19 Apr 2021

सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर लेख

संवेदनशील, 'विचित्र' निर्मिती
----------------------------------



सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर हे दोघेही सध्याचे मराठीतील आघाडीचे चित्रकर्मी आहेत. दोघे मिळून सिनेमा दिग्दर्शित करतात, त्यामुळे जोडीनेच त्यांचा उल्लेख करावा लागतो. त्यांचे सिनेमे 'विचित्र निर्मिती' या शीर्षकाखाली तयार होतात. ही निर्मिती खरंच 'विचित्र' आहे. म्हणजे वेगळी... स्वतंत्र... स्वतःची ठळक ओळख घेऊन येणारी! या जोडीच्या चित्रपटांबाबत कुणी एकाच शब्दात वर्णन करायला सांगितलं, तर मी 'संवेदनशील' हा शब्द निवडीन. याचं कारण या जोडीचे सर्व चित्रपट कमालीचे संवेदनशील आहेत. ही संवेदना या माध्यमाबद्दल आहे, प्रतिपाद्य विषयाबद्दल आहे, एकूण समष्टीबद्दल आहे आणि त्याहीपलीकडे जाऊन निखळ माणूसपण जपणारी अशी आहे. त्यामुळं सुमित्रा भावेंचे चित्रपट पाहताना प्रेक्षक स्वतः उन्नत होत जातो. त्याला काही तरी नवं मिळतं. निखळ मनोरंजनापलीकडं विचारांना काही तरी खाद्य मिळतं. एका अर्थानं हा प्रेक्षकांकडूनही किमान प्रगल्भतेची, बुद्धिमत्तेची अपेक्षा करणारा, बुद्धिवादी, पण तरल-संवेदनशील असा सिनेमा आहे. याशिवाय स्किझोफ्रेनिया किंवा अंगावरचं कोड किंवा विस्मरण असा एखादा विषय घेऊन त्यावर चित्रपट तयार करणं हेही या जोडीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळंच त्यांचा असा एक खास चाहता वर्ग आहे आणि त्याला राज्याची किंवा देशाची सीमा नाही.
सुमित्रा भावे या मूळच्या उमराणी. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ चा. त्यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. नंतर राज्यशास्त्र व सामाजिक विकास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. मुंबईत 'टाटा समाजविज्ञान संस्थे'तून त्यांनी ग्रामीण विकासाबाबतचा डिप्लोमा पूर्ण केला. विविध संस्थांतून त्यांनी सामाजिक विकासासाठी कामे केली. पुण्याच्या कर्वे समाजविज्ञान संस्थेत त्या सुमारे दशकभर अध्यापन करीत होत्या. त्यामुळं त्यांचा पिंड सामाजिक कार्यकर्तीचा आणि शिक्षिकेचा आहे. समाजविज्ञानाचा अभ्यास व अध्यापन करीत असताना सुमित्रामावशींना जो समाज दिसला, जी माणसं दिसली, त्याचे प्रतिबिंब पुढे त्यांच्या सिनेमात दिसते. म्हणूनच त्यांचा सिनेमा 'नो नॉनसेन्स' सिनेमा असतो. त्यांनी सुरुवातीला कामाचा भाग म्हणून काम लघुपटांचे दिग्दर्शन केले. 'बाई', 'पाणी' हे त्यातले गाजलेले काही. या लघुपटांना मोठा प्रतिसाद लाभला. त्यातूनच सुमित्रा भावेंना अभिव्यक्तीसाठी चित्रपट या माध्यमाची वाट गवसली, असं म्हणता येईल.

सुनील सुकथनकर हे मूळचे कराडचे. त्यांचा जन्म ३१ मे १९६६ चा. पुण्यातील बीएमसीसीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शन शिकण्यासाठी पुण्यातीलच 'एफटीआयआय'मध्ये प्रवेश घेतला. सुकथनकर यांनी रंगकर्मी म्हणूनही काम केलं. त्यांनी अनेक नाटकं, पथनाट्यं लिहिली व दिग्दर्शित केली. सुमित्रा भावे 'बाई' हा लघुपट तयार करीत असताना त्यांच्या मुलीमुळे - सतीमुळे - सुनील यांची सुमित्रा भावेंशी ओळख झाली. त्यातून पुढे १९९५ मध्ये या दोघांनी 'दोघी' हा पूर्ण लांबीचा पहिला मराठी चित्रपट तयार केला. तिथून त्यांच्या संयुक्त दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. आतापर्यंत या दोघांनी १४ चित्रपट, पन्नासहून अधिक लघुपट आणि चार टीव्ही मालिका तयार केल्या आहेत. या सर्व कलाकृतींचं लेखन सुमित्रामावशींनीच केलं आहे. 'दोघी'मध्ये सोनाली कुलकर्णी आणि रेणुका दफ्तरदार यांनी काम केलं होतं. सामाजिक बंधनांच्या जाचात सापडलेल्या दोन बहिणी आणि त्यांची आई (उत्तरा बावकर) यांची करुण कहाणी या चित्रपटातून भावे-सुकथनकर यांनी मांडली होती. सोनाली कुलकर्णीच्या अभिनयक्षमतेची सुरुवातीच्या काळात सर्वांना ओळख करून देणारा चित्रपट म्हणून 'दोघी'चं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्यानंतर या दोघांनी 'जिंदगी जिंदाबाद' (१९९७) हा हिंदी चित्रपट तयार केला. एका तरुणाच्या आयुष्यात घडलेल्या सत्यघटनेची पार्श्वभूमी या चित्रपटाला होती. तेव्हा एड्सची समस्या खूप चर्चेत होती. या सिनेमानं एड्स आणि तद्अनुषंगिक समस्यांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला होता. हा सिनेमा फार चालला नाही; मात्र एखादी समस्या किंवा आजार/विकार घेऊन सिनेमा करण्याची या जोडीची परंपरा या सिनेमापासून सुरू झाली होती, असं म्हणता येईल.
त्यानंतर २००२ मध्ये या जोडीचे एकदम दोन चित्रपट आले आणि दोन्ही खूप गाजले. या दोन्ही चित्रपटांनी भावे-सुकथनकरांना नाव मिळवून दिलं. हे चित्रपट होते 'दहावी फ' आणि 'वास्तुपुरुष'! 'दहावी फ' हा सिनेमाही पुण्यातील सत्यघटनेवर आधारित होता. वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीनं सुमित्रामावशींचं लक्ष वेधून घेतलं होतं. एका शाळेतील दांडगाई, उनाडक्या करणाऱ्या मुलांनी शाळेचं केलेलं नुकसान स्वतः काम करून भरून दिलं आणि त्यासाठी एका शिक्षकांनी कसा पुढाकार घेतला, अशी ती बातमी होती. याच बातमीवरून प्रेरणा घेऊन 'दहावी फ' हा सिनेमा तयार करण्यात आला होता. यात अतुल कुलकर्णीने केलेली शिक्षकाची भूमिका गाजली. यातील निमिष काठाळे, वृषसेन दाभोळकर या मुलांनीही चांगलं काम केलं होतं. हा चित्रपट चिल्ड्रन फिल्म सोसायटीने काढावा, यासाठी भावे-सुकथनकर सोसायटीकडे गेले होते. मात्र, या चित्रपटाची कथा त्यांच्या 'मार्गदर्शक तत्त्वां'त बसत नसल्याने त्यांनी या चित्रपटाची निर्मिती करण्यास नकार दिला होता. नंतर भावे-सुकथनकर यांनी मित्रांकडून पैसे गोळा करून हा चित्रपट तयार केला. 'विचित्र निर्मिती'ची सुरुवातही हीच. या चित्रपटाला चांगलं यशही मिळालं.
या जोडीचा मला (व त्यांनाही) सर्वांत आवडणारा चित्रपट म्हणजे 'वास्तुपुरुष'! हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने तयार केला होता. साठच्या दशकातील ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतराचा उभा-आडवा छेद अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटात घेण्यात आला आहे. भास्कर देशपांडे (सिद्धार्थ दफ्तरदार/महेश एलकुंचवार) या मुलाची ही कथा आहे. विपरीत परिस्थितीला तोंड देत तो डॉक्टर कसा होतो, याची ही कथा आहे. पण मला भास्करसोबतच ही त्याच्या आईची - सरस्वतीचीही (उत्तरा बावकर) - कथा वाटते. काळाची पावलं ओळखणारी, खोट्या वतनदारीला न भुलणारी, स्वतः कष्ट करून पैसे कमावण्यावर विश्वास असलेली, गुप्तधनासारख्या भाकड कथांना थारा न देणारी, मुलानं डॉक्टर होऊन जनतेची सेवा केली म्हणजेच आपली वास्तू 'शांत' होईल, असं मानणारी यातली 'सरस्वती' ही मराठी रूपेरी पडद्यावर आलेल्या सर्वांत ताकदवान, प्रभावी पात्रांपैकी एक आहे. उत्तरा बावकरांनी ही सरस्वती खूप जबरदस्त उभी केली आहे. या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम न् फ्रेम, प्रत्येक संवाद कसा जमून आला आहे! साठच्या दशकात ज्यांचं बालपण गेलंय, अशी पिढी तर या चित्रपटाशी रिलेट करू शकतेच; पण माझ्यासारखी त्यानंतर किती तरी काळाने जन्मलेली पिढीही या पात्रांशी, त्यातील पर्यावरणाशी एकजीव होऊ शकते, हे या चित्रपटाचं मोठं यश आहे. याचं कारण ग्रामीण महाराष्ट्रातील परिस्थितीत १९६० ते १९९० या काळात फार प्रचंड फरक पडला नव्हता, हेच असावं. या चित्रपटात मोठ्या भास्करच्या भूमिकेसाठी सुमित्रामावशींनी चक्क महेश एलकुंचवार यांनाच घेतलं. त्यांचा या चित्रपटातला वावर सुखद आहे. स्वतः एलकुंचवार ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक जीवनावर, स्थलांतरावर, स्थित्यंतरावर किती तरी खोल, अर्थपूर्ण असं लिहीत आले आहेत. त्यांची 'त्रिनाट्यधारा' याचंच प्रतीक आहे. त्या तिन्ही नाटकांचा आणि या 'वास्तुपुरुष'चा एक जैव संबंध आहे, असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. 'वास्तुपुरुष'मधील एलकुंचवारांची उपस्थिती हे त्यांचं दृश्य प्रतीक आहे. या चित्रपटातील सगळेच कलाकार जबरदस्त होते. सिद्धार्थ दफ्तरदार, महेश एलकुंचवार व उत्तरा बावकरांच्या जोडीला सदाशिव अमरापूरकर, रवींद्र मंकणी, अतुल कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार, रेखा कामत, तुषार दळवी, निमिष काठाळे अशी सगळी नामवंत मंडळी होती. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जामगाव येथील शिंदेशाही वाड्यात या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. दर वेळी हा चित्रपट पाहताना डोळे झरतात. अशा कित्येक 'सरस्वतीं'नी ग्रामीण महाराष्ट्रातील किती वास्तू पेलल्या आहेत आणि निभावल्या आहेत, या विचारानं मन त्या अज्ञात माउल्यांसाठी कृतज्ञतेनं भरून येतं...
या दोन्ही सिनेमांनंतर भावे-सुकथनकर जोडीचा एका परीनं आपल्या सिनेमाचा आत्मा गवसला, असं म्हणायला हरकत नाही. मग २००४ मध्ये आलेल्या 'देवराई'नं यावर शिक्कामोर्तबच केलं. स्किझोफ्रेनियासारख्या तोपर्यंत मराठी सिनेमात अपवादानंच आलेली समस्या यात हाताळण्यात आली होती. अतुल कुलकर्णीनं यात साकारलेली शेषची भूमिका ही त्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकांपैकी एक आहे. या चित्रपटालाही अनेक पुरस्कार मिळाले. मग २००६ मध्ये या जोडीचा 'नितळ' हा आणखी एक नितांतसुंदर चित्रपट आला. कोडासारख्या आपल्याकडं सामाजिक समस्या होऊन बसलेल्या विषयावर या सिनेमात फार सुंदर मांडणी होती. 'वास्तुपुरुष'मध्ये भावे-सुकथनकरांनी एलकुंचवारांना कॅमेऱ्यासमोर उभं केलं होतं, तसं या सिनेमात त्यांनी विजय तेंडुलकरांना रूपेरी पडद्यावर आणलं. या सिनेमात देविका दफ्तरदार, अमृता सुभाष यांच्या भूमिका अप्रतिम होत्या. श्रीरंग उमराणींनी दिलेलं संगीत आणि यातली गाणीही खूप मस्त आणि वेगळी होती. 'अंधाराच्या भोवती आहे नवा नवा अंधार' हे गाणं विशेष गाजलं. याच वर्षी या जोडीचा 'बाधा' हा चित्रपटही आला. मात्र, तो सर्वत्र प्रदर्शित होऊ शकला नाही. मी स्वतः तो चित्रपट महोत्सवातच पाहिला. अमृता सुभाष आणि राजेश मोरे यात प्रमुख भूमिकांत होते. धनगर समाजातील अंधश्रद्धेचा विषय यात हाताळण्यात आला होता. फलटण परिसरातील धनगर तांड्यांवर जाऊन केलेलं चित्रीकरण हेही याचं वैशिष्ट्य. 
या जोडीचं चित्रपट निर्मितीतील सातत्य या काळात वाखाखण्याजोगं होतं. कारण २००९ मध्ये त्यांचे दोन चित्रपट आले. एक होता 'एक कप च्या' आणि दुसरा 'घो मला असला हवा!' यातला 'एक कप च्या' मला वैयक्तिकरीत्या आवडला होता. माहिती अधिकार कायदा नुकताच आला होता. या कायद्याची मदत घेऊन कोकणातला एक कंडक्टर आपला लढा कसा लढतो, याची ही छान, प्रेरणादायी गोष्ट होती. यात किशोर कदमनं त्या कंडक्टरची भूमिका अफलातून केली होती. एलकुंचवार आणि तेंडुलकरांना रूपेरी पडद्यावर झळकवल्यानंतर या चित्रपटात भावे-सुकथनकरांनी कमल देसाईंना रूपेरी पडद्यावर आणलं होतं. त्यांनी आजीची भूमिका पण खूप गोड केली होती. शिवाय अश्विनी गिरी, देविका दफ्तरदार, ओम भुतकर, पर्ण पेठे आदी कलाकार यात होते. दुर्दैवानं हा सिनेमा फार चालला नाही. 'घो मला असला हवा' या सिनेमाद्वारे या जोडीनं प्रथमच आपली मळवाट सोडून विनोदाची कास धरली. कोकणच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही एक हलकीफुलकी कॉमेडी होती. राधिका आपटेचा हा पहिला चित्रपट. यातला नर्मविनोद उत्कृष्ट होता. पण याही चित्रपटाला मर्यादित प्रतिसाद लाभला. नंतर २०११ मध्ये आलेला 'हा भारत माझा' हा चित्रपट तेव्हा देशात सुरू असलेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने प्रेरित होता. हा चित्रपट प्रयोगशील असला, तरी प्रेक्षकांनी त्याची फार दखल घेतली नाही. मात्र, २०१३ मध्ये आलेला 'संहिता' हा या जोडीचा एक उत्कृष्ट चित्रपट होता. या चित्रपटाची उत्कृष्ट पटकथा, रंगभूषा, संगीत यांचं कौतुक झालं.
पुढच्याच वर्षी म्हणजे २०१४ मध्ये आलेला 'अस्तु' हा विस्मरणाच्या आजारावर आधारित चित्रपट होता. डॉ. मोहन आगाशे यांनी यातली प्रा. चक्रपाणींची भूमिका सुंदर साकारली आहे. एकूणच हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय असा अनुभव आहे. यातली इरावती हर्षेची भूमिकाही पाहण्यासारखी आहे. 'अस्तु' चित्रपट चांगला असला, तरी सुरुवातीला तो मर्यादित ठिकाणीच प्रदर्शित झाला. नंतर त्याला अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर काही संस्थांनी 'क्राउड फंडिंग' करून तो पुन्हा प्रदर्शित केला. 
या जोडीचा शेवटचा आलेला चित्रपट म्हणजे गेल्या वर्षी आलेला 'कासव'. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार व सुवर्णकमळ मिळालं, यातच काय ते आलं. मनाचा आजार या एरवी आपल्याकडं दुर्लक्षित विषयाला हा 
चित्रपट फार हळुवारपणे स्पर्श करतो. यात आलोक राजवाडे, इरावती हर्षे यांचं काम सुंदर आहे. 
या जोडीच्या प्रत्येक सिनेमावर सविस्तर लिहावं, एवढं त्यांचं काम आणि तो आशय महत्त्वाचा आहे. या लेखात एकूण या जोडीच्या कामाचा धावता आढावा घेणंच शक्य आहे. मी त्यांचे सगळे चित्रपट बघितले आहेत आणि बहुतेकांवर लिहिलं आहे. मला या जोडीच्या सिनेमाविषयीच नव्हे, तर एकूण जीवनविषयक दृष्टिकोनाचं कौतुक आहे. अपार आदर आहे. त्यांचं जगणं त्यांच्या कलाकृतीतून झिरपतं आणि ते खूप छान आहे. 
यापुढील काळातही त्यांच्याकडून उत्तमोत्तम कलाकृती तयार होतील आणि आपल्याला त्यांच्या आस्वादाचा आनंद मिळेल, यात मला तरी शंका नाही.

---

(एका वेबसाइटसाठी मार्च २०१८ मध्ये लिहिलेला लेख.) 

(ता. क. हा लेख लिहिल्यानंतर सुमित्रा भावे यांचे वेलकम होम आणि दिठी हे आणखी दोन चित्रपट आले. दोन्ही मला पाहता आले. दिठी अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही. सुमित्रा भावे यांचे १९ एप्रिल २०२१ रोजी पुण्यात निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा लेख ब्लॉगवर प्रसिद्ध करतोय.)
---

4 comments: