23 Nov 2025

रूपेरी पडद्याचे मानकरी – लता मंगेशकर

रूपेरी पडद्याचे मानकरी - लता मंगेशकर
-------------------------------------------------

(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी पडद्याचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी लता मंगेशकर यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)


श्रोते हो, नमस्कार!
पहाटेची वेळ असते... आपण कुठं तरी निसर्गाच्या कुशीत... टेकडीवर... सूर्योदय होतोय... पूर्व दिशा केशरिया रंगानं उजळलीय... अन् आपण एक गाणं सुरू करतो... इअरफोनमधून 'लेकिन'मधल्या 'सुनियो जी...' गाण्यापूर्वीची ती जोरदार तान कर्णपटलातून थेट शरीरातल्या प्रत्येक पेशीपेशीत घुसते... ती ऐकता ऐकताच डोळे घळघळा वाहू लागतात... काही तरी प्रचंड दैवी अनुभूती येते... मन भरून येतं... एकदम पवित्र, सुंदर भावनेनं आपण गद्ग गद् होतो... हे लताचं गाणं...! कित्येकदा ऐकलं, तरी हीच अनुभूती कायम देणारं... काय असेल ही लता मंगेशकर नावाची जादू? काही नावं उच्चारली, की मनात एकदम पवित्र, निर्मळ भाव उमटतात. चेहऱ्यावर हसू उमलतं. लता मंगेशकर हे सात अक्षरी नावही असंच. सप्तसूरच जणू... या नावानं आपल्या जगण्याला अर्थ दिला. आपल्या अस्तित्वाला सार्थकतेचा सूर दिला. आपल्या विरूप, क्षुद्र, क्षुल्लक आयुष्याचा गाभारा स्वरओंकाराच्या निनादानं भारून टाकला...
लता मंगेशकर या नावाच्या ख्यातनाम गायिकेविषयी बोलताना अशा अनेक विशेषणांची खैरात करता येईल. तरीही जे सांगायचंय ते पूर्णांशानं सांगता येईलच असं नाही. कारण सर्वोत्तमालाही व्यापून दशांगुळे उरलेली ही लता नावाची जिवंत दंतकथा आहे. अवकाशाच्या भव्यतेचं वर्णन करता येत नाही, महासागराच्या अथांगतेला लिटरचं माप लावून चालत नाही, सूर्याचं तेज थर्मामीटरनं मोजता येत नाही, तसंच लताच्या गाण्याला कशानं मोजता येत नाही. ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे.
लता मंगेशकर नावाच्या या सात अक्षरी दंतकथेचा जन्म झाला २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर शहरात. ख्यातनाम गायक, नाट्यकर्मी, अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शुद्धमती उर्फ माई मंगेशकर या दाम्पत्याचं लता हे सर्वांत मोठं अपत्य. त्यानंतर मीना, आशा, उषा व हृदयनाथ ही भावंडं. या पाचही भावंडांनी भारताच्या संगीत अवकाशात स्वत:चं नक्षत्रांसारखं स्थान निर्माण केलं. त्यातही लता मंगेशकरांचं स्थान म्हणजे अढळ ध्रुवताऱ्यासारखं. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा १९४२ मध्ये पुण्यात मृत्यू झाल्यावर वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी लतावर सर्व मंगेशकर कुटुंबाची जबाबदारी आली. ती तिनं समर्थपणे पेलली. एवढंच नव्हे, तर देवदत्त प्रतिभा आणि स्वत: केलेले अपार कष्ट या जोरावर केवळ भारतातील नव्हे, तर जगातील संगीत क्षेत्रातील विख्यात गायिका म्हणून नावलौकिक मिळवला.
लताचं पाळण्यातलं नाव 'हृदया' असं होतं. मंगेशकर कुटुंबीय मूळचं गोव्यातलं. त्यांचं मूळ आडनाव नवाथे. तिथल्या मंगेशी देवस्थानाचे पुजारी म्हणून दीनानाथांचे पूर्वज काम करत असत. त्यामुळं नंतर त्यांनी मंगेशकर हे आडनाव घेतलं. ज्येष्ठ गायक जितेंद्र अभिषेकी हे लतादीदींचे मावसभाऊ. दीनानाथ मंगेशकर सांगलीत मुक्कामी असताना तिथल्या सरकारी शाळेत लताला दाखल करण्यात आलं. मात्र, एकदा लहानगी आशा रडत असल्यामुळे एक शिक्षक लताला खूप रागावले. याचा लताला अतिशय राग आला. ती आशाला घेऊन घरी आली आणि त्यानंतर शाळेत परत कधीही गेली नाही. नंतर दीनानाथांनी एक शिक्षक घरी शिकवण्यासाठी ठेवले. मात्र, औपचारिक शिक्षण असं फारसं झालंच नाही. लताचा संगीताचा कान मात्र तयार होता. तिला ती वडिलांकडून देणगीच मिळाली होती. एकदा दीनानाथ त्यांच्या एका शिष्याला एक चीज शिकवत होते. तो शिष्य ती चीज गात होता. दीनानाथ तेवढ्यात आतल्या खोलीत गेले. तेव्हा अवघ्या पाच वर्षांच्या लतानं त्या शिष्याला ‘तू चुकीचं गातो आहेस,’ असं सांगितलं आणि ती चीज स्वत: गाऊन दाखवली. तेवढ्यात तिथं आलेल्या दीनानाथांनी लताचं लक्ष नसताना तिला गाताना ऐकलं. त्या क्षणी त्यांना साक्षात्कार झाला, की आपल्या पोटी एका दैवी कलावंताचा जन्म झाला आहे. त्यांनी मग लताला गाणं शिकवायला सुरुवात केली. दीनानाथांची तेव्हा बलवंत नाटक कंपनी होती. ही कंपनी गावोगावी नाटकाचे प्रयोग करत हिंडत असे. एकदा एक कलाकार आला नव्हता, म्हणून लतानं अतिशय लहान वयात त्याची रिप्लेसमेंट म्हणून ऐन वेळी काम केलं. एवढंच नव्हे, तर अनेक वन्समोअरही मिळवले.
मास्टर दीनानाथ गेले, तेव्हा मंगेशकर कुटुंबाचे स्नेही आणि नातेवाइक, नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी मंगेशकर परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून पहिलं काम मिळवून दिलं. लतानं वसंत जोगळेकरांच्या ‘किती हसाल?’ या १९४२ मध्ये आलेल्या मराठी चित्रपटासाठी ‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी’ हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेलं गाणं गायलं, पण हे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. मास्टर विनायकांनी लताला नवयुग पिक्चर्सच्या ‘पहिली मंगळागौर’ या १९४२ मधल्याच मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. या चित्रपटात लतानं ‘नटली चैत्राची नवलाई…’ हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेलं गाणं म्हटलं. नंतर १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनीचं मुंबईला स्थलांतर झालं, तेव्हा लतादीदीही कुटुंबासमवेत मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ भेंडीबाजारवाले यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्याच ‘आप की सेवा में’ या १९४६ मध्ये आलेल्या हिंदी चित्रपटासाठी ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणं गायलं. दत्ता डावजेकरांनी त्या गाण्याला संगीत दिलं होतं. लता आणि आशा यांनी मास्टर विनायकांच्या ‘बडी माँ’ या १९४५ मध्ये आलेल्या पहिल्या हिंदी चित्रपटातही नूरजहाँसोबत छोट्या भूमिका केल्या होत्या. त्या चित्रपटात लतानं ‘माता तेरे चरणों में’ हे भजन गायलं होतं. मास्टर विनायकांच्या ‘सुभद्रा’ या १९४६ मधल्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लतादीदींची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.
पुढच्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण फाळणीही झाली आणि उस्ताद अमानत अली खाँ भेंडीबाजारवाले नवनिर्मित पाकिस्तानमध्ये गेले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ देवासवाले यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लतादीदींना तालीम मिळाली.
दरम्यान, मास्टर विनायक यांचा १९४८ मध्ये मृत्यू झाला. त्यामुळं लतादीदी आणि कुटुंबाचा मोठाच आधार हरपला. मात्र, आता त्या मुंबईत स्थिरस्थावर होऊ लागल्या होत्या. ज्येष्ठ संगीतकार गुलाम हैदर यानी लताला पुष्कळ मार्गदर्शन केलं. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई अंबालेवाली अशांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. त्यामानानं लताचा आवाज अतिशय कोवळा, नाजूक, पण गोड होता. १९४८ मध्ये ग़ुलाम हैदरांनी लताची ओळख तेव्हा ‘शहीद’ या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी करून दिली; पण मुखर्जींनी लताचा आवाज ‘अतिशय बारीक’ म्हणून नाकारला. तेव्हा गुलाम हैदर थोड्याशा रागात उत्तरले होते - येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदर यांनीच लतादीदींना त्यांच्या ‘मजबूर’ या १९४८ या वर्षी आलेल्या चित्रपटात ‘दिल मेरा तोडा…’ हे गाणं म्हणण्याची मोठी संधी दिली.
सुरुवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हा लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचं अनुकरण करीत असे, पण नंतर लतानं स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली तयार केली. अवघ्या विशीच्या आसपास असलेल्या लताचा हा सर्वच संघर्ष अतिशय मोठा होता. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम धर्मीय असत, त्यामुळे गाण्यांमध्ये भरपूर उर्दू शब्द असत. एकदा प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांनी लताच्या हिंदी गाण्यातील मराठी वळणाच्या उच्चारांसाठी ‘इनके गाने से दालचावल की बदबू आती है’ असा तुच्छतादर्शक शेरा मारला. तेव्हा दुखावलेल्या लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले. त्यानंतर पुन्हा आयुष्यात ना तिच्या गाण्यात कधी उच्चार चुकले, ना कधी कुणाला असे शेरे मारण्याची संधी मिळाली.
१९४९ हे वर्ष लताच्या कारकिर्दीला महत्त्वाचं वळण देणारं वर्ष ठरलं. महल या लोकप्रिय चित्रपटातलं ‘आयेगा आनेवाला’ हे गाणं प्रचंड गाजलं. या गाण्याचे संगीतकार होते खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे मधुबालावर हे गाणं चित्रित झालं होतं. या गाण्यानं लताचा आवाज घराघरांत पोचला.
पुढं तब्बल सहा दशकं हा आवाज सतत आपल्यासोबत राहिला. लहानपणापासून ते मृत्यू येईपर्यंत जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर हा अक्षय लतास्वर आपल्याला साथ देत आलाय. तो ज्यांनी ज्यांनी प्रथम ऐकला, तेव्हाच सगळ्यांना जाणवलं, की हे नेहमीचं साधंसुधं गाणं नाहीय. हे त्यापलीकडं जाणारं काही तरी आहे. काळीज पिळवटून टाकणारी आर्तता त्यात आहे... काही तरी प्युअर, शुद्ध असं त्यात आहे... जे ऐकल्यावर हिंदीत ज्याला 'सुकून मिलना' म्हणतात, तसं काहीसं आपल्याला होतं. आत कुठं तरी शांत वाटतं, खूप आश्वासक वाटतं... अनेकदा अंतःकरण उचंबळून येतं, पोटात कुठं तरी हलतं, अंगावर रोमांच उभे राहतात... डोळे तर अनेकदा पाण्यानं भरतात. असं आपलं शरीर सतत या सूरांना दाद देत असतं. हा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. काय आहे हे? आपला या स्वराशी असा जैव संबंध कसा जोडला गेला? हीच लताच्या आवाजाची जादू आहे, हे निखालस...
दीदींच्या आवाजाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांचा आवाज ‘पिकोलो’ जातीचा होता. पिकोलो ही एक उंच स्वरात वाजणारी बासरी आहे. ध्वनिक्षेपकावर अचूक तीव्रतेने आदळणारा हा आवाज असतो. दादींचं श्वासावर कमालीचं नियंत्रण होतं. गाताना त्या श्वास कधी घेतात, हे कळतही नाही. त्यांचा आवाज अजिबात बेसूर होत नसे. ‘कंबख्त, ये कभी बेसुरी होतीही नहीं’ हे बडे गुलाम अली खाँसाहेब यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. ‘ये ज़िंदगी उसी की है’ हे गाणं ऐकताना त्यांनी हे उद्गार काढले होते. लतादीदींना मिळालेली ही मोठीच दाद म्हणावी लागेल. सुरुवातीच्या काळात अनिल विश्वास, खेमचंद प्रकाश, सज्जाद हुसेन, नौशाद, सी. रामचंद्र, मदनमोहन, एस. डी. बर्मन, हेमंतकुमार, सलील चौधरी आणि शंकर-जयकिशन या संगीतकारांनी लताकडून सर्वोत्तम गाणी म्हणवून घेतली. त्याच काळात मराठीत वसंत प्रभूंनी लताकडून उत्तमोत्तम भावगीतं गाऊन घेतली.
लता मंगेशकर यांच्यावर १९६२ मध्ये विषप्रयोग झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्या गाऊ शकतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आपल्या सर्वांच्या सुदैवानं सहा महिन्यांनंतर दीदी गाण्यासाठी उभ्या राहिल्या. ‘कहीं दीप जलें कहीं दिल…’ हे हेमंतकुमार यांनी संगीतबद्ध केलेलं ‘बीस साल बाद’ चित्रपटातलं गीत पहिल्यांदा त्यांनी गायलं.
१९५० ते १९७० ही दोन दशकं लतादीदींच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम दशकं होती, असं अनेक जाणकार मानतात. या काळात त्यांचा आवाज पक्व आणि अधिकाधिक मधुर होत गेला. गायला अतिशय अवघड अशी गाणी त्यांनी या काळात गायिली. लता होती म्हणूनच आम्ही अशी अवघड गाणी तयार करू शकलो, असं अनेक संगीतकार सांगत. ‘रुस्तुम सोहराब’ चित्रपटातलं ‘ऐ दिलरुबा…’ हे सज्जाद हुसेन यांचं गाणं दीदींनी एवढं कमाल गायलंय, की तसं इतर कुठलीही गायिका गाऊ शकली असती, असं वाटत नाही. ‘ये दिल तुमबिन कहीं लगता नहीं’ हे ‘इज्जत’ चित्रपटातलं गाणं ऐकताना त्यांचा आवाज धारदार सुरीसारखा भासतो. या काळात त्यांच्या आवाजातला लवचीकपणा परमोच्च स्थितीत होता. वेगवेगळ्या गायिकांसाठी त्या गात तेव्हा त्या गायिकेनंच ते गाणं गायलंय असं वाटे. ‘उनसे मिली नजर’ हे गाणं ऐकताना सायराबानूच डोळ्यांसमोर येते, तर ‘कांटो से खीच के आँचल’ ऐकताना वहिदाच डोळ्यांसमोर येते. ‘अभिनेत्री’मधलं ‘ओ घटा सांवरी’ ऐकताना अवखळ हेमाच नजरेसमोर येते. या गाण्यात त्यांनी जी थंडी वाजल्यानंतरची आवाजातली शिरशिरी आणली आहे, ती केवळ ऐकावी. लतादीदींच्या एकेका गाण्याचे असे किती तरी बारकावे सांगता येतील. अनेक संगीत तज्ज्ञांनी त्याचा अभ्यास केला आहे. त्यावर पीएचडी केली आहे. ‘ह’ हे एक अक्षर दीदी किती वेगवेगळ्या पद्धतीनं उच्चारतात, याचाही अभ्यास झाला आहे. त्या त्या गाण्याचा भाव, त्या त्या शब्दांचं वजन, अर्थ या सगळ्यांचा अगदी बारकाईनं विचार करून दीदी गात असत. त्यांनी गायिलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या गाण्याने तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं, एवढे ते त्यांनी आर्तपणे गायलं होतं. लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये दीदींनी १९७४ मध्ये संगीत रजनी सादर केली. त्या जगप्रसिद्ध ठिकाणी कार्यक्रम सादर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या.
लतादीदींनी पहिल्या टप्प्यात शंकर-जयकिशन या जोडीबरोबर भरपूर गाणी गायली. नंतरच्या काळात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दीदींकडून सर्वाधिक गाणी गाऊन घेतली. मात्र, त्यांच्याकडून काही अत्यंत खास गाणी गाऊन घेतली ती संगीतकार मदनमोहन यांनी. ‘अदालत’मधील ‘यूं हसरतों के दाग’ असेल, किंवा ‘दिल की राहें’मधलं ‘रस्म-ए-उलफत’सारखी अत्यंत दर्दभरी गज़ल असेल किंवा ‘दस्तक’मधलं ‘माई री’ असेल किंवा दीदींच्या सर्वोत्तम दहा गाण्यांत सहज येऊ शकेल, असं ‘वह कौन थी?’मधलं ‘लग जा गले’ असेल… मदनमोहन यांनी लतादीदींकडून फारच वेगळी अन् उच्च दर्जाची गाणी गाऊन घेतली, यात वाद नाही.
विविध पार्श्वगायकांनी दीदींबरोबर गाणी गायली. त्यात महंमद रफी आणि किशोरकुमार यांची गाणी रसिकांना विशेष आवडतात. हेमंतकुमार, मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, सुरेश वाडकर, शब्बीरकुमार, उदित नारायण, कुमार सानू ते सोनू निगमपर्यंत अनेक गायकांनी दीदींसमवेत अनेक अजरामर गाणी गायली.
दीदींनी मराठीत केलेलं कामही मोठं आहे. वसंत प्रभू आणि श्रीनिवास खळे वगळले तर दीदींनी मराठीतलं बहुतेक काम त्यांचे धाकटे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह केलं. मराठी चित्रपटांत दीदींनी तुलनेनं कमी गाणी गायली असली तरी ‘प्रेमा काय देऊ तुला’पासून ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी...’पर्यंत जवळपास सर्वच गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्यातही ‘जानकी’मधलं ‘विसरू नको श्रीरामा मला’, ‘जैत रे जैत’मधलं ‘मी रात टाकली…’ किंवा ‘उंबरठा’मधलं ‘गगन सदन तेजोमय’ ही दीदींची गाणी विशेष लोकप्रिय आहेत. मराठीतलं दीदींचं मोठं काम म्हणजे ‘शिवकल्याण राजा’ आणि ‘अमृताचा घनु’ हे दोन अल्बम. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षं झाली, तेव्हा म्हणजे १९७४ मध्ये पं. हृदयनाथ मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे व लतादीदींनी ‘शिवकल्याण राजा’ हा शिवरायांना अर्पण केलेल्या गीतांचा अल्बम केला. तो आजही तितकाच लोकप्रिय आहे. यानंतर १९७५ मध्ये संत ज्ञानेश्वरांच्या सातशेव्या जन्मदिनानिमित्त ‘अमृताचा घनु’ हा ज्ञानेश्वरांच्या अभंगांचा, विराण्यांचा अल्बम पं. हृदयनाथांनी तयार केला. त्यातही सर्व गाणी दीदींनी गायली. यातलं ‘मोगरा फुलला’ ही रचना आणि पसायदान आजही मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं. याशिवाय पंडितजींनी दीदींकडून ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही गणपतीची आरती आणि गणपतीची इतर काही गाणी गाऊन घेतली. यातली काही गाणी शान्ताबाई शेळकेंनी लिहिली होती. ‘गणराज रंगी नाचतो’सारखी त्यांनी लिहिलेली गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. ही गाणी आणि दीदींनी गायलेली आरती आजही गणेशोत्सवात सर्वत्र वाजवली जाते. याशिवाय शान्ताबाईंनी लिहिलेली काही कोळीगीतं हृदयनाथांनी संगीतबद्ध केली, तीही खूप गाजली. याशिवाय ‘आजोळची गाणी’ हा दीदींच्या आजोळच्या म्हणजे खानदेशातील लोकगीतांचा समावेश असलेला अल्बमही रसिकांना आवडला. या सर्वांहून वेगळं असं दीदींचं काम म्हणजे 'आनंदघन' हे टोपणनाव घेऊन त्यांनी मराठी चित्रपटांना दिलेलं संगीत. ही बहुतेक सगळी गाणी लोकप्रिय ठरली. दीदींमधला संगीतकार हा गुणही प्रकर्षानं समोर आला.
दीदीचं व्यक्तिमत्त्व चतुरस्र होतं. त्या बुद्धिमान होत्या; मात्र रुक्ष नव्हत्या. त्यांचा स्वभाव खेळकर होता. स्मरणशक्ती विलक्षण होती. अन्याय सहन न करण्याची वृत्ती होती. त्यापायी इंडस्ट्रीत एस डी. बर्मन, महंमद रफी आदींबरोबर त्यांचे काही वादही झाले. अबोला, रुसवेफुगवेही झाले. मात्र, पुढं ते सर्व निवळून त्यांनी एकत्र कामही केलं. पार्श्वगायकांचं नाव ध्वनिमुद्रिकेवर टाकण्याची पद्धत पूर्वी नव्हती. दीदींमुळं सर्व पार्श्वगायकांना हा मान मिळाला. गायकांना पुरेसं मानधन आणि रॉयल्टी मिळाली पाहिजे यासाठी त्या केवळ आग्रही नव्हत्या, तर त्यासाठी त्यांनी ‘एचएमव्ही’सारख्या तेव्हाच्या बड्या कंपनीबरोबर हक्काची लढाई केली आणि जिंकली. दीदींना फोटोग्राफीचा विलक्षण छंद होता. क्रिकेटचा खेळही त्यांनी अतिशय प्रिय होता. लंडनला लॉर्ड्स मैदानावर सामने पाहता यावेत, यासाठी त्यांनी या मैदानासमोरच घर विकत घेतलं, एवढं त्यांचं क्रिकेट प्रेम होतं. १९८३ मध्ये भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकला तेव्हा खेळाडूंना फार कमी पैसे मिळाले होते. दीदींनी एक म्युझिकल नाइट करून खेळाडूंना भरपूर पैसे मिळवून दिले. सैन्यासाठी, जवानांसाठी तर त्यांनी कित्येकदा गाजावाजा न करता मोठी मदत केली आहे. उपचारांअभावी वडिलांचं ज्या शहरात निधन झालं, त्या पुण्यात मोठं रुग्णालय बांधायचं दीदींचं स्वप्न होतं. ते त्यांनी २००० मध्ये पूर्ण केलं. त्या रुग्णालयाला वडिलांचं म्हणजेच दीनानाथांचं नाव दिलं. यासाठीचे पैसेही वेगवेगळ्या शहरांत संगीत रजनी आयोजित करून उभारले. दीदींना केंद्र सरकारनं १९८९ मध्ये चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवलं. पुढं २००१ मध्ये केंद्रानं ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन दीदींना सन्मानित केलं.
या सन्मानानंतरही दीदी थांबल्या नाहीत, कारण गाणं हाच त्यांचा श्वास होता. अगदी २०१४ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांनी संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या अल्बमसाठी ‘संधीप्रकाशात’ आणि ‘आता विसाव्याचे क्षण’ ही दोन गाणी गायिली. क्षण अमृताचे या नावानं आलेला हा अल्बम त्यांचा अखेरचा अल्बम ठरला. ही गाणी ऐकताना दीदींनी ही गाणी ८५ व्या वर्षी गायिली आहेत, यावर अजिबात विश्वास बसत नाही, एवढा त्यांचा आवाज सुरेल लागला आहे.
अनेकदा विचार करताना असं वाटतं, की गायक-गायिका तर अनेक आहेत. मग दीदी एवढ्या उंच स्थानी का पोचल्या? किंवा त्यांचं गाणं आपल्या हृदयापर्यंत का पोचतं? असं वाटतं, की संगीत मुळात आपल्या सगळ्यांच्या श्वासातच आहे. लय-ताल आपल्या रोमारोमांत आहे. आपण गाणं आवडणारी, गाणारी, गुणगुणणारी माणसं आहोत. हे सात सूर हीच आपल्या हृदयाची अभिव्यक्ती आहे. आपण हसतो, रडतो, रागावतो, चिडतो, रुसतो सारं काही गाण्यांतून... आपल्या या प्रत्येक भावनेला दीदींनी स्वररूप दिलं. आणि ते एवढं उच्च होतं, की आपल्याला दुसऱ्या कशाची गरजच पडली नाही. दीदींचा आवाज आणि आपलं जगणं... साथ साथ! या स्वरानं आपला सच्चेपणा कधी सोडला नाही. त्यानं आपल्याला कधी फसवलं नाही. न मागता भरभरून दिलं. वर्षानुवर्षं तो स्वर न थकता, न कंटाळता, न चिडता आपल्याला फक्त देत राहिला... आपण घेत राहिलो आणि तृप्त होत राहिलो. आपली झोळी कायमच दुबळी राहिली... एखाद्या उंच पर्वतशिखरावर उभं राहून अजस्र घनांतून सहस्रधारा दोन हातांनी कवेत घेण्याचा प्रयत्न करण्यासारखंच होतं ते. आपण त्या सूराच्या वर्षावात अक्षरशः बुडून जात राहिलो...
एवढं निखळ, नितळ, स्फटिकासारखं पारदर्शक असं या जगात आता खरोखर दुसरं काय आहे? लताचा स्वर मात्र आहे तसाच आहे. त्यामुळं ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मध्ये नातीच्या वयाच्या काजोललाही ‘मेरे ख्वाबों में जो आए’ म्हणणारा तो स्वर सहज शोभून जातो. आपल्या देशात एवढं वैविध्य आहे... एवढे भेद आहेत... पण सगळ्या भिंती मोडून एकच सूर सर्वांना बांधून ठेवतो - तो म्हणजे लतास्वर. याचं कारण त्या आवाजात अशी काही जादू आहे, की तो थेट तुमच्या हृदयात उतरतो. एकदा म्हणजे एकदाही, अगदी चुकूनही तो बेसूर होत नाही. त्याचा कधी कंटाळा येत नाही... एक वेगळंच आत्मिक समाधान मिळतं ते सूर कानी पडल्यावर!
आपण देव कधी पाहिलेला नाही, पण अनेकांना त्याचं अस्तित्व जाणवतं. दीदींचा आवाज ऐकल्यावर अशीच काहीशी अनुभूती येते. यापेक्षा सर्वोच्च, श्रेष्ठ काही असू शकणार नाही, असं वाटतं.
आपलं भाग्य म्हणून आपण या काळात आहोत. आपण अभिमानानं सांगू शकतो, की आम्ही सरस्वती पाहिली नाही, आम्ही स्वर्ग पाहिला नाही... पण आम्ही लतादीदींना ऐकलंय...
लता मंगेशकर नाव धारण करणारा देह ६ फेब्रुवारी २०२२ रोजी इहलोक सोडून गेला.. पण लता मंगेशकर नावाची स्वरसम्राज्ञी आपल्या मनात कायमच चिरतरुण राहणार आहे... आजन्म...!



-------

(आकाशवाणीवर प्रसारित झालेला, निवेदक प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केलेला भाग आता यूट्यूबवर ऐका.)

हा भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

सोहराब मोदी यांच्यावरील भागाची संहिता वाचण्यासाठीा येथे क्लिक करा...

-------




31 Oct 2025

मुंबई आकाशवाणीसाठी - ४ ललितबंध

ऐसी अक्षरे रसिके...
------------------------

(‘मुंबई आकाशवाणी’वरील ज्येष्ठ कार्यक्रम अधिकारी ज्योत्स्ना केतकर माझ्या स्नेही आहेत. काही वर्षांपूर्वी, म्हणजे २०१८ मध्ये मी त्यांच्या आग्रहावरून मुंबई आकाशवाणीसाठी ‘ऐसी अक्षरे रसिके’ या कार्यक्रमासाठी काही ललितबंध लिहून त्यांचं वाचनही तिथं, त्यांच्या स्टुडिओत केलं होतं. यंदा दिवाळीत त्यांनी मला पुन्हा खास दिवाळी विशेष असे ललितबंध लिहून पाठवायला सांगितले. या वेळी घरूनच रेकॉर्डिंग करून पाठवले. त्या चार भागांचं हे स्क्रिप्ट...)

---

१. लक्ष्मीपूजन 

श्रोते हो, नमस्कार! 

काय छान वातावरण आहे ना!
हवेत हलकी हलकी थंडी जाणवू लागलीय... एखादी पहाट कशी धुक्याच्या दुलईतच उमलते. नुकताच पाऊस होऊन गेलेला असल्यानं रस्ते, झाडं, पानं-फुलं स्वच्छ झालेली असतात. सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या एकदम वाढलेली दिसते. त्यातल्या हौशी मंडळींकडं नवे बूट, नवी जॉगिंग ट्रॅक, हातात स्मार्टवॉच असा सगळा जामानिमा दिसतो. दुधाची, फुलांची, बेकरीची दुकानं हळूहळू उघडू लागलेली असतात. कुणी झाडून घेत असतं, तर कुणी पाणी मारत असतं. त्या मातीचा एक खरपूस वास नाकात शिरतो. जवळपासच्या मंदिरातही आता ज्येष्ठ मंडळींची लगबग दिसते. तिथं बाहेर फुलवाल्यांच्या दुकानांत टांगलेल्या हारांच्या फुलांचा मंद सुगंध मन प्रसन्न करून जातो. पेपरांच्या स्टॉलवरही वर्दळ दिसते. तिथं आता दिवाळी अंकांची सुरेख मांडणी केलेली दिसते. उत्सुक मंडळी एकेक अंक उचलून चाळत असतात. विक्रेताही हसऱ्या चेहऱ्यानं अंकांची माहिती देत असतो. हा घ्या, तो आला नाही अजून, तो अमका पलीकडं आहे वगैरे संवाद सुरू असतात. रस्त्यावर हळूहळू रहदारी सुरू झालेली असते. आता बाकीची अमृततुल्य किंवा छोटी छोटी टफरीवजा दुकानंही उघडू लागतात. पायऱ्यांची झाडलोट होते. आता देवांची पूजा वगैरे होते. शकुनाच्या ग्राहकाची विशेष सरबराई होते. थोडं पुढं गेलं, की आपलं लाडकं नाट्यगृह दिसतं. तिथं लागलेल्या नाटकांच्या पाट्या बघून मन एकदम खुलून जातं. आता त्या पाट्या बघूनच कानात नांदीचे सूर निनादू लागतात. बटाटवड्याचा वास नाकाला अस्वस्थ करायला लागतो. यातलं कुठलं नाटक पाहता येईल, याचा मनातल्या मनात विचार सुरू होतो. समोर आपलं नेहमीचं अमृततुल्य दिसतं. घरी चहा झाला असला, तरी इथल्या चहाची खुमारी काही औरच! त्यात ही गुलाबी थंडी वगैरे. चहावाल्याशी, तिथं जमलेल्या चार जणांशी हवापाण्याच्या गप्पा होतात. त्यात मग क्रिकेट सामन्यापासून ते राजकारणापर्यंत आणि राज्यातल्या महापुरापासून ते जगातल्या महायुद्धापर्यंतचे सगळे विषय येऊन जातात. तेवढ्यात वाफाळता कप समोर येतो. त्यातल्या आल्याच्या खमंग वासानं जीव वेडावतो. चवीचवीनं चहा घशात उतरतो - ‘अमृततुल्य’ हे नामाभिधान सार्थ होतं बघा अगदी! ही प्रभातफेरी आटोपून आपण घरी येतो. सोसायटीच्या कमानीला दिव्यांची माळ लावायचं काम सुरू असतं. वॉचमनकाकांना ‘मदतीला येऊ का?’ असं हसून म्हणायचं असतं आणि त्यांनीही हात हलवत ‘नाय नाय, हे काय, झालंच’ असं म्हणायचंच असतं. आतमध्ये झाडांवरही दिव्यांच्या माळा सोडलेल्या दिसतात. गेल्या वर्षीची कसर यंदा दुपटीनं भरून काढायची, हे जवळपास प्रत्येकानंच ठरवलेलं असतं. घरी जाताना लिफ्टमध्ये पोरंटोरं हातात खेळण्यांतली पिस्तुलं घेऊन खाली टिकल्या उडवायला निघालेली बघून, सगळं कसं सुरळीत सुरू असल्याचा ‘फी‌ल’ येतो. आपल्या मजल्यावरच्या सगळ्या घरांसमोर काढलेल्या देखण्या रांगोळ्या आणि पणत्यांची ओळ पाहून आपल्या डोळ्यांतही सुखाचे दिवे लखलखू लागतात. नुकतंच स्वच्छ केलेलं घर आपल्याकडं बघून हसत असतं. घरात आजोबांनी संगणकाला आदेश देऊन हौसेनं लावलेल्या सनईचे मंद सूर कानावर पडतात. आपण टेरेसमध्ये जातो. तिथं आपण उंच टांगलेला आपला आकाशकंदील उंच मस्त डोलत असतो. आजूबाजूच्या बहुतेक घरांवर ही आकाशकंदील आणि दिव्यांची सजावट दिसतेच. तेवढ्यात स्वयंपाकघरातून अनारशांचा खमंग वास येऊ लागतो आणि आपण हसत म्हणतो - आली हं दिवाळी! 

---


२. दिवाळी पाडवा 


श्रोते हो, नमस्कार!
आज बलिप्रतिपदा... म्हणजेच दिवाळी पाडवा. महाराष्ट्रात बहुतांश घरांत आज दिवाळीचा जल्लोषात साजरी होत आहे. वसुबारसेपासून सुरू होणारा पाच दिवसांचा हा वर्षातला सर्वांत मोठा उत्सव आपल्या मनातही प्रकाशाच्या रूपानं आशेची ज्योत प्रज्वलित करतो. आजच्याच दिवशी विक्रम संवतहे नवं वर्ष सुरू होतं. व्यापारी मंडळी नव्या वह्यांचं पूजन करतात. उत्तर भारतात गोवर्धनपूजन केलं जातं. असं या बलिप्रतिपदेचं महत्त्व आहे.
आपल्याकडं समस्त विवाहित पुरुषमंडळींसाठी हा सण म्हणजे आपल्या गृहलक्ष्मीला खास भेटवस्तू देण्याचा. दिवाळी पाडव्याची ओवाळणी पूर्वी एखाद्या चांगल्या साडीत भागायची. आता मध्यमवर्गीय लोक आणि त्यांच्या गृहलक्ष्म्या फार पुढं गेल्या. एखादी सिल्कची साडी वगैरे भेटी मागं पडल्या. आता हिऱ्याच्या दागिन्यांपासून ते एखाद्या हायएंड कारपर्यंत किंवा परदेशातल्या ट्रिपपासून महागातल्या ब्रँडेड फोनपर्यंत काय द्यावं लागेल हे हल्ली सांगता येत नाही. अर्थात गेल्या काही वर्षांत आपल्या सगळ्यांच्याच जगण्यात भौतिक समृद्धी आली हे नाकारून चालणार नाही. त्यामुळं आता दिवाळी म्हटलं, की हे असं सगळं असणार हे आपण गृहीत धरलेलंच असतं, नाही का! कधी कधी मग फार उंच उड्या मारायच्या नादात बजेट कोलमडतं. शेवटी मध्यमवर्गीय माणसाचं फुगलेलं बजेट तरी असं किती फुगणार? मग आपल्या कुटुंबाच्या आनंदातच आपलाही आनंद असतो, वगैरे म्हणून मग आपल्या स्वत:च्या खरेदीवर फुली मारावी लागते. तेही आपण हसत हसत करतो. गमतीचा भाग सोडा, पण अगदी दर वेळी बायकोला अशी महागडी भेटवस्तू द्यायला लागते असं नाही. महत्त्वाचं असतं, तो वेळ देणं. हल्लीच्या काळात वेळेसारखी महाग वस्तू दुसरी मिळणं कठीण. जो तो आपला ह्यात! वेळ कुणालाच नाही. मग एकत्र कुटुंबातील भेटीगाठी, गप्पागोष्टीहे सगळं करायला दिवाळीसारखा दुसरा मुहूर्त नाही.
दिवाळीसारख्या मोठ्या सणाचं महत्त्व काय सांगावं! माणसाला जगण्यासाठी सदैव सकारात्मक विचारांची, आशेची, आकांक्षेची ऊर्जा लागते. आपल्याकडचे सण हे इंधन पुरवण्याचं काम करत असतात. शिवाय आनंदी वृत्ती असण्यासाठी ऐहिक श्रीमंतीची अट नसते. किंबहुना ऐहिकातल्या सुखाचं ओझंच होण्याची शक्यता अधिक. सुदैवानं सणांच्या रूपानं आपल्याकडं ही आनंदी वृत्ती बहुतेकांच्या अंगी अवतरते. अगदी हातावर पोट असलेल्या मजुरापासून ते अत्यावश्यक सेवा म्हणून ऐन सणाच्या दिवशीही कर्तव्यभावनेनं कार्यतत्पर असलेले सीमेवरील जवान, पोलिस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, एसटीचे ड्रायव्हर-कंडक्टर, रेल्वेचे मोटरमन, डिलिव्हरी बॉइज, पोस्टमन, कुरिअर बॉइज, डॉक्टर, नर्स, पत्रकार आणिदेशभरातील अशा अनेक व्यवसायांतील हजारो जण… अशा सर्वांनाच या सणाचा आनंद लुटण्याचा हक्क आहे. आपण करीत असलेलं काम नेकीनं, कर्तव्यभावनेनं पूर्ण करणं हाही त्यांच्या आनंदनिधानाचा भाग असू शकतो. तरीही कुटुंबासमवेत घरात राहून हा सण साजरा करण्याचं समाधान काही औरच, यात शंका नाही. घरातल्या प्रियजनांसोबत आकाशकंदील तयार करणं, रांगोळी काढणं आणि फुलांची आरास सजवणं अशा गोष्टी करण्याची मजा वेगळीच. पाडव्याच्या दिवशी गृहलक्ष्मीनं आपल्या पतीला औक्षण करणं आणि कुटुंबातील सौख्याचा हा ठेवा अबाधित राखण्यानं अबोल वचन निरांजनाच्या साक्षीनं देणं यातल्या सुखाचं मोजमाप करता येईल का? दिवाळीसारखा मोठा सण अर्थव्यवस्थेचं चाकही फिरवीत असतो. यंदा तर जीएसटीतील सवलतींमुळं अगदी खरेदीचा उत्सव आणि बचतीचा उत्सवही सुरू आहे. छोट्या छोट्याव्यावसायिकांपासून ते ऑनलाइन विक्री करणाऱ्या महाबलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत सर्वांना दिवाळीची पर्वणी खुणावत असते. नोकरदारांच्या हाती पडणाऱ्या बोनसमुळं बाजारात पैसा येतो आणि खरेदीचा आनंद घराघरांत पसरू लागतो. यंदाची दिवाळी हाच सगळा आनंद आणि सुख आपल्या आयुष्यात घेऊन आली आहे.
ज्योतीने ज्योत प्रकाशित होते, तसं या सणाच्या निमित्ताने आपण एकमेकांच्या चेहऱ्यांवर हसू फुलवू या. सगळे आनंदात असतील, सुखात असतील तर सण साजरा करण्याचा आनंद निश्चितच द्विगुणित होईल, नाही का!
प्रकाशपर्वाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा…

---

३. भाऊबीज 


श्रोते हो, नमस्कार!

आज भाऊबीज. आजच्या दिवसाला यमद्वितीयाही म्हणतात. दिवाळीतल्या पाच दिवसांपैकी हा एक खास दिवस बहीण आणि भावाच्या नात्याचा. आपल्याकडं देशभर भाऊबीज उत्साहानं साजरी करतात. उत्तरेत या सणाला भाईदूज असं म्हणतात. देशात काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत-टाकाचीही पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी यमुना नदीत स्नान करणं अत्यंत पवित्र समजलं जातं. आजच्या दिवसाला यमद्वितीया का म्हणतात, यम या मृत्यूच्या देवाशी याचा काय संबंध,असे प्रश्न लहानपणी पडायचे. नंतर पुढं त्यासंबंधीची लोकप्रिय कथाही ऐकण्यात आली. ती बहुतेकांना ठाऊक असेल. बहीण-भावाचं नातं अतिशय अवखळ, तितकंच निर्मळ. आपल्या आई-वडिलांखालोखाल आपल्यावर प्रेम, माया कोणाची असेल तर ती आपल्या भावंडांची. यात सख्खे, चुलत, आत्ये-मामे, मावस अशी सगळी भावंडं आली. अगदी ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती होती. एका घरात १५-२० माणसं सहज असायची. त्यामुळं आपली सख्खी किमान एक ते तीन भावंडं असायची आणि शिवाय चुलत भावंडंही असायची. त्यात सुट्टीत आपल्या घरी येणाऱ्या आत्ये-मामे भावंडांची भर पडायची. कधी आपण त्यांच्याकडं जायचो. त्यामुळं सगळ्यांनी एकत्र खेळायचं, दंगा करायचा, मस्ती करायची हे चालायचंच. यातूनच भावंडांमध्ये बंध निर्माण व्हायचे. लहानपणी तर हे खूपच जाणवतं. त्या वयात आपल्या मनावर बाकी कसलीही ओझी, कसलेही पूर्वग्रह किंवा विकार नसतात हेही खरं. त्यातही बहिणींची भावावरची माया अंमळ अधिकच. त्यात भाऊ लहान असेल तर त्याला जपायचं, इतरांपासून वाचवायचं हे सगळं भगिनीवर्ग अगदी प्रेमानं करतो. याउलट बहीण लहान असेल तर भाऊही तिच्यासाठी एक संरक्षक कडं होऊन उभा राहतो. या दोघांचंही नातं फारच खास असतं आणि ते आपण बहुतेकांनी कायमच अनुभवलेलं असतं. कित्येक सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये, गाण्यांमध्ये हे भावंडांचं प्रेम दिसून येतं. ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’सारख्या गाण्यांतून गदिमांनीही बहिणीचा भावाकडं केलेला हा गोड हट्ट अजरामर केला आहे. अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील. लग्न होऊन बहीण सासरी गेली, की मग तिची लवकर भेट होत नाही. पूर्वी तर प्रवास करणंही फार जिकिरीचं असायचं. त्यामुळं आपल्या जवळच्या लोकांना भेटण्यासाठी सणांचं निमित्त असायचं. मंडळी, आपल्या पुराणकथा म्हणा, किंवा लोककथा म्हणा… किती अर्थपूर्ण असतात ना! आपल्या प्रत्येक सणामागं, उत्सवामागं असा काही तरी व्यापक अर्थ दडलेला असायचा. काळ बदलला, तरी बहीण-भावांचं प्रेम कायम राहिलं आहे. आता आपण आठवत राहतो, की लहानपणी किती तरी काळ भावंडांबरोबर खेळलो आहोत. काळानुसार कुटुंबं लहान होत गेली… प्रवासाची साधनं वेगवान झाली, तरी कुटुंबं देश-विदेशांत पसरत गेली. मग प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आणि व्हिडिओ कॉलवर भाऊबीज साजरी व्हायला लागली. अर्थात, बहिणीनं हट्ट करावा आणि भावानं तो पुरवावा, यात काहीही खंड पडलेला नाही. फरक पडला असलाच, तर तो इतकाच, की हल्ली बहिणीही भावांकडून भेटवस्तू फक्त घेत नाहीत, तर स्वत:ही उलट त्याला भरभरून देतात. प्रेम तर त्यांचं कायम भावापेक्षा अधिकच असतं. बहिणीचा जीव भावाला भेटण्यासाठी तळमळत असतो. त्यामागे लहानपणीच्या गोड आठवणींची ओढ असते. भावा-बहिणीच्या या अवखळ, निर्मळ आणि पवित्र नातं साजरं करण्यासाठी आजचा दिवस खास असतो. सर्वांना या खास दिवसाच्या शुभेच्छा…

---

४. दिवाळी अंक व दिवाळी पहाट 

श्रोते हो, नमस्कार!

दिवाळीचा सण संपला असला, तरी चार दिवसांनीही या सणाचा उत्साह आणि उत्सवी वातावरण अजिबात कमी होत नाही. याला कारणीभूत दोन गोष्टी. या दोन गोष्टी म्हणजे आपल्याकडच्या दिवाळी सणाचा अविभाज्य भागच झाल्या आहेत. एक म्हणजे दिवाळी अंक आणि दुसरी म्हणजे दिवाळी पहाट कार्यक्रम.
गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून मराठी माणसाची दिवाळी या दिवाळी अंकांमुळं खरोखर समृद्ध होत आलेली आहे. मराठी माणसाच्या काही खास, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. त्यात दिवाळी अंक ही महत्त्वाची. दिवाळी हा मुळातच वर्षातला सर्वांत मोठा सण असल्यानं या काळात हात सैल सोडून खरेदी होत असतेच. त्यात आवडीचे दिवाळी अंक आवर्जून विकत घेतले जातात. बहुसंख्य सुशिक्षित मराठी कुटुंबांमध्ये ही परंपरा दीर्घकाळ चालत आलेली आहे. दिवाळीच्या सुट्टीत या अंकांचं वाचन हा फार मोठा आनंदसोहळा असायचा. मराठीत विपुल प्रमाणात दिवाळी अंक निघतात. नामवंत आणि वर्षानुवर्षं प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची संख्या साडेतीनशे ते चारशेच्या आसपास आहे. याशिवाय गावोगावी निघणारे अंक धरले तर ही संख्या दीड-दोन हजारांच्या घरात सहज जाईल. नियमित निघणारे नेहमीचे अंक म्हटले, तरी वर्षानुवर्षं हे अंक निघत आलेले आहेत, यातलं सातत्य वाखाखण्याजोगं आहे. या दिवाळी अंकांमधून दर्जेदार कथा, कविता आणि कादंबऱ्याही वाचकांना वाचायला मिळतात. अनेक मोठमोठ्या लेखकांची सुरुवात दिवाळी अंकांतून लेख लिहूनच झाली आहे. मराठीत कवींचं उदंड पीक बारमाही येत असतं, त्याला कारण त्यांच्या कविता प्रसिद्ध करणारे असे शेकडो अंक निघत असतात. आपल्या लहानपणी लायब्ररीतूनच दिवाळी अंक आणून वाचायची पद्धत होती. फारच थोडे अंक विकत घेतले जात. त्यातही ‘आवाज’सारख्या विनोदी अंकावर वाचकांच्या उड्या पडत. त्यातल्या त्या ‘खिडक्यां’चं आकर्षण बरेच दिवस होतं. विनोदी अंकांखालोखाल मागणी असायची ती भविष्यविषयक दिवाळी अंकांना. त्यानंतर मग दैनिकांनी काढलेले दिवाळी अंक आणि नंतर विशिष्ट विषयांना वाहिलेल्या अंकांचा नंबर लागत असे. या दिवाळी अंकांना पुढंही जवळपास सहा महिने भरपूर मागणी असे. त्यानंतर मग जुन्या झालेल्या अंकांचीही मित्रमंडळींत देवाणघेवाण चाले.
दिवाळी अंकांच्या जोडीला गेल्या ३०-३५ वर्षांत रुजलेला आणखी एक उपक्रम म्हणजे ‘दिवाळी पहाट’. अशा एखाद्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावायची, नंतर चविष्ट फराळाचा फन्ना उडवायचा आणि मग आवडता दिवाळी अंक वाचत दुपारी लोळत पडायचं, हा अनेकांचा आजही दिवाळातला ठरलेला कार्यक्रम आहे.
खरं तर दिवाळी पहाट ही आता आमच्या सांस्कृतिक उन्नयनाची अविभाज्य गोष्ट झाली आहे. ’पूर्वी हे नव्हतं,’ असं म्हणायला एक तरी गोष्ट आमच्या पिढीला मिळाली. दिवाळीला फटफटायच्या आत आंघोळी-पांघोळी नव्हे, नव्हे अभ्यंगस्नान…. करून रसिक माणसं ज्या त्वरेने पटापटा या अफाट पहाटा पाहायला जवळपासची नाट्यगृहं किंवा लॉन्स वगैरे गाठतात, ते पाहून केवळ अचंबित व्हायला होतं. पहाट ही पूर्वी केवळ अनुभवण्याची गोष्ट होती. आता ती अनुभवण्याबरोबर पाहण्याची-ऐकण्याचीही गोष्ट झालीय. पूर्वीच्या व्याकरणात ‘मी पहाट ऐकली’ हे वाक्य शंभर टक्के चुकीचं मानलं गेलं असतं. आता पहाट केवळ ऐकलीच जात नाही, तर ती एकशे दहा टक्के पाहिलीही जाते. या पहाटांमध्ये रसिक लोक विशेषतः जुनी मराठी गाणी ऐकतात. त्यातही मराठमोळ्या संस्कृतीचं वर्णन करणारी गाणी हॉट फेवरिट असतात. या पहाटांमुळं शहरभरची तमाम रसिक मंडळी सकाळी सकाळी स्वच्छ आवरून, नवे कपडे वगैरे घालून एकत्र जमतात हे कौतुकाचं आहे. पुढचे काही दिवस असंच वातावरण असेल. आपण त्याचा आनंद लूटू या… नमस्कार!

---

(समाप्त)

-----

(मुंबई आकाशवाणीवरील (अस्मिता वाहिनी) प्रसारणकाळ - २१ ते २४ ऑक्टोबर २०२५)

----


29 Oct 2025

रोहन मैफल लेख - दुलत यांचे पुस्तक

‘भ्रमजाला’च्या प्रदेशातले अंतरंग
--------------------------------------------------------------

गुप्तचरांचे जग वेगळेच असते. आपल्या सगळ्यांना गुप्तचरांच्या कथांमध्ये रुची असते. गुप्तहेर मंडळी कसं काम करतात, याविषयी उत्सुकता असते. ‘रिसर्च अँड ॲनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’ ही भारताची गुप्तचर संस्था. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सत्तरच्या दशकात ही संस्था स्थापन केली. आर. एन. काव हे या संस्थेचे पहिले प्रमुख. त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी अनेक अभिमानास्पद दंतकथा आपण ऐकत आलेलो आहोत. ‘रॉ’ ही संस्था प्रामुख्याने भारताबाहेरील कामे पाहते, तर देशांतर्गत कामे ‘इंजेलिजन्स ब्यूरो’ (आयबी) ही संस्था पाहते. या दोन्ही संस्थांमध्ये दीर्घकाळ काम केल्याचा अनुभव असलेले ज्येष्ठ गुप्तचर अधिकारी अमरजितसिंग (ए. एस.) दुलत यांचं ‘ए लाइफ इन द शॅडोज’ हे नवं पुस्तक वाचताना आपल्याला या गुप्तचर विश्वाविषयी अधिक कुतूहल वाटू लागतं, त्याविषयी अधिक जाणून घ्यावंसं वाटतं, हे नक्की. रोहन प्रकाशनाने याच नावाने या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. मिलिंद चंपानेरकर यांनी सहज-सोप्या भाषेत केलेला हा अनुवाद वाचनीय आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, दुलत यांचं हे पुस्तक प्रकाशित होईपर्यंत (मूळ पुस्तक २०२३ मध्ये प्रकशित) कोणत्याही भारतीय वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने आपल्या कारकिर्दीच्या आठवणी सांगणारं पुस्तक लिहिलेलं नव्हतं. दुलत यांच्या या पुस्तकाचं महत्त्व त्या अर्थानेही खूप मोठं आहे. भारतीय गुप्तचर संस्थांच्या अंतरंगाची एवढी तपशीलवार ओळख आणि मुख्य म्हणजे दुलत यांचे वैयक्तिक अनुभव या पुस्तकामुळे आपल्यासमोर येतात. ते वाचताना एखादी घटना घडते तेव्हा त्याच्या आगेमागे किती तरी गोपनीय गोष्टी कशा घडत असतात, याचा काहीसा अंदाज वाचकाला येऊ शकतो.
दुलत यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे टप्पे आले. त्यातही काश्मीरमध्ये त्यांनी केलेले काम विशेष महत्त्वाचे मानले जाते. दुलत यांना काश्मीर विषयाचे तज्ज्ञच म्हटले जाते, एवढा त्यांचा या समस्येचा अभ्यास आहे. काश्मीर समस्या सोडविण्यासाठी तेथील जनतेशी संवाद साधायला हवा, हे त्यांच्या धोरणाचे सूत्र होते. ‘काश्मीर - द वाजपेयी इयर्स’ आणि ‘द स्पाय क्रॉनिकल्स’ या दोन पुस्तकांतून त्यांनी या विषयावर तपशीलवार व भरपूर लिखाण केले आहे. ‘ए लाइफ इन द शॅडोज’ या पुस्तकातही अर्थातच काश्मीरचा उल्लेख आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांच्याशी दुलत यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे फारुक यांच्याविषयी व एकूणच अब्दुल्ला घराण्याविषयी त्यांनी अतिशय आत्मीयतेने लिहिले आहे. ‘रॉ’मधून निवृत्त झाल्यावर दुलत यांची पंतप्रधान कार्यालयात ‘काश्मीरविषयक सल्लागार’ म्हणून नियुक्ती झाली. वाजपेयी पंतप्रधान असताना म्हणजे जानेवारी २००१ ते मे २००४ या काळात ते या पदावर होते. या काळात त्यांनी काश्मिरी लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. दुलत यांच्या ऐन उमेदीच्या काळात त्यांचा ‘मि. काश्मीर’ असाच उल्लेख केला जात असे, यावरून त्यांचा या प्रश्नातील सखोल अभ्यास लक्षात येतो. दुलत यांचा जन्म १९४० मध्ये (आता पाकिस्तानात असलेल्या) पंजाबमधील सियालकोट येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे वडील न्या. समशेसिंग दुलत सर्व कुटुंबीयांसह दिल्लीला आले. दुलत यांचं शिक्षण दिल्ली, सिमला व चंडीगड इथं झालं. चंडीगड या शहराविषयी दुलत यांना विशेष प्रेम आहे आणि ते त्यांच्या लिखाणातूनही दिसून येतं. ते १९६५ मध्ये आयपीएस झाले आणि भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले. त्यानंतर, १९६९ मध्ये त्यांनी ‘आयबी’त नियुक्ती झाली. तिथं ते सुमारे ३० वर्षं होते. नव्वदच्या आसपास काश्मीरमध्ये अत्यंत तणावपूर्ण वातावरण असताना व काश्मिरी पंडितांचे भयानक स्थलांतर सुरू असताना दुलत ‘काश्मीर ग्रुप’च्या प्रमुखपदी होते. पुढे ‘रॉ’च्या प्रमुखपदी त्यांनी नियुक्ती झाली.
या पुस्तकात एकूण नऊ प्रकरणे आहेत. त्यात दुलत यांच्या जवळपास सर्व कारकिर्दीचा आढावा त्यांनी घेतला आहे. यातील ‘काही थोर व्यक्तींच्या सान्निध्यात’ आणि ‘राष्ट्रपतींसोबत प्रवास’ ही दोन प्रकरणे विशेष वाचनीय झाली आहेत. ‘काही थोर व्यक्तीच्या सान्निध्यात’ या प्रकरणात ज्येष्ठ पोलिस अधिकारी अश्विनीकुमार, पॅलेस्टिनी नेते यासर अराफत, प्रिन्स चार्ल्स (सध्याचे ब्रिटनचे राजे), मार्गारेट थॅचर, आधुनिक सिंगापूरचे जनक मानले जाणारे थोर नेते ली क्वान यू, राजेश पायलट आदी व्यक्तिमत्त्वांविषयी दुलत यांनी तपशीलवार लिहिले आहे. यातील परदेशी नेत्यांच्या भारत दौऱ्यात दुलत यांच्याकडे त्या व्यक्तींच्या सुरक्षेची व दौऱ्यातील प्रवास वगैरे सर्व बाबींची जबाबदारी होती. त्यामुळे या प्रकरणातील त्यांचे सर्व अनुभव अतिशय वेधक व वाचनीय झाले आहेत. राजेश पायलट यांच्याबरोबर त्यांची अतिशय हृद्य मैत्री झाली होती व पायलट यांच्या अकाली निधनाने दुलत यांना अतिशय दु:ख झाले. या व्यक्तिचित्र वर्णनाला थोडी वैयक्तिक व भावनिक किनार लाभल्याने ती वाचण्यास अतिशय रोचक झाली आहेत. ‘राष्ट्रपतींसोबत प्रवास’ या प्रकरणात तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्यावर अमेरिकेत होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी दुलत त्यांच्याबरोबर अमेरिकेत गेले होते, त्या सर्व दौऱ्याचं रंजक वर्णन आहे. ते मुळातूनच वाचायला हवं. या दौऱ्यात झैलसिंग यांचे कुटुंबीयही होते. खुद्द झैलसिंग यांचा स्वभाव, त्यांच्या कुटुंबीयांचे वागणे यावर दुलत त्यांच्या खास शैलीत टिप्पणी करतात, तो सर्व भाग अनुवादकानेही अतिशय सहज-सुलभपणे आपल्यापर्यंत पोचविला आहे.
‘डॉक्टरसाहिब आणि काश्मिरीयत’ या प्रकरणात फारुक अब्दुल्लांसोबत असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांबद्दल दुलत यांनी लिहिलं आहे. त्याच अनुषंगाने या आणि त्यापुढच्या ‘काश्मिरीयत : काश्मिरी लोक आणि दिल्ली’ या प्रकरणात काश्मीर प्रश्नाविषयीही त्यांनी पुरेसा ऊहापोह केला आहे. त्यावरून हा प्रश्न किती गुंतागुंतीचा झाला आहे, हे आपल्या लक्षात येतं. अर्थात दुलत यांची सध्याच्या सत्ताधारी पक्षाविषयीची नाराजीही त्यातून लपून राहत नाही.
 काही वाचकांना या पुस्तकातील सर्वांत रोचक प्रकरण वाटेल ते ‘गुप्तचर मित्र : दोन ‘स्पायमास्टर्स’ची कहाणी’ हे. या पुस्तकात दुलत यांनी सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व भारताचे अतिशय ज्येष्ठ, यशस्वी व महत्त्वाकांक्षी गुप्तचर अजित डोवाल यांच्याविषयी लिहिले आहे. डोवाल हे दुलत यांना ज्युनिअर. त्यांची सर्व कारकीर्द दुलत यांच्यासमोर घडली आहे. त्याआधारे दुलत यांनी डोवाल यांच्याविषयी लिहिले आहे. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
गुप्तचर अधिकाऱ्यांना अनेक घटनांविषयी फार तपशिलात लिहिता येत नाही. त्यांच्यावर अनेक बंधने असतात. तरीही दुलत यांचे हे पुस्तक पुरेसे रंजक झाले आहे. उलट या पुस्तकाच्या वाचनानंतर त्या विश्वाविषयीचे आपले कुतूहल अधिकच वाढते आणि तेच या पुस्तकाचे यश आहे.

 ए लाइफ इन द शॅडोज
लेखक : ए. एस. दुलत
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
प्रकाशक : रोहन प्रकाशन
किंमत : ४९५ रुपये.


---

(पूर्वप्रसिद्धी : रोहन मैफल)

---

26 Sept 2025

रोहन मैफल लेख - श्यामा कादंबरी परीक्षण

अश्लीलतेच्या आरोपातून सुटलेली ‘श्यामा’ पुन्हा भेटीला...
---------------------------------------------------------------------

विसाव्या शतकातील लोकप्रिय, प्रसिद्ध, पण काहीसे वादग्रस्त लेखक चंद्रकांत काकोडकर यांची ‘श्यामा’ ही विविध कारणांनी गाजलेली कादंबरी रोहन प्रकाशनाने पुन्हा वाचकांच्या भेटीसाठी आणली आहे. ‘श्यामा’ ही कादंबरी ‘रंभा’ या दिवाळी अंकातून १९६२ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर लगेचच १९६३ मध्ये ती पुस्तकरूपात बाजारात आली. ती वाचल्यानंतर तिच्यावर अश्लीलतेचे आरोप केले गेले. पुण्यातील श्रीकृष्ण भिडे यांनी न्यायालयात खटला गुदरला. हा खटला रंभा या दिवाळी अंकावरच भरण्यात आला होता. त्यातील अनेक लेखकांना न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. न्यायालयाने अनेकांना २५ रुपये दंड करून सोडून दिले. मात्र, काकोडकर दंड भरण्यास तयार झाले नाहीत. ‘माझ्या कादंबरीत काहीही अश्लील नाही,’ असेच त्यांचे ठाम म्हणणे होते. पुढे त्यांचे स्नेही ॲड. सुशील कवळेकर यांच्या मदतीने काकोडकर यांनी आधी हायकोर्टात व तिथे हरल्यावर सुप्रीम कोर्टापर्यंत या निकालाविरोधात दाद मागितली. १९६३ ते १९६९ अशी सहा वर्षे व त्या काळातील साडेदहा हजार रुपये खर्च केल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने ही कादंबरी अश्लील नाही, असा निर्वाळा दिला आणि काकोडकर जिंकले. त्या काळातील माध्यमांतही या खटल्याची भरपूर चर्चा झाली होती. हा खटला जिंकल्यानंतर १९७१ मध्ये या खटल्याच्या साक्षीपुराव्यांसह ही कादंबरी पुन्हा एकदा प्रसिद्ध झाली आणि तीच या कादंबरीची पहिली व शेवटची आवृत्ती ठरली. खटला जिंकला असले तरी ‘अश्लील साहित्य लिहिणारे लेखक’ असा शिक्का बसल्याने काकोडकर मराठी साहित्याच्या ‘अभिजात व अभिरुचीसंपन्न’ मुख्य प्रवाहातून जणू बाहेर फेकले गेले. अर्थात मनस्वी स्वभावाच्या काकोडकरांनी हार मानली नाही. वर्षाला वीस ते पंचवीस कादंबऱ्यांचा अक्षरश: रतीब पुढे ते घालू लागले. आधी ‘चंद्रकांत’ या दिवाळी अंकात ते चार ते पाच कादंबऱ्या लिहीत. नंतर ‘काकोडकर’ नावाचाच एक दिवाळी अंक काढायला त्यांनी सुरुवात केली. दहा हजार अंकांची आवृत्ती काढूनही त्यांना अनेकदा पुनर्मुद्रण करावे लागे, एवढी त्या अंकाची लोकप्रियता होती. ‘श्यामा’वरील खटल्याचा जणू सूड म्हणून त्यांच्या पुढच्या कादंबऱ्यांत ‘उरोजाधिष्ठित’ वर्णनांची रेलचेल वाढली. फिरत्या वाचनालयांमध्ये, तसेच एकूणच तेव्हाच्या महाराष्ट्रात सर्वदूर काकोडकर हे प्रचंड खपाचे, वाचले जाणारे लेखक ठरले. असे असले तरी तत्कालीन समीक्षकांनी त्यांच्याकडे कायमच दुर्लक्ष केले वा त्यांच्या साहित्याला ‘काकोडकरी साहित्य’ म्हणून हिणवले.
वास्तविक तरुण वयात काकोडकरांवर शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबऱ्यांचा खूप प्रभाव होता. त्यांच्या सुरुवातीच्या ‘निसर्गाकडे’, ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी’ आआणि ‘९ ऑगस्ट’ या कादंबऱ्या सामाजिक विषयांवरच्या होत्या. ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी’ या कादंबरीला तर बंगालमधल्या भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी होती. पुढच्या काळातही त्यांनी अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या. शंकरराव कुलकर्णी व वासू मेहेंदळे यांनी त्या प्रामुख्याने प्रकाशित केल्या. पुढे त्यांनी ‘राजाराम राजे’ हे डिटेक्टिव्ह पात्रही निर्माण केले. तत्कालीन मराठी मध्यमवर्गाच्या अनुभवविश्वाच्या पलीकडे असलेले अनेक विषय (उदा. रेसकोर्स, सुपर मार्केट) त्यांच्या लेखनात तेव्हा सहजी येत असत.
पुढे काकोडकरांनी श्यामा कादंबरी लिहिली, त्यामागे श्रीकृष्ण पोवळे या तत्कालीन प्रसिद्ध व काकोडकरांशी मैत्री असलेल्या कवीचे जीवनचरित्र काल्पनिक अंगाने रेखाटण्याचा हेतू असावा, असे  निरीक्षण या नव्या आवृत्तीची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिणारे लेखक पंकज भोसले यांनी नोंदविले आहे. श्यामा कादंबरीचा नायक निशिकांत कदम हे पात्र पोवळे यांच्यावरच बेतलेले असावे, असे दिसते. किंबहुना कादंबरीचे शीर्षक ‘श्यामा’ असे असले, तरी ती मुख्यत: निशिकांतच्या ‘आत्म-देवदास’ वृत्तीची कहाणी सांगणारी कादंबरी आहे, असे भोसले प्रस्तावनेत नमूद करतात.
यासाठी भोसले यांनी श्रीकृष्ण पोवळे या आता पूर्ण विस्मृतीत गेलेल्या, मात्र तत्कालीन मराठी साहित्यवर्तुळात बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेल्या कवीचा अभ्यासपूर्ण शोध घेतला आहे. त्यातून मिळालेली माहिती त्यांनी प्रस्तावनेत तपशीलवार दिली आहे. ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. याशिवाय खुद्द काकोडकर यांचे मनोगत आणि सर्वोच्च न्यायालयातील खटल्याबाबत ॲड. कवळेकर यांनी ‘ललित’मध्ये १९६९ मध्ये लिहिलेला लेख या नव्या आवृत्तीत मुद्रित करण्यात आला आहे. भोसले यांची प्रस्तावना, काकोडकर यांचे या खटल्याविषयीचे मनोगत आणि कवळेकर यांचा लेख आधी वाचून मग ही कादंबरी वाचण्यात अधिक मजा आहे.
‘श्यामा’चा नायक निशिकांत कदम हा शिक्षक आहे, तसेच ध्येयवादी विचारांचा कवीही आहे. श्यामा शिंदे या कलाशिक्षिकेशी त्याची ओळख होते. मात्र, आधीची दोन फसलेली प्रेमप्रकरणे आठवून तो श्यामाबाबत सावध पावले उचलतो. नीला आणि वनिता यांच्यासह झालेल्या निशिकांतच्या प्रेमक्रीडांच्या आठवणी हाच काय तो या कादंबरीतील शृंगाराचा (वा कथित अश्लील) भाग आहे. श्यामा विचारांनी मोकळीढाकळी असल्याने तिला शाळेतही इतर शिक्षकांकडून जाच होत असतो. त्यातून निशिकांत तिला बाहेर काढतो. आपल्या कवितांना चाली लावण्यास तो श्यामाला प्रवृत्त करतो आणि पुढे तिला आकाशवाणीवरील लोकप्रिय गायिका करतो. पुढे गायिका म्हणून होणारी श्यामाची प्रगती आणि संवेदनशील असलेल्या निशिकांतचे गैरसमज यांतून कादंबरीचे कथानक पुढे जाते.
यातील निशिकांत कदम ही व्यक्तिरेखा काकोडकरांनी श्रीकृष्ण पोवळे यांच्यावरून घेतली असावी, असे मानण्यास वाव आहे. एक तर या कादंबरीच्या नायकाच्या म्हणून ज्या कविता काकोडकरांनी कादंबरीत वापरल्या आहेत त्या पोवळे यांच्याच आहेत. पोवळे व काकोडकर स्नेही होते. त्यातूनच त्यांनी काकोडकरांना या आपल्या कविता त्यांच्या कादंबरीत वापरण्यास दिल्या. काकोडकरांनी कादंबरीच्या प्रस्तावनेत तसा उल्लेखही केलेला आहे. याच प्रस्तावनेत ही कादंबरी पोवळ्यांवर आधारित नाही, असे काकोडकरांनी म्हटले असले, तरी ‘कित्येकांना त्यात कदाचित श्रीकृष्ण पोवळे सापडतीलही’ असेही नमूद केले आहे. या उल्लेखानंतर पंकज भोसले यांनी बरेच परिश्रम घेऊन पोवळे यांच्याविषयीही माहिती गोळा केली. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘काकोडकरांनी श्यामा लिहिली तेव्हा पोवळ्यांचे समाजातील आणि साहित्य व्यवहारातील स्थानही रसातळाला गेले होते. अधिकाधिक काळ वेश्येच्या माडीवर आणि सातत्याचे मद्यास्वादक ही त्यांची छबी शिल्लक राहिली होती. पण त्या आधी वीस-पंचवीस वर्षे मराठीतील उमर खय्याम असा कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होत होता.’
एकूणच, ‘श्यामा’ कादंबरी व तिच्या अश्लीलता खटल्याचे हे सारे नाट्य अतिशय रंजक आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात या घटनेची दखल घेतल्याशिवाय पुढे जाणे कठीण आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी व इतरही सर्व वाचकांनी आवर्जून वाचावी अशी ही ‘श्यामा’ची नवी आवृत्ती आहे. मूळ कादंबरी आज वाचली, तर ती ठीकठाकच आहे असे वाटते.
अर्थात काकोडकरांनी ज्या काळात ही कादंबरी लिहिली तो महाराष्ट्रात एका अर्थाने साहित्यिक ‘रेनेसान्स’चा काळ होता. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर साहित्य, संस्कृतीची जोपासना करण्यासाठी सरकारी संस्था स्थापन झाल्या. स्वातंत्र्यानंतर वेगवेगळे जनसमूह खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा व अभिव्यक्तीचा अनुभव घेत होते. साठोत्तरी साहित्यात विद्रोहाची जी ठळक वाट दिसते, त्या वाटेवर दलित साहित्य, स्त्री साहित्य, ग्रामीण साहित्य असे अनेकानेक प्रवाह वाहते झाले होते. वाचनालयांची संख्या वाढली. वाचणाऱ्यांची संख्या वाढली. या नव्याने वाचणाऱ्या वाचकांना काकोडकरांनी मोठंच खाद्य पुरवलं. जनप्रिय साहित्यनिर्मितीची जी वाट तिथून सुरू झाली, त्या वाटेची काकोडकर, बाबा कदम, सुहास शिरवळकर, चंद्रकांत खोत आदी मंडळी महत्त्वाची शिलेदार होती.
काकोडकरांची ‘श्यामा’ याच काळाचं एक अपत्य. वर म्हटल्याप्रमाणे कादंबरी म्हणून ती ठीकठाकच असली, तरी केवळ त्या काळात तिच्यावर अश्लीलतेचा शिक्का बसल्याने तिची एवढी चर्चा झाली. आजच्या ‘लिव्ह-इन’, ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’ आणि ‘सिच्युएशनशिप’च्या काळात तर अनेकांना ही कादंबरी निव्वळ सात्त्विकही वाटू शकेल. ‘उरोजाधिष्ठित’ वर्णनांची जागा आता ‘इन्स्टा’वरच्या ‘प्रत्यक्ष दृश्यांनी’ घेतली आहे. असं सगळं बदललेलं असताना या कादंबरीचं आजचं रंजनमूल्य केवळ त्या प्रेमक्रीडा वर्णनांपेक्षा तिच्या या अद्भुत प्रवासामुळे अधिक झालं आहे, असं नक्की म्हणावंसं वाटतं.

----

(पूर्वप्रसिद्धी - रोहन मैफल)

---------

12 Sept 2025

दिलीप प्रभावळकर - मटा मुलाखत

‘आस्वादक व्हा; रसरशीत जगा’
-------------------------------------

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उद्या, सोमवारी  (४ ऑगस्ट) वयाची ८१ वर्षे पूर्ण करत आहेत. प्रभावळकर याही वयात अतिशय व्यग्र आहेत. त्यांची प्रमुख भूमिका असलेला मराठी सिनेमा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. याशिवाय ‘पत्रापत्री’ हा अभिनव नाट्यप्रयोग ते विजय केंकरे यांच्यासह सादर करतात, त्याचेही प्रयोग सुरू आहेत. याशिवाय वाचन, आवडीची जुनी हिंदी गाणी ऐकणं, क्रिकेट सामने पाहणं हे सर्व जोडीने सुरू आहेच. प्रभावळकर अतिशय सकारात्मक नजरेने आयुष्याकडं पाहतात. अनेक गोष्टींमध्ये असलेली रुची आपल्याला ताजीतवानी ठेवते, असं त्यांना वाटतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी श्रीपाद ब्रह्मे यांनी केलेली ही विशेष बातचीत...


सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त तुमचं अभीष्टचिंतन व ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... तुमचा नवा मराठी चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. यातल्या तुमच्या भूमिकेविषयी सांगा.

दिलीप प्रभावळकर : वय हा केवळ एक टप्पा आहे, असं मी मानतो. यात माझं काही फार कर्तृत्व आहे, असं नाही. मात्र, मी अलीकडंच जो नवा सिनेमा केला, त्यातली भूमिका निश्चितच माझ्या वयाच्या मानाने दमवणारी, आव्हानात्मक होती. ‘दशावतार’ असं या सिनेमाचं नाव आहे. यात मी दशावतारी मंडळींत काम करणाऱ्या ‘बाबुली’ नावाच्या कलाकाराची भूमिका केली आहे. यात त्याचा संघर्ष तर आहेच; शिवाय त्याचे दशावतारातले कामही आहे. त्यात तो ज्या वेगवेगळ्या भूमिका करत असतो, त्या मला साकाराव्या लागल्या. आम्ही कोकणात तब्बल ५० दिवस याचं चित्रीकरण केलं. कोकणातला आतापर्यंत कधीही न दिसलेला निसर्ग, तिथली जंगलं, गावं असं सारं काही यात आहे. सुबोध खानोलकर या तरुणानं हा सिनेमा लिहिला आहे आणि दिग्दर्शितही केला आहे. सुबोधसह सुजय हांडे, ओंकार काटे हे निर्माते आहेत. माझ्यासोबत सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, महेश मांजरेकर, भरत जाधव, सुनील तावडे, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, आरती वडगबाळकर असे बरेच कलाकार आहेत. या चित्रपटासाठी मी आधी दशावतारी खेळ पाहिले. त्यातल्या कलाकारांना भेटलो. आता कोकणातही ही कला फारशी बघायला मिळत नाही. मात्र, या सिनेमामुळं मला या अस्तंगत होत चाललेल्या कलेची व त्यातल्या एका कलाकाराची व्यथा प्रातिनिधिक स्वरूपात दाखवता आली याचा आनंद आहे.

ज्या भूमिकेची एवढी वर्षं वाट पाहिली, ती भूमिका अखेर करायला मिळाली, असं वाटलं का?

दिलीप प्रभावळकर : हो. ही भूमिका निश्चितच आव्हानात्मक होती. मात्र, याही आधी मी अशा काही भूमिका साकारल्या आहेत. ‘हसवाफसवी’तला कृष्णराव हेरंबकर किंवा ‘साळसूद’ मालिकेतला खलनायक किंवा ‘नातीगोती’मधला काटदरे ही सारी पात्रं साकारण्यासाठी आव्हानात्मक होती. ‘हसवाफसवी’तली इतरं पाच पात्रं अर्कचित्रात्मक होती, मात्र ‘कृष्णराव’ ही भूमिका अगदी ‘मानवी’ होती. एरवी आम्ही कलाकार भूमिका साकारताना अलिप्त असतो. मात्र, ‘कृष्णराव’ साकारताना क्वचित ती भूमिका आणि वैयक्तिक मी यांतलं द्वैत मिटून गेलं, असा अनुभव मला काही वेळा आला आहे. ‘काटदरे’ या भूमिकेतही असा अनुभव आला आहे. याशिवाय ‘अलबत्या गलबत्या’मधली चेटकीण असो की ‘रात्र-आरंभ’मधली स्किझोफ्रेनिक माणसाची अंगावर काटा आणणारी भूमिका असो; या सगळ्याच तशा आव्हानात्मकच होत्या. पण ‘दशावतार’मधील सर्वांत जास्त. तुमची शारीरिक, मानसिक, भावनिक कस पाहणारी ही भूमिका होती. मला वाटतं, एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला अनेक गोष्टींत असलेली रुची या भूमिका साकारताना मदतीला येत असावी. लता मंगेशकरांची गाणी ऐकताना त्यातली भावनांची अद्भुत अभिव्यक्ती मला सतत खुणावते. अगदी क्रिकेट पाहतानाही मला त्यातून काही तरी मिळतं. माझ्यातल्या लेखकाला अनेक पात्रं लिहिताना या सर्व अतिरिक्त आवडी-निवडींचा, विविध रसांच्या आस्वादनाचा फायदा झालेला आहे.

या सर्व काळात तुमच्यावर कोणत्या व्यक्तीचा, अभिनेत्याचा किंवा दिग्दर्शकाचा सर्वाधिक प्रभाव पडला, असं तुम्हाला वाटतं?

दिलीप प्रभावळकर : माझ्यावर पु. ल. देशपांडे यांचा बराच प्रभाव आहे, असं मला वाटतं. मीच काय, आमच्या सर्व पिढीवरच तो प्रभाव होता. पुढील पिढ्यांपर्यंत तो कायम राहिला. पुलंची ‘बटाट्याची चाळ’ हे सर्वोत्कृष्ट गद्य विडंबन आहे, असं मला वाटतं. त्यांचं लेखन, त्यांचे नाट्यप्रयोग, त्यांचे एकपात्री प्रयोग पाहत आम्ही मोठे झालो. त्यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मला त्यांनी लिहिलेल्या लेखांमधले उतारेच्या उतारे आठवत होते. पुलंमधला ‘परफॉर्मर’ही अतिशय आवडणारा, लोभस असा आहे. पुलंव्यतिरिक्त चार्ली चॅप्लिनचाही प्रभाव आहे, असं म्हणता येईल. त्याचे सर्व मूकपट तेव्हा पाहिले होते. नंतर आलेल्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ या बोलपटासह त्याचे सर्वच सिनेमे काही ना काही शिकवून गेले. जागतिक रंगभूमीचा मी अगदी अभ्यास वगैरे केला नाहीय, पण ब्रॉडवेवर किंवा स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हन (शेक्सपिअरचं गाव) इथं रंगभूमीवरील सहकलाकारांसोबत नाटकं निश्चितच पाहिली. भरत दाभोळकरसोबत इंग्लिश रंगभूमीवर काही काळ काम केलं, तेव्हा त्या अनुभवाचा फायदा झाला. बाकी इतर भारतीय भाषांतली रंगभूमी पाहायची मात्र राहून गेली.

तुमच्यातला अभिनेता आणि लेखक यांच्यातला तोल कसा साधता? मुळात लेखक कसे झालात?

दिलीप प्रभावळकर : मला जे काही अभिव्यक्त व्हायचं असेल तर मी ते माझ्या भूमिकांमधून होऊ शकतो आणि लेखनातूनही होऊ शकतो. त्या दृष्टीने लिहीत राहणं मला महत्त्वाचं वाटतं. मी हे नेहमी सांगत आलोय, की मला चांगली संधी देणारी माणसं भेटत गेली. मी रुईया महाविद्यालयात असताना भित्तिपत्रकांसाठी लेखन करायचो. त्यानंतर एकदा आनंद अंतरकरांना ‘नाटक’ नावाची कथा दिली. ती प्रसिद्ध होईल का, हेही माहिती नव्हते. मात्र, त्यांनी ती ‘मोहिनी’ दिवाळी अंकात प्रसिद्ध केली. अंतरकरांनी माझा लेखनाचा आत्मविश्वास वाढवला. त्या काळात त्यांनी मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ‘षटकार’मध्ये मी ‘गुगली’ हे सदर चालवलं ते निखिल वागळे यांच्या आग्रहामुळे. मला अजिबात आत्मविश्वास नव्हता, की मी असं काही सदर वगैरे लिहू शकेन; मात्र, वागळेंना होता. नंतर वृत्तपत्रांत साप्ताहिक सदरंही चालविली. पुढं त्याची पुस्तकं झाली. ‘गंगाधर टिपरे’सारखी मालिकाही आली. मुंबई आकाशवाणीवरच्या माधव कुलकर्णींनी मला मुलांसाठी श्रुतिका लिहायला सांगितली. त्यातून ‘बोक्या सातबंडे’ची निर्मिती झाली. पुढे ‘राजहंस’ने त्याची पुस्तकं आणली. पुस्तकांसाठी त्या कथा नव्याने लिहिल्या. त्या पुस्तकांच्या आवृत्त्यांमागून आवृत्त्या निघाल्या, एवढा ‘बोक्या’ लोकप्रिय झाला. त्यावर पुढे मराठी चित्रपटही आला.

प्रश्न - एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून तुम्ही अतिशय समृद्ध आयुष्य जगलात. कुठलाही माणूस आपलं आयुष्य असं रसरशीतपणे जगू शकतो. त्यासाठी त्यानं काय करायला हवं?

दिलीप प्रभावळकर : मी कलाकार म्हणून किंवा सर्वसामान्य माणूस म्हणूनही जगताना एका आस्वादकाच्या भूमिकेतून जगलो. तुम्हाला जगण्यातल्या निरनिराळ्या पैलूंमध्ये रुची हवी. कुतूहल हवं. मला जुन्या हिंदी गाण्यांची आवड आहे. मी साठ-सत्तरच्या दशकांतली हिंदी गाणी कितीही वेळ ऐकू शकतो. मला क्रिकेटमध्ये - त्यातही कसोटी, आयपीएलशी माझी जरा खुन्नस आहे - अतिशय रुची आहे. मी क्रिकेटवर, खेळाडूंवर भरपूर लिहिलंही आहे. मी नवनव्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अलीकडंच मी सोशल मीडियावर माझं अकाउंट सुरू केलं आहे. खरं तर मला त्यातलं तांत्रिक फारसं काही कळत नाही. मात्र, अलीकडच्या काळात जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचं ते प्रभावी साधन आहे, यात शंका नाही. त्यामुळं मी आता तेही करून पाहतो आहे. एकूण आयुष्याकडं आस्वादकाच्या दृष्टीतून पाहिलं आणि तसंच रसरशीतपणे जगलं तर एकूण माणसाचं जगणं आनंददायी होऊ शकेल, असं मला वाटतं. 

---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, ३ ऑगस्ट २०२५)

---

21 Aug 2025

रूपेरी पडद्याचे मानकरी - सोहराब मोदी

रूपेरी पडद्याचे मानकरी - - सोहराब मोदी
--------------------------------------------------

(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी पडद्याचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी सोहराब मोदी यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)

श्रोते हो, नमस्कार...

भारतीय चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांत ज्या कलाकारांनी या जगतावर आपला अमीट ठसा उमटवला, त्यात सोहराब मोदी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. मूकपटांच्या काळापासून ते अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत केवळ चित्रपट निर्मितीचा ध्यास घेणारे सोहराब मोदी यांनी आपल्या कारकिर्दीच्या ऐन भरात अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. त्यांची ‘मिनर्व्हा मूव्हीटोन’ ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली एक महत्त्वाची चित्रपट निर्मिती संस्था ठरली. १९४१ मध्ये आलेला पृथ्वीराज कपूर यांचा ‘सिकंदर’ हा त्यातला सर्वांत महत्त्वाचा आणि गाजलेला चित्रपट म्हणावा लागेल. त्यांच्या ‘मिर्झा’ गालिब या १९५४ मध्ये आलेल्या चित्रपटानं तर सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिलं जाणारं राष्ट्रपतीचं सुवर्णकमळही जिंकलं होतं. अभिनेत्री सुरैया हिनं या चित्रपटात गायिलेल्या उत्तमोत्तम गाण्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही प्रभावित केलं होतं. या दोन चित्रपटांखेरीज ‘खून का खून’, ‘पुकार’, ‘पृथ्वी वल्लभ’, ‘झाँसी की रानी’, ‘जेलर’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. सोहराब मोदी यांनी अभिनेता म्हणूनही अनेक चित्रपटांत काम केलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील अगदी सुरुवातीच्या काळातील ‘शो-मॅन’ असंच त्यांचं वर्णन करावं लागेल.
श्रोते हो, सोहराब यांचं पूर्ण नाव होतं सोहराब मेरवानजी मोदी. त्यांचा जन्म दोन नोव्हेंबर १८९७ रोजी मुंबईत एका पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या आई-वडिलांना एकूण १२ मुलं होती. त्यातले सोहराब हे अकरावं अपत्य. सोहराब केवळ तीन वर्षांचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांचे वडील तत्कालीन ब्रिटिश अमदानीतील भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. सोहराब यांचं बालपण उत्तर प्रदेशातल्या रामपूर इथं गेलं. त्यांचा सांभाळ त्यांच्या मामांनी केला. उत्तर प्रदेशातल्या वास्तव्यामुळं लहानपणीच त्यांना हिंदी आणि उर्दू या भाषांची गोडी लागली. नंतर झालं असं, की शालेय शिक्षण झाल्याबरोबर सोहराब यांनी त्यांच्या प्राचार्यांना ‘मी पुढं कशात करिअर करू?’ असं विचारलं होतं. त्यांच्या प्राचार्यांनी सांगितलं, की तुझा आवाज अतिशय चांगला आहे. त्यामुळे तू एक तर राजकारणात जा किंवा अभिनय क्षेत्रात जा. सोहराब यांनी अर्थात सिनेमात जाण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी सोहराब यांनी त्यांचे मोठे भाऊ केकी यांच्यासह फिरते चित्रपट प्रदर्शक म्हणून काम सुरू केलं. ग्वाल्हेरच्या टाऊन हॉल इथं हे दोन भाऊ चित्रपट दाखवीत असत. याच काळात सोहराब मोदींना नाटकवेडानं झपाटून टाकलं. हे नाट्यप्रेम पुढं आयुष्यभर कायम राहिलं. आज हे ऐकून आश्चर्य वाटेल; पण बघा, वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांनी आर्यसुबोध थिएटर कंपनी स्थापन केली. भावाबरोबर त्यांनी भारतभर फिरून पारसी रंगभूमीवरचा नट म्हणून चांगलं नाव कमावलं. विशेषत: शेक्सपिअरची नाटकं सादर करण्यात या कंपनीची खासियत होती. सोहराब यांच्यावरही शेक्सपिअरच्या नाटकांचा खूप प्रभाव पडला. नाटकाचा पडदा पडला, तरी प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत असत. या टाळ्यांनी, या कौतुकामुळं सोहराब यांचं नाट्यकलेवरचं प्रेम अधिकच वाढत गेलं. याच काळात काही मूकपटांतही अभिनेता म्हणून त्यांनी नशीब आजमावलं.
श्रोते हो, आपण त्या काळाची कल्पना करा. विसाव्या शतकातील तिसऱ्या दशकात भारतात एकीकडं ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य लढा जोर धरू लागला होता आणि दुसरीकडं सिनेमाची कला दिवसेंदिवस प्रगती करत होती. तो काळ नाट्यकलेचा सुवर्णकाळ होता. बंगाल, महाराष्ट्र आदी राज्यांत अनेक दिग्गज कलाकार रंगभूमी गाजवत होते. महाराष्ट्रात केशवराव भोसले, बालगंधर्वांमुळं संगीत रंगभूमीही जोरात होती. त्याच जोडीला मूकपटांची निर्मितीही जोरात सुरू झाली होती. मुंबई हे या नव्या चित्रपटकलेची अनभिषिक्त राजधानी ठरली होती. तिकडं उत्तरेत लाहोरलाही चित्रपटसृष्टी आकार घेत होती. या वातावरणात सोहराब मोदींनी देशभर फिरून रंगभूमी गाजवली आणि त्याच जोडीला सिनेमा या तंत्राधिष्ठित आधुनिक कलेनंही त्यांचं लक्ष वेधून घेतलं.
रसिक हो, काळ झपाट्यानं पुढं सरकत होता. १९३२ हे वर्ष उजाडलं. ‘आलमआरा’ या चित्रपटाद्वारे भारतात बोलपटांचं युग सुरू झालं. नाही म्हटलं तरी तत्कालीन नाटकांना याचा फटका बसू लागला. महाराष्ट्रासह सर्व देशातच रंगभूमी आणि नाट्यव्यवसाय काहीसा मागे पडू लागला. भारतातील बहुसंख्य जनता बोलपटांच्या प्रभावाने वेडावून गेली. चाणाक्ष सोहराब मोदींनी बदललेल्या काळाची ही पावलं ओळखली. त्यांनी १९३५ मध्ये स्टेज फिल्म कंपनी स्थापन केली. या कंपनीद्वारे तयार करण्यात आलेले पहिले दोन चित्रपट नाटकांवरूनच घेण्यात आले होते. यातील पहिला चित्रपट ‘खून का खून’ शेक्सपिअरची अजरामर शोकांतिका ‘हॅम्लेट’वरून घेण्यात आला होता. मेहदी हसन एहसान यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. त्यासाठी त्यांनीच लिहिलेल्या ‘हॅम्लेट’च्या उर्दू रूपांतरित नाटकाचा आधार घेण्यात आला होता. त्यानंतर १९३६ मध्ये आलेला ‘सैद-ए-हवस’ हा चित्रपट शेक्सपिअरच्या ‘द लाइफ अँड डेथ ऑफ किंग जॉन’ या नाटकावरून प्रेरित होता. मात्र, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर साफ कोसळले.
खरं म्हणजे एवढ्या अपयशानं कुणीही हाय खाल्ली असती. पण या अपयशानं खचून न जाता सोहराब मोदींनी १९३६ मध्ये ‘मिनर्व्हा मूव्हीटोन’ या पुढे प्रसिद्धीस पावलेल्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. या बॅनरखाली पुढे भविष्यात अनेक उत्तमोत्तम सिनेमे तयार होणार होते आणि इतिहास घडणार होता. नाटकावरून चित्रपट तयार करण्याचा नाद सोडून सोहराब यांनी आपल्या पुढील चित्रपटांसाठी समकालीन विषयांची निवड केली. सुरुवातीला त्यांना अपयश आलं. इथं श्रोते हो, त्याबाबतचा एक किस्सा नक्की ऐकण्यासारखा आहे. सोहराब यांनी १९३७ मध्ये ‘आत्मा तरंग’ नावाचा चित्रपट काढला होता. तो फ्लॉप झाला. त्यामुळं सोहराब दु:खात होते. एके दिवशी चार व्यक्ती थिएटरमध्ये हा चित्रपट बघून बाहेर पडत असताना त्यांना सोहराब दिसले. त्या चौघांनी यांना विचारलं, की आपणच सोहराब मोदी का? त्यावर सोहराब दु:खी चेहरा करून म्हणाले, ‘होय, मीच तो दुर्दैवी.’ त्यावर त्या चौघांपैकी एक जण सोहराब यांना म्हणाले, की आपण असं का म्हणता? आपण अशाच सामाजिक प्रश्नांवर चित्रपट तयार करीत राहा. एक ना एक दिवस आपल्याला खूप मोठं यश मिळेल. हे ऐकल्यावर सोहराब आनंदित झाले. नंतर त्यांना कळलं, की ते चौघे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. अशा लोकांकडून शाबासकी मिळाल्यामुळं सोहराब यांनी नव्या उत्साहानं पुढील चित्रपट निर्मिती हाती घेतली.
त्यांचा ‘मीठा जहर’ हा १९३८ मध्ये आलेला चित्रपट दारूच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन करणारा होता, तर त्याच वर्षी आलेला ‘तलाक’ हा चित्रपट तत्कालीन समाजातील घटस्फोटांची समस्या मांडणारा होता. १९३९ मध्ये आलेला ‘पुकार’ हा ऐतिहासिक चित्रपट बादशहा जहाँगीरच्या न्यायकाट्याच्या कसोटीच्या दंतकथेवर आधारित होता. यात स्वत: सोहराब यांनी संग्रामसिंह या राजपुताची भूमिका केली होती. यानंतर १०४० मध्ये आलेल्या ‘भरोसा’ या चित्रपटात सोहराब यांनी एका अतिशय धाडसी विषयाला हात घातला होता. एक बहीण व भाऊ अज्ञानातून एकमेकांच्या प्रेमात पडतात, असा तो विषय होता. मजहर खान, चंद्रमोहन आणि सरदार अख्तर यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. ‘फिल्म इंडिया’चे संपादक बाबूराव पटेल एरवी सोहराब यांच्या चित्रपटांना लक्ष्य करीत. मात्र, त्यांनीही ‘भरोसा’चं वर्णन ‘एक चांगला चित्रपट’ असं केलं होतं.
श्रोते हो, अशा पद्धतीनं सोहराब यांची घोडदौड सुरू होती. तोवर त्यांच्या चित्रपटांनी चांगलं यश मिळवलं असलं, तरी सोहराब मोदींना आकर्षण होतं ते ऐतिहासिक विषयांचं. यानंतर आलेली त्यांची पुकार, सिकंदर आणि पृथ्वी वल्लभ ही चित्रत्रयी त्यांच्या इतिहासप्रेमाची साक्ष आहे. यातला पुकार चित्रपट पडद्यावर आला १९३९ मध्ये, ‘सिकंदर’ आला १९४१ मध्ये, तर ‘पृथ्वी वल्लभ’ प्रदर्शित झाला १९४३ मध्ये. यातही सर्वाधिक गाजला तो पृथ्वीराज कपूर यांना सिकंदराच्या भूमिकेत अजरामर करणारा चित्रपट ‘सिकंदर’.
यातला पहिला चित्रपट ‘पुकार’ मुघल बादशहा जहाँगीर याच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटाची बरीचशी दृश्यं प्रत्यक्ष राजवाड्यांत, महालांत चित्रित करण्यात आली होती. त्यामुळे त्याची भव्यता प्रेक्षकांना दिपवून गेली. तेव्हाचे प्रसिद्ध स्टार चंद्रमोहन आणि नसीम बानो यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. याच नसीम बानोशी नंतर सोहराब यांनी लग्न केलं.
यानंतर सोहराबची मोदींच्या जीवनातील सर्वांत भव्य, गाजलेला चित्रपट ‘सिकंदर’ आला. यात जगज्जेत्या सिकंदराच्या भूमिकेने पृथ्वीराज कपूर यांना अजरामर केले. स्वत: मोदी यांनी यात पोरस राजाची भूमिका केली होती. सोहराब मोदींनी ‘सिकंदर’च्या निर्मिती खर्चात कोणतीही कसूर ठेवली होती. मोठमोठे सेट्स. श्रीमंती थाट, उत्तम निर्मिती मूल्ये यामुळं ‘सिकंदर’ हा एक भव्य-दिव्य चित्रपट ठरला. यातील युद्धाच्या दृश्यांनी तर या चित्रपटाची तुलना तत्कालीन हॉलिवूडमधील युद्धपटांशी केली गेलो. या चित्रपटाने पृथ्वीराज कपूर आणि मोदी या दोघांनाही ऐतिहासिक यश आणि यशस्वी प्रतिमा मिळवून दिली. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. महात्मा गांधी यांचे असहकार आंदोलन देशभरात जोरात होते. अशा वेळी ‘सिकंदर’ने भारतीय प्रेक्षकांच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग आणखी चेतवले. ब्रिटिशांच्या तत्कालीन बॉम्बे सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट संमत केला असला, तरी नंतर काही लष्करी कँटोन्मेंटमधील थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवण्यास बंदी घालण्यात आली. असं असलं तरी या चित्रपटाची लोकप्रियता दीर्घकाळ कायम राहिली. गोवा मुक्ती आंदोलनाच्या वेळी, म्हणजे १९६१ मध्ये दिल्लीत हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये लावण्यात आला होता. 

या चित्रत्रयीतला तिसरा चित्रपट म्हणजे ‘पृथ्वी वल्लभ’ हा कन्हैयालाल मुन्शी यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता. यात स्वत: सोहराब मोदी नायकाच्या, तर दुर्गा खोटे नायिका राणी मृणावलतीच्या भूमिकेत होत्या. या दोघांच्या अभिनयाच्या जुगलबंदीची तेव्हा चर्चा झाली होती. चित्रपट तयार करत असले तरी मोदी यांचं नाट्यप्रेम या सर्व काळात शाबूत होतं. पारसी थिएटर तगविण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले. चित्रपटरसिकांनीही मोदी यांच्यावर तेवढंच प्रेम केलं.
रसिक हो, याबाबतचा एक किस्सा सांगतात तो आपल्याला इथं सांगायलाच हवा. त्याचं असं झालं, की १९५० मध्ये मोदी यांचा शीशमहल हा चित्रपट मुंबईत मिनर्व्हा थिएटरमध्ये सुरू होता. तेव्हा स्वत: मोदी एका खेळाला थिएटरमध्ये उपस्थित होते. तेव्हा त्यांनी पाहिलं, की पहिल्या रांगेत एक माणूस डोळे बंद करून बसला आहे. या माणसाला सिनेमा आवडला नसेल आणि त्यामुळे तो झोपला असेल, असं समजून मोदींना जरा वाईट वाटलं आणि त्यांनी त्या माणसाचे तिकिटाचे पैसे परत करा आणि त्याला थिएटरमधून जाऊ द्या, असं सांगितलं. त्यावर त्यांना सांगण्यात आलं, की तो माणूस अंध आहे. मात्र, केवळ मोदी यांचे संवाद ऐकण्यासाठी तो थिएटरमध्ये येतो. हे ऐकल्यावर मोदींना गहिवरून आलं.
मोदींच्या नावे अनेक विक्रम आहेत. भारतातील पहिला टेक्निकलर चित्रपट 'झांसी की रानी'साठी त्यांनी हॉलिवूडमधून तंत्रज्ञ बोलावले होते. त्यात ‘गॉन विथ द विंड’ या जगप्रसिद्ध चित्रपटाचे कॅमेरामन अर्नेस्ट हॉलर यांचाही समावेश होता. हा चित्रपट एकाच वेळी हिंदी व इंग्लिश भाषेत तयार करण्यात आला होता. ‘द टायगर अँड द फ्लेम’ असं इंग्लिश चित्रपटाचं शीर्षक होतं. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या वेळी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचलणाऱ्या झाशीच्या तरुण राणीची भूमिका मेहताबने साकारली होती. मोदींनी राणीचे प्रमुख सल्लागार असलेल्या राजगुरूंची भूमिका साकारली होती. हा चित्रपटही त्यातल्या भव्य युद्धदृश्यांसाठी वाखाणला गेला. ऐतिहासिक घटनांचं नेमकं व यथार्थ चित्रण, भव्य सेट्स आणि मेहताबच्या अभिनयासाठी हा चित्रपट गाजला. झाशीच्या राजवाड्यातील अनेक प्रसंग उत्कृष्टपणे चित्रित करण्यात आले होते.  त्यासाठी सोहराब यांनी त्यांचे कला दिग्दर्शक रुसी बँकर आणि पंडित दुबे यांना झाशीचा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर प्रत्यक्ष पाहण्यासाठी पाठवलं होतं. यातील युद्धाची दृश्यं कोल्हापुरात चित्रित करण्यात आली होती. मोदींना आपल्या पात्रांमधील भावोत्कटतेचे खूप आकर्षण होते. त्यांनी अतिशय मनापासून हा चित्रपट तयार केला होता. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने मोदींना मोठा फटका बसला. त्यामुळं त्यांना ‘मिनर्व्हा मूव्हीटोन’ ही आपली कंपनी कर्जापायी गहाण ठेवावी लागली होती.
श्रोत हो, असं असलं तरी सोहराब मोदी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. ‘मिर्झा गालिब’ या १९५४ मधल्या चित्रपटातून त्यांनी दणदणीत पुनरागमन केलं. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याच्या कारकिर्दीत होऊन गेलेल्या गालिबवर आधारित या चित्रपटाला १९५४ चे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले. ‘मिर्झा गालिब’मध्ये शीर्षक भूमिका भारतभूषणने केली होती. नायिका सुरैया होती. तिच्या गाण्यांमुळेही हा सिनेमा गाजला. ‘आह को चाइहिये एक उमर’, ‘नुक्ताचीन है गम-ए-दिल’, ‘दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है’, ‘ये न थी हमारी किस्मत’ अशी यातली तिची सगळीच गाणी खूप गाजली. भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनाही हा चित्रपट भावला. सुरय्याने मिर्झा गालिबला जणू जिवंत केल्याचे सांगून नेहरूंनी तिचे कौतुकही केलं होतं. ‘तुमने मिर्झा गालिब की रूह को जिंदा कर दिया,’ असे त्यांचे नेमके शब्द होते.
श्रोते हो, त्या काळात चित्रपट निर्मितीसाठी स्टुडिओची व्यवस्था होती. मुंबईत मोठमोठे स्टुडिओ तेव्हा कार्यरत होते. सोहराब मोदींची कंपनीही अशाच भव्य-दिव्य चित्रपटांसाठी प्रसिद्ध होती. पन्नासच्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम कलाकार येऊन दाखल होत होते. सर्वांनाच काही ना काही करून दाखवायचं होतं. या कलाकारांच्या डोळ्यांतली स्वप्नं सिनेमाच्या रूपेरी पडद्यावर मूर्त होऊन अवतरत होती. प्रेक्षकांना वेगळ्याच स्वप्नसृष्टीत नेत होती. अशाच वेड्या मंडळींपैकी एक ‘सपनों का सौदागर’ होते सोहराब मोदी.
श्रोते हो, काळ झपाट्यानं पुढं चालला होता. १९४७ मध्ये आपला देश इंग्रजांच्या राज्यापासून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच सर्व देशात उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण पसरलं होतं. प्रत्येक क्षेत्राला नवनिर्मितीचा ध्यास होता. हिंदी चित्रपटसृष्टीही याला अपवाद नव्हती. या काळात सिनेमानिर्मितीचा वेग वाढला. राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद या त्रयीचं राज्य सुरू झालं. स्टुडिओंचं महत्त्व शाबूत असलं, तरी चित्रपटांचे विषय बदलत होते. आता पौराणिक आणि ऐतिहासिक सिनेमांचा काळ जरा मागं पडून, सामाजिक, कौटुंबिक आणि रोमँटिक चित्रपटांना मागणी वाढू लागली. सोहराब मोदीही या काळात आपली कलेवरची निष्ठा कायम टिकवून होते. यानंतर सोहराब यांनी ‘नौशेरवान-ए-आदिल’ हा १९५७ मध्ये आलेला आणि ‘समय बडा बलवान’ हा १९६९ मध्ये आलेला चित्रपट असे काही चित्रपट तयार केले. हे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले असले, तरी या चित्रपटांमध्ये मोदींच्या आधीच्या चित्रपटांसारखी जादू नव्हती, असं चित्रपट अभ्यासकांचं मत होतं. त्यातल्या त्यात ‘जेलर’  या १९५८ मध्ये आलेल्या चित्रपटाची चर्चा झाली. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सोहराब यांनी १९३८ मध्ये तयार केलेल्या आपल्याच याच नावाच्या चित्रपटाचा २० वर्षांनी रिमेक केला होता. या चित्रपटात, मोदींनी एका विवेकी माणसाचे रूपांतर अत्याचारी माणसात कसं होतं, याचं प्रत्ययकारी चित्रण केलं होतं. यातील नायकाची भूमिका स्वत: सोहराब यांनीच केली होती. पहिल्या चित्रपटात त्यांच्या पत्नीची भूमिका लीला चिटणीस यांनी केली होती, तर २० वर्षांनी आलेल्या दुसऱ्या चित्रपटात कामिनी कौशल यांना नायिकेची भूमिका देण्यात आली होती. नायकाला त्याच्या पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय असतो. या संशय पिशाच्चामुळं एका विवेकी माणसाचं रूपांतर एका ‘राक्षसा’त कसं होतं, हे यात मोदींनी दाखवलं होतं. एका अर्थानं हा सायको-थ्रिलर प्रकारचा सिनेमा होता. १९५८ मध्ये आलेल्या चित्रपटाला मदनमोहन यांचं संगीत होतं. यातलं ‘हम प्यार में जलनेवालों को चैन कहाँ आराम कहाँ’ हे गाणं अतिशय प्रसिद्ध आहे.
त्यांच्या शेवटच्या काही हिट चित्रपटांमध्ये कुंदन (१९५५), राजहट (१९५६) आणि मेरी बिवी मेरे बच्चे (१९६०) यांचा समावेश होता. यातला ‘कुंदन’ हा चित्रपट व्हिक्टर ह्यूगो यांच्या ‘ला मिझराबल’ या जगप्रसिद्ध कादंबरीवर आधारित होता. पं. सुदर्शन यांनी या चित्रपटाचं लेखन केलं होतं. यातील ‘कुंदन’ ही शीर्षक भूमिका स्वत: सोहराब यांनी साकारली होती.
प्रत्यक्ष चित्रपट निर्मिती बंद केल्यानंतरही, सोहराब मोदींनी चित्रपट बनवण्याचा विचार कधीच सोडला नाही. १९८२ मध्ये, जेव्हा ते ८५ वर्षांचे होते) आणि त्यांना अगदी हालचाल करणेही कठीण होते, तरीही त्यांनी ‘गुरुदक्षिणा’ नामक चित्रपटाचा मुहूर्त केला होता. त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, लोकांनी चित्रपटाच्या त्यांच्या वेडाचा गैरफायदा घेतला. अनेकांना त्यांनी आगाऊ पैसे दिले आणि ते कधीही वसूल झाले नाहीत. यात त्यांना खूप पैसे गमवावे लागले. ‘गुरुदक्षिणा’ चित्रपटाच्या 'मुहूर्ता'नंतर दोनच दिवसांनी सोहराब मोदी आजारी पडले आणि नंतर कधीच बरे झाले नाहीत. त्यांना कर्करोगानं ग्रासलं आणि त्यातच मुंबईत २८ जानेवारी १९८४ रोजी त्यांचं निधन झालं. पुढे १९८६ मध्ये त्यांच्या पत्नीने दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, की सोहराबला फक्त चित्रपट निर्मितीचं वेड होतं आणि खरं तर त्यांना इतर कोणत्याही गोष्टीत रस नव्हता. अंगात अतिशय ताप असतानाही सोहराब चित्रपटाचं शूटिंग करत असत आणि अजिबात सुट्टी घेत नसत.
सोहराब यांचं वैयक्तिक आयुष्य एखाद्या टिपिकल सिनेमा नटासारखंच होतं. नसीम बानोसोबतचं नातं संपल्यानंतर सोहराब मोदींनी त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री मेहताबशी २८ एप्रिल १९४६ रोजी तिच्या वाढदिवशी लग्न केलं. सोहराब त्या वेळी ४८ वर्षांचे होते. मेहताब यांचा जन्म गुजरातमधील एका मुस्लिम कुटुंबात झाला आणि त्यांनी सोहराब दिग्दर्शित 'परख' (१९४४) या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. सोहराब यांच्या मोठ्या भावानं त्यांना श्री रामकृष्ण परमहंसांबद्दल माहिती दिली. याशिवाय माता श्री शारदादेवींचेही मार्गदर्शन ते घेत असत. त्यांनी सोहराब यांना त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात कलकत्त्यातील उद्बोधन इथं दीक्षा दिली होती.
रसिक हो, सोहराब मोदी स्वभावानं दिलदार होते. ‘मुघले आझम’बाबतचा त्यांचा एक किस्सा याची साक्ष देतो. ‘मुघले आझम’च्या निर्मितीतील विलंबामुळं या चित्रपटाला वित्तपुरवठा करणाऱ्या शापूरजी पालनजी या कंपनीने चित्रपटाचं दिग्दर्शन सोहराब मोदी यांच्याकडं देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कंपनीच्या ड्रायव्हरने सोहराब यांना के. असीफ यांच्या या चित्रपटाच्या अफाट वेडाविषयी व दातृत्वाविषयी सांगितलं. ते ऐकल्यावर सोहराब यांना वाटलं, की नाही. या सिनेमाचं दिग्दर्शन आपण नाही, तर के. असीफनंच केलं पाहिजे. त्यांनी नंतर ‘शापूरजी पालनजी’ला हे पटवून दिलं आणि ‘मुघले आझम’च्या दिग्दर्शनाची सूत्रं असीफकडंच राहिली. पुढं त्या चित्रपटानं काय इतिहास घडवला हे आपल्याला माहिती आहेच.
अशा या सिनेमाचे सच्चे प्रेमी असलेल्या दिलदार सोहराब मोदींना १९८० मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ते या पुरस्काराचे दहावे मानकरी होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय चित्रपटसृष्टीनं जे ‘शोमॅन’ बघितले, त्यातल्या या बिनीच्या शिलेदाराला अभिवादन...!

---

(आकाशवाणीवर प्रसारित झालेला, निवेदक प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केलेला भाग आता यूट्यूबवर ऐका.)

हा भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

---

सोहराब मोदी यांच्या ‘जेलर’ चित्रपटातील एक लोकप्रिय गीत ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

लता मंगेशकर यांच्यावरील भागाची संहिता वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---------

13 Jul 2025

फुलपाखरू - प्रस्तावना व परीक्षण

फुलपाखरू प्रस्तावना व परीक्षण
------------------------------------------------------

माझं ‘फुलपाखरू’ हे कुमारकथांचं पुस्तक मे महिन्यात प्रकाशित झालं. या पुस्तकाला प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका विभावरी देशपांडे हिनं प्रस्तावना लिहिली आहे. ही प्रस्तावना आणि सोबत या पुस्तकाचं साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका-कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी ‘मटा’साठी केलेलं परीक्षण...

----

मुलांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन

विभावरी देशपांडे

‘करील मनोरंजन जो मुलांचे जडेल प्रभूशी नाते तयाचे’ ही सानेगुरुजींची उक्ती आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आपण त्या दर्जेदार, मूल्याधिष्ठित साहित्यावर वाढलोही आहोत. पण आजही बालसाहित्याला, बालनाट्याला आणि बालचित्रपटांना मुख्य प्रवाहात महत्वाचं स्थान मिळत नाही. तरीही त्या निर्मितीतून मिळणारा  निखळ आनंद आणि बालप्रेक्षकांचं, बालवाचंकांचं भरभरून मिळालेलं प्रेम माझ्यासारख्या मुलांसाठी काम करणाऱ्यांना हवंहवंसं वाटतं.
लहान मुलांसाठी लिहिताना आपल्या आतलं मूल जागं करावं लागतं. लहान मुलाचा निरागसपणा, प्रचंड कुतूहल, निस्सीम प्रेम करण्याची क्षमता, कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय जगाकडे बघण्याची वृत्ती  ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्याच आत जाऊन  शोधाव्या लागतात. लहान मुलांच्या  नजरेतून जगाकडे बघावं लागतं. नाहीतर आपलं लिखाण अप्रामाणिक आणि उपरं वाटू लागतं. श्रीपादच्या कथांमध्ये मला जाणवलेली आणि भावलेली ही एक महत्वाची गोष्ट आहे. श्रीपादच्या स्वभावातच त्यानी त्याच्या आत जपून ठेवलेलं एक मूल आहे. माणूस म्हणून त्याच्यात  असलेला उत्साह, प्रेम करण्याची, माणसं जोडण्याची वृत्ती त्याच्या ह्या कुमारकथांमध्ये तंतोतंत उतरली आहे.
ह्या कथांची भाषा साधी आणि ओघवती आहे. मुलांचं जग काही आपल्या जगापेक्षा वेगळं नसतं. आपल्याच भवतालात ती जगत असतात. फक्त त्यांचा दृष्टीकोन, निरीक्षण आणि जाणिवा वेगळ्या असतात. श्रीपादनी नेमकं हेच अचूक पकडलं आहे. त्याच्या कथांमधली मुलं ह्याच जगातली आहेत. त्यांचा भवताल हाच आहे. पण त्यात ती काय पाहतात, काय अनुभवात आणि त्यातून त्यांचा भावनिक, मानसिक प्रवास काय होतो हे ह्या कथा आपल्यासमोर हळूच उलगडतात. मग पौगंडावस्थेतल्या मुलीला जाणवणारा एकटेपणा, त्यातून तिची एका कृत्रिम यंत्राशी झालेली तात्पुरती मैत्री आणि त्यातली भावनाशून्यता जाणवल्यावर परत माणसांच्या जगापर्यंत तिचा झालेला प्रवास ही कथा असो किंवा लहान गावातल्या, सामान्य परिस्थितील्या एका मुलाच्या आयुष्यात एक दिवस काहीतरी अद्भुत घडल्याची कथा असो, ह्या कथांनी कुमार वयातल्या मुलामुलींचं संवेदनशील मन खूप छान पकडलं आहे. त्यात विषयांचं, सामाजिक, भौगोलिक वास्तवाचं वैविध्य आहे. आणि मुख्य म्हणजे मुलांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन आहे.
कथा लांबलचक नाहीत. मोजक्या शब्दांत एक संपूर्ण अनुभव देणाऱ्या आहेत. त्यात केंद्रस्थानी कुमार वयातली मुलं आहेत. घटना, प्रसंग प्रौढांच्या जगातले असले तरी ती फक्त पार्श्वभूमीच राहते. कथा घडते ती मुलांच्या तात्कालिक भावविश्वातच. तरीही ह्या कथा मोठ्यांसाठीही रंजक होतात कारण मुलांचा दृष्टिकोन आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जातो.
आजच्या काळात पुढची पिढी मराठी भाषेपासून दूर जात असताना मुलांसाठी मराठीत उत्तम साहित्य निर्माण होणं, त्याची भाषा सुयोग्य आणि सुंदर असणं ही अपरिहार्यता   आहे. श्रीपादसारख्या अचूक आणि उत्तम मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लेखकांनी अशी साहित्यनिर्मिती करणं म्हणजे भाषा टिकवण्यासाठी उचललेले उत्तम पाऊल आहे असं मला वाटतं.
श्रीपादनी मुलांसाठी अधिकाधिक लिहीत राहावं. तो ते करीलच. माझ्याकडून ह्या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा.

-----------

फुलपाखरू परीक्षण
-------------------------

मुलांच्या मनात शिरून लिहिलेल्या कथा

डॉ. संगीता बर्वे

मोठी माणसं जेव्हा जेव्हा आपलं बालपण आठवतात तेव्हा ते त्यात रमून जातात. मग ते म्हणू लागतात, किती छान होतं ना आपलं बालपण... अगदी फुलपाखरासारखं!
आता मात्र अगदी उलट झालंय. माणसं मोठी झाल्यावर त्यांचा सुरवंट होत जातो आणि ती आपापल्या कोशात जातात. त्यांना अनेक कंगोरे फुटतात. जगण्यातले अनेक काटे त्यांच्या आणि दुसऱ्यांच्या अंगाला टोचू लागतात. मग मोठी माणसं म्हणू लागतात की रम्य ते बालपण... ते बालपण आपल्याला परत मिळाले पाहिजे.
खऱ्या खऱ्या फुलपाखराचं मात्र माणसापेक्षा वेगळं असतं… ते आधी सुरवंट असतं आणि नंतर त्याचं रूपांतर रंगीत फुलपाखरात होतं. मोठ्या माणसांची काही वेळा गडबड होऊन जाते. आधीचं फुलपाखरासारखं जगणं नंतर सुरवंटासारखं काटेरी होऊन जातं.
श्रीपाद ब्रह्मे यांनी मात्र आपलं बालपण अजूनही तसंच छान जपलं आहे. मुलांसाठी त्यांनी छान छान गोष्टी लिहिल्या आहेत. आणि बुकगंगा पब्लिकेशन्सनं सुबकपणे पुस्तकरूपात त्या मुलांपर्यंत पोहोचवल्याही आहेत. मुलांसाठी कुमारकथा लिहिणारे लेखक हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकेच असावेत.  श्रीपाद ब्रह्मे यांनी 'फुलपाखरू' या कथासंग्रहामध्ये ‘सुरवंटाचे फुलपाखरू होतानाच्या कुमारकथा’ लिहून ही उणीव भरून काढली आहे.
‘लहान मुलांसाठी लिहिताना आपल्या आतलं मूल जागं करावं लागतं. लहान मुलांचा निरागसपणा, प्रचंड कुतूहल, निस्सीम प्रेम करण्याची क्षमता, कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय जगाकडे बघण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्याच आत जाऊन शोधाव्या लागतात; नाही तर आपलं लिखाण अप्रामाणिक आणि उपरं वाटू लागतं,’ असं अभिनेत्री आणि लेखिका विभावरी देशपांडे यांनी ‘फुलपाखरू’च्या प्रस्तावनेत लिहिलं आहे. ते किती यथार्थ आहे हे ब्रह्मे यांच्या कुमारकथा वाचताना जाणवतं.
ब्रह्मे यांनी अतिशय विचारपूर्वक मुलांच्या मनात शिरून लिहिलेल्या या कथा आहेत. रायगड येथे सहलीला गेलेली सायली फुलपाखराच्या मागे धावता धावता रस्ता चुकते आणि मैत्रिणी पुढे गेल्यानंतर मनातून जरा घाबरते. मात्र, हळूहळू स्वतःला सावरत मनाशी म्हणते, की  जास्तीत जास्त काय होईल? आपल्याला न घेता तर हे लोक नक्कीच जाणार नाहीत. त्यांना कळलंही असेल की मी हरवलेय म्हणून… फुलपाखराच्या नादापायी आपण रस्ता चुकलो म्हणून…  तिला फुलपाखराचा खूप राग येतो. मात्र, ते किती मस्त उडतंय, तसं छान आपल्याला जगता यायला हवं असं तिला वाटून जातं. ती हळूच फुलपाखराजवळ जाते. फुलपाखरू पुढं आणि सायली मागं असं करता करता पाण्याचा आवाज येऊ लागतो आणि ती रेंजमध्ये आल्यामुळे तिचा मोबाइल खणखणतो. सायलीला रस्ता सापडतो.
'अपना टाईम आयेगा 'ही तर फारच भन्नाट गोष्ट आहे. डिजिटल घड्याळ हवं असणाऱ्या रघूला चक्क विराट कोहलीकडूनच अशा घड्याळाची भेट मिळते. कशी ते तुम्हाला गोष्टीतूनच वाचावं लागेल. गोष्टी वाचता वाचताच आपण गोष्टींच्या जंगलात कधी शिरतो हे कळतच नाही.
‘एक होतं जंगल. जंगलात काहीच नव्हतं मंगल. झाडे दु:खी, प्राणी दुःखी, नदी दुःखी, नद्यांमधले मासेही दुःखी... का बर बाबा असं?’ असा प्रश्न मुलांना नक्की पडेल आणि उत्सुकतेने ते पुढे वाचतील तर जंगलामधले प्राणी का दुःखी आहेत, याचे कारण कळल्यानंतर त्यांच्या मनात सुरू होणाऱ्या विचारांचं अत्यंत प्रभावी चित्रण ‘सेल्फी, सेल्फी सेल्फिश’ या कथेमध्ये लेखकाने रेखाटले आहे.
समुद्रदेवतेच्या वेशात दिसलेली सुशी, राधाच्या रेंजमध्ये आलेले आई-बाबा, गाड्यांचे नंबर पाठ करणारा डोंगरवाडीचा रघू... रघूच्या तर सगळ्याच करामती कुमार वाचकांना नक्की आवडतील; कारण लेखकाने खरोखरच मुलांच्या मनाचा विचार करून, मुलांच्या मनात शिरून त्यांच्या मनात काय चालले असावे याचा अभ्यास करून या गोष्टी लिहिल्या आहेत. तेव्हा छोट्या मित्रांनो , श्रीपाद ब्रह्मे यांचा ‘फुलपाखरू' हा कथासंग्रह तुम्ही नक्की वाचा आणि तुमच्या मनात ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टीरूपात आणण्याचा प्रयत्न करा असे जाता जाता सहज म्हणून सांगावेसे वाटते.

 …

फुलपाखरू
लेखक : श्रीपाद ब्रह्मे
प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
पृष्ठे : ११४, किंमत : १५० रुपये


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, १३ जुलै २०२५)

---

हे पुस्तक विकत घ्यायचे असल्यास इथे क्लिक करा...

----

11 Jul 2025

‘मेट्रो... इन दिनों’विषयी...

महानगरांतले ‘महासागर’
------------------------------


टायटॅनिक चित्रपटातला एक संवाद मला फार आवडतो. रोझ म्हणते - ए वुमन्स हार्ट इज ॲन ओशन ऑफ सिक्रेट्स... किती खरं आहे ते! मला वाटतं, केवळ स्त्रीच का, आपल्या सर्वांचीच हृदयं म्हणजे गुपितांचे महासागर असतात. अनुराग बासूच्या ‘मेट्रो... इन दिनों’मधली सगळी पात्रंही अशीच. हृदयात कसल्या कसल्या गुपितांचे - रागाचे, द्वेषाचे, तिरस्काराचे, व्यक्त न केलेल्या भावनांचे, अलोट प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आतल्या आत कुढण्याचे - महासागर बाळगणारी. हा सिनेमा बघण्याचं एक खास कारण होतं. याच दिग्दर्शकानं २००७ मध्ये आणलेल्या ‘ए लाइफ इन ए मेट्रो’ या चित्रपटानं तेव्हाच्या जाणिवांना चांगलाच हादरा दिला होता. आपला भवताल बदलतो आहे यात फार धक्कादायक नव्हतं; मात्र आपणही बदलतोय, आपल्या धारणाही बदलताहेत हे जाणवून जास्त हादरा बसला होता. आता १८ वर्षांनी त्या सिनेमाचा - कथानक म्हणून नव्हे; तर कथनाचा आत्मा म्हणून - जणू सीक्वेल असलेला हा सिनेमा कसा झाला असेल, हे पाहण्याची उत्सुकता होती. महानगरी जगण्यात आपण आपल्या भावभावनांचं व्यवस्थापन करताना (किंवा करता न आल्यानं म्हणा) जे काही घोळ घालून ठेवतो, त्या गोंधळाची - आतल्या अन् बाहेरच्या ‘केऑस’ची - ती कहाणी होती. आता १८ वर्षांनी तर काळ आणखीनच बदललाय. तेव्हा आकार घेत असलेली महानगरं आता अक्राळविक्राळ रूप धारण करून बिनचेहऱ्याची झाली आहेत. मॉलपासून मेट्रोपर्यंत सर्वत्र चकचकाट वाढला आहे, पण आपल्या आतला संवेदनांचा दिवा तेवतो आहे का? काहीच कळेनासं झालंय. आधीचा सिनेमा आला होता, तेव्हा सात वर्षांची असलेली पिढी आता पंचविशीत आहे. त्यांचं जगणं सुरुवातीपासूनच महानगरी आणि त्यामुळं सर्वच बाबतींत ‘केऑटिक’ आहे. मग त्यांचं आणि त्यांच्यासोबत जगत असलेल्या माझ्यासारख्या मधल्या पिढीचं आणि त्याहून मोठ्या म्हणजे सीनिअर्सचं जगणं आता कसं झालं आहे? मूलभूत भावना त्याच असल्या, तरी त्या हाताळण्यातला गोंधळ वाढला आहे की कमी झाला आहे? या आणि अशा सगळ्या प्रश्नांना भिडणारा ‘मेट्रो... इन दिनों’ या कारणांसाठी तरी बघायला हवा. एक प्रकारे आपणच आरशात बघितल्यासारखं हे आहे.
‘मेट्रो... इन दिनों’ चित्रपट चांगला मोठा आहे. तब्बल पावणेतीन तासांचा. दिग्दर्शकानं तब्येतीत यातली सगळी पात्रं उभी केली आहेत. अर्थात तब्बल आठ प्रमुख व्यक्तिरेखा असल्यानं त्यातही सर्वच्या सर्व पात्रं तितक्याच ताकदीनं ठसतात, असं नाही. काही जमली आहेत, तर काही फसली आहेत. उदा. पार्थ (आदित्य रॉय कपूर) या व्यक्तिरेखेचा संपूर्ण आलेख चांगला उभा राहिला आहे. वस्तुत: या व्यक्तिरेखेला सिनेमात नातेसंबंधांचा काहीच आगापिछा नाही. तरीही एक संपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून ते पात्र आपल्यासमोर नीट उभं राहतं. याउलट अनुपम खेरनं साकारलेला ज्येष्ठ नागरिक किंवा आकाश (अली फजल) ही पात्रं तेवढ्या परिपूर्णतेनं उभी राहत नाहीत. काजोल (कोंकणा सेनशर्मा) व माँटी (पंकज त्रिपाठी) यांच्या ट्रॅकला जरा जास्तच महत्त्व दिलंय. त्यामुळं तो ताणल्यासारखा झाला आहे, तर याउलट चुमकी (सारा अली खान) आणि काजोलची टीनएजर मुलगी यांचे ट्रॅक काहीसे अर्धवट राहिल्यासारखे झाले आहेत.
असं असलं तरी पहिल्या सिनेमाप्रमाणे यातही प्रीतम आणि त्याचा ऑर्केस्ट्रा महानगरांत, कुठे रस्त्यावर, कुठे टेरेसवर, कुठे पात्रांच्याच आजूबाजूला, कुठे पार्टीत गात गात सिनेमा पुढं नेतो. हा सिनेमा म्हणजे स्वतंत्रपणे एक ‘म्युझिकल’ आहे असं म्हणावं इतकं यातलं संगीत अविभाज्य आहे. यातले शब्द लक्षात राहिले नसले तरी सिनेमात ऐकताना ते चांगले वाटत होते. किंबहुना प्रत्येक पात्राची कहाणी या छोट्या छोट्या गाणुल्यांमधून आपल्यासमोर येते. कधी कधी या गाण्यांचा अतिरेकही होतो. त्यात संगीत प्रीतमचं असल्यामुळं ते कंठाळी आहे हेही वेगळं सांगायला नको. मात्र, असं असलं तरी या सिनेमात ते खपून गेलंय. या सिनेमातल्या पात्रांच्या मनात सुरू असलेला कल्लोळच जणू त्या कंठाळी वाद्यमेळांतून आपल्यावर आदळतोय, असंही वाटून गेलं. आता हे प्रीतमनं हेतुत: केलंय की नकळत झालंय ते आपल्या आपण ठरवावं.
सिनेमाच्या नावात ‘मेट्रो’ असल्यानं तो स्वाभाविकपणे भारतातल्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता व पुणे या पाच प्रमुख महानगरांत घडतो. (पुण्यात चुमकी व काजोलचं माहेर असलं, तरी ते एका घरापुरतंच दिसतं. सिनेमात मुंबई, कोलकता जसं ‘दिसतं’ तसं पुणे शहर ‘दिसत’ नाही. त्यामुळं ते इथं फक्त उल्लेखाच्या पातळीवरच राहतं.) याशिवाय या शहरी गोंगाटावर उतारा म्हणून कालका-शिमला ट्रेन आहे आणि समुद्राशिवायचा गोवाही आहे. याशिवाय बरंच काही आहे. महानगरी जगण्याची पार्श्वभूमी बऱ्याच फ्रेम्समधून दिसत राहते. मग ती मेट्रो असेल, उंच उंच इमारती असतील, कॉर्पोरेट ऑफिस असेल किंवा रस्त्यावरची वाहतूक असेल. कोलकत्यात ट्राम आवर्जून दिसते. मुंबईतल्या दृश्यांत उंच उंच इमारती आणि मुंबईचा झगमगाट दिसतो. दिल्ली, बंगळुरूतही तिथली मेट्रो आणि महत्त्वाची ठिकाणं नेपथ्य म्हणून दिसत राहतात. या सर्व दृश्यांमुळे सिनेमातल्या पात्रांच्या मनातल्या कल्लोळाला योग्य तो कॅनव्हास मिळतो. 

यातली काजोल आणि माँटीची गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्यासोबत राहते. ती जरा ताणलेली आहे आणि त्यामुळे नंतर जरा कंटाळवाणी आणि काहीशी प्रेडिक्टेबल वाटते. त्या तुलनेत पार्थ आणि चुमकीचा ट्रॅक अधूनमधून येत असला तरी तो जास्त फ्रेश आणि ‘खरा’ वाटतो. गंमत म्हणजे यातलं पार्थ हे पात्र मात्र तसं नाही. ते काहीसं ‘अनरिअल’ किंबहुना आपल्याला आपण जसं व्हावं असं वाटतं, पण होऊ शकत नाही, त्या धर्तीवरचं वाटतं. वर म्हटल्याप्रमाणे लिखाणातही या पात्राला चांगला न्याय मिळाला असल्यानं ते शेवटपर्यंत भाव खाऊन जातं. त्या तुलनेत पंकज त्रिपाठीचा ‘माँटी’ मात्र सतत मार खात राहतो. त्या पात्राच्या मूर्खपणामुळे त्याच्याविषयी सहानुभूतीही वाटत नाही. अनुपम खेरला फारसं फुटेज नसलं तरी त्यानं आणि नीना गुप्तानं मिळालेलं काम नेहमीच्या जोशात केलं आहे. त्यांच्यातली एनर्जी अफाट आहे. फातिमा सना शेख आणि अली फजलचा ट्रॅकही विस्कळित झाला आहे. कदाचित त्यांच्यातल्या विस्कळित संबंधांसारखाच. 
सुरुवातीला या सर्व पात्रांचं इंट्रोडक्शन येतं, तेव्हा या सर्व कथा स्वतंत्र आहेत की काय, असं वाटतं. मात्र, नंतर हळूहळू ही पात्रं एकमेकांशी संबंधित आहेत हे कळतं. काही पात्रं थेट एकमेकांशी संबंधित नसली तरी त्यांचे रस्ते एकमेकांना छेदून जातात. कुठे ना कुठे, कुणी ना कुणी एकमेकांना भेटत राहतं. ही सगळी गुंतागुंत दिग्दर्शकानं नीट हाताळली आहे. (तरी एकदा पंकज त्रिपाठी कार चालवत असताना अचानक अली फजल त्याच्या कारसमोर येतो, तेव्हा त्याला ‘अरे गुड्डू’ असा डायलॉग (संदर्भ - मिर्झापूर ही वेबसीरीज) देण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरलेला नाही.)
यातल्या तरुण पिढीचं चित्रण स्वतंत्रपणे कौतुकास्पद आहे. यातल्या तिघींचे व्हिडिओ कॉल सुरू असताना त्यातली जी सर्वांत तरुण आहे (चुमकी) तिच्या फोनची बॅटरी अगदी संपत आलेली असते, हेही दिसतं. (‘जेन झी’च्या मुलांच्या फोनच्या बॅटरी कायम लो असतात आणि ज्येष्ठ नागरिक आपले मोबाइल सतत चार्ज करून ठेवतात, असं एक इंटरेस्टिंग निरीक्षण आहे.) आता हे दिग्दर्शकानं मुद्दाम केलं की ते नकळत तसं चित्रित झालंय हे माहिती नाही. मात्र, बारकाईने पाहिल्यास हे दिसतं खरं. यातल्या काजोल व माँटीच्या टीनएजर मुलीचा ट्रॅक त्या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. आपल्याला मुलं आवडतात की मुली याचा निर्णय ही पंधरा वर्षांची मुलगी करू शकत नसते आणि तिच्या आयुष्यातला तो सर्वांत मोठ्ठा प्रॉब्लेम असतो. हा ट्रॅक दिग्दर्शकानं म्हणावा तसा खुलवलेला नाही. तो काहीसा मुग्धच राहिला आहे. 
असं सगळं असलं तरी हा सिनेमा आवर्जून पाहा. कथेला महत्त्व असलेला, अनेक कलाकारांचा समावेश असलेला तरी एकही ‘सुपरस्टार’ नसलेला, एकही ‘आयटेम साँग’ नसलेला, शक्य असूनही एकही अश्लील किंवा तुलनेनं बोल्ड दृश्य नसलेला असा हा एक स्वच्छ, पण अंतर्मुख करायला लावणारा सिनेमा आहे. सिनेमा अगदी शंभर टक्के परिपूर्ण नाही, हे खरंच; पण पावणेतीन तासांचा असूनही ‘बोअर’ होत नाही, हेही खरं. त्यामुळं आपल्या आवडत्या व्यक्तीसह मोठ्या पडद्यावरच पाहावा, हे नक्की. 

(दर्जा - साडेतीन स्टार)

----

29 Jun 2025

दोन पुस्तकांविषयी...

१. वार्तांच्या झाल्या कथा
------------------------------

मोलाचा सामाजिक-सांस्कृतिक दस्तावेज

ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांनी लिहिलेलं ‘वार्तांच्या झाल्या कथा’ हे रोहन प्रकाशनतर्फे आलेलं नवं पुस्तक म्हणजे एक महत्त्वाचा सामाजिक, सांस्कृतिक दस्तावेज आहे. आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. त्यातील काहींच्या बातम्या होतात, तर काही काळाच्या उदरात गडप होतात. पत्रकार जेव्हा अशा घटना अनुभवतो, तेव्हा तो त्या घटनांचे वार्तांकन करत असताना एक प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय असा महत्त्वपूर्ण दस्तावेजच तयार करत असतो. साबडे यांनी ‘सकाळ’सारख्या पुण्यातील आघाडीच्या, प्रथितयश दैनिकात तब्बल ३४ वर्षं काम केलं. हे काम करताना साबडे यांनी अक्षरश: हजारो बातम्या लिहिल्या असतील किंवा संपादित केल्या असतील. प्रत्येक बातमीची काही कथा होत नाही. मात्र, काही बातम्या नक्कीच तशा असतात. त्या केवळ बातमीरूपात राहणं शक्यच नसतं. अशा घटनांचे दीर्घकालीन परिणाम त्या त्या वेळी समाजावर, त्या शहरावर होत असतात. या घटनांची बातमी आणि त्या बातमीमागील घटना यांची साद्यंत गोष्ट साबडे आपल्या त्यांच्या खास शैलीत सांगतात, तेव्हा आपणही त्या काळातील त्या अनुभवाचे रोमांच अनुभवू शकतो. ही साबडे यांच्या अस्सल अनुभवांची आणि ते शब्दबद्ध करणाऱ्या लेखणीची ताकद आहे.
साबडे यांचे हे पुस्तक दोन विभागांत आहे. पहिल्या विभागात पुण्याशी संबंधित बातम्या व त्यांच्या कहाण्या आहेत, तर दुसऱ्या विभागात देश-विदेशांतील महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेण्यात आली आहे. पहिल्या भागाचं शीर्षक ‘अवती-भवती’ असं असून, त्यात रजनीश आश्रमापासून ते जोशी-अभ्यंकर हत्याकांडापर्यंत आणि ‘टेल्को’पासून ते मार्केट यार्डच्या स्थलांतराच्या घटना येतात. या सहा दीर्घ लेखांमध्ये साबडे आपल्याला पुण्यातील सहा महत्त्वाच्या घटनांची सांगोपांग आणि वस्तुनिष्ठ माहिती देतात. दुसऱ्या भागाचं शीर्षक ‘देश-विदेश’ असं असून, त्यात श्रीलंकेपासून ते जेरुसलेमपर्यंत विषय साबडे यांनी हाताळले आहेत. राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी या माजी पंतप्रधानांची अतिशय मनोज्ञ अशी व्यक्तिचित्रं त्यांनी या विभागात रेखाटली आहेत. मुळात पत्रकाराची लेखणी असल्यामुळं आपोआपच त्यांच्या लेखनात एक तटस्थपणा, नेमकेपणा आणि माहितीची सत्यता यांचं सुखद दर्शन घडतं. अर्थात ही तटस्थता कोरडी नाही. साबडे यांच्या पत्रकारामधला ‘माणूस’ सदैव जिवंत असतो आणि तो अतिशय संवेदनशीलतेनं या सर्व घटनांकडं पाहतो. त्यामुळं या सर्व कथनाला एक आत्मीय ओलावाही आहे. साबडे यांची शैली रसाळ आहे. वस्तुनिष्ठ तपशिलांचे कोंदण असल्यामुळं हे लेखन वाचताना बौद्धिक आनंद लाभतो.
साबडे केवळ ज्येष्ठ पत्रकार व माध्यमतज्ज्ञ नाहीत, तर लेखक व शिक्षकही आहेत. ‘सकाळ’मधील ३४ वर्षांच्या काळात विविध पदांवर काम करताना साबडे यांनी देश-विदेशांतील अनेक महत्त्वाच्या घटनांचं वार्तांकन केलं. अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा सर्व प्रवास साबडे यांनी त्या त्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवला आहे. अवघ्या २७ व्या वर्षी पाकिस्तानला भेट देणारे ते सर्वांत कमी वयातील मराठी पत्रकार असावेत. पुण्यात बातमीदारी करताना साबडे यांचा समाजातील विविध घटकांशी संबंध आला. त्यातून पुण्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी ते जोडले गेले. पुणे श्रमिक पत्रकार संघापासून ते ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’पर्यंत पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संस्थांवर त्यांनी दीर्घकाळ काम केलं आहे. त्यांनी अनेक नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करून, शब्दश: घडवलं आहे. (मीही त्यांचा एक विद्यार्थी आहे.) पत्रकारिता अभ्यासक्रमांत त्यांनी बातमीदारी, संपादन, फीचर रायटिंग असे अनेक विषय विद्यार्थ्यांना शिकवले आहेत. त्यांनी आपल्या शैलीदार भाषेत वृत्तपत्रांतून अनेक विषयांवर पल्लेदार लेख लिहून, वाचकांना आनंद दिला आहे. साबडे यांनी अनेक युरोपीय देशांना भेटी दिल्या असून, तेथील विविध सेमिनार, परिसंवाद, चर्चासत्रांत सहभाग घेतला आहे.
अलीकडं निवृत्तीनंतर ‘पुण्यभूषण’सारख्या दिवाळी अंकांतून ते पुण्यासंबंधी अतिशय मोलाचं, माहितीपूर्ण व रंजक लेखन करीत आहेत. विशेषत: जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर त्यांनी लिहिलेला सविस्तर, सर्वांगीण लेख वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. अशा लेखांद्वारे एका अर्थाने पुणे शहरासंबंधीचा एक दस्तावेजच त्यांच्या हातून तयार होत आहे. डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या ‘सकाळ स्कूल ऑफ जर्नालिझम’चे साबडे हे एक ‘टॉपर’  विद्यार्थी आहेत, असं म्हटल्यास वावगे ठरू नये. वृत्तपत्रीय संकेत, मर्यादा व सभ्यता पाळून त्यांनी केलेलं वस्तुनिष्ठ वार्तांकन वाचकांना संपूर्ण व अचूक माहितीसह नवी दृष्टी प्रदान करतं, असं म्हटल्यास गैर ठरणार नाही. 
‘एका सेनानीचा अंत आणि जिंदा-सुखाशी गाठ’ हा लेख असेल किंवा ‘पुणेरी बावाजी – तुम जियो हजारो साल’ हा पुण्यातील पारशी समाजाविषयीचा लेख असेल; साबडे त्या विषयाची सर्वांगीण माहिती आपल्याला पुरवतात. वाचकाच्या मनात उत्पन्न होऊ शकणाऱ्या सर्व प्रश्नांचं, सर्व शंकांचं उत्तर त्याला लेखात मिळेल, याची पुरेपूर काळजी ते घेताना दिसतात. त्या त्या वेळी प्रत्यक्ष बातमीत लिहिता न आलेले, ज्याला ‘बातमीमागची बातमी’ म्हणतात, तसे – अनेक रंजक तपशीलही ते आपल्या लेखांत खुबीने पेरतात. त्यामुळं एखादी उत्कंठावर्धक मालिका पाहावी तसे आपण या लेखनात गुंतून पडतो. पोलंडमधील छळछावण्यांना भेट दिल्यानंतरच्या आठवणींवर आधारित ‘औशवित्त्झच्या असह्य स्मृती’ या लेखातून लेखकाची संवेदनशील बाजू लख्खपणे दिसते.
रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर यांनी उच्च निर्मिती मूल्यांची परंपरा अबाधित राखून या देखण्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. तब्बल ३१४ पानांच्या या पुस्तकाचं संपादन अनुजा जगताप यांनी केलं असून, मुखपृष्ठ राजू देशपांडे यांचं आहे.
पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे या लेखनात साबडे यांनी अनेकांना न रुचणारं आपलं परखड मतप्रदर्शनही केलं आहे. या ‘कथा’ एकमेकांपासून वेगळ्या असल्या, तरी त्यातील समान सूत्र चिकित्सक पत्रकाराच्या वेधक दृष्टीचं आहे. त्यामुळं चोखंदळ वाचकांना नक्की आवडेल, असं हे पुस्तक आहे, यात शंका नाही.

(पूर्वप्रसिद्धी : रोहन मैफल - रोहन प्रकाशन)

----

२. अप अगेन्स्ट डार्कनेस
-----------------------------

फिटे अंधाराचे जाळे

मध्यंतरी मी सुनंदा अमरापूरकरांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’ हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचलं. ते मला अतिशय आवडलं. त्यानंतर मी सुनंदाताईंशी बोललो. एकूणच नगरच्या बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. मी त्या पुस्तकावर इथं ब्लॉगवरही लिहिलंय. त्यानंतर मग साधारण महिन्यापूर्वी त्यांनी मला एक पुस्तक पाठवलं. ‘तुला नक्की आवडेल. वाच...’ असं म्हणाल्या. ते पुस्तक होतं मेधा देशमुख भास्करन यांचं ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’. या इंग्लिश पुस्तकाचा सुनंदाताईंनीच अनुवाद केला आहे. सकाळ प्रकाशनानं तो प्रकाशित केलाय. त्या पुस्तकाचं नाव ‘फिटे अंधाराचे जाळे’ असं अगदी समर्पक आहे. हे पुस्तक नगरमधील प्रसिद्ध स्नेहालय संस्थेचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश कुलकर्णी यांच्या ‘स्नेहालय’ उभारणीतील संघर्षाची गाथा सांगतं. हा अनुवाद सुनंदाताईंनी करणं अतिशय योग्य होतं, कारण त्यांचंही बरंचसं आयुष्य नगरमध्ये गेलंय. त्यामुळं अनुवादात व्यक्ती, संस्था, परिसर, ठिकाणं यांची नावं अचूक आली आहेत. काही वेळेला त्यांनी मूळ मराठी संभाषण कसं झालं असेल, हे लक्षात घेऊन अगदी अस्सल नगरी भाषाही वापरली आहे. त्यामुळं मला तरी बऱ्याचदा वाटलं, की हे मूळ पुस्तक खरं तर सुनंदाताईंनीच आधी मराठीत लिहायला हवं होतं. इतका तो अनुवाद ‘अनुवाद’ वाटतच नाही.
हे पुस्तक आवडलं याचं दुसरं कारण वैयक्तिक आहे. गिरीश कुलकर्णी यांच्या कुटुंबाशी आम्ही नात्याने जोडले गेलो आहोत. गिरीशची आई म्हणजे आमच्या शोभाकाकू. त्यांंचं माहेर जामखेड. गिरीशचे बाबा दिनूभाऊ कुलकर्णी यांनाही मी वैयक्तिकरीत्या ओळखत होतो. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे नगरमधल्या माझ्या अल्प वास्तव्याच्या काळात माझी गिरीश कुलकर्णींबरोबर एकदाही भेट झाली नाही. अर्थात मी तेव्हा लहान होतो आणि नेमका तोच काळ (१९८८-१९९१) ‘स्नेहालय’च्या प्रारंभीच्या उभारणीचा होता. मी नगरच्या मार्कंडेय विद्यालयात आठवी ते दहावी ही तीन वर्षं शिकलो. आमच्या शाळेच्या समोरच गांधी मैदान होतं आणि एका बाजूला चित्रा टॉकीज. तिच्या शेजारीच नगरची चित्रा गल्ली ही वेश्या वस्ती होती. गिरीश कुलकर्णींचं कार्य याच ठिकाणाहून सुरू झालं. म्हणजे मीही तेव्हा त्याच परिसरात वावरत होतो. अर्थात शाळेतल्या मुलांना त्या गल्लीकडं जायला बंदी असायची. पण गिरीश कुलकर्णी तेव्हा त्याच भागात त्यांच्या कार्याची उभारणी करत होते, हे वाचून मला एकदम आपुलकी वाटली.
गिरीश कुलकर्णी यांनी वेश्यांच्या मुलांसाठी, एड्स झालेल्या वेश्यांसाठी ‘स्नेहालय’च्या माध्यमातून मोठं काम उभं केलं. ज्या काळात या लोकांना जवळही करायला कुणी तयार नसे किंवा सामाजिक बहिष्काराचे ओझे त्यांना सोसावे लागे, त्या काळात गिरीश कुलकर्णी धाडसाने या महिलांजवळ गेले. त्यांचा विश्वास संपादन करताना त्यांना प्रचंड त्रास झाला. पुरुषांकडून त्या महिलांना कधी अशा वागणुकीची अपेक्षाच नव्हती. त्यामुळे त्यांना गिरीश यांच्याविषयीही विश्वास निर्माण व्हायला खूप वेळ लागला. गिरीश यांनी नगरमधलं ‘बिल्वदल’ हे त्यांचं निवासस्थानच अशा महिलांना राहण्यासाठी खुलं केलं. त्यानंतर समाजानेही मोठ्या प्रमाणात मदतीचे हात पुढं केले. अर्थात आपली सामाजिक व्यवस्था, पोलिस यंत्रणा, हितसंबंधी लोक आणि गुंड मंडळी या सर्वांशी लढता लढता गिरीश व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगी शारीरिक मारही सोसला. मात्र, ते कधीही हिंमत हरले नाहीत. नगरच्या एमआयडीसीमध्ये अक्षरश: ओसाड जागेवर त्यांनी प्रचंड कष्टातून ‘स्नेहालय’चे नंदनवन उभे केले. ही सर्व संघर्षगाथा सुनंदाताईंनी या पुस्तकातून अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.
सर्वांनी अगदी आवर्जून वाचावं, असं हे पुस्तक आहे. ‘स्नेहालय’चं काम आता खूप मोठं झालं आहे. जोवर समाजात वेश्या आहेत, एड्ससारखा आजार आहे, त्यांचे प्रश्न आहेत तोवर ‘स्नेहालय’सारख्या संस्थांची गरज कायमच लागणार आहे. गिरीश कुलकर्णींसारखे सामाजिक कार्यकर्ते मात्र क्वचितच तयार होताना दिसतात. हे पुस्तक वाचून आणखी काही ‘गिरीश कुलकर्णी’ तयार झाले तर हा समाज आणखी सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही.

----


------------