31 May 2020

संवादसेतू दिवाळी अंक २०१९ लेख

सिनेमा : ‘तेव्हा’चा आणि ‘आता’चा...
-----------------------------------


कुठलीही कलाकृती ही त्या त्या काळाचं अपत्य असते, असं म्हणतात. म्हणजेच एखादी कलाकृती जन्म घेत असताना तिच्या सभोवतीच्या पर्यावरणाचा परिणाम तिच्यावर या ना त्या प्रकारे होतच असतो. हा काळाचा संदर्भ घट्ट असतो. रुढी, रिवाज, परंपरा, चालीरीती, समजुती, संस्कार, पालनपोषण या सगळ्यांचा आपल्यावर आधी एक समाज म्हणून आणि नंतर एक व्यक्ती म्हणून प्रभाव पडलेला असतो. आपल्या समजुतीतून साकारलेली कलाकृतीही त्यामुळं या प्रभावापासून मुक्त राहू शकत नाही. मात्र, काही वेळा काही कलाकृती ‘अजरामर’ आहेत, ‘कालातीत’ आहेत, असंही आपण म्हणतो. याचाच अर्थ, त्या कलाकृतीवर असलेला तात्कालिकतेचा शिक्का दूर करण्यात ती कलाकृती यशस्वी ठरलेली असते. हा तात्कालिकतेचा शिक्का किंवा पगडा दूर करण्यासाठी त्या कलाकृतीत काही तरी कालातीत, शाश्वत विचार असावा लागतो. साधारणत: वर्षानुवर्षे चालत आलेला ‘सत्’ आणि ‘असत्’ यांच्यातील झगडा किंवा मूलभूत मानवी प्रेरणांचा संघर्ष आणि मानवी मूल्यांची जपणूक अशा गोष्टी प्रभावीपणे मांडल्या गेल्या असतील, तर त्या काही प्रमाणात कालातीत ठरू शकतात. मात्र, काळाच्याही पुढचा, क्रांतिकारी विचार देणारी कलाकृती खऱ्या अर्थाने काळावर मात करणारी कलाकृती म्हणावी लागेल. यासाठी त्या कलाकृतीचा निर्माता द्रष्टा असावा लागतो. काळाची पावले ओळखणारा असावा लागतो. याखेरीज काही जणांमध्ये असामान्य गुण असतात. अशा व्यक्ती अनेक शतकांत क्वचित कधी तरी जन्माला येतात. अशा माणसांनी केलेलं कार्य किंवा त्यांनी निर्माण केलेली कोणतीही कलाकृती असामान्यच ठरते. 
या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या शतकाहून अधिक काळ भारतीय जनमानसावर मोहिनी घालणाऱ्या चित्रपट नामक कलाप्रकाराकडे बघायला पाहिजे. आधी दृश्य आणि नंतर दृश्य व श्रुती या दोन्ही माध्यमांतून या यंत्राधिष्ठित कलेनं भारतीय प्रेक्षकांवर गारूड केलं. भारतीय प्रेक्षकांनी फार थोड्या काळात या कलेवर मन:पूत प्रेम केलं; ही कला आत्मसात केली आणि तिच्याद्वारे आपली अभिव्यक्तीही शोधली. भारतीय सिनेमाची प्रगती आणि देशाची त्या त्या वेळची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थिती यांचा मेळ लावता येतो. या प्रवासात काही अजरामर चित्रपट निर्माण झाले. सर्व सूर जुळून आलेल्या सुरेल गाण्याप्रमाणे लोक हे चित्रपट सतत गुणगुणत राहिले. त्यांचे गुण गात राहिले, त्यांच्याविषयी बोलत राहिले. पिढ्या बदलल्या, तरी यात खंड पडला नाही. मात्र, काही चित्रपटांबाबत काळानुरूप आस्वादन बदलू शकते. विशेषत: एका पिढीला आवडलेला चित्रपट पुढच्या पिढीला आवडेलच असं काही नाही. अशा काही चित्रपटांवर नव्या पिढीला लिहितं करण्याचा अभिनव प्रयोग या अंकाच्या संपादकांनी केला आहे. चित्रपट समीक्षेच्या अंगाने तर या प्रयोगाचं महत्त्व आहेच; शिवाय यात काळानुरूप बदललेल्या किंवा न बदललेल्या दृष्टिकोनाचाही अभ्यास करता येतो. त्या दृष्टीने या अंकात सुजाता, प्यासा, दस्तक, छोटी सी बात, अमर अकबर अँथनी, घरोंदा, अर्थ, इजाजत व वजूद या नऊ सिनेमांवर दहा लेख (‘प्यासा’वर दोन लेख) जुई कुलकर्णी, मृदुला बे‌ळ‌े, अदिती जोगळेकर-हर्डीकर, सानिया भालेराव, अतुल कुलकर्णी, विद्या पोळ-जगताप, विभव देशपांडे, नचिकेत खासनीस, पवन जोशी, आदित्य महाजन या नव्या पिढीच्या प्रतिनिधींनी लिहिले आहेत. या चित्रपटांची निवडही या लेखकांनीच केली आहे. हे चित्रपट त्यांना कसे वाटतात याबद्दल त्यांनी मोकळेपणानं लिहिलं आहे. ‘प्यासा’ चित्रपटावर विद्या पोळ-जगताप व अदिती जोगळेकर-हर्डीकर यांनी लिहिलं आहे. अदिती जोगळेकर यांनी ‘प्यासा’च्या दृश्यात्मकतेवर भर देणारा लेख लिहिलाय, तर विद्या पोळ-जगताप यांनी या चित्रपटाच्या आशयाबाबत लिहिलं आहे. ‘सुजाता’ हा चित्रपट जुई कुलकर्णी यांना नायिकेचा ‘को ‌‌ऽ हं ऽ’ प्रश्न वाटतो. नुकत्याच आलेल्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटातही हेच वास्तव दिसतं, असं निरीक्षण त्या नोंदवतात. ‘वजूद’ हा नाना पाटेकरच्या नेहमीच्या प्रतिमेपेक्षा वेगळी भूमिका असलेला चित्रपट १९९८ मध्ये आला होता. आज वीस वर्षांनी त्यातली काव्यात्मकता आजच्या पिढीच्या विभव देशपांडेला भावते. ‘घरोंदा’ हा गुलजार यांचा चित्रपट पाहताना आदित्य महाजनला तो केवळ त्या काळाचा चित्रपट वाटत नाही. अलीकडच्या ‘वेक अप सिद’ किंवा ‘डबल सीट’ या मराठी चित्रपटातही त्याला ‘घरोंदा’चे अंश आढळतात. ‘घरोंदा’तली गाणीही नव्या पिढीच्या आदित्यला आकर्षित करतात. तेव्हाच्या आयुष्यात असलेला साधेपणा, संथपणा यांच्याकडे काहीशा अलिप्तपणे पाहताना आदित्यला त्या काळातला हलकाफुलका रोमान्स विशेष भावतो. 
बासू चटर्जींच्या ‘छोटी सी बात’ या हलक्याफुलक्या सिनेमाकडे आजच्या पिढीचा पवन जोशी कौतुकानं पाहतो. तेव्हाच्या शांत, निवांत मुंबईतल्या निरागस प्रेमाचा कॅलिडोस्कोप या चित्रपटातून दिग्दर्शक आपल्याला दाखवतो, तेव्हा आपल्याला त्यातली जी सौंदर्यस्थळं जाणवतात, तीच पवन जोशीलाही भावतात. महेश भट यांचा १९८२ मध्ये आलेला ‘अर्थ’ हा चित्रपट आजच्या पिढीच्या सानिया भालेरावला ‘पाथब्रेकिंग’ चित्रपट वाटतो. मित्र, प्रियकर यांच्यापैकी एक हवा, किंवा दोघंही नकोत हे ठरविण्याचा अधिकार यात बाईला होता, ही गोष्ट सानियाला महत्त्वाची वाटते. तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, या चित्रपटातील नायिकेचं असं चित्रण ही काळाच्या पुढचीच गोष्ट होती, असं तिला वाटतं. राजेंद्रसिंग बेदींच्या ‘दस्तक’विषयी, त्यातल्या गाण्यांविषयी लिहिताना अतुल कुलकर्णी भारावून जातात. गुलजारांचाच ‘इजाजत’ पाहताना मृदुला बेळेंना शरदबाबूंचा ‘देवदास’ आठवतो. ‘इजाजत’मधील स्त्री-पुरुष संबंधांचे गहिरे रूप उलगडताना पाहणं कुठल्याही पिढीच्या प्रेक्षकांसाठी एक वेगळी जाणीव करून देणारा प्रवास असतो. मनमोहन देसाईंचा ‘एव्हरग्रीन’ असा ‘अमर अकबर अँथनी’ हा चित्रपट पाहताना गेल्या चाळीस वर्षांत किती तरी पिढ्यांना तेवढीच मजा आली. आजच्या पिढीच्या नचिकेत खासनीसचा अनुभवही काही वेगळा नाही. हा सिनेमा त्याचा अगदी फेवरिट आहे. या सिनेमातली सिनेमॅटिक लिबर्टी या शब्दालाही लाजवणारी सिनेमॅटिक लिबर्टी, पटकथा लेखकाची अफाट कल्पनाशक्ती यांना सलाम करीत नचिकेत आजही या चित्रपटाचा निखळ आनंद घेताना दिसतो.
‘जुना सिनेमा’ या सर्वांच्या लेखणीतून व ‘आताच्या चष्म्यातून’ सविस्तर वाचायला मिळणारच आहे. त्यामुळं त्यातल्या तपशिलात फार न जाता, या प्रयोगाविषयी सांगायला हवं. या प्रयोगात लेखकांनी निवडलेले चित्रपट १९५७ ते १९९८ या चार दशकांतले आहेत. गुरुदत्तचा ‘प्यासा’ ते एन. चंद्राचा ‘वजूद’ अशी ही दोन टोकं आहेत. यातले बहुतेक सिनेमे माइलस्टोन म्हणूनच गणले गेले आहेत. त्यामुळं मुळ‌ात आधी या चित्रपटांनी आपली गुणवत्ता त्या त्या काळात सिद्ध केलेलीच आहे. ‘प्यासा’सारखा चित्रपट तर केवळ भारतीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही सार्वकालिक अभिजात चित्रपट म्हणून नोंदला गेला आहे. ‘छोटी सी बात’, ‘अमर, अकबर, अँथनी’, ‘अर्थ’ आणि ‘वजूद’ यासारखे चित्रपट संबंधित दिग्दर्शकांच्या कारकिर्दीतील माइलस्टोन म्हणून पूर्वीच ओळखले जात आहेत. अशा स्थितीत २०१९ मध्ये (म्हणजे यातला शेवटचा चित्रपट प्रदर्शित होऊनही २१ वर्षे झाल्यावर) नव्या पिढीला, म्हणजे साधारण विशीपासून ते चाळिशीपर्यंत असलेल्या पिढीला ते कसे वाटतात, हे पाहणे औत्सुक्याचे होते. यातील बहुतेक लेखकांनी त्यांच्या जन्माच्या साधारणत: वीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे रसग्रहण केले आहे. हे लक्षात घेतले म्हणजे त्यांच्या नजरेतून या चित्रपटांकडे नव्याने बघणे का महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल. अपेक्षेप्रमाणे हे सर्वच चित्रपट नव्या पिढीलाही तितकेच आवडलेले दिसतात. त्यांचं या चित्रपटांकडे पाहणं कुतूहलाचं, औत्सुक्याचं, तर काहीसं कौतुकाचंही आहे. 
या चित्रपटांचा काळ लक्षात घेतला, तरी या चाळीस वर्षांत आपल्या देशात झालेलं स्थित्यंतर आपल्या सहज लक्षात येईल. ‘प्यासा’ प्रदर्शित झाला, तेव्हा पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते, तर ‘वजूद’ प्रदर्शित झाला, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. या ४० वर्षांत मिश्र समाजवादी अर्थव्यवस्थेकडून जागतिकीकरण स्वीकारल्यानंतरच्या भांडवलवादी अर्थव्यवस्थेपर्यंतचा प्रवास देशानं पूर्ण केला होता. ऐंशीच्या दशकात आलेल्या ‘छोटी सी बात’, ‘घरोंदा’ आदी चित्रपटांनी त्या त्या वेळची सामाजिक परिस्थिती चपखलपणे मांडली होती. याच दशकातल्या ‘अमर अकबर अँथनी’नं सर्वाधिक करमणुकीची नाममुद्रा आपल्या नावावर केली होती. ‘अर्थ’ आणि ‘इजाजत’मध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचं आणि आधुनिक स्त्रीच्या आत्मभानाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. यातले काही सिनेमे सुप्त आशयातून, काही थेट कथानकातून, तर काही गीत-संगीताच्या माध्यमातून आपला वेगळेपणा सिद्ध करीत होते. अशा चित्रपटांविषयीचं कुतूहल सार्वकालिक असू शकतं. नव्या पिढीच्या चष्म्यातून या सिनेमांकडं पाहताना त्यांच्या आशयातला हा कालातीतपणा तपासणं हाही एक उद्देश असतोच. याशिवाय पूर्वी न जाणवणारी काही नवी वैशिष्ट्यं, काही वेगळेपणा, नवी सौंदर्यस्थळं नव्या पिढीला जाणवतात काय हेही पाहता येतं. या सर्व सिनेमांबाबत असं काही ना काही तरी गवसल्याचं या सर्व लेखांमधून प्रत्ययाला येतं.
चित्रपटासारख्या कलाप्रकाराला नाटकाप्रमाणे ‘पुढील प्रयोगात दुरुस्ती’ची संधी नसते. त्यामुळं चित्रपटात राहिलेली एखादी चूक कायमची तशीच राहू शकते. (क्वचितप्रसंगी तो भाग एडिट केला जातोही.) मात्र, अशी एखादी चूक, एखादी विसंगती, कथाप्रवाहातील किंवा संकलनातील दोष नंतरच्या काळात अभ्यासकांना नक्कीच आढळू शकतो. त्यावर चर्चाही होऊ शकते. विशिष्ट कलाकारांची निवड, त्यांची अभिनय पद्धती याविषयीही नव्या पिढीची काही तरी गमतीदार निरीक्षणं असू शकतात. त्या काळात लिहिले गेलेले संवाद, त्यातून प्रकटणारी त्या काळातील समाजाची मानसिकता यातही आजच्या पिढीला विसंगती आढळूच शकते. अशा सगळ्या गमतीजमतींसह या जुन्या सिनेमांकडं नव्या पिढीच्या चष्म्यातून पाहणं हा वाचकांसाठीही एक वेगळा, समृद्ध करणारा अनुभव ठरू शकतो.
चित्रपटांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं प्रदीर्घ काळ जतन करता येणं शक्य आहे. आता तर अत्याधुनिक, डिटिजल माध्यमामुळं चित्रपट अक्षरश: ‘अमर’ झाले आहेत. आपल्याकडं चित्रपटसृष्टी सुरू झाली, तेव्हा तयार झालेला पहिला मूकपट आपण आजही पाहू शकतो. आता तर तंत्रज्ञान पुष्कळ पुढं गेल्यानं तयार झालेले सगळेच्या सगळे चित्रपट आपल्याला जतन करून किती तरी वर्षं जपून ठेवता येणं शक्य आहे. त्या त्या काळाचा आरसा किंवा त्या काळाचा तुकडाच या चित्रपटांच्या रूपानं पुढच्या पिढ्यांना पाहायला मिळणार आहे. तेव्हा आणखी शंभर वर्षांनी कुणी आजच्या चित्रपटांबाबत असा प्रयोग करून पाहू शकेल, ही शक्यता अजिबातच नाकारता येत नाही. हे चक्र पुढं कित्येक काळ चालूच राहील, यात शंकाच नाही. 
अर्थात आपण आजच्या काळात असल्यानं आजची मजा लुटू या. या उत्तम सिनेमांकडं नव्या पिढीनं कसं पाहिलंय ते त्यांच्या लेखांतून अनुभवू या. हे सिनेमे पुन्हा पाहताना आपल्यालाही नवं काही गवसलं तर हा खटाटोप सार्थकी लागेल. 

---

(पूर्वप्रसिद्धी : संवादसेतू दिवाळी अंक, २०१९)

---

No comments:

Post a Comment