26 Feb 2024

ग्राहकहित दिवाळी अंक २३ - लेख

यक्ष
-----


भारतीय चित्रपटसृष्टीतील दिलीपकुमार, राज कपूर व देव आनंद या प्रख्यात नायकत्रयीतील देव आनंदची जन्मशताब्दी नुकतीच २६ सप्टेंबरला झाली. याचाच अर्थ देव आनंद हयात असता तर तो त्या दिवशी शंभर वर्षांचा झाला असता. पण मग असं वाटलं, की देव आनंद केवळ शरीरानं आपल्यातून गेला आहे. एरवी तो आपल्या अवतीभवती आहेच. त्याच्या त्या देखण्या रूपानं, केसांच्या कोंबड्याच्या स्टाइलनं, तिरकं तिरकं धावण्याच्या शैलीनं, थोडासा तुटलेला दात दाखवत नायिकेला प्रेमात पाडणाऱ्या स्मितहास्याच्या रूपानं, त्याच्या त्या विशिष्ट टोपीच्या रूपानं, त्या स्वेटरच्या रूपानं - देव आनंद आपल्यात आहेच.
उण्यापुऱ्या शंभर-सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या चित्रपटसृष्टीवर तब्बल सहा दशकं आपल्या अस्तित्वाची ठसठशीत मोहोर उमटवणारा हा माणूस म्हणजे ‘यक्ष’ होता - आणि ‘यक्ष’ अजरामर असतात. आणि हो, ‘नंदा प्रधान’मध्ये पु. ल. देशपांडे म्हणाले, तसं ‘यक्षांना शापही असतात.’ देव आनंदलाही ते होते. त्याला चिरतरुण राहण्याच्या एका झपाटलेपणाचा शाप होता. त्यामुळं तो आयुष्यभर २५ वर्षांचाच राहिला. आपणही आपल्या भावासारखे उत्तम चित्रपट दिग्दर्शन करू शकतो, असं त्याला वाटायचं. हा आत्मविश्वास अजब होता. त्यामुळं वयाच्या उत्तरार्धात देव आनंदचा नवा सिनेमा ही एक हास्यास्पद, टर उडविली जाणारी गोष्ट ठरली. मात्र, ‘देवसाब’ना त्याचं काही वाटायचं नाही. मुळात भूतकाळात रमणारा हा माणूसच नव्हता. सतत पुढच्या काळाचा आणि प्रसंगी काळाच्या पुढचा विचार करायचा. स्वत:चे प्रदर्शित झालेले सिनेमेही हा माणूस पाहायचा नाही. त्याच वेळी आपण मात्र त्याच्या ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘खोया खोया चांद’, ‘ये दिल ना होता बेचारा’, ‘होठों पे ऐसी बात’, ‘तेरा मेरा प्यार अमर’, ‘हैं अपना दिल तो आवारा’, ‘उपरवाला जान कर अंजान है’, ‘दिल का भंवर करे पुकार’ या आणि अशाच कित्येक कृष्णधवल गाण्यांत हरवून गेलेलो असतो.
बारा वर्षांपूर्वी देव आनंद शरीराने आपल्यातून गेला... एका रविवारी सकाळीच तो गेल्याचा एसेमेस मोबाइलवर आला आणि पहिला विचार मनात आला, की अरेरे, अकाली गेला...! ८८ हे काय वय होतं त्याचं जाण्याचं? देव आनंद किमान पावणेदोनशे वर्षं जगेल, अशी खात्री होती. ८८ हे आपल्यासारख्या सामान्यजनांसाठी वृद्धत्वाचं वय असेल... पण देव आनंद नावाच्या अजब रसायनासाठी नाही. तो वरचा देव या भूलोकीच्या देवाला घडविताना त्यात वृद्धत्व घालायला विसरला असावा. त्यामुळंच देव आनंद लौकिकार्थानं, वयाच्या हिशेबानं वाढला असेल, पण मनानं तो पंचविशीच्या पुढं कधीच गेला नाही. म्हणून तर तो गेला त्याच वर्षी त्याचा 'हम दोनो' पन्नास वर्षांनी रंगीत होऊन झळकला होता आणि त्याच वेळी 'चार्जशीट' हा त्याचा नवा-कोरा सिनेमाही रिलीज झाला होता. त्यातही 'हम दोनो'च अधिक चालला हे वेगळं सांगायला नको. देव आनंदसाठी जसं त्याचं वय पंचविशीला गोठलं होतं, तसं प्रेक्षकांसाठीही तोच 'हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' म्हणणारा देवच आठवणींत कायमचा ‘फ्रीज’ झाला होता. स्वतः देव आनंदला याची फिकीर नव्हती. 'हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' हेच त्याचं जीवनविषयक तत्त्वज्ञान होतं. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची किती पराकोटीची पॅशन असावी, याचं देव हे जितंजागतं उदाहरण होतं. देव सिनेमासाठी होता आणि सिनेमा देवसाठी... दोघांनीही परस्परांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. त्यामुळंच त्याच्या नव्या सिनेमांच्या पोस्टरवर नातीपेक्षा लहान वयाच्या नायिकांना कवेत घेऊन उभा राहिलेला देव कधीही खटकला नाही.
देव आनंद ही काय चीज होती? एव्हरग्रीन, चॉकलेट हिरो, बॉलिवूडचा ग्रेगरी पेक (खरं तर ग्रेगरीला हॉलिवूडचा देव आनंद का म्हणू नये?), समस्त महिलांच्या हृदयाची धडकन अशा विविध नामाभिधानांनी ओळखलं जाणारं हे प्रकरण नक्की काय होतं? पन्नासच्या दशकानं हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या तीन महानायकांपैकी देव एक होता, हे तर निर्विवाद! पुण्यात प्रभात स्टुडिओत उमेदवारी करणारा आणि 'लकी'त चाय-बनमस्का खायला येणारा, सडपातळ बांध्याचा देव आनंद नावाचा हा देखणा युवक पुढं समस्त चित्रसृष्टीवर साठ वर्षांहून अधिक काळ राज्य करतो याचं रहस्य काय? एक तर देव आनंदचं पडद्यावरचं व्यक्तिमत्त्व सदाबहार, प्रसन्न असायचं. त्याचा अभिनय अगदी महान दर्जाचा होता, असं नाही, पण स्वतःला छान प्रेझेंट करायला त्याला जमायचं. शिवाय तो देखणा होताच. साठच्या दशकात त्यानं केलेल्या सिनेमांमुळं रोमँटिक हिरो हे बिरुद त्याला आपोआपच येऊन चिकटलं. त्याचं ते हातवारे करीत गाणी म्हणणं, त्याचा तो केसांचा कोंबडा, मिश्कीलपणे नायिकेच्या मागे गोंडा घोळणं या सगळ्यांतून देवचा नायक साकारायचा. जेव्हा सिनेमा हे एकमेव मनोरंजनाचं साधन होतं, त्या काळात भारतातल्या तमाम महिलांच्या हृदयस्थानी हे महाशय का विराजमान झाले असतील, याचा सहजच तर्क बांधता येतो. देव आनंदनं प्रेक्षकांना रोमँटिकपणा म्हणजे काय, हे शिकवलं... व्यवस्थित टापटीप राहणं, उत्कृष्ट फर्डं इंग्रजी बोलणं आणि सुंदर स्त्रीवर मनसोक्त प्रेम करणं या गोष्टी (तत्कालीन) भारतीय तरुणाई कुणाकडून शिकली असेल, तर फक्त 'देवसाब'कडून...
... कारण देव आनंद नट असला, तरी शिकलेला होता. इंग्रजी साहित्याचा पदवीधर होता. त्याला गीत-संगीताची उत्तम समज होती. त्याचे भाऊ चेतन आनंद आणि विजय आनंदही तसेच बुद्धिमान होते. पन्नास-साठच्या दशकातल्या, स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या पायावर धडपड करून उभ्या राहणाऱ्या, तरुण रक्तानं सळसळणाऱ्या भारताचं देव आनंद हे प्रतीक होतं. 'गाइड'सारख्या अभिजात साहित्यकृतीवर या बंधूंनी तयार केलेला सिनेमाही याची साक्ष आहे. पडद्यावर अतिविक्षिप्त किंवा वाह्यात प्रकार त्यांनी कधी केले नाहीत. पुढं 'हरे रामा हरे कृष्णा'सारखा सिनेमा दिग्दर्शित केल्यावर देवला आपण मोठे दिग्दर्शक आहोत, याचा 'साक्षात्कार' झाला. त्यानंतर आतापर्यंतचा त्याचा प्रवास केवळ थक्क होऊन पाहत राहण्यासारखा होता. मला देव आनंदला प्रत्यक्ष बघण्याची संधी एकदाच मिळाली. साधारण १६-१७ वर्षांपूर्वी तो पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवात आला होता, तेव्हा पत्रकार परिषदेत त्याच्या नातवांच्या वयाच्या पत्रकार पोरा-पोरींसमोर त्यानं केलेली तुफान बॅटिंग लक्षात राहिलीय. त्याचे नवे सिनेमे, त्याच्या पत्रकार परिषदा, त्या सिनेमांचं प्रदर्शित होऊन पडणं हे सगळं पब्लिकच्याही अंगवळणी पडलं होतं. दर वेळेला एवढी अफाट एनर्जी कुठून आणतो हा माणूस, असा एकच प्रश्न पडायचा.
देव आनंदचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ चा. तत्कालीन ‘ब्रिटिश इंडिया’मधील पंजाब प्रांतातील शकरगड (जि. गुरुदासपूर) येथे जन्मलेल्या देवचं जन्मनाव होतं धरमदेव. देवचे वडील पिशोरीलाल आनंद गुरुदासपूर जिल्हा न्यायालयातील नावाजलेले वकील होते. पिशोरीलाल यांना चार मुलगे झाले, त्यातील देव तिसरा. देवची बहीण शीलकांता कपूर म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूरची आई. देवचे थोरले भाऊ म्हणजे मनमोहन आनंद (हेही वकीलच होते), चेतन आनंद आणि धाकटा विजय आनंद. देव आनंदचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण डलहौसी येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं. त्यानंतर तो धरमशाला येथे कॉलेज शिक्षणासाठी गेला. नंतर तो लाहोरला गेला आणि तेथील गव्हर्न्मेंट कॉलेजमधून त्याने इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन बी. ए. केलं.
पदवी मिळविल्यानंतर लगेचच तो मुंबईला आला. सुरुवातीला त्याने चर्चगेट येथील मिलिटरी सेन्सॉर ऑफिस येथे नोकरी केली. तेव्हा त्याला ६५ रुपये पगार मिळायचा. त्यानंतर त्याने आणखी एका अकाउंटिंग फर्ममध्ये ८५ रुपये पगारावर नोकरी गेली. देवचा मोठा भाऊ चेतन आनंद तेव्हा ‘इंडियन पीपल थिएटर्स असोसिएशन’मध्ये (इप्टा) जात असे. त्याच्यासोबत देव सिनेमे पाहत असे. अशोककुमारचा ‘किस्मत’ हा चित्रपट तेव्हा जोरात चालला होता. तो बघून देवच्या मनात अभिनेता होण्याची ऊर्मी निर्माण झाली.
प्रभात फिल्म कंपनीचे बाबूराव पै यांनी देव आनंदला पहिला ‘ब्रेक’ दिला. देव पहिल्यांदा त्यांच्या कार्यालयात धडकला, तेव्हा देवचा चेहरा, त्याचं हास्य व आत्मविश्वास बघून पै खूप प्रभावित झाले. त्यांच्यामुळेच प्रभात फिल्म कंपनीच्या ‘हम एक है’ (१९४६) या चित्रपटात त्याला नायकाची भूमिका मिळाली. हिंदू-मुस्लिम एकतेवर आधारित या चित्रपटात देवने हिंदू तरुणाची भूमिका केली होती आणि कमला कोटणीस त्याची नायिका होती. या चित्रपटाचं पुण्यात चित्रीकरण सुरू असताना देवची मैत्री गुरुदत्तशी झाली. त्या दोघांनी असं ठरवलं होतं, की ज्याला चित्रपटसृष्टीत आधी मोठं काम मिळेल, त्याने दुसऱ्याला मदत करायची. त्यानुसार देवने जेव्हा ‘बाजी’ (१९५१) चित्रपट तयार करायचं ठरवलं, तेव्हा त्याचं दिग्दर्शन गुरुदत्तकडं दिलं.
याच काळात देव आनंदला सुरैयासोबत काही सिनेमे करायला मिळाले. त्या दोघांची जोडी जमली. इतकंच नव्हे, तर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. देव तुलनेने नवखा होता, तर सुरैया तेव्हाही मोठी स्टार होती. ‘विद्या’, ‘जीत’, ‘शायर’, ‘अफसर’, ‘निली’, ‘सनम’ अशा काही सिनेमांत दोघे एकत्र झळकले. सुरैयाचं नाव कायम आधी पडद्यावर येई. ‘विद्या’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ‘किनारे किनारे चले जाएंगे’ या गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना, सुरैयाची बोट उलटली व ती पाण्यात पडली. देवनं तिला वाचवलं. या घटनेनंतर ती त्याच्या प्रेमात पडली. सुरैयाची आजी या दोघांवर लक्ष ठेवून असायची. ‘जीत’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांनी प्रत्यक्ष लग्न करायचंही ठरवलं होतं. दोघं एकमेकांना पत्रं पाठवायचे. मात्र, नियतीच्या मनात निराळंच काही होतं. देवनं सुरैयाला तेव्हाच्या तीन हजार रुपये किमतीची हिऱ्याची अंगठीही दिली होती. मात्र, सुरैयाच्या आजीनं या लग्नाला विरोध केला. सुरैयाचं कुटुंब मुस्लिम होतं, तर देव हिंदू! अखेर लग्न काही झालेच नाही. सुरैया अखेरपर्यंत अविवाहित राहिली. त्या दोघांनीही एकत्र काम करणं थांबवलं आणि एका प्रेमकहाणीचा करुण अंत झाला.
देवला पहिला मोठा ब्रेक अशोककुमार यांनी दिला. बॉम्बे टॉकीजची निर्मिती असलेल्या ‘जिद्दी’ (१९४८) या चित्रपटात त्यांनी देवला नायक म्हणून घेतलं. हा चित्रपट जोरदार चालला. यात देवची नायिका होती कामिनी कौशल. पुढच्याच वर्षी देवनं ‘नवकेतन’ ही स्वत:ची निर्मिती संस्था काढली आणि तो स्वत: चित्रपट काढू लागला. गुरुदत्तनं दिग्दर्शित केलेला ‘बाजी’ हा क्राइम थ्रिलर चित्रपट जोरदार चालला. यात देवच्या नायिका होत्या गीता बाली आणि कल्पना कार्तिक. कल्पना कार्तिकचं मूळ नाव होतं मोनासिंह. या दोघांनी नंतर ‘आँधियाँ’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘हाउस नं. ४४’ व ‘नौ दो ग्यारह’ हे चित्रपट सोबत केले. ‘टॅक्सी ड्रायव्हर’च्या चित्रीकरणाच्या वेळी कल्पना व देव प्रेमात पडले व देवनं तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
यानंतर कल्पना कार्तिकनं आपल्या अभिनय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. देवची घोडदौड सुरूच होती. ‘मुनीमजी’, ‘फंटूश’, ‘सीआयडी’, ‘पेइंग गेस्ट’ असे त्याचे चित्रपट आले आणि जोरदार हिट झाले. देवची एक स्टाइल आता प्रस्थापित झाली होती. देखणा-रुबाबदार चेहरा, मान तिरकी करत बोलण्याची लकब, भरभर भरभर चालण्याची अनोखी अदा आणि त्याचं ते ‘मिलियन डॉलर’ हास्य याच्या जोरावर त्यानं त्या काळातल्या तमाम प्रेक्षकवर्गावर, विशेषत: महिलांवर गारूड केलं.
याच काळात देवची जोडी वहिदा रेहमानबरोबर जमली. वहिदाला चित्रपटसृष्टीत आणले ते गुरुदत्तनं. ती देव आनंदच्या राज खोसला दिग्दर्शित ‘सीआयडी’मध्ये पहिल्यांदा झळकली. त्यानंतर ‘सोलहवां साल’ (१९५८), काला बाजार (१९६०) आणि ‘बात एक रात की’ (१९६२) या यशस्वी चित्रपटांत या दोघांची जोडी दिसली. मधल्या काळात देवनं दिलीपकुमारसोबत ‘इन्सानियत’ (१९५५) हा सुपरहिट चित्रपट दिला. मधुबाला व नलिनी जयवंतसोबतचा ‘काला पानी’ (१९५८) हा सिनेमाही जोरदार चालला. याच चित्रपटासाठी देवला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं ‘फिल्म फेअर’ ॲवॉर्ड मिळालं. या सर्व काळात देवनं आपल्या भूमिकांत वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला. त्यानं ‘जाल’, ‘दुश्मन’, ‘काला बाजार’ अशा सिनेमांत नकारात्मक छटा असलेल्या भमिका केल्या, तर ‘पॉकेटमार’, ‘काला पानी’, ‘शराबी’, ‘बंबई का बाबू’ अशा सिनेमांत काहीशा दु:खी छटा असलेल्या भूमिकाही केल्या. मात्र, रोमँटिक हिरो हीच त्याची प्रतिमा सर्वाधिक प्रबळ ठरली व चाहत्यांमध्ये ठसली. त्यातही वहिदा रेहमान, नूतन, साधना, कल्पना कार्तिक, गीताबाली या नायिकांसोबत त्याची जोडी विशेष जमली. नूतनसोबत ‘दिल का भंवर करे पुकार...’ या गाण्यात कुतुबमिनारच्या पायऱ्या उतरतानाचा देव आनंद (आणि नूतनही) विसरणं अशक्य! तीच गोष्ट ‘तेरा मेरा प्यार अमर...’ गाण्यातल्या साधना आणि देवची.

साठचं दशक देवसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार होतं. त्याची कारकीर्द याच दशकात चढत्या भाजणीनं सर्वोच्च शिखरावर जाणार होती. सन १९६१ मध्ये त्याचा ‘हम दोनो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं तुफान यश मिळवलं. एस. डी. बर्मन हे ‘नवकेतन’चे ठरलेले संगीतकार होते. जयदेव हे त्यांचे सहायक. मात्र, या चित्रपटासाठी देवनं एस. डी. बर्मन यांची परवानगी घेऊन जयदेव यांना स्वतंत्रपणे संगीत द्यायला सांगितलं. त्याचा हा निर्णय किती योग्य ठरला, हे नंतर काळानं सिद्ध केलंच. आजही ‘हम दोनो’ची सर्व गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे हिंदी चित्रपट संगीतातील महत्त्वाच्या युगुलगीतांपैकी एक मानलं जातं. या चित्रपटात साधना व नंदा या त्याच्या नायिका होत्या. देवची यात दुहेरी भूमिका होती. हा चित्रपट ५० वर्षांनी, म्हणजे २०११ मध्ये रंगीत अवतारात पुन्हा थिएटमध्ये प्रदर्शित झाला होता आणि तेव्हाही त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद लाभला होता. (मी स्वत: तेव्हा हा चित्रपट प्रथमच मोठ्या पडद्यावर पाहिला.) यानंतर ‘तेरे घर के सामने’, ‘मंझिल’ नूतनसोबत, ‘किनारे किनारे’ मीनाकुमारीसोबत, ‘माया’ माला सिन्हासोबत, ‘असली नकली’ साधनासोबत, ‘जब प्यार किसी से होता है’ आणि ‘महल’ आशा पारेखसोबत आणि ‘तीन देवियाँ’ कल्पना, सिमी गरेवाल व नंदासोबत असे देवचे एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले आणि बॉलिवूडचा रोमँटिक नायक अशी त्याची नाममुद्रा आणखी ठळकपणे सिद्ध करून गेले.

‘गाइड’ नावाची दंतकथा

याच दशकात, १९६५ मध्ये देव आनंदच्या कारकिर्दीतला कदाचित सर्वांत महत्त्वाचा चित्रपट ‘गाइड’ प्रदर्शित झाला. हा त्याचा पहिला रंगीत चित्रपट. या चित्रपटाने इतिहास घडवला. प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या याच नावाच्या कादंबरीवरून हा चित्रपट तयार करण्यात आला. इंग्रजी साहित्याचा अभ्यासक असलेल्या देवला ही कादंबरी भावली. ती रूपेरी पडद्यावर आणायची हे त्याचं स्वप्न होतं. ‘गाइड’च्या निर्मितीच्या अनेक कथा, दंतकथा प्रचलित आहेत. यातील ‘रोझी’ची भूमिका वहिदा रेहमानच करणार, यावर देव ठाम होता. दिग्दर्शन आधी चेतन आनंद करणार होता, मात्र त्यानं नायिकेच्या भूमिकेसाठी प्रिया राजवंश (त्याची प्रेयसी) असावी, असा हट्ट धरला. त्याबरोबर देवनं चेतन आनंदचाच पत्ता कट केला. त्यानंतर त्याने राज खोसला यांना विचारलं. मात्र, राज खोसला आणि वहिदा रेहमान यांचं फार बरं नव्हतं. त्यामुळं त्यांनीही नायिकेबाबत नाराजी व्यक्त केली, असं सांगतात. अखेर वहिदानंही ‘मी या प्रोजेक्टमधून बाजूला होते, तुमच्या दिग्दर्शकाला मी चालणार नाही,’ असं सांगून पाहिलं. मात्र, देव वहिदालाच ती भूमिका देण्यावर ठाम होता. त्यामुळं राज खोसलाही गेले आणि तिथं मग विजय आनंद आला. विजय आनंद ऊर्फ ‘गोल्डी’नं ‘गाइड’चं सोनं केलं. पुढचा सगळा इतिहास आहे. राजू गाइड ही भूमिका देव आनंदच्या कारकिर्दीतील अजरामर भूमिका ठरली. या चित्रपटापूर्वी नृत्यनिपुण वहिदाला तिची नृत्यकला दाखविण्याची संधी देणाऱ्या फारशा भूमिका मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे तिनं देवला अशी अट घातली होती म्हणे, की माझं एकही नृत्य कापायचं नाही; तरच मी ही भूमिका करीन. देवनं अर्थातच ही अट मान्य केली आणि वहिदाचं नृत्यनैपुण्य सर्वांसमोर आलं. देवला हा चित्रपट हिंदीसोबतच इंग्लिशमध्येही तयार करायचा होता. त्यासाठी त्यानं हॉलिवूड प्रॉडक्शनसोबत काम केलं. नोबेल पारितोषिक विजेत्या प्रख्यात लेखिका पर्ल बक यांना त्याने इंग्लिश चित्रपटासाठी लेखन करायला सांगितलं होतं. खुद्द आर. के. नारायण यांना ‘गाइड’ चित्रपट फारसा भावला नव्हता, असं म्हणतात. ते काही का असेना, भारतीय प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला, यात शंका नाही. मुळात ‘गाइड’मधील राजू आणि रोझीचं प्रेम त्या काळाच्या पुढचं होतं. असा काळाच्या पुढचा चित्रपट काढण्याचं आणि (भारतीय जनमानसाची नाडी ओळखून) त्यातल्या प्रेमाला वासनेचा स्पर्श होऊ न देता ते उदात्त वाटेल याची काळजी घेण्याचं काम देव व विजय आनंद या बंधूंनी यशस्वीपणे केलं, हे निश्चित.
विजय आनंदनेच दिग्दर्शित केलेला ‘ज्वेल थीफ’ हा पुढचा क्राइम थ्रिलरदेखील जोरदार हिट झाला. यात देवची नायिका नृत्यनिपुण वैजयंतीमाला होती. यातलं ‘होठों पे ऐसी बात’ हे गाणं आजही गणेशोत्सवातलं रोषणाईसाठीचं लाडकं गाणं आहे. यानंतर देव व विजय आनंद यांनी ‘जॉनी मेरा नाम’च्या (१९७०) रूपाने आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. या वेळी देवचं वय होतं ४७, तर त्याच्याहून तब्बल २५ वर्षांनी लहान असलेली, २२ वर्षीय हेमामालिनी त्याची नायिका होती. या सिनेमाला मिळालेल्या तुडुंब यशामुळं हेमामालिनी मोठी स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली.

दिग्दर्शनात पदार्पण

साठचं दशक अशा रीतीनं देवला त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर घेऊन गेलं. आता देवला स्वत:ला चित्रपट दिग्दर्शित करण्याची इच्छा निर्माण झाली. ‘प्रेमपुजारी’द्वारे देव दिग्दर्शनातही उतरला. जहिदा या अभिनेत्रीचं या चित्रपटाद्वारे पदार्पण झालं होतं. दुसरी नायिका अर्थात वहिदा रेहमान होती. मात्र, हा सिनेमा फ्लॉप ठरला. देवला दिग्दर्शक म्हणून खरं यश मिळवून दिलं ते ‘हरे रामा हरे कृष्णा’ (१९७१) या चित्रपटाने. हिप्पी संस्कृतीवर आधारित या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण नेपाळमध्ये झालं होतं. या चित्रपटाद्वारे देव आनंदनं झीनत अमानला रूपेरी पडद्यावर झळकवलं. झीनत रातोरात सुपरस्टार झाली. यातलं आशा भोसलेंनी गायलेलं ‘दम मारो दम’ हे गाणंही तुफान गाजलं. या चित्रपटादरम्यान देव आनंद कोवळ्या, पण मादक अशा झीनतच्या प्रेमात पडला होता. त्याबाबत तेव्हाच्या फिल्मी मासिकांतून भरपूर गॉसिप प्रसिद्ध व्हायचं. पुढं राज कपूरच्या पार्टीत देवनं झीनतला पाहिलं आणि नंतर त्यानं तिचा विषय डोक्यातून काढून टाकला, असं सांगतात. राज कपूरनं नंतर तिला ‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये झळकवलं, हे सर्वविदीत आहे.
याच काळात राज कपूर आणि दिलीपकुमार हे देवचे दोन्ही सुपरस्टार सहकलाकार नायक म्हणून काहीसे उतरणीला लागले होते. देव आनंदचेही ‘सोलो हिरो’ म्हणून काही चित्रपट फ्लॉप झाले. मात्र, तो तरीही त्याच्याहून वयाने कमी असलेल्या शर्मिला टागोर, योगिता बाली, राखी, परवीन बाबी आदी नायिकांसोबत काम करत राहिला आणि त्यातले काही सिनेमे चाललेही! विशेषत: १९७८ मध्ये आलेला ‘देस-परदेस’ जोरदार चालला. या वेळी देवचं वय होतं फक्त ५५ आणि त्याची नायिका होती अवघ्या २१ वर्षांची टीना मुनीम!
याच वेळी देशात आणीबाणीचा काळ होता. तेव्हा देवनं उघडपणे आणीबाणीच्या विरोधात भूमिका घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यानं प्रचार केला होता. नंतर त्याने चक्क ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ नावाचा राजकीय पक्षही स्थापन केला होता. तो कालांतरानं अर्थातच त्यानं गुंडाळून टाकला. देव आनंद हा माणूस असाच होता. मनस्वी!
‘देस-परदेस’च्या यशानंतरच तेव्हाच्या माध्यमांनी देवला ‘एव्हरग्रीन’ हे बिरुद दिलं. या सिनेमाच्या यशामुळं बासू चटर्जींनी त्याला ‘मनपसंद’मध्ये भूमिका दिली. (‘सुमन सुधा’ हे लता मंगेशकर यांच्या आवाजातलं सुंदर गाणं याच चित्रपटातलं!) याच यशाच्या लाटेवर त्याचे पुढचे दोन चित्रपट ‘लूटमार’ आणि ‘स्वामीदादा’ (१९८२) हेही हिट ठरले.
याच काळात देवनं त्याचा मुलगा सुनील आनंद याला नायक म्हणून घेऊन, ‘आनंद और आनंद’ हा ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ या लोकप्रिय हॉलिवूड सिनेमावर आधारित चित्रपट काढला. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर असा काही कोसळला, की सुनील आनंदनं त्यानंतर चित्रपटात कधीही काम न करण्याचा सुज्ञ निर्णय घेतला.
देव आनंदनं आता साठी ओलांडली होती. तरीही त्याचे ‘हम नौजवान’ आणि ‘लष्कर’सारखे चित्रपट चांगले चालले. विशेषत: ‘लष्कर’मधल्या (१९८९) प्रोफेसर आनंद या त्याच्या भूमिकेचं समीक्षकांनीही कौतुक केलं होतं. यानंतर नव्वदच्या दशकात त्यानं ‘प्यार का तराना’, ‘गँगस्टर’, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’, ‘अमन के फरिश्ते’, ‘सौ करोड’, ‘सेन्सॉर’ आदी अनेक चित्रपट काढले, पण ते सगळे फ्लॉप ठरले. दिग्दर्शक देव आनंदचा अवतार कधीच समाप्त झाला होता. कायम होता तो देव आनंदचा उत्साह!
असं म्हणतात, की देव आनंदचं ऑफिस अतिशय साधंसुधं होतं. त्याचं स्वत:चं राहणीमान मात्र स्टायलिश होतं. तो ब्रिटिश पद्धतीचे शिष्टाचार पाळणारा ‘सभ्य गृहस्थ’ होता. त्याच्या सहनायिका त्याच्याविषयी नेहमी आदरयुक्त प्रेमानं बोलायच्या. देवच्या सहवासात आम्हाला एकदम निर्धास्त, ‘कम्फर्टेबल’ वाटायचं असं त्या म्हणायच्या. देव आनंदनं आपल्या वागण्या-बोलण्यातली ही आदब, ही ‘ग्रेस’ कायम जपली. देव आनंद हा हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला ‘फॅशन आयकॉन’ होता. त्याचे स्कार्फ, मफलर, जर्किन; एवढंच काय, त्याची सिगारेट हीदेखील फॅशन म्हणून प्रचलित व्हायची. त्याच्यासारखा केसाचा कोंबडा काढून फिरण्याची तेव्हाच्या तरुणाईत क्रेझ असे. 

त्याला मुंबईविषयी अतोनात प्रेम होतं. मुंबई शहर कालांतराने बकाल होत गेलं. ती अवस्था बघून देव कायम व्यथित व्हायचा. त्यानं १९५० च्या दशकातील ब्रिटिशांच्या प्रभावाखालची आखीव-रेखीव, कमी गर्दीची, टुमदार इमारतींची, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली, उच्च अभिरुची जपणारी, उत्तमोत्तम स्टुडिओ असणारी, भारतात दुर्मीळ असलेलं ‘वर्क कल्चर’ असलेली मुंबई अनुभवली होती. नंतर नंतर तो बरेचदा परदेशातच असायचा. विशेषत: लंडनमध्ये. त्यानं अखेरचा श्वास घेतला तोही लंडनमध्येच - ३ डिसेंबर २०११ रोजी.
देव आनंद नावाची रसिली, रम्य, रोचक कथा आता ‘दंतकथा’ म्हणूनच उरली आहे. बघता बघता त्याला जाऊन आता १२ वर्षं होत आली. मात्र, मन तरी असंच म्हणतंय, की देव आनंदचं शरीर फक्त गेलं... पण यक्ष कधी मरतात का?

----

(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक, २०२३)

---


No comments:

Post a Comment