26 Jun 2020

दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग १

नव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...
------------------------------------------------

भाग १
--------

नव्वदचं दशक उजाडलं, म्हणजेच १९९० हे वर्ष उजाडलं तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. नववीत होतो. नगरसारख्या महाराष्ट्रातल्या एका मध्यम मध्यम शहरात राहत होतो. माझ्या आयुष्यातलं सर्वांत मोठं स्थलांतर घडून दोन वर्षं झाली होती. मी माझं जन्मगाव सोडलं होतं आणि कुटुंबासह जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन राहिलो होतो. एका अर्थानं मी छोट्या विहिरीतून तलावात आलो होतो. पुढच्याच वर्षी मी आणखी मोठ्या सरोवरात विहरायला जाणार होतो. माझं वय १४ होतं, म्हणजे मी सर्वार्थानं अंड्यातून बाहेर आलेलं पिल्लू होतो. 'अंगणात गमले मजला संपले बालपण माझे' असं ग्रेस म्हणतात, तसं नगर हे माझं अंगण होतं. जन्मगावातल्या गर्भाशयासारख्या सुरक्षित उबेतून मी एकदम बाहेर आलो होतो. मला बाहेरचं जग सोसेल की नाही, ऊन-वारा सहन होईल की नाही याचा कुठलाही विचार न करता मला एका नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असल्यासारखं बाहेर भिरकावून देण्यात आलं होतं. माझं गाव, माझं घर, माझी खोली, तिथली माझी झोपायची जागा, तिथलं अंथरूण-पांघरूण, आजीच्या कुशीतली ऊब हे सगळं सगळं ८० किलोमीटरवर सोडून मी एका अनोळखी, शहरी वासाच्या गावात आलो होतो. नगरला शहर म्हणणं कठीण होतं; पण आमचं गाव तेव्हा इतकं छोटं होतं, की मला नगर हे खूप मोठ्ठं शहर वाटत होतं. तिथं शहराचा वास येत होता. आमच्या गावी घराजवळ येणाऱ्या उकिरड्याचा, तिथं लोळणाऱ्या डुकरांचा वास इथं नव्हता. इथं सकाळी सहा वाजता पेपर येत होता. गवळी येऊन दूध घालून जात होता. इथं कॉन्व्हेंट शाळा होत्या आणि मुलं टाय लावून शाळेत जात होती. इथं रिक्षा होत्या, सिटीबस होत्या आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे इथं बेकऱ्या होत्या. इथं पाव मिळत होता. माझ्या गावी तोवर ताजा पाव मिळत नसे. त्यामुळं माझ्या लहानपणच्या आठवणीत शहरी मुलांसारख्या पाव-बिस्किटं या गोष्टीच नव्हत्या. त्या इथं आल्या. पहाटे क्लासला जाताना कुठल्या ना कुठल्या बेकरीतून ताजे खमंग पाव भाजल्याचा वास यायचा आणि आपण शहरात राहतो, या जाणिवेनं माझं मन हरखून जायचं. इथं एकच का होईना, पण बाग होती. आमच्या गावात बाग सोडाच, पण ओळीनं लावलेली तीन फुलझाडं मी कधी पाहिली नाहीत. जी काही होती, ती आमच्या अंगणातच होती. आमच्या आजोबांनी मोठ्या हौसेनं रातराणी, काटेकोरांटी आणि दोन कण्हेरीची झाडं लावली होती. मात्र, त्या झाडांचा डुकरांपासून बचाव करणं हे आमच्यापुढचं सगळ्यांत मोठं आव्हान असायचं. 
नगरमधली सर्वांत भारी शाळा माझ्या नशिबात नव्हती. मला मिळाली ती गरिबांची शाळा. शाळा गरीब मुलांची असली, तरी शिक्षक मनानं व ज्ञानानं अतिशय श्रीमंत होते. एका मंदिराच्या आजूबाजूला, जागा मिळेल तसे आमचे चिमुकले वर्ग बांधलेले होते. याउलट आमची गावची शाळा जास्त नीटनेटकी व भक्कम बांधलेली होती. पण मला या गरिबांच्या शाळेनं जे दिलं, ते एखाद्या भारी बिल्डिंगमधल्या शाळेनंही कधी दिलं नसतं. या शाळेनं मला माणसाकडं माणूस म्हणून पाहायला शिकवलं. सगळ्यांबरोबर समानतेनं वागायला, सहानुभूतीनं-प्रेमानं वागायला शिकवलं. आमच्या वर्गात अनेक मुलं डबा आणत नसत. मी टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा होतो. पोळी, बटाटा किंवा कोबीची भाजी आणि लोणचं असा डबा मी नेत असे. आमच्या मंदिरात बसून मी एका मित्रासोबत तो खात असे. अनेक मुलं तेव्हा डबा न खाता नुसतीच खेळत असत. ती डबा का आणत नसतील, हा विचार तेव्हा कधीच मनाला शिवला नाही. आता विचार करून काळीज तुटतं. पण तेव्हा ती हसतमुख मुलं पाहून मला काहीही उमगलं नाही, हे खरं!
फार लहानपणीच, म्हणजे आठवीत असतानाच घरच्या जबाबदाऱ्या घ्यायची सवय त्या काळानं मला लावली. वडील नोकरीला जायचे आणि उशिरा घरी यायचे. कधी फिरतीवर जायचे. तेव्हा घरचा किराणा भरण्यापासून ते सिलिंडर आणण्यापर्यंतची सगळी कामं आठवीतला तो पोरगा करीत असे. सायकलच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या पिशव्या लावून, डुगडुगत हळूवारपणे दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या घरी तो सायकल पायी चालवत नेत असे. सिलिंडर आणणे हा एक दिव्य प्रकार असे. त्या लांबलचक रांगेत उभं राहून पावती घ्यायची, मग दुसरीकडं गोडाउन असलेल्या ठिकाणी जुनं सिलिंडर न्यायचं व नवं आणायचं हा एक सोहळा असे. सायकलच्या मधे तिरकं ठेवून ते सिलिंडर आणणं ही एक सर्कस होती. पण आठवीतल्या पोराला त्याचं काही वाटत नसे. त्याच्यासमोर दुसरा पर्यायही नव्हताच म्हणा. कधी ते सिलिंडर दाणकन पडे. तेव्हा त्या गावात काही भली माणसं राहत. त्यातलं कुणी तरी पुढं होऊन ते सिलिंडर पुन्हा पक्कं बसवून देई. शाळेची सहल निघाली, तेव्हा फुलपँट घ्यायचा आग्रह केला एकदा या मुलानं. गावातल्या बड्या दुकानात जाऊन नव्वद रुपयांची फुलपँट आणली मग त्यानं; कारण आईकडं फक्त शंभर रुपयेच होते. 
याचा अर्थ तेव्हाचं जगणं अगदी वाईट, रडूबाई होतं का? तर मुळीच नाही. आज मागं वळून बघताना या गोष्टी जाणवतात, पण तेव्हा त्या मुळीच जाणवत नव्हत्या किंवा त्याचा त्रासही होत नव्हता. पंधराव्या वर्षी वयात येऊ घातलेल्या मुलाचं सगळं जगणं मोरपंखीच असतं. प्रत्येक क्षण स्वप्नाळू असायचा. वास्तवाच्या कडक उन्हावर स्वप्नांच्या ढगांची सावली धरली जायची. आणि हा मुलगा तसा हुशार होता. गावाकडची हुशारी म्हणजे 'वासरात लंगडी गाय शहाणी' असं नव्हतं, हे त्यानं मोठ्या शहरात येऊन सिद्ध केलं. स्काउटमध्ये भाग घेतला, की त्यालाच प्लाटून कमांडर केलं जायचं. त्या वर्षी त्यानं कलेक्टरसमोर ऐटीत संचलन केलं होतं. चित्रकला परीक्षेला बसला आणि तेव्हा दुर्मीळ अशी 'ए' ग्रेड मिळवून दाखविली. विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला आणि त्याला त्याच्या आयुष्यातली पहिली परी गवसली. ती दुसऱ्या शाळेतून याच्या शाळेत आली होती. ती आजही त्याच्या डोळ्यांसमोर लख्ख उभी आहे. अगदी 'शाळा' कादंबरीच सुरू झाली म्हणा ना नंतर! घरापर्यंत चकरा झाल्या, पण तेवढंच. बोलायची हिंमत नव्हतीच. आणि लगेच दहावी आली...
तापात दोन-तीन दिवस काही सुचू नये आणि एकदम घाम येऊन ताप उतरावा तशी दहावी आयुष्यात आली आणि गेली. त्या काळात कानशिलं तापायची, पण परीक्षेच्या टेन्शननं! स्वप्नाळू अवस्था कुलूपबंद करून कपाटात टाकून दिली. सकाळी लवकर उठायचो आणि क्लासला जायचो. अर्थात एवढं होतं, तरी सतत अभ्यास, अभ्यास केलं नाही, हेही खरं. आजूबाजूला काय काय घडत होतं! मंडल प्रकरणावरून देश तापला होता. व्ही. पी. सिंहांचं सरकार कोसळलं होतं आणि चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते. आदल्याच वर्षी पं. नेहरूंची जन्मशताब्दी साजरी झाली होती आणि देशभर 'अपना उत्सव'मध्ये आम्ही नाचत होतो. टीव्हीवर बी. आर. चोप्रांचं 'महाभारत' सुरू होतं आणि बाहेर लालकृष्ण अडवाणींचं 'रामायण'! अडवाणींच्या अजेय वाटणाऱ्या रथयात्रेचा अश्वमेध बिहारमध्ये लालूप्रसादांनी अडविला होता आणि त्यांना अटकही केली होती. आमची दहावीची सहामाही संपली आणि लवकरच ऐतिहासिक असं १९९१ हे वर्ष उजाडलं. या वर्षाचं आपल्या देशाच्या आणि वैयक्तिक माझ्याही आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. देशाच्या आयुष्यात विसाव्या शतकातलं १९४७ व १९७७ नंतरचं तिसरं आणि महत्त्वाचं स्थलांतर घडणार होतं आणि माझ्याही आयुष्यातलं दुसरं आणि कदाचित कायमचं असं महत्त्वपूर्ण स्थलांतर घडणार होतं...

(क्रमश:)

---

2 comments:

  1. सुरेख....मस्तं चित्र डोळ्यासमोर सारे काही उभे राहिले

    ReplyDelete
  2. धन्यवाद. नाव कळेल का?

    ReplyDelete