8 Feb 2019

रिव्ह्यू : भाई - व्यक्ती की वल्ली (उत्तरार्ध)

आहे मनोहर तरी...
-----------------------

‘भाई : व्यक्ती की वल्ली (पूर्वार्ध)’ हा गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला, पु. ल. देशपांडे यांचं चरित्र सांगणारा, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट मला जेवढा आवडला होता, तेवढा आज (शुक्रवार, ८ फेब्रुवारी) प्रदर्शित झालेला याच सिनेमाचा उत्तरार्ध काही तेवढा भावला नाही. हे दोन्ही भाग ज्या पुस्तकावर प्रामुख्याने आधारलेले आहेत, त्या पुस्तकाच्या लेखिकेचे - सुनीताबाईंचेच - शब्द उसने घ्यायचे तर ‘आहे मनोहर तरी...’ असेच या भागाविषयी मला म्हणावेसे वाटले.
सर्वप्रथम सकारात्मक बाबींविषयी. हा चित्रपट पु. लं.च्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतो. पुलंच्या आयुष्यात आलेल्या दोन-तीन ‘व्यक्ती व वल्ली’ (यात गटणे व बबडू) मागच्या भागाप्रमाणेच झलक स्वरूपात दाखवतो. प्रयाग हॉस्पिटलमध्ये पु. ल. अॅडमिट आहेत व त्यांना एकेक जण भेटायला येताहेत, या मागील भागातील फ्लॅशबॅक पद्धतीने याही भागात कथा पुढं सरकत राहते. पुलंच्या आयुष्यातील काही ठळक घटनांना ओझरता स्पर्श करून, तर काही घटना थोड्याफार विस्तृत स्वरूपात दाखवून कथा पुढे जाते. मात्र, हे सगळं पाहताना काही तरी ‘मिसिंग’ आहे, असं मला वाटत राहिलं.
याच्या कारणांचा विचार करताना वाटलं, की पहिल्या भागात सर्व व्यक्तिरेखांच्या आगमनाचं एक औत्सुक्य होतं. शिवाय मुळातच फारशा अपेक्षा नव्हत्या. त्यामुळं तो भाग एकदम जमून आल्यासारखा आवडून गेला होता. या भागात पु. ल. व सुनीताबाईंच्या व्यक्तिरेखांचं; तसंच याही भागात दिसणाऱ्या वसंतराव, भीमसेन, हिराबाई, कुमार गंधर्व याही व्यक्तिरेखांचं अप्रूप वाटायचं कारण नव्हतं. नवीन येणाऱ्या पात्रांबद्दल औत्सुक्य होतं. त्यात सखाराम गटणे व बबडू ही दोन पात्रं येतात. पैकी गटणे हे पात्र यात अर्धं-कच्चं असंच समोर येतं. बबडू हे पात्र गिरीश कुलकर्णीनं उभं केलंय. गिरीशच्या अभिनय कौशल्याबद्दल वाद नसला, तरी संपूर्ण सिनेमात हा बबडूचा प्रसंग अगदी ठिगळ लावल्यासारखा येतो. या उत्तरार्धाला एक सीरियस टोन लाभला आहे, त्यात तो अगदीच विसंगत वाटतो. बाकी मग अत्रे एका प्रसंगापुरते येतात, पं. नेहरूही दर्शन देऊन जातात, विजया मेहता दिसतात, बाबा आमटे येतात, बाळासाहेब ठाकरे येतात, भक्ती बर्वे येतात, अनिल अवचट दिसतात... अशी पुलंच्या आयुष्यातली त्या त्या वेळी महत्त्वाची असलेली पात्रं येतात आणि जातात. हे सगळं दर्शन ‘टिकिंग ऑल बॉक्सेस’ अशा स्वरूपाचं वाटतं. यातून पुलंच्या त्या त्या वेळच्या उत्तुंगतेची, मोठेपणाची कल्पना पूर्णांशानं येऊ शकत नाही.
शिवाय नुसतं ‘टिकिंग ऑल द बॉक्सेस’ तरी कुठं आहे? दिग्दर्शकानं जे दाखवलं आहे, त्यावरच टिप्पणी करावी; त्यानं हे का नाही दाखवलं, ते काही दाखवलं असं म्हणू नये, असा संकेत आहे. मात्र, पुलंच्या सिनेमाच्या बाबतीत प्रेक्षकाला किमान काय अपेक्षित असणार, हे सांगायला हरकत नसावी. यात पुलंनी ‘दूरदर्शन’ची नोकरी नोकरशहांच्या जाचाला कंटाळून सोडली, असं दर्शवणारं एक दृश्य आहे. यानंतर पु. ल. मित्रमंडळींना जमवून एक मैफल करतात. त्यानंतर मग त्यांच्या बहुरूपी प्रयोगांचा जोरदार कालखंड सुरू होतो. आता त्यापूर्वी पु. ल. दूरदर्शनची नोकरी दिल्लीत करीत होते आणि ती करताना ते सपत्नीक लंडनला गेले होते, हे या चित्रपटात कुठंच येत नाही. कारण त्यांच्या या दौऱ्यानंतर त्यांनी ‘अपूर्वाई’सारखं प्रवासवर्णन लिहिलं, जे आजही पुलंच्या उत्कृष्ट लेखनापैकी एक मानलं जातं. अगदी लंडन नव्हे, पण किमान ते तिकडं जाऊन आले, याचाही उल्लेख यात नसावा, हे खटकणारंच! १९६१ ते १९८५ हा पुलंच्या कारकिर्दीतला बहराचा काळ. त्यापैकी १९६२ ते १९७४ या काळात त्यांनी बटाट्याची चाळ, असा मी असामी, वाऱ्यावरची वरात आणि वटवट असे चार बहुरूपी प्रयोग केले. त्यांची इतर नाटकेही जोरात सुरू होती. यापैकी ‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा प्रारंभी व ‘ती फुलराणी’चा शेवटी उल्लेख येतो. भक्तीबरोबर पुलंच्या तालमी फार जोरदार झाल्या, असं तेव्हाची मंडळी सांगतात. त्याची झलक या चित्रपटात जरूर दिसते. मात्र, त्यांच्या परदेश दौऱ्यांचा उल्लेखही होत नाही, ही गोष्ट खटकलीच.
तीच गोष्ट भाईंच्या बंगालीप्रेमाची. पु. ल. वयाच्या ५० व्या वर्षी बंगाली शिकायला शांतिनिकेतनात गेले व काही महिने तिथं राहिले. या गोष्टीचा साधा उल्लेखही या सिनेमात येत नाही. माझ्या मते, इतर मराठी साहित्यिक  व पु. ल. यांच्यातला फरक अधोरेखित करणारी ही गोष्ट होती. ती यात अजिबात आली नाही. खेरीज पु. ल. नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले, नंतर १९७४ मध्ये इचलकरंजीत भरलेल्या सुवर्णमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले... यापैकी कशाचीच नोंद हा सिनेमा घेत नाही. मात्र, एका संगीत नाटकाच्या वेळी विजय तेंडुलकरांसोबतचा त्यांचा संवाद पुलंची एकूण कलात्मक दृष्टी दाखवण्यासाठी उपयोजिला आहे, तो प्रसंग जमला आहे.
या चित्रपटात कुमार गंधर्व आजारी असताना रामूभय्या दाते पुलंना फोन करतात व पु. ल. पुन्हा वसंतराव, भीमसेन, चंपूताई (हिराबाई बडोदेकर), माणिक वर्मा यांना घेऊन त्यांच्याकडे जातात, असा प्रसंग आहे. तिथं पुन्हा या सगळ्यांचं गाणं-बजावणं होतं व त्यानंतर कुमार पुन्हा गायला लागतात, असा तो घटनाक्रम आहे. तो ठीकच; मात्र नंतर सिनेमात उल्लेख येतो तो थेट कुमार गंधर्वांच्या निधनाचा. कुमार गेले १९९२ मध्ये. मात्र, त्यापूर्वी जवळपास नऊ वर्षं आधी पुलंचे अगदी घट्ट मित्र असलेले (व या सिनेमात ज्यांचा भरपूर वावर आहे असे) वसंतराव देशपांडे गेले, त्याचा उल्लेखही यात नाही. वसंतराव गेल्याचा पुलंना खूप जोरदार मानसिक धक्का बसला होता. त्यातून सावरण्यासाठी त्यांनी बा. भ. बोरकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम सुरू केला. त्या कार्यक्रमाची किमान एक झलक तरी यात पाहायला मिळायला हवी होती. असो. (अर्थात हे हवं होतं, ते हवं होतं, या यादीला अंत नाही हेही खरंच.)
आणीबाणीच्या काळात पुलंनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेली जोरदार भाषणे आणि नंतर सत्तावर्तुळापासून स्वत:ला विरक्तपणे दूर करणे, युतीच्या काळात त्यांना मिळालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार व नंतर बाळासाहेब ठाकऱ्यांसोबत झालेला वाद आदी प्रसंगही सिनेमा यथास्थित दाखवतो. (बाय द वे, मनोहर जोशींचं पात्र विनोदी दाखवून मांजरेकरांनी कुठला तरी मागचा वचपा काढलाय हे नक्की!)
पुलंचा दानशूरपणा, त्यांची समाजाप्रती असलेली सद्भावना यात चांगली दिसलीय हेही सांगायला हवं. फक्त पुलंनी रक्त गोळा करणाऱ्या ज्या बाईंना ते यंत्र देण्यास मदत केली, त्या बाईंचं नावच सिनेमात समजत नाही. (माझ्या माहितीनुसार त्या बाईंचं नाव मुळगावकर असं होतं. पु. ल. गमतीनं त्यांना ‘ही काय रक्तपिपासू बाई आहे!’ असं म्हणत असत.)
पुलंच्या निधनाच्या आधी काही रात्री मी स्वत: प्रयाग हॉस्पिटलमध्ये जात होतो. तेव्हा माध्यमांच्या प्रतिक्रिया मागण्याच्या घाईचा एक प्रसंग या चित्रपटात आलाय. त्या प्रसंगाचा मी स्वत: साक्षीदार आहे. गंमत म्हणजे चित्रपटात त्या माध्यमाचे नाव ‘म्यूट’ करण्यात आले आहे. हा खरोखर कहर आहे. पुलंना यावर एक विनोदी स्फुट सुचलं असतं, यात वाद नाही.
तेव्हा ‘भाई’चा पूर्वार्ध पाहणाऱ्यांना उत्तरार्ध पाहणं मस्टच आहे, हे खरं. फक्त फार अपेक्षा ठेवून जाऊ नका. अन्यथा अपेक्षाभंगाचं दु:ख वाट्याला येईल.
.....

दर्जा : तीन स्टार
----
(पहिल्या भागाच्या परीक्षणाची लिंक )

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. धन्यवाद , आज सकाळी मटा वाचल्यावर अंदाज आला होताच पण तुझा ब्लॉग अजून चांगल्या पद्धतीनं ह्या चित्रपटावर भाष्य करतो असं म्हणेन
    जानेवारीमध्ये पुण्यात असतांना पूर्वार्ध पहिला आणि खूप आवडला होता . इकडे परत जर्मनीत आल्यावर उत्तरार्ध बघता येणार नाही ह्याच थोडं वाईट वाटतं होत ...पण आता कदाचित नाही वाटायचं . असो .
    असो इकडे येताना पुलंची दोन पुस्तक गोळाबेरीज आणि अघळपघळ घेऊन आलोय ती वाचून काढतो आता. राहून गेलीयेत आतापर्यंत वाचायची
    लहानपणापासून जे पुलं मला माहिती आहेत आणि त्यांची जशी छबी डोक्यात आहे , तशीच राहू देत

    ReplyDelete
  3. पहिल्या भागातच अपेक्षाभंग झाला होता त्यामुळे दुसरा बघण्यावरच प्रश्नचिन्ह आहेत. तुमचे समीक्षण अतिशय नेमके असल्याने वाचून बरं वाटलं.

    बाकी त्या चित्रपटावर न बोललेले बरे.

    ReplyDelete