15 Mar 2022

‘गंगूबाई काठियावाडी’विषयी...

हंस जैसी सफेद...
-------------------


गंगूबाई काठियावाडी हे नाव यापूर्वी ऐकलंच नव्हतं, असं नाही. पण तिच्याविषयी फार माहिती नक्कीच नव्हती. कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता. प्रसिद्ध पत्रकार एस. हुसैन झैदी यांचं ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ हे पुस्तक आल्याचं माहिती होतं. मात्र, ते अजून वाचलेलं नाही. संजय लीला भन्साळी गंगूबाईच्या जीवनावर चित्रपट तयार करतोय, हे ऐकत होतो. तो पाहायची उत्सुकताही होती. अखेर आज - १५ मार्च रोजी - तो योग आला. फर्स्ट थिंग फर्स्ट! ‘गंगूबाई काठियावाडी’ हा संपूर्ण चित्रपट आलिया भटचा आहे. तिच्या पात्राप्रमाणेच तिनं या कलाकृतीवर अक्षरश: राज्य केलं आहे. ‘भूमिका जगणं’ या वाक्प्रचाराचाही ‘क्लिशे’ झाला आहे, हे मान्य आहे; तरीही आलियाच्या बाबतीत पुन्हा हाच शब्दप्रयोग करण्याखेरीज पर्याय नाही, इतका हा तिचा सिनेमा आहे. संजय लीला भन्साळींचे चित्रपट म्हणजे भव्य-दिव्य, रंगीतसंगीत, चकाचक असा सगळा प्रकार. इथं मुंबईतल्या कामाठीपुऱ्यातलं वेश्याजीवन दाखवायचं असलं, तरी भन्साळींना तेही चकचकीत दाखवण्याचा मोह आवरलेला नाहीच. फक्त एवढंच म्हणता येईल, की त्यांनी तुलनेनं पुष्कळ संयम पाळण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो. त्याचा या सिनेमाला फायदाच झालेला आहे. 
वेश्याव्यवसाय हा जगातला सर्वांत प्राचीन व्यवसाय असं मानलं जातं. कुठलीही स्त्री स्वेच्छेने या व्यवसायात येत नाही. बळजबरीनं या व्यवसायात ढकललेल्या स्त्रीच्या यातना आणि तिचं नरकासमान जगणं यांचं वर्णन शब्दांत करणं शक्य नाही. माणसाच्या सर्व संवेदना गोठून संपून जाव्यात, असं जगणं काही स्त्रियांच्या वाट्याला येतं. ‘गंगा जमनादास काठियावाडी’ (आलिया) या नावाच्या, बॅरिस्टर पित्याच्या कन्येच्या आयुष्यातही काही वेगळं घडलं नाही. रमणिक नावाच्या एका तरुणाच्या प्रेमात पडलेली ही सुंदर तरुणी चित्रपटात नायिका होण्याच्या आशेनं मुंबईत येते. तिचा प्रियकर हा प्रत्यक्षात तिला विकणारा दलाल निघतो. अपेक्षाभंग आणि विश्वासघाताचं महाभयंकर दु:ख वाट्याला आलेल्या गंगाचं रूपांतर लवकरच ‘गंगू’ आणि नंतर ‘गंगूबाई’मध्ये होतं. हा सर्व १९५५-६० चा काळ. तेव्हाच्या मुंबईत कामाठीपुरा भागात सुमारे चार हजार वेश्या काम करत होत्या. त्यातल्या शीला नावाच्या ‘मौसी’कडं गंगाला विकण्यात येतं. आधी परिस्थितीपुढं हतबल झालेली, गांजलेली, दुबळी गंगा हळूहळू तीव्र जीवनेच्छेच्या जोरावर स्वत:ची ओळख प्रस्थापित करू पाहते. त्यातल्या त्यात शिकलेली, वाचू शकणारी असल्यानं इतर मुलींचं पुढारपण आपोआपच तिच्याकडं येतं. 
गंगूबाई हळूहळू कामाठीपुऱ्याची अनभिषिक्त पुढारीण होते. हा संघर्ष सोपा नसतो. एका भीषण प्रसंगाला तोंड द्यावं लागल्यानंतर ती मुंबईचा तत्कालीन एकमेव डॉन करीम लाला (सिनेमात रहीम लाला - अजय देवगण) याची भेट घेते. त्याच्याशी बहिणीचं नातं जोडते. कामाठीपुऱ्यातला दारूचा धंदा चतुराईनं ताब्यात घेते. तिथल्या रजियाबाई (विजयराज) या तृतीयपंथीचं वर्चस्व संपविण्यासाठी अनेक क्लृप्त्या करते. अखेर रजियाबाईला हरवून गंगूबाई निवडणूक जिंकते. या प्रवासात तिला एका अमीन फैजी पत्रकाराची (जिम सरभ) साथ लाभते. आता तिला आझाद मैदानावर भाषणासाठी बोलावलं जातं. गंगूबाई पहिल्यांदाच कामाठीपुऱ्याच्या बाहेर पडून, ‘सभ्य समाजाच्या’ मेळाव्यात भाषण ठोकते. तिचं हे भाषण म्हणजे संपूर्ण सिनेमाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. गंगूबाई आपल्या रांगड्या भाषेत समोरच्या कथित सभ्य समाजाचं निराळ्या अर्थानं वस्त्रहरण करते. कामाठीपुऱ्यातल्या महिला आणि त्यांचं हित या एकाच तळमळीनं गंगूबाई कामाला लागते. या वस्तीशेजारी असलेली शाळा आणि तिचे संचालक ही वस्ती हटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढतात. गंगूबाईला तिची वस्ती वाचवायची असते. स्थानिक पुढारी आता तिच्याकडं मदतीला येऊ लागतात. गंगूबाईला त्यातून तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना भेटण्याची संधी मिळते. गंगूबाई आणि नेहरूंची भेट हादेखील या सिनेमाचा हायलाइट म्हणावा लागेल.

संजय लीला भन्साळीनं गंगूबाईचं हे सगळं जगणं अतिशय प्रभावीपणे दाखवलंय. अगदी सुरुवातीला एका लहान मुलीची ‘नथ उतरविण्याच्या’ भयंकर प्रसंगापासून चित्रपट पकड घेतो. चित्रपटाचं कलादिग्दर्शन उच्च दर्जाचं आहे. साठच्या दशकातली मुंबई उत्तम साकारली आहे. कामाठीपुरा आणि तिथल्या जुनाट गल्ल्या, अंधारे जिने, पोपडे उडालेल्या खोल्या आणि डोळ्यांतला उजेड विझलेल्या बायका हे सगळं भन्साळींच्या कॅमेऱ्यानं उत्तम टिपलंय. यात प्रमुख वाटा अर्थात आलिया भटचा. ती पहिल्या दृश्यापासूनच या भूमिकेत शिरली आहे. गंगूबाईची अवहेलना, उद्वेग, लाचारी; तिचा उद्दामपणा, करारीपणा, जिगर, प्रेमळपणा, भावूकपणा, खुनशीपणा, रंगेलपणा, नखरेलपणा हे सगळं सगळं आलियानं अतिशय जबरदस्त साकारलं आहे. या भूमिकेसाठी तिच्यावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव होणार हे नक्की.
यातलं रजियाबाई हे तृतीयपंथीयाचं पात्र साकारणारा विजयराज हा एक भन्नाट कलाकार आहे. मी त्याला ‘रघू रोमिओ’पासून पाहतोय. बऱ्याच काळानं त्याच्या क्षमतेला न्याय देणारी ही भूमिका त्याच्या वाट्याला आली आहे. (काही प्रसंगांत ‘सडक’मधली ‘महारानी’ साकारणाऱ्या सदाशिव अमरापूरकरांची आठवण आली.) रजियाबाईचा सगळा तोरा, नखरा विजयराजनं एकदम खास सादर केला आहे. रहीम लालाच्या भूमिकेत अजय देवगण अगदी परफेक्ट! जवळपास पाहुण्या कलाकारासारखी ही भूमिका आहे, पण त्यातही अजय आपली छाप पाडतोच. याशिवाय छाया कदम, शंतनू महेश्वरी, इंदिरा तिवारी, सीमा पाहावा हे कलाकारही आपापली भूमिका चोख करतात. गंगूबाई अफसान या तरुणाच्या प्रेमात पडते, असा एक ट्रॅक सिनेमात आहे. त्यासाठी दोन गाणीही येतात. गंगूबाईमधली प्रेमाची भुकेली स्त्री दाखविण्यासाठी या ट्रॅकचा उपयोग दिग्दर्शकानं केला आहे.
या चित्रपटात नेहरूंची भूमिका राहुल वोहरा या अभिनेत्याने केली आहे. ती निवड मात्र फसली आहे. आपल्या देशात रोशन सेठ ते दलिप ताहिल अशी ‘नेहरू’ साकारणाऱ्या अभिनेत्यांची परंपरा आहे. सध्या यातले दलिप ताहिल उपलब्ध असताना त्यांनाच ही भूमिका देणे इष्ट ठरले असते. याशिवाय पंतप्रधानांच्या या भेटीत खऱ्या गंगूबाईने त्यांना ‘तुमचं आडनाव मला द्या, मग सर्व गैरधंदे सोडते,’ अशा आशयाचं काही तरी सुनावलं होतं, असा एक किस्सा ऐकण्यात आहे. मात्र, या सिनेमात गंगूबाई-नेहरू भेटीच्या दृश्यात या संवादाचा समावेश नाही. तर ते एक असो.
चित्रपटातले गंगूबाईच्या तोंडचे सर्व संवाद खटकेबाज आहेत. अनेक प्रसंगांत गंगूबाईचे संवाद टाळ्या घेतात. संवादलेखक प्रकाश कापडिया आणि उत्कर्षिणी वशिष्ठ या दोघांना त्यांचं श्रेय द्यायला हवं.
संजय लीला भन्साळीनं गंगूबाई नावाच्या कामाठीपुऱ्यातल्या एका जबरदस्त बाईवर उभा केलेला हा चित्रपट पाहायला हवा तो आलिया भटच्या अदाकारीसाठी. वेश्याव्यवसायातील महिलांचं जगणं समजून घेण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे साठच्या दशकात मुंबई महानगरात अशी कुणी तरी एक बाई होती आणि तिनं वेश्यागृहांत पिचत पडलेल्या हजारो महिलांच्या आयुष्याला आवाज दिला हे जाणण्यासाठी!
काळाच्या उदरात गडप झालेल्या अशा अनेक लढवय्या स्त्रिया असतील. त्यांचं चारित्र्य, कर्तृत्व, पेशा, वकूब याविषयी ‘जजमेंटल’ न होता, अगदी तटस्थपणे, पण संवेदनशीलतेनं त्यांचा संघर्ष समजून घेणं ही अंतिमत: आपल्या माणूसपणाची वरची यत्ता ठरते. संजय लीला भन्साळीला धन्यवाद द्यायचे ते अशा एका महिलेचं जगणं त्यानं आपल्यासमोर आणलं म्हणून! या चित्रपटात एक प्रसंग आहे. अफसान गंगूबाईला साड्या निवडायला सांगतो. सर्व साड्या पांढऱ्याच असतात. तेव्हा यात काय निवडणार, असा प्रश्न तो गंगूबाईला करतो. तेव्हा ती शुभ्र रंगाचे शंभर प्रकार सांगून हा निवडू की तो, तो निवडू की आणखी तो... असं विचारते. तेव्हा अफसान म्हणतो, हंसवाला सफेद चुनो!
गंगूबाईसारख्या बाईच्या जगण्यातलं सगळं सार यात आलं आहे!


---

13 comments:

  1. अप्रतिम परीक्षण. नेहमीप्रमाणेच

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर परिक्षण....ग्रेट ! अभिनंदन !!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. कृपया आपले नाव लिहा...

      Delete
  3. अरे वा!नेहमीप्रमाणे दर्जेदार परीक्षण! नक्की पाहू आता हा चित्रपट.

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर लेख 👌👍🥳

    ReplyDelete
  5. मस्तच लिहिलंय सर.

    ReplyDelete
  6. शीर्षक आणि शेवट ... लाजवाब
    चित्रपट पाहायची उत्कंठा वाढवणारं आणि तो का पाहावा यांची दृष्टी देणारे परीक्षण...
    - जयश्री काटीकर

    ReplyDelete
  7. खूप मुद्देसूद व छान परीक्षण👌👌👍💐 ...तुमचे परीक्षण वाचल्याने पुढील २-३ दिवसातच चित्रपट पहायचा ठरवलं आहे ..आलिया भट तर मला प्रत्येक सिनेमात आवडते ..हा रोल तर नक्कीच आव्हानात्मकच आहे ..खूप धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. मन:पूर्वक धन्यवाद वीणाजी...

      Delete
    2. थोड्यावेळापूर्वीच हा चित्रपट पाहून आले...तुमचं परीक्षण एकदमच Perfect.. तंतोतंत पटलं👌👍

      Delete