13 Feb 2020

सुषमा स्वराज लेख - समतोल दिवाळी अंक १९

सुभाषिणी, रणरागिणी...
-----------------------------




राजकारणी लोकांकडं बघण्याचा आपला भारतीय लोकांचा दृष्टिकोन जरा तिरकस आणि तुच्छतेचाच. आदर वाटावा असे फार कमी चेहरे आता राजकारणात उरले आहेत, हेही खरंच. पण सुषमा स्वराज यांच्याकडं पाहिलं की, कसं प्रसन्न वाटायचं! अत्यंत शालीन, सोज्ज्वळ आणि तेजस्वी असा त्यांचा चेहरा पाहिला, की एखाद्या देवीचंच मूर्त रूप आपण पाहतो आहोत, असं वाटायचं. कधी कधी आपल्या आईचा, मावशीचा किंवा प्रेमळ आत्याचाही भास त्यांच्यात व्हायचा. त्यांचं हे असं थेट लोकांशी जोडलं जाणं खूप गोड होतं. त्यामुळंच पक्षाची मर्यादा ओलांडून सर्व जनतेला त्या आपल्याशा वाटायच्या. सुंदर गोल चेहरा, त्यावरचं ठसठशीत कुंकू, आदबशीर पद्धतीनं शरीर झाकून घेतलं जाईल अशी नेसलेली साडी, त्यावर स्वेटर अशा रूपातल्या सुषमा स्वराज प्रथमदर्शनी राजकारणी व्यक्ती वाटायच्याच नाहीत. त्यांचं हे 'अस्सल भारतीय नारी'चं रूप अनेकांना मोहवून टाकणारं आणि त्यांच्याकडं सहज आकर्षून घेणारं होतं. विशेष म्हणजे हे आकर्षण आदरयुक्त असे. त्यात असलाच तर भक्तिभावाचा अंश असे. स्त्रीकडं एरवी बघितलं जातं, तशा आकर्षणाचा त्यात लवलेशही नसे. याचं कारणही पुन्हा सुषमा स्वराज यांनी सार्वजनिक जीवनात वावरताना कायमच पाळलेली एक सभ्यतेची मर्यादा! त्यामुळं त्यांचा कथित शत्रूदेखील त्यांच्याकडं वावग्या भावनेनं बघू शकायचा नाही. राजकारणाच्या पलीकडं जाऊन आपल्या ऋजू, पण कणखर स्वभावाच्या आधारे सुषमा स्वराज यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व उभं राहिलं होतं. या सर्व व्यक्तिमत्त्वाच्या वर दशांगुळे उरेल असं होतं ते त्यांचं वक्तृत्व! 'सुहासिनी, सुमधुरभाषिणी' या 'वंदे मातरम्'मधल्या ओळी जणू ज्यांच्यासाठी लिहिल्या असाव्यात असं वाटावं, अशा सुषमा स्वराज होत्या.
भारतीय राजकारणात महिलांनी एवढं उत्तुंग स्थान गाठणं तसं नवं नव्हतं. याचं कारण इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होऊन गेल्या होत्या. मात्र, इंदिरा गांधींचा वारसा वेगळा होता. त्या जवाहरलाल नेहरूंची कन्या होत्या. सुषमा स्वराज यांच्यामागे एवढा उत्तुंग वारसा नव्हता. मात्र, तरीही त्यांनी आपल्या कर्तृत्वानं राजकारणात मोठं स्थान मिळवलं. परराष्ट्रमंत्रिपदापर्यंत मजल मारली. या पदावर काम करताना केवळ राजकारणात नव्हे, तर देश-परदेशांतील भारतीयांच्या मनात त्यांनी खास स्थान मिळवलं. म्हणून तर त्यांचं निधन झालं, तेव्हा अवघ्या देशातच आपल्या घरातलं कुणी तरी गेलंय, अशी भावना निर्माण झाली होती.
सुषमा स्वराज यांच्या जीवनपटाकडं एक दृष्टिक्षेप टाकला असता, त्यांच्या यशोगाथेची काहीशी कल्पना येऊ शकेल. त्यांचा जन्म व्हॅलेंटाइन डेचा. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश देणाऱ्या संत व्हॅलेंटाइनच्या जन्मदिनीच सुषमा स्वराज यांचा जन्म व्हावा, हा आगळा योगायोग म्हणावा लागेल. याचं कारण पुढील सर्व आयुष्यात सुषमा यांनी जनतेचं भरपूर प्रेम मिळवलं आणि आपल्या देशावर, धर्मावर, पक्षावर मनःपूत प्रेम केलं. हरियाणातल्या अंबाला कँटोन्मेंट या शहरात १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरदेव शर्मा आणि लक्ष्मीदेवी या दाम्पत्याच्या पोटी सुषमांचा जन्म झाला. हे शर्मा कुटुंब मूळचं लाहोरमधील धरमपुरा परिसरातलं. फाळणीनंतर हे कुटुंब भारतात स्थलांतरित झालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारण पाच वर्षांनी सुषमांचा जन्म झाला. अंबाला कँटोन्मेंट येथील सनातन धर्म कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. संस्कृत आणि राज्यशास्त्र हे मुख्य विषय घेऊन त्यांनी पदवी प्राप्त केली. पुढील आयुष्यात सुषमा यांनी अतिशय शुद्ध, तुपात घोळलेल्या संस्कृतप्रचुर हिंदी भाषेवर जी पकड मिळविली, तिचं मूळ त्यांच्या या संस्कृतच्या अभ्यासात असावं. चंडीगडच्या पंजाब विद्यापीठात त्यांनी पुढचं, कायद्याचं शिक्षण घेतलं. याच काळात सुषमा यांच्यामधला वक्ता बहरू लागला होता. कॉलेजात असताना सलग तीन वर्षं उत्कृष्ट हिंदी वक्ता हा पुरस्कार त्यांनी पटकावला होता.
मुळात अत्यंत बुद्धिमान असलेल्या या मुलीनं कायद्याची पदवी संपादन केल्यावर थेट दिल्लीत सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस सुरू केली. याच काळात तिची भेट झाली ती स्वराज कौशल या भावी जोडीदाराशी. तत्पूर्वी सुषमा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात कार्यरत झाल्याच होत्या. स्वराज कौशल यांचे तेव्हाचे फायरब्रँड समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. स्वराज यांच्यामुळे सुषमाही जॉर्ज फर्नांडिस यांच्या वकिलांच्या टीममध्ये काम करू लागल्या. इंदिरा गांधी यांच्या सरकारविरुद्ध तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली 'संपूर्ण क्रांती' आंदोलन सुरू होतं. जॉर्ज या आंदोलनात सक्रिय होते. भूमिगत राहून ते अनेक कारवाया करीत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांचा देशातला सर्वांत मोठा संप याच काळात त्यांनी घडवून आणला होता. इंदिरा गांधी यांचं सरकार हात धुऊन फर्नांडिस यांच्या मागे लागलं होतं. फर्नांडिस यांनी सगळ्या सरकारी यंत्रणांना सळो की पळो करून सोडलं होतं. देशभर त्यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व काळात सुषमा जॉर्ज यांच्या लीगल टीमच्या सभासद म्हणून सक्रिय कामगिरी बजावत होत्या. त्यांचा स्वतःचा स्वभावही स्वस्थ बसणारा नव्हता. त्यांनीही जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात उडी घेतली. देशाची पंतप्रधान एक महिला होती. तिच्या 'हुकूमशाही'विरुद्ध अनेक जण एकवटले होते. अवघ्या पंचविशीची सुषमा हे सगळं बघत होती. तिच्या राजकीय कारकिर्दीची दिशा अगदी स्पष्ट होती. तिचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे कार्यकर्ते होते. घरात काँग्रेस विरोधाची परंपराच होती. देशाच्या राजकारणात हे ऐंशीचं दशक अत्यंत धगधगतं आणि अस्वस्थ दशक मानलं जातं. सुषमा स्वराज यांच्या ऐन तरुणाईची वर्षं याच दशकात गेली. आणीबाणीचा स्फोटक काळही त्यांनी अनुभवला. देशाच्या प्रमुखांची देशातील जनतेशी नाळ तुटली की काय होतं, याचं दर्शन त्या जवळून घेत होत्या. पुढील काळात सुषमा यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवली आणि देशातील सामान्य जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही.
अखेर आणीबाणी संपली आणि निवडणुकांची घोषणा झाली. सुषमा यांनी अवघ्या पंचविशीत अंबाल्यातून निवडणूक लढविली आणि त्या हरियाणा विधानसभेत आमदारही झाल्या. हरियाणात देवीलाल यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आलं. या तरुण, तडफदार मुलीचं कर्तृत्व आणि वक्तृत्व पाहून देवीलाल यांनी तिला लगेच आपल्या मंत्रिमंडळात घेतलं. अशा रीतीनं सुषमा केवळ पंचविशीत मंत्री झाल्या. जुलै १९७७ मध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पुढं जनता पक्ष विखुरला. केंद्रातील सत्ताही गेली. जनता पक्षाच्या फुटीनंतर मूळ जनसंघाचे नेते एकत्र आले आणि त्यांनी १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. सुषमा स्वराज यांचा निर्णय ठरलेला होता. त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. सुरुवातीचा समाजवादी धागा आता गळून पडला आणि त्यांना आपली नेमकी दिशा ठरविता आली. भाजपची सगळी सूत्रं आता अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दोघा धुरिणांकडं आली होती. पक्षात नकळत वाजपेयींचा नेमस्त, तर अडवाणींचा जहाल असे दोन गट असल्यासारखे होते. सुषमा प्रथमपासून अडवाणी गटाच्या म्हणून ओळखल्या जात. भाजपची स्थापना १९८० मध्ये झाली आणि त्यानंतर चारच वर्षांत इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या. ही त्या पक्षाची सर्वांत वाईट कामगिरी. त्यानंतर मात्र पक्षाची कामगिरी दर निवडणुकीगणीक सुधारत गेली. सुषमा स्वराज या सर्व प्रवासात पक्षासोबत होत्या. पक्षाने जी जबाबदारी दिली ती त्यांनी पार पाडली. राजीव गांधींचं सरकार १९८९ च्या निवडणुकीत पराभूत झालं आणि देशात पुन्हा एक अस्वस्थतेचं, अशांततेचं पर्व सुरू झालं. सुषमा १९८७ ते १९९० या काळात हरियाणात भाजप-लोकदल युतीच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री होत्या. मात्र, १९९० मध्ये पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवून राष्ट्रीय राजकारणात आणलं. सुषमा स्वराज, अरुण जेटली, प्रमोद महाजन, अनंतकुमार, वेंकय्या नायडू ही तेव्हाची भाजपची दुसरी फळी तयार होत होती. अडवाणींनी राममंदिरासाठी १९९० मध्ये रथयात्रा काढली. तेव्हा अडवाणी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर होते. देशभर त्यांना प्रचंड पाठिंबा व लोकप्रियता लाभत होती. या आंदोलनाची परिणती पुढं बाबरी मशीद पाडण्यात झाली आणि देशाच्या राजकारणाची चौकट कायमची बदलून गेली. सुषमा स्वराज हे सगळं पाहत होत्या. देशात अस्थिरता होतीच, पण आर्थित सुधारणांचंही पर्व सुरू झालं होतं. नरसिंह राव सरकारनं १९९६ मध्ये आपली पाच वर्षं पूर्ण केली आणि देशात पुन्हा निवडणुका आल्या. या वेळी सुषमा दक्षिण दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला आणि वाजपेयी यांच्या तेरा दिवसांच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना माहिती व प्रसारण मंत्री म्हणून कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद लाभलं. सुषमा स्वराज लोकसभेत आल्या आणि त्याच काळात लोकसभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण 'दूरदर्शन'वरून दाखवायला सुरुवात झाली. सुषमा यांच्यातील वक्त्याला ही मोठीच संधी मिळाली. त्यांनी या संधीचं पुरेपूर सोनं केलं आणि आपल्या बुलंद आवाजात, आत्मविश्वासानं त्या पक्षाची भूमिका संसदेत मांडू लागल्या. आजच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या भाषणांना 'टीआरपी' मिळू लागला. लोकसभेत त्या बोलणार म्हटल्यावर घरोघरी लोक, विशेषतः स्वयंपाकघरातील महिलाही, काम बाजूला ठेवून टीव्हीपुढं बसू लागल्या. 'वाजपेयी हा भला माणूस आहे, त्यांना पंतप्रधानपदावर बसण्याची एक संधी तरी मिळाली पाहिजे,' अशी जी सामूहिक जनभावना त्या काळात देशात तयार झाली, त्यात सुषमा स्वराज यांच्या तळमळीनं केलेल्या अनेक भाषणांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे.
पक्ष आदेश देईल ती भूमिका पार पाडायची, हे तत्त्व सुषमा स्वराज यांनी कायम पाळलं. त्यामुळं १९९८ मध्ये त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार अगदी अल्पकाळ दिल्लीचं मुख्यमंत्रिपदही सांभाळलं. तेव्हा दिल्लीत कांद्याच्या भावानं उच्चांक गाठला होता. त्याचा फटका भाजपला बसला आणि त्यांना हे राज्य गमवावं लागलं. पुढं शीला दीक्षितांनी पुढची १५ वर्षं दिल्लीवर आपली पकड कायम ठेवली. या पराभवामुळं एकच झालं. सुषमा परत केंद्रीय राजकारणात आल्या. त्यांची क्षमता, वकूब, आवाका बघता त्यांनी राष्ट्रीय राजकारणातच असायला हवं होतं. यानंतर त्या कायम केंद्रातच राहिल्या. वाजपेयींना १३ दिवसांनंतर सत्ता गमवावी लागली, त्यानंतर आलेल्या देवेगौडा सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात सुषमांनी केलेलं घणाघाती भाषण आजही लोकांच्या लक्षात आहे. विरोधकांच्या दुटप्पीपणाचा, दांभिकपणाचा त्यांना आलेला सात्त्विक संताप त्यांच्या वाक्यावाक्यातून एखाद्या अंगारासारखा बाहेर पडत होता. शरद पवारांना त्यांनी 'ललिता पवारां'ची दिलेली उपमा ऐकून सभागृहात एकच हशा पिकला होता. पुढं देवेगौडा व गुजराल ही दोन्ही सरकारं पडली आणि वाजपेयींचं तेरा महिन्यांचं सरकार अस्तित्वात आलं. या सरकारमध्येही त्यांना माहिती व प्रसारण खातं मिळालं. जोडीला दूरसंचार खात्याचा अतिरिक्त भारही त्यांनी काही महिने सांभाळला. या काळात त्यांनी घेतलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे चित्रपटसृष्टीचा त्यांनी दिलेला उद्योगाचा दर्जा. त्यामुळं वित्तीय कंपन्यांकडून चित्रपट निर्माता कंपनीला कर्ज घेणं शक्य झालं. चित्रपटसृष्टीतील काळ्या पैशाचं प्रमाण कमी झालं आणि बरेचसे व्यवहार लेखापरीक्षणाच्या देखरेखीखाली आले. यामुळं छोट्या निर्मात्यांनाही फायदा झाला आणि उत्तम आशय असलेले, पण छोट्या बजेटचे अनेक चित्रपट पुढं येऊ लागले. स्वराज यांची ही कामगिरी आपल्या चित्रपटसृष्टीनं कधीही विसरता कामा नये. याच काळात स्वराज यांनी विद्यापीठं आणि इतर बड्या शैक्षणिक संस्थांमध्ये कम्युनिटी रेडिओ केंद्रं सुरू करण्याचा निर्णय घेतला.
वाजपेयी यांचं तेरा महिन्यांचं सरकार पडलं आणि १९९९ मध्ये पुन्हा लोकसभा निवडणूक जाहीर झाली. या वेळेपर्यंत सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून सूत्रं हाती घेतली होती. सोनियांनी रायबरेलीसोबतच कर्नाटकातील बळ्ळारीमधूनही निवडणूक लढविण्याचं जाहीर केलं, तेव्हा भाजपनं त्यांच्याविरुद्ध सुषमा स्वराज यांना बळ्ळारीतून लढायला सांगितलं. पक्षाचा आदेश शिरोधार्य मानून सुषमांनी बळ्ळारीत तळ ठोकला. अगदी थोड्या काळात त्यांनी कन्नड भाषा शिकून घेतली आणि सोनियांना जोरदार लढत दिली. ही निवडणूक त्या हरणार होत्या, हे त्यांनाही माहिती होतं. मात्र, त्यांच्या झंझावाती प्रचार सभांनी काही काळ विरोधकांनाही स्तिमित केलं होतं. याच काळात बळ्ळारीतील खाणसम्राट व कुख्यात रेड्डीबंधूंबाबत बोलताना सुषमा स्वराज 'ते आपल्या भावासारखे आहेत,' असं बोलून गेल्या. पुढं या रेड्डी बंधूंचे एकेक प्रताप उघडकीस आल्यावर त्यांच्याबरोबरचे जवळिकीचे संबंध सुषमा स्वराज यांना त्रासदायक ठरले. अर्थात त्या त्यातून लवकरच बाहेर पडल्या. लोकसभा निवडणुकीत हरल्यावर पक्षानं त्यांना तेव्हा नव्यानं निर्माण झालेल्या उत्तराखंड राज्यातून राज्यसभेवर आणलं. वाजपेयींनी त्यांच्याकडे पुन्हा त्यांचं आवडतं माहिती व प्रसारण खातं सोपवलं. हे खातं त्यांनी जवळपास अडीच वर्षं पाहिलं. जानेवारी २००३ मध्ये वाजपेयींनी त्यांना आरोग्य, कुटुंबकल्याण व संसदीय कामकाज या खात्यांची जबाबदारी सोपविली. आरोग्यमंत्री असताना त्यांनी देशात सहा ठिकाणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारल्या. तोवर ही संस्था केवळ दिल्लीतच होती.
वाजपेयींच्या सरकारला 'शायनिंग इंडिया' मोहिमेचा फटका बसला आणि हे सरकार २००४ च्या निवडणुकीत पराभूत झालं. काँग्रेसला मित्रपक्षांच्या मदतीने बहुमत मिळालं, तेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं, अशी मागणी काँग्रेसजनांनी सुरू केली. तेव्हा त्यांच्या विदेशी मूळ असल्याचा मुद्दा जोरदार चर्चेत होता. सुषमा स्वराज यांनी तेव्हा अचानक, त्यांच्या संयमित स्वभावाच्या विरुद्ध भूमिका घेऊन, 'सोनिया पंतप्रधान झाल्या, तर मुंडण करीन,' अशी घोर प्रतिज्ञा जाहीररीत्या करून सर्वांनाच धक्का दिला. पुढं सोनिया गांधींनी 'आतला आवाज' ऐकून पंतप्रधानपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले. स्वराज यांच्यावर मुंडण करण्याची वेळ काही आली नाही. पुढं कालांतरानं सोनिया आणि त्यांच्यातला दुरावा कमी होत गेला आणि नंतर त्या चांगल्या मैत्रिणीही झाल्या. पुढं २००६ मध्ये त्या तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या आणि पुढची लोकसभा निवडणूक होईपर्यंत त्या राज्यसभेत विरोधी उपनेत्या म्हणून कार्यरत राहिल्या.
सन २००९ ची लोकसभा निवडणूक आली, तेव्हा वाजपेयी प्रकृती अस्वास्थ्यामुळं राजकीय जीवनातून बाहेर पडले होते. ही निवडणूक पक्षानं लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली लढविली. मात्र, भाजपला अपयश आलं आणि पुन्हा काँग्रेस पक्षच सत्तेवर आला. मनमोहनसिंग पुन्हा पंतप्रधान झाले. या निवडणुकीत सुषमा स्वराज वाजपेयींच्या मध्य प्रदेशातील विदिशा या मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि मोठ्या मताधिक्यानं निवडूनही आल्या. लोकसभेत अडवाणींच्या जागी सुषमा स्वराज यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या हे अत्यंत महत्त्वाचं पद पक्षानं दिलं. ती पाच वर्षं त्यांनी 'यूपीए-२' सरकारला आपल्या घणाघाती भाषणांनी सळो की पळो करून सोडलं. कॉमनवेल्थ, टूजी स्पेक्ट्रम असे अनेक घोटाळे याच काळात उघडकीस येत होते आणि सुषमा स्वराज एखाद्या रणरागिणीच्या थाटात आपली मुलूखमैदान तोफ विरोधकांवर सतत डागत होत्या. या सरकारला आपल्या तीव्र टीकास्त्रांनी त्यांनी सर्वाधिक घायाळ केलं.
तोवर पुढची निवडणूक येऊन ठेपली होती. भाजपकडून पंतप्रधानपदाची उमेदवारी आता नरेंद्र मोदींना मिळाली होती. मोदींच्या झंझावातामुळं २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पुरता धुव्वा उडाला आणि भाजप स्वबळावर सत्तेवर आला. मोदींच्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज यांना परराष्ट्रमंत्री म्हणून महत्त्वाचं स्थान मिळालं. इंदिरा गांधींनंतर हे पद भूषविणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या महिला ठरल्या. सुषमा स्वराज यांनी पाच वर्षं अतिशय उत्तम पद्धतीनं हे पद सांभाळलं. सामान्य जनतेपासून दूर असणारं हे खातं त्यांनी सामान्यांना आपलंसं वाटेल, असं बदलवून टाकलं. ट्विटरसारख्या सोशल मीडियमचा उत्कृष्ट वापर करून घेत, त्यांनी जनतेशी संवाद सुरू केला. आपल्या प्रश्नाला परराष्ट्रमंत्र्यांकडून तातडीनं प्रतिसाद मिळतो हे पाहून परदेशात अडीअडचणीत सापडलेल्या अनेक लोकांनी थेट ट्विटरवर सुषमांशी संपर्क साधायला सुरुवात केली. सुषमा स्वराज स्वतः त्यांना उत्तरं देत आणि त्यांच्या अडचणींचं तातडीनं निराकरण करीत. यामुळं अनिवासी किंवा सदैव परदेशांत प्रवास करणाऱ्या भारतीयांत त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. पाकिस्तानात अडकलेल्या २३ वर्षीय गीता या मूकबधीर तरुणीला भारतात परत आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक लोकांशी त्यांनी वैयक्तिक स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले. युनोपासून ते अमेरिका, युरोप आदी सर्व देशांत, खंडांत त्या फिरल्या. भारताची बाजू कायम खणखणीत, सुस्पष्ट आणि संयमित भाषेत मांडण्याचं त्यांचं कसब सर्वांची मनं जिंकून घेत असे.
अशा रीतीनं कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांना आजारपणानं गाठलं. त्यांना मधुमेह होताच. सन २०१६ मध्ये त्यांची किडनी बदलण्यात आली. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळतच गेली. मोदी सरकारनं २०१९ मध्ये पुन्हा प्रचंड विजय मिळविला. मात्र, सुषमांनी मोदींना पत्र लिहून आपल्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळं मंत्रिपद नको असल्याचं कळवलं. मंत्रिपद सोडताच त्यांनी सरकारी बंगला सोडला व त्या आपल्या खासगी निवासस्थानी राहायला गेल्या. आयुष्यभर पाळलेली नीतिमत्ता, तत्त्वे त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाहीत. ऑगस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधील ३७० वे कलम रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेत मांडलं आणि ते मंजूरही झालं. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी ट्विट करून मोदी व शहांचे अभिनंदन केलं. 'मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहिली,' असं भावपूर्ण निवेदन त्यांनी केलं होतं. कदाचित त्यांचे प्राण यासाठीच थांबले असावेत. कारण थोड्याच वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला व काही तासांतच त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. अगदी अकाली त्या हे जग सोडून गेल्या.
त्यांच्या निधनानंतर सर्व देश हळहळला. आपल्या घरातील जवळची मावशी, आई, काकू, आत्या असं कुणी तरी गेल्याचं दुःख सगळ्यांना झालं. सुषमा स्वराज यांच्या जाण्यानं आपण काय गमावलं? सुसंस्कृत पद्धतीनं राजकारण करता येतं, हे सप्रमाण सिद्ध करणारे लोक फार थोडे उरले आहेत. त्यापैकी सुषमा एक होत्या. अत्यंत अभ्यासपूर्ण, संयमित रीतीनं वक्तृत्व गाजवून लोकशाहीत विरोधकांना नामोहरम करता येतं, हे दाखवणारी हे रणरागिणी आपल्यातून निघून गेली. आपण राजकारणात जावं, कर्तृत्व गाजवावं, असं जिच्याकडून बघून आजच्या तरुणाईला वाटू शकतं, अशी एक व्यक्ती गेली. एका व्यक्तीच्या जाण्यानं एवढा फरक पडू शकतो. सुदैवानं सुषमा स्वराज यांची बरीचशी भाषणं आता इंटरनेटच्या साह्यानं बघता येतात. ती भाषणं पाहताना कधी तरी डोळे ओलावले, तर राजकारणापलीकडं पोचलेल्या त्यांच्या उत्तुंग, शालीन व्यक्तिमत्त्वाला आपल्यातल्या माणुसकीनं केलेला तो सलाम असेल...

----

(पूर्वप्रसिद्धी : समतोल दिवाळी अंक, २०१९)

---

1 comment:

  1. किती सुंदर व योग्य शब्दातील लेख आपल्या सर्वांच्या आवडत्या गोड सुषमाजींवर...👌👍👏🙏

    ReplyDelete