17 Aug 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा




‘दोबारा’ देखी, तो अकल बुरा मान जाएगी...
----------------------------------------------------------------------------------------

‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई - दोबारा’ या मुळात मुंबईच्या लोकलसारख्या (आणि वर ‘दोबारा’ हा शब्द जोडल्याने आठ डब्यांऐवजी बारा डब्यांच्या लोकलएवढ्या) लांबलचक नावाचा आणि जवळपास पावणेतीन तास एवढ्या लांबलचक वेळेचा सिनेमा एकदा बघितल्यावर त्यातल्या नायकाचीच भूमिका करणाऱ्या व्हिलनचा संवाद थोडा बदलून म्हणावंसं वाटतं - अगर मैंने ये फिल्म ‘दोबारा’ देखी, तो मेरी अकल बुरा मान जाएगी!




‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ हा या सिनेमाचा पहिला भाग आणि त्यानंतर ‘डर्टी पिक्चर’सारखा ‘बुम्बाट’ सिनेमा देणाऱ्या मिलन लुथरियानं हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. म्हणजे सिनेमाच्या सुरुवातीला तशी पाटी येते, म्हणून असं म्हणायचं एवढंच. बाकी मिलननं या सिनेमात केवळ तीच नाही, तर पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत फक्त पाट्याच टाकल्या आहेत, हे पहिल्या रिळातच लक्षात येतं.
साठच्या दशकात मुंबईत संघटित गुन्हेगारीचा झालेला उदय, त्यानंतर एकेका डॉनची भाईगिरी, दादागिरी आणि त्यांची दहशत याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यावर अनेक दिग्दर्शकांना सिनेमे काढण्याचा मोह झाला. या भाईलोकांचा हिंदी चित्रपटसृष्टीवर असणारा वचक आणि त्यांचं ‘लव्ह-हेट’ नातं याचंही एक सुप्त आकर्षण अनेकांना आहे. दाऊद इब्राहिम हा या कुख्यात भाईलोकांमधला सर्वांत नीच, पाताळयंत्री माणूस. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आता उंदरासारखा पाकिस्तानात लपून बसलेला हा भ्याड माणूस सिनेमाचा विषय नक्कीच होऊ शकतो. मात्र, देशाचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार असलेल्या या माणसावर त्याच्या नावाने सिनेमा काढायला सिनेमावाली मंडळी घाबरतात. मग खोटं नाव देऊन आणि ‘सर्व पात्रं काल्पनिक’ असं म्हणून सुटका करून घेता येते. मिलनही तेच केलंय. या सिनेमात दाऊदचं नाव त्यानं केलं आहे शोएब. अर्थात सुरुवातीला यातली सर्व पात्रं काल्पनिक आहेत, अशी पाटी मात्र नाही. तेव्हा दिग्दर्शकाच्या मनातल्या गोंधळाला येथूनच सुरुवात होते.
‘वन्स अपॉन’चा पहिला भाग निखालस गुन्हेगारीपट होता. हाजी मस्तान, करीम लाला आणि वरदा या अट्टल तस्करांकडून मुंबईच्या अधोविश्वाची सत्ता दाऊदकडं कशी जाते, याची नीटस मांडणी मिलननं त्या सिनेमात केली होती. या सिनेमात दाऊद मुंबईत कसा जम बसवतो आणि त्यानंतर या शहरात काय काय धंदे करतो, येथपासून मुंबईच्या बॉम्बस्फोटापर्यंतचा प्रवास तो दाखवील, अशी स्वाभाविक अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षांना सुरुंग लावून दिग्दर्शक एक (कथित) प्रेमत्रिकोणाची कथा आपल्यासमोर मांडतो. अर्थात त्यात चूक काहीच नाही. त्यानं ही कथा नीट मांडली असती, तर या अपेक्षाभंगाचंही दुःख झालं नसतं. मात्र, त्यानं ही कथाही धड मांडलेली नाही. त्यामुळं अपेक्षाभंगाचं दुःख ‘दोबारा’ वाट्याला येतं.
या सिनेमाच्या सुरुवातीपासूनच सतत काही तरी बिनसल्याचा फील येतो. आधी दोन मुलांच्या रेसचं दृश्य येतं. त्यानंतर खुद्द शोएबचं (अक्षयकुमार) दर्शन होतं. या दोन मुलांना कामावर ठेवण्याचा आदेश शोएब आपल्या माणसांना देतो. ही दोन मुलं म्हणजेच अस्लम (इम्रान खान) आणि देढटांग (पितोभाष त्रिपाठी) नंतर त्याचे खास विश्वासू माणसं होतात. त्यानंतर एक-दोन रिळं इकडं-तिकडं चाचपडल्यानंतर सिनेमात नायिकेचं म्हणजेच जस्मिनचं (सोनाक्षी सिन्हा) आगमन होतं. जस्मिनची एकाच वेळी शोएब आणि अस्लमशी ओळख होते आणि दोघेही एकदम तिच्यावर प्रेम करू लागतात. स्वाभाविकच कथा एकदम या प्रेमत्रिकोणाकडं झुकते. त्यानंतर भाईची गुंडगिरी साइड-बाय-साइड आणि लव्हस्टोरी मुख्य ट्रॅकवर चालते. ती शेवटपर्यंत आपला कंटाळा घालवू शकत नाही.
अक्षयकुमारचा गेटअप आणि एकूण लूक चांगला आहे. तरीही तो ‘दाऊद’ वाटत नाही. चित्रपटातील पहिला संवाद म्हणताना त्यानं आवाजाची एक विशिष्ट पट्टी (पीच) राखली आहे. विशेष म्हणजे शेवटपर्यंत त्यानं ती सोडलेली नाही. मात्र, सदैव त्याला त्याच पीचमध्ये ऐकताना कंटाळा येतो. तीच गोष्ट संवादलेखक रजत अरोराची. प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकायचा अशा इराद्याने त्यानं या सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. ‘अगर मैं अच्छा इन्सान बना, तो मेरी पहचान बुरा मान जाएगी’ हे किंवा असलेच अनेक संवाद आपण प्रोमोजमध्ये पाहिले आहेत. हे सातत्यही दाद देण्यासारखे असले, तरी कुठलीही व्यक्ती सदैव टाळ्याखाऊ वाक्यांतच कशी बोलेल? आपण रोज पुरणपोळी किंवा बिर्याणी खातो का? पण मिलन-रजतची पात्रं प्रत्येक संवाद अगदी टेचात उच्चारतात. ते काही काळानं अत्यंत विनोदी वाटू लागतं. शिवाय प्रत्यक्षात विनोद म्हणून लिहिलेले संवाद अश्लीलतेकडं झुकल्यानं बऱ्याच ठिकाणी सेन्सॉरला ‘बीप’ वाजवावं लागलं आहे. तरी लोकांना व्हायचा तो ‘अर्थकोर्स’ होतोच!
सोनाक्षी सिन्हाची कामगिरी बरी असली, तरी शेवटच्या दृश्यात ती कर्कशपणे शोएबवर ओरडताना बघवत नाही. तीच गोष्ट इम्रान खानची. या चिकन्याचुपड्या हिरोला अस्लमची भूमिका शोभलेली नाही. काही काही दृश्यांत टाळ्याखाऊ संवाद बोलताना त्याची कुचंबणा झालेली स्पष्ट जाणवते. मात्र, अस्लमची प्रेमी म्हणून जी शेड आहे, ती त्यानं चांगली रंगवली आहे. पितोभाष त्रिपाठीनं साकारलेल्या ‘देढटांग’ची भूमिका लक्षात राहणारी आहे. महेश मांजरेकरचा रावल हा खलनायक लिखाणातच फार वाव नसलेला आहे. त्यामुळं जस्मिनला जखमी करण्यापलीकडं त्यानं फार काही साधलेलं नाही.
पहिल्या सिनेमातली गाणी चांगली होती. या सिनेमात मात्र प्रीतमनं काहीशी निराशा केली आहे. ‘तैयबअली प्यार का दुश्मन हाय हाय’ या ‘अमर अकबर अँथनी’त ऋषी कपूरनं साकारलेल्या जबरदस्त लोकप्रिय गाण्याचं नवं रूप या सिनेमात पाहायला मिळतं. इम्राननं या गाण्यात धमाल केली आहे.
मात्र, असे काही तुरळक प्रसंग सोडले, तर संपूर्ण सिनेमा अत्यंत कंटाळवाण्या वेगानं पुढं सरकतो. त्यामुळं एकदा हा सिनेमा बघणारा माणूस ‘‘दोबारा’ देखी, तो मेरी अकल बुरा मान जाएगी...’ असं म्हणणार यात शंका नाही.
---
निर्मिती : बालाजी मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक : मिलन लुथरिया
लेखक, संवाद : रजत अरोरा
संगीत : प्रीतम
प्रमुख भूमिका : अक्षयकुमार, इम्रान खान, सोनाक्षी सिन्हा, पितोभाष त्रिपाठी, महेश मांजरेकर
दर्जा : **
---
(पूर्वप्रसिद्धी - १७ ऑगस्ट २०१३, महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती)

2 comments:

  1. tuz parikshan wachav aani magach tharavav ki movie baghayala jav ki jau naye...khup oghavati shaili aahe tuzhi...farach chan..

    ReplyDelete