26 Jun 2020

दृष्टी-श्रुती दिवाळी १९ - लेख - भाग ३


नव्वदचं दशक - 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त'...
---------------------------------------------

भाग ३
--------

माझं तिसरं आणि (कदाचित शेवटचं मोठं) स्थित्यंतर १९९७ या वर्षानं घडवून आणलं. मी नगर कायमचं सोडलं आणि 'पुणे लोकसत्ता'त रुजू झालो. त्यामागं काही कारणं होती. छोट्या तलावात मी राहू नये, असं माझ्या गुरुजींना वाटत होतं. त्यांचा सल्ला मी ऐकला आणि पुण्यात आलो. तिथं आल्यानंतर दीडच महिन्यात माझी 'सकाळ'मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून निवड झाली. 'सकाळ'तर्फे तेव्हा रीतसर प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. 'सकाळ'तर्फे ही दीर्घ काळानं केली जात असलेली भरती होती, असंही कळलं. 'सकाळ'शेजारी असलेल्या एच. व्ही. देसाई कॉलेजात आम्हाला शंभर मार्कांचा पेपर देण्यात आला होता व त्या कॉलेजच्या वर्गात बसून तीन तासांत आम्ही तो पेपर सोडवला होता. या परीक्षेला खूप लोक आले होते. त्यात अनेक सीनियर मंडळीही दिसत होती. माझा डिप्लोमा अर्धवट सुटल्यानं मी १९९६ मध्ये नगरला न्यू आर्टस कॉलेजमध्ये असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रात बी. ए.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. 'सकाळ'च्या परीक्षेत मी पहिला आलो आणि तिथं माझी प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून निवड झाली. एक सप्टेंबर १९९७ रोजी मी 'सकाळ'मध्ये रुजू झालो. माझ्यासोबत श्रीपाद कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, संजय आवटे, संजीव ओहोळ व सूरश्री चांडक असे पाच जण होते. आम्ही रुजू झालो, त्याच्या आदल्याच दिवशी लेडी डायनाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याचीच ठळक बातमी अंकात होती. मी पहिल्याच दिवशी 'सकाळ'च्या ग्रंथालयात जाऊन माणूस चंद्रावर उतरला त्या दिवशीचा अंक पाहायला मागितला. तेव्हाचे ग्रंथपाल सुरेश जाधव यांनीही तत्परतेनं मला तो अंक काढून दाखवला होता. 'लोकसत्ता'तले विनायक लिमये यांच्या ओळखीनं भाऊमहाराज बोळात ओक वाड्यात कॉट बेसिसवर मी राहत होतो. तिथून मी अरोरा टॉवर्सला 'लोकसत्ता'च्या ऑफिसात सायकलवर जात असे. आता 'सकाळ'चं ऑफिस एकदमच जवळ आलं. मी तर अनेकदा तुळशीबाग, जोगेश्वरीच्या बोळातून चालत ऑफिसात जात असे. तेव्हाचे सहसंपादक राजीव साबडे यांच्या हाताखाली आमचं प्रशिक्षण सुरू झालं. इथून पुढं मी खऱ्या अर्थानं 'बातमी'शी जोडला गेलो. या दिवसानंतरच्या प्रत्येक मोठ्या घडामोडीचा मला या ना त्या प्रकारे साक्षीदार होता आलं. त्यावर लिहिता आलं. 
सन १९९७ या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. तेव्हा रूमवर राहत असताना मी पहिल्यापासून सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया हे चार पेपर रोज घ्यायचो. (ही परंपरा आजही चालू आहे.) त्या वर्षी 'टाइम्स ऑफ इंडिया'नं १५ ऑगस्टला शंभर पानांचा बंपर अंक काढला होता. तो अंक आणि त्यातल्या अत्याधुनिक जाहिराती पाहून माझे डोळे विस्फारले होते. आपल्या आजूबाजूचा भवताल वेगानं बदलत असल्याची त्या जाहिराती ही ठळक खूण होती. दुसरीकडं कुसुमाग्रजांची 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ही कविता आमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती आणि तीही अफाट लोकप्रिय झाली होती. तेव्हा ही कविता सर्व शासकीय कार्यालयांत लावण्याचं फर्मान तेव्हाच्या राज्य सरकारनं काढल्याचं आठवतं. बाकी 'टाइम्स'च्या जाहिरातींतल्या सगळ्याच गोष्टी आमच्यापर्यंत आल्या नसल्या, तरी महानगरांमध्ये हा बदल घडतोय हे आम्हाला दिसत होतं. याच वर्षी दिल्लीत पहिला मॉल आणि पीव्हीआर हे पहिलं मल्टिप्लेक्स उभारण्यात आलं. पुणंही झपाट्यानं बदलत होतंच. पुण्याची वस्ती आता चहूबाजूंनी वाढत होती. मी १९९७ मध्ये बहुसंख्य ठिकाणी सायकलवरूनच बातमीदारी केल्याचं मला आठवतंय. मात्र, १९९४ ला बालेवाडी स्टेडियम उभं राहिलं आणि कात्रज-देहूरोड बायपासच्या दोन्ही बाजूला तेव्हा वैराण माळरान होतं, ते हळूहळू इमारतींनी व्यापू लागलं. यश चोप्रांच्या 'दिल तो पागल है'नं याच वर्षी आम्हाला 'पागल' करून टाकलं होतं. नायिकांचे कपडे तोकडे होत चालले होते. शहरांमध्ये त्या फॅशनचं प्रतिबिंब आता लगोलग पडलेलं दिसू लागलं होतं. मोबाइलनं सर्व जग व्यापण्यापूर्वी पेजर नावाचा एक प्रकार याच काळात आला आणि धुमकेतूसारखा अंतर्धानही पावला. 'सकाळ'मध्ये नोकरीचे सुरुवातीचे दिवस मी फार एंजॉय केले. मी, मंदार, श्रीपाद आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीचा कंटाळा नसायचा. आम्ही बॅचलर व रूमवर राहणारे असल्यानं दिवसाचा बराच काळ ऑफिसमध्येच पडीक असायचो. कुठलंही काम करायला आम्ही नाही म्हटलं नाही. गावभर फिरायचो. जवळपास प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम अटेंड केलाच पाहिजे, असं आम्हाला वाटायचं. आम्ही छोट्या शहरांतून आलेली मुलं होतो. आमचं सांस्कृतिक कुपोषण लपलेलं नव्हतं. मग आम्ही पुण्यात आल्यावर या गोष्टी भरभरून लुटायला सुरुवात केली. सवाई गंधर्व, 'बालगंधर्व'ची नाटकं, मंगला किंवा 'प्रभात'चे सिनेमे, एनएफएआयमधले वेगळे सिनेमे यातलं काही आम्ही चुकवलं नाही. 'सकाळ'मध्ये अगदी सुरुवातीलाच 'झलक' हे सांस्कृतिक डायरीचं काम माझ्याकडं आलं. त्यानिमित्तानं शहरातल्या सांस्कृतिक वर्तुळातील बहुसंख्य लोकांची ओळख झाली, ती आजतागायत टिकून आहे. 'सकाळ'चा रुबाब पुण्यात तेव्हा एवढा होता, की 'सकाळ'चा बातमीदार येतोय म्हणून पत्रकार परिषदा थांबलेल्या आहेत. मी स्वतः याचा अनेकदा अनुभव घेतलाय. 'सकाळ' ही आमची 'मास्टर की' होती. 'सकाळ'मधून आलो म्हटल्यावर सगळीकडची कुलपं निघायची. आम्ही याचा चांगल्या अर्थानं भरपूर फायदा करून घेतला. आम्हाला बाकी काहीच नको होतं. आम्हाला फक्त सगळीकडं उपस्थित राहायचं होतं आणि सगळं भरभरून अनुभवायचं होतं. तेव्हाची माझी डायरी आज नुसती वाचली, तरी दमायला होतं. तेव्हा मी प्रत्यक्ष ते सगळं करत होतो. कंटाळा नावाची गोष्टच माहिती नव्हती. पण या भरभरून जगण्याची, सगळ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेण्याची ही जी सवय लागली, तिचा आयुष्यभर फार मोलाचा उपयोग झाला. पत्रकारिता करीत असताना सर्वांत महत्त्वाचं काय असतं, तर ते कुतूहल. आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींबाबत लहान मुलासारखं कुतूहल पाहिजे. माझ्या ठायी ते भरपूर होतं आणि त्यामुळंच मला भरपूर बघावंसं वाटायचं, लिहावंसं वाटायचं. तेव्हाचं हे संचित पुष्कळ पुरलं. 
बघता बघता १९९८ उजाडलं. आमच्या ऑफिसमध्ये मार्च महिन्यात आणखी २२ जणांची 'मेगाभरती' झाली. आम्ही लगेच 'सीनियर' झालो. हा सगळा शिकण्याचा काळ होता, जडणघडणीचा काळ होता. ऑफिसमध्ये वरिष्ठ सांगतील ती प्रत्येक गोष्ट आम्ही केली. आजूबाजूचं जग बदलत होतं. लोक सढळ हातानं खर्च करताना दिसत होते. पुणे ते मुंबई एक्स्प्रेस-वे बांधायचं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. या एक्स्प्रेस-वेच्या कामाचा शुभारंभ याच वर्षात झाला. तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम वेगात पूर्ण करायचं ठरवलं. त्यांनी मुंबईतही ५५ उड्डाणपूल बांधल्यानं लोक त्यांना 'ब्रिज'भूषण गडकरी म्हणायला लागले होते. याच वर्षी केंद्रातलं (देवेगौडा जाऊन आलेलं) गुजराल सरकार कोसळलं आणि पुन्हा निवडणुका झाल्या. या वेळी लोकांनी वाजपेयींच्या बाजूनं झुकतं माप दिलं. तरीही त्यांना माया, ममता व जयललिता या तिघींचा पाठिंबा घ्यावा लागला. मार्च १९९८ मध्ये वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि सोनिया गांधी विजनवासातून बाहेर येऊन प्रथमच काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. तेव्हा 'सकाळ'मध्ये या दोघांविषयीचा माहितीपर लेख लिहिण्याची संधी मला मिळाली. 
एप्रिलमध्ये शारजात सचिन तेंडुलकर नावाचं वादळ आलं आणि त्यानं शेन वॉर्नच्या ऑस्ट्रेलियाचा दोनदा कचरा करून, भारताला अजिंक्यपद मिळवून दिलं. पंचविशीचा हा तरुण आता देशाचा 'यूथ आयकॉन' झाला होता. दोन वर्षांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यात आणखी दोन हिरे भारतीय संघाला गवसले होते. राहुल द्रविड आणि सौरभ गांगुली... १९९६ च्या वर्ल्ड कप सेमीफायनलला रडणारा भारत आता दिसत नव्हता. उलट सचिनच्या त्या 'डेझर्ट स्टॉर्म' म्हणून नंतर प्रसिद्ध पावलेल्या दोन झंझावाती शतकांनी सगळा माहौलच बदलवून टाकला. याच वर्षात करण जोहर नामक दिग्दर्शकाचा 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा आला आणि या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीतील मनोरंजनाचे सगळे आयामच बदलले. 'कुछ कुछ' तुफान हिट झाला. 'राहुल' आणि 'अंजली' घराघरांत पोचले. याच काळात भारतात पेप्सी आणि कोला या अमेरिकी जायंट शीतपेय कंपन्यांचं 'युद्ध' सुरू झालं होतं. क्रिकेट संघाच्या स्पॉन्सरशिपपासून ते रस्त्यावरच्या बसस्टॉपवरील होर्डिंगपर्यंत सगळीकडं पेप्सी किंवा कोका-कोला दिसायला लागले होते. ही शीतपेयं पिणं म्हणजे 'कूल' असणं असं समस्त तरुणाईला वाटायला लागलं होतं. 'लहर पेप्सी'च्या जाहिरातीत 'आहा' म्हणत रेमो फर्नांडिस आणि जूही चावला नाचू लागले होते. जागतिकीकरण स्वीकारल्याच्या घटनेला आता सात-आठ वर्षं उलटून गेली होती आणि सरकारं बदलली तरी धोरण बदललं नव्हतं. देशाचा सुस्त पहुडलेला हत्ती भांडवलवादी अर्थव्यवस्थेमुळं हळूहळू हालचाल करायला लागला होता. याच वर्षी मे महिन्यात पोखरणमध्ये भारताने पाच अणुचाचण्या केल्या. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या अणुचाचण्यांद्वारे पंतप्रधान वाजपेयींनी जगाला भारताच्या सामर्थ्याची पुन्हा एक चुणूक दाखविली होती.
सन १९९९. या वर्षी एक मार्च रोजी आम्ही 'सकाळ'मध्ये परमनंट झालो. आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं वाटायचा तो काळ होता. दीड वर्ष राबल्यावर आम्ही कायम झालो होतो, त्यामुळं असं वाटणं स्वाभाविक होतं. याच वर्षात मे महिन्यात मी माझ्या बी. ए.च्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली आणि फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. आता मला आणि मंदारला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेची पदवी घेण्याचे वेध लागले होते. त्याप्रमाणे आम्ही जूनमध्ये या कोर्सची प्रवेश परीक्षा दिली. तेव्हा आमच्या सुदैवानं अरुण साधू या विभागाचे प्रमुख होते. त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि कोर्ससाठी आमची निवडही केली. या कोर्ससाठी मी दाखल झालो, हा आयुष्यातला आणखी एक महत्त्वाचा टप्पा. वयाची चोविशी आली, तरी माझं शिक्षण सुरूच होतं. पण एकीकडं नोकरी करत असल्यानं हा सगळा प्रवास आता आनंददायी वाटत होता. याच वर्षी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका झाल्या आणि वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. या वेळी मात्र त्यांना जनतेनं बऱ्यापैकी बहुमत दिलं होतं. 'रानडे'मध्ये दिवसा कॉलेज आणि दुपारी ऑफिस अशा धावपळीत हे वर्ष कसं संपलं ते कळलंही नाही. याच वर्षी सुभाष घईंचा 'ताल' प्रदर्शित झाला. राज्यात मनोहर जोशी जाऊन धडाकेबाज नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते. या सरकारनं मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका जाहीर करायला लावल्या आणि त्यात युतीचा निसटता पराभव झाला. (पुढची पंधरा वर्षं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य केलं.) याच वर्षी जूनमध्ये शरद पवार यांनी सोनियांच्या परदेशी मूळ असल्याच्या मुद्द्यावरून स्वतंत्र 'राष्ट्रवादी काँग्रेस' हा पक्ष स्थापन केला. यामुळं राज्यातील राजकारणाचे आयामच बदलले...
...या सगळ्या वेगवान घडामोडी घडत असताना २००० हे वर्ष उजाडलं. नव्वदचं दशक संपलं होतं आणि जग या विसाव्या शतकातील शेवटच्या वर्षात शिरलं होतं. आज मागं वळून पाहताना लक्षात येतं, की आज आपला जो काही भला-बुरा पिंड घडला आहे, तो या नव्वदच्या दशकानं घडवला आहे. 'अस्वस्थ' ते 'आश्वस्त' असा हा प्रवास होता. वयाच्या चौदा वर्षांसारख्या अत्यंत अस्वस्थ, अस्थिर वयापासून ते चोविसाव्या वर्षापर्यंत, थोडक्यात आयुष्याला स्थैर्य देण्यापर्यंतचा हा प्रवास होता. माझ्यासोबत किंवा माझ्या आगे-मागे तीन-चार वर्षं जन्मलेल्या सर्वांनी या काळात असाच प्रवास केला असेल. तपशील निराळे असतील, पण आपला रस्ता हाच होता. साध्या रस्त्यावरून आपण सहापदरी एक्प्रेस-वेवर येऊन दाखल झालो होतो. आता इथं सीटबेल्ट घट्ट बांधायचे होते आणि गाडी सुसाट सोडायची होती... तोही प्रवास भन्नाटच झाला... पण त्याविषयी नंतर केव्हा तरी.. 
तूर्त मला घडविणाऱ्या आणि काही अविस्मरणीय आठवणी देणाऱ्या या दशकाबद्दल केवळ आणि केवळ कृतज्ञता!!!

(समाप्त)

---- 

2 comments:

  1. सुरेख.....पुढच्या दशकाचा प्रवास वाचण्यास आम्ही आहोत ....शुभेच्छा !!!

    ReplyDelete