2 Feb 2026

मटा पुणे दिवाळी अंक २५ - कथा

रघू अन् रायगडचा थरार
-----------------------------

यंदाच्या दिवाळीत ताडोबा अभयारण्यात जायचं, म्हणून रघू खूश होता. खरं तर त्याच्या शाळेचीच सहल जाणार होती. मात्र, नंतर ती बदलून रायगडावर नेण्याचं ठरलं. रघूला रायगडलाही जायचं होतं आणि ताडोब्यालाही! मात्र, रघूच्या वडिलांनी शाळेच्या सहलीतून रायगडला जा, असं सांगितलं. ताडोबा अभयारण्याला पुढच्या वर्षी नक्की जाऊ, म्हणून रघूच्या बाबांनी त्याची समजूत काढली. त्या दिवशी रघू ताडोब्यातील वाघांची स्वप्नं रंगवतच झोपी गेला... मात्र, स्वप्नात कधी इंटरव्हल झाला ते रघूला कळलंच नाही. न बघितलेल्या ताडोबाची फिल्म जरा जरा ब्लर होत फेड आउट झाली आणि एकदम सह्याद्रीचा एक उंच डोंगर तिथं हळूहळू प्रकट होऊ लागला... आधी निळं आकाश, मग जमीन, त्यावर हिरवेगार डोंगर... ती माची... आणि एकदम त्याला दिसला तो - रायगड. हो, राजांचा गड... हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड. दुर्गांचा दुर्ग, उत्तुंग, बेलाग असा रायगड... रघू एकदम जागा झाला... त्याला नुकतीच झालेली ती सहल आता पुन्हा आठवू लागली...
...त्यांची रायगडची सहल अगदी थरारक झाली होती. रघू पहिल्यांदाच रायगडला गेला होता. त्याला व त्याच्या ग्रुपला खरं तर पायऱ्या चढून गडावर जायचं होतं. मात्र, देशमुख सरांनी डोळे वटारल्यावर सगळी मुलं गप्पच बसली. अर्थात रोप-वेनं जाण्याचा थरारही मस्तच होता. विशेषत: अगदी शेवटी दहा-वीस मीटर अंतर राहिलं असताना ती छोटीशी ट्रॉली आता समोरच्या कातळाला धडकतेच की काय, असं वाटून रघूच्या छातीत धस्स झालं होतं. मात्र, एकदम एक झोका बसला आणि ती ट्रॉली एकदम झुमकन वरच्या डेकवर पोचली होती. सगळा गड हिंडून बघताना रघूला फारच भारी वाटलं होतं. त्याला चौथीत, म्हणजे आधीच्याच वर्षी इतिहासाला ‘शिवछत्रपती’ हेच पुस्तक होतं. त्या पुस्तकावरचं राजा रविवर्मांनी काढलेलं महाराजांचं चित्र रघू कितीदा तरी निरखून पाही. महाराजांकडं नुसतं बघितलं, की रघूला एकदम वेगळं असं, काही तरी ग्रेट वाटत असे. त्याच्या हडकुळ्या दंडात एकदम हत्तीचं बळ आलंय की काय, असं वाटे. हे असं आपल्यालाच होतं, की बाकी मित्रांनाही होतं हे त्याला कळत नव्हतं. एकदा धीर करून त्यानं त्याचा खास मित्र सदूला विचारलं होतं. सदूलाही तसंच होतं, हे कळल्यावर रघूला हुश्श झालं होतं. रायगडावर दिवस कसा गेला, ते कळलंच नव्हतं. महाराजांच्या सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याकडं बघून रघूचा आख्खा वर्ग थक्क झाला होता. नंतर सर्वांनी ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी तो परिसर दणाणून सोडला होता. आजूबाजूला आलेले इतर पर्यटकही या पोरांकडं कौतुकानं बघत होते. पुढं होळीच्या माळावर, बाजारपेठेत, गंगासागर तलावावर, जगदीश्वर मंदिरात... सगळीकडं मुलांचा हा जयघोष कायम राहिला. सगळ्यांना आता टकमक टोक बघायची उत्सुकता लागली होती. बरीच मजल, दरमजल करत मुलं तिथं पोचली, तेव्हा त्या टोकावरून महाराष्ट्राच्या सह्याद्रीचं ते भव्य दर्शन बघून सगळ्यांचेच डोळे तृप्त झाले. किती फोटो काढावेत अन् किती नाही, असं मुलांना होऊन गेलं. रघूनं त्याच्या बाबांचा खास कॅमेरा आणला होता. त्यातून तो भराभर फोटो काढत होता. फोटो काढण्यात तो एवढा गुंगून गेला, की शेवटी त्याच्या मित्रानं - सदूनं त्याला ढोसून हलवलं आणि त्या तंद्रीतून जागं केलं. बाकीची मुलं जरा पुढं निघाली होती. देशमुख सरांनी लांबूनच हाक मारली. हे दोघं दिसताच तेही जरा निवांत झाले आणि पुढं चालू लागले.


‘आपण इथं हरवलो तर...’ सदू एकदम म्हणाला.
त्यावर रघू एक क्षण दचकला, पण नंतर त्याला हसू आलं. त्यानं सभोवती पाहिलं. दुपारचे अडीच-तीन वाजले होते. गडावर ऊन होतं, पण गार वारंही सुटलं होतं. त्यामुळं एकूण छान वाटत होतं. मुळात ही महाराजांची राजधानी, त्यामुळं इथं कसलं भय वाटतच नाहीय, असं त्याला एकदम लक्षात आलं. मगाशी सरांनी हिरकणीची कथाही सांगितली होती. ती कथा खरी आहे, की दंतकथा आहे हा वाद सोडून द्या; त्या गोष्टीतलं मर्म लक्षात घ्या, असंही सरांनी सांगितलं होतं.
‘सदू, एक तर सर दर तासाने सर्व मुलांचा काउंट घेतात. शिवाय आपल्याला घेतल्याशिवाय ते कसे परत जातील? शिवाय आपल्याकडं हे बटणाचे का होईना, मोबाइल आहेत, त्यामुळं आपण इथं हरवण्याची शक्यता मुळीच नाही. कळलं का?’ रघू सदूकडं पाहत हसत म्हणाला. त्यावर सदू जरासा खट्टूच झाल्यासारखा वाटला. जणू काही, इथं आपण हरवायला हवं, असंच त्याला वाटत होतं की काय, कोण जाणे!
रघू मात्र इतिहासात हरवला होता. राजांच्या काळातल्या एकेक गोष्टी त्याला आठवत होत्या. इतिहासाचं पुस्तक, पुण्यात नुकतीच पाहिलेली ‘शिवसृष्टी’, त्याच्या बाबांनी आणलेली इतर काही पुस्तकं, यूट्यूबवरची काही भाषणं असं सगळं ऐकून रघूला महाराजांच्या एकूण कार्यकर्तृत्वाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं. त्या इतिहासातल्या सगळ्याच गोष्टी त्याला कळल्या होत्या, असं नव्हे. मात्र, इतिहास शिकवायला देशमुख सरांसारखे फार चांगले शिक्षक लाभल्यामुळं त्याला पुस्तकापलीकडल्या बऱ्याच गोष्टीही समजत होत्या. शिवरायांकडून घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजांचं प्रसंगावधान, हे रघूच्या मनावर फार बिंबलं होतं. अनेक संकटांवर मात करण्याची ताकद महाराजांना त्यांच्या या प्रसंगावधानानं व अष्टौप्रहर जागृत असण्याच्या वृत्तीनंच दिली होती, यात शंका नाही असंच रघूला मनोमन वाटत होतं.
आता गड उतरायची वेळ झाली होती. रोप-वे संध्याकाळी विशिष्ट वेळी बंद होत असल्यानं सर सर्वांना लवकर निघायची घाई करत होते. गडावरून खाली उतरणारी शेवटची टीम रघूच्या शाळेची होती. रघूला उतरायची घाई नव्हती. त्याला गडावर जास्तीत जास्त काळ थांबायचं होतं. त्यामुळं तो व सदू रांगेत सर्वांत मागे थांबले. आठ-आठच्या तुकडीनं मुलं दोन्ही पाळण्यांत बसून खाली जात होती. देशमुख सरांना पुढील व्यवस्था करायची होती, म्हणून ते दुसऱ्या की तिसऱ्या बॅचबरोबरच खाली उतरले. शेवटच्या तुकडीत आणि शेवटच्या पाळण्यात फक्त रघू व सदू उरले. त्यामुळं त्यात त्या दोघांनाच बसवण्यात आलं. अगदी थोडं पुढं असलेल्या दुसऱ्या पाळण्यात शाळेतली इतर सात-आठ मुलं बसली होती. रोप-वेतून ते दोन्ही पाळणे आता हळूहळू खाली उतरू लागले. भन्नाट वारा वाहत होता. त्यामुळं ते पाळणे थोडेसे हलत होते. निम्म्या अंतरावर गेल्यावर ते पाळणे अचानक थांबले. थोडा वेळ मुलं तशीच स्वस्थ बसली. रोप-वे असा मधेच थांबणं नॉर्मल आहे का नाही, याची त्या मुलांना काही कल्पना नव्हती. रघू आजूबाजूला पाहत होता. मागे रायगडाचा भक्कम, बुलंद असा कठीण कडा आणि समोर लांबवर पसरलेले सह्याद्रीचे भव्यदिव्य डोंगर, लांबवर तळात दिसणारी रायगडवाडी आणि रोप-वेचं चिमुकलं बोर्डिंग स्टेशन आणि या सगळ्यांत मध्येच अंतराळात तरंगत असलेल्या त्या दोन ट्रॉल्या...
थोडा वेळ गेला... आणखी थोडा वेळ गेला... दोन्ही पाळणे तसेच हवेत स्थिर लटकत होते आणि त्यात ही नऊ-दहा लहान मुलं! आता मात्र सदूला थोडी भीती वाटू लागली. पाळणा हळूहळू खाली जाताना सभोवती पाहताना काही वाटत नव्हतं. मात्र, आता त्या एका जागी स्थिर थांबलेल्या पाळण्यातून खाली नजर जरी तरी गरगरून चक्कर येईल, असं वाटू लागलं. मुलांकडं त्यांच्या सॅक होत्या. मात्र, सगळा खाऊ गडावरच संपला होता. खाली उतरलं, की मुलांना थोड्या वेळात लगेच जेवायचंच होतं. रघूच्या सॅकमध्ये अगदी दोन बिस्किटं आणि थोडं पाणी उरलं होतं. रघूनं ते बघून घेतलं. ‘सदू, तुला पाणी हवंय का?’ रघूनं काळजीनं विचारलं. सदू पटकन ‘हो’ म्हणाला आणि त्यानं ते उरलंसुरलं पाणीही पिऊन टाकलं. आता त्यांच्याकडं पाणी नव्हतं. किती वेळ गेलाय हे कळत नव्हतं. मुलांकडं घड्याळं होती, बटणाचा मोबाइलही होता. मात्र, तो काढून बघण्याचं कुणाला सुचेल तर ना! आधी सुरू असलेला दंगा एकदम गप्प झाला होता. आता काही काही मुलांना रडू येण्याच्या बेतात होतं. रघूला भीती वाटत नव्हती, मात्र थोडी काळजी वाटू लागली होती. ‘आपण महाराजांच्या गडावर आहोत, आपल्याला काही होणार नाही,’ असं त्याला मनोमन वाटत होतं. मगाशी गडावर सांगितल्या गेलेल्या महाराजांच्या एकेक गोष्टी, त्यांचं प्रसंगावधान तो आठवू लागला. त्याला एकदम आठवलं, की आपल्याकडं मोबाइल आहे. त्यानं पटकन खिशातून मोबाइल काढला आणि तो देशमुख सरांना फोन करू लागला. पण... अरे देवा! तिथं मोबाइलला रेंजच नव्हती. खूप वेळ प्रयत्न करूनही फोन लागेना. शिवाय त्याची बॅटरीही संपत चालली होती. आता काय करावं? खालच्या ट्रॉलीत कुणाकडं मोबाइल आहे का, हे विचारावं म्हणून तो मागं वळला आणि त्यानं जरा ओरडून विचारलं, ‘ए राजा, दिन्या, पार्थ... कुणाकडं मोबाइल आहे का रे?’ मात्र, तिथं वारा एवढा जोरात वाहत होता, की खाली काहीच ऐकू जाईना. शिवाय रघू अचानक उठून मागं वळल्यानं त्यांची ट्रॉली एकदम हलली आणि जोरदार हलायला लागली. ते बघून सदूनं दोन्ही दांड्यांना हात घट्ट धरले आणि तो रडायलाच लागला. ते बघून रघूही थोडा घाबरला; पण क्षणभरच! नंतर लगेच सावरून त्यानं पुढचा विचार करायला सुरुवात केली. प्रसंगावधान, प्रसंगावधान... त्याच्या डोक्यात तेच शब्द घुमत होते. त्यानं सॅकमध्ये हात घातला. त्याच्या हातात एक टिश्यू पेपर लागला. त्याच्याकडं पेन होतंच. मग त्यानं त्या टिश्यू पेपरवर ‘तुमच्यापैकी कुणाकडे मोबाइल आहे का?’  असं लिहून तो कागद बोळा करून, खालच्या ट्रॉलीत फेकायचा प्रयत्न केला. पण वारा एवढा जोरात होता, की तो बोळा कुठल्या कुठं भिरकावला गेला. रघूला आता अगदी हताश वाटलं. खरं तर खालच्या ट्रॉलीतील मुलांनी स्वत: डोकं चालवून सरांना फोन लावला असेलच की... मग ती पोरं काहीच बोलत नाहीयेत... नुसतीच घाबरली आहेत... आता काय करावं... रघूच्या मनात विचारचक्र सुरू झालं. त्यानं सॅकमध्ये पुन्हा हात घातला. त्याला लहान चेंडूसारखं काही तरी लागलं. बघतो तर काय, बेसनाचा लाडू! त्याच्या आईनं डब्यात दिलेला. रघूला अतिशय आनंद झाला... त्यानं पुन्हा एक टिश्यू पेपर घेतला, त्यावर वरचा मेसेज पुन्हा लिहिला आणि त्यात लाडू ठेवून तो अगदी अलगद खालच्या ट्रॉलीत फेकला... सदैवानं वारा जरा पडला होता. त्यामुळं तो लाडू व ती चिठ्ठी अगदी नेमकी खालच्या ट्रॉलीत पडली. मुलांनी ती उचलून वाचली. त्यातल्या राजानं मोठमोठ्यानं हातवारे करून काही तरी सांगायला सुरुवात केली. मात्र, परत जोरात वाहायला लागलेल्या वाऱ्यामुळं काहीच ऐकू येईना. शेवटी हातवारे करून राजानं काही तरी सांगितलं. ते बघून रघूला एवढंच समजलं, की त्यांनी सरांना लगेचच फोन केला होता. पण सरांचं बोलणं यांना ऐकूच आलं नाही. मात्र, सरांना ही मुलं अडकून पडल्याचं अर्थातच माहिती होतं. आता हे ऐकून रघूला काय करावं ते सुचेना. त्यानं सरळ ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. सदूनं रडणं थांबवून त्याच्या आवाजात आवाज मिसळला. ती गर्जना मात्र खालच्या मुलांना ऐकू गेली आणि त्यांनीही तशाच घोषणा द्यायला सुरुवात केली. तिसऱ्या घोषणेनंतर ट्रॉली एकदम हलली. मुलं परत घाबरली... त्यांनी समोरचा दांडा घट्ट धरला. मात्र, काही सेकंदांतच त्यांना कळलं, की ट्रॉली खाली खाली जाऊ लागलीय... मुलांना एकदम आनंद झाला. त्यांनी आणखी मोठ्या आवाजात घोषणा द्यायला सुरुवात केली. अवघ्या पाच ते सात मिनिटांत मुलं खालच्या बोर्डिंग स्टेशनला पोचलीसुद्धा. खाली गेल्यावर समोरच उभ्या असलेल्या देशमुख सरांनी सर्व मुलांना जवळ घेतलं. सरही रडवेले झाले होते. सदूसह काही काही मुलं तर रडायलाच लागली होती. रघूला मात्र प्रश्न पडला होता, की ट्रॉली मध्येच का थांबली? त्यानं लगेच सरांकडं धाव घेऊन त्यांना तसं विचारलंही. त्यावर सर म्हणाले, की हा रोप-वे अतिशय सुरक्षित आहे. तो एरवी कधीही बंद पडत नाही किंवा कधी काही तांत्रिक अडचण आली, तर अगदी पाच मिनिटांत तो पुन्हा सुरू होतो. आताही तो पाच ते दहा मिनिटांत परत सुरू झाला...
रघूला हे ऐकून आश्चर्य वाटलं. म्हणजे? आपण केवळ दहा मिनिटं अडकून पडलो होतो? आणि तरीही आपल्याला ते असं मधेच हवेत लटकल्यावर किती काय काय वाटून गेलं! सगळ्यांना किती भीती वाटली!
आणि महाराज... त्यांच्या आयुष्यात तर एकाहून एक जीवावरची संकटं आली. मात्र, त्यांनी कधीही हार मानली नाही किंवा त्यांना कधीही कसली भीती वाटली नाही. प्रसंगावधान आणि कूटनीतीमुळं ते सर्व संकटांतून बाहेर पडले. मग ती आग्र्याहून सुटका असो किंवा पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटणं असो. हे आठवून रघूचं मन भरून आलं. त्यानं पुन्हा एकदा रायगडाच्या त्या भव्य विस्ताराकडं पाहिलं आणि मनोमन हात जोडले.
खालच्या ट्रॉलीतले मित्र भेटले आणि त्यांची थट्टामस्करी सुरू झाली. दिन्या एकदम म्हणाला, ‘रघू, थँक्यू रे... बेसनाचा लाडू फार छान होता...’ सगळे हसले. देशमुख सरही हसून म्हणाले, ‘अहो अंतराळवीर, चला... बस वाट बघतेय आणि तिकडं पुण्यातही आपलं घर आपली वाट बघतंय... चला...’
रघू आणि सदू बसमध्ये बसले. बस भन्नाट वेगात पुण्याकडं निघाली. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळं रघूला झोप लागली. झोपेत त्याला पुन्हा स्वप्न पडलं. स्वप्नात तो ताडोबा अभयारण्यात पोचला होता... एका पाणवठ्यावर तो उभा होता. आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्यानं सहज मागं पाहिलं तर दहा फूट अंतरावर झाडाच्या खोडाआडून एक भलामोठा वाघ - हा बहुतेक ‘छोटा मटका’ होता - त्याच्याकडंच रोखून बघत होता... आता? रघू काय करणार?
‘प्रसंगावधान, प्रसंगावधान...’ रघू किंचाळत ओरडत उठला. सदू त्याच्याकडं आश्चर्यानं बघत होता. ‘काय झालं रे?’ त्यानं काळजीनं विचारलं.
रघूनं आजूबाजूला पाहिलं. तो बसमध्येच होता. वाघबिघ कुणी नव्हतं. आता बाहेर अंधार पडला होता... रायगड किल्ला मागे पडला होता आणि रघू मनातल्या मनात हसत होता... म्हणत होता, ‘महाराज, तु्म्ही असेच सतत मनात राहायला येत जा...’

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे दिवाळी अंक २०२५)

----

No comments:

Post a Comment