9 Dec 2025

पाँडिचेरी डायरी - भाग ३

असीम शांततेकडे...
------------------------


ता. १ डिसेंबर २०२५. मु. पाँडिचेरी.

आजही सकाळपासून पाऊस होता. मग कालच्याप्रमाणेच आजही छत्र्या घेऊन चहा घेऊन आलो. आज आम्हाला ‘ऑरोव्हिल’ इथं जायचं होतं. हे पाँडिचेरीपासून साधारण १०-१२ किलोमीटरवर आणि तमिळनाडूत आहे. योगी अरविंदांच्या सहकारी, शिष्या मदर (मीरा अल्फासा) यांनी या ‘ऑरोव्हिल’ परिसराची स्थापना केली आहे. श्री अरविंदांच्या कर्मयोगातून ‘आतील शांततेकडे’ नेणाऱ्या या परिसराला भेट देण्याची अतीव उत्सुकता होती. इथल्या ‘मातृमंदिर’ या डोमविषयी आणि तिथल्या ध्यानधारणेविषयीही खूप ऐकलं होतं. तिथं प्रवेश करण्यासाठी आधी मेल पाठवून नंबर लावावा लागतो असंही समजलं होतं. त्यानुसार मी पुण्यात असतानाच मेलवरून बुकिंग करून, आजची वेळ घेतली होती. त्या मेलमध्ये सर्वांनी सकाळी ८.१५ वाजता मुख्य गेटवर जमावं, असं म्हटलं होतं. मात्र, आम्हाला आवरून बाहेर पडायला आणि कॅब मिळायला वेळ लागला. पाँडिचेरी ते तमिळनाडू आणि तिथून परत पाँडिचेरी असा दोन राज्यांचा प्रवास असल्यानं इकडचे कॅबवाले तिकडं येत नाहीत आणि तिकडच्या रिक्षा इकडं येत नाहीत, हे नंतर समजलं. आम्हाला भेटलेला कॅबवाला मी तिथंच तुमच्यासाठी थांबू का, असं का विचारत होता तेही नंतर कळलं. असो.
आम्ही साधारण सव्वानऊच्या सुमारास त्या गेटवर पोचलो. पार्किंगला कार आत आणली तर दीडशे रुपये वेगळे चार्जेस द्यावे लागले असते, म्हणून आम्ही आमची कॅब बाहेरच सोडली आणि आत चालत गेलो. आता पाऊस पूर्ण थांबला होता आणि त्या परिसरातलं वातावरण प्रसन्न होतं. आम्ही त्या पायवाटेवरून आत निघालो. एके ठिकाणी तळ्यासारखं बरंच पाणी साठलं होतं. त्यावर छोटा पूल होता. हे काही एका दिवसाच्या पावसानं साठलेलं पाणी वाटत नव्हतं. मातृमंदिर व तो परिसर याचं रूपांतर एका बेटात करण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण परिसरात गोलाकार चर खणून तलावनिर्मिती करण्यात येत आहे, असं नंतर समजलं. आम्ही आतील माहिती केंद्रावर पोचल्यावर एका  मिनीबसमध्ये काही लोक चढत असल्याचं दिसलं. तिथल्या माणसानं माझं बुकिंग आहे, म्हटल्यावर तातडीनं त्या बसकडं एक मॅडम उभ्या होत्या, त्यांच्याकडं पाठवलं. त्यांनी आणखी एका प्रौढ गोऱ्या (परदेशी) इसमाकडं पाठवलं. तो तिथला मुख्य व्यवस्थापक असावा. त्यानं माझ्या मेलमधला क्रमांक पाहून बॅच कन्फर्म केली. ‘तुला उशीर झाला आहे आणि सुरुवातीचा व्हिडिओ बघणं आवश्यक असतं, तेही तुझं बुडालं आहे,’ असं तो म्हणाला. पण तो दयाळू होता. त्यानं मला नंतर व्हिडिओ बघण्याच्या अटीवर बसमध्ये जाऊ दिलं. तुझ्यासोबत कुणी आहे का, असंही त्यानं विचारून घेतलं. मग धनश्री व नीललाही त्यानं माझ्यासोबत येण्याची परवानगी दिली. (त्यांचं वेगळं बुकिंग करणं गरजेचं होतं. ते आम्ही केलं नव्हतं. किंबहुना प्रयत्न करूनही फक्त मलाच कन्फर्मेशन मिळालं होतं. मात्र, त्या दिवशी पावसामुळं म्हणा, किंवा अन्य काही कारणानं म्हणा, लोक कमी आले असावेत, म्हणून आम्हा तिघांनाही त्यानं बसमध्ये बसू दिलं.) असो. 
त्या बसमधून साधारण दीड-दोन किलोमीटर आत कच्च्या रस्त्यानं गेल्यावर ‘मातृमंदिर’च्या त्या प्रवेशद्वारापाशी आम्ही पोचलो. पाऊस पडून गेला असल्यानं सगळीकडं चिखल झाला होता. तिथं सगळे जमा झाल्यानंतर आमच्या आधीची बॅच आत जायची वाट पाहत थांबलो. त्यानंतर आमचा नंबर लागला. आमच्या ग्रुपमध्ये ३२-३३ लोक होते. त्यात अर्थात काही मराठी लोकही होते. इथं आता आमच्या बॅग आणि मोबाइल स्विच ऑफ करून जमा करायचे होते. ते जमा केल्यावर आम्ही त्या परिसराच्या मुख्य दारातून आत प्रवेश केला. तिथंच एका झाडाखाली ललित नावाच्या व्यवस्थापकानं आम्हाला पुन्हा सगळी माहिती दिली. सगळे नियम समजावून सांगितले. आवाज होणारी कुठलीही गोष्ट (पैंजण इ.) इथंच काढून ठेवा असं सांगितलं. स्मार्ट वॉचमध्ये कॅमेरा असेल तर तोही काढून ठेवा असं बजावण्यात आलं. त्यानंतर ललितभाऊंनी आम्हाला इथल्या स्थानिक स्वयंसेवकाच्या हवाली केलं. तो आम्हाला घेऊन चालत निघाला. समोरच ‘मातृमंदिरा’चा तो भव्य डोम दिसत होता. ही वास्तुरचना अतिशय आगळीवेगळी आहे. बाहेरून सोनेरी रंग असलेली आणि कमळाच्या पाकळ्यांचा आकार असलेली ती वास्तू एकदम वेगळीच भासत होती. त्या वास्तूशेजारीच एक मोठं वडाचं झाड आहे. ते झाड म्हणजे या सर्व परिसराचा केंद्रबिंदू आहे, असं त्या स्वयंसेवकानं आम्हाला सांगितलं. त्यानंतर त्यानं आम्हाला तिथल्या ॲम्फी थिएटरमध्ये नेलं. या परिसराचा विकास सुरू झाला, तेव्हा पहिल्यांदा इथं विविध देशांतील माती आणून मोठा सोहळा करण्यात आला होता. तो सगळा परिसरच अतीव शांततेनं भारलेला होता. आमच्या ग्रुपमधलेही सगळे लोक अगदी शांतपणे हे सगळं बघत होते. त्या वातावरणाचा परिणाम म्हणून आपोआपच मौन बाळगलं जात होतं किंवा अगदी हळू आवाजात बोललं जात होतं. आता आम्हाला हळूहळू त्या मुख्य डोमकडं नेण्यात आलं. त्या डोममध्ये शिरल्यावर त्याची भव्यता आणखीनच जाणवली. किमान पाच ते सहा मजल्यांएवढा तो उंच असावा. आम्ही शांततेत, शिस्तीत एक रांग करून आत शिरलो. कमळाच्या पाकळ्यांसारखी सभोवती १२ दालने होती, त्यांच्यामधून आत रस्ता होता. तिथं चपला, बूट काढून ठेवायचे होते. आत सगळीकडं कारपेट टाकलेलं होतं. त्या डोमच्या मधोमध खुली जागा होती. तिथं कमळाच्या आकाराच्या जागेत पाणी खळाळत आत जात होतं. तिथं आम्ही गोल करून बसलो. दहा मिनिटं शांत बसल्यावर बाकी कुठलेही आवाज येणं बंद झालं. केवळ त्या पाण्याचा खळाळता आवाज! थोड्या वेळानं तिथल्या स्वयंसेवक महिलांनी हलकेच टाळी वाजवून आम्हाला उठवलं. नंतर आता मुख्य डोममध्ये जायचं होतं. आत गेल्यावर सर्वांना पांढरे मोजे घालायला दिले. पँट असेल तर तीही मोज्यांच्या आत खोचायची होती. तिथून आम्ही पहिल्या फ्लायरनं वर आलो. तिथून वर जायला वर्तुळाकार, सर्पिलाकार रॅम्प होता. इथं त्यांच्यातली एक स्वयंसेविका आम्हाला घेऊन वर निघाली. ती एका विशिष्ट पद्धतीनं पावलं टाकत हळूहळू वर निघाली होती. आम्ही तिच्या मागे चालत होतो. आमच्यातल्या एका प्रौढ माणसाला काय घाई झाली होती, कुणास ठाऊक. तो तिला ओलांडून भरभर वर गेला. तिथं आडवी दोरी लावून रस्ता बंद केला होता. मग ही स्वयंसेविका अतीव हळू गतीनं तिथं पोचली. शेवटच्या टप्प्यात माझ्या मागचा माणूस मला हळूच पुढं सटकण्यासाठी खुणावत असल्यानं मीही तिला ओलांडून पुढं गेलो. मात्र, नंतर वाटलं, की आपलं हे चुकलं. कारण त्या बाईनं असा काही लूक दिला, की मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. कदाचित ध्यान मंदिरात जाण्याआधी ही आपल्या संयमाची परीक्षा असावी. मी त्यात नापास झालो होतो. मला त्या मागच्या माणसाचा भयंकर राग आला. पण आता चूक होऊन गेली होती.
वर एका गोऱ्या प्रौढानं ती दोरी बाजूला केली आणि मग आम्ही आत शिरलो. आत त्या विशाल डोमच्या मधोमध एक क्रिस्टल बॉल होता. त्यातून प्रकाश येत होता. अगदी काही सिनेमांत दाखवतात तसलं गूढ वातावरण होतं. तिथं मोठमोठे खांब होते. त्यांमधून पांढरीशुभ्र चादर व उशीच्या आकाराचं जाजम अंथरलं होतं. त्यावर एकेकानं बसून घेतलं. इथं साधारण पंधरा मिनिटं ध्यानधारणा करता येणार होती. मी डोळे मिटले. एका विलक्षण, असीम, अलौकिक शांततेचा अनुभव मी घेत होतो. किती काळ गेला, कळलं नाही. एक माणूस मोठ्यानं खोकला. सर्वांचीच तंद्री भंगली. खरं तर या सूचना आधी दिल्या होत्या. मात्र, आपल्याकडं ते नियम मोडणारे, किंवा त्यांना गांभीर्यानं न घेणारे लोक असतातच. तो माणूस दुसऱ्यांदा खोकल्यावर त्या गोऱ्यानं त्याला हळूच दंडाला धरून बाहेर नेलं. आम्ही पुन्हा एकदा ध्यानावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. आता दुसरं कुणी तरी खोकलं. मग त्या गोऱ्यानं त्या व्यक्तीलाही बाहेर नेलं. त्यानंतर मात्र बरीच शांतता लाभली. आपल्या आयुष्यात आपण किती ‘नॉइज’ला, गोंगाटाला तोंड देतो हे कळून आलं. हा सगळा खटाटोप ‘इनर पीस’साठी, अर्थात आतल्या शांततेसाठी सुरू होता. बाहेर कितीही शांतता असली, तरी मनात खळबळ सुरू असेल तर आपलं चित्त एकाग्र होऊ शकत नाही. त्यामुळं मन शांत ठेवणं फार गरजेचं असतं. ते आपल्या एकूण आरोग्यासाठीही महत्त्वाचं असतं. हे सगळं आपल्याला कळत असतं. पण वळत नसतं... असो. त्या शांततेतून बाहेर येण्यासाठी दोनदा लाइट ब्लिंक करण्यात आले. मग आम्ही शांतपणे डोळे उघडले. इशाऱ्यानेच आम्हाला बाहेर जायला सांगण्यात आलं. आम्ही अजिबात आवाज न करता, बाहेर आलो. खालच्या मजल्यावर आलो. ते मोजे काढून ठेवले. तिथून खाली उतरून एकदम बाहेर आलो. तो परिसरही तसा शांतच होता. केवळ पक्ष्यांचे आवाज येत होते. आता आम्ही त्या वडाच्या प्रचंड झाडाखाली टाकलेल्या बाकांखाली जाऊन बसलो. सहज मोजलं तर साधारण २३ खोडं जमिनीत उभी होती, एवढं ते झाड भव्य होतं. खरं तर तिथून निघायला नको वाटत होतं. आज पावसानं कृपा केली होती. थोडा वेळ तर चक्क ऊनही पडलं होतं. आमचं नशीब जोरावर होतं, म्हणून इथं येता आलं. एरवी खूप पाऊस असला, की हे ‘मातृमंदिर’ बंद असतं, असं समजलं. 
आता हळूहळू बाहेर पडायची वेळ झाली होती. सगळे त्या एंट्री गेटपाशी जमलो. आपापल्या बॅगा आणि मोबाइल ताब्यात घेतले. साधारण तास-दीड तास आम्ही मोबाइलपासून दूर होतो. मोबाइल सुरू केल्यावर कळलं, की या काळात फार काही घडलेलं नाही. आपल्यावाचून कुणाचंही काहीही अडलेलं नाही. आपण या काळात जे मिळवलं, ते किती तरी अधिक मौल्यवान होतं! असो.
इथून बसनं पुन्हा मुख्य दारापाशी आलो. इथं कॅफे, कँटीन असं सगळं होतं. आम्ही सकाळी नाश्ता न करताच निघालो होतो. आता कडकडून भूक लागली होती. मग तिथं व्यवस्थित खाल्लं. नंतर ते माहिती केंद्र फिरून पाहिलं. तो सकाळी चुकलेला व्हिडिओही पाहिला. त्यात या ‘मातृमंदिरा’ची संकल्पना ते आजपर्यंतचा प्रवास दाखवला होता. एवढं सगळं झाल्यावर आम्ही परत पाँडिचेरीला जायला निघालो. कॅब बुक केली तर त्यानं ॲपवर दाखवलेल्या पैशांपेक्षा दुप्पट पैसे मागितले. आम्ही येताना ३०० रुपयांत आलो होतो. हा आता ६०० रुपये मागत होता. कारण तेच - दुसऱ्या राज्यात जायचंय. तिथून परत यायला काही मिळत नाही वगैरे. रिक्षावाल्यांनीही तेच ऐकवलं. अखेर एकाला ४५० रुपयांत पटवलं. त्यानं निघाल्याबरोबर काही मिनिटांत उजव्या बाजूला एका कच्च्या वाटणाऱ्या रस्त्यावर गाडी घातली. जरा टरकायला झालं. पण मी लोकेशन ऑन ठेवून मॅपवर रस्ता पाहत होतो. अनेकदा हे गावाकडचे रिक्षावाले शॉर्टकट मारत इंधन वाचवत जातात. हाही तसाच होता. कुठल्या कुठल्या इंडस्ट्रियल एरियातून, गल्ली-बोळांतून (बहुतेक पोलिसांना चुकवत) त्यानं रिक्षा पाँडिचेरीत आणली. आम्हाला हॉटेलवर पोचायला दीड वाजला होता. नंतर आम्ही हॉटेलवर आरामच केला. 

आता आजच्या ‘टूर गाइड’मध्ये एका पॅराडाइज बीच नावाच्या ठिकाणाला भेट दर्शविली होती. तिथं वॉटर स्पोर्ट वगैरे होते. त्या आयलंडवर बोटीनं प्रवास करून जायचं होतं. वादळी वातावरणात तिकडं जायला नको वाटलं. मग तो विचारच रद्द करून टाकला. आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा प्रोमोनेडला चालत गेलो. त्याआधी भारती पार्कमध्ये जाऊ, असं ठरवलं. ते पार्क सुंदर आहेच. तिथं मधोमध ते ‘अयी मेमोरियल’ दिसलं. तिथं माहिती फक्त तमिळ व फ्रेंचमधूनच होती. मग ‘गुगल’वर माहिती वाचली. ‘अयी’ची दंतकथा समजली. ही त्या काळातली एक नर्तकी होती. तिचा एक मोठा महाल होता. राजाचे लोक की खुद्द राजाच तिथून चालला असताना, त्यांना हे कुठलं तरी भव्य मंदिर वाटलं. त्यांनी आत जाऊन नमस्कार केला आणि मग त्यांना कळलं, की हे नर्तकीचं घर आहे. या अपमानानं क्रुद्ध झालेल्या राजानं तो महाल जमीनदोस्त करण्याची आज्ञा सोडली. त्यावर ‘अयी’नं राजाकडं धाव घेतली आणि सांगितलं, की इथं मी एक विहीर खोदून तिचं पाणी सर्वांना (स्पृश्यास्पृश्यता न बाळगता) देईन. त्या गोष्टीला राजानं परवानगी दिली. त्यानंतर ‘अयी’ ही पाणी देणारी स्त्री म्हणून ओळखली जाऊ लागली आणि नंतर तर तिला देवस्वरूप आलं. दुसरी दंतकथा अशी, की कुणी मौलवी वा पीर तिच्या घरावरून चालले होते. त्यांना तहान लागली म्हणून त्यांनी ‘अयी’कडं पाणी मागितलं. मात्र, त्या गावातील ब्राह्मण पुजाऱ्यांनी तिला मौलवीला पाणी देण्यास मनाई केली. त्यानंतर ‘अयी’नं स्वत:चा महाल उद्ध्वस्त करून सर्वांना पाणी देता येईल, अशी विहीर खोदली. वगैरे वगैरे. (मला स्वत:ला पहिली दंतकथा जास्त विश्वासार्ह वाटली. तमिळनाडूतल्या पेरियार प्रणीत ब्राह्मणेतर चळवळीचा इतिहास पाहिला, तर त्या काळात ही दुसरी ‘राजकीय’ दंतकथा जन्माला आली असण्याची शक्यता अधिक!)

‘भारती पार्क’च्या मधोमध जे स्मारक आहे, ते तिसऱ्या की चौथ्या नेपोलियननं बांधलं आहे. ते ‘अयी’च्याच स्मरणार्थ आहे. शिवाय त्या पार्कमध्ये एक कारंजं होतं. तिथंही ‘अयी’चा पाणी देतानाचा पुतळा आहे. तिच्या घागरीतून सतत पाणी पडत असतं. या पार्कमध्ये अतिशय शांत वाटलं. एकूणच पुण्यााबाहेर कुठंही गेलं, की ‘कमी गर्दी’ हे एवढं जाणवतं ना! आपल्याकडं केवढी प्रचंड गर्दी झाली आहे, हे सतत डाचत राहतं. असो.
पार्कमधून पुन्हा प्रोमोनेडवर गेलो. कालच्या तुलनेत आज समुद्र शांत होता आणि पाऊसही अजिबात नव्हता. सर्व दिवे लागले होते. वातावरण फारच सुंदर होतं. समोरच्या जुन्या कस्टम हाऊसवरचा तिरंगा सहा वाजता खाली उतरवण्याचा सोहळा झाला. बिगुल वाजलं, तेव्हा सगळे तिकडं धावले. अगदी समारंभपूर्वक तो ध्वज खाली घेण्यात आला. गांधीजींचा पुतळा व तो परिसर आता छान झगमगत होता. पर्यटकांची थोडी गर्दी होती. तिथंच अगदी समुद्रावर ‘ल कॅफे’ नावाचं रेस्टॉरंट आहे. आम्हाला भूक लागली होतीच. मग तिथं जाऊन, समुद्राची गाज ऐकत पिझ्झा खाल्ला आणि नंतर मस्त लेमोनेड प्यायलं. इथंही छान लायटिंग होतं. चांगले फोटो काढता आले. सात-साडेसातपर्यंत तिथंच टाइमपास केला. मग चालत निघालो. इथं समोरच एक तुळशीबागेसारखं मार्केट होतं. तिथं टाइमपास केला. थोडी खरेदी केली. आज ‘सुरगुरू’त जायचं नव्हतं. कार्तिक नावाचं एक रेस्टॉरंट सतत ‘सर्च’मध्ये येत होतं. तिथं जाऊन बघू, असं ठरवलं. सुदैवानं ते चांगलं, मोठं रेस्टॉरंट होतं. अनेक लोक तिथं जेवत होते. इथंही ऑर्डर घ्यायला महिलाच होत्या. मग डोसा, राइस असं सगळं रीतसर जेवलो. निवांत चालत चालत हॉटेलवर गेलो. आज एवढ्या असीम शांततेचा अनुभव घेतला होता, की त्यामुळं झोपही पटकन व शांत लागली.


---

पाँडिचेरी/चेन्नई/पुणे. ता. २ डिसेंबर २०२५. 

आज परतीचा दिवस. सकाळी नऊ वाजताच टॅक्सी बोलावली होती, जाताना जो टॅक्सीवाला आला होता, तोच आता येणार होता. तोही थेट चेन्नईहून. तो पहाटे चार वाजता चेन्नईहून निघून आमच्या हॉटेलला नऊ वाजता येऊन थांबला होता. आम्ही सकाळी जवळच्या ‘सुरगुरू’त जाऊन (हे नूतनीकरणासाठी बंद होतं. कालच सुरू झाल्याचं संध्याकाळी समजलं होतं...) नाश्ता केला. नंतर चेक-आउट केलं. बरोबर साडेनऊला आमचा प्रवास चेन्नईच्या दिशेनं सुरू झाला. जयशंकरला झोप येत होती, हे दिसत होतं. मी त्याला गाडी थांबवून चहा घ्यायला सांगितलं. मग तो थांबला. आता आम्ही ‘कचरा रोड’नं न येता, थुथीकोडी (तुतीकोरीन)-चेन्नई हायवेनं टिंडिवनम, चेंगलपट्टू मार्गे परत निघालो होतो. जयशंकरला घरी जायची घाई झाली होती. त्यामुळं त्यानं सुसाट गाडी सोडली. हा हायवेही उत्तम होता. त्यामुळं त्यानं आम्हाला बारा वाजता चेन्नई एअरपोर्टला सोडलंही. आमचं फ्लाइट ३.४० ला होतं. मग त्याला म्हटलं, इथं बाहेर जो फूड मॉल आहे तिथं सोड. मग तिथं जाऊन खाणं-पिणं असा टाइमपास करत बसलो. बरोबर दीड वाजता त्या बॅटरी-ऑपरेटेड गाडीनं टर्मिनल - १ ला आलो. इथं एस्कलेटर, लिफ्ट असं करत सगळं सामान घेऊन दुसऱ्या मजल्यावर आलो. सिक्युरिटी वगैरे पार पाडून गेटवर येऊन बसलो तरी दोनच वाजले होते. मग पुन्हा टाइमपास. आमचं ‘इंडिगो’चं फ्लाइट थोडं उशिरानं आलं. बराच वेळ ‘सिक्युरिटी’ एवढंच दाखवत होते. वेळही ३.४० ऐवजी ४.०० अशी केली होती. अखेर सगळं मार्गी लागलं. बोर्डिंगही साडेतीन-पावणेचारला सुरू झालं. आमचं विमान साधारण तासभर उशिरा, म्हणजे पावणेपाचला उडालं. ते बरोबर सव्वासहा वाजता पुण्यात लँड झालं. (दुसऱ्या दिवशीपासून ‘इंडिगो’चा जो महागोंधळ सुरू झाला, ते बघितल्यावर मंगळवारी तसे वेळेत पुण्यात पोचणारे आम्ही फारच नशीबवान ठरलो, म्हणायचे.) कॅब करून आठ वाजेपर्यंत घरी पोचलो. पुण्यात लँड होताना हवेतला प्रदूषणाचा जाडसर थर अगदी जाणवला. खाली उतरल्यावर घरी येईपर्यंत रस्त्यावरचा कोलाहल, गोंधळ ऐकून आपण किती शांततेत चार दिवस राहत होतो, हे प्रकर्षानं जाणवलं. असो.
एकूण चार दिवसांची ही छोटेखानी ट्रिप फारच मस्त झाली. ‘मातृमंदिर’मधील ध्यानधारणेचे क्षण हे या ट्रिपमधले सर्वोच्च आनंददायी क्षण म्हणता येतील. 
गेल्या तीन-चार वर्षांत आमच्या दक्षिणेकडंच तीन-चार ट्रिप झाल्या. आता उत्तरायण सुरू करायला हवं... बघू या, कधी योग येतो ते!


(समाप्त)


दुबई ट्रिपविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------------------------





8 Dec 2025

पाँडिचेरी डायरी - भाग २

कर्मयोग, शुभ्रग्राम अन् सागर
------------------------------------


३० नोव्हेंबर २०२५. मु. पाँडिचेरी.


रविवारी सकाळी जाग आली, तीच पावसाच्या आवाजाने. अंदाज खरा ठरला होता. ते डिटवाह चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनाऱ्यावर धडकलं होतं. परिणामस्वरूप तमिळनाडूच्या सर्व किनारपट्टीवर पाऊस सुरू झाला होता. आजचा दिवस, किंबहुना दोनच दिवसांची ही ट्रिपच पाण्यात जातेय की काय, अशी शंका आली. मात्र, आश्चर्यकारकपणे, थोड्या वेळात पाऊस थांबला. आम्ही जे हॉटेल घेतलं होतं, तिथं ब्रेकफास्टची किंवा चहापाण्याची काही सोय नव्हती. हॉटेल अगदी गावात असल्यानं बुकिंग करताना असं वाटलं, की आजूबाजूला सगळं सहज मिळेल. मात्र, त्या वेळी पावसाची शक्यताच गृहीत धरली नव्हती. नशिबानं आमच्याकडं छत्र्या होत्या. मग मी आणि धनश्री खाली उतरून त्या गल्लीत कुठलं हॉटेल किंवा चहाची टपरी वगैरे दिसतेय का ते शोधायला बाहेर पडलो. सुदैवानं आमचा रस्ता सोडून पुढं काटकोनात वळल्यावळल्या त्या रस्त्यावर आम्हाला एक सोडून दोन हॉटेलं सुरू असलेली दिसली. ती आपल्याकडच्या ‘अमृततुल्य’सारखीच होती. जरा आडवी व मोठी होती. शिवाय एवढ्या सकाळी तिथं इडल्या आणि मेदूवडेही ठेवलेले दिसले. त्या रस्त्याच्या पलीकडंच तिथली भाजी मंडई किंवा तत्सम मार्केट होतं. तिथं काम करणारी कामगार मंडळी जास्त संख्येनं सकाळी सकाळी तिथं चहा किंवा कॉफी प्यायला जमली होती. त्यात बऱ्याच बायकाही होत्या. धनश्रीनं व मी तिथं अनुक्रमे कॉफी आणि चहा घेतला. नीलसाठी पार्सल चहाही घेतला. चहा घेतल्यानं चांगलीच तरतरी आली होती. पाऊस थांबला तरी अगदी बारीक भुरभुर येत होती.
एक चांगलं होतं, की आमच्या हॉटेलपासून व्हाइट टाउनमधील सगळी ठिकाणं अगदी चालत जाण्याच्या अंतरावर होती. आम्ही आवरून नऊ वाजता बाहेर पडलो. नाश्ताही बाहेरच कुठे तरी करू, असं ठरवलं. पहिल्यांदा आम्ही अर्थातच योगी अरविंदांचा आश्रम पाहायला गेलो. तो आमच्या हॉटेलपासून अवघ्या ६०० मीटर अंतरावर होता. मग चालतच तिथं गेलो. त्या आश्रमासमोर गेल्यावर आमचा जरा भ्रमनिरासच झाला. आश्रम किंवा कुटी म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर जे चित्र येतं, तसं इथं काहीच नव्हतं. माझ्या डोक्यात, वर्धा येथील सेवाग्राम आश्रमासारखा हा आश्रम असेल, असं काही तरी होतं. प्रत्यक्षात इथं त्या इतर चार इमारतींसारखीच ही एक बैठी, तशी लहानशीच इमारत होती. तिथं समोर चपला काढून आत जायचं होतं. एका स्वयंसेवकानं मोबाइल आवर्जून बंद करायला लावले. आम्ही आत गेलो. वळून उजवीकडं गेल्यावर एका झाडाखाली योगी श्री अरविंदांची समाधी होती. आम्ही तिचं दर्शन घेतलं. तिथं काही मोजके अनुयायी बसले होते. तिथं बोलायला बंदी होती. आम्ही शांतपणे शेजारच्या इमारतीत गेलो. तिथं ग्रंथालय होतं. अरविंदांची सर्व ग्रंथसंपदा विविध भाषांत तिथं उपलब्ध होती. कर्मयोगावरचं अरविंदांचं प्रभुत्व आणि भाष्य प्रसिद्ध आहे. बहुतेक पुस्तकं तीच होती. ‘सावित्री’ हेही त्यांचं एक गाजलेलं पुस्तक तिथं होतं. नीलनं त्यांचं एक इंग्लिश, तर मी त्यांचं जीवनचरित्र असलेलं मराठीतलं छोटेखानी पुस्तक विकत घेतलं. पुढं अरविंदांच्या आणि त्यांच्या शिष्या मदर  (मीरा अल्फासा - यांनीच नंतर ‘ऑरोव्हिल’ उभारलं) यांच्या फोटोंचं दालन होतं. तिथं विक्रीही सुरू होती. आम्हाला ते फोटो घेण्यात रस नसल्यानं आम्ही बाहेर पडलो. पाँडिचेरीतलं हे एवढं महत्त्वाचं ठिकाण अशा रीतीनं केवळ २० मिनिटांत पाहून झालं होतं. आता काय बघायचं, असा आम्ही विचार करू लागलो. आम्ही निघण्यापूर्वी नीलनं ‘एआय’च्या मदतीनं एक टूर गाइड तयार केलं होतं. ते पाहिलं. त्यात इथून जवळच एक प्रसिद्ध व मोठं विनायक मंदिर आहे, ते आवर्जून पाहा, असा उल्लेख होता. ते मंदिर अगदी समोरच होतं. तिथं गेलो. तिथं बऱ्यापैकी गर्दी होती. या मंदिराचा एक हत्तीही प्रसिद्ध होता. तो मरण पावल्याचं समजलं. दाराशीच त्या हत्तीचा एक मोठा फोटो ठेवला होता. लोक तिथंही फुलं वाहत होते. मंदिराच्या समोरच्या रस्त्यावरच मंडप होता. त्या मंडपाच्या छतावर अतिशय सुंदर अशी गणेशचित्रं रेखाटली होती. आम्ही आत गेलो. आतही बऱ्यापैकी गर्दी होती. थोडी रांग होती. आम्ही त्या रांगेत उभे राहिलो. सुदैवानं त्याच वेळी आरती सुरू झाली. आतील पुजारी आरती घेऊन बाहेर आला. मंदिराच्या सर्व भिंतींवर गणपतीची विविध रूपांतील चित्रं होती. मंदिर आतूनही अतिशय भव्य व सुंदर होतं. दर्शन झाल्यावर तिथं जरा वेळ बसलो. नवीन लग्न झालेलं जोडपं सर्वांना द्रोणातून खिचडीसारखा प्रसाद देत होतं. मीही एक द्रोण आणला. तो उपम्यासारखा पदार्थ अतिशय चविष्ट होता. नाश्ता झाला नव्हता, त्यामुळं तो खाऊन बरंच वाटलं. मग बाहेर पडलो. समोरच एक छोटंसं रेस्टॉरंट सुरू झालं होतं. तिथं इडली, डोसा, मेदूवडा-सांबार असा नाश्ता केला. कॉफी घेतली, हे सांगायला नकोच. सुदैवानं आता पाऊस पूर्ण थांबला होता. आता आम्ही चालत पाँडिचेरी म्युझियमकडं निघालो. तेही अंतर अगदी जवळ, म्हणजे ६०० की ७०० मीटर दाखवत होतं. जाता जाता आम्ही त्या व्हाइट टाउनमध्येच प्रवेश केला होता. आमच्यासारखेच अनेक पर्यटक तिथं फिरत होते. त्या सुंदर इमारतींसमोर फोटो काढत होते. पाऊस नसला तरी वातावरण ढगाळ होतं. त्यामुळं छान गार वाटत होतं. आम्ही चालत पाँडिचेरी म्युझियममध्ये पोचलो. दहा रुपये तिकीट होतं. ते काढून संग्रहालय पाहिलं. तीन मजली होतं. खूप मोठं होतं असंही नाही. लगेच बघून झालं. शेवटची एक-दोन दालनं बघत असताना दिवे गेले. मग लोकांनी मोबाइलच्या बॅटरीच्या उजेडात पुढची दालनं बघितली. आम्हीही तेच केलं. तिथं एका ठिकाणी ‘अयी मेमोरियल’ची प्रतिकृती दिसली. ‘अयी’ म्हणजे तमीळ भाषेत स्त्री, बाई. त्या ‘अयी’ची एक दंतकथा आहे. ती त्या प्रतिकृतीखाली लिहिलेली होती. हे मूळ मेमोरियल चांगलं भव्य आहे. या म्युझियमसमोरच भारती पार्क नावाचं मोठं उद्यान आहे. त्या उद्यानाच्या मधोमध हे स्मारक आहे. (त्या दिवशी आम्ही त्या पार्कच्या आत गेलो नाही. दुसऱ्या दिवशी मात्र तिथं जाऊन ते मेमोरियल पाहिलं.) दिवे गेल्यामुळं म्युझियम बंदच करण्यात आलं. आमचं बघून झालंच होतं. मग बाहेर पडलो.

इथं रस्ता ओलांडला, की त्या भारती पार्कचं एक गेट आहे. त्याच्यासमोरच इथलं ‘राजनिवास’ हे राज्यपालांचं भव्य निवासस्थान आहे. तिथं फोटो काढले. मग पुन्हा त्या व्हाइट टाउनमधून हिंडलो. समुद्र अगदी समोरच होता. अनेक लोक तिकडं जायचा प्रयत्न करत होते. पण चक्रीवादळामुळं पोलिसांनी रस्ते बंद करून ठेवले होते. त्या बॅरिकेडपलीकडं तो प्रोमोनेड रस्ता आणि समुद्र सहज दिसत होता. काहो लोक बॅरिकेडमधून पलीकडं गेलेले दिसले. मग आम्हीही घुसलो. आता अगदी प्रोमोनेडच्या त्या कट्ट्यावर आम्ही उभे होतो. समोर समुद्र चांगलाच उधाणलेला दिसत होता. पोलिस होते. आत जाऊ नका, असं सतत सांगत होते. आम्हीही लांबूनच समुद्राचा आनंद घेत होतो. थोडा वेळ त्या रस्त्यानं फिरलो. आमच्या त्या ‘टूर गाइड’मध्ये इथला गांधींचा पुतळा, फ्रेंच वॉर मेमोरियल व लाइट हाऊस चुकवू नका, असं लिहिलं होतं. मग ते आम्हाला तिथं समोरच दिसलं. तिथंही पर्यटकांची गर्दी दिसली. मात्र, बसायला जागा मिळाली. निवांत बसलो. मागून समुद्राचं गार वारं येत होतं. फार बरं वाटत होतं. पाऊस नसल्यामुळं आम्हाला फिरता आलं होतं. आता दुपारचा एक वाजून गेल्यावर भूक लागली. जवळच एक व्हेज रेस्टॉरंट दाखवलं गुगलबाबानं. मग तिथं चालत गेलो. मात्र, ते नेमकं बंद होतं. मग सुरगुरू रेस्टॉरंट सापडलं. तिथं चालत गेलो. हे रेस्टॉरंट चांगलंच होतं. जेवण उत्तम झालं. तिथून बाहेर पडलो. आता मला इथले रस्ते हळूहळू समजू लागले होते. कुठून कुठं गेलो की कुठं निघतो किंवा कुठं पोचतो याचा अंदाज आला होता. मग मॅप न लावता हॉटेलवर जाऊ या, म्हणून निघालो. अजिबात न चुकता, दहा मिनिटांत हॉटेलवर पोचलो. चालून दमछाक झाल्यानं सरळ ताणून दिली. 
संध्याकाळी पुन्हा बारीक बारीक पाऊस सुरू झाला. मात्र, चहाची तल्लफ त्याहून मोठी होती. मग आवरून बाहेर पडलो. सकाळी चहा घेतला, त्याच्या समोर जे दुसरं दुकान होतं, तिथं आता चहा आणि कॉफी घेतली. पाऊस रिमझिम सुरूच होता. मग आता पावसाला न जुमानता तिथल्या मार्केटमध्ये फिरायचं आम्ही ठरवलं. मग चालत त्या मुख्य रस्त्यावर गेलो. हा अगदी आपल्या लक्ष्मी रोडसारखा रस्ता आहे. दुकानंही अगदी तशीच. बरंचसं विंडो शॉपिंग केलं. काही छोट्या वस्तू खरेदी केल्या. नीलला मला काही तरी वाढदिवसाचं गिफ्ट घ्यायचं होतं आणि ते आजच (३० नोव्हेंबर) घ्यायचं होतं, कारण वाढदिवसाचा महिना आज संपणार होता. मग एका दुकानातून मी एक शर्ट विकत घेतला. नीलनं बिल दिलं. आम्हाला रात्रीचं जेवण करूनच हॉटेलवर जायचं होतं. पण अजून वेळ होता. मग आम्ही ‘टूर गाइड’ काढलं. त्यात व्हाइट टाउनमधलं ‘अवर लेडी ऑफ एंजल्स’ हे चर्च आमचं बघायचं राहिलं आहे, असं लक्षात आलं. ते अंतर जरा जास्त, म्हणजे एक किलोमीटरपेक्षा जास्त होतं. मग रिक्षा करून जायचं ठरवलं. शंभर रुपयांत यायला एक रिक्षावाला तयार झाला. आम्ही चर्चमध्ये पोचलो. त्या परिसरात बराच अंधार होता. चर्चमध्येही अगदी मोजकीच माणसं होती. चर्च खरोखर सुंदर व भव्य होतं. आम्ही आतून ते बघत असतानाच तिथल्या लोकांनी आवराआवरी सुरू केली. खरं तर हे चर्च आठ वाजता बंद होतं, असं समजलं होतं. मात्र, ते आता सात वाजताच बंद करत होते. रिक्षावाल्याला हे माहिती असावं. याचं कारण तो थांबला होता आणि जाताना आणखी शंभर रुपये घेऊन आम्ही म्हणू तिथं सोडायला तो तयार झाला होता. आम्ही लगेच चर्चमधून बाहेर पडलो. आम्ही पुन्हा ‘सुरगुरू’लाच गेलो. हे हॉटेल आम्हाला आवडलं होतं. आता वेगळी डिश ट्राय करायची म्हणून कोच्छू पराठा ऑर्डर केला. फोडणीच्या पोळीसारखा पदार्थ समोर आला. इथं पराठाही असा कुस्करून देतात, हे त्यावरून कळलं. तो चवीला बरा होता. मी नॉर्थ इंडियन थाळी घेतली. मात्र, ती भरपूर आली. नाइलाजानं त्यातला राइस परत द्यावा लागला. ‘इथं राइस परत देणारा हा वेडा इसम कोण आहे?’ अशा नजरेनं तो वेटर माझ्याकडं पाहतोय की काय, असा मला भास झाला. खाऊन झाल्यानंतर बाहेर पडलो. आता रस्ते पाठ झाले होते. चालतच हॉटेलवर पोचलो. नीलनं तो शर्ट रीतसर माझ्या हाती दिला. लेकानं त्याच्या पैशातनं दिलेल्या या गिफ्टचं फार फार कौतुक वाटलं. मन आनंदानं भरून गेलं. दिवसभर दमल्यानं झोपही लवकर लागली.
अर्थात, उद्या एक विलक्षण अनुभव आपण घेणार आहोत, याची स्वप्नातही कल्पना आली नाही...



(क्रमश:)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-------------




7 Dec 2025

पाँडिचेरी डायरी - भाग १

अळागना पोन्नू...
-------------------


पुणे/चेन्नई/महाबलिपुरम/पाँडिचेरी, २९ नोव्हेंबर २०२५.

गेल्या वर्षी १४ नोव्हेंबरला पन्नाशीत पदार्पण करताना आपण जगातल्या सर्वांत उंच इमारतीवर - 'बुर्ज खलिफा'वर - असायला हवं असं मला वाटत होतं. अगदी त्या दिवशी नाही, पण गेल्या डिसेंबरमध्येच दुबईला जाऊन ते स्वप्न पूर्ण करता आलं. आता पन्नाशी पूर्ण करताना आपण जमीन व समुद्र या दोन पंचमहाभूतांच्या सान्निध्यात असायला हवं, असं मनात आलं. या दोन्ही गोष्टी एकत्र अनुभण्यासाठी अंदमानसारखी दुसरी जागा नाही. त्यामुळं पन्नाशी पूर्ण करताना अंदमानला जाऊ, असं ठरवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या काळकोठडीचं दर्शन घेण्याची आस होतीच. मात्र, सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. काही कारणानं अंदमानला जाणं रद्द झालं. मात्र, निदान निम्म्या वाटेत तरी जाऊ, असं मनात आलं. अनेक दिवसांपासून 'बकेट लिस्ट'मध्ये असलेल्या पाँडिचेरीचं नाव अचानक वर आलं. (पाँडिचेरीचं आताचं अधिकृत नाव पुदुच्चेरी. मात्र, या लेखनात सगळीकडं पाँडिचेरी हाच अधिक रूढ असलेला उल्लेख केला आहे.) त्यामुळं तिथंच जायचं निश्चित केलं. पाँडिचेरी ही एके काळी भारतातील फ्रेंचांची महत्त्वाची वसाहत होती आणि तिथं योगी अरविंदांचा आश्रम आहे, या दोन गोष्टींपलीकडं मला पाँडिचेरीची माहिती पत्रकारितेत येईपर्यंत नव्हती. पाँडिचेरीच्या जमिनीला पाय लागण्याचं भाग्य मात्र तब्बल २४ वर्षांपूर्वी, २००१ मध्ये माझ्या वाट्याला आलं होतं. तेव्हा मी 'सकाळ'तर्फे तमिळनाडूत विधानसभा निवडणूक कव्हर करायला गेलो होतो. तेव्हा चेन्नईवरून कडलूरला बसनं जाताना पाँडिचेरीला आमची बस काही वेळ थांबली होती. मला आमची बस पाँडिचेरीमार्गे जाणार आहे, हेच माहिती नव्हतं. त्यामुळं पाँडिचेरी आल्यावर मी अतिशय उत्सुकतेनं जेवढं दिसेल तेवढं ते टुमदार गाव डोळे भरून पाहिलं होतं. तिथल्या बसस्टँडवर मी डोसाही खाल्ला होता. मात्र, तिथं थांबून ते सगळं गाव नीट पाहणं तेव्हा शक्य नव्हतं आणि नंतर तब्बल दोन तपं हा योग काही आला नाही. तो आला गेल्या महिन्यात. पन्नाशीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन खरोखर महिनाभर चाललं होतं. त्याची सांगता करण्यासाठी ही ट्रिप म्हणजे एकदम योग्य पर्याय होता. मी दोन-तीन महिन्यांपूर्वीच २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर अशी चार दिवसांची ट्रिप आखून टाकली. आमचे नेहमीचे भिडू या वेळी नव्हते. आम्ही तिघंच जाणार होतो. पुणे ते चेन्नई फ्लाइट आणि नंतर कॅब करून पाँडिचेरीला जाऊ, असं ठरवलं. कुठल्याही प्रवासी कंपनीची किंवा एजंटची मदत न घेता, सगळी बुकिंग वगैरे आमची आम्हीच केली. ट्रिपला जाण्याआधी एका ठिकाणी बोलताना असा विषय निघाला, की नोव्हेंबरअखेरीला गेल्या वर्षी चेन्नईत मोठं चक्रीवादळ आलं होतं आणि त्या लोकांचा सगळा प्लॅन त्यात वाहून गेला होता. मी या संकटाची कल्पनाच केली नव्हती. (पुढं ते चक्रीवादळ आलंच.) त्यामुळं मी रोज पाँडिचेरीचं हवामान पाहू लागलो. तिथं जवळपास रोजच पाऊस पडण्याचा अंदाज येत होता. मग आम्ही आमच्या सामानात छत्र्या घेतल्या. आमचं जातानाचं विमान पुण्याहून दहा वाजता होतं. ते बारा वाजता चेन्नईला पोचणार होतं. आम्ही सकाळी साडेसात वाजता घरातून निघालो. बरोबर साडेआठ वाजता पुणे एअरपोर्टला पोचलो. 'इंडिगो'चं विमान वेळेत निघालं (हो!) आणि वेळेच्या आधी म्हणजे ११.३० वाजताच चेन्नईत लँड झालं. (एकाच आठवड्याने या एअरलाइन्सचा काय महागोंधळ होणार आहे, याची तेव्हा अर्थातच कल्पना नव्हती.) जाताना हवा अतिशय स्वच्छ होती. नव्या मोबाइलचा कॅमेरा चांगला होता. म्हणून विमानातून खंबाटकी घाट, कऱ्हाडचा कृष्णा-कोयना संगम असे फोटो टिपता आले. जसजसं चेन्नई जवळ येऊ लागलं, तसतसं निरभ्र आकाश जाऊन ढगांची दाटी दिसून आली. त्या ढगाळ वातावरणातच आम्ही चेन्नईत उतरलो. तोवर आम्हाला डिटवाह नावाच्या दिवट्या चक्रीवादळाची खबर नव्हती. चेन्नईत उतरल्यावर मला बातम्यांत त्या वादळाविषयी समजलं. तेव्हा ते श्रीलंकेच्याही खाली होतं आणि दुसऱ्या दिवशी ते श्रीलंकेत येऊन धडकणार होतं. अर्थात इथं त्याचा परिणाम दिसायला सुरुवात झाली होती. आम्ही उतरलो तेव्हा चेन्नईत हवा स्वच्छ होती आणि पाऊसही नव्हता. अगदी थंडी नव्हती, पण उकाडा अजिबात नव्हता. आम्ही बाहेर पडल्यावर तातडीनं एक टॅक्सी ठरवली. बरंच अंतर चालत जाऊन एअरोमॉलमधून ती टॅक्सी पकडावी लागली. मात्र, बारा वाजता आमचा प्रवास सुरूही झाला होता.

आम्हाला आधी महाबलिपुरमला जायचं होतं. चेन्नईहून पाँडीला जाताना महाबलिपुरम लागतं. इथली ती प्रसिद्ध मंदिरं, शिल्पकारांची कार्यशाळा आणि ती प्रसिद्ध लोण्याचा गोळा असलेली शिळा हे सगळं बघायचं होतं. आम्ही दोन वाजता तिथं पोचलो. आधी पोटपूजा करायची होती. अड्यार आनंदा भवन या तिथल्या प्रसिद्ध साखळी हॉटेलांपैकी एक असलेल्या हॉटेलमध्ये आमच्या जयशंकरनं आम्हाला नेलं. तिथं सेल्फ सर्व्हिस आणि टेबल सर्व्हिस असे दोन विभाग होते. मात्र, गर्दी बरीच होती. तेवढ्यात एक वेटर आला आणि हिंदीत आम्हाला म्हणाला, की तुम्ही इथं बसा. मी तुमची ऑर्डर जागेवर आणून देतो. मग मी सांबार राइस मागवला. धनश्री व नीलनं पावभाजी घेतली. तो वेटर बिहारचा होता. आमचे चेहरे बघूनच त्याला आम्ही पर्यटक असल्याचं समजलं आणि त्यानं आम्हाला अशी मदत केली होती. आमचा जरासा गबाळा आणि बराचसा गबदुल असा चक्रधर जयशंकर हाही तिथं जेवायला बसला. त्यानं आमच्याकडं बोट दाखवून 'हे माझे पैसे देतील,' असं वेटरला सांगून मिल्स मागवलं. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. जेवण झाल्यावर बरं वाटलं. नंतर मस्त कॉफी पण घेतली. बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता. मात्र, आता आम्हाला महाबलिपुरम बघायचंच होतं. जयशंकर आम्हाला मुख्य शोअर टेम्पलच्या दारात घेऊन गेला. तिथं आम्ही दरडोई ४० रुपयांची तिकिटं घेऊन आत गेलो. थोडं आत गेल्यावर ते मंदिर होतं. तिथं इंग्लिशमध्ये माहिती देणारे कुठलेही फलक नव्हते. माझा सहकारी अभिजित थिटेनं मला, तिथं पोचल्यावर फोन किंवा व्हिडिओ कॉल कर, सगळी माहिती सांगतो, असं सांगितलं होतं. मात्र, आता जोरात पाऊस सुरू झाला. शेजारीच समुद्र होता आणि तो चांगलाच उधाणला होता. आमच्याबरोबर असलेले बरेच पर्यटक भिजत होते. आमच्याकडं दोन छ्त्र्या होत्या, मात्र आता त्या वाऱ्यानं उलट्या व्हायला लागल्या. अखेर ते मंदिर पाहिलं. तिथं फोटो काढले. अनेक पर्यटक कंपन्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत 'फोटोस्टॉप' नावाचा प्रकार असतो. तोच आम्हाला इथं नाइलाजानं करावा लागत होतं. आम्ही भिजतच बाहेर आलो. अभिजितला फोन केला. त्यानं बरीच माहिती दिली. मात्र, व्हिडिओ कॉल न झाल्यानं त्या माहितीला मर्यादा आली. पुढं जयशंकर आम्हाला अर्जुनाचा रथ आणि त्या शिळेपर्यंतही घेऊन गेला, एके ठिकाणी लेण्यासारखी जागा असल्यानं आम्ही तिथं आत शिरलो. तिथं पाऊस लागत नव्हता, त्यामुळं बरेचसे पर्यटक आतच थांबले होते. तिथं छायाप्रकाशाचा सुंदर खेळ रंगला होता. फोटो सुंदर येत होते. मग बरंचसं फोटोसेशन तिथं केलं. तिथून जरा पुढे गेल्यावर तो प्रसिद्ध तिरपा दगड दिसला. तिथंही आत जायला तिकीट होतं. मात्र, पाऊस परत वाढल्यानं आम्ही बाहेरूनच फोटो काढले आणि निघालो. मोदी आणि जिनपिंग यांची भेट याच ठिकाणी झाली होती. पल्लव राजांच्या काळातलं हे सगळं काम आहे. त्या महाकाय शिळेला श्रीकृष्णाचा लोण्याचा गोळा असंही म्हणतात. 
इथं बघण्यासारखं बरंच काही होतं. मात्र, आता पाऊस वाढल्यामुळं आम्हाला निघणं भाग होतं. मग पुन्हा टॅक्सीत येऊन बसलो आणि जयशंकरनं लगेच टॅक्सी पाँडिचेरीच्या दिशेनं दामटली. त्याला इंग्रजी जेमतेम येत होतं आणि हिंदी समजत होतं. त्यामुळं आमचा तोडकामोडका संवाद सुरू होता. 'चेन्नई आता किती वाढलंय' इथून आमच्या चर्चेची सुरुवात झाली. तो अण्णा द्रमुकचा कार्यकर्ता होता. त्यामुळं आताच्या स्टॅलिन राजवटीला शिव्या घालत होता. सगळीकडं भ्रष्टाचार बोकाळला आहे, असं त्याचं म्हणणं होतं. येत्या निवडणुकीत स्टॅलिन यांच्या द्रमुकला विरोधकांचं मोठं आव्हान असेल, असंही तो म्हणाला. तमिळनाडूत येत्या मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आमचं हे बोलणं चाललं होतं. चेन्नईहून पाँडीला जाणाऱ्या रस्त्याला ईसीआर (ईस्ट कोस्ट रोड) म्हणतात. हा रस्ता निसर्गसुंदर आहे. डाव्या बाजूला सतत समुद्र दिसत राहतो. मात्र, जयशंकर त्या रस्त्याला शिव्या घालत होता. खरं तर हा रस्ता चौपदरी करण्याचं काम सुरू असलेलं दिसत होतं. त्यामुळं अनेक ठिकाणी डायव्हर्जन होती. मात्र, जयशंकर सतत 'कचरा रोड, कचरा रोड' म्हणत त्या रस्त्याचा उद्धार करत होता. जसजसं आम्ही पाँडीच्या जवळ येऊ लागलो, तसतसं समोरचं आकाश भरून आलेलं दिसायला लागलं. ऑरोव्हिलेचा बीच लागला. थोड्याच वेळात आमची टॅक्सी पाँडीत शिरली.
पाँडिचेरीविषयी आपण जे काही ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, तसं काही या गावाचं रूपडं लगेच जाणवत नाही. कुठल्याही भारतीय गावात गेल्यावर जे दिसतं तसंच याही गावात दिसतं. पाँडीचं अंतरंग आम्हाला अजून उलगडायचं होतं. हळूहळू आमची टॅक्सी मिशन स्ट्रीटवरल्या आमच्या कोरामंडल हेरिटेज हॉटेलकडं धावू लागली. मुख्य टाउन भागात शिरल्यावर पाँडीचं अंतरंग दिसू लागलं. अतिशय झगमगीत, ब्रँडेड कपड्यांची दुकानं असलेला रस्ता लागला. या गावावर पूर्वीपासून काँग्रेसचं वर्चस्व होतं. तेव्हा वल्लभभाई पटेल सलाई, कामराज सलाई, नेहरू मार्ग, गांधी पुतळा वगैरे सगळं इथं आहे.
फ्रेंचांची ही वसाहत. इथल्या व्हाइट टाउन या भागात त्या वसाहतीच्या खाणाखुणा दिसतात. बाकीचं गाव आता इतर चार भारतीय गावांसारखंच दिसतं. तीच गर्दी, तोच गजबजाट... अर्थात पुण्याच्या तुलनेत पुष्कळच शांत. एकूण टुमदार. वर्गात सर्वसामान्य दिसणाऱ्या अनेक मुलींत एखादीच देखणी मुलगी असावी, तशी तमिळनाडूच्या पोटात ही 'अळागना पोन्नू' (सुंदर मुलगी) दिसते. फ्रेंच वाइनप्रमाणे अधिक मुरल्यानंतर तर तिची खुमारी अधिकच वाढलेली दिसते. त्या सौंदर्याच्या खाणाखुणा इथल्या व्हाइट टाउननं प्राणपणानं जपल्या आहेत. काही काही ठिकाणी तर केवळ तमिळ व फ्रेंच या दोन भाषांतच पाट्या आहेत.
पुदुच्चेरी हे केंद्रशासित राज्य. इथं विधानसभा आहे, मुख्यमंत्री आहेत. मात्र, दिल्लीप्रमाणेच हा भाग सगळा केंद्रशासित. एन. रंगास्वामी हे गृहस्थ अनेक वर्षं इथले मुख्यमंत्री आहेत. सर्वसामान्यांत मिसळणारे, स्कूटरवरून फिरणारे म्हणून ते प्रसिद्ध आहेत. (आमच्या आशिष चांदोरकरने पूर्वी यांची मुलाखत घेतली होती. तेव्हापासून आम्ही रंगास्वामींना आशिषचे मित्र म्हणतो.) असो.
आम्ही हॉटेलमध्ये येऊन टेकलो. आमची रूम दुसऱ्या मजल्यावर होती. त्यामुळं सतत जिन्यानं चढ-उतार करणं आलं. त्यात पाऊस. संध्याकाळी सहा वाजताच अंधार पडला होता. आम्हाला जेवायला बाहेर जायचं होतं. आम्ही जरा फ्रेश होऊन बाहेर पडलो. पाऊस होताच. छ्त्र्यांचा उपयोग झाला. इथं जवळच सुरगुरू नावाचं व्हेज साउथ इंडियन हॉटेल होतं, असं समजलं होतं. मात्र, ते रिनोव्हेशनमुळं तात्पुरतं बंद असल्याचं कळलं. मग आम्ही अगदी शेजारी असलेल्या एका घराच्या टेरेसवर असलेल्या हॉटेलमध्ये गेलो. इथं अगदी कलोनियल व्हाइब्स होत्या. इथलं आर्किटेक्चर, टेबल, कटलरी, भिंतींवरचे फोटो सगळं तसंच होतं. पाऊस नसता तर टेरेसवरही बसायची सोय होती. मात्र, आम्हाला आत आत बसावं लागणार होतं. तिथं एक तरुणी (ती बहुतेक मालकीणच असावी...) आणि दोन-तीन कामावर असलेली मुलं होती. आम्ही लवकर आलो होतो. त्यामुळ बाकी ग्राहक कुणीही नव्हते तेव्हा. आम्ही शांततेत सगळं ऑर्डर केलं आणि निवांत जेवलो. नंतर काही जण जेवायला आले. बिल आल्यावर कळलं, की हॉटेल जरा महागच आहे. ते सगळे त्या ॲम्बियन्सचे पैसे होते. जेवणही बरंच बरं होतं. सूप विशेष छान होतं. मग पुन्हा पावसात जरा भिजत आमच्या शेजारीच असलेल्या हॉटेलमध्ये परतलो. मोबाइलमध्ये बातम्या बघितल्या. उद्या श्रीलंकेत चक्रीवादळ धडकणार, अशाच बातम्या होत्या. इथं तर सतत पाऊस पडत होता. आमच्या ट्रिपचं काय होणार असा प्रश्न पडला. त्या चिंतेत असलो तरी बरेच दमलो असल्यानं लगेच डोळा लागला. उद्याचं उद्या बघू, असं म्हणत झोपलो...

(क्रमश:)


पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

--------------------







27 Nov 2025

शिक्षणवेध अंक - रूपे रूपेरी १

कवी ‘जगवतो’ तेव्हा...
--------------------------


(‘शिक्षणवेध’या उच्च व तंत्रशिक्षण खात्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या नियतकालिकात सध्या ‘रूपे रूपेरी’ हे चित्रपटविषयक सदर लिहितो आहे. त्यातील हा पहिला भाग.)

चित्रपट बघायला आवडत नाही, अशी व्यक्ती सापडणं अवघड. आपल्या सगळ्यांना रूपेरी पडद्यावरच्या या जादूने गेल्या शतकाहून अधिक काळ वेड लावलं आहे. या काळात अनेक उत्तमोत्तम चित्रपट तयार झाले. त्यातल्या काही विशेष, त्यातही तरुण विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहाव्यात अशा काही कलाकृतींचा वेध आपण ‘रूपे रूपेरी’ या सदरामधून घेणार आहोत. पहिल्या लेखात ‘डेड पोएट्स सोसायटी’ या गाजलेल्या इंग्लिश चित्रपटाविषयी...

-----

अमेरिकेतलं एक उच्चभ्रू महाविद्यालय. तिथं सगळंच कसं शिस्तीत आणि आखीवरेखीव! अशा महाविद्यालयांत घडतात ते अत्यंत हुशार, प्रज्ञावंत विद्यार्थी. पुढे जाऊन आपल्या देशाच्या कीर्तीत, लौकिकात, महत्तेत भर घालणारे अतिशय बुद्धिमान विद्यार्थी. असे विद्यार्थी मानेवर खडा ठेवून तासन् तास अभ्यास करतात. त्यांचं जीवनही कसं शिस्तबद्ध आणि काटेकोर असतं. प्रत्येक क्षणाचा जणू हिशेब त्यांना कुणी तरी मागत असतं. हे विद्यार्थीही महाविद्यालयाच्या त्या ठरावीक साच्यातून, तेथील वरिष्ठांना जसे हवे तसे, होऊन बाहेर पडतात. हे असंच वर्षानुवर्षे चालत असतं. मात्र, या सगळ्यांत या विद्यार्थ्यांकडून एक थोडी महत्त्वाची गोष्टच करायची राहून जात होती - त्यांचं ‘जगायचं’च राहून जात होतं...
अशा वेळी तेथे प्रकटतो एक कवी. म्हणजे कविमनाचा प्राध्यापक. ज्ञान मिळविण्याच्या, मोठं होण्याच्या वरील चाकोरीची मळलेली वाट त्याला मान्य नसते. मग तो यातल्या काही भाग्यवान विद्यार्थ्यांना वेगळी वाट दाखवतो. त्यांना कविता शिकवतो. जगण्यातली मौज समजावून सांगतो. त्या विद्यार्थ्यांनाही हळूहळू समजत जातं, की आपल्याला नक्की काय हवंय? आपल्याला काय आवडतं? आपल्याला आवडते तीच गोष्ट आपण आयुष्यात करत राहिली पाहिजे... अर्थात विद्यार्थ्यांना हे ज्ञान मिळण्यासाठी एका दुर्दैवी जीवाचा बळी जावा लागतो.
‘डेड पोएट्स सोसायटी’ या १९८९ मध्ये आलेल्या अमेरिकी चित्रपटाचं हे कथासार. पीटर वेअर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यातील जॉन कीटिंग या कवी-प्राध्यापकाच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता रॉबिन विल्यम्सने कमाल केली होती. नील पेरी या विद्यार्थ्याची भूमिका रॉबर्ट सीन लेनर्ड याने, तर टॉड अँडरसन या विद्यार्थ्याची भूमिका इथन हॉकने केली आहे. चित्रपटाचं कथानक वेल्टन अकादमी या व्हरमाँटमधील काल्पनिक शिक्षण संस्थेत घडते. या महाविद्यालयाची चार प्रमुख तत्त्वे आहेत - परंपरा, सन्मान, शिस्त आणि उत्कृष्टता. चित्रपटाच्या सुरुवातीलाच हे अधोरेखित केलं जातं. या महाविद्यालयात इंग्रजी शिकविण्यासाठी जॉन कीटिंग या शिक्षकाची नियुक्ती होते. इतर शिक्षकांपेक्षा कीटिंग वेगळे असतात. ते पुस्तकी ज्ञानापेक्षा इतर काही महत्त्वाची तत्त्वे विद्यार्थ्यांना शिकवू पाहतात. स्वतंत्र विचार करायला शिकवतात. मुख्य म्हणजे कविता शिकवतात. ‘कार्पे डिअम’ (लॅटिन शब्दप्रयोग - अर्थ सीझ द डे - दिवस भरभरून जगा) हा त्यांचा मूलमंत्र असतो. या सरांचं सगळंच वेगळं असतं. ते कवितांच्या पुस्तकांतील गणिती पद्धतीनं कवितेला रेटिंग देण्याच्या प्रकाराविषयी लिहिलेली पानं आधी फाडायला सांगतात. प्रत्येकानं कवितेचं स्वतंत्र मूल्यमापन करावं, असा त्यांचा आग्रह असतो. त्या महाविद्यालयाचे कडक शिस्तीचे प्राचार्य नोलन यांना कीटिंग यांची ही शिकविण्याची तऱ्हा अजिबात आवडत नाही.
कालांतरानं मुलांना कीटिंग सर तरुणपणी चालवत असलेल्या ‘डेड पोएट्स सोसायटी’ नावाच्या ग्रुपविषयी समजतं. मग नील, नॉक्स, रिचर्ड कॅमेरॉन, स्टीव्हन मीक्स, गेरार्ड पिट्स आणि चार्ली डाल्टन हे सगळे विद्यार्थी पुन्हा हा ग्रुप पुनरुज्जीवित करतात. एका गुहेत जाऊन कवितावाचन, वाद्यवादन असे उपक्रम ते सुरू करतात. यातूनच या विद्यार्थ्यांना त्यांचा ‘स्व’ गवसायला लागतो. नॉक्स त्याचं एका मुलीवर असलेलं प्रेम धीटपणे व्यक्त करायला शिकतो, तर नीलला त्याची अभिनयाची आवड गवसते. स्थानिक स्तरावर शेक्सपिअरच्या ‘मिडसमर नाइट्स ड्रीम’ या नाटकातली ‘पक’ची भूमिका मिळते. टॉडचा आत्मविश्वास परत येतो आणि वर्गासमोर स्वत:ची कविता म्हणण्याएवढं धैर्य त्याच्या अंगात येतं. नीलच्या शिस्तप्रिय व एकांगी विचारांच्या वडिलांना त्याचं हे नाट्यप्रेम अजिबात मान्य नसतं. त्याने हार्वर्ड विद्यापीठात जाऊन डॉक्टर व्हावं, यासाठी ते अतिशय आग्रही असतात. चार्ली विद्यापीठाच्या मॅगेझिनमध्ये विद्यार्थिनींनाही तेथे प्रवेश मिळायला हवा, या मताचा पुरस्कार करणारा लेख लिहितो. (या कथानकाची पार्श्वभूमी १९५९ ची आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवे.) त्यावरून संतापून प्राचार्य त्याला फटके देण्याची शिक्षा करतात. शिवाय ‘डेड पोएट्स सोसायटी’त आणखी कोण कोण आहे, याची विचारणा करतात. मात्र, चार्ली ते गुपित फोडत नाही. इकडे नाटकाच्या आदल्या दिवशी नीलचे वडील त्याला त्या नाटकात काम करण्यापासून परावृत्त करतात. त्यांच्या या कमालीच्या विरोधामुळं नील टोकाचं पाऊल उचलतो. या धक्कादायक प्रकारानंतर पुढं काय होतं, हे चित्रपटातच पाहायला हवं. 

कनिष्ठ महाविद्यालय (अमेरिकेत त्याला ‘स्कूल’ असंच म्हणतात) स्तरावरील, थोडक्यात पौगंडावस्थेतून तारुण्यात पदार्पण करण्याच्या अतिशय नाजूक, तरल वयातील मुलांच्या भावभावना मांडणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाला आता जवळपास ३५ वर्षे उलटून गेली, तरी त्यातल्या अनेक गोष्टी आजही सयुक्तिक वाटतात. टॉम शुलमन यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. नॅशव्हिल (टेनेसी) येथील माँटगोमेरी बेल अकॅडमीतील त्यांच्या स्वत:च्या अनुभवावर आधारित ही कथा आहे. सॅम्युएल पिकरिंग नावाचे त्यांचे असेच ‘वेगळे’ शिक्षक होते, ते त्यांनी कीटिंग या पात्राद्वारे उभे केले आहेत. कीटिंग या प्रमुख पात्रासाठी आधी लिआम नीसन, डस्टिन हॉफमन, मेल गिब्सन, टॉम हँक्स आदी नामवंत अभिनेत्यांचा विचार झाला होता. प्रत्यक्षात ही भूमिका साकारण्याचे भाग्य रॉबिन विल्यम्सच्या वाट्याला आले. (‘मिसेस डाउटफायर’ या चित्रपटातील त्यांची स्त्री-भूमिका पुढे खूप गाजली. त्यावरून आपल्याकडे ‘चाची ४२०’ हा चित्रपट आला होता.) या चित्रपटाच्या शेवटी ‘कॅप्टन, ओ कॅप्टन’ या वॉल्ट व्हिटमनच्या १८६५ मध्ये (अब्राहम लिंकन यांच्या हत्येसंदर्भात) लिहिलेल्या कवितेचा अतिशय सुंदर संदर्भ आहे. (रॉबिन विल्यम्सचे २०१४ मध्ये निधन झाले, तेव्हा त्याच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर या कवितेद्वारे त्याला आदरांजली वाहिली. अनेक शिक्षकांनी सांगितले, की विल्यम्सने साकारलेल्या कीटिंगच्या या भूमिकेमुळेच ते या पेशात येण्यास उद्युक्त झाले.)
हा चित्रपट दोन जून १९८९ रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला. त्याने उत्तम व्यवसाय केला. या चित्रपटाला ऑस्कर सोहळ्यात उत्कृष्ट मूळ पटकथा, उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक व उत्कृष्ट अभिनेता (विल्यम्स) या विभागांत नामांकन मिळाले होते. प्रत्यक्षात शुलमन यांना उत्कृष्ट मूळ पटकथा या विभागात ऑस्कर पुरस्कार मिळाला.
आपल्याकडे या चित्रपटावर आधारित चित्रपट आला नसता तरच नवल. सन २००० मध्ये आदित्य चोप्राने ‘मोहब्बतें’ हा भव्य हिंदी चित्रपट तयार केला तो ‘डेड पोएट्स सोसायटी’च्या प्रेरणेतूनच. अर्थात आदित्यने या मूळ कथेला भारतीय वळण देताना सिनेमात भरपूर बदल केले. केवळ मूळ गाभा कायम राहिला. ‘गुरुकुल’ या केवळ मुलग्यांच्या शैक्षणिक संस्थेचे कडक प्राचार्य नारायण शंकर यांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली होती. त्यांच्या मेघा या मुलीची भूमिका ऐश्वर्या रायने केली होती, तर राज या तिच्या प्रियकराची भूमिका शाहरुख खानने साकारली होती. तोच काही काळानंतर या ‘गुरुकुल’मध्ये संगीत शिक्षक म्हणून परततो आणि तेथील तीन तरुणांना (उदय चोप्रा, जिमी शेरगिल, जुगल हंसराज यांना) नव्याने प्रेमाची भाषा शिकवतो.
‘मोहब्बतें’ तुफान चालला. आदित्य चोप्राने अतिशय भव्य प्रमाणात या चित्रपटाची निर्मिती केली होती. अमिताभचे हे दीर्घ काळानंतरचे ‘कमबॅक’ होते. (त्याने स्वत: यश चोप्रांकडे जाऊन मला सिनेमात काम द्या, अशी मागणी केली होती म्हणतात.) जलित-ललित यांनी दिलेले संगीतही सुपरहिट झाले. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता २५ वर्षे होत आली, तरी त्यातली गाणी आजही लोकप्रिय आहेत. 

‘डेड पोएट्स सोसायटी’ काय किंवा आपला ‘मोहोब्बतें’ काय, दोन्ही चित्रपटांनी तरुण विद्यार्थ्यांना आपल्या जगण्याचं नेमकं प्रयोजन शोधण्यासाठी मदत केली. या चित्रपटांत दाखवलेल्या विद्यार्थ्यांशी आपण प्रेक्षक म्हणून सहज रिलेट होऊ शकतो. आपणही अशा अनेक प्रसंगांतून गेलेलो असतो. ‘डेड पोएट्स सोसायटी’तल्या नीलप्रमाणेच आवडते क्षेत्र की वडिलांनी सांगितलेले करिअर क्षेत्र ही द्विधा अवस्था आजही कित्येक विद्यार्थ्यांची होत असते. सर्वांंनाच कीटिंग सरांसारखे किंवा राज सरांसारखे शिक्षक लाभत नाहीत. त्यामुळेच हे दोन्ही सिनेमे आपल्याला ‘स्वत:चं ऐका’ हा महत्त्वाचा संदेश देतात, तो लक्षात ठेवण्यासारखा आहे.
रूढ चाकोरीतलं शिक्षण घेणं, त्यासाठी झटून अभ्यास करणं, शिस्त पाळणं हे सगळं एका मर्यादेपर्यंत आवश्यक आहेच; मात्र तेच ते करताना आपला ‘रोबो’ तर होत नाहीय ना, हे सतत तपासावं लागतं. त्यासाठी एक तर कविमनाचा शिक्षक लाभावा लागतो किंवा आपलं मन तसं घडवावं लागतं. त्यामुळं या चित्रपटाचं वर्णन तीन शब्दांत करायचं झाल्यास ते ‘कवी ‘जगवतो’ तेव्हा...’ असंच करावं लागेल.

-----

23 Nov 2025

रूपेरी पडद्याचे मानकरी – लता मंगेशकर

रूपेरी पडद्याचे मानकरी - लता मंगेशकर
-------------------------------------------------

(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी पडद्याचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी लता मंगेशकर यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)


श्रोते हो, नमस्कार!
पहाटेची वेळ असते... आपण कुठं तरी निसर्गाच्या कुशीत... टेकडीवर... सूर्योदय होतोय... पूर्व दिशा केशरिया रंगानं उजळलीय... अन् आपण एक गाणं सुरू करतो... इअरफोनमधून 'लेकिन'मधल्या 'सुनियो जी...' गाण्यापूर्वीची ती जोरदार तान कर्णपटलातून थेट शरीरातल्या प्रत्येक पेशीपेशीत घुसते... ती ऐकता ऐकताच डोळे घळघळा वाहू लागतात... काही तरी प्रचंड दैवी अनुभूती येते... मन भरून येतं... एकदम पवित्र, सुंदर भावनेनं आपण गद्ग गद् होतो... हे लताचं गाणं...! कित्येकदा ऐकलं, तरी हीच अनुभूती कायम देणारं... काय असेल ही लता मंगेशकर नावाची जादू? काही नावं उच्चारली, की मनात एकदम पवित्र, निर्मळ भाव उमटतात. चेहऱ्यावर हसू उमलतं. लता मंगेशकर हे सात अक्षरी नावही असंच. सप्तसूरच जणू... या नावानं आपल्या जगण्याला अर्थ दिला. आपल्या अस्तित्वाला सार्थकतेचा सूर दिला. आपल्या विरूप, क्षुद्र, क्षुल्लक आयुष्याचा गाभारा स्वरओंकाराच्या निनादानं भारून टाकला...
लता मंगेशकर या नावाच्या ख्यातनाम गायिकेविषयी बोलताना अशा अनेक विशेषणांची खैरात करता येईल. तरीही जे सांगायचंय ते पूर्णांशानं सांगता येईलच असं नाही. कारण सर्वोत्तमालाही व्यापून दशांगुळे उरलेली ही लता नावाची जिवंत दंतकथा आहे. अवकाशाच्या भव्यतेचं वर्णन करता येत नाही, महासागराच्या अथांगतेला लिटरचं माप लावून चालत नाही, सूर्याचं तेज थर्मामीटरनं मोजता येत नाही, तसंच लताच्या गाण्याला कशानं मोजता येत नाही. ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे.
लता मंगेशकर नावाच्या या सात अक्षरी दंतकथेचा जन्म झाला २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर शहरात. ख्यातनाम गायक, नाट्यकर्मी, अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शुद्धमती उर्फ माई मंगेशकर या दाम्पत्याचं लता हे सर्वांत मोठं अपत्य. त्यानंतर मीना, आशा, उषा व हृदयनाथ ही भावंडं. या पाचही भावंडांनी भारताच्या संगीत अवकाशात स्वत:चं नक्षत्रांसारखं स्थान निर्माण केलं. त्यातही लता मंगेशकरांचं स्थान म्हणजे अढळ ध्रुवताऱ्यासारखं. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा १९४२ मध्ये पुण्यात मृत्यू झाल्यावर वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी लतावर सर्व मंगेशकर कुटुंबाची जबाबदारी आली. ती तिनं समर्थपणे पेलली. एवढंच नव्हे, तर देवदत्त प्रतिभा आणि स्वत: केलेले अपार कष्ट या जोरावर केवळ भारतातील नव्हे, तर जगातील संगीत क्षेत्रातील विख्यात गायिका म्हणून नावलौकिक मिळवला.
लताचं पाळण्यातलं नाव 'हृदया' असं होतं. मंगेशकर कुटुंबीय मूळचं गोव्यातलं. त्यांचं मूळ आडनाव नवाथे. तिथल्या मंगेशी देवस्थानाचे पुजारी म्हणून दीनानाथांचे पूर्वज काम करत असत. त्यामुळं नंतर त्यांनी मंगेशकर हे आडनाव घेतलं. ज्येष्ठ गायक जितेंद्र अभिषेकी हे लतादीदींचे मावसभाऊ. दीनानाथ मंगेशकर सांगलीत मुक्कामी असताना तिथल्या सरकारी शाळेत लताला दाखल करण्यात आलं. मात्र, एकदा लहानगी आशा रडत असल्यामुळे एक शिक्षक लताला खूप रागावले. याचा लताला अतिशय राग आला. ती आशाला घेऊन घरी आली आणि त्यानंतर शाळेत परत कधीही गेली नाही. नंतर दीनानाथांनी एक शिक्षक घरी शिकवण्यासाठी ठेवले. मात्र, औपचारिक शिक्षण असं फारसं झालंच नाही. लताचा संगीताचा कान मात्र तयार होता. तिला ती वडिलांकडून देणगीच मिळाली होती. एकदा दीनानाथ त्यांच्या एका शिष्याला एक चीज शिकवत होते. तो शिष्य ती चीज गात होता. दीनानाथ तेवढ्यात आतल्या खोलीत गेले. तेव्हा अवघ्या पाच वर्षांच्या लतानं त्या शिष्याला ‘तू चुकीचं गातो आहेस,’ असं सांगितलं आणि ती चीज स्वत: गाऊन दाखवली. तेवढ्यात तिथं आलेल्या दीनानाथांनी लताचं लक्ष नसताना तिला गाताना ऐकलं. त्या क्षणी त्यांना साक्षात्कार झाला, की आपल्या पोटी एका दैवी कलावंताचा जन्म झाला आहे. त्यांनी मग लताला गाणं शिकवायला सुरुवात केली. दीनानाथांची तेव्हा बलवंत नाटक कंपनी होती. ही कंपनी गावोगावी नाटकाचे प्रयोग करत हिंडत असे. एकदा एक कलाकार आला नव्हता, म्हणून लतानं अतिशय लहान वयात त्याची रिप्लेसमेंट म्हणून ऐन वेळी काम केलं. एवढंच नव्हे, तर अनेक वन्समोअरही मिळवले.
मास्टर दीनानाथ गेले, तेव्हा मंगेशकर कुटुंबाचे स्नेही आणि नातेवाइक, नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी मंगेशकर परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून पहिलं काम मिळवून दिलं. लतानं वसंत जोगळेकरांच्या ‘किती हसाल?’ या १९४२ मध्ये आलेल्या मराठी चित्रपटासाठी ‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी’ हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेलं गाणं गायलं, पण हे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं. मास्टर विनायकांनी लताला नवयुग पिक्चर्सच्या ‘पहिली मंगळागौर’ या १९४२ मधल्याच मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. या चित्रपटात लतानं ‘नटली चैत्राची नवलाई…’ हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेलं गाणं म्हटलं. नंतर १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनीचं मुंबईला स्थलांतर झालं, तेव्हा लतादीदीही कुटुंबासमवेत मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ भेंडीबाजारवाले यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्याच ‘आप की सेवा में’ या १९४६ मध्ये आलेल्या हिंदी चित्रपटासाठी ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणं गायलं. दत्ता डावजेकरांनी त्या गाण्याला संगीत दिलं होतं. लता आणि आशा यांनी मास्टर विनायकांच्या ‘बडी माँ’ या १९४५ मध्ये आलेल्या पहिल्या हिंदी चित्रपटातही नूरजहाँसोबत छोट्या भूमिका केल्या होत्या. त्या चित्रपटात लतानं ‘माता तेरे चरणों में’ हे भजन गायलं होतं. मास्टर विनायकांच्या ‘सुभद्रा’ या १९४६ मधल्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लतादीदींची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.
पुढच्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण फाळणीही झाली आणि उस्ताद अमानत अली खाँ भेंडीबाजारवाले नवनिर्मित पाकिस्तानमध्ये गेले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ देवासवाले यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लतादीदींना तालीम मिळाली.
दरम्यान, मास्टर विनायक यांचा १९४८ मध्ये मृत्यू झाला. त्यामुळं लतादीदी आणि कुटुंबाचा मोठाच आधार हरपला. मात्र, आता त्या मुंबईत स्थिरस्थावर होऊ लागल्या होत्या. ज्येष्ठ संगीतकार गुलाम हैदर यानी लताला पुष्कळ मार्गदर्शन केलं. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई अंबालेवाली अशांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. त्यामानानं लताचा आवाज अतिशय कोवळा, नाजूक, पण गोड होता. १९४८ मध्ये ग़ुलाम हैदरांनी लताची ओळख तेव्हा ‘शहीद’ या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी करून दिली; पण मुखर्जींनी लताचा आवाज ‘अतिशय बारीक’ म्हणून नाकारला. तेव्हा गुलाम हैदर थोड्याशा रागात उत्तरले होते - येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदर यांनीच लतादीदींना त्यांच्या ‘मजबूर’ या १९४८ या वर्षी आलेल्या चित्रपटात ‘दिल मेरा तोडा…’ हे गाणं म्हणण्याची मोठी संधी दिली.
सुरुवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हा लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचं अनुकरण करीत असे, पण नंतर लतानं स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली तयार केली. अवघ्या विशीच्या आसपास असलेल्या लताचा हा सर्वच संघर्ष अतिशय मोठा होता. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम धर्मीय असत, त्यामुळे गाण्यांमध्ये भरपूर उर्दू शब्द असत. एकदा प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांनी लताच्या हिंदी गाण्यातील मराठी वळणाच्या उच्चारांसाठी ‘इनके गाने से दालचावल की बदबू आती है’ असा तुच्छतादर्शक शेरा मारला. तेव्हा दुखावलेल्या लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले. त्यानंतर पुन्हा आयुष्यात ना तिच्या गाण्यात कधी उच्चार चुकले, ना कधी कुणाला असे शेरे मारण्याची संधी मिळाली.
१९४९ हे वर्ष लताच्या कारकिर्दीला महत्त्वाचं वळण देणारं वर्ष ठरलं. महल या लोकप्रिय चित्रपटातलं ‘आयेगा आनेवाला’ हे गाणं प्रचंड गाजलं. या गाण्याचे संगीतकार होते खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे मधुबालावर हे गाणं चित्रित झालं होतं. या गाण्यानं लताचा आवाज घराघरांत पोचला.
पुढं तब्बल सहा दशकं हा आवाज सतत आपल्यासोबत राहिला. लहानपणापासून ते मृत्यू येईपर्यंत जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर हा अक्षय लतास्वर आपल्याला साथ देत आलाय. तो ज्यांनी ज्यांनी प्रथम ऐकला, तेव्हाच सगळ्यांना जाणवलं, की हे नेहमीचं साधंसुधं गाणं नाहीय. हे त्यापलीकडं जाणारं काही तरी आहे. काळीज पिळवटून टाकणारी आर्तता त्यात आहे... काही तरी प्युअर, शुद्ध असं त्यात आहे... जे ऐकल्यावर हिंदीत ज्याला 'सुकून मिलना' म्हणतात, तसं काहीसं आपल्याला होतं. आत कुठं तरी शांत वाटतं, खूप आश्वासक वाटतं... अनेकदा अंतःकरण उचंबळून येतं, पोटात कुठं तरी हलतं, अंगावर रोमांच उभे राहतात... डोळे तर अनेकदा पाण्यानं भरतात. असं आपलं शरीर सतत या सूरांना दाद देत असतं. हा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. काय आहे हे? आपला या स्वराशी असा जैव संबंध कसा जोडला गेला? हीच लताच्या आवाजाची जादू आहे, हे निखालस...
दीदींच्या आवाजाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांचा आवाज ‘पिकोलो’ जातीचा होता. पिकोलो ही एक उंच स्वरात वाजणारी बासरी आहे. ध्वनिक्षेपकावर अचूक तीव्रतेने आदळणारा हा आवाज असतो. दादींचं श्वासावर कमालीचं नियंत्रण होतं. गाताना त्या श्वास कधी घेतात, हे कळतही नाही. त्यांचा आवाज अजिबात बेसूर होत नसे. ‘कंबख्त, ये कभी बेसुरी होतीही नहीं’ हे बडे गुलाम अली खाँसाहेब यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. ‘ये ज़िंदगी उसी की है’ हे गाणं ऐकताना त्यांनी हे उद्गार काढले होते. लतादीदींना मिळालेली ही मोठीच दाद म्हणावी लागेल. सुरुवातीच्या काळात अनिल विश्वास, खेमचंद प्रकाश, सज्जाद हुसेन, नौशाद, सी. रामचंद्र, मदनमोहन, एस. डी. बर्मन, हेमंतकुमार, सलील चौधरी आणि शंकर-जयकिशन या संगीतकारांनी लताकडून सर्वोत्तम गाणी म्हणवून घेतली. त्याच काळात मराठीत वसंत प्रभूंनी लताकडून उत्तमोत्तम भावगीतं गाऊन घेतली.
लता मंगेशकर यांच्यावर १९६२ मध्ये विषप्रयोग झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्या गाऊ शकतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आपल्या सर्वांच्या सुदैवानं सहा महिन्यांनंतर दीदी गाण्यासाठी उभ्या राहिल्या. ‘कहीं दीप जलें कहीं दिल…’ हे हेमंतकुमार यांनी संगीतबद्ध केलेलं ‘बीस साल बाद’ चित्रपटातलं गीत पहिल्यांदा त्यांनी गायलं.
१९५० ते १९७० ही दोन दशकं लतादीदींच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम दशकं होती, असं अनेक जाणकार मानतात. या काळात त्यांचा आवाज पक्व आणि अधिकाधिक मधुर होत गेला. गायला अतिशय अवघड अशी गाणी त्यांनी या काळात गायिली. लता होती म्हणूनच आम्ही अशी अवघड गाणी तयार करू शकलो, असं अनेक संगीतकार सांगत. ‘रुस्तुम सोहराब’ चित्रपटातलं ‘ऐ दिलरुबा…’ हे सज्जाद हुसेन यांचं गाणं दीदींनी एवढं कमाल गायलंय, की तसं इतर कुठलीही गायिका गाऊ शकली असती, असं वाटत नाही. ‘ये दिल तुमबिन कहीं लगता नहीं’ हे ‘इज्जत’ चित्रपटातलं गाणं ऐकताना त्यांचा आवाज धारदार सुरीसारखा भासतो. या काळात त्यांच्या आवाजातला लवचीकपणा परमोच्च स्थितीत होता. वेगवेगळ्या गायिकांसाठी त्या गात तेव्हा त्या गायिकेनंच ते गाणं गायलंय असं वाटे. ‘उनसे मिली नजर’ हे गाणं ऐकताना सायराबानूच डोळ्यांसमोर येते, तर ‘कांटो से खीच के आँचल’ ऐकताना वहिदाच डोळ्यांसमोर येते. ‘अभिनेत्री’मधलं ‘ओ घटा सांवरी’ ऐकताना अवखळ हेमाच नजरेसमोर येते. या गाण्यात त्यांनी जी थंडी वाजल्यानंतरची आवाजातली शिरशिरी आणली आहे, ती केवळ ऐकावी. लतादीदींच्या एकेका गाण्याचे असे किती तरी बारकावे सांगता येतील. अनेक संगीत तज्ज्ञांनी त्याचा अभ्यास केला आहे. त्यावर पीएचडी केली आहे. ‘ह’ हे एक अक्षर दीदी किती वेगवेगळ्या पद्धतीनं उच्चारतात, याचाही अभ्यास झाला आहे. त्या त्या गाण्याचा भाव, त्या त्या शब्दांचं वजन, अर्थ या सगळ्यांचा अगदी बारकाईनं विचार करून दीदी गात असत. त्यांनी गायिलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या गाण्याने तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं, एवढे ते त्यांनी आर्तपणे गायलं होतं. लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये दीदींनी १९७४ मध्ये संगीत रजनी सादर केली. त्या जगप्रसिद्ध ठिकाणी कार्यक्रम सादर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या.
लतादीदींनी पहिल्या टप्प्यात शंकर-जयकिशन या जोडीबरोबर भरपूर गाणी गायली. नंतरच्या काळात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दीदींकडून सर्वाधिक गाणी गाऊन घेतली. मात्र, त्यांच्याकडून काही अत्यंत खास गाणी गाऊन घेतली ती संगीतकार मदनमोहन यांनी. ‘अदालत’मधील ‘यूं हसरतों के दाग’ असेल, किंवा ‘दिल की राहें’मधलं ‘रस्म-ए-उलफत’सारखी अत्यंत दर्दभरी गज़ल असेल किंवा ‘दस्तक’मधलं ‘माई री’ असेल किंवा दीदींच्या सर्वोत्तम दहा गाण्यांत सहज येऊ शकेल, असं ‘वह कौन थी?’मधलं ‘लग जा गले’ असेल… मदनमोहन यांनी लतादीदींकडून फारच वेगळी अन् उच्च दर्जाची गाणी गाऊन घेतली, यात वाद नाही.
विविध पार्श्वगायकांनी दीदींबरोबर गाणी गायली. त्यात महंमद रफी आणि किशोरकुमार यांची गाणी रसिकांना विशेष आवडतात. हेमंतकुमार, मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, सुरेश वाडकर, शब्बीरकुमार, उदित नारायण, कुमार सानू ते सोनू निगमपर्यंत अनेक गायकांनी दीदींसमवेत अनेक अजरामर गाणी गायली.
दीदींनी मराठीत केलेलं कामही मोठं आहे. वसंत प्रभू आणि श्रीनिवास खळे वगळले तर दीदींनी मराठीतलं बहुतेक काम त्यांचे धाकटे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह केलं. मराठी चित्रपटांत दीदींनी तुलनेनं कमी गाणी गायली असली तरी ‘प्रेमा काय देऊ तुला’पासून ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी...’पर्यंत जवळपास सर्वच गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्यातही ‘जानकी’मधलं ‘विसरू नको श्रीरामा मला’, ‘जैत रे जैत’मधलं ‘मी रात टाकली…’ किंवा ‘उंबरठा’मधलं ‘गगन सदन तेजोमय’ ही दीदींची गाणी विशेष लोकप्रिय आहेत. मराठीतलं दीदींचं मोठं काम म्हणजे ‘शिवकल्याण राजा’ आणि ‘अमृताचा घनु’ हे दोन अल्बम. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षं झाली, तेव्हा म्हणजे १९७४ मध्ये पं. हृदयनाथ मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे व लतादीदींनी ‘शिवकल्याण राजा’ हा शिवरायांना अर्पण केलेल्या गीतांचा अल्बम केला. तो आजही तितकाच लोकप्रिय आहे. यानंतर १९७५ मध्ये संत ज्ञानेश्वरांच्या सातशेव्या जन्मदिनानिमित्त ‘अमृताचा घनु’ हा ज्ञानेश्वरांच्या अभंगांचा, विराण्यांचा अल्बम पं. हृदयनाथांनी तयार केला. त्यातही सर्व गाणी दीदींनी गायली. यातलं ‘मोगरा फुलला’ ही रचना आणि पसायदान आजही मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं. याशिवाय पंडितजींनी दीदींकडून ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही गणपतीची आरती आणि गणपतीची इतर काही गाणी गाऊन घेतली. यातली काही गाणी शान्ताबाई शेळकेंनी लिहिली होती. ‘गणराज रंगी नाचतो’सारखी त्यांनी लिहिलेली गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. ही गाणी आणि दीदींनी गायलेली आरती आजही गणेशोत्सवात सर्वत्र वाजवली जाते. याशिवाय शान्ताबाईंनी लिहिलेली काही कोळीगीतं हृदयनाथांनी संगीतबद्ध केली, तीही खूप गाजली. याशिवाय ‘आजोळची गाणी’ हा दीदींच्या आजोळच्या म्हणजे खानदेशातील लोकगीतांचा समावेश असलेला अल्बमही रसिकांना आवडला. या सर्वांहून वेगळं असं दीदींचं काम म्हणजे 'आनंदघन' हे टोपणनाव घेऊन त्यांनी मराठी चित्रपटांना दिलेलं संगीत. ही बहुतेक सगळी गाणी लोकप्रिय ठरली. दीदींमधला संगीतकार हा गुणही प्रकर्षानं समोर आला.
दीदीचं व्यक्तिमत्त्व चतुरस्र होतं. त्या बुद्धिमान होत्या; मात्र रुक्ष नव्हत्या. त्यांचा स्वभाव खेळकर होता. स्मरणशक्ती विलक्षण होती. अन्याय सहन न करण्याची वृत्ती होती. त्यापायी इंडस्ट्रीत एस डी. बर्मन, महंमद रफी आदींबरोबर त्यांचे काही वादही झाले. अबोला, रुसवेफुगवेही झाले. मात्र, पुढं ते सर्व निवळून त्यांनी एकत्र कामही केलं. पार्श्वगायकांचं नाव ध्वनिमुद्रिकेवर टाकण्याची पद्धत पूर्वी नव्हती. दीदींमुळं सर्व पार्श्वगायकांना हा मान मिळाला. गायकांना पुरेसं मानधन आणि रॉयल्टी मिळाली पाहिजे यासाठी त्या केवळ आग्रही नव्हत्या, तर त्यासाठी त्यांनी ‘एचएमव्ही’सारख्या तेव्हाच्या बड्या कंपनीबरोबर हक्काची लढाई केली आणि जिंकली. दीदींना फोटोग्राफीचा विलक्षण छंद होता. क्रिकेटचा खेळही त्यांनी अतिशय प्रिय होता. लंडनला लॉर्ड्स मैदानावर सामने पाहता यावेत, यासाठी त्यांनी या मैदानासमोरच घर विकत घेतलं, एवढं त्यांचं क्रिकेट प्रेम होतं. १९८३ मध्ये भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकला तेव्हा खेळाडूंना फार कमी पैसे मिळाले होते. दीदींनी एक म्युझिकल नाइट करून खेळाडूंना भरपूर पैसे मिळवून दिले. सैन्यासाठी, जवानांसाठी तर त्यांनी कित्येकदा गाजावाजा न करता मोठी मदत केली आहे. उपचारांअभावी वडिलांचं ज्या शहरात निधन झालं, त्या पुण्यात मोठं रुग्णालय बांधायचं दीदींचं स्वप्न होतं. ते त्यांनी २००० मध्ये पूर्ण केलं. त्या रुग्णालयाला वडिलांचं म्हणजेच दीनानाथांचं नाव दिलं. यासाठीचे पैसेही वेगवेगळ्या शहरांत संगीत रजनी आयोजित करून उभारले. दीदींना केंद्र सरकारनं १९८९ मध्ये चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवलं. पुढं २००१ मध्ये केंद्रानं ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन दीदींना सन्मानित केलं.
या सन्मानानंतरही दीदी थांबल्या नाहीत, कारण गाणं हाच त्यांचा श्वास होता. अगदी २०१४ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांनी संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या अल्बमसाठी ‘संधीप्रकाशात’ आणि ‘आता विसाव्याचे क्षण’ ही दोन गाणी गायिली. क्षण अमृताचे या नावानं आलेला हा अल्बम त्यांचा अखेरचा अल्बम ठरला. ही गाणी ऐकताना दीदींनी ही गाणी ८५ व्या वर्षी गायिली आहेत, यावर अजिबात विश्वास बसत नाही, एवढा त्यांचा आवाज सुरेल लागला आहे.
अनेकदा विचार करताना असं वाटतं, की गायक-गायिका तर अनेक आहेत. मग दीदी एवढ्या उंच स्थानी का पोचल्या? किंवा त्यांचं गाणं आपल्या हृदयापर्यंत का पोचतं? असं वाटतं, की संगीत मुळात आपल्या सगळ्यांच्या श्वासातच आहे. लय-ताल आपल्या रोमारोमांत आहे. आपण गाणं आवडणारी, गाणारी, गुणगुणणारी माणसं आहोत. हे सात सूर हीच आपल्या हृदयाची अभिव्यक्ती आहे. आपण हसतो, रडतो, रागावतो, चिडतो, रुसतो सारं काही गाण्यांतून... आपल्या या प्रत्येक भावनेला दीदींनी स्वररूप दिलं. आणि ते एवढं उच्च होतं, की आपल्याला दुसऱ्या कशाची गरजच पडली नाही. दीदींचा आवाज आणि आपलं जगणं... साथ साथ! या स्वरानं आपला सच्चेपणा कधी सोडला नाही. त्यानं आपल्याला कधी फसवलं नाही. न मागता भरभरून दिलं. वर्षानुवर्षं तो स्वर न थकता, न कंटाळता, न चिडता आपल्याला फक्त देत राहिला... आपण घेत राहिलो आणि तृप्त होत राहिलो. आपली झोळी कायमच दुबळी राहिली... एखाद्या उंच पर्वतशिखरावर उभं राहून अजस्र घनांतून सहस्रधारा दोन हातांनी कवेत घेण्याचा प्रयत्न करण्यासारखंच होतं ते. आपण त्या सूराच्या वर्षावात अक्षरशः बुडून जात राहिलो...
एवढं निखळ, नितळ, स्फटिकासारखं पारदर्शक असं या जगात आता खरोखर दुसरं काय आहे? लताचा स्वर मात्र आहे तसाच आहे. त्यामुळं ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मध्ये नातीच्या वयाच्या काजोललाही ‘मेरे ख्वाबों में जो आए’ म्हणणारा तो स्वर सहज शोभून जातो. आपल्या देशात एवढं वैविध्य आहे... एवढे भेद आहेत... पण सगळ्या भिंती मोडून एकच सूर सर्वांना बांधून ठेवतो - तो म्हणजे लतास्वर. याचं कारण त्या आवाजात अशी काही जादू आहे, की तो थेट तुमच्या हृदयात उतरतो. एकदा म्हणजे एकदाही, अगदी चुकूनही तो बेसूर होत नाही. त्याचा कधी कंटाळा येत नाही... एक वेगळंच आत्मिक समाधान मिळतं ते सूर कानी पडल्यावर!
आपण देव कधी पाहिलेला नाही, पण अनेकांना त्याचं अस्तित्व जाणवतं. दीदींचा आवाज ऐकल्यावर अशीच काहीशी अनुभूती येते. यापेक्षा सर्वोच्च, श्रेष्ठ काही असू शकणार नाही, असं वाटतं.
आपलं भाग्य म्हणून आपण या काळात आहोत. आपण अभिमानानं सांगू शकतो, की आम्ही सरस्वती पाहिली नाही, आम्ही स्वर्ग पाहिला नाही... पण आम्ही लतादीदींना ऐकलंय...
लता मंगेशकर नाव धारण करणारा देह ६ फेब्रुवारी २०२२ रोजी इहलोक सोडून गेला.. पण लता मंगेशकर नावाची स्वरसम्राज्ञी आपल्या मनात कायमच चिरतरुण राहणार आहे... आजन्म...!



-------

(आकाशवाणीवर प्रसारित झालेला, निवेदक प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केलेला भाग आता यूट्यूबवर ऐका.)

हा भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...

सोहराब मोदी यांच्यावरील भागाची संहिता वाचण्यासाठीा येथे क्लिक करा...

-------




31 Oct 2025

मुंबई आकाशवाणीसाठी - ४ ललितबंध

ऐसी अक्षरे रसिके...
------------------------

(‘मुंबई आकाशवाणी’वरील ज्येष्ठ कार्यक्रम अधिकारी ज्योत्स्ना केतकर माझ्या स्नेही आहेत. काही वर्षांपूर्वी, म्हणजे २०१८ मध्ये मी त्यांच्या आग्रहावरून मुंबई आकाशवाणीसाठी ‘ऐसी अक्षरे रसिके’ या कार्यक्रमासाठी काही ललितबंध लिहून त्यांचं वाचनही तिथं, त्यांच्या स्टुडिओत केलं होतं. यंदा दिवाळीत त्यांनी मला पुन्हा खास दिवाळी विशेष असे ललितबंध लिहून पाठवायला सांगितले. या वेळी घरूनच रेकॉर्डिंग करून पाठवले. त्या चार भागांचं हे स्क्रिप्ट...)

---

१. लक्ष्मीपूजन 

श्रोते हो, नमस्कार! 

काय छान वातावरण आहे ना!
हवेत हलकी हलकी थंडी जाणवू लागलीय... एखादी पहाट कशी धुक्याच्या दुलईतच उमलते. नुकताच पाऊस होऊन गेलेला असल्यानं रस्ते, झाडं, पानं-फुलं स्वच्छ झालेली असतात. सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या एकदम वाढलेली दिसते. त्यातल्या हौशी मंडळींकडं नवे बूट, नवी जॉगिंग ट्रॅक, हातात स्मार्टवॉच असा सगळा जामानिमा दिसतो. दुधाची, फुलांची, बेकरीची दुकानं हळूहळू उघडू लागलेली असतात. कुणी झाडून घेत असतं, तर कुणी पाणी मारत असतं. त्या मातीचा एक खरपूस वास नाकात शिरतो. जवळपासच्या मंदिरातही आता ज्येष्ठ मंडळींची लगबग दिसते. तिथं बाहेर फुलवाल्यांच्या दुकानांत टांगलेल्या हारांच्या फुलांचा मंद सुगंध मन प्रसन्न करून जातो. पेपरांच्या स्टॉलवरही वर्दळ दिसते. तिथं आता दिवाळी अंकांची सुरेख मांडणी केलेली दिसते. उत्सुक मंडळी एकेक अंक उचलून चाळत असतात. विक्रेताही हसऱ्या चेहऱ्यानं अंकांची माहिती देत असतो. हा घ्या, तो आला नाही अजून, तो अमका पलीकडं आहे वगैरे संवाद सुरू असतात. रस्त्यावर हळूहळू रहदारी सुरू झालेली असते. आता बाकीची अमृततुल्य किंवा छोटी छोटी टफरीवजा दुकानंही उघडू लागतात. पायऱ्यांची झाडलोट होते. आता देवांची पूजा वगैरे होते. शकुनाच्या ग्राहकाची विशेष सरबराई होते. थोडं पुढं गेलं, की आपलं लाडकं नाट्यगृह दिसतं. तिथं लागलेल्या नाटकांच्या पाट्या बघून मन एकदम खुलून जातं. आता त्या पाट्या बघूनच कानात नांदीचे सूर निनादू लागतात. बटाटवड्याचा वास नाकाला अस्वस्थ करायला लागतो. यातलं कुठलं नाटक पाहता येईल, याचा मनातल्या मनात विचार सुरू होतो. समोर आपलं नेहमीचं अमृततुल्य दिसतं. घरी चहा झाला असला, तरी इथल्या चहाची खुमारी काही औरच! त्यात ही गुलाबी थंडी वगैरे. चहावाल्याशी, तिथं जमलेल्या चार जणांशी हवापाण्याच्या गप्पा होतात. त्यात मग क्रिकेट सामन्यापासून ते राजकारणापर्यंत आणि राज्यातल्या महापुरापासून ते जगातल्या महायुद्धापर्यंतचे सगळे विषय येऊन जातात. तेवढ्यात वाफाळता कप समोर येतो. त्यातल्या आल्याच्या खमंग वासानं जीव वेडावतो. चवीचवीनं चहा घशात उतरतो - ‘अमृततुल्य’ हे नामाभिधान सार्थ होतं बघा अगदी! ही प्रभातफेरी आटोपून आपण घरी येतो. सोसायटीच्या कमानीला दिव्यांची माळ लावायचं काम सुरू असतं. वॉचमनकाकांना ‘मदतीला येऊ का?’ असं हसून म्हणायचं असतं आणि त्यांनीही हात हलवत ‘नाय नाय, हे काय, झालंच’ असं म्हणायचंच असतं. आतमध्ये झाडांवरही दिव्यांच्या माळा सोडलेल्या दिसतात. गेल्या वर्षीची कसर यंदा दुपटीनं भरून काढायची, हे जवळपास प्रत्येकानंच ठरवलेलं असतं. घरी जाताना लिफ्टमध्ये पोरंटोरं हातात खेळण्यांतली पिस्तुलं घेऊन खाली टिकल्या उडवायला निघालेली बघून, सगळं कसं सुरळीत सुरू असल्याचा ‘फी‌ल’ येतो. आपल्या मजल्यावरच्या सगळ्या घरांसमोर काढलेल्या देखण्या रांगोळ्या आणि पणत्यांची ओळ पाहून आपल्या डोळ्यांतही सुखाचे दिवे लखलखू लागतात. नुकतंच स्वच्छ केलेलं घर आपल्याकडं बघून हसत असतं. घरात आजोबांनी संगणकाला आदेश देऊन हौसेनं लावलेल्या सनईचे मंद सूर कानावर पडतात. आपण टेरेसमध्ये जातो. तिथं आपण उंच टांगलेला आपला आकाशकंदील उंच मस्त डोलत असतो. आजूबाजूच्या बहुतेक घरांवर ही आकाशकंदील आणि दिव्यांची सजावट दिसतेच. तेवढ्यात स्वयंपाकघरातून अनारशांचा खमंग वास येऊ लागतो आणि आपण हसत म्हणतो - आली हं दिवाळी! 

---


२. दिवाळी पाडवा 


श्रोते हो, नमस्कार!
आज बलिप्रतिपदा... म्हणजेच दिवाळी पाडवा. महाराष्ट्रात बहुतांश घरांत आज दिवाळीचा जल्लोषात साजरी होत आहे. वसुबारसेपासून सुरू होणारा पाच दिवसांचा हा वर्षातला सर्वांत मोठा उत्सव आपल्या मनातही प्रकाशाच्या रूपानं आशेची ज्योत प्रज्वलित करतो. आजच्याच दिवशी विक्रम संवतहे नवं वर्ष सुरू होतं. व्यापारी मंडळी नव्या वह्यांचं पूजन करतात. उत्तर भारतात गोवर्धनपूजन केलं जातं. असं या बलिप्रतिपदेचं महत्त्व आहे.
आपल्याकडं समस्त विवाहित पुरुषमंडळींसाठी हा सण म्हणजे आपल्या गृहलक्ष्मीला खास भेटवस्तू देण्याचा. दिवाळी पाडव्याची ओवाळणी पूर्वी एखाद्या चांगल्या साडीत भागायची. आता मध्यमवर्गीय लोक आणि त्यांच्या गृहलक्ष्म्या फार पुढं गेल्या. एखादी सिल्कची साडी वगैरे भेटी मागं पडल्या. आता हिऱ्याच्या दागिन्यांपासून ते एखाद्या हायएंड कारपर्यंत किंवा परदेशातल्या ट्रिपपासून महागातल्या ब्रँडेड फोनपर्यंत काय द्यावं लागेल हे हल्ली सांगता येत नाही. अर्थात गेल्या काही वर्षांत आपल्या सगळ्यांच्याच जगण्यात भौतिक समृद्धी आली हे नाकारून चालणार नाही. त्यामुळं आता दिवाळी म्हटलं, की हे असं सगळं असणार हे आपण गृहीत धरलेलंच असतं, नाही का! कधी कधी मग फार उंच उड्या मारायच्या नादात बजेट कोलमडतं. शेवटी मध्यमवर्गीय माणसाचं फुगलेलं बजेट तरी असं किती फुगणार? मग आपल्या कुटुंबाच्या आनंदातच आपलाही आनंद असतो, वगैरे म्हणून मग आपल्या स्वत:च्या खरेदीवर फुली मारावी लागते. तेही आपण हसत हसत करतो. गमतीचा भाग सोडा, पण अगदी दर वेळी बायकोला अशी महागडी भेटवस्तू द्यायला लागते असं नाही. महत्त्वाचं असतं, तो वेळ देणं. हल्लीच्या काळात वेळेसारखी महाग वस्तू दुसरी मिळणं कठीण. जो तो आपला ह्यात! वेळ कुणालाच नाही. मग एकत्र कुटुंबातील भेटीगाठी, गप्पागोष्टीहे सगळं करायला दिवाळीसारखा दुसरा मुहूर्त नाही.
दिवाळीसारख्या मोठ्या सणाचं महत्त्व काय सांगावं! माणसाला जगण्यासाठी सदैव सकारात्मक विचारांची, आशेची, आकांक्षेची ऊर्जा लागते. आपल्याकडचे सण हे इंधन पुरवण्याचं काम करत असतात. शिवाय आनंदी वृत्ती असण्यासाठी ऐहिक श्रीमंतीची अट नसते. किंबहुना ऐहिकातल्या सुखाचं ओझंच होण्याची शक्यता अधिक. सुदैवानं सणांच्या रूपानं आपल्याकडं ही आनंदी वृत्ती बहुतेकांच्या अंगी अवतरते. अगदी हातावर पोट असलेल्या मजुरापासून ते अत्यावश्यक सेवा म्हणून ऐन सणाच्या दिवशीही कर्तव्यभावनेनं कार्यतत्पर असलेले सीमेवरील जवान, पोलिस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, एसटीचे ड्रायव्हर-कंडक्टर, रेल्वेचे मोटरमन, डिलिव्हरी बॉइज, पोस्टमन, कुरिअर बॉइज, डॉक्टर, नर्स, पत्रकार आणिदेशभरातील अशा अनेक व्यवसायांतील हजारो जण… अशा सर्वांनाच या सणाचा आनंद लुटण्याचा हक्क आहे. आपण करीत असलेलं काम नेकीनं, कर्तव्यभावनेनं पूर्ण करणं हाही त्यांच्या आनंदनिधानाचा भाग असू शकतो. तरीही कुटुंबासमवेत घरात राहून हा सण साजरा करण्याचं समाधान काही औरच, यात शंका नाही. घरातल्या प्रियजनांसोबत आकाशकंदील तयार करणं, रांगोळी काढणं आणि फुलांची आरास सजवणं अशा गोष्टी करण्याची मजा वेगळीच. पाडव्याच्या दिवशी गृहलक्ष्मीनं आपल्या पतीला औक्षण करणं आणि कुटुंबातील सौख्याचा हा ठेवा अबाधित राखण्यानं अबोल वचन निरांजनाच्या साक्षीनं देणं यातल्या सुखाचं मोजमाप करता येईल का? दिवाळीसारखा मोठा सण अर्थव्यवस्थेचं चाकही फिरवीत असतो. यंदा तर जीएसटीतील सवलतींमुळं अगदी खरेदीचा उत्सव आणि बचतीचा उत्सवही सुरू आहे. छोट्या छोट्याव्यावसायिकांपासून ते ऑनलाइन विक्री करणाऱ्या महाबलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत सर्वांना दिवाळीची पर्वणी खुणावत असते. नोकरदारांच्या हाती पडणाऱ्या बोनसमुळं बाजारात पैसा येतो आणि खरेदीचा आनंद घराघरांत पसरू लागतो. यंदाची दिवाळी हाच सगळा आनंद आणि सुख आपल्या आयुष्यात घेऊन आली आहे.
ज्योतीने ज्योत प्रकाशित होते, तसं या सणाच्या निमित्ताने आपण एकमेकांच्या चेहऱ्यांवर हसू फुलवू या. सगळे आनंदात असतील, सुखात असतील तर सण साजरा करण्याचा आनंद निश्चितच द्विगुणित होईल, नाही का!
प्रकाशपर्वाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा…

---

३. भाऊबीज 


श्रोते हो, नमस्कार!

आज भाऊबीज. आजच्या दिवसाला यमद्वितीयाही म्हणतात. दिवाळीतल्या पाच दिवसांपैकी हा एक खास दिवस बहीण आणि भावाच्या नात्याचा. आपल्याकडं देशभर भाऊबीज उत्साहानं साजरी करतात. उत्तरेत या सणाला भाईदूज असं म्हणतात. देशात काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत-टाकाचीही पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी यमुना नदीत स्नान करणं अत्यंत पवित्र समजलं जातं. आजच्या दिवसाला यमद्वितीया का म्हणतात, यम या मृत्यूच्या देवाशी याचा काय संबंध,असे प्रश्न लहानपणी पडायचे. नंतर पुढं त्यासंबंधीची लोकप्रिय कथाही ऐकण्यात आली. ती बहुतेकांना ठाऊक असेल. बहीण-भावाचं नातं अतिशय अवखळ, तितकंच निर्मळ. आपल्या आई-वडिलांखालोखाल आपल्यावर प्रेम, माया कोणाची असेल तर ती आपल्या भावंडांची. यात सख्खे, चुलत, आत्ये-मामे, मावस अशी सगळी भावंडं आली. अगदी ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती होती. एका घरात १५-२० माणसं सहज असायची. त्यामुळं आपली सख्खी किमान एक ते तीन भावंडं असायची आणि शिवाय चुलत भावंडंही असायची. त्यात सुट्टीत आपल्या घरी येणाऱ्या आत्ये-मामे भावंडांची भर पडायची. कधी आपण त्यांच्याकडं जायचो. त्यामुळं सगळ्यांनी एकत्र खेळायचं, दंगा करायचा, मस्ती करायची हे चालायचंच. यातूनच भावंडांमध्ये बंध निर्माण व्हायचे. लहानपणी तर हे खूपच जाणवतं. त्या वयात आपल्या मनावर बाकी कसलीही ओझी, कसलेही पूर्वग्रह किंवा विकार नसतात हेही खरं. त्यातही बहिणींची भावावरची माया अंमळ अधिकच. त्यात भाऊ लहान असेल तर त्याला जपायचं, इतरांपासून वाचवायचं हे सगळं भगिनीवर्ग अगदी प्रेमानं करतो. याउलट बहीण लहान असेल तर भाऊही तिच्यासाठी एक संरक्षक कडं होऊन उभा राहतो. या दोघांचंही नातं फारच खास असतं आणि ते आपण बहुतेकांनी कायमच अनुभवलेलं असतं. कित्येक सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये, गाण्यांमध्ये हे भावंडांचं प्रेम दिसून येतं. ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’सारख्या गाण्यांतून गदिमांनीही बहिणीचा भावाकडं केलेला हा गोड हट्ट अजरामर केला आहे. अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील. लग्न होऊन बहीण सासरी गेली, की मग तिची लवकर भेट होत नाही. पूर्वी तर प्रवास करणंही फार जिकिरीचं असायचं. त्यामुळं आपल्या जवळच्या लोकांना भेटण्यासाठी सणांचं निमित्त असायचं. मंडळी, आपल्या पुराणकथा म्हणा, किंवा लोककथा म्हणा… किती अर्थपूर्ण असतात ना! आपल्या प्रत्येक सणामागं, उत्सवामागं असा काही तरी व्यापक अर्थ दडलेला असायचा. काळ बदलला, तरी बहीण-भावांचं प्रेम कायम राहिलं आहे. आता आपण आठवत राहतो, की लहानपणी किती तरी काळ भावंडांबरोबर खेळलो आहोत. काळानुसार कुटुंबं लहान होत गेली… प्रवासाची साधनं वेगवान झाली, तरी कुटुंबं देश-विदेशांत पसरत गेली. मग प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आणि व्हिडिओ कॉलवर भाऊबीज साजरी व्हायला लागली. अर्थात, बहिणीनं हट्ट करावा आणि भावानं तो पुरवावा, यात काहीही खंड पडलेला नाही. फरक पडला असलाच, तर तो इतकाच, की हल्ली बहिणीही भावांकडून भेटवस्तू फक्त घेत नाहीत, तर स्वत:ही उलट त्याला भरभरून देतात. प्रेम तर त्यांचं कायम भावापेक्षा अधिकच असतं. बहिणीचा जीव भावाला भेटण्यासाठी तळमळत असतो. त्यामागे लहानपणीच्या गोड आठवणींची ओढ असते. भावा-बहिणीच्या या अवखळ, निर्मळ आणि पवित्र नातं साजरं करण्यासाठी आजचा दिवस खास असतो. सर्वांना या खास दिवसाच्या शुभेच्छा…

---

४. दिवाळी अंक व दिवाळी पहाट 

श्रोते हो, नमस्कार!

दिवाळीचा सण संपला असला, तरी चार दिवसांनीही या सणाचा उत्साह आणि उत्सवी वातावरण अजिबात कमी होत नाही. याला कारणीभूत दोन गोष्टी. या दोन गोष्टी म्हणजे आपल्याकडच्या दिवाळी सणाचा अविभाज्य भागच झाल्या आहेत. एक म्हणजे दिवाळी अंक आणि दुसरी म्हणजे दिवाळी पहाट कार्यक्रम.
गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून मराठी माणसाची दिवाळी या दिवाळी अंकांमुळं खरोखर समृद्ध होत आलेली आहे. मराठी माणसाच्या काही खास, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. त्यात दिवाळी अंक ही महत्त्वाची. दिवाळी हा मुळातच वर्षातला सर्वांत मोठा सण असल्यानं या काळात हात सैल सोडून खरेदी होत असतेच. त्यात आवडीचे दिवाळी अंक आवर्जून विकत घेतले जातात. बहुसंख्य सुशिक्षित मराठी कुटुंबांमध्ये ही परंपरा दीर्घकाळ चालत आलेली आहे. दिवाळीच्या सुट्टीत या अंकांचं वाचन हा फार मोठा आनंदसोहळा असायचा. मराठीत विपुल प्रमाणात दिवाळी अंक निघतात. नामवंत आणि वर्षानुवर्षं प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची संख्या साडेतीनशे ते चारशेच्या आसपास आहे. याशिवाय गावोगावी निघणारे अंक धरले तर ही संख्या दीड-दोन हजारांच्या घरात सहज जाईल. नियमित निघणारे नेहमीचे अंक म्हटले, तरी वर्षानुवर्षं हे अंक निघत आलेले आहेत, यातलं सातत्य वाखाखण्याजोगं आहे. या दिवाळी अंकांमधून दर्जेदार कथा, कविता आणि कादंबऱ्याही वाचकांना वाचायला मिळतात. अनेक मोठमोठ्या लेखकांची सुरुवात दिवाळी अंकांतून लेख लिहूनच झाली आहे. मराठीत कवींचं उदंड पीक बारमाही येत असतं, त्याला कारण त्यांच्या कविता प्रसिद्ध करणारे असे शेकडो अंक निघत असतात. आपल्या लहानपणी लायब्ररीतूनच दिवाळी अंक आणून वाचायची पद्धत होती. फारच थोडे अंक विकत घेतले जात. त्यातही ‘आवाज’सारख्या विनोदी अंकावर वाचकांच्या उड्या पडत. त्यातल्या त्या ‘खिडक्यां’चं आकर्षण बरेच दिवस होतं. विनोदी अंकांखालोखाल मागणी असायची ती भविष्यविषयक दिवाळी अंकांना. त्यानंतर मग दैनिकांनी काढलेले दिवाळी अंक आणि नंतर विशिष्ट विषयांना वाहिलेल्या अंकांचा नंबर लागत असे. या दिवाळी अंकांना पुढंही जवळपास सहा महिने भरपूर मागणी असे. त्यानंतर मग जुन्या झालेल्या अंकांचीही मित्रमंडळींत देवाणघेवाण चाले.
दिवाळी अंकांच्या जोडीला गेल्या ३०-३५ वर्षांत रुजलेला आणखी एक उपक्रम म्हणजे ‘दिवाळी पहाट’. अशा एखाद्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावायची, नंतर चविष्ट फराळाचा फन्ना उडवायचा आणि मग आवडता दिवाळी अंक वाचत दुपारी लोळत पडायचं, हा अनेकांचा आजही दिवाळातला ठरलेला कार्यक्रम आहे.
खरं तर दिवाळी पहाट ही आता आमच्या सांस्कृतिक उन्नयनाची अविभाज्य गोष्ट झाली आहे. ’पूर्वी हे नव्हतं,’ असं म्हणायला एक तरी गोष्ट आमच्या पिढीला मिळाली. दिवाळीला फटफटायच्या आत आंघोळी-पांघोळी नव्हे, नव्हे अभ्यंगस्नान…. करून रसिक माणसं ज्या त्वरेने पटापटा या अफाट पहाटा पाहायला जवळपासची नाट्यगृहं किंवा लॉन्स वगैरे गाठतात, ते पाहून केवळ अचंबित व्हायला होतं. पहाट ही पूर्वी केवळ अनुभवण्याची गोष्ट होती. आता ती अनुभवण्याबरोबर पाहण्याची-ऐकण्याचीही गोष्ट झालीय. पूर्वीच्या व्याकरणात ‘मी पहाट ऐकली’ हे वाक्य शंभर टक्के चुकीचं मानलं गेलं असतं. आता पहाट केवळ ऐकलीच जात नाही, तर ती एकशे दहा टक्के पाहिलीही जाते. या पहाटांमध्ये रसिक लोक विशेषतः जुनी मराठी गाणी ऐकतात. त्यातही मराठमोळ्या संस्कृतीचं वर्णन करणारी गाणी हॉट फेवरिट असतात. या पहाटांमुळं शहरभरची तमाम रसिक मंडळी सकाळी सकाळी स्वच्छ आवरून, नवे कपडे वगैरे घालून एकत्र जमतात हे कौतुकाचं आहे. पुढचे काही दिवस असंच वातावरण असेल. आपण त्याचा आनंद लूटू या… नमस्कार!

---

(समाप्त)

-----

(मुंबई आकाशवाणीवरील (अस्मिता वाहिनी) प्रसारणकाळ - २१ ते २४ ऑक्टोबर २०२५)

----


29 Oct 2025

रोहन मैफल लेख - दुलत यांचे पुस्तक

‘भ्रमजाला’च्या प्रदेशातले अंतरंग
--------------------------------------------------------------

गुप्तचरांचे जग वेगळेच असते. आपल्या सगळ्यांना गुप्तचरांच्या कथांमध्ये रुची असते. गुप्तहेर मंडळी कसं काम करतात, याविषयी उत्सुकता असते. ‘रिसर्च अँड ॲनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’ ही भारताची गुप्तचर संस्था. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सत्तरच्या दशकात ही संस्था स्थापन केली. आर. एन. काव हे या संस्थेचे पहिले प्रमुख. त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी अनेक अभिमानास्पद दंतकथा आपण ऐकत आलेलो आहोत. ‘रॉ’ ही संस्था प्रामुख्याने भारताबाहेरील कामे पाहते, तर देशांतर्गत कामे ‘इंजेलिजन्स ब्यूरो’ (आयबी) ही संस्था पाहते. या दोन्ही संस्थांमध्ये दीर्घकाळ काम केल्याचा अनुभव असलेले ज्येष्ठ गुप्तचर अधिकारी अमरजितसिंग (ए. एस.) दुलत यांचं ‘ए लाइफ इन द शॅडोज’ हे नवं पुस्तक वाचताना आपल्याला या गुप्तचर विश्वाविषयी अधिक कुतूहल वाटू लागतं, त्याविषयी अधिक जाणून घ्यावंसं वाटतं, हे नक्की. रोहन प्रकाशनाने याच नावाने या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. मिलिंद चंपानेरकर यांनी सहज-सोप्या भाषेत केलेला हा अनुवाद वाचनीय आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, दुलत यांचं हे पुस्तक प्रकाशित होईपर्यंत (मूळ पुस्तक २०२३ मध्ये प्रकशित) कोणत्याही भारतीय वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने आपल्या कारकिर्दीच्या आठवणी सांगणारं पुस्तक लिहिलेलं नव्हतं. दुलत यांच्या या पुस्तकाचं महत्त्व त्या अर्थानेही खूप मोठं आहे. भारतीय गुप्तचर संस्थांच्या अंतरंगाची एवढी तपशीलवार ओळख आणि मुख्य म्हणजे दुलत यांचे वैयक्तिक अनुभव या पुस्तकामुळे आपल्यासमोर येतात. ते वाचताना एखादी घटना घडते तेव्हा त्याच्या आगेमागे किती तरी गोपनीय गोष्टी कशा घडत असतात, याचा काहीसा अंदाज वाचकाला येऊ शकतो.
दुलत यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे टप्पे आले. त्यातही काश्मीरमध्ये त्यांनी केलेले काम विशेष महत्त्वाचे मानले जाते. दुलत यांना काश्मीर विषयाचे तज्ज्ञच म्हटले जाते, एवढा त्यांचा या समस्येचा अभ्यास आहे. काश्मीर समस्या सोडविण्यासाठी तेथील जनतेशी संवाद साधायला हवा, हे त्यांच्या धोरणाचे सूत्र होते. ‘काश्मीर - द वाजपेयी इयर्स’ आणि ‘द स्पाय क्रॉनिकल्स’ या दोन पुस्तकांतून त्यांनी या विषयावर तपशीलवार व भरपूर लिखाण केले आहे. ‘ए लाइफ इन द शॅडोज’ या पुस्तकातही अर्थातच काश्मीरचा उल्लेख आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांच्याशी दुलत यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे फारुक यांच्याविषयी व एकूणच अब्दुल्ला घराण्याविषयी त्यांनी अतिशय आत्मीयतेने लिहिले आहे. ‘रॉ’मधून निवृत्त झाल्यावर दुलत यांची पंतप्रधान कार्यालयात ‘काश्मीरविषयक सल्लागार’ म्हणून नियुक्ती झाली. वाजपेयी पंतप्रधान असताना म्हणजे जानेवारी २००१ ते मे २००४ या काळात ते या पदावर होते. या काळात त्यांनी काश्मिरी लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. दुलत यांच्या ऐन उमेदीच्या काळात त्यांचा ‘मि. काश्मीर’ असाच उल्लेख केला जात असे, यावरून त्यांचा या प्रश्नातील सखोल अभ्यास लक्षात येतो. दुलत यांचा जन्म १९४० मध्ये (आता पाकिस्तानात असलेल्या) पंजाबमधील सियालकोट येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे वडील न्या. समशेसिंग दुलत सर्व कुटुंबीयांसह दिल्लीला आले. दुलत यांचं शिक्षण दिल्ली, सिमला व चंडीगड इथं झालं. चंडीगड या शहराविषयी दुलत यांना विशेष प्रेम आहे आणि ते त्यांच्या लिखाणातूनही दिसून येतं. ते १९६५ मध्ये आयपीएस झाले आणि भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले. त्यानंतर, १९६९ मध्ये त्यांनी ‘आयबी’त नियुक्ती झाली. तिथं ते सुमारे ३० वर्षं होते. नव्वदच्या आसपास काश्मीरमध्ये अत्यंत तणावपूर्ण वातावरण असताना व काश्मिरी पंडितांचे भयानक स्थलांतर सुरू असताना दुलत ‘काश्मीर ग्रुप’च्या प्रमुखपदी होते. पुढे ‘रॉ’च्या प्रमुखपदी त्यांनी नियुक्ती झाली.
या पुस्तकात एकूण नऊ प्रकरणे आहेत. त्यात दुलत यांच्या जवळपास सर्व कारकिर्दीचा आढावा त्यांनी घेतला आहे. यातील ‘काही थोर व्यक्तींच्या सान्निध्यात’ आणि ‘राष्ट्रपतींसोबत प्रवास’ ही दोन प्रकरणे विशेष वाचनीय झाली आहेत. ‘काही थोर व्यक्तीच्या सान्निध्यात’ या प्रकरणात ज्येष्ठ पोलिस अधिकारी अश्विनीकुमार, पॅलेस्टिनी नेते यासर अराफत, प्रिन्स चार्ल्स (सध्याचे ब्रिटनचे राजे), मार्गारेट थॅचर, आधुनिक सिंगापूरचे जनक मानले जाणारे थोर नेते ली क्वान यू, राजेश पायलट आदी व्यक्तिमत्त्वांविषयी दुलत यांनी तपशीलवार लिहिले आहे. यातील परदेशी नेत्यांच्या भारत दौऱ्यात दुलत यांच्याकडे त्या व्यक्तींच्या सुरक्षेची व दौऱ्यातील प्रवास वगैरे सर्व बाबींची जबाबदारी होती. त्यामुळे या प्रकरणातील त्यांचे सर्व अनुभव अतिशय वेधक व वाचनीय झाले आहेत. राजेश पायलट यांच्याबरोबर त्यांची अतिशय हृद्य मैत्री झाली होती व पायलट यांच्या अकाली निधनाने दुलत यांना अतिशय दु:ख झाले. या व्यक्तिचित्र वर्णनाला थोडी वैयक्तिक व भावनिक किनार लाभल्याने ती वाचण्यास अतिशय रोचक झाली आहेत. ‘राष्ट्रपतींसोबत प्रवास’ या प्रकरणात तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्यावर अमेरिकेत होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी दुलत त्यांच्याबरोबर अमेरिकेत गेले होते, त्या सर्व दौऱ्याचं रंजक वर्णन आहे. ते मुळातूनच वाचायला हवं. या दौऱ्यात झैलसिंग यांचे कुटुंबीयही होते. खुद्द झैलसिंग यांचा स्वभाव, त्यांच्या कुटुंबीयांचे वागणे यावर दुलत त्यांच्या खास शैलीत टिप्पणी करतात, तो सर्व भाग अनुवादकानेही अतिशय सहज-सुलभपणे आपल्यापर्यंत पोचविला आहे.
‘डॉक्टरसाहिब आणि काश्मिरीयत’ या प्रकरणात फारुक अब्दुल्लांसोबत असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांबद्दल दुलत यांनी लिहिलं आहे. त्याच अनुषंगाने या आणि त्यापुढच्या ‘काश्मिरीयत : काश्मिरी लोक आणि दिल्ली’ या प्रकरणात काश्मीर प्रश्नाविषयीही त्यांनी पुरेसा ऊहापोह केला आहे. त्यावरून हा प्रश्न किती गुंतागुंतीचा झाला आहे, हे आपल्या लक्षात येतं. अर्थात दुलत यांची सध्याच्या सत्ताधारी पक्षाविषयीची नाराजीही त्यातून लपून राहत नाही.
 काही वाचकांना या पुस्तकातील सर्वांत रोचक प्रकरण वाटेल ते ‘गुप्तचर मित्र : दोन ‘स्पायमास्टर्स’ची कहाणी’ हे. या पुस्तकात दुलत यांनी सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व भारताचे अतिशय ज्येष्ठ, यशस्वी व महत्त्वाकांक्षी गुप्तचर अजित डोवाल यांच्याविषयी लिहिले आहे. डोवाल हे दुलत यांना ज्युनिअर. त्यांची सर्व कारकीर्द दुलत यांच्यासमोर घडली आहे. त्याआधारे दुलत यांनी डोवाल यांच्याविषयी लिहिले आहे. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
गुप्तचर अधिकाऱ्यांना अनेक घटनांविषयी फार तपशिलात लिहिता येत नाही. त्यांच्यावर अनेक बंधने असतात. तरीही दुलत यांचे हे पुस्तक पुरेसे रंजक झाले आहे. उलट या पुस्तकाच्या वाचनानंतर त्या विश्वाविषयीचे आपले कुतूहल अधिकच वाढते आणि तेच या पुस्तकाचे यश आहे.

 ए लाइफ इन द शॅडोज
लेखक : ए. एस. दुलत
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
प्रकाशक : रोहन प्रकाशन
किंमत : ४९५ रुपये.


---

(पूर्वप्रसिद्धी : रोहन मैफल)

---

26 Sept 2025

रोहन मैफल लेख - श्यामा कादंबरी परीक्षण

अश्लीलतेच्या आरोपातून सुटलेली ‘श्यामा’ पुन्हा भेटीला...
---------------------------------------------------------------------

विसाव्या शतकातील लोकप्रिय, प्रसिद्ध, पण काहीसे वादग्रस्त लेखक चंद्रकांत काकोडकर यांची ‘श्यामा’ ही विविध कारणांनी गाजलेली कादंबरी रोहन प्रकाशनाने पुन्हा वाचकांच्या भेटीसाठी आणली आहे. ‘श्यामा’ ही कादंबरी ‘रंभा’ या दिवाळी अंकातून १९६२ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर लगेचच १९६३ मध्ये ती पुस्तकरूपात बाजारात आली. ती वाचल्यानंतर तिच्यावर अश्लीलतेचे आरोप केले गेले. पुण्यातील श्रीकृष्ण भिडे यांनी न्यायालयात खटला गुदरला. हा खटला रंभा या दिवाळी अंकावरच भरण्यात आला होता. त्यातील अनेक लेखकांना न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. न्यायालयाने अनेकांना २५ रुपये दंड करून सोडून दिले. मात्र, काकोडकर दंड भरण्यास तयार झाले नाहीत. ‘माझ्या कादंबरीत काहीही अश्लील नाही,’ असेच त्यांचे ठाम म्हणणे होते. पुढे त्यांचे स्नेही ॲड. सुशील कवळेकर यांच्या मदतीने काकोडकर यांनी आधी हायकोर्टात व तिथे हरल्यावर सुप्रीम कोर्टापर्यंत या निकालाविरोधात दाद मागितली. १९६३ ते १९६९ अशी सहा वर्षे व त्या काळातील साडेदहा हजार रुपये खर्च केल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने ही कादंबरी अश्लील नाही, असा निर्वाळा दिला आणि काकोडकर जिंकले. त्या काळातील माध्यमांतही या खटल्याची भरपूर चर्चा झाली होती. हा खटला जिंकल्यानंतर १९७१ मध्ये या खटल्याच्या साक्षीपुराव्यांसह ही कादंबरी पुन्हा एकदा प्रसिद्ध झाली आणि तीच या कादंबरीची पहिली व शेवटची आवृत्ती ठरली. खटला जिंकला असले तरी ‘अश्लील साहित्य लिहिणारे लेखक’ असा शिक्का बसल्याने काकोडकर मराठी साहित्याच्या ‘अभिजात व अभिरुचीसंपन्न’ मुख्य प्रवाहातून जणू बाहेर फेकले गेले. अर्थात मनस्वी स्वभावाच्या काकोडकरांनी हार मानली नाही. वर्षाला वीस ते पंचवीस कादंबऱ्यांचा अक्षरश: रतीब पुढे ते घालू लागले. आधी ‘चंद्रकांत’ या दिवाळी अंकात ते चार ते पाच कादंबऱ्या लिहीत. नंतर ‘काकोडकर’ नावाचाच एक दिवाळी अंक काढायला त्यांनी सुरुवात केली. दहा हजार अंकांची आवृत्ती काढूनही त्यांना अनेकदा पुनर्मुद्रण करावे लागे, एवढी त्या अंकाची लोकप्रियता होती. ‘श्यामा’वरील खटल्याचा जणू सूड म्हणून त्यांच्या पुढच्या कादंबऱ्यांत ‘उरोजाधिष्ठित’ वर्णनांची रेलचेल वाढली. फिरत्या वाचनालयांमध्ये, तसेच एकूणच तेव्हाच्या महाराष्ट्रात सर्वदूर काकोडकर हे प्रचंड खपाचे, वाचले जाणारे लेखक ठरले. असे असले तरी तत्कालीन समीक्षकांनी त्यांच्याकडे कायमच दुर्लक्ष केले वा त्यांच्या साहित्याला ‘काकोडकरी साहित्य’ म्हणून हिणवले.
वास्तविक तरुण वयात काकोडकरांवर शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबऱ्यांचा खूप प्रभाव होता. त्यांच्या सुरुवातीच्या ‘निसर्गाकडे’, ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी’ आआणि ‘९ ऑगस्ट’ या कादंबऱ्या सामाजिक विषयांवरच्या होत्या. ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी’ या कादंबरीला तर बंगालमधल्या भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी होती. पुढच्या काळातही त्यांनी अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या. शंकरराव कुलकर्णी व वासू मेहेंदळे यांनी त्या प्रामुख्याने प्रकाशित केल्या. पुढे त्यांनी ‘राजाराम राजे’ हे डिटेक्टिव्ह पात्रही निर्माण केले. तत्कालीन मराठी मध्यमवर्गाच्या अनुभवविश्वाच्या पलीकडे असलेले अनेक विषय (उदा. रेसकोर्स, सुपर मार्केट) त्यांच्या लेखनात तेव्हा सहजी येत असत.
पुढे काकोडकरांनी श्यामा कादंबरी लिहिली, त्यामागे श्रीकृष्ण पोवळे या तत्कालीन प्रसिद्ध व काकोडकरांशी मैत्री असलेल्या कवीचे जीवनचरित्र काल्पनिक अंगाने रेखाटण्याचा हेतू असावा, असे  निरीक्षण या नव्या आवृत्तीची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिणारे लेखक पंकज भोसले यांनी नोंदविले आहे. श्यामा कादंबरीचा नायक निशिकांत कदम हे पात्र पोवळे यांच्यावरच बेतलेले असावे, असे दिसते. किंबहुना कादंबरीचे शीर्षक ‘श्यामा’ असे असले, तरी ती मुख्यत: निशिकांतच्या ‘आत्म-देवदास’ वृत्तीची कहाणी सांगणारी कादंबरी आहे, असे भोसले प्रस्तावनेत नमूद करतात.
यासाठी भोसले यांनी श्रीकृष्ण पोवळे या आता पूर्ण विस्मृतीत गेलेल्या, मात्र तत्कालीन मराठी साहित्यवर्तुळात बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेल्या कवीचा अभ्यासपूर्ण शोध घेतला आहे. त्यातून मिळालेली माहिती त्यांनी प्रस्तावनेत तपशीलवार दिली आहे. ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. याशिवाय खुद्द काकोडकर यांचे मनोगत आणि सर्वोच्च न्यायालयातील खटल्याबाबत ॲड. कवळेकर यांनी ‘ललित’मध्ये १९६९ मध्ये लिहिलेला लेख या नव्या आवृत्तीत मुद्रित करण्यात आला आहे. भोसले यांची प्रस्तावना, काकोडकर यांचे या खटल्याविषयीचे मनोगत आणि कवळेकर यांचा लेख आधी वाचून मग ही कादंबरी वाचण्यात अधिक मजा आहे.
‘श्यामा’चा नायक निशिकांत कदम हा शिक्षक आहे, तसेच ध्येयवादी विचारांचा कवीही आहे. श्यामा शिंदे या कलाशिक्षिकेशी त्याची ओळख होते. मात्र, आधीची दोन फसलेली प्रेमप्रकरणे आठवून तो श्यामाबाबत सावध पावले उचलतो. नीला आणि वनिता यांच्यासह झालेल्या निशिकांतच्या प्रेमक्रीडांच्या आठवणी हाच काय तो या कादंबरीतील शृंगाराचा (वा कथित अश्लील) भाग आहे. श्यामा विचारांनी मोकळीढाकळी असल्याने तिला शाळेतही इतर शिक्षकांकडून जाच होत असतो. त्यातून निशिकांत तिला बाहेर काढतो. आपल्या कवितांना चाली लावण्यास तो श्यामाला प्रवृत्त करतो आणि पुढे तिला आकाशवाणीवरील लोकप्रिय गायिका करतो. पुढे गायिका म्हणून होणारी श्यामाची प्रगती आणि संवेदनशील असलेल्या निशिकांतचे गैरसमज यांतून कादंबरीचे कथानक पुढे जाते.
यातील निशिकांत कदम ही व्यक्तिरेखा काकोडकरांनी श्रीकृष्ण पोवळे यांच्यावरून घेतली असावी, असे मानण्यास वाव आहे. एक तर या कादंबरीच्या नायकाच्या म्हणून ज्या कविता काकोडकरांनी कादंबरीत वापरल्या आहेत त्या पोवळे यांच्याच आहेत. पोवळे व काकोडकर स्नेही होते. त्यातूनच त्यांनी काकोडकरांना या आपल्या कविता त्यांच्या कादंबरीत वापरण्यास दिल्या. काकोडकरांनी कादंबरीच्या प्रस्तावनेत तसा उल्लेखही केलेला आहे. याच प्रस्तावनेत ही कादंबरी पोवळ्यांवर आधारित नाही, असे काकोडकरांनी म्हटले असले, तरी ‘कित्येकांना त्यात कदाचित श्रीकृष्ण पोवळे सापडतीलही’ असेही नमूद केले आहे. या उल्लेखानंतर पंकज भोसले यांनी बरेच परिश्रम घेऊन पोवळे यांच्याविषयीही माहिती गोळा केली. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘काकोडकरांनी श्यामा लिहिली तेव्हा पोवळ्यांचे समाजातील आणि साहित्य व्यवहारातील स्थानही रसातळाला गेले होते. अधिकाधिक काळ वेश्येच्या माडीवर आणि सातत्याचे मद्यास्वादक ही त्यांची छबी शिल्लक राहिली होती. पण त्या आधी वीस-पंचवीस वर्षे मराठीतील उमर खय्याम असा कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होत होता.’
एकूणच, ‘श्यामा’ कादंबरी व तिच्या अश्लीलता खटल्याचे हे सारे नाट्य अतिशय रंजक आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात या घटनेची दखल घेतल्याशिवाय पुढे जाणे कठीण आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी व इतरही सर्व वाचकांनी आवर्जून वाचावी अशी ही ‘श्यामा’ची नवी आवृत्ती आहे. मूळ कादंबरी आज वाचली, तर ती ठीकठाकच आहे असे वाटते.
अर्थात काकोडकरांनी ज्या काळात ही कादंबरी लिहिली तो महाराष्ट्रात एका अर्थाने साहित्यिक ‘रेनेसान्स’चा काळ होता. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर साहित्य, संस्कृतीची जोपासना करण्यासाठी सरकारी संस्था स्थापन झाल्या. स्वातंत्र्यानंतर वेगवेगळे जनसमूह खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा व अभिव्यक्तीचा अनुभव घेत होते. साठोत्तरी साहित्यात विद्रोहाची जी ठळक वाट दिसते, त्या वाटेवर दलित साहित्य, स्त्री साहित्य, ग्रामीण साहित्य असे अनेकानेक प्रवाह वाहते झाले होते. वाचनालयांची संख्या वाढली. वाचणाऱ्यांची संख्या वाढली. या नव्याने वाचणाऱ्या वाचकांना काकोडकरांनी मोठंच खाद्य पुरवलं. जनप्रिय साहित्यनिर्मितीची जी वाट तिथून सुरू झाली, त्या वाटेची काकोडकर, बाबा कदम, सुहास शिरवळकर, चंद्रकांत खोत आदी मंडळी महत्त्वाची शिलेदार होती.
काकोडकरांची ‘श्यामा’ याच काळाचं एक अपत्य. वर म्हटल्याप्रमाणे कादंबरी म्हणून ती ठीकठाकच असली, तरी केवळ त्या काळात तिच्यावर अश्लीलतेचा शिक्का बसल्याने तिची एवढी चर्चा झाली. आजच्या ‘लिव्ह-इन’, ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’ आणि ‘सिच्युएशनशिप’च्या काळात तर अनेकांना ही कादंबरी निव्वळ सात्त्विकही वाटू शकेल. ‘उरोजाधिष्ठित’ वर्णनांची जागा आता ‘इन्स्टा’वरच्या ‘प्रत्यक्ष दृश्यांनी’ घेतली आहे. असं सगळं बदललेलं असताना या कादंबरीचं आजचं रंजनमूल्य केवळ त्या प्रेमक्रीडा वर्णनांपेक्षा तिच्या या अद्भुत प्रवासामुळे अधिक झालं आहे, असं नक्की म्हणावंसं वाटतं.

----

(पूर्वप्रसिद्धी - रोहन मैफल)

---------