13 Mar 2019

अक्षरधारा - फेब्रुवारी १९ लेख

व्यक्ती, चरित्र अन् पट...
-----------------------


सध्या आपल्याकडे धडाधड चरित्रपट येत आहेत. मराठीतही व हिंदीतही! गेल्या काही वर्षांत तर हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेलं दिसतं. सध्या पु. ल. देशपांडे यांच्यावरील 'भाई : व्यक्ती की वल्ली' या चरित्रपटावरून बराच वादंग माजलेला दिसतो. काहींना हा चित्रपट आवडला, तर काहींना अजिबात आवडला नाही. या अनुषंगाने चरित्रपट व आपल्या प्रेक्षकांची मानसिकता यांचा धांडोळा घेणं समयोचित ठरेल. 
मुळात चरित्रपट का निघतात? आणि कुणाचे निघतात? आपल्या समाजात ज्या व्यक्तीच्या आयुष्याविषयी सर्वसामान्य लोकांना कुतूहल आहे, अशा व्यक्तीचं जगणं पडद्यावर आणणं हा अगदी ठळक हेतू सांगता येतो. याखेरीज काही लोकांचं आयुष्य सर्वसामान्य लोकांपेक्षा फारच वेगळं असतं. त्यांच्यात काही तरी असामान्य गोष्ट असते आणि तीविषयी जाणून घ्यायला लोकांना आवडतं. मग अशा व्यक्तींवर चरित्रपट येऊ शकतो. काही लोकांचं आयुष्य प्रेरणादायी असतं. ते पडद्यावर आणणं यात काही दिग्दर्शकांना आव्हान वाटतं. काही चरित्रपट तर राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून तयार केले जातात. काही चित्रपट तर संबंधित सेलिब्रिटींकडून स्वतःची बाजू मांडण्यासाठी मुद्दाम तयार करवून घेतले जातात. अर्थात हे उघडपणे कुणीच मान्य करत नाही. त्यामुळं चरित्रपटांचा आढावा घेताना चित्रकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपण प्रेक्षक म्हणून कुठल्या परिप्रेक्ष्यातून या सगळ्याकडे बघतो हेही महत्त्वाचं ठरतं. 
आपल्याकडं चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली ती 'राजा हरिश्चंद्र'पासून. या पौराणिक कथांचा सुरुवातीला पगडा होता. त्यानंतर संतपट आले. पण अगदी ठळक उल्लेख करावा असा आणि ज्यानं खरोखर प्रचंड यश मिळवलं असा मराठीतला पहिला चरित्रपट म्हणजे 'संत तुकाराम'! 
'प्रभात फिल्म कंपनी'च्या या चित्रपटाच्या यशाचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रकर्त्यांनी तुकाराम महाराजांबाबत समाजात जी प्रतिमा आहे तिचं हनन न करता, हा चरित्रपट केला. त्यामुळं गाथा तरण्याच्या प्रसंगापासून ते वैकुंठागमनापर्यंत सगळे कथित चमत्कारही या चित्रपटात समाविष्ट होते. सगळ्यांत महत्त्वाचं होतं ते म्हणजे तुकारामांचं 'दिसणं'! विष्णुपंत पागनीस यांची या भूमिकेसाठीची निवड एवढी अचूक होती, की तुकाराम महाराज असेच दिसत असावेत, असं पुढं लोकांना वाटू लागलं. प्रभात फिल्म कंपनीनं नंतर संत ज्ञानेश्वरांपासून ते संत सखूपर्यंत अनेक संतपट काढले. पण भूमिकेसाठी अचूक कलाकाराची निवड आणि समाजमनातील संतांविषयीची प्रतिमा यांना धक्का न लावणं या दोन गोष्टींचं पथ्य त्यांनी आवर्जून पाळलं. नंतरच्या काळात भालजी पेंढारकरांनी 'छत्रपती शिवाजी' या चित्रपटातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत प्रथमच रूपेरी पडद्यावर आणलं. भालजींचं या विषयातलं समर्पण सर्वांना माहिती होतं. चंद्रकांत मांडरे यांनी शिवरायांची भूमिका साकारली होती, तेव्हा भालजी स्वतः त्यांना नमस्कार करायचे. स्वतः चंद्रकांत चित्रिकरणाच्या काळात अपेयपानादी गोष्टींपासून दूर राहायचे. यामुळं त्यांनी पडद्यावर साकारलेल्या भूमिकेला एक सात्त्विक भाव मिळाला. हे चरित्रपट यशस्वी होण्यामागे चरित्रनायकाच्या निवडीपासून ते समाजमनावर कोरलेली त्यांची प्रतिमा जपण्यापर्यंत अनेक बाबींचा अंतर्भाव होता, असं म्हणता येईल. यानंतर दखल घेण्याजोगा चरित्रपट म्हणजे संत गाडगेबाबांवरचा 'देवकीनंदन गोपाला'! राजदत्त यांच्यासारख्या जाणत्या दिग्दर्शकाचं दिग्दर्शन आणि चरित्रनायकाच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागूंसारखा कसलेला अभिनेता यामुळं हा सिनेमा लोकांना आवडला. त्यानंतर डॉ. जब्बार पटेल यांनी हिंदीत ‘डॉ. आंबेडकर’, तर अगदी अलीकडं ‘यशवंतराव चव्हाण’ हे दोन चरित्रपट दिग्दर्शित केले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा ‘दुसरी गोष्ट’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.

आता अगदी अलीकडचा म्हणजे गेल्या आठ-दहा वर्षांचा आणि मराठी सिनेमापुरता विचार केला, तरी मराठीत दादासाहेब फाळके, बालगंधर्व, लोकमान्य टिळक, डॉ. काशिनाथ घाणेकर, पु. ल. देशपांडे यांच्यावरचे चरित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पु. लं.वरचा चरित्रपट तर दोन भागांत प्रदर्शित होत आहे. या सर्व चरित्रपटांना आपल्याकडं चांगलं यश मिळालं आहे. त्यावर भली-बुरी चर्चा झाली आहे. मात्र, ‘भाई’ला टीकेचा जरा जास्तच सामना करावा लागला आहे, असं दिसतं. पु. ल. देशपांडे २००० मध्ये आपल्यातून गेले. याचा अर्थ अगदी अलीकडच्या काळापर्यंत ते आपल्यात होते. त्यांचा सहवास लाभलेली भरपूर माणसं आजही हयात आहेत. त्यांच्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या आहेत. याहीपलीकडं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पु. ल. त्यांच्या लेखनाद्वारे बहुसंख्य मराठी माणसांच्या मनात विराजमान झाले आहेत. एवढी लोकप्रियता विसाव्या शतकात फार थोड्या साहित्यिकांच्या वाट्याला आली. त्याबाबत पुलंच्या बरोबरीला येईल असा साहित्यिक महाराष्ट्रात झाला नाही. त्यामुळंच पुलंवरील चरित्रपटावर एवढी चर्चा झाली. 
त्या तुलनेत दादासाहेब फाळके व लोकमान्य टिळक ही दोन्ही महान व्यक्तिमत्त्वे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात निधन पावली. बालगंधर्वांचे निधन १९६८ मध्ये झाले असले, तरी त्यांच्या कारकिर्दीचा बहराचा काळ हा विसाव्या शतकाचा पूर्वार्धच होता. त्यामुळं या तिन्ही व्यक्तिमत्त्वांवर एकविसाव्या शतकात जेव्हा चित्रपट तयार झाले, तेव्हा या तिन्ही व्यक्तींबाबत समाजमानसावर असलेल्या स्मृती ताज्या नव्हत्या. हे चित्रपट पाहणारे लोक एका अलिप्त भावनेने ते चरित्रपट पाहू शकले. आपण अल्बममध्ये दुसऱ्याचे भराभर पाहतो, पण एखाद्या फोटोत आपण असू, तर तो फोटो जरा जास्त वेळ थांबून, निरखून पाहतो. पुलंचा चरित्रपट हा महाराष्ट्रातील आत्ताच्या जनतेसाठी ‘आपला सहभाग असलेला फोटो’ होता. त्यामुळं त्यांची इतरांचे चरित्रपट पाहण्याची दृष्टी आणि पुलंचा चरित्रपट पाहण्याची दृष्टी वेगळी होती, हे अगदी स्पष्ट आहे. या सिनेमाबाबत हे ‘निरखणं’ जास्तच प्रमाणात चाललं, हे मान्य करायला हवं. पण यामागं केवळ ‘आपण अनुभवलेले पु. ल.’ त्या चरित्रपटात दिसायला हवे होते, हीच भावना असणार.
कुठलाही चरित्रपट पाहताना प्रेक्षकांचं त्या चरित्रनायकाशी असलेलं भावनिक नातं कोणत्या प्रतीचं आहे, यावर त्यांची त्या चित्रपटातील भावनिक गुंतवणूक अवलंबून असते. पु. लं. च्या बाबतीत मराठी प्रेक्षकांचा हा भावनांक मोठा आहे. ‘भाई’ या चित्रपटापूर्वी काही महिने आधी प्रदर्शित झालेल्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या आणखी एका यशस्वी चरित्रपटाचं उदाहरण घेऊ या. डॉ. काशिनाथ घाणेकर हे कितीही लोकप्रिय अभिनेते असले, तरी त्यांच्या लोकप्रियतेचा कालावधी तुलनेनं कमी होता. डॉ. घाणेकरांचं निधन होऊन आता ३२ वर्षे होऊन गेली. त्यामुळे त्यांच्याविषयीची सार्वत्रिक आठवण पुलंच्या तुलनेत किती तरी कमी होती. शिवाय डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी प्रामुख्याने नाटकांतून भूमिका केल्या. मात्र, दुर्दैवाने त्या नाटकांच्या ध्वनिचित्रफिती आज उपलब्ध नाहीत. ते कसे काम करीत होते हे पाहण्याची आजच्या पिढीला संधी नाही. डॉ. घाणेकरांची एखादी दृकश्राव्य मुलाखतही उपलब्ध नाही. त्यामुळे ही व्यक्ती नक्की कशी दिसत होती, बोलत होती याचा आजच्या प्रेक्षकांना फारसा अंदाज नाही. त्यामुळे त्या सिनेमात डॉ. घाणेकर जसे सादर झाले, तसे प्रेक्षकांनी स्वीकारले. (याचा अर्थ ते चुकीचे सादर झाले, असा नाही.) याउलट पुलंच्या अगदी ‘बटाट्याची चाळ’पासून ते बहुतेक नाट्यप्रयोगांच्या कृष्णधवल, सिंगल कॅमेरा अशा कशा का असेना, ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहेत. पुलंनी त्यापूर्वी दृकश्राव्य माध्यमात काम केलेलं असल्यानं त्यांना या चित्रिकरणाचं महत्त्व नक्कीच माहिती असणार. त्यांनी त्यांची सगळी नाटके त्यामुळे चित्रित करून ठेवली. आज हा सगळा अत्यंत दुर्मीळ आणि मौल्यवान ठेवा झाला आहे, यात शंका नाही. याशिवाय पुलंनी स्वत: कथाकथन केल्याचे अनेक भागही आज यू-ट्यूबवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे पुलंची केवळ लेखक म्हणून लेखनातून नव्हे, तर एक खेळिया व्यक्ती म्हणून दृकश्राव्य माध्यमातून भरपूर आठवण सर्वांकडे आहे. सिनेमा हेही दृकश्राव्य माध्यम असल्याने पुलंच्या चरित्राला प्रेक्षकांच्या मनातल्या या दृकश्राव्य आठवणींशी मुकाबला करावा लागला. हे आव्हान सोपे नसते. बघणारे जेवढे प्रेक्षक तेवढ्या त्यांच्या मनातल्या प्रतिमा! अशा लाखो प्रतिमांचा लसावि काढून चरित्रनायक साकारणे हे खचितच सोपे काम नाही.
थोडक्यात सांगायचं, तर समाजमनावर ज्या व्यक्तीच्या आठवणींचा ठसा ताजा व लख्ख आहे, अशा व्यक्तीवर चरित्रपट काढणं हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. याउलट काही काळापूर्वी होऊन गेलेल्या, समाजमनाच्या विस्मरणात गेलेल्या व्यक्तींवर चरित्रपट काढणं तुलनेनं कमी धोकादायक आहे. यातलं आव्हान हे अर्थातच समाजमनात त्या व्यक्तीची असलेली प्रतिमा जपण्याचं! या प्रतिमेला जराही धक्का लागलेला समाजमानस खपवून घेत नाही. 
याखेरीज प्रेक्षकांच्या अपेक्षा हा एक स्वतंत्र विषय आहे. कुणाच्या चरित्रपटातून काय अपेक्षा करायची, याबाबत प्रेक्षक हुशार असतात. सर रिचर्ड अॅटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटातून ‘शोले’सारख्या मनोरंजनाची अपेक्षा अर्थातच कुणी करीत नाही. अलीकडच्या काळात काही क्रिकेटपटूंचे चरित्रपट आले. पण ‘अजहर’ आणि ‘एम. एस. धोनी’ या दोन्ही चरित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद भिन्न होता. चरित्रनायकाची समाजात आत्ता असलेली प्रतिमा यात फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. ‘अजहर’ हा चित्रपट अजहरुद्दीनची बाजू मांडण्यासाठी तयार करवून घेण्यात आला आहे, असाच प्रेक्षकांचं मत झालं. याउलट धोनी हा आजही क्रिकेट रसिकांचा लाडका खेळाडू व कर्णधार आहे. त्यामुळं त्याच्यावरच्या चित्रपटातून प्रेक्षकांना या अवलिया खेळाडूची जडणघडण कशी झाली, हे पाहण्यात रस होता. ती अपेक्षा त्या चित्रपटानं बव्हंशी पूर्ण केल्यानं त्यांचं समाधान झालं. तीच गोष्ट ‘भाग मिल्खा भाग’ या मिल्खासिंग यांच्यावरच्या आणि ‘मेरी कोम’ या मेरी कोमवरच्या चरित्रपटांची! या दोन्ही खेळाडूंना भारतीय जनतेमध्ये आदराचं, प्रेमाचं स्थान आहे. त्यामुळं त्यांच्यावरचे चरित्रपट त्याच भावनेनं पाहिले गेले. याउलट ‘संजू’ या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद संजय दत्तच्या विलक्षण आयुष्याबाबत प्रेक्षकांच्या मनात असलेल्या कुतूहलाचं द्योतक होता. सुनील दत्त व नर्गिस या चित्रपटसृष्टीतील आदरणीय दांपत्याचा हा लाडावलेला मुलगा आधी कसा बिघडला व नंतर त्यानं स्वत:ला कसं सावरलं, पुन्हा अनेक चुका केल्या व नंतर त्याची शिक्षाही कशी भोगली हे सगळं पाहण्यात सामान्य प्रेक्षकांना एक वेगळंच कुतूहल होतं. ते शमवण्याचं काम या चित्रपटानं केलं. त्यामुळं या चित्रपटाला व्यावसायिक यशही प्रचंड प्रमाणात लाभलं. 
चरित्रपट कोण दिग्दर्शित करीत आहे, चरित्रनायकाची किंवा नायिकेची भूमिका कोण करीत आहे, याही गोष्टी प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या ठरतात. ‘संजू’च्या यशामध्ये नायकाच्या भूमिकेत रणबीर कपूरचं असणं आणि तो चरित्रपट राजकुमार हिरानीनं दिग्दर्शित करणं याही गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. ‘मेरी कोम’च्या यशात मेरी कोम साकारणाऱ्या प्रियांका चोप्राच्या ग्लॅमरचा वाटा महत्त्वाचा होताच. त्यामुळं मुळात असे चरित्रपट तयार करताना तो तयार करणाऱ्याचं चरित्रनायकावर मनापासून प्रेम हवं. त्या व्यक्तीचं जीवन जसं आहे तसं लोकांसमोर यावं, अशी निखळ, प्रामाणिक भावना हवी. चरित्रनायकाची किंवा नायिकेची भूमिका कोण करणार आहे, हेही प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं असतं. मुळात त्या व्यक्तीचं दिसणं तसं दिसणं पटायला पाहिजे. संबंधित कलाकार चरित्रनायकासारखा दिसतच नसेल, तर प्रेक्षकांना तो चित्रपट पाहावासाच वाटणार नाही.
अर्थात एवढं सगळं अनुकूल घडूनही चरित्रपट प्रेक्षकांना आवडेलच असं नाही. त्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. एक मात्र आहे. प्रेक्षकांनीही काही पथ्ये जरूर पाळली पाहिजेत. एक तर, आपल्या मनात असलेला नायक पडद्यावर शोधायला जाऊ नये. चित्रकर्त्यांना ती व्यक्ती कदाचित वेगळी दिसलेली असू शकते. त्या चरित्रनायकाबाबत काही लेखन, अधिकृत आत्मचरित्र किंवा चरित्र असा काही दस्तावेज उपलब्ध असेल, तर तो जरूर आधी वाचावा. पुलंसारखा आपल्या अगदी हृदयाजवळचा चरित्रनायक असेल, तर आपल्याला त्यांच्याबाबत सगळंच माहिती असतं, असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात खरोखर तसं आहे का, याचाही विचार करायला हवा. 
काही जण असं मत व्यक्त करताना दिसतात, की चरित्रपट काढूच नयेत. मला असं वाटत नाही. चरित्रपट जरूर निघावेत. त्यातले चांगले चरित्रपट पुढच्या अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात. आता चांगला चरित्रपट म्हणजे काय, याची काही ठोस अशी व्याख्या नाही. मात्र, समाजमनावर असलेल्या प्रतिमेला फारसा धक्का न लावता, त्या व्यक्तीच्या आयुष्यातील जडणघडण, बारकावे उलगडून दाखविणारा चित्रपट म्हणजे चांगला चरित्रपट असं ढोबळमानानं म्हणता येईल. एखाद्या व्यक्तीविषयी उत्सुकता निर्माण करणं हेदेखील चरित्रपटांचं काम असू शकतं. ‘भाई’ हा चित्रपट नव्या पिढीमध्ये पुलंविषयी उत्सुकता निर्माण करणारा ठरला असेल, तर तेही त्या चित्रपटाचं यशच मानायला हवं. बाकी मतमतांतरे सुरूच राहतील. 

----
(पूर्वप्रसिद्धी : अक्षरधारा मासिक, फेब्रुवारी २०१९ अंक)
----

No comments:

Post a Comment