16 Dec 2018

अक्षरधारा दिवाळी अंक २०१८ लेख


वास्तुस्त्री
----------


सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर हे माझे आवडते दिग्दर्शक आहेत. त्यांच्या सगळ्याच कलाकृती मला आवडतात. अत्यंत संवेदनशीलतेनं हाताळलेले विषय हे त्यांच्या सर्व सिनेमांचं वैशिष्ट्य. त्यातही काही सिनेमे आपल्या काळजाच्या जवळचे असतात. 'वास्तुपुरुष' हा त्यापैकीच एक. या जोडीचाही हा आवडता सिनेमा आहे, असं त्यांनी मला अनेकदा सांगितलं आहे. हा सिनेमा २००२ मध्ये प्रथम प्रदर्शित झाला, तेव्हाच मी पहिल्यांदा पाहिला होता. तेव्हा या सिनेमाचा माझ्या मनावर काही खूप खोल परिणाम वगैरे झाल्याचं मला आठवत नाही. मात्र, नंतर काही वर्षांनी एकदा मला सिनेमांच्या सीडीच्या दुकानात या सिनेमाची डीव्हीडी दिसली आणि मी ती लगेच घेऊन घरी आलो. त्यानंतर मी कित्येकदा हा सिनेमा घरी पाहिला. तो सर्व सिनेमा माझा जवळपास पाठच झाला. प्रत्येक वेळी हा सिनेमा पाहताना अधिकाधिक आवडत गेला. कदाचित मी पण तोपर्यंत वयानं थोडा फार वाढलो होतो. सिनेमा पाहताना त्यातला खोल आशय दर वेळी नव्यानं उलगडत गेला आणि आता हा सिनेमा माझ्या 'ऑल टाइम फेवरिट'च्या यादीत जाऊन बसला आहे. एखादी सुंदर कादंबरी वाचत असतानाची एकतानता हा सिनेमा बघताना साधता येते. शास्त्रीय संगीताची एखादी सुरेल मैफल ऐकतानाची तल्लीनता हा सिनेमा बघताना लाभते. नव्यानं एखादी गोष्ट आपण शिकलो किंवा आपल्याला समजली तर त्या वेळी होणारा आनंद ही कलाकृती जवळपास प्रत्येक वेळी आपल्याला देते. दर वेळी हा सिनेमा पाहताना डोळे अखंड झरतात आणि मला परत 'थोडा बरा माणूस' करून जातात. एखाद्या समाजातील स्थित्यंतर टिपतानाचे एवढे प्रत्ययकारी दर्शन मराठी साहित्यात, नाटकांत, सिनेमात फार कमी वेळा दिसले आहे. सुमित्रा भावे स्वतः समाजशास्त्रज्ञ असल्यानं त्यांच्या कलाकृतींमध्ये केवळ कल्पनारंजन नसतं, तर त्या विषयाचा सखोल अभ्यास आणि त्यातून येणारी वैचारिक प्रगल्भता सदैव दिसत राहते.
महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात खेड्यापाड्यांतून ब्राह्मणांची घरे जाळली गेली. गांधीजींचा खून एका माथेफिरू, पण जातीने ब्राह्मण असलेल्या व्यक्तीनं केला, याचा अपरिहार्य त्रास तेव्हा सर्व जातीला झाला. एक आख्खी पिढी यात होरपळून निघाली. देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. गावागावांमध्ये तोवर असलेली बारा बलुतेदारी पद्धत आणि जातीची उतरंड याला धक्के बसायला सुरुवात झाली होती. तेव्हाची सामाजिक परिस्थिती पाहता ते योग्यही होतं. तोवर खेड्यापाड्यांत ब्राह्मण, मराठा याच कथित उच्चवर्णीयांचं राज्य होतं. शिवशाही, पेशवाईच्या काळापासून मिळालेली वतनं, जमिनी आणि वंशपरंपरागत (अनुक्रमे) क्षात्रबुद्धी तैलबुद्धीचा भलाबुरा वापर करून हाती ठेवलेली गावगाड्याची सत्ता याच्या जोरावर मराठा ब्राह्मणांनी तेव्हा आपलं सगळीकडं वर्चस्व राखलं होतं. मात्र, महात्मा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या होरपळीनं बरेचसे ब्राह्मण खेड्यांतून कायमचे विस्थापित झाले. समाजजीवनाची पूर्वापार चालत आलेली चौकट मोडली. इतर जातींनी स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या लोकशाही हक्कांचा (रास्त) उपयोग करून, ब्राह्मणी वर्चस्वाला सुरुंग लावला. ब्राह्मण समाजानं तोवर इतर समाजांवर केलेल्या कथित अनिर्बंध सत्ताबाजीची अशी शिक्षा काळानंच जणू दिली! याच काळात म्हणजे सन १९३९ मध्ये आलेल्या कुळ कायद्यानं कथित उच्चवर्णीयांच्या सत्तेला हादरे दिलेच होते. नंतर १९४८ मध्ये आलेला सुधारित कुळ कायदा आणि नंतर १९५७ मध्ये प्रत्यक्ष कुळांना जमिनीचे कायदेशीर मालक म्हणून जाहीर करणारा नवा कायदा यामुळं तर खेड्यांतील ब्राह्मणांचं कथित वर्चस्व पूर्णपणे लयाला गेलं. हे जे काही घडलं, ते देशाच्या लोकशाहीच्या तत्त्वांना धरूनच झालं आणि विशिष्ट समाजांचं जातिवर्चस्व संपुष्टात येण्यासाठी ते योग्यही होतं. (पुढं जाती संपल्या नाहीतच; उलट अधिक तीव्र आणि क्रूर झाल्या अन् नवा जातीयवाद निर्माण झाला, हा इतिहास आहे. पण तो या लेखाचा विषय नव्हे.)
आता हे सर्व होत असताना खेड्यांमधील ब्राह्मण समाज या सर्व बदलांना कसा सामोरा गेला, हा 'वास्तुपुरुष' चित्रपटाचा विषय आहे. यातला भास्कर हा कोल्हापूरजवळच्या नांदगाव नावाच्या खेड्यात राहणारा, जमीनदार ब्राह्मण कुटुंबातला तरुण मुलगा यंदा मॅट्रिकला आहे आणि या परीक्षेत उत्तम गुण मिळवून त्याला डॉक्टर व्हायला शहरात जायचं आहे. त्याचं घर म्हणजे मोठा वाडा आणि शेती वगैरे असली, तरी ती आता केवळ 'बडा घर पोकळ वासा' अशीच उरली आहे. भास्करचे वडील नारायण देशपांडे स्वातंत्र्यसैनिक आहेत, गांधीवादी आहेत. त्यांची स्वतःची अशी तत्त्वं आहेत. घरात एक ना नात्याची ना गोत्याची, अशी एक म्हातारी बाईआज्जी आहे. तिला या घरानं पूर्वीपासून आपली म्हणून सांभाळलं आहे. भास्करचा माधवकाका आणि त्याचा मोठा भाऊ निशिकांत याच घरात राहतात. काकाची पत्नी बाळंतपणात गेल्यापासून तो फक्त जोर-बैठका काढणं आणि वाड्यातल्या गुप्तधनाचा शोध घेणं याच कामात अडकला आहे. त्याला गाण्या-बजावण्याचा छंद आहे आणि एका 'सुंदरी'कडं त्याचं जाणं-येणंही आहे. भास्करचा मोठा भाऊ जातीनं मराठा असलेल्या कृष्णा नावाच्या एका नर्स मुलीच्या प्रेमात पडला होता, पण त्याला घरातून तीव्र विरोध झाल्यामुळं तो प्रेमभंग होऊन घरात बसलाय. तो एके काळी कविता वगैरे करायचा. पण आता नुसता बसून आहे. याच घरात गोटूराम नावाचा एक हरकाम्या ब्राह्मण नोकरही आहे... 
...आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या घरात 'सरस्वती' आहे. भास्करची आई, घरातली कर्ती बाई...! ही 'सरस्वती' हे देशपांड्यांचं सगळं घर तोलून धरते आहे. एका अर्थानं तीच या घरातली एकमेव 'कर्ती' व्यक्ती आहे. ही जशी भास्करची गोष्ट आहे, तशीच ती 'सरस्वती'चीही गोष्ट आहे, असं मला कायम वाटत आलेलं आहे. ही सरस्वती म्हणजे या घराची खरी वास्तु'पुरुष' नव्हे; तर 'वास्तुस्त्री' आहे, असं म्हणायला हवं. या घरानं पूर्वापार कथित 'खालच्या जाती'च्या लोकांवर जो अन्याय केलाय, त्यामुळं या वास्तूला शाप लागलाय आणि भास्करनं डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा केल्याशिवाय या 'वास्तुपुरुषा'ची शांत होणार नाही, असं सरस्वतीचं म्हणणं आहे. ही सरस्वती काळाचं भान असलेली आहे. आता आपल्या घरातल्या 'कर्त्या' पुरुषांचे बसून खाण्याचे दिवस संपले, हे तिला माहिती आहे. तिच्या प्रत्येक कृतीतून, संवादातून हे दिग्दर्शकानं जाणवून दिलं आहे. सरस्वती हुशार आहे. 'कसायला दिलेली मळईची (सुपीक) जमीन नाथा सोडतोय होय,' असं ती म्हणते, तेव्हा तिचं व्यावहारिक शहाणपणही दिसतं. नंतर वेळ पडते, तेव्हा घरात सुतक असतानाही ती बैलगाडी करून शेतात जाते आणि नाथाकडून आपल्या हिश्श्याचे पैसे घेऊन येते, तेव्हाही तिचं हे व्यावहारिक भान लख्खपणे दिसतं. आपल्या अपत्याच्या संरक्षणासाठी आई काहीही करू शकते, हे प्राणिमात्रांमधलं अगदी 'बेसिक इन्स्टिंक्ट'ही तिच्यात दिसतं; तसंच बदलत्या काळानुसार टिकून राहण्याचं काही विशिष्ट प्राणिमात्रांचं 'सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट'ही तिच्यात ठासून भरलेलं दिसतं. आणि या मूलभूत प्रवृत्तींच्याही वर आहे तिच्यातलं माणूसपण... घरातले कर्ते पुरुष आता काही कामाचे नाहीत आणि आता एकमेव भरोसा धाकट्या भास्करवर आहे आणि त्याला काहीही करून डॉक्टर करायचंच आहे, या निश्चयानं भारलेलं तिचं माणूसपण... मुलगा चांगल्या मार्कांनी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर ती भडाभडा जे नवऱ्याला बोलते - 'पोरगं आपल्या परीनं करतंय हो, त्याला द्या की म्हणावं एखादी नादारी, सरकार गरिबांसाठीच आहे ना, मग करा ना त्याला मदत, चांगलं शिकून, मोठा होऊन फेडेल की तो सगळ्यांचं रीण' असं म्हणताना ती जेव्हा फुटून रडते, तेव्हा आपलेही डोळे झरल्याशिवाय राहत नाहीत. याचं कारण तिच्या माणूसपणात असलेलं तिच्यातलं ठळक 'स्त्रीपण'... हे 'स्त्रीपण' हीच तिची ताकद आहे. या स्त्रीपणाच्या सर्व क्षमता सरस्वतीमध्ये अगदी भरभरून आहेत. ती योग्य वेळी त्यांचा नेमका वापर करते आणि आपलं सगळं खानदान वाचवते.
मराठी चित्रपटांत एवढं ताकदीचं स्त्री-पात्र अलीकडच्या काळात पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. याचं कारण या पात्राची जन्मदात्री, लेखिका-दिग्दर्शिका स्वतः एक स्त्री आहे. शिवाय समाज अभ्यासक आहे. तेव्हा सरस्वतीच्या जन्मामागे असा मोठा सामाजिक पट उभा आहे. म्हणूनच सुमित्रा भावेंच्या लेखणीतून साकारलेल्या सर्वोत्तम पात्रांपैकी एक म्हणजे ही सरस्वती, असं मला वाटतं
या चित्रपटांत तिचं पहिलं दर्शन होतं ते ती भास्कर घरी आल्यानंतर वाड्यातल्या आडातून पाणी शेंदताना! चोपून नेसलेली नऊवारी साडी, मोजकीच सौभाग्यलेणी, ठळक कुंकू, गौर वर्ण आणि चेहऱ्यावरचा एका करारी, स्वाभिमानी बाईचा ठसठशीत भाव! पहिल्याच दृश्यात दिग्दर्शिका तिचं हे अगदी महत्त्वाचं पात्र अगदी तिला हवं तसं प्रेक्षकांच्या मनात प्रस्थापित करते. या चित्रपटातला संघर्ष ठळक करणारं पहिलंच दृश्य आहे ते घरातली सगळी मंडळी जेवायला बसली आहेत तेव्हाचं. तेव्हा चुलीवर भाकऱ्या करीत असलेली आणि या घरातल्या या चौघाही पुरुषांशी 'ऑथॉरेटिव्ह' भाषेत संवाद साधणारी सरस्वती मुळातूनच पडद्यावर पाहावी. फार मोजक्या संवादांतून आणि दृश्यांतून दिग्दर्शकद्वय सरस्वतीच्या जगण्याचा सगळा आलेख उभा करतात. मुळात 'वास्तुपुरुष' असं नाव असलेल्या या सिनेमात सगळं दर्शन घडतं ते तेव्हाच्या पुरुषांच्या एका पिढीच्या स्खलनाचं, कर्मदरिद्रीपणाचं, स्थितिशीलतेचं... या गर्तेतून तेव्हाच्या पुरुषांना बाहेर काढणारी असते ती सरस्वतीसारखी खंबीर, खमकी स्त्री - वास्तु'स्त्री' ती
'वास्तुपुरुष'मधल्या प्रसंगांची रचना पाहिली, की सरस्वतीचं भास्करच्या मागं भक्कमपणे उभं असणं प्रत्ययाला येतं. घरात बाईआज्जी खोकत असताना, इतर पुरुषमंडळी ढाराढूर झोपलेली तरी असतात किंवा गुप्तधनासाठी खणत तरी असतात. तेव्हा अभ्यासाला बसलेल्या भास्करला सरस्वतीच 'भास्कर, बाईंना पाणी दे' असं सांगते. हा प्रसंग अगदी छोटा आहे. पण त्या जुन्या, थकत चाललेल्या वाड्याचा सगळा भार फक्त ही बाई आपल्या खांद्यावर वाहते आहे, हे अगदी स्पष्ट होतं. आपल्या मोठ्या मुलाचं प्रेमप्रकरण तिला मान्य असतं. इतर जातीतली मुलगी सून म्हणून स्वीकारण्याचा मोठेपणा तिच्या अंगात असतो. मात्र, नवऱ्याच्या (सामाजिक विरोधाला बळी पडून होणाऱ्या) विरोधामुळं तिला मुलाचं लग्न करता येत नाही. याची खंत ती शेवटपर्यंत बोलून दाखवते. तेव्हा गप्प बसलेली सरस्वती धाकट्या मुलाच्या डॉक्टर होण्यातला कोणताही अडथळा सहन करायला तयार होत नाही. त्यासाठी ती तेव्हाची रुढी झुगारून नवऱ्याशी अद्वातद्वा भांडते. त्याच्या एके काळच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या सहकाऱ्याशी आता मंत्री झालेल्या वसंतरावाशी बोलायला लावते. त्याच्या ओळखीतून काही शिष्यवृत्ती मिळतेय का, यासाठी अखंड धडपड करीत राहते. याचं कारण मुलाला मुंबईला पाठवायचं म्हणजे रोख पैसे उचलून द्यावे लागणार. आणि या 'ओसाडगावच्या इनामदारां'कडं काहीही नसतं. पुढं बाईआज्जी जातात तेव्हा त्यांचे तेरावे घालण्यासाठी (पुन्हा सामाजिक दबावापोटी नवऱ्याचा दीराचा आग्रह म्हणून) नाथाकडून भास्करसाठी मागून आणलेले शेतीच्या उत्पन्नातले पैसे देताना तिचा झालेला तळतळाट पाहून आपल्याच आतड्याला पीळ पडतो. या बाईआज्जी आजारी असताना शेवटी कृष्णाला नर्स म्हणून घरी बोलावण्याचा मोठेपणाही ती दाखवते. घरात भास्कर सोडून पुरुषमाणूस नसताना आजीचे अंतिम संस्कार करण्याबाबतचे सगळे निर्णय तीच गावकऱ्यांना देते. त्या प्रसंगाला सरस्वती ज्या धीरोदात्तपणे सामोरी जाते, ते पाहण्यासारखं आहे. नाथाकडून आणलेले पैसे आजीच्या तेराव्याला खर्च झाले म्हणताना, शेवटचा पर्याय म्हणून स्वतःच्या बांगड्या मोडून भास्करला पैसे आणून देणारी सरस्वती पाहिली, की नतमस्तक व्हावंसं वाटतं. दीर गुप्तधनाची माहिती असलेला जुना मोडीतला कागद दाखवतो, तेव्हा सरस्वती सांगते - 'भाऊजी, तुमच्या या गुप्तधनावर माझा नाही हो विश्वास. आपले पूर्वज त्या वेळी जे जगले ते जगले. आपण आज जगतोय. आपण आपल्या कष्टानं, ज्ञानानं जे काही धन मिळवू तेवढं खरं आपलं. कशाला त्या धनाची आस लावून घेताय? अहो, आपला भास्कर डॉक्टर होईल, गोरगरिबांची सेवा करील आणि स्वतःसाठीही चार पैसे मिळवील. तेव्हाच या वास्तुपुरुषांची शांत होईल.' 
देशस्थ नवरा तिच्या बडबडीला कंटाळून 'तुझ्यात हा कोकणी तोंडाळपणा देशावर कुठून गं आला?' असं म्हणतो, तेव्हा ती शांतपणे 'होय हो, नाही मी बोलत आता' असं म्हणते. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणं नवऱ्याला प्रतिवाद करणारी, सोवळ्यातला स्वयंपाक करताना चुकून ओवळं झालं की पुन्हा अंघोळ करून स्वयंपाकाला लागणारी ही सरस्वती नंतर मुलासाठी वेळ पडताच नवऱ्याला 'जा, तिकडंच काळं करा' असं म्हणण्याइतपत कठोर होते. घरातले सगळे सणवार निगुतीनं करणारी, भास्करची 'सोपाना कांबळे'सोबत असलेली मैत्री सहजी स्वीकारणारी, सोपानावरही प्रेम करणारी अशी ही सरस्वती म्हणजे काळानुरूप स्वतःला बदलणारी, हुशार मराठी स्त्री आहे
सरस्वती या पात्राचं वैशिष्ट्य म्हणजे ती 'सेल्फमेड', स्वयंसिद्ध आहे. तिनं घरातली परिस्थिती नीट जोखली आहे. तिला आजूबाजूला बदलणाऱ्या समाजाचं, काळाचं नेमकं भान आहे. अभ्यासात हुशार असलेल्या मुलाला डॉक्टर करणं म्हणजे एकप्रकारे गावाच्या त्या पिढीजात व्यवस्थेतून बाहेर काढणं आहे आणि त्याला या सगळ्या गर्तेतून बाहेर काढल्यासच त्याला भवितव्य आहे, हे ओळखणारी द्रष्टी नजर तिच्याकडं आहे
त्या काळातल्या खेड्यांत वस्तीला असलेल्या, बहुसंख्य जमीनदार घरांतला इतिहास तपासला असता, अशा अनेक 'सरस्वतीं'मुळं ती घरं तरली, वाढली असंच लक्षात येईल. या हजारो 'सरस्वतीं'नी तेव्हाचे संसार स्वतःच्या भक्कम खांद्यांवर तोलून धरले असतील, पुढे नेले असतील. या कर्तबगार स्त्रियांची बखर कुणी लिहिली नाही, त्यांच्या त्यागाची नोंद कुठल्या ऐतिहासिक दस्तावेजानं घेतली नाही, त्यांच्या कौतुकाचं गाणं कुणी गायिलं नाही, की त्यांना देव्हाऱ्यात बसवून त्यांची 'मातृपूजा' कुणी केली नाही. सुमित्रा भावेंनी 'वास्तुपुरुष'मधल्या 'सरस्वती'च्या रूपानं या सगळ्यांची कसर भरून काढली आहे. एक प्रकारे या सगळ्या बायकांच्या ऋणातून थोडं फार उतराई होण्याचा प्रयत्न त्यांनी यात केला आहे. आणि हा प्रयत्न एवढा प्रभावी आहे, की या सरस्वतीचं आपल्या मनावरचं गारूड लवकर उतरणं शक्य नाही
ही भूमिका साकारणाऱ्या उत्तरा बावकर यांची खरोखर कमाल म्हणावी लागेल. या 'सरस्वती'ची भूमिका त्या खरोखर जगल्या आहेत. या भूमिकेत त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीची कल्पनाच करता येऊ नये, एवढ्या प्रभावीपणे त्यांनी ही भूमिका केली आहे. खरंच, प्रत्येकानं प्रत्यक्ष हा सिनेमा पाहूनच बावकर यांच्या भूमिकेचं मोजमाप करावं. शब्दांनी त्यांच्या भूमिकेचं वर्णन करणं जवळपास अशक्य आहे.
एकूणच या सिनेमाची सर्वच पात्रयोजना जमली होती. सिद्धार्थ दफ्तरदारनं तरुण भास्करची भूमिका फार सुंदर केलीय. पण मोठ्या भास्करच्या भूमिकेत महेश एलकुंचवार यांना घेणं, हा सुमित्रा भावेंचा 'मास्टरस्ट्रोक' म्हणावा लागेल. याचं कारण मराठी साहित्यात व्यंकटेश माडगूळकरांनंतर ब्राह्मण समाजाच्या सामाजिक बदलांची ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण नोंद कुणी घेतली असेल, तर ती महेश एलकुंचवारांनी! त्यांची वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगान्त ही विदर्भातल्या धरणगावकर देशपांड्यांची कहाणी सांगणारी त्रिनाट्यधारा आणि 'वास्तुपुरुष' यांच्यात मला कायमच एक जैव संबंध असल्याचं वाटतं. त्यामुळं या सिनेमात एलकुंचवारांचं असणं हा या कलाकृतीचाही सन्मानच आहे. भास्करच्या वडिलांची भूमिका सदाशिव अमरापूरकर यांनी फारच जबरदस्त केली आहे. अमरापूरकरांच्या सर्वोत्तम भूमिकांमध्ये ही भूमिका गणावी लागेल. रवींद्र मंकणी, अतुल कुलकर्णी आणि रेणुका दफ्तरदार यांनीही त्यांची कामं फार नेटकी सुंदर केलीयत
पण या सगळ्यांच्या वर दशांगुळे उरते ती भास्करची आई - सरस्वती. खऱ्या अर्थानं वास्तु'स्त्री'... सुमित्रा भावेंनी हा सिनेमा तयार करून महाराष्ट्रातल्या भास्करसारख्याच कित्येक घरांची वास्तु'स्त्री' शांत केली आहे, असंच म्हणावंसं वाटतं. या कलाकृतीच्या आणि तुमच्या ऋणातून मुक्त होणे नाही...!! 

---

(पूर्वप्रसिद्धी : अक्षरधारा दिवाळी अंक २०१८)

---


6 comments:

  1. खूप अप्रतिम लिहिले आहेस.श्वास च्या आधीच्या दशकातील मराठी सिनेमावर विस्ताराने लिहायला हवे. श्रीपाद तुझ्या लेखणीत जादू आहे!

    ReplyDelete
  2. सुरेख लेख.. काही वाक्य तर कायम लक्षात राहतील अशी 👌 अभिनंदन !

    ReplyDelete
  3. माझा पण खूप आवडता सिनेमा. सुमित्रा ताई सोबत या सिनेमा विषयी बोलण्याचा योग्य देखील आला होता.

    ReplyDelete