2 Apr 2019

मटा संवाद लेख : ३१ मार्च १९

मायाजाल : सीझन १
--------------------

आपल्याकडे जालमालिका (वेबसीरीज) येऊन स्थिरावल्या, त्याला आता काही-एक काळ झाला. या मालिकांच्या आशयामधील नावीन्य व कुतूहल अद्याप टिकून आहे. या मालिकांना मिळणारा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. भविष्यात आणखी वाढणार आहे आणि त्यामुळं कदाचित या ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप - म्हणजे इंटरनेटवरून थेट उपलब्ध होणाऱ्या) सेवेचे नियमन करण्याचीही वेळ येणार आहे. या मालिकांच्याच भाषेत सांगायचं, तर त्यांचा पहिला सीझन संपत आला आहे आणि या मालिकांमुळं आपल्या सभोवतालावर होत असलेल्या बऱ्या-वाईट परिणामांची चर्चा करायलाही हीच योग्य वेळ आहे, असं वाटतं.
नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन या दोन बलाढ्य अमेरिकी कंपन्यांसोबत आता भारतीय कंपन्याही ‘ओटीटी’ सेवेत उतरल्या आहेत. ज्यांच्याकडे उत्तम दर्जाचा, क्षमतेचा मोबाइल आहे आणि (जिओकृपेने) अविरत, मुबलक व स्वस्त डेटा उपलब्ध आहे, अशांच्या मोबाइलमध्ये आता अशी किमान चार-पाच अॅप असतातच. नुकत्याच एका पाहणीद्वारे असं सिद्ध झालंय, की भारतात मिळणारा डेटा जगात सर्वांत स्वस्त आहे. चांगल्या प्रतीच्या मोबाइलची किंमतही आता दहा हजारांच्या घरात आली आहे. त्यामुळे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, आल्ट बालाजी, हॉटस्टार, वूट, झी-५ अशा अॅपना मोबाइल स्क्रीनवर पानाची पंगत लाभली आहे. कधीही टिचकी मारावी आणि हवी ती मालिका पाहायला सुरुवात करावी, एवढं हे सोपं झालंय. एखाद्या आधीच जाहिरातींतून गाजवत ठेवलेल्या जालमालिकेचे भाग संबंधित अॅपवर पडले रे पडले, की ‘बिंज वॉचिंग’ (लागोपाठ सगळे भाग पाहणे) करणारे लोक काही कमी नाहीत.
या मालिकांतून आपल्यापर्यंत येणाऱ्या कंटेंटला सध्या तरी कुठलीही सेन्सॉरशिप नाही. त्याऐवजी मालिका सुरू होतानाच संबंधित ‌‌व अपेक्षित प्रेक्षकवर्गाचा वयोगट आणि त्यात हिंसाचार, नग्नता आहे असे सूचित करणारे इशारे येत असतात. या जालमालिकांमधून सध्या आपल्यापर्यंत काय येत आहे? भारतासारख्या विशाल, खंडप्राय देशात सर्व भाषा, प्रदेश, संस्कृती ओलांडून खपणाऱ्या दोनच गोष्टी आहेत - माणसांचे लैंगिक व्यवहार आणि त्याची मूलभूत गुन्हेगारी प्रवृत्ती. या मालिका तयार करणारे लोक हुशार आहेत. त्यांचा प्रेक्षकवर्गाचा अभ्यास आधीच नीट झालेला असतो. कुठलीही रिस्क न घेता, त्यांनी सेक्स आणि क्राइम या दोन गोष्टी विकायला सुरुवात केली आहे. आणि अपेक्षेप्रमाणेच, त्या जोरदार खपताहेत. बहुतेक मालिकांचा ‘यूएसपी’ हाच दिसतो आहे. भारतांतील चित्रपटांत (अगदी ‘प्रौढां’साठीच्या) न दिसणारी नग्नता, लैंगिक दृश्ये आणि भयानक अंगावर येणारा, किळसवाणा हिंसाचार असा सगळा मसाला या मालिकांमध्ये खच्चून भरलेला दिसतो. वास्तविक हा भाग वगळला तरीही यातल्या काही मालिका उत्तम आहेत आणि त्यांना चांगला प्रेक्षकवर्गही मिळेल. मात्र, तरीही त्यात मालिकांमध्ये या गोष्टी एखाद्या खाद्यपदार्थावर सजावटीसाठी वरून कोथिंबीर किंवा खोबरं टाकतात, तशा भुरभुरलेल्या दिसतात. काही मालिकांमध्ये हे खोबरं जास्त आणि मूळ भाजी कमी असाही प्रकार दिसतो. त्यांना जसा मिळायला हवा, तसाच प्रतिसाद मिळतो आहे.
महत्त्वाचे म्हणजे आता या मालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक होत आहे. मोठमोठ्या प्रॉडक्शन कंपन्या यात उतरल्या आहेत, अनेक नामवंत व बडे दिग्दर्शक या माध्यमात काम करू लागले आहेत. दिग्दर्शकाला जे आणि जसं दाखवायचंय ते आणि तसं दाखवायचं स्वातंत्र्य त्याला इथं मनमुराद उपभोगता येत आहे. त्यामुळं एखाद्याकडं जर खणखणीत आशय असेल, तर त्याला तो इथं जोरदार वाजवता येणार आहे आणि प्रेक्षकही त्याला तसाच प्रतिसाद देतील, याची जवळपास खात्री आहे. त्यामुळं आत्ता नाही तरी निदान भविष्यात तरी इथं चांगला कंटेंट येईल आणि तोच टिकेल, असं वाटतं. याचं कारण मुळात हे भविष्यातलं महत्त्वाचं माध्यम असणार आहे; किंबहुना आत्ताच ते बऱ्यापैकी महत्त्वाचं माध्यम झालंही आहे. त्यामुळं इथल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होणार, टीकाटिप्पणी होणार, बरी-वाईट मतं मांडली जाणार!
यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मनोरंजनाचे प्रतल आता वैयक्तिक होते आहे. सिनेमा किंवा नाटक यासारख्या माध्यमांतून सामूहिक आस्वादनाचा आनंद आपण एवढे दिवस घेत होतो. आता पुस्तकवाचनासारखा हा आनंदही वैयक्तिक पातळीवर येणार आहे. सामूहिक आस्वादनासाठीच्या कला राहतीलच; पण एकट्याला आपल्या मोबाइलमध्ये कधीही, कुठेही आपल्या सोयीने पाहता येणाऱ्या या जालमालिकांना पसंती वाढत जाणार आहे. पुढच्या पाच वर्षांत किंवा त्याहूनही कमी कालावधीत मनोरंजन क्षेत्राचे सर्व आयामच बदलवून टाकण्याची ताकद या माध्यमात आहे. आताच काही काही चित्रपट फक्त या ‘ओटीटी’ सेवेवरच थेट प्रदर्शित होत आहेत. थिएटरमध्ये जा, भरपूर पैसे मोजा, पॉपकॉर्नलाही पैसे द्या, येता-जाता ट्रॅफिक जॅममध्ये अडका, पेट्रोल-पार्किंगला पैसे घालवा यापेक्षा घरच्या घरी, बेडरूममध्ये, गादीवर लोळत, एसीमध्ये बसून हवी ती मालिका, पॉज करत करत किंवा सलग अशी कशीही बघता येत असेल, तर कुणीही सहजच हा दुसरा पर्याय स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. भारतात आजही कुठल्याही गोष्टीला मोजावी लागणारी किंमत हे अनेक गोष्टी ठरविण्यामागचं मुख्य कारण असू शकतं. सुरुवातीला अगदी फुकट असलेल्या या सेवांना आता पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, तरीही ते एका वेळेला घरातील चार जणांनी सिनेमाला जाण्यात होणाऱ्या खर्चापेक्षा किती तरी कमी आहे. किंबहुना, तेवढ्या किमतीत एखाद्या सेवेची वर्षभराची वर्गणी भरणं शक्य आहे. 
हे आभासी मनोरंजन एवढं वैयक्तिक झाल्याचे फायदे म्हणजे प्रत्येकाला शांतपणे आपल्याला जे हवं ते पाहता येईल. एकाच घरात जेवढी डोकी, तेवढे स्वभाव आणि आवडी-निवडी. मात्र, इथं प्रत्येकाला हवं ते पाहण्याचं स्वातंत्र्य असल्यानं त्यावरून वाद-विवाद, कटकटी होणार नाहीत. ज्याला जे हवे ते त्याने निवडून पाहावे, अशी स्थिती असेल. त्यामुळे एकाच घरात तीन जण आपापल्या मोबाइलमध्ये डोके आणि कानात इअरफोन खुपसून, तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेताहेत, असंही दृश्य दिसेल. खरं तर आत्ताच ते दिसतं आहे.
याची दुसरी बाजू म्हणजे मनोरंजन वैयक्तिक पातळीवर उतरल्याने सामूहिक आस्वादनाची आपली आवड, इच्छा व क्षमता कमी होणार काय, असा प्रश्न उपस्थित होतो. आनंद असो वा दु:ख, कुठल्याही भावनेचं ‘शेअरिंग’ ही माणसाची मूलभूत गरज असते. कलेचा सामूहिक आस्वाद घेताना आपोआप हे शेअरिंग होत असतं. पूर्वी सिनेमा थिएटरांवर आवडत्या गाण्यावर पडणारा नाण्यांचा पाऊस किंवा तमाशा पाहताना उडणारी शेले-पागोटी म्हणजे या शेअरिंगचंच एक उदाहरण होतं. अनेक कलावंतांना आजही थिएटर करावंसं वाटतं, महत्त्वाचं वाटतं याचं एक कारण म्हणजे समोरून मिळणारी जिवंत दाद! सामूहिक आस्वादनाच्या प्रक्रियेत प्रेक्षकांची कलाकारांसोबत किंवा सिनेमासारखी कला असेल, तर अन्य प्रेक्षकांसोबत होणारी ही जिवंत देवाणघेवाण फार महत्त्वाची आहे. जालमालिकांचा वैयक्तिक आस्वाद घेताना त्या आनंदाची ओढ माणसाला कायम वाटत राहील का, असा प्रश्न पडतो. 
याखेरीज अनेकदा या मालिकांचं ‘बिंज वॉचिंग’ करण्याचं व्यसन लागू शकतं. एकाच प्रकारच्या आभासी जगात, त्यातही गुन्हेगारी स्वरूपाच्या, सतत दीर्घकाळ मेंदू वावरत राहिला तर त्या माणसाच्या मानसिकतेवर त्या दृश्यांचा, घटनांचा परिणाम होणारच नाही, असं कुणीही ठामपणे म्हणू शकणार नाही. आधीच विकेंद्रित झालेल्या कुटुंबात आता प्रत्येक व्यक्ती असं स्वतंत्र बेट करून जगू लागली, तर ते या कुटुंबव्यवस्थेच्या पायालाच धक्का लागल्यासारखे होईल. कुणी म्हणेल, की आपण टीव्हीवरही पूर्वी मालिका पाहतच होतो. तेव्हाही अशाच चर्चा व्हायच्या. हे खरं असलं, तरी त्या मालिका सगळं कुटुंब एकत्र बघत असे. आता तेवढ्यापुरतंही एकत्र येण्याची गरज उरलेली नाही. शिवाय जालमालिकांतून येणारा आशय हा किती तरी भडक आणि तीव्र स्वरूपाचा असू शकतो, हा महत्त्वाचा फरक आहे.
एका अर्थानं मनोरंजनाची व्याप्ती पुन्हा मोठ्या पडद्याकडून (अति)छोट्या पडद्याकडे अशी पसरते आहे. ही व्याप्ती केवळ भौतिक नाही, तर मनोरंजनाचे हे ‘मायाजाल’ तुमच्या-आमच्या मनाचाही ताबा घेणार आहे. एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेने आपल्या आहार-विहारावर सत्ता गाजवायला सुरुवात केली आहेच; दुसरीकडे या मायाजालाच्या प्रभावामुळे आपल्या मनातल्या विचारांवरही कदाचित आपलं नियंत्रण राहणार नाही. या चक्रात योग्य त्या आशयाची निवड करणं हे आव्हानात्मक काम होऊन बसणार आहे. ‘मायाजाला’चा आनंद लुटताना या आव्हानाचंही भान ठेवू या!
---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती : ३१ मार्च २०१०९)

---

1 comment:

  1. मराठी व्याकरण लेख मस्त ..👌👌

    ReplyDelete