29 May 2018

परमाणू रिव्ह्यू

‘विस्फोटक’ थरार...
------------------------


भारतानं ११ मे १९९८ रोजी पोखरणमध्ये तीन अणुचाचण्या केल्या आणि सगळं जग हादरलं. मी त्या वेळी नुकतीच ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून कामाला सुरुवात केली होती. तेव्हा भारतात राजकीयदृष्ट्या विलक्षण अस्थिरता होती. दोन वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांना १३ दिवसांच्या सत्तेनंतर बहुमताअभावी राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल या दोघांची पंतप्रधानपदाची अल्प कारकीर्द पार पडल्यानंतर १९ मार्च १९९८ रोजी पुन्हा वाजपेयी पंतप्रधान झाले. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आत भारताने ‘पोखरण-२’ घडवून आपल्या आण्विक सामर्थ्याचं दर्शन जगाला घडवलं होतं. वाजपेयी यांच्या कणखर नेतृत्वाची तेव्हा देशभरात प्रशंसा झाली होती. भारतानं पहिली अणुचाचणी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९७४ मध्ये पोखरणमध्ये केली होती, त्याला २४ वर्षं झाली होती. ‘आणि बुद्ध हसला’ या सांकेतिक नावाखाली पार पडलेली ती चाचणी होती. तेव्हा त्याला शांततामय विस्फोट म्हटलं गेलं होतं. मात्र, मधल्या काळात जगाची संरचना बदलून गेली होती. सोविएत युनियन लयाला गेलं होतं आणि जगावर अमेरिकेची एकछत्री सत्ता प्रस्थापित झाली होती. अमेरिकेला आव्हान देण्यासाठी चीन आपलं सामर्थ्य वाढवू लागला होता. अमेरिकेकडून पाकिस्तानला होणाऱ्या शस्त्रपुरवठ्यामुळं एकीकडं चीन, तर दुसरीकडं पाकिस्तान अशा कोंडीत देश सापडला होता. त्यात १९९० पासून काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या मार्गाने पाकिस्ताननं अघोषित युद्ध पुकारलं होतं. यात भरीस भर म्हणून राजीव गांधींच्या हत्येनंतर देशाला राजकीय अस्थिरतेनं घेरलं होतं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर वाजपेयींनी बहुमत मिळविताच अणुचाचण्या का घेतल्या, याचं उत्तर मिळू शकेल. या चाचण्यांना नुकतीच वीस वर्षं पूर्ण झाली. आता या वीस वर्षांतही पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. तेव्हा आता त्या घटनेकडं आपण पुन्हा एकदा काहीशा तटस्थतेनं पाहू शकतो. अभिषेक शर्मा दिग्दर्शित ‘परमाणू  - द स्टोरी
ऑफ पोखरण’ पाहताना आधी अशीच काहीशी भावना होती. मात्र, प्रत्यक्ष सिनेमा पाहताना देशप्रेमाच्या विलक्षण भावनेनं मन भरून जातं. राजकीय निर्णयांची वस्तुनिष्ठ चिकित्सा वगैरे गोष्टी, सिनेमात अणुचाचण्या झाल्यानंतर जवानांनी फडकवलेला तिरंगा पाहताना अश्रूंमध्ये वाहून जातात. काही गोष्टींना खरंच पर्याय नसतो. आपल्या देशावर आपलं सगळ्यांचं असलेलं प्रेम ही गोष्ट अशीच आहे. प्रसंग पडला, तर आपण एक देश म्हणून काय करू शकतो, याची फक्त एक किंचित झलक हा सिनेमा दाखवतो. ती झलक पाहताना मन देशाप्रती असलेल्या प्रेमाच्या, निष्ठेच्या, त्यागाच्या भावनेनं ओथंबून जातं. दिग्दर्शक म्हणून अभिषेक शर्माचं हे निखालस यश होय.
‘परमाणू’मध्ये ‘पोखरण-२’ चाचण्या भारतानं नक्की कुठल्या परिस्थितीत पार पाडल्या, याचा एखाद्या माहितीपटासारखा आढावा पाहायला मिळतो. मात्र, त्याच वेळी हा सिनेमा भावनांकावरही कमी पडत नाही. भय, निराशा, उत्सुकता, जिद्द, दु:ख, आनंद या सर्व मूलभूत मानवी भावना तो उत्कटतेनं दाखवतो. तेव्हाच्या परिस्थितीतला थरार नेमका टिपतो.
अश्वत्थ रैना (जॉन अब्राहम) या आयएएस ऑफिसरच्या नजरेतून हा सर्व सिनेमा आपल्याला पाहायला मिळतो. चीननं १९९५ मध्ये ४३ वी अणुचाचणी केल्यानंतर आता भारतानंही मागे न हटता, अणुचाचणी केली पाहिजे असं अश्वत्थचं मत असतं. त्यासाठी त्याच्याकडं एक गुप्त कार्यक्रमही ‘फ्लॉपी’मध्ये तयार असतो. मात्र, ‘नॉर्थ ब्लॉक’मधले नोकरशहा ज्युनिअर असलेल्या अश्वत्थची खिल्ली उडवतात. त्याच्या फ्लॉपीचा चहाचा कप ठेवण्यासाठी वापर करतात. त्यातून व्हायचं तेच होतं. अणुचाचणी करायचा निर्णय तर घेतला जातो, मात्र अश्वत्थची योजना समजावून न घेता, घाईनं चाचणीचा निर्णय घेतल्यानं अमेरिकेला हे कळतं आणि त्या देशाच्या दबावाखाली या चाचण्या रद्द करण्याची नामुष्की देशावर ओढवते. सर्व घटनाक्रमाची चौकशी होते आणि दोषी नसतानाही अश्वत्थवर सगळं खापर फुटतं व त्याला निलंबित केलं जातं.
मग बायको व मुलाला घेऊन तो मसुरीला निघून जातो आणि यूपीएससीचे क्लास घेत बसतो. तेव्हाच दिल्लीत सत्तांतर होतं आणि वाजपेयी पंतप्रधान होतात. हिमांशू शुक्ला (बोमन इराणी) पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून सूत्रे हाती घेतात. त्यानंतर अचानक सगळी सूत्रे फिरतात आणि अणुचाचणीचा विषय पुढं येतो. शुक्लाजी अश्वत्थला पाचारण करतात. आधी नाराज असलेला अश्वत्थ देशासाठी पुन्हा एकदा ही मोहीम हाती घ्यायला तयार होतो.
त्यानंतर सुरू होते ती या चाचणीची तयारी. इथून ते अखेर चाचण्या होईपर्यंतचा सर्व प्रवास म्हणजे भावभावनांची एक ‘रोलर कोस्टर’ राइड आहे. या मोहिमेतला सर्वांत मोठा धोका असतो, तो अमेरिकी उपग्रहांचा. त्यांना फसवून या चाचणीची तयारी करायची असते. जेव्हा या चाचण्या झाल्या, तेव्हा अमेरिकेनेही आपण याचा शोध घेण्यात कमी पडल्याची कबुली दिली होती. तेव्हा सगळ्या बातम्यांचा फोकस हाच होता, हेही मला आठवतंय. या सिनेमातही याच बाबीवर सगळा फोकस केंद्रित आहे. अश्वत्थ त्याची टीम कशी तयार करतो, मग ही टीम स्फोटांची सगळी तयारी कशी करते आणि त्यानंतर त्यांच्यासमोर काय काय अडथळे येत जातात, हे सगळं मध्यंतरापर्यंत येतं.
त्यानंतर घटना अधिकच वेगवान व्हायला लागतात. काही कारणांनी या चाचण्यांची तारीख अलीकडं आणावी लागते. चाचण्या होतात की नाही, अशीही एक वेळ येते. त्यात जॉनला घरच्या आघाडीवरही लढावं लागतं. शिवाय पोखरणमध्ये तळ ठोकून असलेल्या सीआयए आणि आयएसआयच्या दोन एजंटांना या गुप्त मोहिमेची कुणकुण लागते. त्यानंतर तर गोष्टी अधिकच जटिल होतात. त्यावर अश्वत्थ आणि त्याची टीम कशी मात करते, हे प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवं.
अशा थरारपटांमध्ये दोन गोष्टी असतात. एकात आपल्याला शेवटी काय घडतंय, हे माहिती नसतं. दुसऱ्यात आपल्याला शेवटी काय होणार हे नक्की माहिती असतं. ‘परमाणू’ हा दुसऱ्या वर्गातला सिनेमा आहे. अणुचाचण्या होऊन गेल्या आहेत. त्यामुळं या सिनेमात शेवटी काय घडणार, हे आपल्याला माहितीच असतं. अशा वेळी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणं आणि ‘आता काय होणार’ असं वाटायला लावणं ही खरी कसोटी असते. ‘परमाणू’ या कसोटीला पुरेपूर उतरतो. इतका, की अमेरिकेच्या व पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून एकदाचा तो महाप्रचंड, भयंकर असा अणुस्फोट होतो, तेव्हा प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात.
‘मद्रास कॅफे’नंतर ‘परमाणू’ हा जॉन अब्राहमचा हा आणखी एक मास्टरस्ट्रोक ठरला आहे. अशा प्रकारच्या भूमिकांवर सध्या फक्त अक्षयकुमारचीच छाप दिसून येते. मात्र, जॉननं इथं आपलं स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित केलं आहे. त्यानं अश्वस्थची भूमिका फार समरसून केली आहे. डायना पेंटी आणि त्याच्या टीममधल्या इतर कलाकारांनी चांगली साथ दिली आहे. जॉनच्या पत्नीच्या भूमिकेत अनुजा साठेनं प्रभावी काम केलं आहे. बोमन इराणी नेहमीप्रमाणेच झकास!
भारताच्या अगदी नजीकच्या इतिहासाकडं पुन्हा नजर टाकण्याचा ‘झी स्टुडिओज’चा प्रयत्न राजकीय हेतूंनी प्रेरित नसेलच, असं म्हणता येत नाही. पण फक्त कलाकृती म्हणून विचार करता, ती उत्तम झाली आहे. त्यामुळं आपण तिचा आनंद लुटायला हरकत नाही. बाकी भारतीय जनता सुज्ञ आहेच!
---
दर्जा - चार स्टार
---

No comments:

Post a Comment