8 Jan 2020

रिव्ह्यू - धुरळा

‘वुई, द राजकारणी...’
--------------------------

आपण सगळेच राजकारणी असतो. राजकारणात प्रत्यक्ष भाग घेत असू वा नसू! आपल्या रोजच्या जगण्यात आपण राजकारण करतच असतो. अगदी शाळेत असल्यापासून ते अगदी मृत्युपत्र लिहायची वेळ येईपर्यंत... आपण पक्के राजकारणी असतो. गंमत म्हणजे राजकारण करणारे तेच राजकारणी आणि आपण मात्र त्यांच्यापासून वेगळे कुणी तरी गरीब, भाबडे, सर्वसामान्य माणसं अशी आपण स्वत:ची पक्की समजूत करून घेतलेली असते. पण प्रत्यक्षात तसं नसतं. आपण जगण्यातल्या प्रत्येक क्षणाला अगदी पक्के, मुरलेले, बेरकी, जहाँबाज, कावेबाज, पाताळयंत्री राजकारणी असतो. कुठे प्रमाण कमी असेल, तर कुठे अधिक, इतकंच! आपल्या कुटुंबात, नातेवाइकांत, ऑफिसमध्ये, बिझनेसमध्ये आपण सदैव राजकारणच करत पुढं जात असतो. म्हणून तर आपल्याला राजकारण आणि राजकारणी मंडळी यांच्याविषयी प्रचंड कुतूहल असतं. अशी माणसं दिसली, की त्यांच्या थेट चालणाऱ्या राजकारणाला नावं ठेवत, आपण स्वत:ही तसंच वागत असल्याचा ‘गिल्ट’ कमी करण्याची संधी आपल्याला मिळते, हे त्या कुतूहलामागचं प्रमुख कारण असतं. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आजच पाहिलेला ‘धुरळा’ हा नवा मराठी चित्रपट! समीर विद्वांस दिग्दर्शित व क्षितिज पटवर्धन लिखित हा चित्रपट आपल्याला हरघडी आपल्यातल्या राजकारणी व्यक्तीची आठवण करून देतो आणि हेच त्याचं सर्वांत मोठं यश आहे.
शेक्सपिअरच्या अनेक शोकांतिका किंवा मारिओ पुझोच्या ‘गॉडफादर’सारख्या कलाकृती कालातीत दर्जा गाठण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्या कलाकृतींमध्ये मानवी जगण्याचे असे अनेक पदर दृग्गोचर झाले. माणसाच्या स्वभावातले अनेक कंगोरे, उत्क्रांतीच्या ओघातही टिकून राहिलेलं त्याच्यातलं पशुत्व, सदैव दुसऱ्यावर विजय मिळविण्याची, दुसऱ्याला टाचेखाली ठेवण्याची लालसा, त्याचं स्खलनशील असणं अशा अनेक गोष्टींचे पापुद्रे उलगडत या कलाकृती आपल्याला माणसाच्या जगण्याचं विराट दर्शन घडवतात. त्यातून मानवी स्वभावाविषयी काही मूलभूत स्वरूपाचं भाष्य आपल्याला बघायला मिळतं, अवगत होतं! समीर आणि क्षितिजची ही कलाकृती पाहून अशा कालातीत कलाकृतींची किमान आठवण व्हावी, हेदेखील या जोडीचं मोठं यशच म्हणावं लागेल. (तुलना करण्याचा प्रश्नच नाही; पण किमान मार्ग तरी योग्य निवडला हे म्हणायला हरकत नाही. भविष्यात ते तिथवर पोचतीलही, कुणी सांगावं...)
उत्तम पेपरवर्क, प्रतिपाद्य विषयाची स्पष्ट कल्पना, कल्पनाबीज-विस्तार-संघर्ष-सांगता या चतु:सूत्रीच्या साह्यानं बांधलेली घट्ट पटकथा, खटकेबाज-चुरचुरीत संवाद आणि त्याला अभिनयाची जोड या कुठलाही चित्रपट यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी! ‘धुरळा’ने यातील बहुतांश गोष्टींचे बॉक्स अचूक ‘टिक’ केले आहेत. अर्थात काही त्रुटीही त्यात आहेत. मात्र, चांगल्या गोष्टींचं पारडं जड आहे आणि त्यामुळंच हा चित्रपट पाहणं हा एक चांगला अनुभव ठरतो.
आपण सगळे राजकारणीच असतो आणि जगण्यातल्या कुठल्याही क्षेत्रात आपण राजकारण करत असतो, ही मध्यवर्ती थीम धरली, तर या थीमचा विस्तार करणारे अनेक चित्रपट, नाटकादी कलाकृती आपण यापूर्वीही पाहिल्या आहेत. ‘धुरळा’ही याच यादीतला सिनेमा आहे. यात दिग्दर्शकानं माणसातला ‘राजकारणी’ दाखविण्यासाठी गोष्टीचं नेपथ्य निवडलंय ते राजकारणाचंच! एका अर्थानं हे सुलभीकरण आहे. मात्र, या सुलभीकरणामुळं गोष्ट क्लिष्ट किंवा बोजड न होता, सगळ्यांना समजेल अशी सोपी-सरळ झालीय हा तिचा गुणच म्हणायला हवा.
आंबेगाव नामक छोट्या गावातलं सरपंचपद मिळवण्याची एका घराण्यातील, रक्ताच्या नात्यातील तीन लोकांची स्पर्धा हे या चित्रपटाचं एका ओ‌‌ळ‌ीतलं कथासूत्र! सत्तेचं पद किंवा खुर्ची - मग ती सरपंचपदाची असो की पंतप्रधानपदाची - ती मिळवण्यासाठी जगात सगळीकडं जे राजकारण चालतं, ते सारख्याच प्रमाणात क्रूर असतं आणि ‘राजकारणात सगळं क्षम्य’ या उक्तीला साजेसंच असतं. त्यामुळं इथं महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावाचं नेपथ्य दिग्दर्शकानं घेतलं असलं, तरी त्यातला सत्तासंघर्ष हा जगातील कोणत्या माणसाला परका वाटणार नाही. त्या अर्थानं ही ‘युनिव्हर्सल अपील’ असणारी गोष्ट आहे. मात्र, या गोष्टीचा विस्तार करताना त्यातील माणसांचं बाह्य द्वंद्व दाखवण्याच्या मोहात दिग्दर्शक पडल्यानं, माणसाच्या नेणिवेच्या पातळीवरचे काळेकरडे मनोव्यापार किंवा त्यांच्यातलं ते आदिम ‘पाशवी’ इन्स्टिंक्ट आपल्याला यात फारसं बघायला मिळत नाही. त्या पातळीवरचा एक धागा जरी यात ओवला गेला असता, तरी ही महान कलाकृती ठरली असती.
अर्थात, आत्ताही जे समोर येतं, ते कमी मनोरंजक किंवा कमी उत्तम दर्जाचं आहे, असं मुळीच नाही. मुळात इथं प्रत्येक पात्रावर खूप बारकाईनं काम झाल्याचं दिसतं. उभे कुटुंबातील अक्का, नवनाथ, हनुमंत, नीलेश, हर्षदा उर्फ बुरगुंडा आणि मोनिका या सर्व व्यक्तिरेखांचे आलेख आपल्यासमोर ठसठशीतपणे ‘उभे’ राहतात. या कुटुंबाला आव्हान देणारा हरीश गाढवे, त्याचे पित्ते, शिवाय या कुटुंबावर कृपादृष्टी ठेवणारा आमदार ही बाकीची पात्रंही अगदी नीट उभी राहतात. प्रत्येक पात्राला एक व्यक्तिमत्त्व आहे आणि ते लिखाणातून त्या अभिनेत्यापर्यंत किंवा अभिनेत्रीपर्यंत नेमकेपणानं पोचलंय. चित्रपटाचा सुरुवातीचा काही काळ ही सगळी पात्रं उभी राहण्यात खर्च होतो, त्यामुळं चित्रपट सुरुवातीला काहीसा संथ वाटू शकतो. पण चित्रपटाचा एकूण कालावधी बराच मोठा (१७० मिनिटं) असल्यानं हा सुरुवातीचा वेळ सर्व पात्रं प्रस्थापित होण्यासाठी योग्यच आहे.
या चित्रपटात महिलांचं घरातलं, राजकारणातलं आणि एकूणच समाजातलं स्थान यावर सविस्तर भाष्य येतं. तसं ते यापूर्वीही ‘घराबाहेर’सारख्या चित्रपटांतून आलेलं आहे. मात्र, वीस वर्षांनंतरही आपल्याकडची परिस्थिती फारशी बदललेली नसल्यानं दिग्दर्शकाला हा ट्रॅक जोडणं आवश्यक वाटलं, यातच सारं काही आलं.  किंबहुना चित्रपटाच्या उत्तरार्धात हा संघर्ष संपूर्णपणे या कुटुंबातील तीन बायकांमध्ये विभागला जातो. या तिघींच्याही व्यक्तिरेखांमधले अनेक सूक्ष्म ‘पदर’ विद्वांस यांनी फार नजाकतीनं दाखवले आहेत. याशिवाय या चित्रपटात येणारी अन्य स्त्री पात्रंही ठळकपणे लक्षात राहतात, हे या कलाकृतीचं वैशिष्ट्य. चित्रपटाचा शेवट काहीशा अनपेक्षित नोटवर संपत असला, तरी या सगळ्याची अपरिहार्य परिणती ती असूच शकते, हे पटतं.
या चित्रपटाची पात्रयोजना आणि प्रमुख कलाकारांची कामं अगदी चोख जमली आहेत. अक्काच्या भूमिकेत अलका कुबल-आठल्ये अगदी फुल फॉर्मात आल्या आहेत. अंकुश चौधरी नवनाथच्या भूमिकेत शोभून दिसतो. या भूमिकेसाठी आवश्यक तो बेरकीपणा त्यानं चष्म्याआडच्या नजरेतून नेमका दाखवला आहे. हनुमंत उर्फ सिमेंट शेठच्या भूमिकेतील सिद्धार्थ जाधव हा यातलं सरप्राइझ पॅकेज आहे. सिद्धार्थच्या इमेजपेक्षा खूप वेगळा रोल त्याला मिळाला असून, त्यानं या संधीचं सोनं केलं आहे. या रोलबाबत फार काही सांगत नाही. तो प्रत्यक्ष पडद्यावरच पाहा. नीलेश ऊर्फ भाऊज्याच्या भूमिकेत अमेय वाघनं तडफदार कामगिरी केली आहे. हरीश गाढवेच्या भूमिकेत प्रसाद ओकनं एकदम तगडं काम केलंय. त्यानं ही भूमिका करून दिग्दर्शकावर आणखी एक ‘फेवर’च केला म्हणायचं! सई ताम्हणकरनं यातली हर्षदा ऊर्फ बुरगुंडा चांगली उभी केलीय. प्रचारसभेतील पहिल्या भाषणाचा तिचा सीन उत्तम जमलाय. मात्र, या सगळ्यांत भाव खाऊन गेलीय ती मोनिका साकारणारी सोनाली. दबून राहण्यापासून ते बंडखोरीपर्यंतचा या व्यक्तिरेखेचा सगळा प्रवास सोनालीनं फार प्रभावीपणे मांडलाय. या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत, अनेक शेड्स आहेत. लिखाणात सर्वांत भाव खाऊन जाणारी ही भूमिका सोनालीनं जोरदार वठवून आणखीनच भाव खाल्लाय! तिच्या काही संस्मरणीय भूमिकांत या भूमिकेचा नक्कीच समावेश होईल. सुलेखा तळवलकर, उदय सबनीस यांनीही चांगली साथ दिलीय. अलका कुबल व सुलेखा तळवलकर प्यायच्या सीनमध्ये छानच ‘रम’ल्या आहेत! अगदी एकाच सीनमध्ये प्राजक्ता हणमघर धमाल उडवून गेलीय.
गावाकडचा चित्रपट आणि त्यातही राजकारण म्हटल्यावर देवेंद्र गायकवाड, श्रीकांत यादव, नितीन धंदुके आदी कलाकारांची उपस्थिती हल्ली अनिवार्य असते. हे लोक पडद्यावर दिसले, की आपोआपच त्या चित्रपटाला एक ऑथेंटिसिटी येत असावी.
अलीकडं आपल्या जगण्यातल्या जवळपास प्रत्येक बाबीत राजकारण शिरलेलं असताना आणि आपणही प्रत्येक गोष्टीत जोरदार राजकारण करीत असताना, गावच्या राजकारणावरचा हा ‘धुरळा’ अंगावर उडवून घ्यायलाच हवा; कारण ती धूळ साफ झाल्यानंतर आपल्याला आपल्यातला ‘राजकारणी’ लख्ख दिसू लागतो...

---

दर्जा : साडेतीन स्टार

---

No comments:

Post a Comment