14 Mar 2016

विजय मल्ल्या लेख

'किंग ऑफ गुड होप'
-----------------

आद्य मद्यसम्राट, मद्याधिपती, मद्यराज, मद्यदेवता, 'सुक्काळीचा राजा' ('किंग ऑफ गुड टाइम'चं मराठमोळं भाषांतर) विजय मल्ल्या यांनी एक दिल्ली ते लंडन प्रवास केला काय आणि अनेकांचे फेसाळते पेले जणू रिते झाले. त्यांचे विमान अंतराळी झेप घेते जाहले आणि इकडे अनेकांचे विमान पुनश्च जमिनीवर उतरले. मल्ल्या भारतातल्या बँकांची देणी बुडवून पळाले म्हणे. हूं! यात काय विशेष!! वर्षानुवर्षे या देशात राहून, त्याला लुटून मग परदेशी जायचे ही फार जुनी परंपरा आहे इथली... मल्ल्या हे मद्यविक्रीच्या व्यवसायात असल्याने त्यांचे काम सोपे झाले एवढेच. लोकांना मद्याच्या अमलाखाली ठेवून, त्यांना आजूबाजूच्या दुःखी-कष्टी जगाचा विसर पाडायला लावणे हे फार पुण्याचे काम त्यांनी केले आहे, हे तरी मद्यपींनी विसरू नये. मद्यपी मंडळी तशी सरळ असतात. एक वेळ उपकारकर्त्याचे नाव ते विसरतील, पण त्याने केलेले उपकार नाही विसरणार... भारतात लोक पूर्वी मद्य पीत नसत, असं नाही. पण मद्यमल्ल्यांनी हे पेय घराघरांत नेले. लोकांचा संध्याकाळचा वेळ बरा जावा, यासाठी मल्ल्याभाऊंनी आपले सारे कसब पणाला लाविले. जगातील उत्तमोत्तम द्रावणे तयार केली. मद्याच्या कंपन्याच विकत घेतल्या... भारतातल्या साध्या-भोळ्या, गरीब जनतेनं आपल्या चिंता-दुःखं, वेदना सारं सारं काही विसरून संध्याकाळचे दोन क्षण दोन घोटांसोबत सुखात घालवावेत यासाठी भाऊंची केवढी तळमळ! 
भाऊंच्या कंपनीचं नावपण आपल्याला फार आवडतं - किंशफिशर! म्हणजे आपला खंड्या पक्षी हो! हा खंड्या ज्या चपळाईनं पाण्यात सूर मारून मासा टिपतो, त्याहून अधिक चपळाईनं या द्रावणाचे थेंब जिभेवर टेकताच मनुष्य अंतराळीची सैर करून येतो. त्यामुळं नाव अगदी सार्थ आहे. तर या द्रावणांचा खप वाढतच गेला. दिसामाशी कंपनी वाढत गेली. पैसा येत गेला. भाऊंना तर उसंतच नव्हती. 'टाक पैसे नि घे कंपनी' असं चाललं होतं. अर्थात भाऊंना फक्त दारू विकायची नव्हती. नाही तर मग गावातला गुत्तेवाला आणि भाऊंच्यात फरक तो काय राहिला! आपलं पेय प्राशून मंडळी अंतराळात विहरत असली, तरी त्याचं वेगळं तिकीट त्यांना पडत नव्हतं. क्वार्टरच्याच पैक्यात ती सैर होऊन जायची. पण भाऊंना तसलं अपेक्षित नव्हतं. मग त्यांनी खरीखुरी विमान कंपनी काढली. विमान बसल्यावर पण पुन्हा वेगळं आपलं स्वतःचं असं खास 'विमान' उडवायची सोय होतीच. भाऊंना 'कॅटल क्लास' कधीच मान्य नव्हता. जे काय उडायचं, ते हाय-फाय उडायचं असंच भाऊंचं धोरण होतं. त्यामुळं जनता भाऊंच्या विमानात बसायला तरसू लागली. भाऊंच्या विमानातल्या एअर होस्टेससुद्धा कशा अगदी, या आपल्या त्या ह्या होत्या! (आलं असेल लक्षात!) असं विमान आणि अशी कंपनी भारतात कधीच नव्हती, असं नाही नाही ते जाणकार लोक नको तेव्हा सांगू लागले. या कौतुकानं भाऊंचं स्वतःचं खासगी विमान पुनश्च अंतराळी लहरू लागलं. मद्य आणि विमान या दोन्ही गोष्टी माणसाला खूप उंच जातात; पण दोन्हींचा अंमल ओसरला, की जमिनीवर आदळणं हे क्रमप्राप्तच असतं. पण भाऊंना भौतिकशास्त्रातल्या नियमांत नव्हे, तर इतर अनेक भौतिक गोष्टींत रस होता. इथं मदिरेप्रमाणंच मदिराक्षी त्यांच्या कल्पक बुद्धीच्या मदतीला आली. एरवी क्यालेंडर ही गोष्ट आम्ही फार रुचीनं कधी पाहिली नव्हती. दुधाचे आणि पेपरांचे खाडे खरडण्याचा भिंतीवरचा चिठोरा यापलीकडे आम्ही त्यास कधी जास्त महत्त्व दिलेही नव्हते. पण भाऊंचे 'क्यालेंडर' अवतरले आणि आम्हास भयंकर लज्जा उत्पन्न जाहली. नव्हे, नव्हे, क्यालेंडर पाहून नव्हे; तर एवढे दिवस आपण डोळ्यांच्या खाचांचा नक्की काय उपयोग करीत होतो या विचारानं लज्जा आली! अहाहा, जानेवारी ते डिसेंबर असं बारामास बीचवर पसरलेलं ते सौंदर्य बघून भाऊंचे पाय धरावेसे वाटू लागले. कुडीरूपी होडीवर वस्त्ररूपी शिडं धारण करणाऱ्या त्या शिडशिडीत चारुगात्री पाहून आम्हास अन्य कुठल्याही नशेची गरज वाटेनाशी जाहली. त्यामुळं भाऊंच्या अन्य उत्पादनांचा खप किंचित घसरला, हे सत्य होय. पण जनसेवेपुढे असल्या क्षुद्र तोट्याची चिंता करतो कोण?
भाऊंनी मुळात पहिल्यापासूनच 'हे विश्वचि माझे घर' हेच ब्रीद अंगिकारलं होतं. त्यामुळं सेशेल्स ते सनसिटी आणि मिरामार ते मायामीपर्यंत जगभरातले नामचीन समुद्रकिनारे हीच त्यांची संचारांची प्रमुख ठिकाणे होती. एखादे यॉट घ्यावे, वारुणी-तरुणींचा ताफा घ्यावा आणि समुद्राच्या विशाल अंतःपुरात जाऊन अंमळ चिंतन करावे, ही भाऊंना जडलेली खोड होती. शिवाय कुठलाही आनंद एकट्यानं लुटला, तर त्यात काही मजा नसते. त्यामुळं भाऊंनी हा आनंद देशभरातल्या त्यांच्या व्यवसायबंधूंना वाटला. भाऊंवर प्रेम करणारी थोडी का माणसं आहेत आपल्या देशात? बिझनेसमन म्हणू नका, राजकारणी म्हणू नका, मोठमोठे आध्यात्मिक गुरू म्हणू नका की मीडियावाले म्हणू नका! भाऊंच्या यॉटवर सर्वधर्मसमभाव! शिवाय सोबत असलेल्या 'सत्संगा'मुळं आपण फारच वेगानं आध्यात्मिक आनंद लुटतो, याची बहुतेकांना खात्रीच असायची. 
 असे सगळे मज्जेमज्जेचे दिवस चालले होते. भाऊंची मद्ये पिऊन लोक बँकांमध्ये एफड्या करत होते आणि भाऊ त्याच बँकांकडून कर्ज घेऊन लोकांना निराळा आनंद देत होते. पण मध्येच या बँकांनी वसुलीचा तगादा सुरू केला. आता माणूस आहे. नसेल कर्ज फेडता आलं. बिघडलं कुठं? आणि पैसा काय हो, आज असतो आणि उद्या नाही. बँकांनी तर कर्जवसुली वगैरे मोहपाशात अडकावेच का? भाऊंचं नेमकं हेच म्हणणं होतं. कर्ज काढा आणि विसरून जा! एकदा भाऊंच्या ब्रँडची बाटली घेऊन बसलं, की तसंही सर्व काही विसरायला होतंच म्हणा. भाऊ स्वतः खूपच साधेभोळे आणि विसरभोळे. त्यांच्या या स्वभावाचा त्यांना अनेकदा फायदाच होई. पण काही दुष्ट लोकांना भाऊंचं सुख पाहावलं नाही. त्यांनी कोर्टकचेरी, वसुली, नोटिसा वगैरे अत्यंत कडवट भाषा सुरू केली. कोमल हृदयाच्या भाऊंना हे कसं सहन होईल? जिथं फुलं वेचली, तिथंच गोवऱ्या वेचायच्या? जिथं 'क्यालेंडर' फिरवलं तिथं भेळीचा कागद बघायचा? हा हन्त हन्त! पण काळ हा माणूसच दुष्ट! त्यानंच हे सगळं घडवून आणलं. बिचारे भाऊ! पकडलं विमान आणि गेले आपले दुसऱ्या देशात निघून... 
पण त्यावरून एवढं आकांडतांडव करायची गरजच काय आहे? भाऊ परत येणार... अहो, चांगल्या वख्ताचा हा राजा आहे. सध्या काळच वाईट आहे. त्यामुळं राजाचा रंक झालाय. पेला पार तळाला गेलाय. पण तो पुन्हा भरणारच. चांगला टाइम येणारच. अजून देशात किती तरी बँका आहेत. किती तरी पैसा आहे. किती तरी लोकांनी अजून भाऊंच्या कंपनीच्या मद्याची चवच चाखलेली नाही. नाही नाही! हे होणे नाही. भाऊ परतुनी येणारच. कारण आशा अमर असते. भाऊ 'किंग ऑफ गुड टाइम्स' असतील तर आम्ही 'किंग ऑफ गुड होप' आहोत...!! चिअर्स!!!
 -----------
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, १३ मार्च २०१६)
---

No comments:

Post a Comment