14 Mar 2019

प्रभाकर पणशीकर व विंदा आठवणी

१. प्रभाकरपंतांची आठवण
---------------------------------------------------

मी माझ्या आयुष्यात प्रथम मुंबईला गेलो, तो १९९६ मध्ये. तेव्हा मी २० वर्षांचा होतो. त्यापूर्वी १९८७ मध्ये वसईला आमचे एक चुलतआजोबा राहायचे, त्यांच्याकडे गेलो होतो. पण वसई म्हणजे काही मुंबई नव्हे. तर मुंबईला मी एकटाच गेलो होतो व सगळीकडं फिरलो होतो. माझगावला विक्रीकर भवनात माझं काम होतं. ते केलं. मग दिवसभर गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट असं भटकत मी संध्याकाळी शिवाजी पार्क पाहण्यासाठी दादरला आलो. तिथं चालताना अचानक शिवाजी मंदिर दिसलं. तेव्हा पाच वाजता ‘तो मी नव्हेच’चा प्रयोग लागलेला मला दिसला. तेव्हा साडेचार वाजले होते. मी तडक त्या नाटकाचं तिकीट काढलं व आत शिरलो. वीस रुपयांचं तिकीट होतं व मागून दुसरी ओळ मला मिळाली होती. नाटकाला फार गर्दी नव्हती. पण मी साक्षात प्रभाकर पणशीकरांना ‘तो मी नव्हेच’मधल्या त्या पाच गाजलेल्या भूमिका करताना पाहत होतो. आयुष्यात पहिल्यांदाच तो फिरता रंगमंच पाहिला. नाटक पाहून धन्य झालो. तेव्हा मागे जाऊन पंतांना भेटावं वगैरे काही सुचलं नाही आणि तेवढं धैर्यही नव्हतं. मग मी तिथून बसनं सेंट्रलला आलो व एसटी पकडून नगरला आलो. 
त्यानंतर प्रभाकर पणशीकर यांना थेट भेटण्याचा योग पुन्हा येईल असं मला मुळीच वाटलं नव्हतं. पण तो योग पाचच वर्षांनी, म्हणजे २००१ च्या जानेवारीत आला. आमच्या जामखेडच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं ते सुवर्णमहोत्सवी वर्ष होतं व त्या वर्षाच्या सांगता समारंभासाठी प्रभाकर पणशीकरांना निमंत्रित करण्याचा निर्णय तिथल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. विशेष म्हणजे पुण्याहून पंतांना जामखेडला घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्या काकावर सोपविण्यात आली होती. तेव्हा मी ‘सकाळ’मध्ये काम करायला सुरुवात करून तीन-चार वर्षं झाली होती. पत्रकार म्हणून मी स्थिरावत होतो. त्यामुळं शाळेच्या लोकांनी मलाही जामखेडला त्या कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. पंतांसोबत जायची ही संधी मी सोडणार नव्हतोच. जानेवारीतला तो नक्की दिवस मला आठवत नाही, पण मी व काका सुमो की क्वालिस की अशीच कुठली तरी ट्रॅव्हल्सची जीप घेऊन सहकारनगरमध्ये पंत ज्यांच्याकडं उतरले होते, त्या पत्त्यावर गेलो. आम्ही गेलो, तेव्हा पंत तयारच होते. धोतर, तलम झब्बा व त्यावर लाल रंगाचं जाकीट त्यांनी घातलं होतं. त्यांची ती ट्रेडमार्क गोल टोपी मात्र तेव्हा त्यांनी घातली नव्हती. गाडीत मी त्यांच्या शेजारी बसलो व काका पुढं ड्रायव्हरशेजारी बसला. पुणे ते जामखेड हे अंतर पाच तासांचं आहे. या संपूर्ण प्रवासात मला पंतांशी गप्पा मारता आल्या. ‘सकाळ’मध्ये आम्ही सुरुवातीला ट्रेनी असताना कुठल्याही सेलिब्रिटी व्यक्तीला भेटायला जाताना त्यांच्याविषयीची सर्व माहिती वाचून मगच जायचं, असं आम्हाला शिकवलं होतं. त्यानुसार मी आमच्या लायब्ररीत आदल्या दिवशी जाऊन पंतांचं पाकीट काढून त्यांची सगळी माहिती (मुलाखती, कात्रणं, बातम्या, लेख) वाचून काढले होते. प्रवासात त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता मी अधूनमधून ही माहिती पेरायला लागलो. पंतांनी ते लगेच ओळखलं. ‘माझा बराच अभ्यास केलेला दिसतोय’ असं ते कौतुकानं म्हणाले. कोरेगाव भीमा इथं आमची गाडी थांबली. तिथं रस्त्याच्या कडेला असलेल्या एका साध्याशाच हॉटेलात आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो. विशेष म्हणजे गांधी टोपी घालणाऱ्या त्या थोड्या वयस्कर मालकानं पंतांना ओळखलं. त्यानं तेवढ्या गडबडीत कुठून तरी नारळ, हार आणून पंतांचा सत्कारही केला. पंतांचं सेलिब्रिटी असणं आता आम्ही अनुभवत होतो. पंतांनी नाटकांच्या निमित्तानं सगळा महाराष्ट्र कित्येकदा पालथा घातला होता. त्यामुळं त्यांना सगळी माहिती होती. पुढं सुप्याला गाडी पोचताच, त्यांनी ‘आता बर्की घेऊ या’ असं सांगितलं. मी आत्तापर्यंत शेकडो वेळा नगर-पुणे रस्त्यानं प्रवास केला असला, तरी तिथं असा काही पदार्थ मिळतो हे मला माहिती नव्हतं. (कारण तोपर्यंत एसटीनंच प्रवास व्हायचा व एसटी सुप्याला थांबत नसे.) तर नानकटाईसारखा दिसणारा तो पदार्थ त्यांना हवा होता. त्यांनी एका विशिष्ट हॉटेलपुढं गाडी थांबवायला सांगितली आणि ती बर्की घेतली. त्यांनी घेतली म्हणून मग आम्हीही घेतली. दुपारी जामखेडला पोचलो. तिथल्या डाकबंगल्यात त्यांची व्यवस्था केली होती. त्यांना तिथं सोडून आम्ही आमच्या घरी गेलो. संध्याकाळी शाळेत पुन्हा पंत भेटले. एकूण रागरंग पाहून ते मला अचानकच तिथं म्हणाले, की असं करू या.... मी भाषण करत नाही. तूच माझी मुलाखत घे. मी त्यांच्याबरोबर जरा जास्तच बोललो की काय, असं मला वाटायला लागलं. पण तेव्हा मला काही त्यांना नाही म्हणायचं कारणच नव्हतं. मग मी त्यांची मुलाखत घेतली. समोर पाचवी ते दहावीतली मुलं रांगा करून बसली होती. त्यांना पंत माहिती असायचं कारणच नव्हतं. मुलाखत चालू असताना मुलांनी दंगा करणं सोडलं नाही. मुलाखत रंगलीच नाही. अर्ध्या तासात ती आम्ही गुंडाळली. पण शाळेच्या पदाधिकाऱ्यांना पंतांचं मोठेपण माहिती होतंच. त्यामुळं कार्यक्रमानंतर पुन्हा छान गप्पा रंगल्या. संध्याकाळी डाकबंगल्यावर पंतांची पुन्हा सगळी ‘साग्रसंगीत’ सोय करण्यात आली होती. पण आपल्याच गावात (आपले शिक्षक तिथं असताना) आपल्याला अशा ठिकाणी कुणी जाऊ देत नाही. त्यामुळं त्या मैफलीला मी मुकलोच. नंतर पंत परस्पर पुण्याला गेले... आमची भेट परत झाली नाही.
मी ‘मटा’त रुजू झाल्यावर २०११ मध्ये म्हणजे मी त्यांना भेटल्यानंतर बरोबर दहा वर्षांनी एके दिवशी त्यांचं निधन झाल्याची बातमी आली. तेव्हा आमची डेडलाइन फारच लवकर, म्हणजे पावणेदहाची होती. पंत गेल्याचं साधारण सव्वानऊ वाजता कळलं होतं. मग आम्ही सगळ्यांनी फार गडबड करून त्यांच्या निधनाची व्यवस्थित बातमी आमच्या अंकात घालविली... 
आज १४ मार्च. पंतांचा जन्मदिन. ते आज असते तर ८८ वर्षांचे असते. 
त्यानिमित्त हे सगळं आठवलं, इतकंच....

(१४ मार्च २०१९)

---

२. विंदांची आठवण
------------------------------

साहित्य संमेलन या प्रकाराविषयी मला लहानपणापासूनच भयंकर कुतूहल होतं. पण मी पहिल्यांदा संमेलन पाहिलं ते १९९७ ला नगरला. तेव्हा यशवंतराव गडाख यांनी नगरला सत्तरावं साहित्य संमेलन घेतलं होतं. साहित्य संमेलनांच्या इतिहासातलं एक प्रचंड यशस्वी, महागर्दीचं संमेलन म्हणून हे संमेलन ओळखलं जातं. तेव्हा मी नगरच्या 'लोकसत्ता'त प्रूफरीडर म्हणून काम करीत होतो. दोन ते चार जानेवारी १९९७ या काळात हे संमेलन भरलं होतं. दोन जानेवारीला नगरच्या मार्केट यार्डातून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली होती. त्या संमेलनाचे अध्यक्ष ना. सं. इनामदार होते. माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे त्यांना घोडागाडीत बसवलं होतं. ही ग्रंथदिंडी नगरच्या प्रमुख रस्त्यांवरून प्रवास करीत, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मोकळ्या मैदानात, जिथं संमेलनाचा मंडप होता, तिथपर्यंत प्रवास करणार होती. मी आणि माझे 'लोकसत्ता'तले सहकारी उत्साहानं या दिंडीत सहभागी झालो होतो. अनेक साहित्यिक नगरला आले होते. पण सगळ्यांत ठळक लक्षात राहिले ते विंदाविंदा तेव्हा ७९-८० वर्षांचे होते. पण अत्यंत उत्साहाने ते ग्रंथदिंडीत चालत होते. मी त्यांना अर्थात लगेच ओळखलं. मी त्यांच्या अवतीभवतीनं चालू लागलो. बोलण्याचं डेअरिंग नव्हतं. पण बालसुलभ उत्साहानं त्यांच्याकडं पाहत होतो. विंदा अत्यंत हसतमुख चेहऱ्यानं चालत होते. मधूनच कविता म्हणत होते. लहान मुलांना उचलून घेत होते. नगरच्या चितळे रोडवर विंदा चालत असताना त्यांच्याभोवती चाहत्यांचा मोठा गराडा तयार झाला होता, असं आठवतं. मी तेव्हा विंदांच्याच शब्दात सांगायचं तर 'बाविशीतला बुढ्ढा' होतो आणि ते अमाप चैतन्यानं सळसळत होते. साधा पायजमा, सुती सदरा, खांद्याला शबनम अशा थाटात हा मराठीतला महाकवी आमच्यासोबत हसत हसत, गाणी म्हणत निघाला होता. 'कवि तो दिसतो कसा आननी' हे मी प्रत्यक्ष पाहत होतो. या वातावरणामुळं साहित्य संमेलनाविषयी माझ्या मनात अत्यंत प्रेम उत्पन्न झालं आणि या उत्सवाला आपण दर वर्षी गेलं पाहिजे असं वाटू लागलं. नगरच्या त्या संमेलनत गिरीश कार्नाड यांनी केलेलं उद्घाटनाचं भाषण गाजलं. सांगतेला पं. हृदयनाथ मंगेशकरांचं 'भावसरगम' होतं. सोबत साक्षात गुलजार होते. 'सूरमयी शाम' होती ती... त्या संमेलनाला विंदा आल्यानं मी साहित्य संमेलन नावाच्या या साहित्योत्सवाकडं वळलो, हे निर्विवाद. पुढं अनेक संमेलनं कव्हर केली, पण नगरच्या त्या ग्रंथदिंडीसारखी मजा पुन्हा आली नाही, कारण लोकांमध्ये मिसळून गाणारा, नाचणारा विंदांसारखा कवी पुन्हा कधी दिसला नाही.

(२३ ऑगस्ट २०१८)

-----

No comments:

Post a Comment