5 Mar 2016

मनोजकुमारवरचा लेख

‘भारतकुमार’ 
-----------------


सत्तरच्या दशकात आपल्या देशभक्तिपर चित्रपटांद्वारे प्रेक्षकांना देशप्रेमाचे बाळबोध डोस देणारा अभिनेता म्हणजे मनोजकुमार. अर्थात हे सिनेमे बाळबोध असले, तरी मनोजकुमारचे प्रामाणिक प्रयत्न कमी लेखायचं कारण नाही. ‘उपकार’पासून (१९६७) ते ‘क्रांती’पर्यंत (१९८१) देशभक्तिपर सिनेमांमुळंच प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या या अभिनेत्याला नंतर तर ‘भारतकुमार’ असंच टोपणनाव पडलं. मनोजकुमार काही पडेल हिरो नव्हता. माला सिन्हासोबत ‘हरियाली और रास्ता’ (१९६२), साधनासोबत ‘वह कौन थी?’ (१९६४), माला सिन्हासोबतच ‘हिमालय की गोद में’ (१९६५) आणि आशा पारेखसोबतचा ‘दो बदन’ (१९६६) अशा सुपरहिट सिनेमांचा तो हिरो होता.
तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी मनोजकुमारला त्यांच्या ‘जय जवान जय किसान’ या लोकप्रिय घोषणेवरून चित्रपट काढायला सांगितला. शास्त्रीजींची आज्ञा प्रमाण मानून मनोजकुमारने ‘उपकार’ काढला. हा मनोजकुमारचा दिग्दर्शक म्हणूनही पहिलाच प्रयत्न होता. यात त्याने एका शेतकऱ्याची आणि एका जवानाची भूमिकाही केली. ‘उपकार’ हिट झाला. मनोजकुमारला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं फिल्मफेअर अॅवॉर्डही मिळालं. या सिनेमातलं गाजलेलं ‘मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे-मोती’ हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गाणं (संगीत कल्याणजी आनंदजी) आजही २६ जानेवारी, १५ ऑगस्टला वाजवलं जातं. अर्थात मनोजकुमारच्या या देशप्रेमी चित्रपटांचा वा भूमिकांचा सिलसिला सुरू झाला तो त्याहीआधी, १९६५ मध्ये. शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘शहीद’ याच शीर्षकाच्या सिनेमात मनोजकुमारनं नायकाची भूमिका साकारली होती.
‘उपकार’च्या यशानंतर मनोजकुमारनं ‘पूरब और पश्चिम’ या चित्रपटाद्वारे पूर्व आणि पश्चिम जगांचा संघर्ष दाखविण्याचा प्रयत्न केला होता. नंतर ‘बेइमान’साठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या वर्षी त्याचा नंदासोबतचा ‘शोर’ आला. हा सिनेमा तेव्हा गाजला नसला, तरी कालांतरानं या सिनेमावर समीक्षक-रसिकांच्या पसंतीची मोहोर उमटली. ‘इक प्यार का नगमा है’ हे लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायिलेलं प्रसिद्ध युगुलगीत (संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल) याच चित्रपटातलं. 
 त्यानंतर ‘रोटी, कपडा और मकान’ (१९७४) या सामाजिक आशयाचा चित्रपटानं मनोजकुमारला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं दुसरं फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळालं. अमिताभ, शशी कपूर आणि झीनत अमान यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट लोकप्रिय ठरला. त्यानंतर मनोजकुमारची हेमामालिनीसोबत जोडी जमली. या दोघांचे संन्यासी (१९७५) आणि दसनंबरी (१९७६) हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. त्यानंतर काही काळ मनोजकुमारच्या कारकि‍र्दीला ब्रेक बसला. अखेर १९८१ मध्ये मनोजकुमारला त्याचा आदर्श अभिनेता दिलीपकुमारला दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली ती ‘क्रांती’द्वारे. हाच सिनेमा त्याच्या कारकि‍र्दीतला खऱ्या अर्थाने अखेरचा मोठा हिट सिनेमा ठरला. एकोणिसाव्या शतकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्याची कथा सांगणारा हा सिनेमा आणि त्यातली गाणीही गाजली. यातही हेमामालिनी होती.
यानंतर मात्र मनोजकुमारची कारकीर्द उतरणीला लागली. त्याने १९८९ मध्ये क्लर्क नावाचा एक टुकार सिनेमा काढला होता. महंमद अली आणि झेबा बख्तियार या पाकिस्तानी नट-नट्यांना त्यानं या सिनेमातून भारतीय पडद्यावर आणलं होतं, हेच काय ते या सिनेमाचं वैशिष्ट्य. ‘मैदान-ए-जंग’ (१९९५) या सिनेमानंतर मनोजकुमारनं अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला. नंतर त्याने त्याचा मुलगा कुणाल गोस्वामी याच्यासाठी ‘जयहिंद’ नामक सिनेमा १९९९ मध्ये काढला. मात्र, तोही आपटला. त्याच वर्षी त्याला ‘फिल्मफेअर’नं जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं.
हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं मूळ नाव असलेल्या या अभिनेत्याचा जन्म २४ जुलै १९३७ चा. सध्या पाकिस्तानात असलेलं अबोटाबाद (होय.. जिथं अमेरिकी सैन्यानं ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता, तेच!) हे तेव्हाच्या वायव्य सरहद्द प्रांतातलं, आणि आताच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातलं शहर हे त्याचं जन्मगाव. हरिकृष्ण दहा वर्षांचा असतानाच देशाची फाळणी झाली आणि गोस्वामी कुटुंबीय होतं नव्हतं ते सारं घेऊन दिल्लीमध्ये आलं. निर्वासितांसाठी असलेल्या कॅम्पमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांनी दिवस काढले. नंतर ते जुन्या राजेंद्रनगर भागात स्थायिक झाले. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर हरिकृष्ण गोस्वामीनं चित्रपटांत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि तो मुंबईला आला. तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून असे अनेक स्वप्नाळू चेहऱ्यांचे तरुण नशीब आजमावण्यास मुंबई नामक मायापुरीत येत. त्या सगळ्यांचा आदर्श एक तर राज कपूर किंवा देव किंवा दिलीपकुमार असे. हरिकृष्ण गोस्वामीचा आदर्शही दिलीपकुमार हाच होता. मग दिलीपच्या शबनम (१९४९) या चित्रपटातील नावावरून त्यानं स्वतःचं बारसं ‘मनोजकुमार’ असं करून घेतलं. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात फॅशन (१९५७) नामक एका सिनेमात मनोजकुमारला एक छोटी भूमिका मिळाली. पुढं ‘काँच की गुडिया’ (१९६०) या सिनेमात सइदा खान नामक नटीसमोर त्याला नायकाची भूमिका करण्याची संधी लाभली. अर्थात हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला, तेही कळलं नाही. नंतर ‘पिया मिलन की आस’ आणि ‘रेशमी रुमाल’ही आले आणि गेले. मनोजकुमारचं नशीब उघडलं ते १९६२ मध्ये आलेल्या विजय भट्ट दिग्दर्शित ‘हरियाली और रास्ता’मुळं. माला सिन्हा त्याची नायिका होती. हा सिनेमाची गाणी आजही हिट आहेत. त्यानंतर मनोजकुमारला मागं वळून पाहण्याची गरज पडली नाही. 
 ‘लग जा गले...’ (‘वह कौन थी?’) या सुपरहिट गाण्यात साधनासोबत असलेला हा भावूक डोळ्यांचा तरुण लोकांना आवडू लागला. पुढे कदाचित रोमँटिक हिरोच्या इमेजमध्ये तो अडकलाही असता. मात्र, १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाने मनोजकुमारचे भवितव्य कायमसाठी बदलले. याच युद्धानंतर शास्त्रीजींना त्याला ‘जय जवान...’वर चित्रपट करायला सांगितले होते. मनोजकुमारचा ‘उपकार’ आला, तेव्हा तो पाहायला दुर्दैवानं शास्त्रीजी हयात नव्हते. मात्र, या चित्रपटानं मनोजकुमारला खऱ्या अर्थानं ‘भारतकुमार’ करून टाकलं.
मनोजकुमारला आणखी एक ओळख मिळवून दिली ती ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटाने. साईभक्त असलेल्या मनोजकुमारनेच हा सिनेमा लिहिला होता आणि त्यात कामही केलं होतं. शिर्डीकरांनीही तेथील एक रस्त्याला मनोजकुमारचे नाव देऊन त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलीय. 
एक हात चेहऱ्यावर ठेवून चेहरा अर्धवट झाकून घेण्याची त्याची अजब स्टाइल होती. त्याची खूप नक्कलही झाली. अगदी अलीकडं २००७ मध्ये आलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात शाहरुख खाननं मनोजकुमारची तशीच नक्कल करणारं एक पात्र दाखवलं होतं. त्यानंतर संतापून मनोजकुमारनं हे प्रकरण कोर्टात नेलं. मात्र, नंतर त्यात कोर्टाबाहेर तडजोड झाली आणि ते प्रकरण मिटलं.
त्यानंतर आता प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याच्या निमित्तानं ७९ वर्षांचा हा बुजुर्ग अभिनेता पुन्हा एकदा बातम्यांमध्ये झळकला आहे. त्याच्या अभिनयगुणांविषयी, त्याच्या देशप्रेमी सिनेमांच्या बाळबोधपणाविषयी चर्चा होत राहील; मतभिन्नताही असेल... पण मनोजकुमारचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि हा अभिनेता कधीही गैरकारणांसाठी प्रसिद्धीस आला नाही, या बाबी एक माणूस म्हणून त्याचं मोठेपण सांगणाऱ्या आहेत, हे सर्वच जण मान्य करतील.
----

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, ६ मार्च २०१६)
----

No comments:

Post a Comment