29 Jan 2024

दृष्टी-श्रुती दिवाळी अंक २३ - लेख

मुकुंद, तू मीच आहेस!
--------------------------

मिलिंद बोकील यांची ‘शाळा’ ही कादंबरी मी वाचली तेव्हा मी त्या कादंबरीच्या प्रेमातच पडलो. नंतर मी अनेकदा ही कादंबरी वाचली. ‘शाळेत गेलेल्या सर्वांसाठी’ अशी या कादंबरीची अर्पणपत्रिका आहे. खरोखर, शाळेत गेलेल्या सगळ्यांसाठीच ही कादंबरी आहे आणि शाळेतल्या त्या दिवसांची अनुभूती ज्यांच्या मनात श्रावणसरींसारखी आजही बरसत असते त्या सगळ्यांनाच या कादंबरीच्या प्रेमात पडल्याशिवाय गत्यंतर नाही. मी अनेकदा विचार करतो, की या कादंबरीतलं आपल्याला नक्की काय आवडलं? त्या कोवळ्या वयातलं ‘प्रेम’? वयात येण्याची जाणीव आणि त्यासोबत उमलत असलेल्या कित्येक मुग्ध-मधुर भावनांची पुनर्भेट? आपल्यातल्या हरवलेल्या निरागसपणाची टोचणारी भावना? मग वाटतं, की हे सगळंच... आणि त्याशिवाय असं बरंच काही, जे शब्दांत कदाचित कधीच सांगता येणार नाही. 

यातला नायक म्हणजे मुकुंद जोशी. इयत्ता नववी. कादंबरीचा काळ म्हणजे नववीचं संपूर्ण वर्ष. गाव (थेट उल्लेख नसला तरी) डोंबिवली. या मुकुंदाची आणि त्याच्या वर्गात असलेल्या शिरोडकरची ही ‘प्रेम’कथा... इंग्रजीत ज्याला ‘काफ लव्ह’ म्हणतात, त्या वयातल्या पहिल्या-वहिल्या आकर्षणाची ही गोड गोष्ट!
कादंबरीतील मुकुंदा भेटल्यावर असं वाटलंच नाही, की याला आपण पहिल्यांदाच भेटतोय. मुकुंद जोशी राहत होतास ते शहर, ते पर्यावरण, तो भोवताल किती तरी वेगळा होता. त्याच्या नववी-दहावीत असण्याचा काळही वेगळा होता. आणीबाणीचे संदर्भ पुस्तकात येतात. माझ्या त्या वयाच्या जवळपास पंधरा-सोळा वर्षं पूर्वीचा... आणि कादंबरीतून मुकुंदाची भेट झाली तीही बरोबर माझ्या दहावीच्या काळानंतर पंधरा-सोळा वर्षांनंतर...म्हणजे मधे साधारणत: तीस वर्षांचा काळ गेला होता.. मात्र, आपण एकच काळ जगलो आहोत, असं वाटण्याइतका हा नायक जवळचा वाटला... मला खात्री आहे, माझ्यासारख्या अनेक वाचकांना असंच वाटलं असेल. मुकुंदाचं नववीतल्या वयातलं भावविश्व आपल्याला मनापासून आवडतं. याचं कारण माझ्यासारख्या लाखो मध्यमवर्गीय मराठी मुलांचं भावविश्व तसंच होतं. काळ कितीही बदलला तरी पौगंडावस्थेतल्या त्या भावना कुठल्याही काळात त्याच असतात. त्या वयात प्रत्येकाची आपली आपली अशी कुणी तरी ‘शिरोडकर’ असतेच. त्या कोवळ्या वयातलं ते प्रेम... त्याला ‘प्रेम’ तरी कसं म्हणावं? त्या वयातलं ते खास आकर्षण... पण बोकील सांगतात, ती गोष्ट केवळ त्या आकर्षणापुरती मर्यादित नव्हती. त्यात त्या काळाचा सगळा पटच सामावला आहे. चाळीतलं जोशींचं घर, मंत्रालयात लोकलनं नोकरीला जाणारे मुकुंदाचे बाबा, त्याची सुगृहिणी अशी साधीसुधी टिपिकल आई, त्याची मोठी बहीण - जिचा उल्लेख तो कायम अंबाबाई असाच करतो आणि ते खूप आवडतं -, याशिवाय त्याचा लाडका नरूमामा हे सगळेच आवडू लागतात. सगळ्यांत भारी म्हणजे यातले मुकुंदाचे सगळे मित्र. फावड्या, चित्र्या, सुऱ्या... नकळत त्यातून लेखक दाखवत असलेला त्यांच्या आर्थिक परिस्थितीतला फरक, गावातलं सांस्कृतिक-सामाजिक वातावरण आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीला सूचकपणे असलेली आणीबाणीची किनार... हा काळ आपणही नायकासोबत अनेकदा जगतो. त्याच्यासोबत त्या शेताडीतील वाट चालतो, भाताचा सुगंध छाती भरून घेतो, वर्गात त्याच्याच शेजारी बसून बेंद्रीणबाईंची टवाळी करतो, दूरवरचे सोनारपाड्याचे ते जांभळे डोंगर बघतो, त्याच्यासोबत गावातल्या गणपती मंदिरात येतो आणि प्रदक्षिणाही घालतो, त्याच्यासोबत संध्याकाळच्या क्लासला येतो आणि त्या दाटीवाटीत कोपऱ्यात बसून त्याच्याकडे पाहत राहतो, तो शिरोडकरकडं पाहताना मी त्या दोघांनाही पाहतो... मी स्काउटच्या कॅम्पलाही येतो, मीही गाणी म्हणतो... मी केटी आणि विजयच्या बैठकीतही डोकावतो, मी संध्याकाळी मुकुंदाच्या बाबांसोबत बुद्धिबळ खेळणाऱ्या निकमकाकांच्या मधे बसून त्यांचा खेळ बघत राहतो... मी घराघरातून येणाऱ्या कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज आणि चाळीत आलेल्या पहिल्या टीव्हीचा आवाज मुकुदांच्याच जोडीने अनुभवतो....
खरं तर माझं जगणं मुकुंदापेक्षा किती तरी वेगळं होतं. यातला नायक मुंबईच्या सान्निध्यात वाढतो, मी एका लहान तालुक्याच्या गावाला... त्याचं टिपिकल चौकोनी कुटुंब होतं, आमचं एकत्र कुटुंब... पण तरीही मग तो एवढा जवळचा का वाटतो? त्या काळात त्याच्यासारखं आपण जगायला हवं होतं, असं तीव्रतेनं का वाटतं? मला वाटतं, त्या वयात असलेलं निरागस मन आपण नंतर हरवून बसलो आहोत. मुकुंदाला भेटलं, की माझं ते निरागस मन पुन्हा मला धावत भेटायला येतं... मग मी अजून विचार करतो आणि माझ्या लक्षात येतं, अरे, मीच मुकुंद आहे! मग आपण तर आपल्याला आवडतोच...

मला यातले अनेक प्रसंग आवडतात. अनेकदा तर आपल्याच आयुष्याचं चित्र लेखक उभं करतो आहे की काय, असंही वाटतं. वर्गात गाण्याच्या भेंड्या सुरू असताना, शिरोडकरनं फळ्यावर लिहिलेलं गाणं मुकुंदानं ओळखणं आणि नंतर ती नाराज झाल्याचं लक्षात आल्यावर पुढच्या वेळी मुद्दाम ते न ओळखणं आणि मग तिनं समजुतीनं याच्याकडं पाहणं हे फार खास आहे. शिवाय ते गणपती मंदिरात पहिल्यांदा भेटतात, तो प्रसंगही लेखकानं इतका उत्कट आणि सुंदर रंगवला आहे की बस! यानंतर स्काउटच्या शिबिराला ते जातात तेव्हाचा प्रसंग आणि नंतर मुकुंदा थेट तिच्या घरी जातो, तो प्रसंग! या प्रत्येक प्रसंगात लेखकानं मुकुंदाची त्या वयातली शारीर जाणीव, त्याला शिरोडकरविषयी वाटत असलेलं ‘ते काही तरी’, त्याची धडधड, आजूबाजूच्या लोकांची-कुटुंबाची सतत धास्ती घेत जगण्याची वृत्ती हे सगळं फार नेमकेपणानं टिपलं आहे. मंदिरातला प्रसंग आणि ती तिच्या बहिणीला घेऊन येते त्यानंतर मुकुंदाची उडालेली धांदल लेखक फार प्रेमानं चितारतो. या गणपती मंदिरातलं एकूण वातावरण, तिथं रोज येणारे त्या गावातले भाविक, सतत ‘तू इथं काय करतोयस?’ असं विचारणारी आणि गावातल्या प्रत्येक मुलाला ओळखणारी मोठी माणसं, तिथला फुलवाला, देवळातल्या बायका असं सगळं चित्र लेखक तपशीलवार उभं करतो. एका अर्थानं नंतर घडणाऱ्या फार गोड अशा प्रेमप्रसंगासाठी एक कॅनव्हास तयार करतो. नायक मुकुंदाला शिरोडकर तिथं भेटायला येईल की नाही, याची खात्री नसते. मात्र, ती यावी अशी मनोमन प्रार्थना तो करत असतो. त्यासाठी ‘ती येणार नाही, ती येणार नाही’ असं मुद्दाम उलटं घोकत असतो. अखेर ठरलेली वेळ उलटून गेल्यावर काही वेळानं ‘ती’ येते. तिला पाहून मुकुंदा हरखतो. तिच्यासोबत तिची लहान बहीणही असते. ते पाहून तो जरा नाराजही होतो. या प्रसंगाला मुकुंदाचा जो काही शारीरिक प्रतिसाद असतो, तो सगळा लेखक कमालीच्या आत्मीयतेनं आणि प्रेमानं रंगवतो. अखेर अगदी थोडा वेळ त्यांची भेट होते. काही तरी जुजबीच ते बोलतात आणि ती लगबगीनं तिथून निघून जाते. मुकुंदा एवढ्यावरही खूश असतो. ती आली याचंच त्याला विशेष वाटत असतं. मुकुंदासारखीच भावना असणारे त्या वयातले किती तरी मुलं जसं वागतील, जसा प्रतिसाद देतील, जसं व्यक्त होतील अगदी तसंच या कादंबरीचा नायक करतो. म्हणूनच तो अधिकाधिक आपला वाटतो.
कादंबरी या वाङ्मय प्रकाराची सारी वैशिष्ट्यं लेखक यात वापरतो. म्हटलं तर काल्पनिक, म्हटलं तर स्पष्टच आत्मकथनात्मक असं निवेदन लेखकानं यात वापरलं आहे. याचा फायदा म्हणजे वाचकांच्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव मिळतो. लेखक या कादंबरीतलं पर्यावरण अशा खुबीनं रंगवतो, की ते सगळं आपल्याला तर दिसतंच; शिवाय आपल्या वैयक्तिक अनुभवविश्वाची जोड त्याला देऊन आपण आपली वेगळी ‘शाळा’ मनात भरवू लागतो. आपल्याला आपल्या ’त्या‘ वयातले अनुभव आठवू लागतात. लेखकानं ते अशा कौशल्यानं वर्णिले आहेत, की प्रत्येक वाचकाला त्यात आपल्या स्वत:च्या ‘गाळलेल्या जागा’ तिथे भरता येतील.
संपूर्ण कादंबरी अशा रीतीनं आपल्याला आपल्या ‘काफ लव्ह’ची आठवण करून देते; शिवाय आपल्याला पुन्हा एकदा त्या कोवळ्या प्रेमाच्या प्रेमात पाडते. त्या वयातल्या आपल्या आठवणी आयुष्यभर कधीही न विसरता येण्यासारख्याच असतात. ‘शाळा’ आपल्याला पुन्हा त्या दिवसांत नेते आणि स्मरणरंजनाचं सुख मिळवून देते.
एका अर्थानं हा मुकुंदा आणि त्याची ती ‘शाळा’ म्हणजे माझं, काळाच्या शिळेत आणि पुस्तकांच्या पानांत कोरून ठेवलेलं पौगंड आहे... आणि म्हणूनच मला ती फार फार प्रिय आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२३)

---


No comments:

Post a Comment