30 Nov 2017

अक्षयकुमार - साहित्य शिवार लेख

खिलाडी नं. १
-------------
अक्षयकुमार हा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक देखणा, कर्तबगार असा दिग्गज अभिनेता. नुकतीच त्याच्या कारकिर्दीला रौप्यमहोत्सवी २५ वर्षं पूर्ण झाली. एवढा काळ टिकून राहणं आणि त्यातही अव्वल स्थानावर राहणं हे यश सहज सगळ्यांना जमतंच असं नाही. पण 'अक्की'ला ते सहज जमून गेलंय. गेल्या महिन्यातच, म्हणजे ९ सप्टेंबरला त्याला वयाची ५० वर्षं पूर्ण झाली. त्याच्याकडं बघून अर्थातच हे खरं वाटत नाही. उंचापुरा, पंजाबी, रांगड्या देहयष्टीचा हा अभिनेता अजून किती तरी वर्षं नायकाच्या भूमिकेत फिट्ट बसेल, असंच वाटतं. नायकाच्या म्हणजे अगदी टिपिकल नायकाच्या नव्हे. तसा टिपिकल नायक अक्षयकुमारनं त्याच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला रंगवला. मात्र, अलीकडच्या दहा-बारा वर्षांत त्याच्या भूमिकांमध्ये वैविध्य दिसू लागलं आहे. आपल्या वयानुरूप वेगवेगळ्या छटांच्या भूमिका तो करू लागलाय. त्यामुळंच तो इथं दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यताही वाढली आहे. अक्षयनं गेल्या २५ वर्षांत शंभरहून अधिक सिनेमांत काम केलंय आणि त्यातले बरेचसे शंभर कोटी रुपयांहून अधिक गल्ला गोळा करणारे आहेत. अलीकडंच 'रुस्तुम' या सिनेमातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय दोन फिल्मफेअर पुरस्कारही त्यानं मिळवले आहेत. एका पाहणीनुसार, अक्षयकुमार हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. चार वर्षांपूर्वी, म्हणजे २०१३ मध्ये झालेल्या एका पाहणीनुसार, अक्षयकुमारच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मिळविलेली रक्कम दोन हजार कोटींहून अधिक होती. तेव्हा अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय अभिनेता होता. यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पाहणीनुसार, त्याच्या चित्रपटांनी मिळविलेली रक्कम तीन हजार कोटींच्या वर गेली होती. अर्थातच तो आजच्या घडीचा हिंदीतील एक मोठा स्टार आहे, यात शंका नाही.
हिंदी सिनेमाचा हिरो म्हटलं, की लोकांच्या मनात वर्षानुवर्षं जपलेल्या काही प्रतिमा असतात. अफाट श्रीमंती, प्रासादतुल्य निवासस्थान, महागड्या गाड्यांचा ताफा, सहकलाकार नट्यांसोबतची अफेअर्स, क्वचित अंमली पदार्थांचं व्यसन इ. इ. काही हिरो म्हणजे अगदीच हस्तिदंती मनोऱ्यात राहणारे. लोकांना वर्षानुवर्षं त्यांचं नखही बाहेर दिसणार नाही; तर काही म्हणजे प्रसिद्धीच्या मागं नुसते वेडेपिसे... काहीही करून चर्चेत राहायचं एवढंच त्यांना ठाऊक. अक्षयकुमारचं सगळं करिअर बघितलं, तर तो असल्या गोष्टींपासून कटाक्षानं दूर राहिलेला दिसतो. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याचीही अनेक नट्यांसोबत अफेअर्स झाली. पूजा बात्रा ही त्याची गाजलेली पहिली प्रेयसी. रविना व शिल्पा शेट्टीबरोबरची प्रकरणं तर विशेष गंभीर होती. पण ती काही पुढं मार्गी लागलं नाही. मात्र, एकदा २००१ मध्ये ट्विंकल खन्नासोबत लग्न झाल्यानंतर अक्षयनं शहाण्या नवऱ्यासारखा संसार केला आहे. (अपवाद प्रियांका चोप्रासोबतच्या अफेअरचा... पण त्यातून अक्षय लवकरच बाहेर आला...) त्याला आरव व नितारा अशी दोन मुलंही आहेत. गेल्या १५-१६ वर्षांत गैरकारणांसाठी त्याचं नाव कधीही चर्चेत आलं नाही. त्याची पत्नी ट्विंकल हीदेखील स्वतंत्र प्रज्ञेची स्त्री आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला तिनंही काही नायिकेच्या भूमिका केल्या. पण तिला फार काही यश लाभलं नाही. नंतर तिला लेखनात तिचा आनंद गवसला. विशेषतः विनोदी लेखनावर तिची हुकूमत आहे. आता तर ती एक उत्कृष्ट लेखिका म्हणून ओळखली जाते. तिची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत. असं हे जोडपं आपापल्या कामांमध्ये आनंदात आहे. अक्षयकुमारची कामावरची निष्ठा अविचल आहे. आपल्या कामाचा तो पुरेपूर आनंद घेताना दिसतो. तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरही दिसतो. तो निर्व्यसनी आहे. उशिरापर्यंतच्या पार्ट्यांना तो कधीही जात नाही. शूटिंग नसेल त्या दिवशी तर तो रात्री दहा वाजता झोपतो आणि सकाळी लवकर उठून व्यायाम करतो, असं त्याचे जवळचे मित्र सांगतात. स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला त्याचं सर्वाधिक प्राधान्य असतं. असं शिस्तबद्ध जगणं असल्यामुळंच तो एक यशस्वी अभिनेता होऊ शकला आहे, यात वाद नाही. 
अक्षयकुमार हा मूळचा राजीव हरिओम भाटिया. पंजाबी पुत्तर... नऊ सप्टेंबर १९६७ रोजी अमृतसरमध्ये त्याचा जन्म झाला. त्याचे वडील हरिओम भाटिया लष्करात अधिकारी होते. (त्यामुळंच अक्षयला लहानपणापासून शिस्तीची सवय लागली असावी.) आई अरुणा आणि एक बहीण अलका असं हे कुटुंब. अक्षयचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिल्लीच्या डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये झालं. हे कुटुंब तेव्हा दिल्लीतील चांदणी चौक परिसरात राहत होतं. उच्च शिक्षणासाठी तो मुंबईच्या गुरुनानक खालसा कॉलेजमध्ये आला. लहानपणापासून सुदृढ तब्येत असलेल्या अक्षयला मार्शल आर्टसची विशेष आवड होती. तायक्वोंदोमध्ये त्यानं ब्लॅक बेल्ट ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त केली आहे. या मार्शल आर्टसमधील पुढील शिक्षणासाठी त्यानं थायलंड गाठलं. बँकॉकमध्ये शिकता शिकता त्याला शेफची नोकरी मिळाली. अक्षय उत्तम कुक आहे. वडिलांप्रमाणे लष्करात किंवा नौदलात जाऊन देशसेवा करायची, असं त्याचं सर्वसामान्य तरुणाप्रमाणं एक स्वप्न होतं. सिनेमात आपण कधी जाऊ आणि हिरो होऊ, असा विचारही त्याच्या मनाला तोपर्यंत शिवला नव्हता. कामाच्या शोधात तो थायलंडवरून बांगलादेशात गेला. तिथून कोलकत्यात आला. तिथं त्यानं एका ट्रॅव्हल एजन्सीत नोकरी गेली. पण तिथं मन रमेना म्हणून तो परत मुंबईला आला. तिथं सुरुवातीला त्यानं दागिने विकण्याचा व्यवसाय केला. तिथं त्याची ओळख जयेश सेठ या नामवंत सिने फोटोग्राफरशी झाली. जयेशनं आपला पोर्टफोलिओ करावा, यासाठी अक्षयनं सुमारे वर्षभर त्याच्याकडं लाइट धरणे वगैरे असली काम फुकट वर्षभर केली. एकदा गोविंदाचे फोटो द्यायला अक्षय त्याच्या घरी गेला असता, गोविंदानं त्याच्याकडं पाहून तू सिनेमात हिरो म्हणून काम का करीत नाहीस, असं विचारलं. तेव्हापासून अक्षयच्या डोक्यात ही गोष्ट ठाण मांडून बसली आणि त्यानं सिनेमात येण्याची धडपड सुरू केली. मग १९९० मध्ये त्यानं अभिनयाचा एक कोर्स केला. नंतर त्याला एका  सिनेमात फुटकळ काम मिळालं. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्याला कळलं, की त्याच्या वाट्याला फक्त सात सेकंदाचं काम आलंय. त्या सिनेमाच्या नायकाचं नाव अक्षय होतं. त्यामुळं राजीव भाटियानं स्वतःचं नाव बदलून 'अक्षयकुमार' असं करून घेतलं. अशा रीतीनं राजीव भाटियाचा 'अक्षयकुमार' झाला...
आपला पोर्टफोलिओ घेऊन अक्षयकुमार निर्मात्यांचे उंबरठे झिजवू लागला. पण नरेंद्र नावाच्या एका मेकअपमननं त्याचा पोर्टफोलिओ पाहून त्याला एका दिग्दर्शकाकडं नेलं. इथं अक्षयकुमारचं नशीब पालटलं. त्याला एका दिवसात तीन चित्रपटांच्या ऑफर आल्या आणि सोबत ५१०० रुपयांची साइनिंग अमाउंटही मिळाली. त्या पहिल्या चित्रपटाचं नाव होतं - सौगंध. १९९१ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याला फारसे यश मिळाले नाही. पण त्यानं त्या वेळी साइन केलेला दुसरा चित्रपट होता अब्बास-मस्तान यांचा 'खिलाडी'. हा सिनेमा १९९२ मध्ये प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. या सिनेमानं खऱ्या अर्थानं अक्षयकुमारला चित्रपट जगतातला नामांकित 'खिलाडी' बनवलं आणि त्याचं करिअर मार्गाला लागलं. 

'खिलाडी'च 'खिलाडी'
'खिलाडी' हा एक सस्पेन्स चित्रपट होता. अब्बास-मस्तान यांची ती खासियत होती. हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर 'खिलाडी' नाव आणि अक्षयकुमार असं एक समीकरणच झालं. यानंतर अक्षयनं 'मैं खिलाडी तू अनाडी', 'खिलाडियों का खिलाडी', 'इंटरनॅशनल खिलाडी', 'सब से बडा खिलाडी', 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी', 'खिलाडी ४२०' आणि 'खिलाडी ७८६' अशा तब्बल सात 'खिलाडी'पटांत काम केलं. एक अॅक्शन हिरो म्हणून अक्षयकुमार ओळखला जाऊ लागला. त्याच काळात आमीर, शाहरुख व सलमान चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले होते. अजय देवगणनंही १९९२ मध्ये 'फूल और काँटे'मधून चित्रपदार्पण केलं होतं. हे पाचही जण पुढील २५ वर्षं चित्रपटसृष्टीवर राज्य करत राहतील, असं तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं. विशेषतः अक्षयकुमारच्या बाबतीत तर नक्कीच... सुरुवातीचे त्याचे चित्रपट सर्वसामान्य, अॅक्शनपट होते. मात्र, १९९४ मध्ये आलेल्या 'मोहरा' या चित्रपटानं अक्षयकुमारला देशभर नाव मिळवून दिलं. या चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' या गाण्यानं देशात एकच धूम उडवली. अक्षयकुमार आणि रवीना यांचं अफेअर याच काळातलं. पुढची काही वर्षं अक्षयसाठी भरपूर सिनेमांची गेली. दर वर्षी त्याचे तीन-चार, तीन-चार सिनेमे येत गेले. यात 'खिलाडी'पट होते, तसेच 'सुहाग', 'संघर्ष', 'आरजू', 'जानवर' असे काही उल्लेखनीय चित्रपटही होते. मात्र, तरीही अक्षयची अॅक्शन हिरो ही एकच इमेज कायम होती. यश चोप्रांच्या 'दिल तो पागल हैं' या १९९७ मध्ये आलेल्या चित्रपटातलं अक्षयचं पाहुण्या कलाकाराच्या रूपात येणं सुखावह होतं. 

'हेराफेरी' अन् विनोदपट
यानंतर २००० मध्ये आला प्रियदर्शनचा 'हेराफेरी'. हा एका तमिळ सिनेमाचा रिमेक होता. यात परेश रावल, तब्बूसह अक्षय आणि सुनील शेट्टीनं धुमाकूळ घातला. 'हेराफेरी' सुपरहिट ठरला. या सिनेमानं अक्षयनं उत्तम विनोदी भूमिका करता येतात, याचा साक्षात्कार फिल्म इंडस्ट्रीला झाला. याच वर्षी आलेल्या 'धडकन'नं अक्षयला अॅक्शनसोबतच रोमँटिक हिरो म्हणूनही प्रस्थापित केलं. आता अॅक्शन, विनोद आणि रोमान्स या सर्व शैलींमध्ये त्याला प्रेक्षक स्वीकारू लागले होते आणि दिग्दर्शकही त्याला तशा प्रकारच्या भूमिका देऊ लागले होते. या यशानंतर अक्षयकुमारनं एक महत्त्वाची गोष्ट केली. लग्न केलं. ट्विंकलसोबत त्याचं प्रणयाराधन सुरू असताना लग्नाचा त्याचा फारसा विचार नव्हता. मात्र, ट्विंकलची आई डिंपल कपाडियानं त्याला लग्नाचा आग्रहच केला आणि १७ जानेवारी २००१ रोजी दोघांचं लग्न झालं. 
त्या वर्षीच आलेल्या अब्बास-मस्तान यांच्या 'अजनबी'मध्ये अक्षयनं पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका रंगविली. विक्रमच्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळाला. 
'हेराफेरी'नंतर अक्षयकुमारनं केलेल्या विनोदी चित्रपटांत 'मुझसे शादी करोगी?', 'गरम मसाला', 'भागमभाग', 'सिंग इज किंग' आदी चित्रपटांचा समावेश होता. या काळातच डेव्हिड धवनच्या 'मुझसे शादी करोगी?' या रोमँटिक विनोदी चित्रपटात अक्षयसोबत सलमान खान आणि प्रियांका चोप्रा हे दोघं झळकले होते. यानंतर अक्षयनं 'अंदाज', 'आँखे', 'खाकी', 'आन : मेन अॅट वर्क', 'ऐतराज' असे महत्त्वाचे चित्रपट केले. यात 'आँखे'मध्ये त्यानं अंध तरुणाची भूमिका साकारली होती, तर मधुर भांडारकरच्या 'आन'मध्ये तो पोलिस अधिकारी होता. 'ऐतराज'मध्ये त्यानं लेडी बॉसकडून लैंगिक शोषण होत असलेल्या तरुणाची भूमिका साकारली होती. यात त्या बॉसची भूमिका प्रियांका चोप्रानं केली होती, तर त्याच्या पत्नीची भूमिका करिना कपूरनं केली होती. या चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेची खूप तारीफ झाली. हा अक्षय व प्रियांकाचा एकमेकांसोबतचा तिसरा चित्रपट होता. या काळातच लग्नानंतरचं अक्षयचं (कदाचित एकमेव) अफेअर प्रियांकासोबत सुरू झाल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र, ट्विंकलनं परिस्थिती खंबीरपणे हाताळली. यापुढं प्रियांकासोबत एकही सिनेमा करायचा नाही, असं वचनच तिनं अक्षयकडून घेतलं. ते अक्षयनं आजवर तरी पाळलं आहे. 
अक्षयनं २००७ या वर्षात चार यशस्वी चित्रपट दिले. यात 'वेलकम', 'भूलभुलैया', 'हे बेबी' आणि 'नमस्ते लंडन' या चित्रपटांचा समावेश होता. यातील 'भूलभुलैया' आणि 'हे बेबी'मध्ये विद्या बालन त्याची नायिका होती. 'नमस्ते लंडन'मध्ये कतरिना कैफबरोबर त्यानं काम केलं होतं. पुढच्या वर्षी आलेला अक्षय-कतरिना जोडीचा 'सिंग इज किंग' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. याच वर्षी, म्हणजे २००८ मध्ये अक्षयनं हरिओम एंटरटेन्मेंट ही कंपनी सुरू केली आणि टीव्हीवरचा 'खतरों के खिलाडी' हा रिअॅलिटी शोदेखील सुरू केला. अक्षयकुमारला २००९ मध्ये केंद्र सरकारतर्फे 'पद्मश्री' देऊन गौरवण्यात आलं. 

शंभर कोटी क्लब
या काळात हिंदी सिनेमात हळूहळू शंभर कोटी क्लबची चर्चा चांगलीच जोर धरू लागली होती. सलमान, आमीर व शाहरुख यांचे सिनेमे येणार, म्हणजे बॉक्स ऑफिसवर त्यांचीच चलती असणार हे गृहीतक मांडलं जाऊ लागलं. आमीरनं दर वर्षी एकच चित्रपट करायचा आणि तो डिसेंबरमध्ये प्रदर्शित करायचा पायंडा पाडला. 'तारें जमीं पर' (२००७), 'गझनी' (२००८) आणि 'थ्री इडियट्स' (२००९) या आमीरच्या चित्रपटांनी चढत्या भाजणीनं यश मिळवलं. दर वर्षी ईदला सलमानचा चित्रपट प्रदर्शित होण्याचा ट्रेंड 'वाँटेड'पासून (२००९) सुरू झाला. शाहरुखनंही २००७ च्या 'ओम शांती ओम'पासून दिवाळीचा मुहूर्त पक्का करून घेतला. याच काळात अक्षयकुमारचं करिअर काहीसं अडखळू लागलं होतं. 'चांदनी चौक टु चायना', 'तसवीर ८ बाय १०', 'कंबख्त इश्क', 'ब्लू' हे त्याचे २००९ मध्ये सगळे सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले. त्यानंतर २०१० मध्येही तीच कथा कायम राहिली. 'हाउसफुल'नं काहीसं यश मिळवलं असलं, तरी 'खट्टा मीठा', 'अॅक्शन रिप्ले', 'तीसमार खान' हे त्याचे चित्रपट फार काही चालले नाहीत. तीच कथा २०११ मध्ये आलेल्या 'पतियाळा हाउस', 'थँक्यू' आणि 'देसी बॉइज' या सिनेमांची! अखेर अक्षयला हात दिला तो २०१२ मध्ये आलेल्या 'रौडी राठोड' आणि 'हाउसफुल्ल २' या सिनेमांनी. हे दोन्ही सिनेमे शंभर कोटी क्लबमध्ये दाखल झाले आणि अक्षयकुमारच्या चाहत्यांनी निःश्वास सोडला. याच वर्षी आलेल्या विजय कृष्ण यादवच्या 'ओह माय गॉड' या सिनेमाचंही समीक्षक व रसिक दोघांकडूनही कौतुक झालं. मात्र, त्याच वर्षी आलेला शिरीष कुंदेरचा 'जोकर' हा चित्रपट साफ आपटला. या सिनेमाच्या आधीच शिरीष व अक्षयमध्ये मतभेद झाले होते आणि अक्षयनं या सिनेमाचं प्रमोशनही केलं नाही.
अक्षयकुमारच्या कारकिर्दीत असे चढ-उतार सदैव पाहायला मिळतात. पण तो अपयशानं खचून न जाता टिकून राहिला, हे महत्त्वाचं. किंबहुना २०१२ नंतर म्हणजे त्याच्या वयाच्या ४५ व्या वर्षानंतर त्यानं एक से एक जबरदस्त हिट सिनेमे किंवा वेगळे सिनेमे दिल्याचं दिसतं. यात २०१३ च्या सुरुवातीला आलेला 'स्पेशल छब्बीस'सारखा सिनेमा होता. नीरज पांडेचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा मुंबईतील एका चोरीच्या सत्यघटनेवर आधारित होता. त्याच वर्षी आलेल्या मिलन लुथरियाच्या 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या चित्रपटात त्यानं दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली. पुढच्या वर्षी, म्हणजे २०१४ मध्ये ए. मुरुगदास दिग्दर्शित 'हॉलिडे' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवलं. यात अक्षयबरोबर सोनाक्षी सिन्हा होती. अक्षयकुमारचा यातील लूक आणि लष्करी अधिकाऱ्याची भूमिका दोन्ही प्रेक्षकांना आवडलं. या चित्रपटानंतर २०१५ मध्ये अक्षयनं नीरज पांडेच्या 'बेबी' या आणखी एका थरारकपटात काम केलं. याही चित्रपटानं जोरदार यश मिळवलं. मात्र, त्या वर्षी आलेल्या त्याच्या 'गब्बर इज बॅक' किंवा 'सिंग इज ब्लिंग' वगैरे चित्रपटांना अपेक्षित यश मिळालं नाही. आमीर किंवा शाहरुखसारखं वर्षाला एकच सिनेमा न करता तीन-चार चित्रपट करायची अक्षयची वृत्ती आहे. याचं कारण तो भराभर काम करतो. यामुळं काही सिनेमांच्या त्याच्या निवडीही चुकतात. एकाच वेळी एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट तो देतो, त्याच वेळी एक अत्यंत रद्दी सिनेमाही तो देऊ शकतो. मात्र, त्याच्या कामात कधीही ढिलाई दिसत नाही. अत्यंत व्यावसायिक सफाईनं तो सर्व सिनेमांत वावरताना दिसतो. या काळात अॅक्शनबरोबरच कॉमेडीपटांतही तो दिसतो. तुलनेनं अगदी प्युअर रोमँटिक अशा कथा असलेल्या सिनेमांत तो कमी दिसू लागला आहे. 
गेल्या वर्षी अक्षयचे तीन चित्रपट आले. 'एअरलिफ्ट', 'हाउसफुल्ल ३' आणि 'रुस्तुम' या तिन्ही चित्रपटांत त्याच्या भूमिका वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित 'एअरलिफ्ट'मध्ये १९९१ च्या आखाती युद्धाच्या वेळी कुवेतमधून भारतीयांना मायदेशी परत आणणाऱ्या मॅथ्युनी मॅथ्यूज या अधिकाऱ्याच्या जीवनातील खऱ्या घटनांचं चित्रिकरण करण्यात आलं होतं. अक्षयनं यातील रणजित कात्याल या उद्योजकाची भूमिका जोरदार केली. 'हाउसफुल्ल ३'मध्ये त्याच्या नेहमीच्या शैलीतील विनोदी भूमिका होती. 'रुस्तुम' हा टिनू देसाई दिग्दर्शित चित्रपट प्रख्यात के. एम. नानावटी खटल्यावर आधारित होता. यात अक्षयकुमारनं प्रेम आहुजा ही नौदल अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत उत्कृष्ट केली होती. या चित्रपटासाठीच त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. यंदाही त्यानं 'टॉयलेट : एक प्रेमकथा' हा वेगळा चित्रपट करून, सरकारी मोहिमेला हातभार लावला आहे. 
अक्षयचे आगामी चित्रपटही असेच वेगळे आहेत. महिलांसाठी परवडणाऱ्या किमतीतील सॅनिटरी नॅपकिन बनविणारे अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित 'पॅडमॅन' हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की तयार करीत आहेत. यात मुरुगनाथम यांची भूमिका अक्षय करतो आहे. 'टॉयलेट' या सिनेमाद्वारे त्यानं खेड्यापाड्यांत महिलांन अद्याप उघड्यावर शौचास जावं लागतं, या समस्येचा वेध घेतला होता. 'पॅडमॅन' ही अरुणाचलम यांची अत्यंत प्रेरणादायी कहाणी आहे. हा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रजनीकांतच्या अत्यंत गाजलेल्या 'रोबो' या चित्रपटाचा दुसरा भाग '२.०' पुढच्याच वर्षी येतो आहे. त्यात अक्षयनं रिचर्ड ही खलनायक रोबोची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक शंकर भव्यदिव्य सिनेमे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळंच या चित्रपटाविषयी आणि त्यातल्या अक्षयच्या भूमिकेविषयी सर्वांनाच अत्यंत उत्सुकता लागून राहिली आहे.
चित्रपटसृष्टीसारख्या मोहमयी दुनियेत राहूनही प्रामाणिकपणे, कष्टानं काम करून आपलं करिअर घडविणाऱ्या, शिस्तबद्ध स्वभावाच्या आणि नवनवे प्रयोग करण्याची आवड असलेल्या अक्षयकुमारला यापुढंही अशाच चांगल्या चांगल्या भूमिका मिळोत आणि आपल्याला त्यांचा आनंद लाभो!
---

(पूर्वप्रसिद्धी - साहित्य शिवार दिवाळी अंक २०१७)
---

No comments:

Post a Comment