangore asanarya vyaktimatwala chapkhal shabdat sakaranyacha Uttam prayas

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद... कृपया आपले नाव लिहा...

      Delete
  3. ग्रेट व्यक्तिमत्त्व...... तु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे छान रेखाटन केलंय.... 🙏🏻👌🏻

    ReplyDelete
  4. थोडक्यात लिहिलेला पण हृदयस्पर्शी असा हा सुंदर लेख आहे एका उत्तुंग , ऋषितुल्य व्यक्तिमत्वाविषयी ...खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद👏👍🙏🌹

    ReplyDelete