24 Jan 2019

उरी - द सर्जिकल स्ट्राइक - रिव्ह्यू

‘उरी’ अभिमानच, पण...
-----------------------

‘उरी - द सर्जिकल स्ट्राइक’ हा नवा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवसापासून खूप चर्चेत आहे. अनेकांना तो अफाट आवडलाय, तर अनेकांना त्याचं या वेळी प्रदर्शित होणं फार सूचक वाटतंय. हा सिनेमा पाहायला मला दोन आठवडे जमलंच नाही. अखेर आज, गुरुवारी (२४ जानेवारी) मी तो पाहिला. मला सिनेमा आवडला. युद्धपट पाहायला मला आवडतात. ‘उरी’ हा भारतीय लष्कराच्या अतुलनीय कामगिरीवर आधारित सिनेमा असल्यानं तो पाहताना अजूनच जास्त छान वाटतं. आपल्या लष्करी अधिकाऱ्यांबद्दल, जवानांबद्दल विलक्षण अभिमान आपल्या उरी दाटून येतो. ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांना शिकवलेला मोठाच धडा आहे, यात वाद नाही. अशी मोहीम राबविताना पंतप्रधानांपासून सर्वच उच्चपदस्थ सहभागी असतात. अशी धाडसी मोहीम कशी राबविली जाते, ती प्रत्यक्षात कशी आणली जाते, हे सगळं पाहणं आपल्याला आवडतं. ‘उरी’ आपल्या बहुतांश अपेक्षा पूर्ण करतो. 
अनुराग कश्यपनं त्याच्या गाजलेल्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या सिनेमाची रचना ‘चॅप्टर १’, ‘चॅप्टर २’ अशी पुस्तकासारखी केली होती. ‘उरी’ही तशीच रचना सादर करतो. पहिल्या चॅप्टरमध्ये मणिपूर, नागालँड येथे भारतीय लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, अनेक जवानांचं वीरमरण आणि नंतर आपल्या जवानांनी म्यानमारच्या सीमेत घुसून घेतलेला त्याचा बदला हा भाग येतो. खऱ्या अर्थाने आत्ताच्या सरकारच्या काळातला हा पहिला सर्जिकल स्ट्राइक होता. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानच्या बाजूने होणारी घुसखोरी आणि दहशतवाद्यांकडून आपल्या तळांवर होणारे हल्ले थांबले नाहीत. उरी येथे झालेला हल्ला असाच भीषण आणि आपल्या सुरक्षा यंत्रणांसाठी लज्जास्पद होता. आपल्याच लष्कराचा गणवेश घालून चार पाकिस्तानी दहशतवादी थेट उरी येथील लष्करी तळात शिरतात आणि झोपलेल्या नि:शस्त्र जवानांना क्रूरपणे गोळ्या घालून संपवतात, ही घटनाच अत्यंत संतापजनक होती. पडद्यावरही ती दृश्ये पाहताना कानशिले गरम झाली होती. अशा या मानहानीकारक हल्ल्यात आपले अनेक जवान मारले गेले. याला चोख प्रत्युत्तर म्हणून ‘पाकव्याप्त काश्मीर’मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करायचा आणि तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायचे, अशी योजना ठरली. 
चित्रपटात पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार गोविंद भारद्वाज (परेश रावल) (अजित डोवल यांच्यावर बेतलेले पात्र) ही योजना आखतात आणि तडीस नेतात. मेजर विहान शेरगिल (विकी कौशल) हा धाडसी व शूर अधिकारी ही योजना प्रामुख्याने प्रत्यक्ष राबवतो आणि यशस्वी करतो. चित्रपटात हा सगळा भाग थरारकपणे समोर येतो. सुमारे दोन तास २० मिनिटांच्या या चित्रपटात आपण बहुतांश काळ खुर्चीला खिळून राहतो.
चित्रपटात विहानची अल्झायमरने त्रस्त आई, त्याची बहीण, लष्करातच अधिकारी असलेला त्याचा मेव्हणा अशी सगळी कथाही समांतरपणे येते. विहानचा मेव्हणा उरी हल्ल्यात बळी पडतो. त्यामुळं या सर्जिकल स्ट्राइकमध्ये आपण सहभागी व्हायचंच याबद्दलचा विहानचा निश्चय पक्का होतो. त्यानंतर तो या योजनेत कसा सहभागी होतो, आर्मी इंटेलिजन्सच्या मदतीने ही योजना कशी आखतो आणि प्रत्यक्षात कशी पार पाडतो, हा सगळा थरारक भाग उत्तरार्धात येतो. 
‘हाऊ इज द जोश?’ असं विचारणारा विकी कौशलचा नायक आपल्याला आवडतो. या सिनेमातला त्याचा वावर अत्यंत उमदा, जोशपूर्ण असाच आहे. त्यानं घेतलेली मेहनत जाणवते. तुलनेनं यामी गौतम व कीर्ती कुलहारी यांना फार स्थान नाही. परेश रावल यांनी अजित डोवाल यांच्यावर बेतलेल्या गोविंद भारद्वाज या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भूमिका केली आहे. रजित कपूर यांनी मोदींची भूमिका केली आहे, मात्र ते अजिबात ‘मोदी’ वाटत नाहीत. मनोहर पर्रीकरांच्या भूमिकेत योगेश सोमण चपखल बसले आहेत. मात्र, त्यांनाही फार वाव नाही. 
या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, व्हीएफएक्स सगळं उच्च प्रतीचं आहे. एलओसी व पाकव्याप्त काश्मीरमधील गावं हे सगळं चित्रिकरण युरोपातील सर्बिया देशात झालेलं आहे. त्यामुळं तिथली चकचकीत खेडी लगेच ओळखू येतात. ती पाकव्याप्त काश्मीरमधील वाटत नाहीत. गरूड पक्ष्याच्या ड्रोनची कल्पना भारी आहे. प्रत्यक्षात असं काही झालं होतं का, माहिती नाही. चकमकीचे प्रसंग खरे वाटतात. गोळीबाराचे आवाज आणि साहसदृश्ये जमून आली आहेत. मात्र, शेवटी विकी कौशल आणि दहशतवाद्यांचा कमांडर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतात, हे जरा अती वाटतं. लष्करी मोहिमा कशा राबविल्या जातात, याची सखोल माहिती असलेल्यांना कदाचित हा सिनेमा भाबडा व हास्यास्पद वाटू शकेल. पण सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी शत्रूच्या घरात घुसून मारणारा आपला लष्करी जवान व अधिकारी टाळ्या-शिट्ट्यांचेच धनी आहेत, यात वाद नाही.
अर्थात, हे सगळं चांगलं असलं, तरी हा सिनेमा आत्ता प्रदर्शित करण्यामागची सूचक वेळ लक्षात येते आणि आपल्या लष्कराच्या कामगिरीचा सत्ताधारी पक्ष आपल्या प्रचारासाठी वापर करून घेत नाहीय ना, अशी शंकाही येते. या सिनेमात काही वेळा ‘यह नया हिंदुस्थान है’ असा जरा मुद्दाम होत असलेला उल्लेख पाहिला, की या शंकेला पुष्टी मिळते. काय वाट्टेल ते झालं, तरी लष्कराच्या कामगिरीचा राजकारणाशी संबंध जोडला जाऊ नये. भारतीय लष्कर पूर्वीपासूनच चांगली कामगिरी करीत आलेलं आहे. सध्या सत्तेवर कोण आहे, याच्याशी त्याच्या कर्तृत्वाचा संबंध जोडता कामा नये.
हा सिनेमा पाहावा तो आपल्या लष्करासाठीच! कारण सिनेमा संपताना वाटतं, की आपण इकडं किती सुरक्षित आयुष्य जगतो! आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला लष्करी शिक्षण व प्रशिक्षण सक्तीचं करायला पाहिजे. तेव्हाच या लष्कराच्या बलिदानाची किंमत आपल्याला कळेल. तोवर ‘उरी’ जखमा होतच राहतील.... 

दर्जा : साडेतीन स्टार

----

No comments:

Post a Comment