25 Jan 2019

ठाकरे - रिव्ह्यू

आहेत ‘साहेब’ तरीही...
----------------------


मला अभिजित पानसे या दिग्दर्शकाचं काम आवडतं. त्यामुळं ‘ठाकरे’ या चरित्रपटाचं दिग्दर्शन तो करणार म्हटल्यावर बऱ्यापैकी आशा तयार झाल्या. नवाजुद्दीन सिद्दिकी बाळासाहेबांचं काम करणार, म्हटल्यावर तर हा सिनेमा पाहणं अगदी ‘मस्ट’ झालं. त्यानुसार खूप उत्सुकतेनं आज पहिल्याच दिवशी (२५ जानेवारी) हा सिनेमा (मराठी आवृत्ती) पाहिला. सिनेमा पाहिल्यावर माझ्या मनात संमिश्र भावना तयार झाल्या. सिनेमात काही गोष्टी उत्तम जमल्या आहेत, तर काही गोष्टींबाबत भ्रमनिरास झाला. 
आधी जमलेल्या गोष्टींबाबत. या चित्रपटानं ‘ठाकरे’ नावाच्या व्यक्तिरेखेची जडणघडण अगदी बारकाईनं, सर्व तपशिलात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना महाराष्ट्राचा, मुंबईचा इतिहास माहिती आहे, ज्यांनी हा काळ बघितला आहे, त्यांना हा चित्रपट स्मरणरंजनाच्या दुनियेत घेऊन जाईल. मुंबईत मराठी माणसांवर होणारा अन्याय ‘कार्टून’च्या रूपात दाखविण्याची कल्पना फारच आवडली. त्यानंतर बाळासाहेबांकडं कामं घेऊन येणाऱ्या लोकांची संख्या वाढते, हे दाखविण्यासाठी केलेला दृश्यांचा कोलाजही आवडला. चित्रपटाचा स्वभाव गंभीर आहे. तो आशयाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. चरित्रनायकाच्या वैयक्तिक आयुष्यातील हळवे क्षणही टिपण्यावर भर देतो. सिनेमाचा पूर्वार्ध संथपणे, वेळ घेत, ‘बाळ ठाकरे’ ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब’ हा प्रवास दाखवतो. नवाजुद्दीनचा अभिनय, त्यानं बाळासाहेब साकारण्यासाठी घेतलेली मेहनत, अंगिकारलेली देहबोली स्तुत्य आहे. (पण बाळासाहेब वर्णानं गोरे होते. यात ते काळे दिसतात.) प्रबोधनकार, श्रीकांत ठाकरे, प्रमोद नवलकर, यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई या व्यक्तिरेखा जमल्या आहेत. विशेषत: प्रबोधनकारांचे काम करणारा कलाकार हुबेहूब त्यांच्यासारखा दिसतो. पूर्वार्धातील अनेक प्रसंग मुंबईतील गेल्या ५० वर्षांच्या इतिहासाची उजळणी करणारे आहेत. ते प्रसंग व तेव्हाचे कलादिग्दर्शन प्रशंसनीय.
आता त्रुटींबाबत. हा चित्रपट युतीच्या १९९५ मधील विजयापर्यंत येऊन थांबतो व शेवटी  ‘टू बी कंटिन्यूड’ अशी पाटी येते. हा सिनेमाचा पूर्वार्ध आहे, हे चित्रकर्त्यांनी आधी स्पष्ट केलेले नाही. ‘भाई’ चित्रपटाप्रमाणे प्रेक्षकांना विश्वासात घेऊन हा पहिला भाग आहे, हे सांगायला हवे होते. याशिवाय चित्रपटाच्या संकलनात काही त्रुटी जाणवतात. लखनौच्या कोर्टात बाळासाहेब अयोध्या खटल्यात साक्षीला जातात, त्या प्रसंगापासून चित्रपटाची सुरुवात होते व तिथेच शेवट होतो. त्यांच्या निवेदनाच्या मध्ये पेरलेल्या प्रसंगांतून, फ्लॅशबॅक तंत्राने कथा पुढे जाते. मात्र, १९६९ ची घटना आधी येते व नंतर १९६६ ची येते. घटना कालक्रमानुसार येत नाहीत. युती सरकारमध्ये मनोहर जोशींचा शपथविधी १९९५ मध्ये झाला. जर बाळासाहेबांची साक्ष १९९४ मध्ये चालली आहे, तर त्या काळाच्या मागील घटनाच फ्लॅशबॅकमध्ये यायला हव्यात. त्याऐवजी १९९५ ची घटनाही सिनेमात दाखविली जाते. आणखी खटकणारी बाब म्हणजे अमृता रावनं साकारलेल्या मीनाताई. मराठी आवृत्तीतील संवादांचे डबिंगही अमृतानंच केलं असावं. मात्र, तिचे कृत्रिम मराठी उच्चार खूप खटकतात. माँसाहेबांची ही व्यक्तिरेखा ठसत नाही. तीच गोष्ट संदीप खरेंनी साकारलेल्या मनोहर जोशींची. प्रवीण तरडे यांनी साकारलेले दत्ताजी साळवीही अनेकदा ‘ओव्हर द बोर्ड’ जातात. आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे, मुंबईच्या आयुष्यातील गिरणी संपासारखी महत्त्वाची गोष्ट हा चित्रपट बायपास करून पुढं जातो. त्याऐवजी कृष्णा देसाईंची हत्या, आणीबाणी व ठाकरे-इंदिरा भेट अशा गोष्टी जास्त तपशिलात दाखविल्या जातात. बाळासाहेब जातिधर्म मानणारे नव्हते, ही बाब खरीच. पण तरीही त्यांच्या घरात एक मुस्लिम नमाज पढतो आहे, हे दृश्य आवर्जून दाखवण्यामागचा उद्देश लपत नाही. 
‘ठाकरे’ या चित्रपटाबाबत सर्वांत चर्चा झाली ती बाळासाहेबांच्या आवाजाची. सचिन खेडेकर यांचा आवाज बदलून निर्मात्यांनी चेतन सशीतल यांचा आवाज वापरला, ते फार बरे झाले. प्रेक्षकांना बाळासाहेब ही व्यक्तिरेखा विश्वसनीय वाटण्यात या आवाजाचा फार मोठा वाटा आहे. 
अर्थात, हा चित्रपट पाहताना या चित्रपटाची ‘कथा’ संजय राऊत यांची आहे, हे लक्षात ठेवलेले बरे. ठाकरे यांचे उत्तरार्धातील आयुष्य खूप जवळून पाहिलेले ते पत्रकार व नंतर त्यांचे विश्वासू सैनिक असल्यानं चित्रपट अधिकाधिक ‘ऑथेंटिक’ करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले आहेत, हे जाणवतं.
पण तरीही हा चित्रपट एक उत्तम चरित्रपट पाहिल्याचं समाधान देत नाही. काही तरी राहून गेल्यासारखं वाटतं. मी सिनेमा पाहताना संपूर्ण भरलेल्या थिएटरमधून एकदाही टाळी, शिट्टी आली नाही, हे जरा जास्तच जाणवलं. (‘उरी’च्या तुलनेत तर ते फारच जाणवलं.) अर्थात, हा बाळासाहेबांचा संपूर्ण चरित्रपट नाहीच, हे शेवटी समजलंच. त्यामुळं काहीसं असमाधान घेऊन पुढच्या भागाची वाट पाहायची.
बाळासाहेबांनी स्वत: हा चित्रपट पाहिला असता, तर ते कदाचित चेतन सशीतल यांना म्हणाले होते, तसंच संजय राऊत यांना म्हणाले असते का? - ‘चांगलंय. परत काढू नकोस!’

दर्जा : तीन स्टार

---

6 comments:

  1. चांगलं परीक्षण. "उरी: द सर्जिकल स्ट्राईक' आणि 'द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' याही चित्रपटांचे परीक्षण केले असल्यास त्याचेही दुवे द्यावेत.

    ReplyDelete
  2. परिक्षण नेहमीप्रमाणे तटस्थ राहून केलं आहे. व्यक्तिगत मत बाजूला ठेवून चांगल्या वाईट बाजूंचं मूल्य मापन करणं खरंच खूप अवघड असतं. ते उत्तम जमलं आहे. चित्रपट पहायची उत्सुकता निर्माण झाली आहे.

    ReplyDelete
  3. उत्तम परीक्षण ...एकदम पटल...काल रात्रीच पाहिला

    ReplyDelete
  4. शेवटचं वाक्य अगदी पर्फेक्ट :)

    ReplyDelete