17 Jul 2020

रिव्ह्यू – जानू

हरवलेल्या मोरपिसाची मधुर मोहिनी...
----------------------------------------------


शाळेत असताना प्रेमात पडतोच आपण. तेव्हा कळतच नसतं, की त्या प्रकाराला नक्की काय म्हणायचं? प्रेम असतं का खरंच? की त्या पौगंडावस्थेतलं केवळ शारीरिक आकर्षण? काहीही म्हणा, पण कुणी तरी आवडतं, बस्स... आणि मग बाकी काही सुचतच नाही. हवेवर तरंगणाऱ्या मोरपिसासारखं मन हलकं हलकं होऊन जातं. समोर फक्त ती (किंवा तो) दिसत राहते. अहोरात्र तिचाच विचार मनात येत राहतो. पण मनातलं प्रेम व्यक्त करता येतंच, असं नाही. शंभरातल्या किमान ८० जणांना तरी ते नसेलच करता येत! नकाराची भीती वाटत राहते, विशेषतः मुलांना.... पुढं शाळा संपते. आपापले रस्ते वेगळे होतात. पुढं लग्नं होतात, संसार सुरू होतात. तरी ती सध्या काय करते याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. हल्ली फेसबुक, व्हॉट्सअपसारख्या माध्यमांमुळे जुन्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा भेटणं सहज शक्य झालंय. शाळांची रियुनियन म्हणजे जुन्या प्रेमांची गॅदरिंगंच झालीयत जणू. तिथं बहुतेकांना आपापलं जुनं प्रेम दिसतं. वस्तुस्थितीचं भान येतं आणि मनातलं मोरपीस मनातच कोमेजून जातं. काही भाग्यवानांचं मात्र प्रेम टिकतं... कायम राहतं. अशा भेटीच्या वेळी मग हृदय दहावीतल्यासारखंच दुप्पट वेगानं धडधडू लागतं. जुन्या आठवणी आषाढातल्या कृष्णघनांसम आवेगानं कोसळू लागतात. मेंदू बधिर होतो. हाता-पायांना कंप सुटतो... ती अशी समोर येते आणि आपण अक्षरशः कोसळतो. नंतर आपल्याला कळतं, की ती परदेशातून आलीय. मोठ्या मुश्किलीनं मुलीला घरी ठेवून तिनं यायचं जमवलंय. पहाटेच्या फ्लाइटनं ती परत जाणार आहे. हातात केवळ काही तास आहेत. तिचा सहवास लाभणार आहे तो तेवढाच काळ... आता या काळातल्या प्रत्येक क्षणावर कादंबरी होऊ शकते, महाकाव्य लिहिलं जाऊ शकतं, कवितांचा पूर येऊ शकतो आणि आठवणींच्या चांदण्यांनी मनाचं आकाश लखलखू शकतं.
सी. प्रेमकुमार दिग्दर्शित 'जानू' या तेलगू चित्रपटाचं कौतुक अशासाठी, की त्यानं या सर्व शक्यता आजमावल्या आहेत. प्रेमाची नवी गाथा सांगितली आहे. खरं तर ती नवी नाहीच, पण तिच्यातली तरलता मात्र नवी भासू शकते. आपल्या आजूबाजूचं सर्व जग आणि एकूणच अभिव्यक्ती व्यवहारी आणि रोकडे हिशेब मोजणारी होत असताना, एवढं नितळ, स्वच्छ काही असू शकतं का, यावरचा आपलाच विश्वास उडण्यासारखी परिस्थिती आहे, म्हणूनही ही तरलता नवी भासू शकते.
खरी गोष्ट अशी आहे, की या कलाकृतीतून आपल्यात पूर्वी असलेली आणि आता कुठे तरी हरवून गेलेली निरागसता आपल्याला अशी जुन्या प्रेयसीसारखी अवचित गवसते. त्या प्रेमातील निरागसता आणि निरागसतेवरचं आपलं प्रेम दोन्ही आत्ताच्या रुक्ष जगात गवसण्याची एक शक्यता ही कलाकृती निर्माण करते आणि म्हणूनच मला तिचं खूप खूप मोल वाटतं. 
चित्रपटाची सुरुवात आणि मध्यंतरापर्यंतचा भाग एरवीच्या शालेय प्रेमपटांसारखाच पुढं सरकतो आणि आपल्याला पुढं काय होणार याचा काहीसा अंदाज येतो. मात्र, चित्रपटाची खरी जान आहे तो याचा उत्तरार्ध. तो फक्त आपल्या नायक-नायिकेचा आणि त्यांच्यातल्या त्या खास क्षणांचा आहे. प्रेम म्हणजे नक्की काय, याचा काहीएक अदमास यातून येऊ शकतो. ज्यांनी कधी तरी एकदा का होईना, असं निस्सीम प्रेम केलंय, त्यांना यातल्या अबोध प्रेमाची तरलता कळू शकेल. नायक-नायिका एकदाही अंगचटीला न येता, शारीर स्पर्शाविना प्रेमाचं एवढं उत्कट दर्शन घडवू शकतात, यावर हल्ली कुणाचाच विश्वास बसायचा नाही. पण जानू असं प्रेम दाखवतो. किंबहुना हा अशक्य वाटणारा प्रेमाचा पैलू फार ठळकपणे दाखवतो आणि त्यातली हवीहवीशी अशक्यता स्वप्नवत सत्यात उतरवून दाखवतो. म्हणूनच भिडतो.
'जानू'चा सगळा प्राण हा त्या दोघांच्या त्या अव्यक्त क्षणांमध्ये आहे. तिला लिफ्ट द्यायची आहे हॉटेलपर्यंत... तिथून पहाटे एअरपोर्टला सोडायचंय.... मधल्या काळात भूतकाळाची सगळी उजळणी होते. कुठं काय चुकलं हे समजत जातं. ती उन्मळून पडते. एक लहानशी चूक निमित्तमात्र झालेली असते. आता काळाची चक्रं उलटी फिरवणं अशक्यच असतं. पण फ्लाइटची वेळ होईपर्यंतचा प्रत्येक क्षण तिला त्याच्यासोबत काढायचा असतो. मग दोघे हॉटेलमधून बाहेर पडतात. तिला त्याला दहावीच्या रूपात पाहायचं असतं. मग सलूनमध्ये जाऊन आधी ती त्याची दाढी करवून घेते. नंतर शहरातल्या सुनसान रस्त्यांवर दोघे भटकत राहतात. प्रत्येक क्षण असोशीनं जपू पाहतात. मेट्रोनं फिरतात. कॅफेमध्ये जातात. तिथं त्याच्या विद्यार्थिनी भेटतात. तिला त्याची पत्नी समजतात. गप्पा मारतात. तीही भूतकाळातली घटना तिला जशी घडायला हवी होती, तशी रचून सांगते. तो ती ऐकताना अस्वस्थ होतो. अखेर त्या मुली जातात. नंतर त्याच्या घरी जातात दोघं. दारातून पाऊल आत टाकताना आवर्जून तो तिला उजवा पाय आधी टाकायला सांगतो. पावसानं भिजलेली ती त्याच्या बाथरूममध्ये जाते. अंघोळीला त्याचाच साबण वापरते. तो संकोचानं तिला टॉवेल व त्याचे शर्ट देऊ पाहतो. ती निश्चिंतपणे त्याचा शर्ट घालते. शर्टचा गंध घेऊन पाहते... तो कॉफी करतो... गॅलरीत दोघं गप्पा मारतात... तिला त्याचं लग्न व्हावं, असं वाटतंय, त्याला मुलं झालेली बघायची आहेत. ती हे सगळं असोशीनं त्याला सांगत राहते... त्याला भूक लागलेली असते. ती त्याच्या स्वयंपाकघरात जाते, खायला करते. तो तिच्यासमोर बसून मांडी घालून बसतो आणि खात राहतो. तिच्यातल्या प्रेयसीतलं हे मातृस्वरूप दर्शन प्रेमाची उच्च प्रत दाखवून जातं. एका टप्प्यानंतर हेच उरतं ना खरं तर... एकमेकांची काळजी, जिव्हाळा, माया.... एवढंच राहतं. शारीर आकर्षणापलीकडं गेलेलं हे प्रेम... अचानक लाइट जातात. तो बॅटरी आणायला धावतो. ती एकदम 'यमुना तटी...' म्हणायला सुरुवात करते. राधाकृष्णाचं हे गाणं... त्यानं शाळेत अनेकदा फर्माइश करूनही तिनं कधीच न म्हटलेलं! आज असं अचानक त्याच्या घरात ती म्हणते. त्यांच्यातल्या उत्कट प्रेमाचा हा सर्वोच्च क्षण असतो... ती शांतपणे त्याच्या बेडवर पडते. श्रमानं तिचा डोळा लागतो. तो खाली जमिनीवर निजतो. पण झोप येत नाहीच. तो पाहत राहतो तिच्या झोपलेल्या निरागस चेहऱ्याकडं... आता काही काही नको असतं. हृदय उचंबळून येतं, मन भरून येतं.... 'क्षण एक पुरे प्रेमाचा', तो हाच...
अखेर तिचा जाण्याचा क्षण येतो. दोघं तिच्या हॉटेलवर येतात. कारनं एअरपोर्टला जायला निघतात. एअरपोर्ट जवळ येतो, तसं तिला जाणवतं, की हे सगळं लवकरच संपणार आहे. तिचा हात नकळतपणे गिअरवर जातो. तो बघतो. तिच्या हातावर हात ठेवून गिअर बदलत राहतो. शेवटी ती न राहवून म्हणते, मला अजून तुझा थोडा वेळ हवाय. मग तो चक्क तिच्या विमानाचं आणखी एक तिकीट स्वत:साठी काढतो. दोघंही आत जातात. मूकपणे एकमेकांची सोबत अनुभवत राहतात. पण शेवटी ताटातुटीचा प्रसंग पुन्हा येतोच. सगळे बांध फुटतात.... ती त्याच्या गळ्यात पडू पाहते. पण सावरते लगेच आणि विमानाकडं धावत सुटते. तो घरी येतो. दहावीनंतर तिनं शाई शिंपडलेला शर्ट आणि आत्ता तिचा ‘विसरलेला’ कुर्ता तो बॅगेत बंद करून ठेवतो. मोरपीस पुन्हा वहीत जातं.... मन एकाच वेळी रिक्तही असतं आणि तृप्तही...
शर्वानंद (राम) आणि जानकी उर्फ जानू (समंथा रुथ प्रभू) या दोघांचा अभिनय केवळ लाजवाब. त्यातही समंथानं साकारलेली जानू केवळ अप्रतिम. अनेक शांत, संथ क्षणांमध्ये अर्थ उतरवण्याचं अवघड काम या दोघांनीही फार उत्कृष्ट पेललंय. 
शाळेत एकदा तरी प्रेम केलेल्यांना नक्की आवडेल असा हा सुंदर चित्रपट चुकवू नका.

----

दर्जा – चार स्टार

-----------------------
 

20 comments:

  1. चित्रपट तर छान असेलच पण परिक्षणही अतिशय सुंदर,
    वाचतानाच वाचकही चित्रपटाच्या कथेत गुंतत जातो.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद... नाव लिहा कृपया...

      Delete
    2. अंजली उमाप

      Delete
  2. परिक्षण अतिशय सुंदर...
    Rajeev Jatkar.

    ReplyDelete
  3. परीक्षण खूप छान, चित्रपट पाहीन नक्की

    ReplyDelete
  4. मनःपूर्वक धन्यवाद!

    ReplyDelete
  5. Written so well, want to watch the movie. This is success of the article. Nowadays content is so bold, vulgar n full of violence, in this era, such love story as u said, refreshing n strengthen belive in pure love. Btw where to watch this movie?

    ReplyDelete
  6. चित्रपट आधीच पाहिला होता.. फारच सुंदर तरल फिल्म. नसता पाहिला तर हा परिचय वाचून नक्की पाहिला असता.. छान लिहिलय तुम्ही

    ReplyDelete
  7. छान परीक्षण, हा सिनेमा तामिळ सिनेमा 96 वर बेतला आहे, हाही सिनेमा आपण पहावा, विजय सेथुपती आणि त्रिशा यांनी खूप छान काम केले आहे, यातील गौतम याचे संगीत अप्रतिम आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हो. पाहिला आहे तोही... मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete
  8. एखाद्या चित्रपटाचं समिक्षण इतकं सुंदर असू शकतं!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. मन:पूर्वक धन्यवाद. कृपया नाव लिहा...

      Delete
  9. Khup sundar varnan...nakki baghayala aawad

    ReplyDelete
  10. अत्यंत सुंदर परिक्षण!

    ReplyDelete