13 Nov 2017

मटा संवाद लेख

टूर निरागस हो... 
--------------------

भटकायला जायला आपल्याकडं हिवाळ्यासारखा उत्तम ऋतू नाही. पावसाची कचकच संपली, दिवाळीची लखलख संपली, की थंडीची लगबग सुरू होते. वातावरणात सुखद असा गारवा पसरतो आणि चित्तवृत्ती की काय म्हणतात, त्या एकदम प्रफुल्लित होऊन जातात. ऑफिस किंवा व्यवसायाच्या कामाच्या रुटीनमध्ये अडकलेलं मन त्यातून बाहेर पडायला धडपडू लागतं. या काळात पुण्यात पडणाऱ्या थंडीला कविमंडळींनी ‘गुलाबी थंडी’ असं म्हणून आधीच रोमँटिकपणाची दुलई पांघरली आहे. त्यामुळं एखाद्या रुक्ष जीवाचा स्वभावही अगदी लोण्यासारखा मऊ होऊन जातो. अशाच अवचित क्षणी मग एखाद्या सहलीचा बेत आखला जातो.
अचानक ‘कुठं तरी गेलं पाहिजे’ ही भावना फारच जोर धरायला लागते. वास्तविक आपण आपल्या आजूबाजूची बहुतेक सगळी ठिकाणं ‘य’ वेळा पालथी घातलेली असतात. त्यामुळं पुनःपुन्हा तिथंच काय जायचं, या विचारानं मन जरा खट्टू होतं. पण पर्यटनाची उबळ तशी जोरदार असते. खिसा बऱ्यापैकी हलका केल्याखेरीज ती थांबत नाही. मग साधारण दिवाळीतली सुट्टी ते नाताळची सुट्टी अशी दोन टोकं धरून या काळात किंवा याच्या अधल्यामधल्या काळात सुट्टीचं नियोजन केलं जातं. अचानक आपलं भौगोलिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक भान जागृत होतं आणि यंदा आपली ट्रिप ही ‘हट के’ झाली पाहिजे, अशा जिद्दीनं आपण पेटून उठतो.
अशा वेळी घरचे किंवा जीवाचे जीवलग जेवढे उपयोगी पडत नाहीत, तेवढं फेसबुक किंवा गुगल किंवा यूट्यूब उपयोगी पडतं. मी आपला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलेल्या लोकांच्या पोस्टी आवडीनं पाहू लागतो. काही लोक सासवड किंवा शिरूरला जावं तितक्या सहजपणे न्यूयॉर्क, लंडन, सिडनी, टोकियो, गेलाबाजार हाँगकाँग, बँकॉक, सिंगापूर अशा ठिकाणी जाताना दिसतात. अशा लोकांविषयी मला मनातून भयंकर असूया, हेवा, मत्सर इ. इ. काय काय वाटत असतं. पण प्रत्यक्षात मीही माझं रोजचंच तिकडं येणं-जाणं असल्याच्या थाटात त्यांना काहीबाही सूचना करीत असतो. यू-ट्यूबच्या महिम्यामुळं जगातली बहुतेक ठिकाणं घरबसल्या बघायला मिळतात. ते ज्ञान पाजळून अशा लोकांना कॉम्प्लेक्स आणण्यात भारी मौज असते. विशेषतः सिडनीला गेलेल्या लोकांना ‘अंटार्क्टिका खंड नाही पाहिला अजून?’ असं, तर युरोपात गेलेल्यांना ग्रीनलँडची भेट चुकविल्याबद्दल खिजवून अपरिमित आनंद लुटता येतो. सिंगापुरात पहिल्यांच गेलेले लोक त्या मरलॉन की मर्लिऑनच्या पुतळ्यासमोर आणि दुबईला पहिल्यांदाच गेलेले लोक ‘बुर्ज खलिफा’समोर किंवा टॉप फ्लोअरवर जाऊन वेडीवाकडी तोंडं करून फोटो काढतात आणि पोस्टतात. अशा लोकांना आपण तिथं गेलो नसलो, तरी ‘ही फॅशन आता आउटडेटेड झाली’ असं सांगावं. लोक परदेशातून परत येईपर्यंत सोशल मीडियात एखादी फॅशन कालबाह्य होणं हे अगदीच शक्य आहे. त्यामुळं संबंधितांचा आपल्या सांगण्यावर (एकदाच) विश्वास बसतो. पण हा प्रयोग वारंवार करू नये. बँकॉकला पहिल्यांदाच जाणारे लोक शक्यतो आल्यानंतरच आपण जाऊन आल्याचं सांगतात. त्यामुळं त्यांना खिजवण्याची भयंकर सुंदर संधी असते. थोडक्यात, परदेशाचा विचार हा पोस्टपुरताच मर्यादित राहतो.
काही लोक भारतातल्या भारतातच प्रवास करतात, पण एकदम वेगळीच ठिकाणं शोधून काढतात. सर्वसाधारण प्रवासी कंपन्यांसोबत जाणाऱ्या लोकांची धाव काश्मीर, केरळ, राजस्थान, उत्तर कर्नाटक, मध्य प्रदेश अशी ठळक ठळकच असते. पण काही लोक एकदम अनवट ठिकाणी जातात आणि फोटो टाकतात. अंदमानातलं कुठलंसं दुर्गम बेट, हिमालयातली आदिम गुहा, सह्याद्रीतली एखादी अनाघ्रात घळ, दंडकारण्यातला कुठलासा धबधबा या किंवा अशाच ठिकाणी ही मंडळी जातात कशी, याचं विलक्षण आश्चर्य वाटतं; कौतुकही वाटतं. सुंदरबन, भीतरकणिका, कच्छ, लक्षद्वीप, भीमबेटका, मदुमलाई, स्पिती असली ठिकाणं हिंडणाऱ्यांची वेगळी जातकुळी असते. यांना कॉम्प्लेक्स आणणं अवघड असतं, पण यांचं वारेमाप कौतुक करून आपल्याला त्या ठिकाणी जाण्यात कसा रस नाही, हे शेवटी सांगावं. परिणाम साधारण तोच साधतो.
महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फिरून फोटो टाकणारेही काही कमी नसतात. पण कुणी कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांचं कौतुक सुरू केलं, की आपण अजिंठा-वेरूळचा पत्ता टाकावा. कुणी गोव्यातल्या माशांचं रसभरीत वर्णन केलं असलं, की त्याला सोलापुरी चटणी कशी श्रेष्ठ असते, हे पटवून द्यावं. कुणी मुंबईतल्या मॉलमधला फोटो टाकला, की आपण आनंदवन किंवा हेमलकशाच्या आठवणींचे कढ आणावेत. आपण उगाच फोटो टाकले, असं संबंधित पर्यटनप्राण्याला वाटेपर्यंत हे करीत राहावं.
एवढं झाल्यावर फेसबुकचा नाद सोडावा. आता व्हॉट्सअॅपवर जावं. मित्रांच्या ग्रुपमध्ये हळूच चर्चेचं पिल्लू सोडून द्यावं. घमासान चर्चा होते. पण शेवटी ग्रुपमधील माणसं, सगळ्यांच्या सुट्ट्या, सर्वांचं आवडीचं ठिकाण हे कधीही जुळत नाही आणि या चर्चेचा शेवट ‘यंदा जमत नाही, पुढल्या वर्षी नक्की जाऊ’ या वाक्यानंच होतो. हे वाक्य ‘आज रोख, उद्या उधार’सारखंच असतं. त्यातला ‘उद्या’ आणि ‘पुढचं वर्ष’ कधीही उगवत नसतं.
एवढं सगळं झाल्यावर आपण आपलेच ट्रिपला जाऊ, असा फंडा निघतो. त्यातच थंडी असली, तरी रजा आणि सुट्ट्यांसाठीचा हा ‘हॉट सीझन’ असल्यानं तीही खिंड ऑफिसात लढवावी लागते. नवसानं मिळालेली रजा सत्कारणी लावण्यासाठी जवळपास कुठं तरी जाऊन येऊ, असा एकदाचा निर्णय होतो. दिवाळीच्या सुट्टीत अशा रिसॉर्टची चौकशी करायची वेळ फार कमी वेळा येते. पण चुकून ती केलीच, तर आपण तिथं सुट्टी घालवायला जातोय की ते रिसॉर्ट विकत मागतोय असाच प्रश्न त्यांचे दर ऐकून पडतो. एका रिसॉर्टचं पॅकेज ऐकून तर तिथं सोन्याच्या थाळीत जेवायला देतात का, अशी शंका आली. तेव्हा तोही प्रश्न निकाली निघतो. आता फार थोडे पर्याय शिल्लक उरलेले असतात. पर्यटनाच्या त्याच त्या लोकप्रिय ठिकाणी जायचं नाही, ही आपली अट कायम असते. 
बाकी गड-किल्ल्यांच्या सहली काढायची हौस अनेक जणांना असते. एरवी गड-किल्ले चढणं म्हणजे घाम निघायचं काम! थंडीत तुलनेनं हे प्रकरण थोड्या-फार ‘हाशहुशी’त जमून जातं. व्यायामाचा अभाव आणि बैठ्या जीवनशैलीला सोकावलेला आपला देह, गडावर पोचताच महाराजांना त्रिवार लोटांगण घालण्यासाठी खरोखर आडवा होतो. किल्ल्यांवर जायला मात्र आपल्याला मनापासून आवडतं. वर माथ्यावर सह्याद्रीचा भर्रार वारा आणि इतिहासात रमू पाहणारं मन यांची मस्त जोडी जमते. शरीराला शीण झाला, तरी मन ताजंतवानं होतं. त्यामुळंच की काय, गड उतरून येताना काहीसं उदास वाटतं खरं...
कधी कधी हेही जमत नाही आणि आपल्याच शहरात दिवस घालवावा, असा पर्याय पुढं येतो. आपल्या गावातलं एकूण एक स्थळ आपण केव्हाच पाहिलेलं असल्यानं कुठल्याही ठिकाणी गेलं तरी ती पुनर्भेटच असते. मग एखादा नवा झालेला मॉल किंवा मल्टिप्लेक्स यांच्या तावडीत आपण सापडतो. एकीकडं जुनं होत चाललेलं आणि दुसरीकडं रोज नवनवा आकार घेणारं शहर पाहून अचंबित व्हायला होतं. बदलांचा हा वेग आपल्याला हळवं करतो आणि वय झाल्याची जाणीवही करून देतो. सगळं करून झाल्यावर ‘झालं एकदाचं पर्यटन’ एवढंच काय ते समाधान मिळतं...
पण नशीब कधी तरी फारच मेहेरबान होतं. अचानक ऑफिसला दांडी मारायची हुक्की येते. निवांत उशिरा उठता येतं. दिवाळी अंक किंवा आवडतं पुस्तक घेऊन दुपारपर्यंत लोळत पडता येतं. अशा वेळी बाहेरून काही तरी डिश मागवून दुपारचं जेवण करायचं, मग पुन्हा ताणून द्यायची, संध्याकाळी सुंदर थंडीत बाहेर पडायचं, मनाला येईल त्या रस्त्याला गाडी हाणायची, सूर्यास्त होत आला की गाडी रस्त्याच्या कडेला थांबवायची, अनिमिष डोळ्यांनी तो केशरी सोहळा डोळ्यांत साठवून घ्यायचा... परत घरट्यात परतायचं... संध्याकाळी जिवाला जीव देणारा मित्र बोलवावा, सुख-दुःखाच्या गप्पा मारीत साग्रसंगीत भोजन व्हावं, रात्री जमल्यास एखादा पिक्चर टाकावा किंवा गाण्याची मैफल ऐकावी... निवांत झोपावं... अहाहा!
दुसऱ्या दिवशी रुटीन जगायला आपण परत सिद्ध होतो, तेव्हा लक्षात येतं, की काल काय मस्त पर्यटन झालं आपलं! 
 ---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे; १२ नोव्हेंबर २०१७)
---

No comments:

Post a Comment