12 Apr 2019

रिव्ह्यू - वेडिंगचा शिनेमा

निखळ नात्यांचं सुरेल गाणं....
-------------------------------------------------------


हल्लीच्या काळात साधं-सरळ, सहज-सोपं, नितळ-निखळ असं काही पाहायला मिळत नाही असं आपण सारखं बोलत असतो. दिवसेंदिवस नानाविध विकारांनी आपली मनं ग्रस्त झालेली दिसताहेत आणि त्यामुळे आपणही त्रस्त झालो आहोत. रणरणत्या उन्हात एखादं झाड दिसावं आणि तिथं सावलीला बसल्यावर शेजारी थंडगार पाण्याचा वाहता झरा दिसावा, असे सुखद अनुभव आताशा दुर्मीळच झाले आहेत.
अशा वेळी आपल्याला अशी साफसुथरी, नितळ-निखळ कलाकृती बघायला मिळाली, तर कसं वाटेल? त्या उन्हातल्या झाडाच्या सावलीत बसल्यासारखं व झऱ्याचं पाणी प्यायल्यासारखं फीलिंग येईल, हे नक्की! प्रसिद्ध संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला ‘वेडिंगचा शिनेमा’ हा नवा मराठी सिनेमा आपल्याला अगदी असाच अनुभव देतो. आपल्याला प्रिय असणारे व हल्ली दुर्मीळ झालेले असे सुखद अनुभव देणारी कुठलीही कलाकृती आपल्याला भावतेच. ‘वेडिंगचा शिनेमा’ ही हलकीफुलकी कॉमेडी आपल्याला अगदी याच कारणासाठी आवडते. मनापासून हसवते आणि हे करता करता किंचित अंतर्मुखही करते. पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाकडून यापेक्षा अधिक काय हवे?
हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगात हृषीकेश मुखर्जी यांनी मध्यमवर्गीय संवेदना केंद्रस्थानी ठेवून, हलक्या-फुलक्या शैलीत त्याचं जगणं मांडणाऱ्या अनेक कलाकृती दिल्या. त्या त्यांच्या या अंगभूत गुणांमुळं अत्यंत लोकप्रियही झाल्या. सलीलचा चित्रपट पाहताना हृषीदांच्या चित्रपटांची आठवण झाली. मराठी चित्रपटांना विनोदाची उत्तम परंपरा आहे. (वाईट इनोदी सिनेमांचीही आहे. पण ते जाऊ द्या...) त्यात उत्तमोत्तम साहित्यिकांनी लिहिलेल्या सिनेमांपासून अत्युत्तम अभिनेत्यांनी साकारलेल्या भूमिकांपर्यंत सगळ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सलीलचा ‘वेडिंगचा शिनेमा’ हा याच वाटेवरचा सिनेमा आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या चित्रपटाचं लेखन जमून आलं आहे. आपल्याला काय दाखवायचंय यापेक्षा काय दाखवायचं नाहीय हे दिग्दर्शकाच्या डोक्यात स्पष्ट असल्याशिवाय हे घडत नाही. सलीलच्या गेल्या वीस वर्षांतील सांगीतिक कारकिर्दीमधून, अप्रत्यक्षपणे घडत गेलेला त्याच्यातला दिग्दर्शक पुष्कळ प्रगल्भ झाल्यावरच त्यानं सिनेमासारख्या मोठ्या निर्मितीला हात घातल्याचं जाणवतं.
हा सिनेमा नावाप्रमाणं लग्नाच्या व लग्नाआधीच्या गमतीजमती सांगणारा आहे. हल्ली लग्नाआधी शूट करण्याचं फॅड आहे. त्या वेडाचा उपयोग या चित्रपटात करण्यात आला आहे. अर्थात हा सिनेमा फक्त त्या लग्नाचा किंवा त्याआधीच्या प्री-वेडिंग शूटच्या गमतीजमतीचा नाहीच. या सिनेमाची नायिका आहे ती ऊर्वी (मुक्ता बर्वे). तिला गंभीर, सामाजिक आशयाचे वगैरे चित्रपट तयार करायचे आहेत. ते तिचं अगदी जेन्युइन स्वप्न आहे. तिचा एक बॉयफ्रेंडही आहे. (सिनेमाच्या अगदी शेवटी येणारा हा बॉयफ्रेंड म्हणजे एक सरप्राइज आहे.) त्याच्याशी असलेल्या नात्याचं पुढं नक्की काय करायचं, याबाबतही ती कन्फ्युज्ड आहे. अशा स्थितीत तिला सासवडला हे प्री-वेड शूट करण्याचं काम मिळतं. अगदी नाइलाजानं व पैसे मिळतील म्हणून ती हे काम स्वीकारते.
कट टु सासवड. प्रकाश शहाणे (शिवराज वायचळ) हा सासवडमध्ये मोबाइलचं दुकान चालवणारा, एक साधा-सरळ मुलगा आहे. मुंबईहून इंटर्नशिपसाठी आलेल्या परी प्रधान (ऋचा इनामदार) या मुलीच्या तो प्रेमात पडतो. दोघं लग्नही करायचं ठरवतात. त्याच्याआधी प्री-वेडिंग शूट करायचं ठरतं. मग ऊर्वी सासवडला येते. तिच्यासोबत मदन (भाऊ कदम) हा ‘डीओपी’ आणि जंबो (त्यागराज खाडिलकर) हा कोरिओग्राफरही येतात. प्रकाशचे वडील (शिवाजी साटम), आई (अलका कुबल), बहीण (प्राजक्ता हणमघर), भाऊ (संकर्षण कऱ्हाडे) अशा सगळ्या गोतावळ्याशी ऊर्वीची गाठ पडते. मग हे लग्नाआधीचं शूटिंग करता करता प्रत्येकाचा स्वत:चा असा एक प्रवास सुरू होतो. त्यात राग-लोभ, प्रेम-भांडण, रुसवे-फुगवे, समज-गैरसमज अशी सगळी परिचयाची स्टेशनं घेत गाडी मुक्कामी पोचते.
हा प्रवासच गमतीशीर आहे. हा प्रकाश आणि ऋचाच्या नात्याचा प्रवास आहे, तसा तो ऊर्वीच्याही बदलत जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास आहे. तो प्रकाशच्या आई-वडिलांमधल्या समंजस नात्याचा आहे, तसा ऋचाच्या आई-वडिलांच्या नात्यातील अवघडलेपणाचाही आहे. ऋचाची आई (अश्विनी काळसेकर) ही करिअरला प्राधान्य देणारी डॉक्टर. ऋचा आणि तिच्या आई-वडिलांचं शूटिंग करायला ऊर्वी जाते, तेव्हा आपल्या मुलीला वेळ देऊ न शकलेल्या आईचं कोसळलेपण अश्विनी काळसेकरांनी त्या दृश्यात अप्रतिम दाखवलंय. दिग्दर्शकाच्या लेखणीतून साकारलेली अशी काही दृश्ये या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.
दिग्दर्शकच संगीतकारही असल्यानं यातली गाणीही धमाल आहेत. यातल्या देवीच्या गाण्यावर मुक्तानं केलेलं नृत्य ठसकेबाज आणि लक्षात राहणारं आहे. बोल पक्या बोल आणि उगीचच ही दोन्ही गाणीही मस्त जमून आली आहेत.
चित्रपट जमून येण्यातला सगळ्यांत महत्त्वाचा भाग म्हणजे कलाकारांची अचूक निवड. या चित्रपटातील सर्वच कलाकार त्या त्या भूमिकांमध्ये फिट बसले आहेत. मुक्ता बर्वे कुठल्याही भूमिकेत ज्या सहजतेनं वावरते, ते थक्क करणारं असतं. ती इथल्या ऊर्वीच्या भूमिकेतही अशीच चपखल बसली आहे. शिवराज वायचळ या अभिनेत्यानं प्रकाश फार सहज उभा केला आहे. ऋचा इनामदार ही नवी अभिनेत्री परीच्या भूमिकेत छान शोभलीय. अलका कुबल यांना दीर्घकाळानं त्याच्या प्रतिमेला न शोभणारी अशी भूमिका मिळाली आहे आणि ती त्यांनी चोख केलीय. शिवाजी साटम नेहमीच सहज अभिनय करतात. इथले मुलाचे बाबा साकारणं त्यांच्यासाठी सहज-सोपंच होतं. तीच गोष्ट सुनील बर्वे यांची. त्यांनी ऋचाचे बाबा फार गोड साकारले आहेत. या चित्रपटात चार जणांनी धमाल केलीय. ते म्हणजे प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमघर आणि अर्थातच भाऊ कदम. या चौघांनी आपापल्या भूमिकांत जी जान ओतलीय त्यामुळं या चित्रपटाचा पुष्कळ भाग आपल्याला हसवत ठेवतो. प्राजक्ता हणमघरनं आणलेला नणंदेचा गावरान ठसका त्यातही विशेष उल्लेखनीय!
असा हा हसत-खेळत, सहकुटुंब पाहता येणारा प्रसन्न सिनेमा चुकवून चालणार नाही. कारण अशी निखळ व नितळ करमणूकही दुर्मीळ होत चाललीय....
सलील व टीमचं या चांगल्या कलाकृतीसाठी अभिनंदन.
----

दर्जा : साडेतीन स्टार
---

No comments:

Post a Comment