26 Feb 2016

फिल्म रिव्ह्यू - नीरजा

नीरजा, तुला सलाम...
--------------------------


कराची विमानतळावर अपहरण केलेल्या विमानातील क्रूर दहशतवाद्यांचा अत्यंत शौर्याने सामना करून, हौतात्म्य पत्करणाऱ्या नीरजा भानोत या हवाईसुंदरीची प्रेरणादायी कथा नीरजा या नव्या हिंदी सिनेमातून दिग्दर्शक राम माधवानीनं आपल्यासमोर आणली आहे. मूळ घडलेल्या प्रसंगांतच एवढं नाट्य भरलेलं आहे, की ते सगळं पाहताना आपण त्यात गुंतून गेल्याशिवाय राहत नाही. अवघ्या २३ वर्षांच्या या मुलीनं कुठून एवढं धैर्य आणलं असेल? कुठून ती हे सगळं शिकली असेल? चित्रपटाच्या शेवटी नीरजाची आई भाषण करताना तिलाही हे प्रश्न पडल्याचं सांगते, तेव्हा आपल्यालाही भरून येतं.
पाच डिसेंबर १९८६ च्या त्या काळ्या दिवशी हा सगळा प्रकार घडला. मी तेव्हा अकरा वर्षांचा होतो. मला पेपरमध्ये आलेल्या याबाबतच्या बातम्या थोड्याफार आठवतात. एकूणच तो काळ भारतासाठी संघर्षाचाच होता. इंदिरा गांधींची हत्या होऊन दोन वर्षं लोटली होती, राजीव गांधी पाशवी बहुमत घेऊन सत्तेत आले होते, त्यांची मि. क्लीनची इमेज अजून शाबूत होती, पाकिस्तानात जनरल झिया उल हक सत्तेत होते, शारजात मियाँदादनं मारलेला षटकार काट्यासारखा भारतीयांच्या मनात रुतून बसला होता, लव्ह ८६ नावाच्या सिनेमातून गोविंदा नामक नाचरा नट पडद्यावर दाखल झाला होता, गावसकर अजून भारतीय संघात खेळत होता, सचिन तेंडुलकर हे नाव फारसं कुणाला माहिती नव्हतं, हिंदी सिनेमात अमिताभनं निवृत्ती पत्करल्यासारखी झाली होती आणि नव्या सुपरस्टारचा जन्म व्हायचा होता, शरद पवार समाजवादी काँग्रेसचा संसार गुंडाळून पुन्हा काँग्रेसवासी झाले होते आणि पुलं, कुसुमाग्रज ही मंडळी सार्वजनिक जीवनात अद्याप कार्यरत होती... दूरदर्शन या एकमेव चॅनेलवर यह जो है जिंदगी आणि नुक्कडसारख्या मालिका लोकप्रिय होत्या, (रामायण अद्याप पडद्यावर यायचं होतं...), पाँड्स, गोल्डस्पॉट, लक्स, विमल वॉशिंग पावडर आणि निरमा ही आणि असलीच उत्पादनं जोरात होती. व्हीसीआरचा आणि कॅसेटचा तो जमाना होता...
हे सगळं एवढ्या तपशिलानं सांगायचं कारण म्हणजे जागतिकीकरणपूर्व काळातला तो भारत आणि तेव्हाच्या या गोष्टी काळ वेगानं पुढं गेल्यानं आता पाषाणयुगातल्या गोष्टी वाटू लागल्या आहेत. मात्र, तत्कालीन भारतीय समाजमनाचा अभ्यास केल्याखेरीज नीरजाच्या अतुलनीय धैर्यामागची प्रेरणा आणि त्याचं महत्त्व कळणं अवघड आहे. १९६३ मध्ये जन्मलेल्या नीरजाचा लाडका हिरो राजेश खन्ना असावा, यात काही नवल नव्हतं. भानोत कुटुंबातली ही लाडकी लेक म्हणून तिला सर्व जण लाडो म्हणत हे आपल्याला सुरुवातीच्या संवादांतून कळतं. दिसायला सुंदर असलेल्या लाडोनं आई-वडिलांच्या, विशेषतः वडिलांच्या पाठिंब्यावर मॉडेलिंग क्षेत्रात काम केलं होतं. ही बाब तेव्हाच्या मुलींसाठी खरोखर दुर्मिळ होती. नीरजाचं एक अपयशी लग्नही यात दिसतं. दोहासारख्या ठिकाणी टिपिकल नवरा मेंटॅलिटीच्या माणसाबरोबर तिनं काढलेले भयावह दिवसही यात फ्लॅशबॅकमध्ये दिसतात. यातून नीरजाचं व्यक्तिमत्त्व, तेव्हाचा समाज आणि तिच्या कुटुंबीयांची वेगळी जडणघडण कळायला मदत होते. नीरजानं पुढं आकस्मिक समोर ठाकलेल्या संकटाला कशाच्या जीवावर तोंड दिलं याचं थोडं फार आकलन यातून होतं.
नीरजा लग्न मोडून घरी परत आलेली आहे आणि आता ती पॅन अॅम या अमेरिकी कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम करतेय. तिला हे काम मनापासून आवडतंय. पाच डिसेंबरच्या रात्री निघणाऱ्या मुंबई न्यूयॉर्क व्हाया कराची, फ्रँकफर्ट या विमानात ती प्रथमच हेड पर्सर असणार असते. म्हणून अगदी उत्साहात आदल्या रात्रीची एक पार्टी आटोपून ती मस्त झोपलेली असते. तिचा जुना मित्र तिला एअरपोर्टला सोडायला येतो. एकीकडं हा घटनाक्रम दिसत असतानाच दुसरीकडं कराचीत काही लोकांच्या गुप्त कटासारख्या हालचाली सुरू असलेल्या दिसतात. हे लोक पाकिस्तानी दिसत नाहीत, हेही त्यांच्या भाषेवरून कळतं. एकीकडं नीरजाची तयारी सुरू असते आणि दुसरीकडं त्या दहशतवाद्यांची अपहरणाची तयारी सुरू असते. हे दहशतवादी पॅलेस्टिनी असतात आणि अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या देशाच्या कंपनीचं विमान पळवून, त्यांच्या काही साथीदारांची सुटका करवून घ्यायची असा त्यांचा डाव असतो, हे नंतर कळतं.
दिग्दर्शकानं हा सर्व घटनाक्रम अत्यंत इंटेन्स, तीव्रतम पद्धतीनं घेतला आहे. त्यातली ऑथेंटिसिटी जपली आहे. नीरजा आणि तिच्या मित्राचा मुंबईतल्या रस्त्यावरचा एक प्रसंग मध्ये येतो. यात नीरजाचं वधूवेषातील एक पोस्टर (मॉडेल म्हणून) रस्त्यावर झळकलेलं असतं आणि आपली आठवण आली, तर कधीही इथं येऊन उभा राहा, असं ती त्या मित्राला सांगते. पुढं ती विमानतळावर पोचल्यावर पुढच्या सर्व गोष्टी झटपट होतात. नीरजा पहिल्यांदाच हेड पर्सर म्हणून काम करणार असल्यानं अत्यंत उत्साहात असते. प्रवाशांचं हसतमुखानं स्वागत करते. परदेशी पायलट्सना ओळख करून देते. त्यातला एक पायलट हिंदी शिकत असतो आणि मोडक्यातोडक्या हिंदीतून प्रवाशांशी संवाद साधत असतो. हे सर्व नॉर्मल, हसतं-खेळतं वातावरण दाखवून दिग्दर्शकानं पुढं घडणाऱ्या भयावह घटनांसाठी चांगलं नेपथ्य तयार केलं आहे. तिकडं दहशतवादीही विमानतळावरील कर्मचाऱ्यांसारखा वेष करून विमानतळावर व्हॅनमधून घुसतात. सव्वा तासानंतर बरोबर पावणेसहा वाजता नीरजाची फ्लाइट कराची विमानतळावर उतरते. विमान उतरल्यानंतर पाच मिनिटांतच दहशतवादी विमानात घुसतात.
इथून सिनेमातील खरा थरार सुरू होतो. या दहशतवाद्यांपैकी खलील हा एक भडक माथ्याचा असतो. नीरजा सर्वांत आधी पायलट्सना मेसेज करून तिथून पळून जायला मदत करते. त्यानंतर ती अत्यंत प्रसंगावधान दाखवून, कमालीचं धैर्य दाखवून सर्व परिस्थिती हाताळते. दहशतवाद्यांना ती अनेकदा वेडं बनवते. हे सर्व प्रसंग मुळातूनच पाहण्यासारखे आहेत. त्या प्रवाशांत कराची विमानतळावर चढलेला एक रेडिओ इंजिनीअर असतो. त्याच्याबाबतचे सर्वच प्रसंग उत्तम जमलेले आहेत. दहशतवाद्यांची क्रूर वागणूक, प्रवाशांतील लहान मुले, एक गर्भवती स्त्री, एक वृद्धा, परदेशी नागरिक यांची भेदरून गेलेली अवस्था, नीरजाच्या सहकारी हवाई सुंदरींची झालेली करुण अवस्था हे सगळं दिग्दर्शक एकापाठोपाठ एक दाखवत राहतो. नीरजाच्या पूर्वायुष्यात घडलेल्या कठीण प्रसंगांची सांगड आत्ताच्या स्थितीशी घालून, ती आता का एवढी धैर्यानं वागते आहे, याचं उत्तर देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केलेला जाणवतो.
इथून पुढं सिनेमा संपेपर्यंत प्रत्येक फ्रेम खिळवून ठेवणारी झाली आहे. शेवट अतिशय करुण आहे. तो पाहताना कुठल्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. शबाना आझमी यांनी नीरजाच्या मृत्यूनंतर वर्षभरानं, म्हणजे तिच्या २४ व्या वाढदिवशी केलेलं भाषणही अतिशय भावपूर्ण. शबाना आझमी यांच्या अभिनय दर्जाविषयी सांगायला नको. त्यांनी ज्या सहज पद्धतीनं नीरजाची आई होणं साकारलंय ते पाहण्यासारखं आहे. सोनम कपूरचंही कौतुक करायला हवं. तिनं नीरजाची भूमिका अगदी समरसून केलीय. आई-वडिलांची लाडकी लाडो, परदेशात नवऱ्याचा छळ निमूट सोसणारी नववधू ते पाश्चात्य शर्ट-स्कर्ट आणि बॉब केलेले केस अशा वेषभूषेत अत्यंत आत्मविश्वासानं नव्या आयुष्याला सुरुवात करणारी आणि ते करता करता प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या प्राणांचंही बलिदान देणारी नीरजा तिनं फारच कन्व्हिन्सिंगली उभी केली आहे.
सिनेमाच्या शेवटी एंड स्क्रोलला येणारी खऱ्या नीरजाची छायाचित्रं पाहताना मन हेलावून जातं. जागतिकीकरणानंतर भारत बदलला. इथली तरुण पिढीही बदलली. सचिन तेंडुलकरच्या रूपानं भारताला नवा आत्मविश्वास लाभला. जगाच्या व्यासपीठावर भारत ताठ मानेनं आता वावरतो आहे. पण हे काही नसतानाच्या भारतात हेच सगळे गुण घेऊन वावरणारी एक तरुण मुलगी होती, हे नीरजानं दाखवून दिलं. त्या काळातल्या तरुण पिढीच्या या कर्तृत्वाची दखल आता पडद्यावर कायमची चित्रबद्ध झाली आहे. नीरजा, तू अनसंग हिरो नव्हतीसच. आताही कधी नसशील. कारण तू आता आमच्या मनातही अजरामर झाली आहेस. तुला आणि तुझ्या त्या सर्व पिढीलाही सलाम!

दर्जा - साडेतीन स्टार
---

2 comments:

  1. Khup chan lihile aahet.. Don't want to miss this now. Big salute to Nirja

    ReplyDelete