30 Sept 2020

व्यंगचित्रांवरील लेख

वक्ररेषेच्या मिषाने...

----------------------

माणसाला वाचायच्या आधी पाहायला येतं. म्हणजेच एखादा लेख वाचण्यापूर्वीच तो एखादं चित्र पाहू शकतो आणि त्याचा अर्थही जाणू शकतो. त्या अर्थानं व्यंगचित्रकला ही लेखनाच्याही आधीची कला आहे, असं म्हणावं लागेल. शिवाय हजार शब्दांचा लेख जे काम करू शकणार नाही, ते एक व्यंगचित्र करू शकतं. 

लहानपणी वृत्तपत्रांत पहिल्या पानावर येणाऱ्या पॉकेट कार्टूनच्या माध्यमातून व्यंगचित्रांची आपली पहिली ओळख होते. कित्येकदा पानावरची मुख्य बातमी कोणती हे वाचण्यापूर्वी आपण अनेकदा हे कार्टून पाहतो आणि मगच इतरत्र वळतो. याचं कारण म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित एखादा मुद्दा त्यात हलक्याफुलक्या रीतीनं मांडलेला असतो. आदल्या दिवशी घडलेल्या एखाद्या घटनेवर काही टिप्पणी असते. ती वाचून आणि ते व्यंगचित्र पाहून आपल्या चेहऱ्यावर हलकेच हसू उमटतं. दिवसाची सुरुवात प्रसन्न होते, सकारात्मक होते. व्यंगचित्रातून अगदी मोजक्या शब्दांत फार मोठी प्रतिक्रिया व्यक्त केलेली असते. अनेकदा ती सर्वसामान्य माणसाच्या मनातलंच काही तरी सांगणारी असते आणि त्यामुळंच ती प्रत्ययकारक ठरते. 

व्यंगचित्राची कला म्हणजे विसंगती टिपण्याची कला! यासाठी फार उच्च दर्जाची बुद्धिमत्ता लागते. अवतीभोवती काय चाललंय, याचं भान असावं लागतं. विसंगती टिपायची म्हणजे आधी संगती माहिती असावी लागते. घरातील गृहिणी जसं धान्य निवडून त्यातले खडे फेकून देते, तसंच व्यंगचित्रकाराला समाजातलं जे जे काही टोचणारं, बोचणारं आहे, ते चित्राद्वारे मांडून ते दूर करण्याचं आवाहन समाजाला करावं लागतं. ही प्रक्रिया आपोआप होते. चित्र पाहताना आपल्या अबोध मनात त्यातली विसंगती ठसत जाते आणि प्रत्यक्ष जगण्यात अशी विसंगती न ठेवण्याकडं आपला कल वाढतो. 

व्यंगचित्रकाराची चित्रकला आणि शब्दांवर सारखीच हुकूमत असावी लागते. व्यंगचित्रात चित्र श्रेष्ठ की त्यासोबत लिहिलेले संवाद जास्त श्रेष्ठ, असा वाद कधी कधी उपस्थित केला जातो. माझ्या मते, त्यातलं चित्र हेच श्रेष्ठ! याचं कारण या प्रकाराचं नावच मुळी व्यंग'चित्र' असं आहे; व्यंग'शब्द' किंवा व्यंग'वाक्य' नाही! म्हणजे व्यंगचित्रात शब्द नसतील, तर चालतं. एकही शब्द नसलेलं व्यंगचित्र असू शकतं आणि ते अनेकदा असतंही... आणि ते सर्वश्रेष्ठही असू शकतं. पण चित्र नसेल आणि केवळ संवाद किंवा एखादं विनोदी वाक्य असेल, तर त्याला आपण व्यंगचित्र म्हणू शकणार नाही. तो केवळ शाब्दिक विनोद झाला. अनेक व्यंगचित्रकार शाब्दिक कोट्या किंवा शब्दांच्या कसरतीवर भर देताना दिसतात. पण ती दुय्यम गोष्ट आहे, हे वाचकांनीही सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. एकही शब्द सोबत नसेल, तरी ते व्यंगचित्र तुमच्याशी बोललं पाहिजे. जगातील सर्वोत्तम व्यंगचित्रकारांची उदाहरणं घेतली तर ती केवळ चित्रांतूनच अधिक बोलतात, हे आपल्या लक्षात येईल. अर्थात आपल्याकडं बोलक्या व्यंगचित्रांची परंपरा आहे. तीही चांगलीच असतात. पण शब्दांना चांगल्या रेषांची जोड मिळणं मात्र आवश्यक असतं. खरं तर हे सूर आणि ताल यांच्यासारखं आहे. दोन्हींच्या मिलाफातून अजोड संगीत तयार होतं. तसं चित्र आणि शब्द यांच्या संयोगातून एक दर्जेदार व्यंगचित्र तयार होऊ शकतं, असं म्हणायला हरकत नाही.

आपल्याकडं दिवाळी अंकांमध्ये व्यंगचित्रं देण्याची परंपरा आहे. माझ्या माहितीनुसार, अगदी पहिल्या दिवाळी अंकातही व्यंगचित्र होतंच. त्यामुळं व्यंगचित्रांना दिवाळी अंकांत हक्काची जागा असते. व्यंगचित्रांच्या उपस्थितीमुळं दिवाळी अंकांचा दर्जा उंचावण्यास मदतच झाली आहे. 'आवाज'सारख्या दिवाळी अंकातल्या 'त्या खिडक्या' हे एके काळी फार आकर्षण होतं. त्या 'खिडकीच्या आड' दडलंय काय, हे पाहण्याची उत्सुकता असे. अनेक घरांत तर हा अंक जणू काही प्रौढांसाठीच असल्यासारखा चोरून वाचला जाई. सूचक व चावट लैंगिक संदर्भ असल्यानं ते तसं होत असावं. (आजच्या पिढीला ती चित्रं दाखवली तर कदाचित त्यांच्या दृष्टीनं ती बालिश ठरतील. तर ते असो.) आमच्या लहानपणी मात्र गोल, घाटदार आणि सौष्ठवपूर्ण सौंदर्यवती स्त्रिया पाहण्याची ती नामी संधी असायची. व्यंगचित्रकारही फार प्रेमानं त्या बायकांच्या पडलेल्या पदराचे आणि आतल्या ऐवजाचे चित्र रंगवीत असत. हा व्यंगचित्रांचा एक प्रकार झाला. बाकी आत पानोपानी समोर येणाऱ्या इतर विनोदी व्यंगचित्रांचं वाचन करणं हाही निश्चितच आनंदाचा भाग असायचा. या व्यंगचित्रांना कुठलेही विषय वर्ज्य नसत. साधारणतः महागाई, संसारी माणसांचे व्याप-ताप, नट-नट्या आणि राजकारण हे तर हातखंडा विषय! एखादे शहर, तिथल्या लोकांचे स्वभाव, सवयी हेही व्यंगचित्रांचे विषय असतात. पुण्यातल्या मिठाईच्या एका प्रसिद्ध दुकानाविषयी एका दिवाळी अंकात पाहिलेलं व्यंगचित्र अद्याप माझ्या स्मरणात आहे. हे दुकान दुपारी एक ते चार बंद असण्याबद्दल फेमस आहे. तेव्हा व्यंगचित्रकारानं थोडं नाव बदलून या दुकानाचं चित्र काढलं. समोर फायर ब्रिगेडचा माणूस आग विझवायला आत चालला आहे, असं दाखवलं. घड्याळात दुपारचा एक वाजलेला दिसतो आहे आणि दुकानाचे मालक दारात उभे राहून त्या फायर ब्रिगेडच्या माणसावर खेकसत आहेत - 'आग विझवायची एवढी हौस होती तर एकच्या आत यायचं!' हा अर्थातच अतिशयोक्ती अलंकार वापरून केलेला विनोद होता. पण तो कायमचा लक्षात राहिलाय तो व्यंगचित्रकारानं या घटनेतलं व्यंग नेमकं हेरल्यामुळं. 

भारतात व्यंगचित्रं म्हटलं, की काही नावं हमखास ओठांवर येतात. शंकर, आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, मारिओ मिरांडा यांच्यापासून ते मराठीत शि. द. फडणीस, वसंत सरवटे, मंगेश तेंडुलकर, खलील खान, विवेक मेहेत्रे, हरिश्चंद्र लचके, प्रभाकर झळके, चारुहास पंडित, प्रभाकर वाडेकर, विकास सबनीस आणि प्रशांत कुलकर्णींपर्यंत अनेक नावं आठवतात. पुलंच्या पुस्तकांत वसंत सरवटेंची व्यंगचित्रं असत. अपूर्वाई, पूर्वरंग, व्यक्ती आणि वल्ली, असामी असा मी आणि विशेषतः बटाट्याची चाळ या पुस्तकांत सरवटेंनी काढलेली चित्रं अफलातून आहेत. पुलंचा विनोद आणि सरवट्यांची चित्रं एखाद्या उत्तम चित्रात मिसळून आलेल्या रंगांप्रमाणे यात एकमेकांत सामावून गेली आहेत हे लक्षात येईल. गंमत म्हणजे ती व्यक्तिचित्रणं वाचून आपल्या डोळ्यांसमोर जशी व्यक्ती उभी राहील, साधारण त्याच्या अगदी जवळ जाणारं व्यंगचित्र सरवट्यांनी काढलेलं आपल्याला दिसून येतं. हा तादात्म्यभाव अपूर्व आहे. बटाट्याच्या चाळीची सरवट्यांनी काढलेली चित्रं तर अक्षर वाङ्मय म्हणून मिरवावीत एवढी अप्रतिम आहेत. लेखकाला कदाचित शब्दांच्या जंजाळातून जे सांगता येत नाही, ते व्यंगचित्रकार आपल्या रेषांनी दाखवू शकतो. लेखकाची प्रतिमासृष्टी शब्दांनी आकार घेते, तर व्यंगचित्रकाराची रेषांनी, एवढाच काय तो फरक! मात्र, जेव्हा या दोन्हींमध्ये संकल्पनाचं अद्वैत होतं, तेव्हा वाचकालाही परमानंद होतो. पुलंचे लेख आणि सरवटेंची चित्रं यांनी आपल्याला हा आनंद अपरंपार दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली राजकीय व्यंगचित्रं नंतरच्या काळात संग्रहाच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळाली. बाळासाहेबांची रेष जबरदस्त होती. इंदिरा गांधींच्या राजवटीत नऊ राज्यांत काँग्रेस सरकारांचा पाडाव झाला आणि तिथं विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री आले, तेव्हा बाळासाहेबांनी काढलेलं 'नाकी नऊ आले' हे व्यंगचित्र आजही अनेकांच्या स्मरणात असेल. यात इंदिराजींचं मूळचंच लांब नाक आणखी मोठ्ठं करून दाखवलं होतं आणि त्या नाकावर हे नऊ मुख्यमंत्री बसलेले दाखवले होते. उत्तम व्यंगचित्र कल्पना आणि शाब्दिक कोटी यांचा अचाट संगम या व्यंगचित्रात झाला होता आणि म्हणूनच ते आज जवळपास ५० वर्षांनीही लोकांच्या लक्षात राहिलंय.

वृत्तपत्रांतील कार्टून स्ट्रिप हा प्रकार पाश्चात्त्य देशांत आणि अमेरिकेत लोकप्रिय आहे. आपल्याकडं मराठीत तो जास्त रुजवला आणि लोकप्रिय केला तो चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांनी. 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होणारा 'चिंटू' तमाम मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय झाला. 'चिंटू'च्या लोकप्रियतेनं अगदी लवकरच कळस गाठला. पुलं गेल्यानंतरचा निःशब्द 'चिंटू' आजही लोकांच्या लक्षात आहे. मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि ऐतिहासिक यश मिळविणारी कार्टून स्ट्रिप म्हणूनच 'चिंटू'चा उल्लेख करावा लागेल. मराठी मध्यमवर्गीय लोकांची मानसिकता, वृत्तपत्राचा वाचकवर्ग, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्या जगण्यातले प्रसंग यांचा एवढा जबरदस्त अभ्यास आणि निरीक्षण पंडित-वाडेकर जोडीनं केलं होतं, की हा 'चिंटू' एकदाही म्हणजे एकदाही कधी फसला नाही. प्रत्येक वेळी तो आनंदच देत गेला. यशाचं एवढं सातत्य राखणं ही कमालीची कौतुकास्पद गोष्ट आहे. मराठी वाचकांसाठी 'चिंटू' हा आता केवळ एक कार्टून स्ट्रिपमधला मुलगा नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन घरातल्या एखाद्या सदस्यासारखा झाला आहे. केवळ चिंटूच नव्हे, तर यात पंडित-वाडेकर जोडीनं तयार केलेल्या सगळ्याच व्यक्तिरेखा फारच ठसठशीत लक्षात राहिल्या आहेत. चिंटू मालिकेवरून पुढं चित्रपटही तयार झाले. मराठीत तरी ही अभूतपूर्व गोष्ट होती. एक तर चारुहास पंडितांची रेष फारच गोड आहे. अशीच गोड रेष शि. द. फडणीसांचीही आहे. ठसठशीत आणि सामान्य प्रेक्षकांना एकदम अपील होईल, अशी ही सुंदर रेष आहे. त्यामुळंच फडणीसांची 'हसरी गॅलरी' काय, किंवा पंडित-वाडेकरांचा 'चिंटू' काय, मराठी घरांत आणि मनांत अढळ स्थान मिळवून आहेत.

वृत्तपत्रांत पान १ वर येणाऱ्या पॉकेट कार्टूनच्या बाबतीत आर. के. लक्ष्मण यांचं स्थान भारतीय व्यंगचित्रांच्या इतिहासात तरी ध्रुवताऱ्यासारखं आहे, असंच म्हणावं लागेल. आर. के. लक्ष्मण यांनी साकारलेला आणि सदैव अबोल असणारा 'कॉमन मॅन' ही आता एक जिवंत दंतकथा झाली आहे. लक्ष्मण यांच्या या 'कॉमन मॅन'नं पन्नास वर्षांहून अधिक काळ भारतीयांची सकाळ हसरी केली. केवळ हसरी केली असं म्हणता येणार नाही. प्रसंगी उद्विग्न केलं, असहाय केलं, हताश केलं, चीड आणली, संताप आणला, रडू आणलं... थोडक्यात, आमच्या सर्व भावभावना लक्ष्मण यांनी त्यांच्या या छोट्याशा चित्रातून मांडल्या. उत्कृष्ट व्यंगचित्रकार कसा असावा, याचं लक्ष्मण हे जितंजागतं उदाहरण होते. लक्ष्मण यांच्यानंतर ठाकरे कुटुंबाची व्यंगचित्रकला रसिकांना भावली. खुद्द बाळासाहेब आणि नंतर राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांनी मराठी जनांना दीर्घकाळ भुरळ घातली. बाळासाहेबांनी तर व्यंगचित्रांना वाहिलेलं 'मार्मिक' हे नियतकालिकच सुरू केलं. माझ्या माहितीनुसार, ते मराठीतलं पहिलं आणि एवढा दीर्घकाळ सुरू असलेलं एकमेव व्यंगचित्र नियतकालिक होय. 'मार्मिक'मध्ये प्रामुख्यानं राजकीय व्यंगचित्रं असतात. मात्र, तसा कुठलाही विषय या नियतकालिकाला वर्ज्य नाही. बाळासाहेबांप्रमाणंच राज ठाकरे यांचीही रेष ताकदवान, पण लयबद्ध आहे. तिच्या एका फटकाऱ्यात अनेकांना घायाळ करण्याचं सामर्थ्य आहे. अर्थात बाळासाहेबांप्रमाणंच राजही पूर्णवेळ राजकारणात उतरल्यानं त्यांच्यातील व्यंगचित्रकारावर तसा अन्यायच झाला आहे. मात्र, या राजकारणाच्या धकाधकीतही ते मधूनच एखादं व्यंगचित्र काढतात, तेव्हा त्यांच्यातला कलाकारही सुखावत असणार.

अलीकडच्या काळात 'लोकसत्ता'त येणारी प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रं अतिशय बोलकी आणि परिणामकारक वाटतात. प्रशांत कुलकर्णी यांची राजकीय, सामाजिक समज उत्तम आणि रेषांचं भान पक्कं आहे. त्यामुळं त्यांनी हाताळलेले विषय हमखास चेहऱ्यावर हसू फुलवतात. विकास सबनीस हेही माझे आवडते व्यंगचित्रकार होते. सध्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये नुकतीच सुरू झालेली तंबी दुराई यांची ‘असं बोललात!’ ही नवी व्यंगचित्रमालिकाही वाचकांचं लक्ष वेधून घेते आहे. मराठीत अनेक नियतकालिकांमध्ये अनेक वर्षं दिसणारं आणखी एक नाव म्हणजे खलील खान. खलील खान यांचीही व्यंगचित्रं जबरदस्त असतात. त्यांचा तो 'ट्रेडमार्क' छोटा कुत्राही अफलातून आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक नामवंत व्यंगचित्रकार आज चांगलं काम करीत आहेत. त्या सर्वांचाच नामोल्लेख माझ्या अज्ञानामुळं इथं करणं शक्य नाही. तरीही हे सर्वच कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्य सर्वांना हसवताहेत आणि आपलं मनोरंजन करताहेत, यात शंकाच नाही. 

स्वतःच्या चुकांवर किंवा व्यंगांवर किंवा विसंगतीवर हसणारा समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असतो, असं म्हणतात. याचं कारण आपल्या चुका किंवा विसंगती समजायलाही एक बौद्धिक कुवत लागते. ब्रिटिश समाजाचं उदाहरण याबाबत एक आदर्श उदाहरण म्हणता येईल. एरवी रुक्ष असलेल्या साहेबाला स्वतःवर हसणं जमतं. मराठी समाजात हेच काम आपले व्यंगचित्रकार करीत आहेत. ते नसते, तर आपल्या सामाजिक जीवनातलं ते एक फार व्यंग ठरलं असतं, यात वाद नाही. 

---

(एका नियतकालिकासाठी दिवाळी अंकासाठी दोन-तीन वर्षांपूर्वी लिहिलेला, पण प्रसिद्ध न झालेला हा लेख आहे.)

(वि. सू. - व्याकरणदृष्ट्या व्यंग्यचित्र हा शब्द बरोबर आहे. पण व्यंगचित्र हा शब्द रूढ आहे. म्हणून या लेखात तो तसाच वापरला आहे.)

------

3 comments:

  1. आज जागतिक व्यंग्यचित्र दिन आहे.आपला लेख वाचून मस्तं वाटलं. आपलं लिखाण नेहमी अधून मधून वाचत असतो,छान लेखन शैली आहे.मराठी व्याकरणावर लिहिलेले लेख खूप उपयुक्त माहितीप्रद आहेत.

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणेच उत्तम आहे,समयोचित, खुसखुशीत..👌

    ReplyDelete
  3. नेहमीप्रमाणेच उत्तम आणि खुसखुशीत लेख.
    खूप आवडला.

    ReplyDelete